
सध्या वैश्विक तापवृद्धी हा बरेच चर्चेत असणारा विषय आहे. ह्यावर चाललेल्या वाद विवादांमध्ये साधारणपणे दोन गट असतात. एक म्हणजे बहुतांश शास्त्रज्ञांचा गट ज्यांच्या मते वैश्चिक तापवृद्धी ही मोठी समस्या आहे तर दुसरा गट आहे वैश्विक तापवृद्धी ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे आणि त्याचे उगीचच स्तोम मानवले आहे असे मानणार्यांचा. ध्रुवीय बर्फ वितळत आहे, समुद्राचे पाणी अधिक ऍसिडीक बनत चालले असून काही दुर्मिळ प्रवाळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, ह्या गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत त्यामूळे मी ह्या वाद विवादामध्ये मला पहिल्या गटात समजतो. पण नुकतेच टी.व्ही. वरील एका कर्यक्रमात बियॉन लॉमबर्ग ह्या अर्थशास्त्रज्ञाची मुलाखत पाहीली आणि एक वेगळाच दृष्टीकोन आणि विचार ऐकायला मिळाले जे मुलाखतकाराला पटले नसले तरी मला मात्र पटले.
असे काय आहेत लॉमबर्ग ह्यांचे विचार?
लॉमबर्ग ह्यांनी हे सगळे विचार 'कूल ईट' ह्या पुस्तकात सविस्तर मांडले आहेत मी ते पुस्तक वाचलेले नसले तरी वर उल्लेखलेल्या मुलाखतीतुन मला कळलेले त्यांचे विचार येथे देतो :-
वैश्विक तापवृद्धी ही समस्या आहे ह्याचा नकार त्यांनी केलेला नाही. पण ही समस्या सोडवण्यासाठी सध्या जो अतिरेक केला जातो आहे तो त्यांच्या मते चुकिचा आहे. वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी मांडलेला 'क्योटो प्रोटॉकॉल' हा अंमलात आणण्यासाठी अतिशय खर्चिक आहे. त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे. कारण कार्बन इमिशन मध्ये सध्या आघाडीवर असणारे देश म्हणजे चीन आणि भारत आहेत आणि ही दोनही राष्ट्रे विकसनशील आणि आर्थिक दृष्ट्या विकसीत देशांपेक्षा मागे आहेत. त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही . जाणवण्या इतपत बदल तेव्हाच घडून येईल जेव्हा भारत आणि चीन मधील सामन्य माणूस ह्यांचा वापर करू लागेल. आणि हे तेव्हाच शक्य होइल जेव्हा पर्यायी इंधनचा उपाय हा अश्म इंधना इतकाच अथवा त्याहुन अधिक किफायतशीर असेल.
तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का?
मंडळी मलातर बॉ ह्या लॉमबर्ग साहेबाचे विचार पटले. आपल्याला काय वाटते?
- वरूण
संतुलन
जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है", हे अगदी मान्य. क्योटो कराराला मान्यता न दिल्याने अम्मेरिकेवर पर्यावरणवाद्यांची आगपाखड साहजिकच आहे. पण अनाठायी आहे, असे वातते. बाली मध्ये करार होतो का, आणि त्याचे स्वरूप क्योटोपेक्षा काय वेगळे असेल, ह्याची वाट पाहतोय.
मला लॉमबर्ग ह्यांचे विचार पटले, हे सांनल.
- (संतुलित) सर्किट
संतुलित
लॉमबोर्ग यांनी मांडलेले विचार पटले. टोकाची भूमिका न घेता, आपल्यासमोर असलेल्या समस्येला तोंड कसे द्यावे याचा उत्तम वस्तुपाठ म्हणता येईल. थोडे विषयांतर होईल, पण सर्किट यांनी केलेल्या निरीक्षणावरुन स्कॉट 'डिल्बर्ट' ऍडम्सच्या अनुदिनीवरील हा लेख आठवला. कॉग्निटिव्ह डिझॉनन्स [याला विदा द्विधा म्हणता येईल का? :)] हे यामागचे कारण आहे, असे त्याचे म्हणणे आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
कॉग्निटिव्ह डिझोनन्स
म्हणजे संकुचित विचारधारा. मला माहिती आहे तेच सत्य, त्याचे दुसरे स्पष्टीकरण असूच शकत नाही, असे वाटणे. आपण हे आजूबाजूला नेहमी बघतो. सर्व चर्चांमध्ये हे दिसतेच. बेसनलाडूंनी आधी लिहिल्याप्रमाणे आपण चर्चांत ऑब्जेक्टिव्हिझम आणू शकत नाही, ह्याचे कारण कॉग्निटिव्ह डिझोनन्स.
- (कॉग्निटिव्हली रेझोनंट) सर्किट
संतुलन
>>जागतिक तापवृद्धीच्या वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है"
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.
सारांश
अमेरिकेत एकूणच विचारधारांचे ध्रुवीकरण इतके जास्त आहे की नुसते तापवृद्धीच नव्हे तर बहुतांश वादविवादात दोन्ही बाजू आपले संतुलन "खो बैठी है" असेच वाटते.
हा सारांश पटतो.
दुसर्या टोकाचे एक उदाहरण
येथे वाचता येईल. गायींच्या ढेकरांतून बाहेर पडणार्या मिथेन गॅसमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत असल्याने, त्यांच्या खाण्यात मेदयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवून याचा परिणाम कमी करता येईल का; या दृष्टीने संशोधन सुरु आहे.
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
काही विचार
या विषयावर बरेच काही लिहीता येईल पण थोडक्यातः
सर्वप्रथम, यात मी पर्यावरणवादी म्हणून लिहीत नाही आहे (कारण तसा मी नाही आणि त्या संदर्भात माझे विचार त्यांच्यापेक्षा कधी कधी भिन्न असतात). पण या भागात थोडेफार काम करणारा म्हणून नक्की लिहीत आहे. सर्कीटसाहेबांनी म्हणलेल्या बालीला काय होईल याची थोडी कल्पना आहे कारण त्याला प्रिल्यूड असलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या "पर्यावरण बदल आणि त्याचे परीणाम" या संदर्भातील अधिवेशनास मी उपस्थीत होतो आणि त्यात झालेल्या ठरावास संमत करण्यात सहभागी होतो. या आधीवेशनाचे कारण जगभरच्या २०० शास्त्रज्ञांनी गेल्या सहा महीन्यात टप्याटप्याने जी अनुमाने मांडली आहेत त्यावर आधारीत प्रश्नाचे गांभिर्य लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणिसांनी हे आधिवेशन आयोजीत केले होते. त्या नंतरच्या २ आठवड्यातच त्यांनी जगभरच्या नेत्यांसाठी पण एकदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याला कामामु़ळे ऑबझर्वर म्हणून जाऊ शकलो नाही, पण काय घडले याची थोडीफार कल्पना आहे.
हा विषय जसा शास्त्रज्ञांना महत्वाचा आणि गंभिर वाटतो तसेच त्याचे राजकीय, धंदेवाईक (बिझिनेस या अर्थाने), सामजीक, धार्मीक (हो धार्मीक पण मला धक्का बसला!) फायदे घेतले जात आहेत. पण म्हणून हा प्रश्न काही कमी गंभीर होत नाही...यातील प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळा लेख होऊ शकेल!
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते. लॉमबर्ग आणि त्यांच्या विचारावर नंतर प्रतिसाद लिहीन पण थोडी माहीती:
-----------
मूळ संदर्भः http://en.wikipedia.org/wiki/List_of_countries_by_carbon_dioxide_emissi… (ओरेगॉन नॅशनल लॅब)
अमेरिकेचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील १८.९ तर २००४ २०.४
चीनचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील २.१ तर २००४ ३.८४
भारताचे पर कॅपिटा कार्बन एमिशन १९९० मधील ०.८ तर २००४ १.२
------------
अमेरिकेच्या नकाशात कार्बन एमिशनसंदर्भात किती देश बसू शकतात यावर खालील मॅप बघितल्यास या देशात किती "वेस्ट/वाया जाणे" होते ते कळेलः

संदर्भ
--------------
कॅलीफोर्नीयाचा नंबर (जर स्वतंत्र राष्ट्र धरले तर) वर लागतो. तुर्त मला समान युनीटस मधे माहीती न मिळल्याने आत्ता लिहीलेली नाही.
________
>>>त्यामुळे कॅलीफॉरनियातील निवडक श्रीमंत लोकांनी सोलर पॅनेल बसवून त्याचा फायदा काहीच होणार नाही .
संबंध फक्त सोलर पॅनेल्स बसवण्याचा नाही तर राहणीमान (लाईफ स्टाईल कशी आहे) कसे आहे याच्याशी आहे. त्या संदर्भात बर्याच गोष्टी बदलता येऊ शकतात.
_________
>>>त्यावर पैसा खर्च करण्याऐवजी पर्यायी इंधनाचे स्रोत (उदा. सूर्य उर्जा) हे अश्म इंधनाला स्पर्धा करू शकतील अश्या स्वस्त दरात उपलब्ध होण्यासाठी त्यावरील संशोधनावर करणे जास्त गरजेचे आहे.
अगदी बरोबर आहे, पण त्याच बरोबर पब्लीक ट्रान्स्पोर्टेशनला चालना, अर्बन स्प्रॉल (वस्तीची घनता तुरळक करणे), कोळसा आणि खनीज तेलांना सबसिडी पण तेच रेल्वे गाड्या बंद करण्याचे धोरण असे अनेक प्रकार आहेत जे थांबवणे गरजेचे आहे आणि शक्य ही आहे.
याबाबतीत एक उदाहरण सांगतो. समरव्हील मॅसेच्युसेट्स या गावात १९७२ च्या सुमारास "कर्बसाईड रिसायक्लिंग"चा प्रयोग केला गेला. ऐकीव माहीती प्रमाणे तो संपूर्ण अमेरिकेतील पहीला प्रयोग होता. अर्थातच असफल झाला आणि त्यावेळेस जो हे काम रिसर्च म्हणून करत होता आणि जो नंतर त्याच गावात डिपिडब्ल्यू चा डायरेक्टर झाला त्याने अनुमान काढले की "कर्बसाईड रिसायक्लिंग" कधी शक्यच होणार नाही. पुढे गरजा आणि कायदे बदलले. रिसायकल होऊ शकणार्या गोष्टी कचर्यात टाकायला बर्याच ठिकाणी बंदी आणली. आपोआप एक बाजारपेठ तयार झाली आणि आज काय होते ते सांगायला नको....
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का?
दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे.
-----
धन्यवाद
पर्यावरण : एक गंभीर विषय
विकासराव,
आपल्याशी एका विषयावर पूर्णपणे सहमत आहे, तो म्हणजे "पर्यावरण हा गंभीर विषय आहे". त्याविषयी बोलताना/लिहिताना गंभीर व्हायला हवे. ह्याविषयी क्रॉस डिसिप्लिनरी चर्चा व्हायला हवी, कारण ह्यात, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र, (आपल्याला आश्चर्य वाटल्याप्रमाणे, धर्म), जीवशास्त्र, तत्वज्ञान हे सगळे विषय अंतर्भूत आहेत.
ह्या सर्व मुद्यांचा विचार करून जागतिक तापवृद्धीची कारणे आणि ते थांबवण्यासाठी उपाय, हे शोधायला हवेत.
पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा.
१००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ?
- सर्किट
समुद्राची पातळी
>>>पण आधी, एन्व्हायरनमेंटलिस्ट लोक ही तापवृद्धी जगाचा विनाश करेल असे छाती ठोकून सांगताहेत, ते खरे आहे का, ह्यावर विचार विमर्श हवा.
मी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे स्वतःला एन्व्हायरनमेंटलिस्ट समजत नाही (आणि स्थानीक एन्व्हायरनमेंटलिस्ट लोकं पण मला तसे समजत नाहीत, पण तरी माझ्यावर विश्वास ठेवतात!). माझ्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे २०० शास्त्रज्ञांनी जो रिपोर्ट तयार केला आहे त्यात ते एन्व्हायरनमेंटलिस्ट म्हणून काम करत नाहीत तर शास्त्रीय दृष्टीकोन म्हणून संशोधन करत आहेत. बरं हे आत्ताचे संशोधन झाले, तसे गेले २-३ दशके हळू हळू संशोधन वाढतच गेले आहे. त्यावर शास्त्रीय वाद घालायच्या ऐवजी शंका घेऊन वाद घातला जातो. विचार करा, की आज ह्या शास्त्रज्ञांचे आपण ऐकले तर त्यांना आर्थीक फायदा किंवा कसलाच फायदा होणार नाही आहे. पण तेच जर या विज्ञानाला वोरोध करणार्या तेलकंपन्यांचे (त्यांनी अनुदान केलेल्या लोकांकडून - बियॉन लॉमबोर्ग बद्दल मी नंतर माहीती पडताळल्यावर लिहीन) ऐकले तर त्याचा आर्थीक फायदा त्यांना नक्कीच होणार आहे. तेंव्हा कोणाचे "स्वार्थ पणाला लागलेत" ज्यामुळे कोण खोटे बोलण्यास उद्युक्त होईल याचा विचार केल्यास बरे होईल.
१००० वर्षांपूर्वी सध्यापेक्षाही जास्त तापवृद्धी झाली, ती का ? तिचे काय दुष्परिणाम झाले ? ह्या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणीही दिलेली ऐकिवात नाहीत.
हे घ्या - National Oceanic and Atmospheric Administration US Department of Commerce: Paleoclimatology Webpage :
Several periods of warmth (listed below) have been hypothesized to have occurred in the past. However, upon close examination of these warm periods, it becomes apparent that these periods of warmth are not similar to 20th century warming for two specific reasons:
1. The periods of hypothesized past warming do not appear to be global in extent, or
2. The periods of warmth can be explained by known natural climatic forcing conditions that are uniquely different than those of the last 100 years.
Several commonly cited periods of warmth are as follows:
* The so-called "Medieval Warm Period" (ca., 9th to 14th centuries)
* The so-called mid-Holocene "Warm Period" (ca. 6,000 years ago)
* The penultimate interglacial period (ca. 125,000 years ago)
* The mid-Cretaceous Period (era?) (ca. 120-90 million years ago)
The latest peer-reviewed paleoclimatic studies appear to confirm that the global warmth of the 20th century may not necessarily be the warmest time in Earth's history, what is unique is that the warmth is global and cannot be explained by natural forcing mechanisms.
समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ?
खालच्या चित्रात आपल्याला हवे असलेले उत्तर मिळेल अशी आशा करतो:
Population, area and economy affected by a 1 m sea level rise (global and regional estimates, based on today's situation)
UNEP/GRID-Arendal library of graphics resources
धन्यवाद
धन्यवाद -- सोशल सर्च
विकासराव, धन्यवाद. आपण दिलेल्या दुव्यांचा अभ्यास सुरू आहे.
अवांतरः गेल्या वर्षात शोधयंत्रांच्या क्षेत्रात एक "सोशल सर्च" नावाचे खूळ सुरू आहे. म्हणजे सर्च एंजिनद्वारे (अल्गॉरिथमने) निकाल देण्या ऐवजी, खर्या खुर्या हाडामासाच्या लोकांची मदत घ्यायची. माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती. त्यामुळे हे खूळ नसून ह्या संकल्पनेत काहीतरी दम आहे, हेच सिद्ध झाले आहे. गूगलवर मात करायला याहूला (त्यांच्या यूझर्सच्या मदतीने) अद्याप खूप स्कोप आहे, असा विश्वास वाटतो.
पुन्हा एकदा, धन्यवाद.
- सर्किट
सोशल सर्च - भाग २
माझ्या प्रश्नांना आपण दिलेली उत्तरे कुठल्याही सर्च एंजिन वरून मिळाली नसती....
धन्यवाद, असा अनुभव मला पण आलेला आहे. असो. माझ्या कामानिमित्तच्या लेखनासाठी दुवे शोधत असताना असाच एक अचानक युएनइपी चा दुवा मिळाला. त्यातील खालील चित्र वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड साध्या पद्धतीत सांगते आणि ते चर्चे संदर्भात बेसीक माहीती देईल असे वाटल्यामुळे येथे देत आहे.
Atmospheric CO2 has increased from a pre-industrial concentration of about 280 ppmv to about 367 ppmv at present (ppmv= parts per million by volume). CO2 concentration data from before 1958 are from ice core measurements taken in Antarctica and from 1958 onwards are from the Mauna Loa measurement site. The smooth curve is based on a hundred year running mean. It is evident that the rapid increase in CO2 concentrations has been occurring since the onset of industrialization. The increase has closely followed the increase in CO2 emissions from fossil fuels. (http://www.grida.no/climate/vital/07.htm)
सोशल सर्च - भाग ३
वर बरेच नकाशे दाखवण्यात आले आहेत. सोशल सर्च करून माझ्याकडे जर्मनीतून आलेला नकाशा खाली देत आहे. अमेरिकेच्या बहूसंख्य लोकांना हाच नकाशा बर्यापैकी माहीती आहे. त्यामूळे माफ करा पण तुमचे सर्व नकाशे बिनकामाचे ठरत आहेत.
------------------------------------------------------------------
एका विदुषीच्या मते अमेरिकेत सध्या नकाशांची कमी आहे म्हणून ही सोय.
हा हा हा !!
उच्च !!! (पण नायकी आणि मायक्रोसॉफ्ट फ्याक्टर्यांची अदलाबदल झाली आहे. आणि क्यानडा "मूज हेड्स", "माउस हेड्स" नाही.)
- सर्किट
मूज हेड्स..
....म्हणजे काय हे जरा गुगलुन पाहिले तर ते एका कनेडियन बियरचे नाव आहे असे कळले..त्यात विनोद काय आहे?
विनोद नाही
क्यानेडामध्ये मूज हा प्राणी मुबलक संख्येत आढळतो. त्यामुळे क्यानेडियन लोकांना चिदवताना मूजहेड्स असे म्हणतात.
- सर्किट
हम्म..
.. 'माउस हेड' टाकुन सर्च केला असता ह्याच चित्रावर चाललेली ही मस्त चर्चा पहायला मिळाली. त्यातल्या शेवटून दुसर्या प्रतिसादातील थियरी पण वाचण्याजोगी आहे :-)
अवांतरः योगायोग ?
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ?
- (अचंभित) सर्किट
योगायोग नसावा...
वरील आलेखात एक विमान ट्विन टॉवर्सच्या दिशेने जाताना दिसते आहे. हा योगायोग आहे का ? की यू एन ई पी मधील कुणाला अमेरिकेतील काळ्याकुट्ट दिवसाची यावरून आठवण करून द्यायची आहे ?
एक म्हणजे ती न्यू यॉर्कची स्काय लाईन नाही वाटत. दुसरे म्हणजे ते चित्र युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नीयाच्या संशोधकांनी काढले आहे, तेंव्हा "चावटपणा" असायची शक्यता कमी वाटते. तीसरे म्हणजे, नक्की करू शकलो नसलो तरी, या चित्रात कार्बन डायऑक्साईड हा वातावरणात कुठपासून ते किती उंचावर गेला आहे हे दाखवले आहे असे वाटते.
>>समजा
>>समजा पुढल्या पन्नास वर्षांत आणखी एक फुटाने समुद्राची पातळी वाढली, तर पृथ्वीवर काय परिणाम होतील ?
ह्याचे उत्तरे लॉमबोर्ग ह्यांनी मुलाखतीत दिले होते. पुढील पन्नास वर्षात समुद्राची पातळी वाढण्या आधी गेल्या शतकात १ फुटाने वाढलेली आहे आणि त्यामुळे कसलेही प्रलय आलेले नाही. १९ व्या शतकातील सर्वात भीषण घटना कोणत्या असे विचारले असता बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही. अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.
दृश्य-अदृश्य
अर्थात त्याने नुकसान हे होणारच आहे पण त्याचा सध्या जास्तच बाऊ केला जात आहे. एड्स सारखे जीवघेणे रोग, युद्ध ह्यामधुन मधुन होणारी हानी कितीतरी जास्त आहे.
हे मान्यच आहे. बाऊ केला जात आहे हा जो भाग आहे त्या संदर्भात मी सुरवातीस त्यावरून चालू असलेल्या राजकारणाचा उल्लेख केला होता. त्याचे समर्थन मी पण करत नाही आहे.
...बहुतांश लोक महायुद्ध, सुनामी, कॅटरीना अशी उदाहरणे देतील पण समुद्राची फुटभर वाढलेली पातळी असे उत्तर ऐकायला मिळणार नाही.
दृश्य परीणामातून होणारी ही कदीही जास्त वाटते. उ.दा. विमान कंपन्या कायम म्हणतात की रस्त्यावरील अपघातात होणारी जीवीतहानी ही विमानापेक्षा जास्त असते आणि ते खरे पण आहे. पण लोकांना धसका बसतो तो विमानाचा...
पर्यावरणातील बदलाचे परीणाम हे आत्तातरी अदृश्य आहेत त्यामुळे ते मान्य करायला सर्वसामान्यपणे अवघड जाते. एक परीणाम हा पाण्याचा आणि जमिनीच्या नापिक पणाशी संबधीत आहे. आता हळू हळू असे म्हणायला लागले आहेत की अफ्रिकेतील डार्फर भागात जे अमनुष हत्यांकांड चालू आहे त्याचे मूळ हे पर्यावरणीय बदल होत असलेला दुष्काळ आहे.
बीबीसी दुवा: ब्रिटीश सरकार प्रतिनिधी
वॉशिंग्टन पोस्ट दुवा: यु एन जनरल सेक्रेटरी बॅन की मून
थोडक्यात माझे म्हणणे इतकेच आहे की अमेरिकेस (८०-९०% जगातील प्रदुषण करणारा देश) बरेच काही करता येण्यासारखे आहे ज्याने अर्थीक दृष्ट्या काही बिघडणार नाही. आणि त्यात पण गंमत बघा: घराच्या कर्जात गडबडी झाल्या बिलईयन्स डॉलर्स (आर्म) गेले तर लगेच सोडवायला पळतात, शेअर मार्केट मधे गडबडी झाल्या, बिलीयन्स बुडाले, इंटरेस्ट रेट कमी करणार, तेच विमान कंपन्यांच्या बाबतीत, इराक युद्धाबद्दलतर $$ किती ते विचारूच नका! पण पर्यावरण हाशब्द आला की इकॉनॉमीच्या नावाने जगबुडी होत असल्याचा गळा काढणार. माझा आक्षेप केवळ या गोष्टीला आहे.
प्रायोरिटायझेशन
>>>तसाच आणखी एक विचार म्हणजे, ह्या क्योटो प्रकल्प अंमलात आल्यावर दरवर्षी एका ध्रुवीय अस्वलाचा जीव वाचू शकतो पण आज दर वर्षी हजारो अस्वले शिकार करून मारली जातात तेव्हा अस्वलांच्या संवर्धनासाठी आधी ह्या शिकारीवर उपाय करायला नको का?
दोन चुका मिळून एक बरोबर होत नसते हा जुना सिद्धांत येथेपण लागू आहे
पण दोन पैकी कुठली चूक आधी सुधारायची, ह्यासाठी प्रायोरिटायझेशन करायला हवे, नाही का ? अस्वलांची शिकार थांबवणे, हा अधिक सोपा मार्ग आहे, नाही का ? मग ते आधी का करू नये ?
- (जांबुवंत भक्त) सर्किट
भारत आणि चीन
भारत आणि चीन या देशांनी केवळ क्लायमेट चेंज म्हणून नाही तर स्वत:च्या लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी म्हणून पण पर्यावरणाचा प्रामाणीक विचार करायला हवा असे वाटते.
अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ?
वाळ्याचे पडदे जाऊन एसी घरी असणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ?
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ?
- सर्किट
अस कोणी म्हणलयं?
आम्ही कॅलिफोर्नियातल्या लोकांनी आठवड्यातला एक दिवस सायकलने हापिसात जाऊन भारतातल्या राहणीमानाच्या व्याख्येवर कसा फरक पडेल ?
असं कोण म्हणतयं की तुम्ही सायकली चालवा? उर्जेचे आणि इंधनाचे व्यवस्थापन तुमच्या गव्हर्नरकडून शिका की . तो कमी इंधनावर चालणार्या मोठ मोठ्या गाड्या (हमर आणि एसयुव्हीज) चालवू शकतो ना? आज अमेरिकेचा प्रॉब्लेम आहे की येथील विशेष करून रिपब्लिकन राज्यकर्त्यांना गाड्यांवर इंधनबचत जास्त करायला लावायची नाही आहे. आणि डेमोक्रॅट्सना नुसते बोलायचे आहे...
अहो, पण ह्या दोन्ही देशांत आपापल्या सायकली टाकून देऊन कार्स चालवणे, म्हणजे राहणीमान सुधारणे, असा समज आहे. हे कसे बदलणार ?
मी काही वेगळे म्हणत नाहीच आहे. माझे म्हणणे अजूनच जास्त आहे, की केवळ क्लायमेटचेंज साठी म्हणूनच नाही तर राहाणीमानासाठी - याचा अर्थ असा की क्लायमेटचेंज साठीच तर करायला हवेच पण मुख्य म्हणजे पाणी, सार्वजनीक आरोग्य आणि व्यक्तीगत आरोग्य या तीन गोष्टी प्रदुषणामुळे बिघडत आहेत - त्याचे परीणाम बाकी सर्वत्र दिसू शकतील (अर्थातच इकॉनाँमीवर) म्हणून गरज आहे आणि लोकांना आणि राज्यकर्त्यांना समजले पाहीजे.
पण भारत आणि चीन यांनी करावे आणि अमेरिकेने निवांत झोपावे असे आपले म्हणणे आहे का? बरं पर कॅपिटा एमिशनच्या आकडेवारीवरून आपले काय म्हणणे आहे?
हे देखिल प्रदूषण???
विविध विषयांवर आपण सगळेच तावातावाने चर्चा करतो. वाद-प्रतिवाद करतो. प्रत्यक्ष समोरासमोर असताना वाग्युद्ध देखिल करतो ह्यातूनही ध्वनी प्रदूषण,मन प्रदूषण(कलुशित होणे,दुसर्याला दूषणे देणे)वगैरे प्रदूषण होतच असावे असे नाही वाटत. :D(ही माझ्या मताची पिंक टाकली इथे मी!)
एकूणच सद्या आपण जे जे काही करतो आहोत त्यातूनही कोणते ना कोणते प्रदूषण होतच असते नाही का!
नफा-नुकसान,फायदा-तोटा,सत्य-असत्य्,प्रकाश-अंधार,ज्ञान-अज्ञान,खरे-खोटे वगैरे जसे जोडीने नांदते तसेच प्रगती-प्रदूषण(अधोगती) एकत्र नांदताहेत. सापेक्षता वादाच्या सिद्धांताप्रमाणे आघात-प्रतिघात वगैरे सारखे.
हे सगळे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणूनच मी एक सिद्धांत मांडलाय(असे आश्चर्य चकित होऊ नका).
फायदा-तोटा,नफा-नुकसान ह्या सर्व गोष्टी 'हातात हात्'घालूनच चालतात. हे दुधारी शस्त्रासारखे आहे. एकीकडे खड्डा खणला की दुसरीकडे डोंगर बनतो. थोडक्यात परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे आणि हे अनादि कालापासून चालत आलेले आहे आणि अनंत काळापर्यंत चालू राहाणार आहे.