या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती.
समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे?
कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो. दरोड्याने मिळालेल्या संपत्तीचे दान स्वीकारणेही आपल्याला मान्य होणार नाही. वेश्याव्यवसायाच्या जवळ राहून प्रगत झालेल्या कलांबाबत मात्र आपण तसे म्हणत नाही. अंग विकणारी कलावंतीण आणि अंग विक्षेपणारी कलावंतीण या दोघी पुष्कळदा एकच असू शकतात. पुण्यात नाट्योपयोगी वस्तूंची दुकाने बुधवार पेठेत, वेश्यावस्तीशेजारी आहेत, हे पूर्णतया योगायोगाचे नव्हे. लावणी रसिकतेने ऐकणारा आणि गाणारीशी चाळे करणारा रसिक एकच असू शकतो. अशा प्रकारे वेश्याव्यवसाय ज्याला शिवतो त्याला ओवळे करत नाही, हे त्याचे वेगळेपण.
(स्मृतिग्रंथादी धर्मशास्त्रांत वेश्याव्यवसायाविरुद्ध फार कडक धर्मनियम नाहीत. शिवाय पुरुषांना एका स्त्रीशी निष्ठावान राहाण्याचे बंधनही नाही. वेश्या हा कुलस्त्रिया नसल्यामुळे त्यांच्यावरही काही बंधन नाही. त्यामुळे या नैतिकतेच्या चर्चेत आपल्या जुन्या परंपरांचा फारसा संदर्भ देता येत नाही.)
(वेश्या व्यवसायात रोगांची लागण होऊ शकते, हे खरे आहे. पण त्याच प्रमाणे टाक्यात न्हायल्याने नारूची लागण होऊ शकते. लागण होऊ नये अशी काळजी घेणे हा स्वच्छतेचा विचार आहे, नैतिकतेचा नव्हे. त्यामुळे वैद्यकीय विचार या चर्चेत अगदीच अप्रस्तुत नसला तरी गौण आहे.)
नीती-अनीतीबद्दल मला सुचणारी काही कारणे अशी :
१. अविवाहित व्यक्तींच्या ब्रह्मचर्यास धोका : पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे. ब्रह्मचर्य हे बर्यापैकी कठिण आहे, इतकेतरी मानण्यास जागा आहे. इतकेच नव्हे तर भोग हा स्थायीभाव आहे, आणि ब्रह्मचर्य अपवादात्मक आहे, असे मानण्यास जागा आहे. (ज्यांना भोगच नको असे संन्यासी प्रसिद्ध आहेत, ते वेगळे.) मग त्या अविवाहित व्यक्तीने लग्न का न करावे? काही कारणाने लग्न झाले नसणार, नाही का? ज्याचे लग्न तोंडावर आले आहे, त्यांच्या ब्रह्मचर्याला वेश्या फारसा धोका पोचवू शकणार नाही असे वाटते. आणि ज्याचे मनच ब्रह्मचर्यात नाही, तो कुणा दुसर्या व्यक्तीबरोबरही शरीरभोग घेऊ शकेल. त्यामुळे हे कारण मला पूर्णपणे ग्राह्य वाटत नाही, पण यात काही तथ्य असेल असे मानण्यास मी थोडाफार तयार आहे. तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय? काही म्हटले तरी हा त्या अविवाहित व्यक्तीच्या नैतिकतेचा प्रश्न जास्त आहे, व्यवसायाचा कमी.
२. विवाहित व्यक्तींच्या एकनिष्ठतेस धोका : हा प्रकार मला तितकासा समजत नाही. वेश्यांकडे जाणे हे तर पूर्णपणे वैकल्पिक आहे. विवाहित व्यक्तीला कोणी तिथे जाण्याची बळजबरी तर करत नाही. मग ही गिर्हाइकाची अनैतिकता म्हणायला पाहिजे, व्यवसायाची का म्हणावी? आणि म्हणूया (हे तरी का म्हणूया?) की घरच्या सुखापेक्षा विकतचे सुख अधिक असते, तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही.
३. वेश्यांची स्वतःची नैतिक मूल्ये ढळलेली असतात : या विचारपद्धतीत काही दम आहे. पण पुष्कळदा सत्य नाही. (याच संकेतस्थळावर "विसोबा खेचर" यांनी लिहिलेली "रौशनी" कथा वाचावी.) मुळात अनेकांशी शरीरसंबंध ठेवणे (त्यांना न फसवता) हे अनैतिक का, हे जोपर्यंत पटवता येत नाही, तोवर "हे आपोआप अनैतिक" असे म्हणता येत नाही. नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे.
४. हा व्यापार स्वतंत्रपणे झालेला नाही : (हे मला सर्वात जास्त पटलेले कारण आहे.)
४अ. वेश्याव्यवसायात पुष्कळ देशांत अपहरण केलेल्या, विकत घेतलेल्या मुलामुलींना कामाला लावतात. लहान मुला-मुलींना सारासार विचार करून निर्णय घ्यायची योग्यता आलेली नसते. त्यांच्याकडून काम करून घेणे हे त्यांच्या स्वातंत्र्यास घातकच आहे. शिवाय कोणाचेही अपहरण त्याचे स्वातंत्र्यहरण आहे, ते अनैतिक आहे. आणि कुठल्याही व्यक्तीचा दुसर्या मनुष्यव्यक्तीवर मालकी हक्क असणे, तो हस्तांतरित करणे अनैतिक आहे. (येथे प्रत्येकास स्वातंत्र्य असावे, आणि प्रत्येक मनुष्याचे मूल्य समानच आहे, ही तत्त्वे नैतिक गृहीतके म्हणून घेतली आहेत. तुम्हाला ती मान्य नसल्यास चर्चेत त्यांचे खंडन करावे.)
४आ. शिवाय या "बालविक्रय" तथ्यातून माझे बाजारशास्त्रीय निष्कर्ष निघतात. एक तर स्वखुषीने या व्यवसायात उतरणार्या लोकांची संख्या मागणीच्या मानाने कमी असली पाहिजे. अर्थातच शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत स्वतंत्र व्यक्ती मागेल त्यापेक्षा कमी दिले जाते. बाजारात मूल्य सरासरीने लावले जाते (कारण या बाजारात "उत्तम कौशल्या"ची यादी प्रसिद्ध होत नाही, सहज उपलब्ध होत नाही.) त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी. तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी.
तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)
पण हा असमतोल दूर केल्यास, बालकांचा उपयोग कडकपणे बंद केल्यास वेश्याव्यवसाय नैतिक होईल काय. माझे मत काय आहे? युरोपातील काही देशांत, अमेरिकेतील नेव्हाडा राज्यात, हा अभ्यास करण्यासारखा आहे. त्या देशांत, राज्यांत वावर करण्याइतपतही मला चक्षुर्वै ज्ञान नाही.
पण त्याच्या जवळपासचे ज्ञान इतपत आहे - (पैशांच्यासाठी) देहप्रदर्शन करणार्यांचे. यांची थोडीफार वैयक्तिक ओळख आहे. हेदेखील बहुतेक समाजांत अनैतिक मानले जाते - का ते मला माहीत नाही. हे आमच्या राज्यात कायदेशीर आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी अर्ज खुल्या बाजारात होतात. बाजार ठरवतो ती किंमत "नाचा"साठी मिळते. किंमत न पटल्यास त्या बारमध्ये कंत्राट न स्वीकारण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. काही कॉलेजमध्ये जाणारी गरीब (प्रौढ) मुले-मुली हा व्यवसाय काही काळासाठी स्वखुषीने स्वीकारतात.
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
विषय आवडला...
धन्याशेठ,
तुझ्या काथ्याकुटाचा विषय आवडला. इंटरेश्टींग आहे! :)
आता माझी मतं -
पण प्रदीर्घ ब्रह्मचर्य हे मोठ्या पोचलेल्या लोकांसच जमते, असे आपण ऐकून आहोत. आध्यात्मिक-नि:संगता नसून, स्त्रीभोग हवा असून, भोगाची संधी असून ब्रह्मचारी राहिलेला एक देवव्रत भीष्म आपल्या पुराणांत प्रसिद्ध आहे.
मी तर म्हणेन की भीष्मालादेखील स्वप्नदोष (झोपेतल्या झोपेत वीर्यस्खलन) झाला असणार. कारण मनुष्यप्राणी हा स्खलनशील आहे, आणि मेडिकल सायन्स प्रमाणे मनुष्य शरीर हे ठराविक काळापेक्षा अधिक काळ त्याच्या शरीरात तयार होणारे स्पर्मस रोखून ठेवू शकतच नाही. तेव्हा माझ्या मते भीष्म देखील ब्रह्मचारी नव्हता जर तो मनुष्यप्राणी असेल तर! आणि वीर्यस्खलन झाले की ब्रह्मचर्य संपले! मग भले ते १) स्त्रीशी संग येऊन होवो किंवा २) अपना हाथ जगन्नाथ हस्तमैथूनाने होवो किंवा झोपेतल्या झोपेत होवो! जी मंडळी १) व २) प्रमाणे वीर्यस्खलन रोखून धरू शकतात त्यांना निद्रावस्थेत ब्रह्मचर्यभंगाला सामोरे जावेच लागते लागते कारण मेडिकल सायन्सचा तसा नियमच आहे!
तरीही अविवाहित व्यक्तीने कोणाला भुरळ पाडून, फूस लावून भोग घेण्यापेक्षा नकद व्यवहार वापरून रोखठोक भोग घेणे सरस नाही काय?
माझ्या मते तरी नाही! कारण बाजारी नकद व्यवहारात रोगराईची भितीच अधिक असते. तेव्हा त्या वाटेला न जाणंच अधिक श्रेयस्कर! आणि मी म्हणतो की 'भुरळपाडून',' फूस लावून भोग घेणं' असं तुम्ही म्हणताय खरं पण भुरळ पाडून घेणार्याला किंवा घेणारीला ते समजायला नको काय? टाळी एका हाताने कधीच वाजत नाही!
तर वैवाहिक सुखाचे प्रशिक्षण नवविवाहितांना देऊन ही त्रुटी सहज दूर करता येण्यासारखी आहे. घरी नाचता येईना, म्हणून नृत्यशाळा अनैतिक! हे पटण्यासारखे नाही.
हा हा हा! धन्याशेठ, हा तू भलताच मुद्दा मांडला आहेस. यावर मला ठाम असं एक उत्तर देता येत नाहीये! :) कारण व्यक्तिश: माझ्याबद्दल बोलायचं झालं तर अद्याप तरी मी अविवाहीत आहे आणि अद्याप तरी कुणी कळकळीने माझ्यासमोर ह्या प्रशिक्षणाचा मुद्दा मांडलेला नाही! :)
बाय द वे, 'नवविवाहितांना प्रशिक्षण देऊन' असं तू म्हटलं आहेस, त्या ऐवजी अविवाहितांना विवाहाला वर्ष सहा महिने असताना पूर्वप्रशिक्षण देण्यास काय हरकत आहे? भावी वराची/वधूची याला संमती असेल तर फारच उत्तम! बाहेरचे ट्रेनिंग कोर्सेसही जॉईन करायला नकोत! :)
जोक्स अपार्ट, परंतु 'प्री मॅरिटल सेक्स' हा माझ्या मते महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या संदर्भात कुणा तज्ञाने मिपावर काथ्याकुटास सुरवात करावी असे वाटते. इथे या बाबत अधिक चर्चा केल्यास विषयांतर होईल!
नपेक्षा उत्तम प्रकारे शरीरसुख देणे हे एक कौशल्य आहे, आणि या कौशल्याचा प्रयोग करून दाखवताना तिकिट लावले, तर हा सामान्य व्यापार आहे.
आहेस खरा तर्कशुद्ध! :)
तुझ्या '४अ' या मुद्द्याशी मी पूर्णत: सहमत आहे....
त्यामुळे प्रौढांमध्येही कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी.
नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला!
बहुत करून काही श्रीमंत घरातल्या काही बायका नवर्याच्या अपरोक्ष खुलेआम नव्हे, तर ओळखी ओळखीत लपूनछपून दुसर्या पुरुषासोबत शैय्या करतात त्यांचे दर आवाच्या सव्वा असतात. माझ्या माहितीत अश्या काही चांगल्या घरंदाज, श्रीमंत, खात्यापित्या घरच्या अत्यंत देखण्या स्त्रीया आहेत! तसेच काही अभिनेत्रीही आहेत ज्यांचा उल्लेख मी रौशनीच्या एका भागत केलेला आहे!
अर्थात माझं वरील म्हणणं हे काही अपवादात्मक स्त्रीयांबद्दलच आहे. खुलेआम बाजार मांडून बसणार्या स्त्रीयांच्या बाबतीत तू म्हणतोस त्याप्रमाणे 'कौशल्याच्या मानाने शरीरभोगाच्या तिकिटाची किंमत त्यांना हवी त्यापेक्षा कमीच मिळत असावी' हे कदाचित खरंही असू शकेल!
तरी ही विक्री अगतिकतेने होण्याची अधिक शक्यता आहे. कंडोम न वापरल्यास अधिक शुल्क मिळते म्हणून धोका माहीत असूनही काही वेश्या त्याशिवाय कार्य करतात. आमच्या गावात अनेक शरीरभोग विक्रेत्या गर्द किंवा कोकेनच्या आहारी गेलेल्या असतात - नशेचा पदार्थ मिळवण्यासाठी केलेली ही देखील अगतिक आणि स्वातंत्र्यहीन विक्री मानावी.
तरी माझ्या मते (१) बालकांचा वापर आणि (२) प्रौढांच्या व्यापारातही गिर्हाईक-विक्रेत्यांत असमतोल, यांच्यामुळे सध्या चालणारा वेश्याव्यवसाय अनैतिक मानावा. (वेश्या व्यक्ती अनैतिक नाहीत, तर बाजारपेठ अनैतिक.)
सहमत आहे!
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
हा शेवटचा परिच्छेद अप्रतिम! विचार करायला लावणारा!
आपला,
(धन्याच्या बुद्धीमत्तेचा फ्यॅन!) तात्या.
नीतीमत्तेचे काही मुद्दे
सर्वप्रथम , धनंजय यांचे एका उत्कृष्ट लेखाबद्दल अभिनंदन - आणि मिसळपावचेही. धनंजय यांचा आपल्या या लाडक्या स्थळावरचा वावर म्हणजे या स्थळाचा मानबिंदू आहे असे विधान करणे धाडसाचे होणार नाही.
धनंजय यानी एका गुंतागुंतीच्या आणि अगदी जुन्या सामाजिक संस्थेविषयी उहापोह केला आहे. ('वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन्' असा उल्लेख वेश्याव्यवसायाबद्दल केला जातो.) त्यांच्या लिखाणाचे एक तात्पर्य असे असू शकते की शरीराचा क्रय आणि विक्रय या गोष्टी स्वत:मधे अनैतिक नाहीत (द ऍक्ट्स इन देमसेल्व्स आर नॉट अन्-एथिकल) .
धनंजय यांच्या लिखाणाचा अजून एक अर्थ "या व्यवसायाचा डिफेन्स" असा सुद्धा घेतला जाऊ शकतो. वेगवेगळे मुद्दे मांडून ते निर्विवादपणे सिद्ध करू पाहतात, की या व्यवसायाशी संबंधित असणारे इतर घटक अनैतिक , प्रसंगी सर्वात वाईट , नीच जातीचे गुन्हेगार असू शकतात , परंतु ज्या व्यक्ति (पक्षी : वेश्या) हा व्यवसाय करतात त्या व्यक्तिना अनैतिक म्हणता येणार नाही. पर्यायाने या व्यक्तिंच्या व्यवसायालाही अनैतिक म्हणता येणार नाही.
मला वाटते , अशा प्रकारचा डिफेन्स मांडायला धनंजय यांच्यासारख्या अतिशय बुद्धिमान वकिलाची गरज नाहीच. मुद्दा सोपा आहे. तो असा की, या व्यवसायात पडणार्या बहुतांश स्त्रिया या त्यांच्या परिस्थितीच्या शिकार असतात. (दे आर द विक्टिम्स ऑफ देअर डायर सर्कम्स्टान्सेस.) सर्व पर्याय उपलब्ध असताना वेश्याव्यवसायात उतरणार्या स्त्रिया किती टक्के स्त्रिया असतील यावर संशोधन होऊ शकेल ; पण कॉमन सेन्सने असे म्हणता येईल की, बहुतांश स्त्रिया इतर पर्याय उपलब्ध नसल्याने, बर्याचदा बळाच्या वापराने, किंवा कौटुंबिक-सामाजिक परंपरेने या व्यवसायात पडलेल्या असतात. ("पडलेल्या" असतात या क्रियापदावरूनच हे सूचित होते.) आणि यात आपण कायद्याच्या बंधनाच्या आतल्या मुलींचा मुद्दा बाजूला ठेवू - त्याना विक्रीस बसविणे सरळसरळ गुन्हा होय.
आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील.
पण कुठल्याही गोष्टीचा असा संदर्भविरहित अर्थ लावणे - विशेषतः नैतिकतेच्या दृष्टिने - अपुरेच ठरते. सर्व समाजात , सर्व काळात स्त्रियांचे शोषण होते. या शोषणाचा सगळ्यात वाईट बाय्-प्रोडक्ट म्हणजे दि वल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन.
तळटीप : मित्रानो, माझ्या लिखाणात इंग्रजी शब्द अति आले आहेत. या गोष्टीची मला शरम वाटते. मी अशी आशा करतो की एक दिवस असा येईल जेव्हा मी भेसळविरहित मराठीत लिहायला शिकेन. आमेन :-)
खरे तर..
धनंजय यांनी हा विषय काथ्याकुट या सदरात का टाकला याचाच मी विचार करते आहे. कारण त्यांनी विषय मांडणी इतकी सुंदर केली आहे की इथे चर्चेला जागाच नाही. मुक्तसुनित म्हणतात त्याप्रमाणे-
आदर्श समाजव्यवस्थेमधे - जिथे व्यक्तिच्या स्वातंत्र्याची शंभर टक्के जपणूक होईल , आपापल्या फ्री विल (मराठी शब्द ?) प्रमाणे वागण्याची मुभा जिथे प्रत्येकाला असेल , तेव्हा आपण्हून या व्यवसायात कोण पडेल ? या उत्तरातच धनंजय यांची उत्तरे सापडतील.
आणि जिथे उत्तरे मिळतात तिथे चर्चा कशावर करणार?
एक अतिशय विचार करायला लावणारा आणि सुंदर लेख लिहिल्याबद्दल धनंजय यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
(सर्वव्यापी)प्राजु
एका सर्वात जुन्या विषयाला हात
जगातल्या एका सर्वात जुन्या चर्चाविषयाला (पुन्हा एकदा) हात घातला गेला आहे.
नैतिक अनैतिक सर्व सापेक्ष झाले आहे.
जगभरातुन अनेक माहितीपट आले आहेत व सर्वात एकच कायम धागा दिसतो की या लोकांचे (बायकांची) फसवणूक, अत्याचार, शोषण. जर का ते थांबले तर या व्यवसायात सहभागी व्हायला किती जणी (जण) येउ शकतील याचे उत्तर मिळणे कठीण नव्हे.
मुक्त शारीरिक संबंधाला चालना मिळाली तर जर का हा व्यवसाय कमी होईल असे म्हणले तर पश्चिमात्य देशात हा व्यवसाय कमी व्हायला हवा पण तसे तर दिसत नाही. शिवाय मग मुक्त शारीरिक संबंधाचे तोटे दिसले (वैद्यकिय तोटे) आता भर सुरक्षित शारीरिक संबंधावर जास्त.
मधल्या मधे वेश्याव्यवसाय आहे तसा आहेच. उलट (चुकीच्या दिशेने) प्रगत होत आहे. जास्त पैसा येत आहे शेवटी मग पैसा, अज्ञान, पुरवठा, मागणी यांचा जोर वाढुन बाकी सगळे फोल.
व्यवसायाचे नाव काही असो सत्य फक्त शोषण, पैसा.
अनैतिकच
याच प्रकारचे स्वातंत्र्य वेश्याव्यवसायात असते, तर मी बहुधा त्याला नैतिक म्हटले असते असे मला वाटते. पण याबाबत माझे मन पूर्ण तयार नाही, कारण अंगप्रदर्शन हे शारिरिक इजा करणारे नसते. वेश्याव्यवसायात शारिरिक इजा (रोगराई) होऊ शकते. अन्य धोकादायक व्यवसायांइतके (खाणकामगार, अग्निशामक) धोक्याच्या तुलनेने शुल्क मागण्याचे स्वातंत्र्य शरीरभोग विकणार्यांकडे येऊ शकेल काय? नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
पटले! अन मी एक धाडसी विधान करु इच्छितो, वर उल्लेखलेल्या सर्व दोषांचे (ज्यामुळे हा व्यवसाय अनैतिक आहे) निर्मुलन जरी झाले तरी हा व्यवसाय अनैतिकच राहिल.
कारणः वेश्या व्यवसाय जितका जुना तितकाच माणुस हा कळपात रहाणारा प्राणी आहे हे ही सत्य खरे. आपली आजची समाजव्यवस्था ही पोट भरल्यानंतरच्या भुकांची वा मानसिकतेची (जसे प्रेम, भविष्याबद्दलची हवी असणारी निश्चितत) फलित आहे, असे मानण्यास जागा आहे. आयुष्याच्या प्रत्येक पर्वात सर्व सामान्य माणुस हा कोणत्या ना कोणत्या नातेसंबधांवर जगत असतो, जसे लहान असतांना आई वडिलांबरोबर, तारुण्यात प्रेयसी/सहचारिणी बरोबर, प्रौढावस्थेत सहचारिणी बरोबर, म्हातारपणात सहचारिणी अन मुलांबरोबर. आता या सर्व नातेसंबधात सुखी रहायला, अहंकार जपायला त्याने/ तिने व्यवसाय करणे गरजेचे असते, खाणकामगार सुद्धा कष्ट करतांना उद्याच्या सुखी आयुष्याचाच विचार करत असतो/ असावा. वेश्या व्यवसायात जेव्हा आपल्या समाजाचा बेस असणारी कुटुंबव्यवस्थाच जेव्हा बाद होते, तेव्हा हा व्यवसाय अनैतिक ठरतो असे मला वाटते. कारण बहुतांश वेश्यांना कुटुंबे नसतात/ होउ शकत नाहित, त्यांचे उत्तरायुष्य अत्यंत वाईट परिस्थितीत जाते परिणामी 'व्यवसाय' करण्याची कारणे फलित होउ शकत नाहित. प्लस काही प्रमाणात नादी लागलेल्या विवाहित पुरुषांचे सुध्धा संसार उध्वस्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय असावे.
चोरी जशी अनैतिक, ती या समाजव्यवस्थेच्या मॉडेलला पुरक नाही तसेच वेश्या व्यवसाय पण अनैतिकच तो ही पुरक नाही.
अनैतिक व्यवसाय..?
हा व्यवसाय अनैतिक जरी असला तरी या व्यवसायाला जन्म देणारे वि़कृत, षंढ (कितीही आणि कितीही खालच्या शिव्या दिल्या तरी अपुर्याच पडतील) पुरुष समाजात होते, आहेत आणि रहातील.
ते अशा ठिकाणी जाउन आपली XX XXX घेतात.
अशा व्यावासायिक स्त्रिया आहेत म्हणून कित्येक संभाव्य बलात्कार वाचतात / वाचत असतील. (माझा या विषयावर सखोल अभ्यास नाही, पण हे माझे वैयक्तिक मत आहे.)
ह्याला उपाय म्हणजे १००% सुरळीत समाजव्यवस्था आणि समाजाची १००% सात्विक मनोवृती - दोन्ही गोष्टी अशक्य आहेत!
मनस्वी
माफ
करा पण, तुम्हाला जर नैतिक असे वाटत असेल तर त्याची काही कारणे द्या ! म्हणजे आम्हाला (म्हणजे माझ्यासारखे मत असणार्या) कळेल तरी की हा व्यवसाय नैतिक कसा आहे ते !
माफ केले
प्रथम, मी हा व्यवसाय नैतिक आहे असे म्हटलेले नाही.
ह्या समाजात अनेक अनावश्यक नैतिक आणि आवश्यक अनैतिक व्यवसाय आहेत.
लाच घेणे/देणे, हुंडा घेणे/देणे, राजकारण (विशेषनाम नव्हे.. अनेक व्यवसायांतील राजकारण जे सहकार्यांबरोबर, कर्मचार्यांबरोबर खेळले जाते) असे अनेक समाजघटक आहेत पण बर्याचदा ते करणार्यांची प्रतिमा मात्र स्वच्छ असते.
वेश्याव्यवसायातही वेगवेगळे स्तर आहेत -
काही पैशांसाठी (तर तुम्ही म्हणाल की मग हाच व्यवसाय का.. दुसरे नैतिक व्यवसाय ती करू शकते उदा. एक अशिक्षित बाई भांडी घासणे, घरकाम करणे इ. कामे करू शकते. पण अशा बायकांवरही लांडगे टपलेले असतात. गरीब बाईमाणूस असल्याने काही बोलूही शकत नाही. आणि पाळणाघरात, लेडिज होस्टेलमध्ये प्रत्येक निराधार निरक्षर स्त्रीला काम मिळतेच असे नाही. {म्हणजे भांडीघासणे, घरकाम ही कामे करू नयेत असे मी म्हणत नाही.. तर ते व्यवसायही स्त्री साठी १००% सुरक्षित आहेत असे नाही.}),
काही भरपूर पैसा असून नुसतेच मजा करण्यासाठी (समाजातील उच्च स्तरातील बायका) ,
एखादी आई आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी,
एखादी पत्नी नवर्याच्या आजारासाठी,
काही गावी असलेल्या घरी पैसे पुरविण्यासाठी.. अशा एक ना अनेक स्तरातील स्त्रीया असतात.
तर प्रत्येक बाई ही आवडीने हा व्यवसाय पत्करत नाही.
माझे म्हणणे असे की हा व्यवसाय जरी अनैतिक असला तरी तो आणि असे अनेक व्यवसाय आता समाजाचा घटक आहेत.
("वेश्याव्यवसायारहित समाज" हे हवेहवेसे पण कायम स्वप्नच रहाणार आहे. कारण पुरुष.. ज्याच्या सुप्त भावनेने ह्यास जन्म दिला.)
वेळ आल्यावर सगळे पाठ फिरवतात. नातेवाईक मदत करत नाहीत.
मार्ग असतो, पण प्रत्येकीला वाईट वेळ आल्यावर सापडतोच असे नाही. काही वाटा चुकतात. वाटेवर यायची काहींकडे अक्कल नसते. म्हणून त्या अनैतिक नाहीत तर व्यवसायाचे मूळ - पुरुष अनैतिक.
तरी कृपया अशा अशिक्षित गरजू महिला ज्यांना समाजसेवी संस्थेकडे जायचे सुद्धा ज्ञान नसते, त्यांसाठी आपण नैतिक व्यवसायाचे पर्याय सुचवू शकता का?
मनस्वी
हा हा हा
आपण माफ केलेत आम्ही उपकृत झालोत.
आणी बहुतांश अशिक्षित गरजू महिला नैतिक व्यवसायच करतात असा आमचा आजवरचा अनुभव आहे, या कारणामुळे आम्ही कोणतेही पर्याय सुचवु शकत नाही.
धन्यवाद.
ही ही ही
अतिशय नैतिक उत्तराबद्दल धन्यवाद हं.
मनस्वी
माझे मत
"मला वेश्याव्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते," असे जवळपास कुणीही म्हणणार नाही१. हा 'धंदा' शोषणावर आधारित आहे. बहुतेकांना भुलवून, फसवून ह्या व्यवसायात आणले जाते. तर अनेकांना कमाईसाठी दुसरा कुठला चांगला पर्याय उपलब्ध झाला असता तर ते इकडे वळलेच नसते. त्यामुळे हा व्यवसाय, शोषणावर आधारित इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच, अनैतिकच वाटतो.
१.
तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?" असे एकाने विचारल्यावर एकीने "मला 'आयएएस ऑफिसर' व्हायचे होते/आहे," असेही सांगितल्याचा एक खरा किस्सा मला एकाने ऐकवला आहे. कदाचित ती 'हाय सोसायटी'ची असती तर तिला असा प्रश्न विचारण्याची हिंमत संबंधिताला झाली नसती. किंवा तिचे असे उत्तर देणे आम्हा खोटारड्या लोकांना हास्यास्पदही वाटले नसते. असो.
अनैतिक
नुसते वेश्या व्यवासायच का? धुणी भांडी करणार्या महिलांना देखिल हा प्रश्न (तुझी 'ऍम्बिशन' काय आहे/होती?)विचारला तर "मला हा व्यवसाय आवडतो, म्हणून मी ह्या व्यवसायात आले/आलो. लहानपणापासून माझे हेच स्वप्न होते" अहे कुणीही म्हणणार नाही.. कारण हे सर्व व्यवसाय समाजात फारसे प्रतिष्ठा नसणारे व्यवसाय आहेत इतकेच.. परंतू त्यामूळे ते 'अनैतिक' असलेच पाहिजेत असे मात्र नाही. धुणीवाली/ भांडीवाली ह्यांच्या कामाला कुणीही अनैतिक म्हणणार नाही!
शोषण तिथेही आहेच!
कोलबेर, धुणीवाली आणि भांडीवाला ह्यांच्या कामाला कुणीच अनैतिक म्हणणार नाही.
पण ह्या कामांत शोषण आहेच. ह्या बायांना भविष्यनिर्वाह निधी (प्रॉविडंट फ़ंड), ग्रॅच्युइटी (मराठीत काय म्हणतात), किमान वेतन मिळायला हवे. इतरांसारख्या सुट्ट्या मिळायला हव्यात. आम्ही ह्या गोष्टी देतो काय? नाही!
थोडक्यात दोन्ही ठिकाणी सेवा घेणारे अनैतिक कामच करीत आहेत आणि परिस्थिती जैसे-थे राहण्यास कळत-नकळत कारणीभूतही ठरत आहेत.
बरोबर...
बरोबर... धुणी वाली आणि वेश्याच कशाला..अगदी (काही) सॉफ्टवेअर कंपन्यांमध्येही हे शोषण चालते..आणि कसल्याही प्रकारचे शोषण हे अनैतिकच त्यात काहीही वाद नाही..पण म्हणून सरसकट संपूर्ण व्यवसायच अनैतिक म्हणता येईल का?..समजा वेश्या व्यवसाय कसलेही शोषण न होऊ देता चालवला तरीही तो अनैतिकच ठरेला का?
वेश्या व्यवसाय
१) कोठेवाली/घरवाली ही व्यावसायिक; वेश्या ही नोकरदार/गुलाम (अनुभवातुन तीच पुढे व्यावसायिक होउ शकते) आणि ग्राहक हा गिर्हाईक.
२) कुठलाही व्यवसाय हा ग्राहकांच्या गरजेतून निर्माण होतो.
३) नैतिक / अनैतिक, प्राकृत / विकृत सापेक्ष आहे
४) ही तुलना भुक लागली असता व घरात अन्न नसता उपहारगृहात जाणे, डबा लावणे किंवा उपाशी राहणे याच्याशी करुन पहा.
५) ही तुलना नाट्यनिर्माता , रंगकर्मी व मायबाप प्रेक्षक यांच्याशी करुन पहा
६) गणिका व्यवसाय हा पुर्वीपासुन आहे. योग्य/अयोग्य ही मतमतांतरेही पुर्वीपासूनच आहेत.
७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?
८) हा व्यवसाय नसता तर बलात्काराचे गुन्हे वाढले असते असे म्हणणे म्हणजे या व्यवसायाचे समर्थन करणे होत नाहि. तो प्रेशर कुकरच्या सेफ्टी व्हॉल्व सारखा आहे.
९) योनिशुचिता जशी गौण व्हायला लागेल तसा हा व्यवसाय वाढीस लागेल
१०) वेश्यांच्या जागी आपल्या आया बहिणि असत्या तर? याचे चित्र डोळ्या समोर आणा. असे करताना स्वामी विवेकानंद यांची शिकागो ला वेश्यावस्तीकड फेरफटका मारताना " या तर आमच्या भगिनी आहेत" या बोधकथेतील वाक्याची आठवण करुन पहा.
११) http://www.misalpav.com/node/114 इथ 'पोटाला नाही आटा अन चोटाला उटण वाटा 'इथे ओशाळणारी अश्लिलता आठवते.
१२) क्या करें शेवटी अपना अपना हाथ अपना अपना जगन्नाथ
प्रकाश घाटपांडे
माझेही मत..
अंमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि बायका, हे कायमच नफा देणारे धंदे होते आणि आहेत.
युरोपातील वेश्याव्यवसायावर ही एक थरारक documentary आहे.. आपल्याकडे जे नेपाळमधे किंवा गरीब राज्यांत होते तेच पूर्व युरोपातही होते.
येथे
नैतिकतेच्या गप्पा मारण्याआधी अवश्य पहा.
पण अधिक पैशांसाठी (गरजेपोटी नव्हे!) धंदे करणार्या कॉलेजातील पोरी अथवा डेली सोपमधील नट्यांचा उपभोग घेण्यात गैर आहे असे मला वाटत नाही.
अनिकेत
प्रतिष्ठा मिळेल का ?
नैतिक, अनिकतेचा विचार करण्याअगोदर आमचे मत असे आहे की, वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा नाही. जशी श्रमाला प्रतिष्ठा आहे,त्या प्रमाणे. ती मिळाली की नैतिक, अनैतिक राहणार नाही असे वाटते. पण, व्यवसाय म्हणतांना वेश्यांना आर्थिक गरजा भागवता येत नाही, म्हणुन त्या वेश्या व्यवसाय करतात. जर आर्थिक संपन्नता असेल तर त्या या गोष्टीकडे वळल्या असत्या का ? याचे उत्तर मला तरी 'नाही' असेच वाटते. ती सामाजिक गरज असेलही पण प्रतिष्ठा नसल्यामुळे मोठ मोठ्या मॉल्स मधे माणूस जितक्या सहजपणे प्रवेश करतो तितक्या सहजपणाने वेश्येच्या वस्तीत प्रवेश करण्याचे धाडस करतो का ? 'नाही'. म्हणुन समाधानासाठी ( आर्थिक सुबत्ता इथे प्रश्न नाही ) येणार्या स्त्रिया वेगळ्या. पण अधिक नफ्यासाठी व्यवसायात येणार्या या गरजू स्त्रिया आहेत, आणि त्यातही उच्च गरजा पूर्ण करण्यासाठी या अशा व्यवसायात तरुण मुली, स्त्रिया दिसतात. पण,योनिशुचिता ही व्यवसायातील/ बाजारपेठेतील मुख्य अडचण असल्यामुळे येत्या काळात वेश्या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळेल आणि तीही भारतात यावर माझा तरी विश्वास नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्राहक नाकारण्याचा हक्क?
वस्तूंच्या अगर सेवा पुरविण्याच्या व्यवसायात आणि या व्यवसायात एक मोठा फरक आहे. तो म्हणजे शरीराच्या मर्यादा व मनाचे आस्तित्त्व . या मर्यादांमुळे तिला ग्राहक नाकारण्याचा हक्क असायला हवा. असे या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पाच फूट उंच व ४० किलो वजनाच्या स्त्रीकडे १२५ - १५० किलो वजनाचा सहासाडेसहा फुटी माणूस किंवा गलिच्छ किळसवाणा पण भरपूर पैसे मोजायला तयार असणारा श्रीमंत माणूस, पोलीस, गुंड वगैरे व्यक्ती आली तर तिने काय करावे?
४अ मुद्याबाबत बहुतेक लोक सहमत होतील.
असो. एक चांगली चर्चा.
धन्यवाद.
चर्चेत वेगवेगळे विषय
आणि नवीन मुद्दे आले आहेत. असे वेगवेगळे विचार वाचून चर्चा प्रगल्भ होत आहे.
तात्यांनी उल्लेख केलेला विवाहपूर्व संबंधांचा मुद्दा अवांतर नाही. अविवाहित व्यक्तीला लबाडीने भोग घेणे आणि विकत भोग घेणे हे दोनच पर्याय नाहीत. दोघांच्या स्वातंत्र्यास धक्का न देता, दोघांच्या भावनांची कदर करून, दोघांच्या गरजा भागवणे हा पर्याय आहेच. या बाबतीत "दोघांच्या भावनांची कदर, स्वातंत्र्य" यांना मी बर्यापैकी कडक निकष लावतो तो मागे एका कवितेत चर्चिला आहे. हा पर्याय असणे माझ्या विचारधारेला समर्थन देतो - कारण हा राजमार्ग असताना जो अविवाहित व्यक्ती वेश्याबाजारामुळे चळतो, तो त्याच्या इच्छेने, वेश्याबाजाराच्या अनैतिक भुरळीमुळे नाही.
काही वेश्यांना पुष्कळ शुल्क मिळते हे खरे आहे. कालच न्यू यॉर्क राज्याचे राज्यपाल गोत्यात अडकले (दुवा) त्या ठिकाणच्या वेश्या ताशी १०००-५००० डॉलर दर लावत. अशा वेश्यांना बहुतेक नकाराधिकाराचे, किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य असावे. येथे राज्यपाल स्पित्झर हे विवाहित आहेत की नाहीत, त्यांच्या कुटुंबसंस्थेवर काय परिणाम होत आहे, हे बघण्याची मुख्य जबाबदारी स्पित्झर यांचीच आहे, ते जिला भेटले त्या "क्रिस्टेन"ची (विक्रेती म्हणून) नव्हे. जर हा बाजार खरोखर मुक्त आणि स्वतंत्र व्यक्तींमधला असेल तर हा माझ्या आर्थिक चर्चेतून निसटतो. तो मी केलेल्या वेगळ्या चर्चेत याच्या नैतिकतेचा विचार व्हावा - त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांस पूर्ण माणुसकीने वागवत आहेत की नाहीत. तेही होत असेल - कोणी कोणाला जनावर किंवा वस्तू म्हणून वागवीत नसेल तर या विषयाबद्दल मला वेगळे कुठले नैतिक कुतुहल नाही.
तरीही हा अपवादात्मक, दुर्मिळ मालाचा व्यापार आहे. माझा मुख्य मुद्दा बहुसंख्य वेश्यांबद्दल आहे, ज्या पूर्ण स्वातंत्र्याने व्यापार करत नाहीत.
मुक्तसुनीत म्हणतात (शिवाय वेगळ्या शब्दांत प्राजु, चित्तर, अनिकेत यांनी दिलेली चित्रफीत, म्हणतात) की पर्याय उपलब्ध असताना हा पेशा कोणीही स्वीकारणार नाही. यात बळजबरी, किंवा अगतिकता आलीच. (याला अपवाद स्पित्झर यांस विक्रय करणारी, वगैरे असेल - आपल्याला माहीत नाही.) मीही तो अगतिकतेचा मुद्दा आर्थिक ताळमेळ लावून करू इच्छितो. तो मुक्तसुनीत म्हणतात तसा सोपा नाही. मागे मुंबई पोलिसांनी "सोडवलेल्या" काही वेश्यांबद्दल ऐकले होते. त्यांचे म्हणणे होते की आम्ही स्वखुषीने धंदा करत आहोत. सोडवणूक नको होती. अनिकेत यांनी दिलेल्या चित्रफितीतही काही वेश्यांचे असे मत होते, की जर इंग्लंडमधून हद्दपार होणार असतील तर गुलामगिरीतून सोडवणूकच गैरसोयीची. (इथे अगतिकता थेट दिसते, पण मुंबईत सोडवलेल्या वेश्यांच्या बाबतीत ते स्पष्ट दिसत नव्हते.) माझ्या समान मनुष्य म्हणून त्या "आपखुषी" वेश्यांची साक्ष खरी मानण्यास माझी तयारी असलीच पाहिजे. दुसर्या कुठल्या बाबतीत थोडाफार अगतिक असल्याचा माझा अनुभव आहे, म्हणून त्यांचे "आपखुषीचे" विश्लेषण करू इच्छितो. आर्थिक गणित करून त्यांचा बाजार स्वातंत्र्याचा नाही हे दाखवतो. सर्वच वेश्या आपण नाखुषीने या धंद्यात आहोत अशी तक्रार करत असतील (म्हणजे कारकूनही तक्रार करतात, त्यांपेक्षा जास्त!) तर या लांब सिद्धतेची गरज नव्हती. मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही (टंकनदोष सुधार केला).
सहज आणि काही वेगळ्या पद्धतीने प्रकाश घाटपांडे विचार करतात की येथे नैतिक/अनैतिक सापेक्ष आहे, किंवा होऊ लागले आहे. त्या दोघांच्या बहुतेक मुद्द्यांचा मी स्वीकार करत असलो तरीही पूर्ण सापेक्षता नाही असे माझे मत आहे. अधिकाधिक सापेक्षता मानूनही नैतिकतेचा विचार केला जाऊ शकतो, असे मला या चर्चेत म्हणायचे आहे. स्वातंत्र्यहरण आणि मनुष्य-मूल्य-समानता (मूल्य=किंमत) या सापेक्ष मानू नयेत, असे मला वाटते. या नैतिक मूल्याला (मूल्य=तत्त्व) इंग्रजीत गोल्डन रूल असे म्हणतात. "जसे माझ्याशी वागणे इष्ट तसे सर्वांशी वागणे इष्ट, जसे माझ्याशी वागणे अनिष्ट तसे सर्वांशी वागणे अनिष्ट". "इष्ट" म्हणजे मला जपणे, एक स्वतंत्र मनुष्य म्हणून मला स्वस्त न करणे. हे कमीतकमी तत्त्व सापेक्ष मानू नये.
बाकी प्रकाश घाटपांडे म्हणतात तसे वेश्यांना आयाबहिणी मानूनच त्यांच्या व्यापारातील स्वातंत्र्याचे विश्लेषण करतो आहे. "७) आपली बुद्धी सेवामुल्य आकारुन वापरु देणे आणि आपले शरिर सेवामुल्य आकारुन वापरु देणे यात तत्वतः फरक काय?" हे अगदी चपखल माझे तर्कशास्त्र आहे - फक्त माझा निष्कर्ष आहे की विद्यापीठाशी वाटाघाटीत माझ्या बुद्धीचे मूल्य ठरवण्याचे मला जितपत स्वातंत्र्य आहे, तितके स्वातंत्र्य शरीरविक्रीच्या वाटाघाटीतही असले पाहिजे. माझ्या गणिताप्रमाणे तितके स्वातंत्र्य नाही, त्याहून खूपच कमी आहे, त्यामुळे ती बाजारपेठ अनैतिक मानावी.
सहज विचार करतात की मुक्त शरीरसंबधाची मुभा असलेल्या पाश्चिमात्य देशांत वेश्याबाजार अजून कार्यरत का? त्याचे कारण हे असावे की मुक्त (मोफत) भोग घेणारे व्यक्ती आणि विकतचा भोग घेणारे व्यक्ती बहुधा वेगवेगळे असावेत. "मोफत" शरीरभोग घेण्यात भावनांचा, वेळेचा खर्च करावा लागतो, हे विसरता कामा नये. तो खर्च करण्यास जे असमर्थ आहेत, त्यांना कदाचित रोख व्यवहारच सोपा जात असावा.
मनस्वी आणि घाटपांडे "या सेफ्टी-वाल्वमुळे काही संभाव्य बलत्कार टळतात" त्याच्याकडे लक्ष वेधतात. हा मुद्दा वेश्याव्यवसाय या संदर्भात लागू तर आहेच. पण नैतिकता या संदर्भात लागू नाही असे तेही म्हणतात, ते योग्यच.
मनस्वी अन्य कामधंद्यासाठी मुभा नसलेल्या स्त्रियांच्या अगतिकतेबद्दल सांगतात. पण या अगतिकतेमुळे त्या कामाला लागलेल्या स्त्रियांना शुल्क ठरवायचे स्वातंत्र्य नाही हे त्यांचे मत आहे, असे त्यांच्या लिखाणावरून मी समजतो.
प्राडॉ मुद्दा उपस्थित करतात की या श्रमाला प्रतिष्ठा नाही; योनिशुचितेचे स्तोम आहे, याची आठवण देतात. सुधीर कांदळकर सांगतात की सेवा पुरवण्याबाबत नकाराधिकार असल्याशिवाय हा व्यवसाय अन्य व्यवसायांपेक्षा जाचक आहे, हे पटण्यासारखे आहे. कोलबेरही श्रमबाजाराची नैतिक तत्त्वे लागू व्हावीत, अशा मताचे दिसतात.
सर्वांपेक्षा आनंदयात्री वेगळा दृष्टिकोन आणतात. त्यांचे मत असे की वेश्याव्यवसाय हा समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कुटुंबसंस्थेला घातक आहे. यातही ते दोन्हीकडून विचार करत आहेत ही त्यांच्या विचारातील प्रगल्भता आहे. वेश्येला कुटुंबसुख नकारले जाते हा त्यांचा मुद्दा एक आगळीवेगळी सहानुभूती दाखवतो. वेश्येला जोडीदार-पती मिळण्याचे सौख्य नाही, हे व्यापाराच्या दृष्टीने सक्तीचे नाही, तरी आजच्या समाजातली परिस्थिती आहे. शारिरिक इजेसारखी ही मानसिक इजा आहे. अशा प्रकारची प्रीति-वैफल्याची मानसिक इजा काही थोड्याच काही व्यवसायांत होते. कुठल्याकुठे वर्षानुवर्षे पोस्टिंग झालेले सैनिक, खतरनाक व्यवसायामुळे षंढत्व आलेले कामगार, वगैरे. या कामगारांना या इजेच्या बदल्यात ज्या प्रकारचा मोबदला मिळतो, तितपत मोबदला वेश्येला मिळाला नाही, तर तो व्यापार योग्य मूल्याचा कसा म्हणावा. (वर तात्यांनी उल्लेखलेल्या उच्चवर्गीय वेश्यांना जोडीदार-पतीचे सुख मिळत असते, ते अपवादात्मक. तसेच प्रसिद्ध सिनेनट-नट्यांना पुढे जोडीदार करता येत असावा. पण त्यांचे सेवाशुल्क बघितल्यास व्यापारातील त्यांचे स्वातंत्र्य, नकाराधिकार, वगैरे बाजारबसव्यांपेक्षा अधिक असतो हे दिसते.) वेश्यागामी व्यक्तीचे कुटुंब उद्ध्वस्त होते, हा दुसर्याबाजूनेही आनंदयात्री विचार करतात, तो योग्यच. पण त्याविषयी वरील लेखात मी थोडक्यात ऊहापोह केलेला आहे. एक मुख्य की त्यांचे मुद्दे व्यक्तींच्या कुटुंबाचा घात होण्याबद्दल आहेत. समाजात कुटुंबव्यवस्था नष्ट होण्याबद्दल नाहीत. दुसर्या कोणाचे तेही मत असू शकते. पण वेश्याव्यवसाय हा पूर्वापारपासून चालत आलेला आहे, हे चर्चेत अनेकांनी नमूद केले आहे (वर्ल्ड्स ओल्डेस्ट प्रोफेशन). त्या अर्थी वेश्याव्यवसाय हजारो वर्षांत समाजातील कुटुंबव्यवस्थेला नाहिसे करू शकला नाही, त्यात तेवढी शक्ती नाही, हे उघडच आहे.
मला वाटत होते की केवळ "अनेकांशी भोग भोगणे अनैतिक हे गृहीतक मानावे" असे म्हणणारे कोणी चर्चेत सहभागी होईल. त्यांच्याशी माझा वेगळा वाद झाला असता - बहुतेक एकमेकांचे मुद्दे पटले नसते. पण तेही उद्बोधक ठरले असते.
उत्तम गोळाबेरीज
>>> मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक आहे.
या ऐवजी
मुक्तसुनीत म्हणतात त्याप्रमाणे हा बाजार स्वयंसिद्ध अनैतिक नाही.
असे वाचावे.
चर्चा उत्तम
कालपासून चर्चा वाचत असलो तरी प्रतिसाद देण्यासाठी वेळ मिळाला नाही. चर्चेचे प्रस्तावक आणि संचालक श्री. धनंजय यांनी चर्चेचा गोषवारा घेतल्यामुळे चर्चा संपली की काय अशी शंका आली.
परंतु विषय फारच व्यापक असल्याने ती पुढे सुरू राहील असे वाटते. म्हणून माझेही मत -
चर्चा 'वेश्या व्यवसायाची नैतिकता/अनैतिकता' या विषयावर सुरू असली तरी केवळ स्त्री वेश्यांपुरतीच मर्यादित राहिली काय अशी शंका येते.
वेश्यांमध्ये लिंगपरत्वे तीन प्रकार आहेत -
पुरुष वेश्या - (जिगोलो), क्लीब वेश्या आणि स्त्री वेश्या.
हे तीन्ही व्यवसायप्रकार फार पूर्वीपासून चालत आलेले आहेत.
शिवाय समलैंगिक वेश्यावृत्ती आणि विषमलैंगिक वेश्यावृत्ती यांच्याबाबतही विचार झाला पाहिजे.(केवळ समलैंगिकता या विषयावर अथवा मानसिक लैंगिकता या विषयावर वेगळी चर्चा होऊ शकेल.)
माणूस हा विचारशील असला तरी प्राणी आहे. :) वंशसातत्य टिकवणे हा त्याच्या अस्तित्वाचा इतर सर्व जीवसॄष्टीप्रमाणे एक प्रमुख (कदाचित एकमेव) हेतू आहे. आणि त्यामुळे त्याला शारिरिक आणि मानसिक लैंगिक गरजा असणारच. शिवाय समलैंगिकता अनेक प्राण्यांमध्येही आढळते. निसर्गतयः अनेक भागिदारांशी संबंध ठेवण्याची प्रवृत्ती प्राण्यांमध्ये दिसते.या सर्व संबंधांत पशूनरांची अनेक पशूमाद्यांशी संबंध जास्त आढळतात. याउलटही काही उदाहरणे आहेत.
या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करण्याची 'गरज' माणसानेच निर्माण केली आहे. कारण केवळ पशुत्वाप्रमाणे संबंध नियंत्रित केले असते (किंवा अनियंत्रित ठेवले असते तर) तर मानवसमाजातील अनेक कमजोर, दुबळ्या नरांना त्यांचे वंशसातत्य टिकवणे अशक्य होऊन बसले असते.
याशिवाय अनेकसंबंधी लैगिक वर्तनामुळे शारिरिक रोगांचेही प्रमाण वाढून समाजाचा र्हास होण्याची शक्यता मानवाने पूर्वीच हेरली असावी. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे एकूणच लैंगिक नैतिकता (पक्षी -समाजाने मान्य केलेले शरीरसंबंध) ही मानवसमाजाच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनातून निर्माण झाली आहे.किंबहुना विवाहसंस्थेचे मूळही यातच आहे.लैगिक अनैतिकता हा सर्वाधिक सामाजिक तुच्छ्तेचा आणि घृणेचा विषय आहे.
Morality: the character of being in accord with the principles or standards of right conduct; right conduct; sometimes, specif., virtue in sexual conduct
त्यामुळे एकाद्या व्यक्तीच्या विवाहबाह्य, विवाहपूर्व अथवा समलैंगिक संबंधांकडे समाजाने अनैतिक म्हणून पहाणे स्वाभाविकच आहे. वेश्याव्यवसाय यात मोडतो हे स्पष्टच आहे.
परंतु कोणत्याही गरजा विचारांच्या सहाय्याने काबूत ठेवायच्या किंवा नाही ते प्रत्येकाच्या विचारांवर अवलंबून असते. काही लोकांच्या गरजा विचारांवर मात करण्याइतक्या प्रबळ असू शकतात. तर काही लोकांना मिळणारे प्रलोभन हे विचारांवर मात करणारे असते.
हे केवळ लैंगिक गरजांबाबतच नव्हे तर इतरही सर्व गरजांना लागू होते. यातूनच सामाजिक हिताची नैतिकता भंग होण्याची शक्यता निर्माण होते. (इथे पुलंचे रावसाहेब आठवतात - 'तुम्ही पण शहाणेच की वो! म्हणे चोरी कशाला करायची, मागून घ्यायचे...'किंवा 'घरी एक चांगलं सुख मिळत असलं तर माणूस बोगारवेशीत कशाला जातंय वो?')
Ethics: the system or code of morals of a particular person, religion, group, profession, etc.
त्यामुळे एखाद्या माणसाने स्वतःचे वर्तन हे नैतिक किंवा अनैतिक ठरवणे हा ज्याचात्याचा अधिकार आहे.
असा गुंतागुंतीचा मामला आहे.
माझ्या मताप्रमाणे ज्यांना (दोन्ही भागीदारांना) या प्रकारच्या व्यावसायिक शरीर संबंधात मानसिक/लैंगिक सुख आणि/किंवा आर्थिक फायदा मिळतो असे वाटते, कुणाचेही (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही, म्हणून (पर्यायाने) जे आपखुषीने हा संबंध करतात त्यांच्यासाठी तो व्यवसाय नैतिक मानायला हरकत नसावी. (उदा. उच्चभ्रू स्त्री वेश्या, पुरुष वेश्या आणि क्लीब वेश्या.) अलेक्झांडरसारख्या पुरुषाबरोबर हेफायस्तियनचे समलैगिक संबंध होते. हेफायस्तियन हा एक प्रकारे पुरुष वेश्याच होता असे म्हणावे लागेल. तसेच काही देशात/प्रांतात (जसे गोवे - भाविणी) वंशपरंपरेने काही स्त्रिया हा व्यवसाय करतात. त्यात त्यांच्या आर्थिक फायद्याचा मोठा वाटा असतो. 'राख' हा प्रकारही याच पद्धतीचा आहे.
अर्थात या भागिदारांमधील एक किंवा दोन्ही विवाहित असतील तर त्यांच्या इतर (वैवाहिक) भागिदारांचे या व्यावसायिक संबंधांमुळे (आर्थिक, शारिरीक अथवा मानसिक) नुकसान होत नाही ना? याचाही या नैतिकतेच्या व्याख्येत विचार करावा लागेल.
पण व्यावसायिक शरीर संबंधात जर कोणत्याही बाजूचे (आर्थिक, शारिरिक, मानसिक) नुकसान होत असेल तर मात्र तो अनैतिक आहे असे म्हणावे लागेल.बारबाला या कितीही उत्कृष्ट नृत्यांगना असल्या तरी त्यांच्या नृत्यातला शारीरभाव आणि कामुकता यांचा वापर त्या आर्थिक फायद्यासाठी करत होत्या हे उघड आहे. त्यामुळे अनेक पुरुषांचे आर्थिक नुकसान झाले. म्हणून तो व्यवसाय अनैतिक. केवळ अंधश्रद्धेमुळे (जसे जट आली म्हणून देवदासी) एकाद्या व्यक्तीला तिच्या मनाविरुद्ध/ तिला न कळता या व्यवसायात ढकलणे अनैतिक. गरीबीमुळे एखाद्या मुलीला तिच्या मनाविरुद्ध हा व्यवसाय करायला लावणे अनैतिक. वेश्येच्या संबंधांमुळे जर लैंगिक आजार होणार असतील तर ते अनैतिक. रखेलीमुळे वैवाहिक जीवनात पत्नी, मुले यांची आर्थिक, मानसिक कुतरओढ झाली तर ते अनैतिक.अशी अनेक उदाहरणे देता येतील.
सध्या इतकेच. श्री. धनंजय आणि इतरांची मते कळावीत.
अवांतर - वेश्याव्यवसाय या विषयावर 'मी मराठी' या वाहिनीवर झालेल्या चर्चेत 'सेफ्टी व्हॉल्व' या संकल्पनेवर झालेली मार्मिक टिप्पणी अशी-
'ज्यांना हा सेफ्टी वॉल्व वाटतो त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना उदार अंतःकरणाने हा सेफ्टी व्हॉल्व बनण्याची परवानगी द्यावी. त्यांचे समाजावर अगणित उपकार होतील. '
(ही माझी टिप्पणी नव्हे. कोणावरही व्यक्तिगत रोख नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माफी असावी.)
समांतर चर्चा
हे अवांतर नसुन मला तर समांतर वाटते.
मी मराठी वरील ही चर्चा मी पाहिली नाहि. पण अशा प्रकारची मते नवीन नाहीत. आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव प्रतिवादकाच्या चेहर्यावर नक्कि असणार. "एवढा गरिबीचा कळवळा आहे तर आपल्या घरातील संपत्ती का नाही वाटून टाकत?" "एवढा पुळका आहे तर स्वतःच्या घरात ठेउन घ्यायचे!" "आम्ही काय अन्नछ्त्र उघाडल नाय, यवढ आसन तर सोताच्या घरात जेवायला बोलावचं" वगैरे वगैरे सदृश विधाने आपण नेहमी ऐकत असतो. जंगल कमी झाल्यावर बिबटे मानवी वस्तीत शिरतात. पाण्यासाठी ,अन्नासाठी; प्रजोत्पादनासाठी नव्हे. मग बिबट्यांच्या नावे हाकाटी होते. "एवढी बिबट्याच्या भुकेची काळजी आहे तर आपली मुल जाउ द्यात कि बिबट्याच्या तोंडात?" अशी पण चर्चा सुरु होउ शकते.
"समजा ज्यांना हा सेफ्टी व्हॉल्व वाटत नाही त्यांच्या घरातील स्त्रिया समाजातल्या पुरुषी कामांधतेला बळी पडल्या तर?" असाही प्रश्न उपस्थित होतो. या आहेत म्हणुन आपल्या आयाबहिणि सुखाने जगताहेत (त्यातल्या त्यात) . स्वामी विवेकानंदांनी म्हणुन तर त्यांना भगिनी म्हटलं . अस मानणारा एक लोक प्रवाह आहे.
मुरळ्या, देवदासी या समाजातील धर्मलंडांची सोय व्हावी म्हणुनच निर्माण झाल्या. त्याला 'द्यवाची शेवा' असा धार्मिक पाठिंबा दिला.
मूळ प्रश्न असा आहे कि लैंगिक भुक भागली नाही म्हणुन माणुस मरत नाही. पण लैंगिक भूक हि नैसर्गिकच आहे. ती शमली नाही तर समाज स्वास्थ्य टिकेल का? असा आहे.
प्रकाश घाटपांडे
खरे आहे -
आपल्या वाक्चातुर्याने कसे गपगार केले असा आविर्भाव चेहेर्यावर होताच.
चर्चेतले एक ऐकीव मत (माझे नव्हे) म्हणून अवांतरमध्ये नोंदवले. आपलेही मत ग्राह्य आहेच.
स्त्री/पुरुष/क्लीबसाठी एकच नैतिक नियम असावा
तुमच्या पुढील म्हणण्याशी सहमत :
वेश्याव्यवसायाच्या बाबतीत नैतिक गणित करत असताना या तीन प्रकारच्या शरीरविक्रेत्यांत मूलभूत फरक करून काही हशील नाही. पण तपशिलांत फरक येऊ शकेल. सामाजिक गुप्ततेमुळे आर्थिक/मानसिक/शारिरिक फायद्या-तोट्याचे गणित तिघांमध्ये वेगवेगळे येऊ शकेल. त्यामुळे एखादी बाजारपेठ कमीअधिक प्रमाणात अन्याय्य असू शकेल.
या चर्चेत मी बहुतेक शरिराच्या क्रय-विक्रयाबाबत विचार केला आहे. त्यामुळे बाजार मुक्त की नाही, विक्रेत्याला आणि ग्राहकाला किंमत ठरवण्याचे किंवा नकारण्याचे स्वातंत्र्य आहे की नाही, अगतिकतेमुळे अयोग्य किंमत ठरवली जात आहे की नाही, या निकषांवर न्याय-अन्याय ठरवता येतो.
क्रय-विक्रय नसला तर माझ्या मते लैंगिक संबंधांच्या नैतिकतेचे वेगळे निकष असावेत - कारण बाजाराच्या दृष्टीने विश्लेषण करता येत नाही. मग ते विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध कुठले का असेनात.
बाजारात आपल्याला बराच थोड्या वेळाचा, मुदतीचा विचार करावा लागतो. देण्या-येण्याचा हिशोबखाते किंमत भरल्यानंतर सामान्यपणे बंद केले जाते. (किंवा किंमत आगाऊ दिल्यास सेवा पुरवून झाल्यानंतर हिशोबखाते बंद केले जाते.)
पैशांचे हस्तांतरण होत नसेल तर हिशोबाच्या खात्याची मुदत लांब असते. त्यामुळे नैतिकता ठरवण्यासाठी सामान्य बाजाराचे निकष वापरता येणार नाहीत. तेही मूलभूत निकष विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक संबंध सर्वांनाच सारखे असावेत. कोणाचेही मानव्य मूल्य स्वस्त होता कामा नये. सामाजिक परिस्थितीमुळे विवाहपूर्व/बाह्य/अंतर्गत, भिन्न/समलैंगिक या प्रकारांत "मानव्य मूल्य राखणे" कमीअधिक कठिण असेल, हे तपशील वेगळेवेगळे असतीलच.
"सेफ्टी वॉल्व" उपमा ठीक आहे. पण कोणीही "सेफ्टी वॉल्व" होण्यासाठी औदार्य मागणे ठीक नाही. आजकाल ज्यांना आपण प्राण देण्याचे औदार्य मागतो (खाणकामगार, अग्निशामक, सैनिक, वगैर,) त्यांना त्या मानाने शुल्क देतो. इतकेच काय सैन्यातले अधिकारी पगाराबद्दल बोलले, पगारवाढीबद्दल बोलले, तर आपण त्यांना "उदार व्हा" असे म्हणून चूप करत नाही. तसेच "उदारपणे सेफ्टी वॉल्व व्हा" म्हणून अन्याय्य बाजारात बोळवण करू नये.
क्लायंट ९
धनंजय,
अतिशय छान लेख.
.... नसल्यास हा व्यवसाय नेहमीच असमतोल स्वातंत्र्याचा राहील, आणि बाजारपेठ अनैतिक राहील.
खरेच असेच वाटते.
पण यावर अनैतिकतेचा शिक्का सर्व समाजात आहेच. पहा ना आत न्युयॉर्क मधले प्रकरण. यात पैशाच्या अपव्ययाबद्दलची ओरड आहे तसेच वश्या प्रकरण हा सुद्धा महत्वचा नैतिक मुद्दा आहे.
वरचे सर्व प्रतिसाद वाचून झाले नाहित. वाचत आहे.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
आणखी अवांतर/समांतर
विसुनानांच्या प्रतिसादातुन ह्या विषयाला असणारे अनेक कंगोरे दिसल्याने आम्हीही आमचे पावशेर त्यात टाकतो आहोत :)
मुळातच 'वेश्याव्यवसाय' ह्याची सामाजिक व्याख्या आपण समजतो तितकी संकुचित नाही. पैसे मोजुन शरिर उपभोगायला देते ती वेश्या इतकाच अर्थ 'वेश्या' शब्दातुन अभिप्रेत नाही. त्यालाही अनेक कंगोरे आहेत. एखादी स्त्री जेव्हा कामात बढती मिळवण्यासाठी (आपला स्वार्थ साधुन घेण्यासाठी..विशेषतः सिनेजगतात) वरिष्ठांना शरीर भोगायला देते अश्या स्त्री ला देखिल 'वेश्या' असेच संबोधले जाते.. म्हणजेच शरीर भोगायला देण्यामागे 'पैसे' हाच एकमेव मोबदला दरवेळेस असेल असे नाही.बर्याचदा अश्या स्त्रियांविषयी बोलताना अमकी अमकी पेक्षा, 'सरळ पैसे मोजुन घेणारी वेश्या बरी!( नैतिकतेच्या दॄष्टीकोनातुन)' असा देखिल उल्लेख केला जातो..
म्हणजेच जेव्हा जेव्हा एखादी स्त्री कोणत्याही मोबदल्यासाठी/फायद्यासाठी एखाद्याला संभोग करु देते ती वेश्या अशी व्याख्या योग्य ठरेल का?..तर नाही..करण कधी कधी एखाद्या मुलीला आपल्या मना विरुद्ध लग्न करावे लागते. अशा वेळेस प्रेम दुसर्या कोणावर जडले असले तरी समाजाच्या दबावाला बळी पडून लग्न तिसर्याशीच केले जाते. ह्या स्त्रियांना देखिल आपल्या मनाविरुद्ध आपले शरीर दुसर्याच व्यक्तिला अर्पण करावे लागते( समाजाच्या कडवेपणा टाळण्याच्या मोबदल्यात)..पण त्याला मात्र कुणीही वेश्या/अनैतिक म्हणू शकत नाही. तेव्हा ही व्याख्या देखिल बाद!!
थोडक्यात विषय दिसतो तितका सोपा नाही..:)
गणिका
संस्कृत साहित्यात आपला संबंध वारंवार गणिका ह्या पात्राशी येतो. किंबहूना विदूषक आणि गणिका
संस्कृत साहित्याचे अभिन्न अंग आहेत.
ती गणिका देहविक्रय करतेच असे नाही तर काही गणिका केवळ आपल्या गाण्याने अथवा नृत्याने ग्राहकांची घटकाभर करमणूक करणार्या सुद्धा असतात. तसेच ह्या गणिका चाणाक्ष असतात
आणि हेरगिरीसाठी त्यांचा फार उपयोग केलेला आढळतो (माताहारी सारखा).
चाणक्याने हेरगिरीसाठी सुंदर, बुद्धिमति गणिकांचा विशेषत्वाने उल्लेख केला आहे.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।
अ डे इन द लाईफ ऑफ धंदेवाली
बंगलोर येथे नुकत्याच झालेल्या एक नाट्यप्रयोगा बद्दल माहिती http://www.indiatogether.org/2008/mar/wom-dhande.htm इथे वाचा. मीन सेशू या सामाजिक कार्यकर्तीने वेश्या अन्याय मुक्ती परिषद (VAMP) व संग्राम या एनजीओ च्या माध्यमातून या क्षेत्रात काम करतात. त्यांनी ही निर्मिती केली. सुषमा देशपांडे यांनी दिग्दर्शीत केलेला प्रयोग या दुर्लक्षित विषयावरचे जनजागरण आहे.
प्रकाश घाटपांडे
नजरा बदला दृष्य बदलेल
http://esakal.com/esakal/03162008/SaptarangACAEFD66F3.htm या ठिकाणी मीना सेशू यांचा नजरा बदला दृष्य बदलेल हा एक लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
व्यवसाय की नोकरी?
वैश्या बनणे हे नैतिक की अनैतिक हा चर्चेचा विषय निवडण्याबद्दल धनंजय यांचे अभिनंदन वर अनेक घटकांचा उत्तम उहापोह झाला आहे. धन्ंजय यांचा सारांशही रोचक आहे. मी जरा उशीराच चर्चेत प्रवेश करत आहे. असो.
वैश्या व्यवसायाची नैतिकता.. यात वैश्या 'व्यवसाय' हा शब्दच मला खटकतो. या बाजारातील प्रत्येक विक्रेती ही "व्यावसायिक"च असते असे नाहि. कित्येक जणी (किंवा बहुतांशजणी?) ह्या नोकर असतात. खरा व्यवसाय कोणीतरी वेगळीच व्यक्ती करत असते. तेव्हा या प्रकारास केवळ एक व्यवसाय ना नजरेतून बघणे मला सर्वस्वी चूक वाटते.
आता नोकरीचे निकष लावा पाहु. आमच्या (आयटी) नोकरीशी तुलना करू. आमच्याकडे उत्तम जाहिरातीसाठी नोकरदार मंडळीनी केलेली आधीची प्रोजेक्टस बढवून नवीन क्लायंटला ऐकवली जातात, कधी एखादा क्लायंट आपखूशीने कंपनीचे नाव सुचवतो, क्लायंटने दिलेल्या पैशातून त्यात काम केलेल्यांचे पगार वगैरे तर होतातच शिवाय मुळ व्यावसायिकाला उत्तम मोबदला मिळतो, अनेकदा बराच एक्पिरियन्स झाला आणि तुमच्यात 'गुण' असतील तर बढती मिळते/पगारवाढ मिळते/आपल्या हवे तेच काम करायची संधी दिली जाते, एरवी इथे काय काम करायचे, कीती करायचे, कधी करायचे हे तुमच्या हातात नसते.
आता हे सगळं वैश्यांनाही लागु होत नाहि का? मग हा व्यवसाय कसा? ही तर नोकरी !!! आणि नोकरी करतान सुरवातीला चॉईस नसतो त्यात ही नैतिकता कुठे? (निदान सुरवातीला) बर्याचजणांचे नोकरी असते म्हणून घर चालते (फार तर फार एका व्यावसायिकाची नोकरी आवडली नाहि तर दुसरा जॉईन करता येतो )
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
मित्रांनो हा लेख व त्यावरील
मित्रांनो हा लेख व त्यावरील आपल्या सर्व चर्चा लिंकद्वारे मी त्या क्षेत्रात काम करणार्या स्वयंसेवी संस्था यांना पाठवल्या. मीना सेशू ज्यांचा उल्लेख मी वर प्रतिक्रियांमधे केला आहे त्यांनी त्या सेक्सवर्कर साठी काम करणारी वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटने द्वारे प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या काही ध्वनीप्रतिक्रिया त्यानी पाठवल्या आहेत व मिसळपाव चे आभार मानले आहेत.
अप्रतिम काथ्याकुट !
मोदी आणि भाजपा सत्तेत यायच्या आधी मिपावर किती गंभीर विषयांवर प्रगल्भ चर्चा वादविवादसुसंवाद व्हायचे ! कुठेही राजकीय टिप्पण्णी नाही, कोणत्याही धर्मावर , धर्मपरंपरा श्रध्दांवर , कोणत्याही जातीवर, समाजावर चिखलफेक नाही, कुठेही तारतम्य सोडून तिरकस टिप्पण्णी नाही !
हा काथ्याकुट एक अतिषय आदर्श काथ्याकुट म्हणुन पिन करुन ठेवला पाहिजे मुख्यपानावर !
बाकी -
श्या: , आमच्या काळचं मिपा राहिलं नाही आता !
(No subject)
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
उत्तम निकाल आणि उत्तम लेख
उत्तम निकाल !
उत्तम निकाल !
भारत हळुहळु पाश्चिमात्य बुरसटलेल्या नैतिकतेच्या बकवास संकल्पनांच्या जोखडातुन मुक्त होत आहे हे पाहुन छान वाटले !
व्हिक्टोरिय नैतिकता
मार्कस ऑरेलियस,
मला वाटतं त्यास व्हिक्टोरिय नैतिकता ( victorian morality ) म्हणतात. हिने ब्रिटीशकालीन भारतात प्रचंड गोंधळ घातला होता.
आ.न.,
-गा.पै.
निकाल योग्य की अयोग्य हा नंतर चा प्रश्न
लोकशाही देशात धोरणात्मक निर्णय घेणे हे लोक नियुक्त सरकार चे काम आहे.
लोकशाही मध्ये लोक सत्ताधारी निवडतात.
आणि तेच देशाला जबाबदार असतात.
किती ही चांगला निर्णय असला तरी कोर्टाने धोरणात्मक निर्णय घेणे .
अयोग्य आहे.
त्या मुळे वेगळा पायंडा पडू शकतो.
सरकार नी तसा कायदा करावा असे निर्देश
देणे इथ पर्यंत कोर्टाचे निर्णय योग्य असे समजू शकतो.
लोकसत्ता लेखाची link
लोकसत्ता लेखाची link देण्यासाठी तुम्हाला थेट २००८ च्या लेखाची उचकपाचक करावी लागली.
कमाल आहे.
लेख आवडला
लेख फार आवडला.
देहव्यापाराला 'नैतिक' मान्यता नसणे याचे एकमेव कारण म्हणजे हा व्यवसाय पुरुषसत्तेच्या पायाला समूळ हादरा देतो. बाकी दुसरे काही नाही. गणिका उजळ माथ्याने समाजात वावरू लागल्या तर कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष (ही विशेषणे समाजमान्य अर्थाने घ्यावीत. ती माझीच मते आहेत असे समजू नये) मुखावगुंठित मुलीमहिलांना या सर्वातील फोलपणा कळून चुकेल आणि त्या पुरुषसत्ताक नियमांना फाट्यावर मारतील ही आदिम भीती यामागे आहे.
ही भीतीदेखील निराधार आहे हे सांगायला नको. उद्या देहविक्रय समाजमान्य झाला तरी पुरुषसत्ता त्याला पुरून उरेल आणि आपले वर्चस्व अबाधित ठेवेल यात मला तरी काहीच शंका नाही.
या संदर्भात निर्णयस्वातंत्र्य वगैरे मुद्दे उगाचच उकरून काढले जातात. सफाई कामगार, मोलकरीण किंवा हमाल होण्याचीही महत्वाकांक्षा कुणी बाळगून नसते. इतकेच काय, इच्छा नसताना डॉक्टर, अभियंता, व्यापारी झालेले लोकही सापडतील. पण त्यावरून या व्यवसायांना कुणी अनैतिक ठरवत नाही.
भीती ? कसली भीती !
चलत मुसाफिर,
यांत भीती कसली? जर प्रत्येक बाई पुरुषसत्तेस फाट्यावर मारून वेश्या बनली, तर कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास सहज उपलब्ध होईल. पुरुषांना दुसरं काय हवं?
असो.
तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. लालबत्तीवस्तीत बापाला किंमत नसते. आईला मात्र अतिशय आदराने वागवलं जातं. मग ही पुरुषसत्ताक व्यवस्था म्हणायची का?
आ.न.,
-गा.पै.
कुठलीही स्त्री पैसे फेकल्यास
थोडीशी सुधारणा - कुठलीही नाही , जीला स्वतःहुन कामक्रीडेत भाग घेण्याची इच्छा आहे ती , आणि हाच ह्या व्यवसायातील युनिक सेल पॉईंट आहे !
स्त्री-लैंगिकतेचे गूढ ह्या धाग्यावर आलेल्या काही प्रतिसादा नुसार बहुतांश स्त्रियांना कळससुख अर्थात ऑर्गॅझम हा परमोच्च आनंद लाभतच नसतो , त्या केवळ करायचे म्हणुन, कर्तव्य म्हणुन सेक्स करत असतात , परिणामी कामक्रिडेतील स्त्रीचा सहभाग बहुतांश वेळा पॅसीव्ह असतो . (काही सन्माननीय स्त्रीयांचे काही मोजके रतिक्षण ह्याला अफवाद असतीलही , पण इन जनरल "उरका पटकन" हाच अॅटिट्युड असतो.)
अशा वेळेस कल्पना करा की एक स्त्री जी स्वेच्छेने कामक्रिडेत सहभाग घेत आहे , जी पैसे घेत आहे , क्लायंट ला खुष करणे हाच जिचा उद्देश आहे तिच्या सोबतचा अनुभव कसला भिन्न असेल ! तसेच पुरुषाच्या नजरेतुन - ही स्त्री आवडली तर आवडली नाहीतर आजचे पैसे अक्कलखाती, नेक्स्ट टाईम नवीन बघु, ही काही कटकटी करणार नाहीये , डोके दुखते आज नको , मूड स्विंग्स वगैरे नखरे नसणार आहेत , बस्स आत्ता आहे हा क्षण एन्जॉय करायचा आहे - carpe diem. ह्या सिचुएशन मध्ये रतिसुखाचा अनुभव काहीतरी वेगळ्याच लेव्हल वरील असावा असा अंदाज आहे ... पुरुषासाठी अन स्त्रीसाठीही!!
दुरुस्तीशी सहमत
मार्कस ऑरेलियस,
तुमच्या दुरुस्तीशी सहमत आहे. 'उपलब्ध असलेल्या कुठल्याही स्त्रीस पैसे फेकून वापरता येईल' असं म्हणायचं होतं.
आ.न.,
-गा.पै.
गणिका उजळ माथ्याने समाजात वावरेल ही भीती.
जगाचे माहीत नाही.
पण भारताची लोकसंख्या १३०, कोटी आहे.
कट्टर पुरोगामी स्त्री,पुरुष.
कट्टर स्त्री हीत वादी स्त्री पुरुष.
देह विक्रीस समर्थन देणारे महान विचारवंत.
ह्या समाजाच्या सुधारित घटकात.
१) मला सून देह विक्री करणारीच हवी.
२)माझी बायको देह विक्री करते हे आमचे कार्ड.
३) माझी मुलगी मी ज्या कुटुंबात देह विक्री करण्याला मान्यता आहे त्याच कुटुंबात देईल.
४ माझी आई आणि बहिण देह विक्री करतात हे आमचे visiting कार्ड.
असे मोठ्या अभिमानाने सांगणारा
पुरोगामी,स्त्री हक्क वाला,सुधारणावादी,देह विक्री लं पाठिंबा देणारा.
मी आज पर्यंत तरी कोणी बघितला नाही.
१३० कोटी लोकात एक खरा पुरोगामी नाही.
आणि म्हणे गणिका सन्मानाने समाजात फिरतील.
अमेरिका,ब्रिटन जे आपल्या पेक्षा १०० वर्ष पुढे आहेत तिथे पण असे घडतं नाही.
पुरुष सत्तेला हादरा
काही लॉजिक नाही ह्या विचारला की पुरुष सत्तेला हादरा बसेल म्हणून वैश्या व्यवसाय च संबंध नित्ती मत्ते शी जोडला आहे.
काही लॉजिक नाही
.स्त्री बाजारात विकायला उपलब्ध असणे आणि ती पण तिच्यावर काहीच जबरदस्ती न करता. स्व मर्जी नी.
ही पुरुषांसाठी अस्त्यंत फायद्याची गोष्ट आहे.
स्त्री काही पैसे देवून सहज उपलब्ध असेल तर पुसृषांसाठी लॉटरी च आहे..
उद्या हे सामान्य झाले समाजाने स्वीकारले तर.
स्पर्धा वाढेल आणि अगदी पन्नास ,शंभर रुपयांत पण ती उपलब्ध होईल.
ह्या मध्ये स्त्री चच नुकसान आहे.पुरुषांचे नाही.
असे स्त्री chya हक्काच्या बाता मारून बायकांना पुरुषांच्या समोर कमी कपड्यात बार मध्ये नाचवले आणि आजुन पण नचवले जाते.
देह विकायला लागणे पोटासाठी ही वेळ येणे म्हणजे खाते सर्व समाजासाठी ही लाज वाटण्यासारखे गोष्ट आहे.
आणि त्याला स्त्री चा हक्क ह्या गोंडस सुवर्ण वेष्टनात पॅक करून स्त्री चे शोषण करायचा.
मतलबी डाव .
तसे विचार व्यक्त करणाऱ्या लोकांचा आहे
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच
हे इतकं साधं असतं तर प्रश्नच नव्हता.
बहुतांश वेळेस (९९%) मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं.
यात आई बापानी मुलींना विकण्यापासून प्रियकराने किंवा दलालाने फसवून किंवा सरळ गुंडांमार्फत अपहरण करून मुलींना धंद्याला लावले जाते.
धंदा कायदेशीर केला तर केवळ मुलीला जीवाची धमकी देऊन मी हे स्वेच्छेने करते आहे असे कोर्टात बोलायला लावले तर जबरदस्तीने या धंद्यात ढकलल्या गेलेल्या परंतु बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या मुलींना यातून बाहेर पडण्याचा मार्गच बंद होईल.
आता कदाचित १-२ % मुली अशा बाहेर पडत असतील पण या नंतर ते सुद्धा बंद होण्याचा धोका आहे.
दुर्दैवाने वेश्याव्यवसायातून पुनर्वसन होण्याची शक्यता एकंदर समाजाच्या मनोवृत्तीमुळे फार कमी असते.
लग्न करून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली नवऱ्याने टाकून दिल्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. कारण अनेक वेळेस नवरे मुलीच्या चारित्र्याचा संशय घेताना दिसतात. या मुली धंदा केल्यानंतर पुरुषाशी बोलताना जास्त मोकळ्या असतात आणि याचा अनेक अर्थ नवरे ती निर्लज्ज/ वाईट चारित्र्याची किंवा तसलीच आहे असा काढतात.
पुनर्वसन करून आई बापाकडे पाठवलेल्या बहुतांश मुलींना आई बापच आपल्या खोट्या प्रतिष्ठा किंवा पुढच्या मुलींच्या लग्नात विघ्न येण्याची भीती किंवा मुलीचा भाऊ तिला स्वीकारायला तयार नसेल तर त्याला नाराज करायचे नाही म्हणून या मुलींना स्वीकारण्यास नकार देतात.
अनेक वेळेस सख्खे बाप सुद्धा परत या मुलींना विकून पैसे करताना आढळतात.
या मुली निरक्षर किंवा अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे चरितार्थाचे साधन उपलब्ध नसते त्यामुळे परत वेश्या व्यवसायात येतात. तर अनेक मुलींना या व्यवसायात काही वर्षे घालवल्याने अंगमेहनतीचे काम करावेसे वाटत नाही त्यामुळे त्या स्वखुशीने वेष्ट्यव्यवसायात परतल्याची सुद्धा अनेक उदाहरणे आहेत
त्यामुळे त्यांचे पुनर्वसन वाटते तितके सोपे नाही. त्यातून काही वर्षे (१०-१५) संसारात रमल्यावर त्यांचे खटले न्यायालय उभे राहतात आणि सततच्या न्यायालयाच्या वाऱ्या ,कटकटीना कंटाळून आणि आर्थिक तंगी मुळे सुद्धा नवरे त्यांना हाकलून देतात.
एकदा वेश्या व्यवसायातून बाहेर पडली कि त्यांचे दलाल त्यांच्या वर चार दमड्या खर्च करत नाहीत आणि हा सर्व आर्थिक भार सोसणे त्यांना अशक्य होते.
त्यातून त्यांना पोलीस सुद्धा ज्या तर्हेने वागवतात ते पाहिले तर सभ्य माणसे सुद्धा लाजतील.
पैसे नसतील तर पोलीस सुद्धा त्यांच्याकडून सर्रास शरीरसुखाची मागणी करतात मग ती आता पुनर्वसन करून संसाराला लागली का असेना?
महिला पोलीस सुद्धा त्यांच्याशी अत्यंत घृणास्पद वर्तन करताना आढळतात तर पुरुषांची काय कथा?
बाकी स्त्रीचे स्वातंत्र्य त्यांचे हक्क आणिस्वखुषीने वेश्या व्यवसायात पडणे हे उच्चभ्रू गटातील कॉलगर्लस, एस्कॉर्टस किंवा कॉनक्यूबाईन इ. साठी ठीकआहे.(त्यांना वेश्या म्हणणे डाऊनमार्केटआहे).
नैतिकता हा प्रश्नच नाही नियोजन हा प्रश्न आहे
Vaisha व्यवसाय .
खुप जुना आहे
ब्रिटिश लोक ही अतिशय हुशार असल्या मुळे त्यांनी ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केले होते.
देह विक्री व्यवसाय करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून दिली होती
बाकी समाजा पासून वेगळी.
एकाचे हक्क जपताना दुसऱ्याच्या हक्कावर गदा येत कामा नये.
देह विक्री ह्या व्यवसायाचे उत्तम नियोजन केलं. तर ते समाजाच्या,देशाच्या हिताचेच आहे.
१) देश विक्री व्यवसाय करण्यासाठी प्रतेक शहरात जागा आरक्षित ठेवली जावी.
थोडी लांब.
२)म्हाडा,सिडको.
सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात
३) त्या व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाची चाचणी केली जावी त्यांच्या मर्जी नीच करत आहेत ना ह्याची खात्री करावी.
४) देह विक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया ची माहिती त्या व्यवसाचा पोर्टल वर जाहीर करावी
नाव ,गाव,नातेवाईक सहित.
लाज वाटण्याचे कारण नाही स्त्री मुक्त होत आहे.
५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात.
असे मस्त. नियोजन केले तर मला नाही वाटत कोणी विरोध करेल.
कोणत्या तरी ब्रिटिश कंपनीला ह्या सर्व यंत्रणेचे नियोजन करण्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यावे.
ते योग्य नियोजन करतील.
मुंबई मध्ये त्यांनी योग्य काम केले आहे त्यांना अनुभव आहे.
२)म्हाडा,सिडको.
२)म्हाडा,सिडको.
सारख्या सरकारी संस्थेने तो भाग विकसित करून देश विक्री ह्या व्यवसायासाठी सर्व सुविधा पुरवाव्यात.
हायला
इथे अर्ध्या जनतेला डोक्यावर छप्पर नाही पण रात्रीची सोया पाहण्यासाठी सरकारने त्यांना कोठे बांधून द्यायला हवेत काय?
५) भाव ठरवले जावेत,सेवा ठरवल्या जाव्यात.
हे कुणी ठरवायचं ?
ब्रिटीश कंपनीला?
त्यांना भारतीय बायका कुरूप च वाटतील.
मग बायकांना चांगला भाव कुणी द्यायचा?
का इथे पण शेतीसारखा किमान आधारभाव द्यायचा?
आणि या आधारभावाला ग्राहक आला नाही तर पैसे सरकार ने द्यायचे का?
कचरे बुवा
तुमच्या टंकणाऱ्या मेंदूचा आणि विचार करणाऱ्या मेंदूचा संबंध नाही हे तुम्ही सतत का सिद्ध करून देताय
खरे साहेब
मी तुमची भीती दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
१)देह विक्री व्यवसायात जबरदस्ती नी स्त्रियांना ढकलल जाते.
ही तुमची भीती आहे.
रीतसर सर्व मुलींची चोकशी करून त्यांची सर्व ओळख पोर्टल वर जाहीर करा.
हे माझे solution.
पुरुषाची मकत्तेदरी स्त्री नी देह विक्री केली की नष्ट होत असेल तर अशी माहिती जाहीर करणे ही अभिमानाची गोष्ट असेल त्यांच्या नाते वाइक लोकांसाठी.
सिडको किंवा म्हाडा नी अशा वस्त्या नियोजन करून उभ्या कराव्यात .
गाव कुसा बाहेर.
कारण एकाचे एक जपताना दुसऱ्याचे हक्क नाकारणे अयोग्य म्हणून.
सिडको आणि म्हाडा नी अशा वस्त्या निर्माण केल्या म्हणजे त्या मधील जागा फुकट ध्या असा मी उल्लेख केला नाही.
ज्यांना तीव्र इच्छा आहे त्यांनी ती जागा विकत घ्यायची आहे हवं बँक लोण ची सोय करावी.
आराखडा आखून हा व्यवसाय म्हणून उभा केला तर रोजगार पण मिळेल.
ती स्त्री आणि त्यांचे ग्राहक ह्यांना कायद्याचे संरक्षण पण मिळेल.आणि समाजातील बाकी लोकांचे हक्क पण अबाधित राहतील.
प्राथमिक आरोग्य उपचार,गुप्त रोग तत्न,hiv स्पेशालिस्ट dr .. ह्यांना पण आराखड्यात जागा असेल..
Dr लोकांचा व्यवसाय वाढण्याची पण शक्यता आहे
खरे ..मी परफेक्ट solution दिले आहे.
मी परफेक्ट solution दिले आहे.
मी परफेक्ट solution दिले आहे.
कधी वेश्या वस्तीत गेला आहात का?
त्यांच्याशी बोलला आहात का? त्यांचे प्रश्न काय? त्यानं काय हवंय?
ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते अशाना घर विकत सोडाच भाड्याने घेणे सुद्धा परवडत नाही त्यांना बँकेच्या लोण ची सुविधा पुरवणार कोण?
बँकेचे कर्ज देताना व्यवसायाचे काही आडाखे असतात. त्यात स्त्रीचे शरीर कसे बसवणार? जी दिसायला जास्त चांगली तिला जास्त कर्ज देणार का?
हा निकष कसा ठरवायचा?
तारण काय ठेवायचे? आणि त्यांनी कर्ज फेडले नाही तर त्यांच्या कडून वसुली कशाची कशी आणि कोणी करायची?
उगाच उंटावरून शेळ्या हाकताय?
तुमचं परफेक्ट solution तुमच्या टंकणाऱ्या मेंदूकडून आलेलं आहें.
उचल हात आणि बडव कळफलक
त्याचा विचार करणाऱ्या मेंदूशी काहीही संबंध दिसत नाही.
गंमत वाटली.
काही प्रतिसाद वाचून चंमतग वाटली. गणिका सहज उपलब्ध झाल्या तर पुरुषांचे फावेल हा समज मुदलातच गंडलेला आहे. पैसा व सामाजिक ताकद असलेल्या पुरुषांना गणिका (किंवा अन्य स्त्री) आजही मिळवता येते. देहव्यापार खुला झाला तर हे सर्व पुरुषांना सहजसाध्य होईल. तसेच देहव्यापार करणाऱ्या स्त्रीला अधिकृत हक्क मिळतील. हे पुरुषसत्तेला मुळातच नको आहे.
देहव्यापार समाजसंमत झाला तर सगळ्या स्त्रिया तेच करू लागतील हा दुसरा गंडलेला समज. तसे काहीही होणार नाही. ज्या स्त्रियांना तो व्यवसाय करायचा असेल त्या तो सुरक्षित व अधिकृत रीतीने करू शकतील, इतकेच. पण याचे पुरुषसत्तेवर दूरगामी परिणाम होतील.
सेक्स ही एक क्षणिक, तात्कालिक, नैसर्गिक भावना (instinct) आहे. पण तिला नाना नियम व बंधनांत कोंडले की एक प्रबळ आवेग निर्माण होतो जो जीवनाच्या प्रत्येक पैलूवर कमीअधिक परिणाम करतो. पुरुषसत्ता याचा चलाखीने वापर करते.
नियोजन केले तर
उत्तम नियोजन केले तर देह विक्री व्यवसाय लं कोणाचा विरोध नाही.
देहविक्री लं मान्यता म्हणजे गल्ली बोळात,रहिवासी इमारती ,सार्वजनिक जागा इथे विक्षपित चाळे करण्याची परवानगी नाही..
मला वाटतं
वेश्या व्यवसाय हा मानवी संस्कृतीने ठरवलेल्या नैतिकतेच्या चौकटीत कधीच बसणार नाही , पण म्हणून त्याचे कायदेशीर प्रमाणीकरण करू नये असे नाही, काही देशाचे नियम आजकाल गांजा कायदेशीर करत आहेत, मला तर ते चूक वाटते, मस्तिष्कावर प्रभाव पाडून पुढे अगदी हेवी मेटल पॉयझिंग देऊ शकणाऱ्या गांज्याला कायदेशीर करणे चूक वाटते, पण
वेश्या व्यवसायाबद्दल विचार करता त्याला कायदेशीर करणे हे कैक लैंगिक आजार, गुप्तरोग, एचआयव्ही इत्यादींच्या प्रसारात एक उपायकारक खोडा म्हणून वापरले जाऊ शकते, वेश्यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप, त्यांना औषधपूरवठा, स्वच्छ ठिकाणे (व्यवसाय करावयास) ह्याने फक्त वेश्याच नाही तर वेश्यागमन करण्यासाठी जाणाऱ्या मंडळींचे पण स्वास्थ्यरक्षण होऊ शकेल, वरती काचुरे ह्यांनी वेश्या व्यवसाय, आई बहीण व्हिजिटिंग कार्ड वगैरे काय काय लिहिलेले आहे, ते पटले नाही दोन कारणांसाठी
१. माझ्याच लेखनात वेश्या व्यवसाय हा मानवी नितीमूल्यांच्या चौकटीत नैतिक ठरणार नाही कधीच हे मी स्पष्ट म्हणतोय
आणि त्यामुळे
२. काचुरे ह्यांनी (कदाचित कोणालातरी प्रतिसाद म्हणून) वेश्याव्यवसायाची व्हाईट कॉलर सर्विस इंडस्ट्री सोबत केलेली तुलना.
बाकी काय, वेश्याव्यवसाय कायदेशीर केला तर तो करताना जगातील कैक फसलेली, यशस्वी उदाहरणे ठेवता येतीलच अभ्यास करायला समोर.
भारतात
जगातील जास्त माहीत नाही पण भारतात खजुराव सारखी मंदिर आहेत तिथे .
सेक्स ह्या विषयावर अनेक शिल्प कोरली आहेत.
बघितले नाहीत पण ऐकून आहे.
कामशास्त्र सारखे बाकी प्राचीन ग्रंथ पण आहेत त्याचा विषय सेक्स हाच आहे.
. Evolution मुळे माणसाची प्रजाती निर्माण झाली असे दावे असले तरी..
संस्कृती, समाज व्यवस्था,निती अनिती.
ह्यांची बरीच चक्र होवून गेली असावीत..
खुला सेक्स,नंतर निती मत्तेत सेक्स अडकला असेल.
कोणाशी ही सेक्स करणे ह्याचा निती अनीती शी काही संबंध नाही.
आणि कोणाशी ही सेक्स करणे ही अनीती.
असे अनेक स्थित्यंतरे मानवी इतिहासात नक्कीच होवून गेली असणार.
प्रतेक प्रकारचे चांगले वाईट परिणाम अनुभव नी माणसाला माहीत पडले असणार.
म्हणून सेक्स लं निती मत्ते शी जोडले गेले असेल.
एकच स्त्री संभोग करणे जी पत्नी आहे हे योग्य असे ठरवून कुटुंब व्यवस्था.आणि बाकी व्यवस्था.
हे खूप अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
सेक्स चा संबंध अनेक गोष्टी शी आहे.
संतती हा पहिला त्याचा प्रॉडक्ट आहे.
त्याची जबाबदारी कोणावर तरी टाकणे अतिशय गरजेचे होते.
म्हणून कुटुंब व्यवस्था आणि बाकी समाज व्यवस्था.
सेक्स आणि भावनिक गुंतवणूक हा प्रश्न आहेच.
बार गर्ल्स
बार मध्ये कमी कपडे घालून नाचणे,विविध लोकांचे स्पर्श सहन करणे.
हे त्या व्यवसाय करणाऱ्या मुली खरेच मनापासून करत असतील का?
हा प्रश्न मला नेहमी पडतो.
साधे बस,ट्रेन मध्ये पण आपल्या बाजूला आपल्याला बरा वाटणारा च सहप्रवासी असावा अशी इच्छा सर्वांची असते.
काही मिनिट किंवा तासाच्या प्रवासात पण आपल्याला बरा वाटणारा प्रवासी नसेल तर मन विचलित होते.
बार गर्ल म्हणून काम करणाऱ्या मुलींची मानसिक अवस्था काय होत असेल.
थंड डोक्याने विचार केला की जाणीव होईल.
सेक्स वर्कर तर अजून खतरनाक.
शारीरिक संबंध ठेवणे अशा व्यक्ती शी ह्याच्या शी काहीच ओढ नाही,आकर्षण नाही,इच्छा नाही.
खुप कठीण काम आहे.
मुली किंवा स्त्रिया ना ही अशी काम पोट पाणी चालण्यासाठी करावे लागत असेल तर आपल्या सिस्टीम मध्ये दोष आहे.
पर स्त्री किंवा पर पुरुष ह्यांच्या शी आकर्षित होवून सेक्स करणे आणि.
फक्त पैसे मिळतात म्हणून ओळख पण नसणाऱ्या व्यक्ती शी सेक्स करणे.
खुप खुप फरक आहे.
मानसिक त्रासाची परिसीमा आहे ती.
आणि ह्या सर्व सेवांचे ग्राहक कोण तर पुरुष.
पुरुषांना ऐश करण्यासाठी निर्माण झालेली गुलामगिरी ची एक पद्धत.
ह्या मध्ये स्त्री चे हीत नाही.
स्त्री लं कोणाशी ही तिच्या इच्छे नी सेक्स करायचा असेल तर तशी तिला परवानगी असावी हे वेगळे आहे .
आणि पोटपण्यासाठी व्यवसाय म्हणून सेक्स करावा लागणे .हे वेगळे आहे.
खुप फरक आहे ह्या मध्ये.
कामनियमांचा उगम
आता हे पहा.
मांजर आपल्या पिल्लांना केवळ तीन गोष्टी शिकवते: शिकार कशी करावी, कुणाला घाबरून रहावे आणि आपला बचाव कसा करावा (झाडावर चढणे, नखे पाजळणे इ.). याला फारतर 2 आठवडे लागतात. इतक्या शिक्षणावर मांजर आरामात आयुष्य जगू शकते.
पण मानवाची उत्क्रांती इतकी जास्त झालेली आहे की समाजात केवळ जिवंत रहाण्यासाठी अफाट ज्ञानाची गरज पडते. पहा: भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, वाहतुकीचे नियम, कायदा, तंत्रज्ञान (किमानपक्षी दूरध्वनीचा वापर), लेखन-वाचन, सांस्कृतिक भान, पाककला, शेती, धर्मशास्त्र. ही यादी कितीही वाढवता येईल.
हे इतके मूलभूत शिक्षण घेता घेता 18-20 वर्षे जातात. मानवाचे सरासरी आयुष्य 60-65 वर्षाचे असते. गुणोत्तर काढा.
हे इतके ज्ञान आत्मसात करणे, साठवणे आणि वापरणे याकरिता मानवाला प्रचंड मोठा मेंदू विकसित करावा लागला. (मानवी मस्तक व शरीर यांचे गुणोत्तर काढा व त्याची इतर प्राण्यांशी तुलना करा. फरक लगेच उमजेल).
मेंदूचा आकार हा असा भरपूर मोठा असल्यामुळे मुलांचा जन्म तुलनेत लवकर व्हावा लागतो. कारण मुलाचे डोके निसर्गाने जर मातेच्या पोटातच फार मोठे होऊ दिले तर माता आणि बाळ दोघे प्रसूतीतच मरतील. त्यामुळे मानवी अर्भके तुलनेत लवकर जन्माला येतात व जन्मानंतर वर्षानुवर्षे पालकांवर अवलंबून असतात (पशुपक्ष्यांचे असे नसते. कुत्रा साधारण 10-12 वर्षे जगतो. कुत्र्याची पिल्ले पंधरा ते वीस दिवसात जवळजवळ स्वयंपूर्ण होतात. गुणोत्तर काढा).
अर्भकांची अशी प्रदीर्घकाळ देखभाल एकटीने करणे हे मानव मातेला केवळ अशक्य आहे. त्यामुळे पित्याने तिची साथ देणे सक्तीचे करण्यात आले (इतर प्राण्यांत माता आपली पिले एकटीने सांभाळते, किंबहुना पित्याला हाकलून लावते).
आता हे पिल्लू माझेच आहे हा विश्वास पित्याला कसा व्हायचा? त्यामुळे कामनियम, योनिशुचिता, एकपतिव्रत ही बंधने आली.
ही बंधने अंमलात आणण्यासाठी, तसेच मातापित्याला मुलांचे संगोपन, शिक्षण व रक्षण सुलभ व्हावे, म्हणून समाजव्यवस्था आली.
आपल्या प्रतिसादातील काही
आपल्या प्रतिसादातील काही त्रुटी
१) मानवापेक्षा उत्क्रांतीत खालच्या पायरीवर असणारे प्राणी यांच्या डी एन ए मध्ये मोठ्या प्रमाणात उपजत बुद्धी (स्मरणशक्ती) साठवलेली असते. त्यामुळे कुत्रे, मांजरं गायी हरणं आणि त्यांच्या कुळातील सर्व प्राणी हे मातेचे दूध पिणे थांबवल्यावर उपजत बुद्धीने वासाने आपले अन्न शोधून काढून आपले पोट भरू शकतात. मानवाच्या मेंदूचा विकास झाला त्याबरोबर हि उपजत बुद्धी मागे पडली.
याच बरोबर मानवी मेंदूची वाढ सुरुवातीच्या काळात फार झपाट्याने होते. पहिल्या सहा महिन्यात हि वाढ ६५ % आणि १ वर्षापर्यंत मानवी मेंदू प्रौढ माणसाच्या ७५ % आकाराचा आणि २ वर्षे पर्यंत ९० % आकाराचा होतो.
२) हे हार्डवेअर वाढल्या नंतर त्यात सॉफ्टवेअर लोड होण्याची प्रक्रिया चालू होते जी जन्मभर चालूच राहते.
३) मानवी शरीराची वाढ १८ वर्षापर्यंत होत असते म्हणजेच मानवी मुलाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते.
या काळात स्त्रीला बालकाच्या संगोपनासाठी पुरुषाची गरज भासत असते. आणि अशास्थितीत पुरुषाने हे मूल माझे नाहीच म्हणून जबाबदारी झटकली तर शेतीप्रधान व्यवस्थेत स्त्रीची स्थिती फार केविलवाणी होत असे. कारण बाहेर शेती सोडून दुसरे काम नाही. तेथे काम करताना मुलाचे संगोपन कसे करणार या शिवाय बलात्कार होण्याची आणि त्यातून पुढची संतती होण्याची शक्यता फार होती ज्यामुळे असलेल्याच नव्हे तर पुढच्या बालकाच्या पोषणाचीसमस्या निर्माण होत असे.
या कारणास्तव जगभर सर्व समाजात यौनशुचिता ( नवऱ्याशी एकनिष्ठता) हि कल्पना जन्माला आली. आणि या कल्पनेचा विस्तार म्हणून लग्न संस्था निर्माण झाली.
स्त्री स्वातंत्र्य हि कल्पना संतती प्रतिबंधक साधने आल्यानंतरच खरी फोफावू शकली आणि त्यानंतर आधुनिक जगात स्त्रीला नोकरी व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्यावर तिची खरी मुक्तीच्या दिशेने वाटचाल चालू झाली.
स्त्रियांचे शोषण आदीम काळात कसे होत होते हे ज्यांना पाहायचे आहे त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीतील स्त्रियांची स्थिती याचा जरूर अभ्यास करावा.
मानवी इतिहासात
सर्व प्रकार होवून गेले आहेत
कोणाशी ही संभोग अगदी आई,बहिण ह्यांच्या शी पण(यम आणि यमी)
प्राणी तर नाते पाळत नाहीत माणूस प्राणी च आहे.
पण स्थिर जीवन,संतती चे पालन पोषण,स्त्री ची सुरक्षा, स्त्री साठी सुरक्षित वातावरण.
पुरुष आक्रमक आहे हे नैसर्गिक आहे.
पाणी
नीतिमत्ता आणि परंपरा पुरुषांची आक्रमकता थोपवून ठेवतात.
बहिण नागडी जरी दिसली तरी तिचा भाऊ हा पुरुष असून पण लैंगिक रित्या उत्तेजीत होत नाही
का?
ती स्त्री आहे हा पुरुष आहे तरी पण नाही.
कारण नीतिमत्ता , समाज व्यवस्था
त्या मुळे
दहा वेळा फाशी असा कायदा केला असता आणि नीतिमत्ता आणि योग्य समाज व्यवस्था नसती तर .
बहिण नागडी बघून भाऊ sexually उत्तेजीत झाला असता.....
कायदे आणि शिक्षा ते थांबवू शकले नसते
त्या मुळे देह विक्री चा संबंध मंद बुद्धी सारखा स्त्रियांच्या हक्क आणि स्त्री चे स्वतंत्र ह्याच्या शी मंद बुद्धी लोकांनी जोडू नये.
कळीचा मुद्दा
चलत मुसाफिर,
हा कळीचा मुद्दा आहे :
तुम्ही वर जी कुलीन, संस्कारी, सच्छील, एकपतिव्रता, गृहकृत्यदक्ष, मुखावगुंठित वगैरे विशेषणं ल्वापारली आहेत त्यांचा निर्देश मुलांच्या संगोपानाकडेच आहे. मात्र या गोष्टी आवश्यक असल्या तरी पुरेश्या नाहीत ( necessary but not sufficient ). बाप देखील नीतिवान असावा लागतो, पण तो मुद्दा वेगळा आहे.
आ.न.,
-गा.पै.
ठाम असहमत
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवले? याचा संगोपनाशी काय संबंध? ज्ञानार्जन स्वसंरक्षण, परोपकार वगैरे ठीक आहे.
नीतीमत्ता, चारित्र्य वगैरे गोष्टी म्हणजे धूर्त पुरुषसत्तेने आपला वरचष्मा अबाधित ठेवण्यासाठी काढलेली नसती टूम आहे.
(या आता म्होरं. होऊनच जाऊ दे!)
:-) :-)
नीती आणि चारित्र्य विहीन संगोपन .... ?
चलत मुसाफिर,
संगोपनात नीती आणि चारित्र्य कुठून उगवलं, म्हणून काय विचारता ! वेश्यांना त्यांची अपत्यं त्याच वस्तीत राहावीशी वाटंत नाहीत. वेश्यांना त्यांच्या अपत्यांनी तोच धंदा केलेला आवडंत नाही. मुलगी असेल तर तीही वेश्या झालेली नको असते. मुलगा असेल तर मोठेपणी भ#वा झालेला नको असतो. भ#वा हा त्यातल्या त्यात बरा पर्याय आहे. बाकी पर्याय कोणते ते विचारू नका.
नीती व चारित्र्य म्हणजे काय ते वेश्यंना बरोब्बर ठाऊक आहे.
आ.न.,
-गा.पै.
पुन्हा चंमतग वाटली
स्त्रीची सुरक्षितता हाही एक गंडलेला मुद्दाच. सुरक्षितता कोणापासून? पुरुषांपासूनच की हो! गुंडांनी दुकान फोडू नये म्हणून त्यांना हप्ता देण्यासारखेच हे झाले. असो.
एकूण माझा मुद्दाच सिद्ध होतो: योनिशुचिता न पाळणारी, लिंगस्वातंत्र्य मानणारी स्त्री पुरुषसत्तेला महाप्रचंड धोक्याची घंटी वाटते. ती तशी वाटली नसती, तर सुरक्षितता वगैरे बागुवबुवे उभे करायची गरजच नव्हती.
फक्त स्त्री शी संबंधित प्रश्न नाही.
सुरक्षित ,स्थिर आयुष्य स्त्री आणि पुरुष दोघांचे.
त्या साठी नियम आणि निती मत्ता .
शारीरिक क्षमता काहीच वर्ष असते निसर्ग काही वर्षानंतर तारुण्य,शक्ती सर्व नष्ट करतो
बालपणी चे १० ते १५ वर्ष आधार शिवाय जगता च येणार नाहीत माणसाच्या मुलाला.
आर्थिक बाबतीत स्थिर होण्यास जी बुद्धी लागते ते शिक्षण आणि सुरक्षित निवारा.
हा फक्त कुटुंब असेल तर च.
आता बेरीज , वजा बाकी करा.
स्वतःच्या शक्ती वर माणूस त्याच्या पूर्ण आयुष्यातील किती वर्ष जगू शकतो.
स्त्री माणूस च आहे कोणती extra ordinary प्राणी नाही
तिला हेच नियम लागू आहेत
समाज स्वास्थ्य
रंधोंचे सर्व समाजस्वास्थ चे अंक आता ऑनलाईन उपलब्ध आहेत https://radhonkarve.com/
सर्व विषयवार आहे. तेथे वेश्या संबंधी लेख पहा
वेश्यांचे आयुष्य
मी मराठी किडा वर वेश्यांच आयुष्य हा वृत्तपट पाहिला होता , तो शेअर करतोय. तुम्ही बाकी काही करु शकत नसला तरी त्यांच्याप्रति संवेदनशीलता ठेवा. विचार करा.
धन्यवाद सूरज खटावकर, मराठी किडा व तेजस्वी सेवेकरी, सहेली संस्था
https://www.youtube.com/watch?v=NIglFzYCE9U
धन्स.
खरं तर, महाराष्ट्रातील काही दिवसातील घटना पाहिल्या शाळकरी मुलींवरील झालेले अत्याचार, विक्रुत बापांनी मुलींवर केलेले अत्याचार, राजस्थानमधील अठ्ठावीस वर्ष वयाच्या मुलांनी बावन्न वय असलेल्या स्वतःच्या आईवर केलेले बलात्कार या सर्व घट्ना पाहिल्यावर विकृतीला धर्म नसतो तर, माणसातली विकृती असते आणि तिचा स्तर दिवसेंदिवस कोणत्या स्तराला चाललं आहे, ते लक्षात येतं आणि अशावेली वेशाव्यवसायाचं महत्व अधोरेखित व्हावं. वेश्या व्यवसाय काही त्यांनी आनंदाने स्वीकारलेला नसतो. परिस्थिती, अगतिकता, आणि असंख्य गोष्टी तो वेगळा विषय आहे.
कोलकता येथील डॉक्टर तरुणीवरील बलात्कार हत्त्या प्रकरणी बंगालमधील आशिया खंडातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया असलेल्या वेश्यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिकच आहे. पिडितेला न्याय मिळावा म्हणून वेश्यांनी मोर्चात सहभाग घेतला झालेल्या बलात्कारांच्या घटनांनी त्याही व्यथित झाल्या आणि मोर्चामधे त्यांच्या हातातील घोषणा फलक होते-
'प्रयोजने आमादे काचे आशून, किंतू नारी के धारशन कोरबे ना' याचा अर्थ असा की तुम्हाला जर इतकीच गरज पडत असेल तर तर आमच्याकडे या, परंतु कुठल्या स्त्रीवर बलात्कार करु नका'' ही सामाजिक जाणीव ऐतिहासिक आहे. या विषयावर प्रसिद्ध लेखक, समीर गायकवाड यांनी खुप लिहिलं आहे. खुप लिहिण्या-बोलण्यासारखं पण थांबतो.
घाटपांडे साहेब मिपावर येत राहा.
-दिलीप बिरुटे
राजमार्गाने करण्याचाही सोय
माणूस दारू , तंबाखू शिवाय एकवेळ राहू शकतो परंतु पुरुष आणि स्त्रीला लैगिंक भूक आहे ती नैर्सगिक आहे , जिथे पुरुष स्त्री चे प्रमाण व्यस्त आहे तिथे हि भूक भागवण्याची सोय लागते ,,
ती राजमार्गाने करण्याचाही सोय असेल तर त्यातील गुन्हेगारी कमी होते ( युरोपातील काही देश )
दोन्ही पुरुष वेश्या आणि स्त्री वेश्या उपलब्ध असणे असणे हे मला तरी अनैतिक वाटत नाही
अनॆतिक काय तर लग्न बंधन किंवा अगदी लिव्ह इन रेलशनशिप मध्ये असताना वेश्यागमन करणे , येथे दोन्ही पुरुष आणि स्त्री हा नियम समान धरला आहे
युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स
युपी: पेशंट ला ऍम्ब्युलन्स मधून नेत होते. ऍम्ब्युलन्स चालक आणि त्याच्या साथीदारांनी पेशंट च्या पत्नीचा लैंगिक छळ करायला सुरवात केली.
आणि त्यासाठी पेशंट ला ऑक्सिजन मास्क काढून नंतर बाहेर फेकून दिले.
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन. उज्जैन मध्ये भर दिवस, रस्त्यात, फुटपाथवर एका महिलेचा बलात्कार झाला.
लोकं बघत बसली, काहींनी व्हिडिओ सुद्धा बनवले.
एमपी: हिंदूंचे धार्मिक
एमपी: हिंदूंचे धार्मिक क्षेत्र उज्जैन.
यात धर्म कुठे आला? एक नागरिक म्हणून या घटनेचा निषेध जरुर करा
मग प्रत्येक गुन्ह्याचे वर्णन आपण " हिंदू बहुसंख्याक भारतात गुन्हा झाला " असे करणार का ?
कॉ न्ग्रेस जेव्हा सत्तेत होतती तेव्हा हि देशची ८०% लोकसख्या हिंदूच होती आणि २०१४ पासून सुद्धा ..
इतका द्वेष बरा नव्हे .. अर्थात तुमच्या नादाला कोण लागणार .. बसा लावत भीतीला तुंबड्या
युपी मधील अत्याचारी कोण होते....
चौकस 212 बरोबर सहमत.
प्रत्येक गोष्ट धर्म जात पात याच्याशी जोडू नये.
प्रसिद्ध वाक्य ,
गुन्हेगार गुन्हेगार असतो.
प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ
प्रतिक्रिया देण्या अगोदर मूळ लेख व त्यावरील प्रतिसाद पुन्हा वाचावेत. लेख जुना असल्याने काही लिंक आत्ता चालत नाहीत
पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही मात्र या विषयावर निर्भया प्रकरणानंतर 2013 साली मंगला सामंत यांचा लोकसत्तामधील लैंगिकतेचे शमन कि दमन? हा लेख व नंतर लैंगितेचे शमन हवेच हा एक लेख वैज्ञानिक दृष्टीकोन व सामाजिक दृष्टीकोन सांगणारा आहे त्यातील मुद्यांवर सध्या चर्चा होताना दिसत नाही हे मला ठळक पणे जाणवले. अनेक मानसशास्त्रीय पैलू या लेखात चांगले मांडले होते. जरुर वाचा.
लैंगिकतेचे शमन की दमन?
https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-or-aggression-36…
मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 5 जाने 2013
लैंगिकतेचे शमन हवेच
https://www.loksatta.com/chaturang/sexual-satisfaction-is-needed-40206/
मंगला सामंत, लोकसत्ता चतुरंग 12 जाने 2013
हे दोन्ही लेख तज्ञांनी आणि जिज्ञासूंनी जरुर वाचावेत. समीर गायकवाड यांचे खुलूस हे पुस्तक वेश्यांच्या जीवनावर आहे. ते ही आवर्जून विकत घेउन वाचावे. हा लेख व विषय समाजाचे लैंगिक व्यवस्थापन या मूळ विषयाचा भाग आहेत