प्रेम करायला जागा नसलेली मुंबई
Primary tabs
आज पेपरात बातमी वाचली, 'भरतीच्या वेळी पाण्यात बुडून प्रेमी युगुलाचा मृत्यू', 'प्रेम उद्यानांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..',
म्हटलं... बघुया तर हा प्रश्न खरोखर ऐरणीवर आणून.... म्हणूनच हा काथ्याकूट प्रपंच...
मुंबईतल्या तरुणाईसाठी खरोखरच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तथाकथित संस्कृतीरक्षकांच्या दांभिक मुजोरपणापुढे नमून मुंबईचे पोलीसखाते जणु काय मुंबईतली सगळी गुन्हेगारी नष्ट झाल्यामुळे, आता दुसरे काहीच काम नसल्याच्या थाटात संस्कृतीरक्षणाचा विडा उचलल्याप्रमाणे प्रेम करणा-यांवर उठले आहे. भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरणा-या प्रेमी युगुलांवर पोलीसी कारवाई केली जाते. मुंबईत लेडीज बार आहेत, पण प्रेम करणा-या तरुणांसाठी अशी निवांत जागा नाही, की जिथे एकमेकांबरोबर प्रेमाच्या चार गुजगोष्टी करता याव्यात. रस्त्यावर हातात हात घालून चालणा-या जोडप्याकडे आपल्या संस्कृतीरक्षकांच्या देशात शंभर नजरा वळून वळून बघतात. एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार? अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ?
ह्यावर कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवतात,
त्याने प्रेम केलं, किंवा तिने प्रेम केलं, म्हणून तुमचं काय गेलं ?
तुमच्या आमच्या पूर्वजांनी, दुसरं काय केलं ?
तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ?
याबाबत, मिपाकरांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...
आपला
हैदर अली
(तथाकथित संस्कृतीचा टेंभा मिरवणा-यांचा कट्टर विरोधक)
तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ?
अवश्य असावीत! आम्ही पुन्हा एकदा याचा खंदा पुरस्कार आणि पुनरोच्चार करतो!
हैदरराव,
काही काळापूर्वी आम्ही याच संदर्भात एक चर्चाप्रस्ताव उपक्रमावर मांडला होता, त्यात आम्ही आमचे मतही नोंदवले होते. इतर सभासदांनीही त्यात आपापली मते नोंदवली आहेत.
ही चर्चा आपल्याला इथे पाहता येईल...
आपला,
(कधीकाळी कॉलेज जीवनात बागेतल्या अंधारात मजा केलेला!) तात्या.
प्रेम करायचे असेल तर त्याला कुठल्याही जागेचे वेळेचे बंधन नाही. अनेक जोडपी अशी आहेत की जी बसमधे लोकल मधे एकमेकांना मदत करत सावरत कदाचित चेष्टामस्करी करत असतात. कदाचित त्याना ते प्रेम करत्तात असे म्हणता येईल.
पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात. कारण असे पार्क उघडले आणि आमच्यासारखे चावट लोक हळूच इकडून तिकडून लपून छपून त्या क्रीडा बघणार नाहीत का?बागा शक्यतो उघड्या असतात त्यामुळे तिथे तो धोका अधिक...
जर प्रश्न 'मुंबईचा जावई' या प्रमाणे एकांत मिळण्याचा असेल तर त्यासाठी वेगळी हॉटेले उघडावीत. त्यामुळे वरील धोके टळतील असे वाटते(हॉटेल मधे छुपे कॅमेरे नसतील हे गृहीत धरुन).
वरील मते माझी अंतिम मते नाहीत. कदाचित चर्चेतून अधिक चांगले पर्याय उपलब्ध होउ शकतील. पण ही प्रथमदर्शनी मते आहेत.
पुण्याचे पेशवे
पण मुक्तचुंबने आणि इतर गोष्टी या आपापल्या सद्सदविवेकबुद्धी वापरून स्वगृही कराव्यात.
मुक्तचुंबने हा शब्द अतिशय आवडला.. :)
आपला,
(मुक्त!) तात्या.
असल्या पार्कांना माझा विरोध आहे. कारण इथे अपेक्षित असलेले मुक्त "मैत्री पार्क" होणार नाहि. ते स्थळ लवकरच "बाजार" होऊन जाईल याची खात्री बाळगा. मनापासून चार घटका एकांतात बोलायला, गुजगोष्टी करायला कोणत्याहि बागेत जाता येते. पण शारिरिक जवळीक करण्यासाठी अशी मुक्त सार्वजनिक ठिकाणे चालू करणे मात्र धोकादायक वाटते.
हे पटले :)
-ऋषिकेश
>>एकाच वेळी ग्लोबल आणि संकुचित अशा द्विधा मनस्थितीत असलेले काय संस्कृतीचं रक्षण करणार?
बरं
>> अहो ह्या संस्कृतीरक्षकांच्या पूर्वजांच्या गेल्या पाचशे पिढ्यांनी प्रेम केले नसते तर आज हे अस्तित्त्वात तरी असते का ?
हम्म, बरं बरं
>> तुम्हाला काय वाटतं, प्रेमी युगुलांसाठी खरोखर अशी ठिकाणे किंवा उद्याने असावीत का ?
प्रेमी युगुलांसाठी अशी ठिकाणे किंवा उद्याने आहेतच असे मला वाटते, पण ती कामातुरांकरिता सुद्धा खुली करावीत असे आम्हांस वाटते.