पाककृती

बिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२

Primary tabs

जिन्नस * चार वाट्या भिजवून मोड आणून सोललेल्या डाळिंब्या-कडवे वाल * चार चमचे तेल भाजीसाठी व वरून घालावयाच्या फोडणीसाठी दोन चमचे तेल * चवीपुरते मीठ, गुळाचे चार-पाच मध्यम खडे ( किसलेला गुळ पाच चमचे ) * दोन चमचे ओले खोबरे व मूठभर कोथिंबीर * तीन चार सुक्या लाल मिरच्या व फोडणीचे साहित्य मार्गदर्शन कडवे वाल बारा-चौदा तास भिजवून नंतर मोड येण्यासाठी पंधरा-सोळा तास बांधून ठेवून नंतर सोलून घ्यावेत. थंड प्रदेशात मोड येण्यास थोडा जास्त वेळ लागू शकतो. कढई/पातेले मध्यम आचेवर ठेवून चांगले तापले की चार चमचे तेल घालावे. नेहमीप्रमाणेच मोहरी- हिंग व हळदीची फोडणी करून त्यावर सोललेल्या डाळिंब्या घालून हलक्या हाताने परतावे. त्यावर दोन भांडी पाणी घालून झाकण ठेवावे. दहा-बारा मिनिटांनी दोन चमचे हिंग व थोडीशी कोथिंबीर घालून ढवळून पुन्हा दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवावे. पाणी कमी वाटल्यास एक भांडे पाणी घालावे. झाकण काढून एखादी डाळिंबी काढून शिजली आहे का ते पाहावे. नसल्यास पुन्हा पाच मिनिटे ठेवावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ, ओले खोबरे व गूळ घालून सगळे मिश्रण हलक्या हाताने एकत्र करून पुन्हा पाच मिनिटे झाकण ठेवूनच शिजवावे. आचेवरून उतरवून कोथिंबीर घालावी. एका छोट्या कढईत किंवा फोडणीच्या पाळीत दोन चमचे तेल घालून तापले की मोहरी व हिंगाची फोडणी करून आच बंद करावी. लागलीच त्यात सुक्या मिरच्या घालून मिनिटभर हालवून वाटीत काढावी. डाळिंब्या वाढताना वरून ही वेगळी केलेली फोडणी घालून वाढावे. Image removed. टीपा डाळिंब्या शिजायला हव्यात पण मोडू देऊ नयेत. अतिरेक शिजवू नयेत. मात्र शिजल्याची खात्री झाल्याशिवाय गूळ घालू नये. आवडत असल्यास चार आमसुले घालावीत. किंवा बरोबर आमसुलाचे सार जरूर करावे.
चिंतामणी

बरोबर आमसुलाचे सार जरूर करावे.

त्याचीसुद्ध पाकृ द्या

गवि

कोकणात असताना नैसर्गिकरित्या या प्रकाराची चटक लागली.

अजूनही कधीमधी मातृकृपेने याचा लाभ होतो, त्यामुळे आयुष्य समाधानी आहे.

उत्तमच...

धन्यवाद..

गणपा

फोटो कातील आहे आणि रेसिपी नेहमी प्रमाणे भन्नाट. :)

कौशी

मस्त रेसीपी....हा फोटो दिसत आहे.

मेघवेडा

आईशप्पथ कसला जीवघेणा फोटू आहे.. खल्लास!!!

आंसमा शख्स

एक्दम मस्त लागते... गरम भाकरी बरोबर खायची. गूळ नाही घालायचा पन

चिंतामणी

गुळ का घालतात हे माहीत आहे का?

कडव्या वालांना उग्रपणा असतो. गुळाच्या वापराने ते नॉर्मल होतातच. फक्त गोड चविसाठी नाही वापरतात गुळ.

भानस

निवेदिता-ताई, विजिनेर, गगनविहारी, गणपा, बेसनलाडू, रेवती, कौशी, प्राजु, मेघवेडा, आंसमा व मदनबाण सगळ्यांचे खूप आभार. :)