गणेशमूर्तिकारांची उद्या शिवसेना भवनात बैठक
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवरील बंदीबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी मुंबईतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सरचिटणीस आणि मूर्तिकारांची बैठक शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे. यावेळी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. हिंदूंच्या सणांत कोणताही हस्तक्षेप शिवसेना सहन करणार नाही, या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
काहीतरी निसर्गाचं पर्यावरणाचं चांगलं होत असेल आणि शिवाय मूर्तीचीही विटंबना (तत्काळ न दिसणारी) टळत असेल तरी त्याला हस्तक्षेप म्हणून विरोध करायचा ? छान.
तुलनेत नव्याने आलेल्या कृत्रिम पीओपीच्या मटेरियलऐवजी शाडूच्या (पूर्वीपासून जशा असायच्या तशा) मूर्ती हा हस्तक्षेप म्हणायचा हा विनोद झाला. असो.
म्हणजे फलाहाराने करण्यात येणार्या उपासात नंतर शोध लागलेले कृत्रिमरित्या बनवलेले साबुदाणे मान्य (सोयीस्कर) झाले, आणि कधीतरी ते आरोग्याला वाईट असे सिद्ध झाले म्हणून कोणी म्हटलं की उपासाला (पुन्हा पूर्वीसारखी) फळं खावीत तर तो उपासात हस्तक्षेप का?
निदान पीओपीत असलेल्या कामगारांना आम्ही उघडे पडू देणार नाही..त्यांचे आर्थिक प्रश्न.. असा काही अजेंडा तरी मांडायचा.
धन्य आहे.
अजानुकर्णा साहेबांशी सहमत.
उद्धवनी या प्रश्नाचे राजकारण करू नये.
महागाई /भ्रष्टाचार / घराणेशाही असे अनेक मुद्दे समोर असताना हा मुद्दा कशासाठी?
प्लास्टरच्या अमूर्ती बहुतेकवेळा महाराष्ट्राबाहेरून येतात. त्यामुळे बर्याच स्थानीक लोकांचा रोजगार बुडालेला आहे.
गेल्या वर्षी पुण्यात मुलतानी मातीच्या छोट्या गणेशमूर्ती उपलब्ध होत्या. कमला नेहरु पार्कसमोरच्या शिरीष ट्रेडर्सकडे विक्रीसाठी आल्या होत्या. मी आज जाऊ-उद्या जाऊ असा आळस केला आणि गणेशचतुर्थीआधी दोन दिवस त्या मूर्ती संपल्या. मुलतानी मातीच्या गणेशमूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे विसर्जन घरी लहान बादलीत करता येते. वनस्पतीजन्य रंग वापरले असल्याने माती विरघळल्यानंतर हे बादलीतले रंगीत पाणी झाडांना घातले तरी चालते. तळाशी उरलेली माती चेहर्याला सौन्दर्यप्रसाधन लेप म्हणून लावता येते.
पण मला बेसिक प्रश्न पडतो, की आता सार्वजनिक गणेशोत्सवाची गरजच काय? सर्वजण आपापल्या घरी भरपूर खर्च करुन सण साजरे करतात. सजावट करतात, गोडाधोडाचे खातात. मग पुन्हा गल्लीत मंडळ कशासाठी? ती वर्गणी (की खंडणी) नको आणि मवालेगिरीही नको. पण जर उत्सव सार्वजनिक ठेवायचा ठरवले तर मग घरगुती गणपती बंद करा. रिपीटेशन कशाला हवे?
पूर्वी गणेशोत्सवाचा उद्देश स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय/सामाजिक ऐक्य होता. मेळे होत. स्थानिक कलाकारांना उत्तेजन मिळे. लोकसेवक कार्यकर्त्यांना समाजकार्याचे वस्तुपाठ मिळत. आता यापैकी कशाची गरज राहिली आहे? गेल्याच गणपतीत मी आमच्या भागात एक प्रकार पाहिला. मी एका दुकानात गेलो असताना तेथे वर्गणी मागणार्या तरुण टपोरींचे एक टोळके आले. त्यातील जो लीडर होता त्याने फर्मावले, 'पक्या. याची हजाराची पावती फाड रे.' त्यावर त्या दुकानदाराने विरोध केला. आतापर्यंत २५१ रुपये याप्रमाणे चार मंडळांना १००० रुपये देतो. तुम्ही एकटे एवढे पैसे कसे मागता, असे दुकानदाराने विचारले. त्यावर तो लीडर म्हणाला, 'ठीक आहे. द्यायचे नसतील तर नको देऊ. पुढे केव्हातरी काचा फुटतील तेव्हा समजेल तुला.'
हा प्रकार सर्वसामान्यांच्या घरापर्यंत येण्याची वेळ फार लांब नाही, असे वाटायला लागले आहे.
योगप्रभुंशी सहमत...
मला तर सार्वजनिक गणेशोत्सवाचा वीट आला आहे. गणपतीउत्सवाच्या काळात दारु आणि कंडोमचा खप किती तरी वाढतो. आणि त्यात उध्दव ठाकरेना काही तरी काम द्यावे असे मी सरकारला विनंती करतो.
कुठलाही सार्वजनीक उत्सव हा आता उत्सव उरला आहे का असा प्रश्न पडतो. कार्यकर्ते वर्गणी गोळा करतात का खंडणी हे देखील समजत नाही.
ह्या ऐन गणेशोत्सवात तिसर्याच दिवशी अचानक आईला प्रयाग हॉस्पिटलला अॅडमिट करायची गरज पडली. त्यावेळी अनेक मंडळांनी रस्ते बंद केल्याने प्रचंड अडचण झाली. आणि सर्वात वाईट म्हणजे गर्दी नसताना व शक्य असुनही अनेक मंडळांनी सहज बाजुला करता येण्यासारखे अडथळे देखील न हलवता मदत करण्याचे नाकारले. बरोबर पेशंट आहे सांगुनही त्यांच्याकडून कसलेही सहकार्य मिळाले नाही.
सहमत आहे. गणेशोत्सव, नवरात्र, ३१ डिसेंबर, रमजानचे आणि दर शुक्रवारचे रस्ते बंद पाडून केले जाणारे नमाज यासारखे उत्सव रस्त्यावर उतरून साजरे करण्यास बंदी करावी.
पुपेंशी सहमत.
एक गाव एक सार्वजनीक गणपती (शहरात असेल तर एक वॉर्ड/विभाग एक सार्वजनीक गणपती) हा उपक्रम राबवल्यास लो. टिळकांचा या उत्सवा मागचा उद्देश सफल होईल.
अपर्णाने म्हटल्याप्रमाणे हल्ली खूप लोक घरातल्या गणपतीचीच पूजा करतात. माझे सासरे ८७ वर्षांचे आहेत, पण विहिरीत गणपतीचं विसर्जन करू नये हे त्याना सुचवल्यावर त्यानी डोणीत पाणी भरून त्यात घरच्या गणपतीचे विसर्जन करायला सुरूवात केलीय. नवीन विचार नीट सांगितला तर कोणीही त्याचा मनापासून स्वीकार करतो.
मला वाटतं, पीओपीचा प्रश्न जास्त करून शहरात भेडसावतो. लहान खेड्यांमधे अजून शाडूच्याच मूर्ती बनवल्या जातात.
इथे गोव्यातल्या काही घरातल्या प्रथेचा उल्लेख करते. पोर्तुगीजानी कोणत्याही देवाची नवी मूर्ती बनवायला बंदी घातली होती त्या काळात जीव मुठीत धरून जे हिंदू गोव्यात राहिले, त्यातील काहीनी आपद्धर्म म्हणून घरातल्या गणपतीच्या तसबिरीची पूजा करायला सुरुवात केली. आज, म्हणजे ४५० वर्षांनंतरही या घरांतून घराण्याची प्रथा म्हणून गणेशोत्सवात घरातल्या गणपतीच्या तसबिरीचीच पूजा केली जाते. तसंच काही घरातून तेवढीच जुनी मखरेही वापरली जातात. त्यांच्याकडे पीओपी वगैरेचा प्रश्नच येत नाही!
वर बऱ्याच जणांनी उपाय सांगितलेत जे प्रदूषण करणारे नाहीत अन मंडळांची अरेरावीपण नाहीशी होईल...अन हाच मुद्दा आहे कि ज्यामुळे हे उपाय अमलात आणले जाणे खूप अवघड आहे.
तसबिरीची पूजा सुद्धा एक चांगला उपाय आहे....ती तर विसर्जित कराय्चासुद्धा प्रश्न नाही...पण...
प्रतिक्रिया