भाडेकरु
भाडेकरु हा कोणीही असला तरी भाडेकरुसारखाच वागणार. त्यात पुणेरी भाडेकरु असेल तर मग बोलायची सोयच नाही.
जुन्या वाड्याच्या लाकडांमधून ढेकूण बाहेर काढणे जितके अवघड तितकेच जुन्या भाडेकरुला घरातून हुसकावून लावणे महाकठीण. स्वतःचे कितीही नुकसान झाले तरी चालेल. सामयिक संडास, अपुरा प्रकाश या अडचणी सोसेल. घरमालकाशी पिढ्यानपिढ्या भांडत राहील. पण भाड्याची जागा तो सोडणार नाही. अगदी फेव्हिकॉलचा मजबूत जोड.
एक निराधार तरुण स्त्री आपल्या लहानगीला घेऊन पुण्यात आली. एका भल्या घरमालकाने आपल्याकडच्या ४ खोल्या तिला भाड्याने दिल्या. स्थिर स्थावर होशील तेव्हा भाडे दे असेही सांगितले. पुढे तिची स्थिती थोडी सुधारली. तेव्हा तिने भाडे द्यायला सुरुवात केली. पुढे मुलगी मोठी झाली, त्या मुलीचे लग्न झाले. तिनेही तिथेच संसार थाटला. इकडे घरमालकालाही वाढत्या संसारासाठी अधिक जागेची आवश्यकता होती पण या भाडेकरुंनी जागा सोडली नाही. आता हे मालक आणि भाडेकरु एकमेकांशेजारीच राहतात पण दोघांमधे अबोला आहे.
सुरुवातीच्या काळात भाडेकरुकडे मतदार या दृष्टिने पाहीले गेले. मालक १ विरुद्ध भाडेकरु अनेक. संख्येमुळे कोणत्याही सरकारने त्यांना नाराज करण्याचे धाडस दाखवले नाही. पुण्यातले भाडेकरु उन्मत्त होत गेले.
आपल्याकडे भाडेकरुला वीकर सेक्शन, दुर्बल घटक म्हटले आहे. त्यामुळे त्याला हाकलता येत नाही. त्यात गम्मत म्हणजे घराची मालकी जशी वारसा हक्काने येते तसाच भाडेकरुचा हक्कही वारशाने येतो आणि भाडेही पूर्वी होते तेच. त्यात एक रुपयाचीही वाढ होत नाही. सध्या ११ महिन्याचे लीव लायसंस हा त्यावरचा उपाय असावा. पण तो वेगळा विषय आहे.
भाडेकरुकडे जर स्वतःच्या मालकीचे घर असेल तर मालक भाड्याने दिलेली जागा परत घेऊ शकतो. यासाठी अनेक जण स्वतःचे घर घेताना पोरांच्या नावावर घेतात. कोर्टात केस उभी राहील्यास बिनधास्त आणि निलाजरेपणे खोटे सांगतात. मुलगा सून आम्हाला सांभाळत नाहीत. म्हणजे आम्ही पुन्हा दुर्बल घटक. भाड्याची जागा सोडणार नाही.
'अंकुश' चित्रपट आपण पाहीला असेल. अशा मग्रूर भाडेकरुंमुळे शेवटी गुंडांची मदत घ्यावी लागते.
भाड्याचे घर ६ महिने बंद राहील्यास मालक ते ताब्यात घेऊ शकतो म्हणे. त्यामुळे पुण्यातले अनेक महाभाग फक्त दुपारची झोप काढायला जुन्या भाड्याच्या घरात जातात. कुणी विचारले तर यांचा उलटा प्रश्न "आजोबांच्यापासूनची १० रुपये भाड्याची जागा अशी कशी सोडायची" नाकासमोर चालणार्या, स्वतःला पापभीरु समजणार्या मध्यमवर्गीय लोकांना बर्याचदा दुसर्याची जागा बळकावून आपण मोठे पाप करत आहोत याची जाणीवच नसते.
अशा कूपमंडूक वृत्तीच्या, डबक्याबाहेर येऊ न इच्छिणार्या भाडेकरुंनी पुण्याच्या पेठांमधील वाड्यांना झोपडपट्टीची अवकळा प्राप्त करून दिली आहे. यामुळे पुण्याचेही आता दोन सांस्कृतिक भाग पडलेले आहेत. दोन भावांमधल्या एका भावाची परिस्थिती बरी असेल तर तो वाड्याच्या वातावरणातून बाहेर पडतो. कोथरुड औंध बाणेर बिबवेवाडी इथे घर घेतो. स्वतःची प्रगती साधतो. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महागडे तिकीट काढून नाटकाला हजेरी लावतो. याउलट दुसरा भाऊ कमी भाड्यातली आजोबांपासूनची जागा सोडायची कशाला अशा विचाराने पेठातल्या वाड्यातच राहतो. फुकट कार्यक्रम असेल तर भरत नाट्यला हजेरी लावतो. येता येता आणण्यासाठी बायकोने दिलेली वाण्याच्या सामानाची यादी बरोबर असते आणि सामान आणायला अति कळकट पिशवी. या अशाच लोकांना पुणेरीपणाचा जाज्वल्य अभिमान असतो. पण आपण पेठेत राहतो ते पेठेच्या अभिमानामुळे नव्हे तर भावासारखे बाणेरला फ्लॅट घेणे परवडत नाही म्हणून हे दु:ख तो सोयीस्करपणे लपवतो.
या सगळ्या पार्श्वभूमीवर एक उदाहरण लक्षात राहते. एक सामाजिक कार्यकर्ते होते/आहेत. अनेक वर्षे भाड्याच्या जागेत राहीले. जागेचा पुरेपूर उपयोग करून घेतला. भाडेही नीटपणे देणे त्यांना शक्य नसे. पुढे दुसर्या जागेत रहायला गेले तरी जागा स्वतःकडे होती. एक दिवस मालक घरी आले. यांना शंका जागा रिकामी करा आणि राहिलेले भाडे द्या म्हणणार. पण मालक म्हणाले. आपल्या जागेत नवी बिल्डींग उभारणार आहोत. तुम्हाला फ्लॅट हवा तर तसे सांगा किंवा पैसे हवे तर तसे लिहून द्या. सामाजिक कार्यकर्ते चकित. ते मालकांना म्हणाले, "तुमच्या जागेचा आम्ही पुरेपूर उपयोग करुन घेतला, भाडेही नीटपणे दिले नाही. आता आम्हाला अधिक काही नको. या घ्या किल्ल्या. तुमची जागा तुम्हाला परत करतो" अशी मोजकी उदाहरणे खरच आशेचा किरण आहेत.
(संपादित)
पण या फायद्याचा वाटा भाडेकरुला द्यायला त्यांची तयारी नाहीफायद्याचा वाटा का द्यावा..?