गाडगीळांनी बे एरियात कॅलिफोर्नियात पेढी टाकलेय.. तिथे विकत घेऊन मग पुण्यात कधी गेलात तर मिरवता येईल (सोन्यात घट येणार नाही गाडगीळांकडूनच घेतले असल्याने..)
बाकी इतरही पर्याय असतिल म्हणा.. हा आपल्या मराठी (मध्यमवर्गीय) पर्याय.. ईटीएफचा विचार करण्यास हरकत नाही, पण लिक्विडीटीचं बघून घ्या..
तुम्हाला दुकानातूनच घ्यायचे आहे की एखाद्या साईटवरुन? ajpm.com ही एक चांगली साईट आहे. तसेच आपल्या आजूबाजूला एखादे विश्वासार्ह दुकान असेल तर देशी सूवर्णकाराचे दुकान हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.
सर्टिफिकेट्स कागदी असतात. कागद म्हणजे सोने नाही. तेच गोल्ड फंड्स आणि इटिएफच्या बाबतीतही खरे आहे.
गुंतवणुकीसाठी दुकानात जाऊन हॉलमार्कवाल्या सोन्याची वळी, चिप्स किंवा नाणी घेण्याची पद्धत बर्याच देशांमध्ये आहे. अमेरिकेत कशी करतात ते माहिती नाही.
जोखीम. सर्टिफिकेट्स म्हणजे जास्त जोखीम. अलोकेटेड असलं तरी जारी करणार्या बँकेने एकाच वीटेवर किती लोकांना दिलंय हे कसं कळणार? शिवाय त्यात गुंतवणूक म्हणजे सोन्याबरोबरच एकंदर त्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर अनावश्यक गुंतवणूक नाही का? अगदी साठवता येणार नाही एवढं सोनं घेणार असाल तर विचार करावा लागेल पण तो पर्यंत खरोखर हातात सोने असणेच उत्तम.
>>सर्टिफिकेट्स म्हणजे जास्त जोखीम
हे काही फारसे पटले नाही. सामान्य माणूस जेव्हा सोने घेतो तेव्हा तो दागिने घेतो. यात मुख्य अडचण म्हणजे करणावळ जाते. वरून दागिना मोडताना तुट येते. एखाद्याने दागिना न घेता नाणे अथवा बिस्कीट घेतले तरीही ते सांभाळण्याची जोखीम आहे. घरात फार प्रमाणात ठेवणे अडचणीचे. अन्यथा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे लागते. तरी नेता आणताना धोका असतोच. चोरी, दरोडेखोरी शिवाय आग, पूर, भूकंप या सारखे धोके आहेतच (शक्यता कमी असली तरीही).
शिवाय शुद्धता नक्की कशी पारखून घेणार? (मला वाटते हल्ली नाणी ही प्रमाणित शिक्क्यानिशी येतात, पण तरीही फसवणूक होऊ शकतेच की) लिक्विडीटी हा ही भाग आहे. सोने खऱ्या स्वरुपात विकायला गेलो तर त्या क्षणी विकत घेणाऱ्याकडून ग्राहकाला सोनार जितके चार्ज करतो तितके आपल्याला देतो का हे व्यक्तिश: मला माहित नाही (मी कधी सोने विकले नाही)
>>अलोकेटेड असलं तरी जारी करणार्या बँकेने एकाच वीटेवर किती लोकांना दिलंय हे कसं कळणार?
अशी एकच गोष्ट १० जणांना विकता येते? आणि कायद्याने तशी परवानगी त्यांना असली तरी जोवर मी ते विकताना मला ती बँक त्या क्षणीचा बाजारभाव देण्याचा वायदा करते आहे, तोवर आपण कशाला चिंता करायची त्यांनी एक वीट किती जणांना विकली आहे त्याची ?
>>शिवाय त्यात गुंतवणूक म्हणजे सोन्याबरोबरच एकंदर त्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर अनावश्यक गुंतवणूक नाही का?
अशी गुंतवणूक आपण करत असतोच की. शेअर घेताना demat शेअर च्या व्यवस्थेवर, चेक घेताना बँकेवर इतकेच काय चलनातील नोट ही पण खरा पैसा नसून पैसे देण्याचा वायदा असतो RBI ने केलेला.
त्यामुळे माझ्या मते, गुंतवणूक म्हणून करणार असाल तर कागदी (किंवा इलेक्ट्रोनिक) स्वरूपातील सोने हा जास्त चांगला पर्याय आहे. जाणकारांची मते ऐकण्यास उत्सुक.
अलोकेटेड असलं तरी जारी करणार्या बँकेने एकाच वीटेवर किती लोकांना दिलंय हे कसं कळणार?
सेबीच्या या सर्क्युलरप्रमाणे सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या फंडांना त्यांच्याकडे खरोखरच सोने आहे याबद्दलचा रिपोर्ट दर सहा महिन्यांनी सेबीला द्यावा लागतो. सेबीचे शेअरबाजाराशी संबंधित नियम नक्कीच कडक आहेत आणि त्याची अंमलबजावणीही कडकपणे होते.सत्यमसारख्या प्रकरणानंतर सेबीने नियम आणखी कडक केले आहेत आणि त्या प्रकरणी चुकीचे audit दिल्याबद्दल PWC सारख्या मोठ्या संस्थेची नाचक्की झाली आहे.मध्यंतरी बाजारात जी पडझड झाली ती काही मंडळींनी जाणीवपूर्वक केली असा संशय सेबीला आल्यावर त्याविषयी चौकशी सुरू झाली.अगदी मुकेश अंबानींच्या RIL वरही इनसायडर ट्रेडिंगसाठी १५०० कोटींचा दंड सेबी ठोठावायची शक्यता आहे आणि असे वेगवेगळ्या वेळी सेबीने केलेही आहे. तेव्हा सेबी हा कागदी वाघ नक्कीच नाही आणि सेबीला इतके हातोहात फसविणे वाटते तितके सोपे नाही.तेव्हा एकाच वीटेवर एकापेक्षा जास्त लोकांना युनिट देणे हा प्रकार इतक्या बेमालूमपणे खपवला जाईल असे वाटत नाही.
शिवाय त्यात गुंतवणूक म्हणजे सोन्याबरोबरच एकंदर त्या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर अनावश्यक गुंतवणूक नाही का?
हे कसे काय ते समजले नाही. याविषयी अधिक स्पष्टीकरण देता येईल का?
रेग्युलेशन्स पुष्कळ असतात पण तरी वेळ आली की सिस्टीम फेल्युअर होतेच. २००८ मध्ये लेहमनच्या बुडण्यामुळे अतिशय सुरक्षित समजली जाणारी शॉर्ट टर्म मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स पण डिफॉल्ट झाली होती असं ऐकीवात आहे. अगदी कमोडिटी ट्रेडर नसेल तर माझ्या समजुतीप्रमाणे सामान्य माणूस सोन्यामध्ये यासाठी गुंतवणूक करतो की पुढेमागे मोठ्या संकटात चलनाची किंमत खूप कोसळली आणि एकूणच देशातले भांडवली बाजार खूप कोसळले तर सोन्यामुळे बचाव होईल. आता अशी परिस्थिती आलीच तर ही बँकांची सर्टिफिकीटे आणि इटीएफ वगैरे विकण्या-घेण्याची व्यवस्था सुरळीत चालेल याची खात्री काय? शिवाय यांची किंमत त्या सर्टिफिकेट्सना ओळख देणार्यांनाच. दुसर्या ठिकाणी जावे लागले तर काय होईल कोण जाणे. म्हणून हातात सोने असणे महत्वाचे वाटते.
रेग्युलेशन्स पुष्कळ असतात पण तरी वेळ आली की सिस्टीम फेल्युअर होतेच.
समजा फंडाने अवैधपणे सोने परस्पर विकून त्याचे पैसे केले तर नक्कीच तुम्ही म्हणता तशी परिस्थिती निर्माण होऊ शकेल.पण अन्य कोणत्याही कारणाने फंड दिवाळखोरीत गेला तरी त्या फंडाकडे असलेले सोने विकून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळू शकतील.अख्खी म्युचुअल फंड कंपनी जरी दिवाळखोरीत गेली तरी मूळ मुद्दलाइतका सोन्यावर पहिला दावा या गोल्ड इ.टी.एफ मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा असेल.अर्थात अमेरिकेत सबप्राईमच्या संकटात घराच्या किंमती वाढतच राहतील हा खोटा आत्मविश्वास होता.तसेच सोन्याच्या बाबतीतही झाले तर मात्र नुकसान नक्कीच होईल.पण जर काही कारणाने सोन्याच्या किंमती कमी जरी झाल्या तरी सोने प्रत्यक्ष ताब्यात ठेवले तरी असे नुकसान होईलच.
२००८ मध्ये लेहमनच्या बुडण्यामुळे अतिशय सुरक्षित समजली जाणारी शॉर्ट टर्म मनी मार्केट इन्स्ट्रुमेन्ट्स पण डिफॉल्ट झाली होती असं ऐकीवात आहे.
याचे कारण काय होते हे आधी बघू. समजा एका कंपनीने १ जानेवारीला कच्चा माल खरेदी केला.त्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार झाला आणि गोदामात गेला.आणि तो तयार झालेला पीस १ फेब्रुवारीला विकला गेला तर याचा अर्थ होतो १ जानेवारीला कंपनीने पैसे गुंतवले त्याचा परतावा १ फेब्रुवारीला म्हणजे १ महिन्याने मिळाला.म्हणजेच कोणत्याही क्षणी पुढील एक महिन्यासाठी पुरेसे पडेल इतका पैसा कंपनीकडे हवा.अशा short term साठी गरजेच्या असलेल्या पैशाला ’Working capital' म्हणतात.आता असे working capital कुठून उभे करावे?त्यासाठीचा एक मार्ग म्हणजे short term commercial papers जारी करून गुंतवणूकदारांकडून पैसे कर्जाऊ घ्यावेत आणि त्या बदल्यात त्यांना थोडेसे व्याज द्यावे!
अवांतर: Working capital हे वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेससाठी वेगवेगळ्या नेचरचे असते. म्हणजे आपल्या घरी दररोज दूध घालायला येणाऱ्या दूधवाल्याला आपण बील देतो एक महिन्यानंतर तेव्हा त्याला working capital उभे करायला हवे. तर एखाद्या मासिकासाठी आपण वर्गणी भरतो तेव्हा ती एका वर्षासाठी आधीच वर्गणी भरतो.तेव्हा केवळ हाच एक मुद्दा असेल तर मासिकासाठीचे working capital हे ऋण असते आणि त्यांच्याकडे आधीच खेळता पैसा असतो.तेव्हा working capital किती हवे हे बिझनेसच्या स्वरूपावर अवलंबून असते.वित्तीय संस्थांना पण working capital गरजेचे असते.
आता वित्तीय संस्थांनी आपली working capital ची गरज भागवण्यासाठी असे थोड्या कालावधीसाठीचे commercial paper जारी केले होते.त्यात मनी मार्केट म्युच्यअल फंडांनी गुंतवणूक केली.आता २००८ मध्ये लेहमन कोसळली याचे कारण लेहमनचे सबप्राईम सेक्युरिटीजचे exposure. त्यानंतरच्या काळात नक्की कोणत्या वित्तीय संस्थांचे अशा toxic assets मध्ये किती exposure आहे याविषयी बाजारात खूप मोठा संभ्रम निर्माण झाला होता.
समजा मी money market mutual fund मध्ये काही समभाग घेतले असतील आणि तो फंड अशा वित्तीय संस्थांच्या commercial papers मध्ये गुंतवणूक करत असेल तर मला माझ्या पैशाविषयी काळजी वाटणे स्वाभाविक आहे.त्यामुळे माझ्यासारखे असंख्य गुंतवणूकदार त्या फंडाला युनिट परत करून भराभरा आपले पैसे परत काढू लागले तर त्याचा परिणाम काय होईल?भारतात सामान्यत: १०० रूपये ठेवींमागे बॅंका ६ रूपये रोख स्वरूपात आपल्याकडे ठेवतात.याचे कारण सगळे ठेवीदार एकाच वेळी पैसे मागायला येत नाहीत.तसेच खात्यात नव्याने भरलेले पैसे आणि ठेवीदारांनी काढलेले पैसे आणि तसेच हे वर ठेवलेले ६ रूपये हे ठेवीदारांची मागणी पूर्ण करायला पुरेसे असतात.आता अशा वेळी जर सगळे ठेवीदार एकाच वेळी आपले पैसे काढायला आले तर?बॅंकेकडे तितके पैसे नक्कीच रोखीत नसतात.कारण ठेवीदारांच्या पैशांचा बराच हिस्सा कर्जदारांना दिलेल्या कर्जात अडकलेला असतो.अशा वेळी ठेवीदार १०० रूपये परत मागायला आले तर बॅंक दिवाळखोरीत जाईल.याला Run on the bank म्हणतात. तेव्हा मनी मार्केट म्युचुअल फंडाविषयी असेच Run on the fund झाले होते.
तेव्हा हा प्रश्न कशामुळे आला?अप्रत्यक्षपणे मनी मार्केट फंडांचे toxic assets ना exposure होते म्हणून. आता सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या फंडाचे असे toxic assets ना exposure असेल तर त्यालाही असा प्रश्न येईल.म्हणजे त्यासाठी सोने हे toxic asset व्हायला हवे!
आता अशी परिस्थिती आलीच तर ही बँकांची सर्टिफिकीटे आणि इटीएफ वगैरे विकण्या-घेण्याची व्यवस्था सुरळीत चालेल याची खात्री काय?
अमेरिकेत २००८ मध्ये इतके मोठे संकट आले तरी कंपन्यांचे शेअर, सरकारी बॉंडला कोणी ओळखत नाही असे झाले नव्हते. भले शेअरच्या किंमती खूप कमी झाल्या असतील (काही कंपन्या दिवाळखोरीत गेल्या म्हणजे शेअरधारकांना काहीही मिळाले नाही) पण ज्या कंपन्या वाचल्या त्यांच्या शेअरना कोणी ओळखत नव्हते असे झाले नव्हते. बॅंकांची सर्टिफिकिटे आणि कशालाच कोणी ओळखत नसेल तर मात्र प्रचंड मोठी आणीबाणीचीच परिस्थिती येईल. मग त्या परिस्थितीत रोख पैशाचा पण फार उपयोग होईल असे वाटत नाही.तेव्हा अशा वेळी हातात धान्य किंवा तत्सम गोष्टी असल्या पाहिजेत. आता या इतक्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपण नियोजन करायचे की नाही हे ठरवायला हवे .
मी सोन्याचे डंबबेल्स , बार्स आणि वेट प्लेट्स मधे इन्व्हेस्ट केलं आहे !! त्याचा पुरेपुर वापर मी जिम मधे करतो ... हे म्हणजे आम के आम गुठलीयो के दाम सारखं आहे बघा !!
(सोन्या चा मित्र) टारझन
सुवर्ण आमदार की कोण तो तूच का रे भाऊ? ;)
हे झाले अवांतर.
मूळ विषयाविषयी.
सर्टिफिकेट्स वगैरेमधे काही गैर नाही पण जेव्हा :
१) इतर गुंतवणुकींखेरीज आपण एक सर्वात सेफ आणि लिक्विड अशा स्वरुपाचा ऑप्शन म्हणून सोन्याकडे वळतो तेव्हा
चोख सोने फिजिकली घेणे चांगले. कारण बाकी सर्व बाबतीत बँकेवर का होईना पण डिपेन्डन्स राहतो. मात्र ते अपण कुठेतरी सुरक्षित ठेवू शकलो पाहिजे. अजून एक.. अशी गुंतवणूक प्रत्यक्ष इकॉनॉमीत सक्रिय सहभाग देत नाही. (चू.भू. क्लिंटन यांनी दुरुस्त करावी.. :) )
२) जर नियमित थोडे थोडे सोने घेत राहून साठा वाढवायचा असेल आणि जग आणि अर्थव्यवस्था (त्यातील सर्व बँकांसहित) सुरक्षित अतएव जिवंत राहणार आहेत असाअ सुशेगाद विचार करण्याइतकी मनःशांती असेल तर मग गोल्ड फंड्स, सर्टिफिकेट्स, गोल्ड एस आय पी..जे काही तुमच्या देशात उपलब्ध असेल ते , चांगले..
अशी गुंतवणूक प्रत्यक्ष इकॉनॉमीत सक्रिय सहभाग देत नाही. (चू.भू. क्लिंटन यांनी दुरुस्त करावी.. )
धन्यवाद ग.वि. . मी प्रत्यक्ष सोने घेतले काय किंवा गोल्ड इ.टी.एफ घेतले काय शेवटी कुठल्यातरी सोनाराकडून मी प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे सोने खरेदी करतो. आता या पैशाचे सोनार काय करतो? एक तर बॅंकेत ठेवतो किंवा ते पैसे काहीतरी दुसरे विकत घ्यायला वापरतो. ते पैसे बॅंकेत ठेवले तर बॅंक तेच पैसे दुसऱ्या कोणालातरी ते कर्जाऊ देते-- उदाहरणार्थ घर घ्यायला किंवा इतर काही खरेदी करायला/ स्वत:चा व्यवसाय सुरू करायला वगैरे. म्हणजेच मी खर्च केलेले पैसे कुठेतरी अर्थव्यवस्थेत वापरले जातातच.म्हणजेच मी सोने घेतले तरी किंवा युनिट घेतले तरी त्याचा इकॉनॉमीत सहभाग असतोच.
समजा एखाद्याने १० लाख रुपयाचे सोने दागिने स्वरूपात (इतक्या रकमेत थोडे तरी येत असावे अजून!) घेतले तर
१० लाख रुपये सोनाराला मिळणार. तो ते अर्थव्यवस्थेत गुंतवेल हे खरे. पण घेतलेल्या वस्तूचे काय? समारंभात दागिने मिरवता येतील इतपतच दागिन्यांची उपयुक्तता आहे. जर सोन्याचे बिस्किट घेतले तर तेवढीही नाही.
उलट
जर हेच दहा लाख घर, शेअर्स, ठेव, एखादी कार, घराचे आधुनिकीकरण, फर्निचर, टीव्ही, कंप्युटर अशा उपकरणे खरेदी करायला वापरले तर ज्या कुणाकडून खरेदी करून ह्या वस्तू घेतल्या त्याला ते गुंतवायला उपलब्ध होतीलच. पण वरीलपैकी जे काही खरेदी केले आहे
तेही समाजाला आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला जास्त उपयोगाचे असेल. कारने प्रवास करता येतो. भाड्याने देता येते. पेट्रोल, डागडुजीकरता
पैसे खर्च होतात. घरात रहाता येते वा भाड्याने देता येते. फर्निचर, टीव्ही, कंप्युटर अशा वस्तूंचा दैनंदिन वा नैमित्तिक बराच जास्त वापर होतो. आराम करता येणे (फर्निचर), दोन घटका करमणूक होणे (टीव्ही, कंप्युटर ह्याचाही त्याच्या मालकाला आणि पर्यायाने समाजाला फायदा होतो.
शेअर्स वा अन्य प्रकारची ठेव असेल तर तो पैसा थेट अर्थव्यवस्थेतच सामील होतो.
एखाद्या समाजात निव्वळ सोन्यातच पैसा गुंतवायची पद्धत असेल आणि दुसर्या समाजात वरील अन्य कुठल्यतरी प्रकारात मोडणारी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असेल तर दुसर्या समाजाची अर्थव्यवस्था जास्त धडधाकट आहे असे म्हणता येईल.
ईस्ट कोस्टला भारतीय सराफ आहेत त्यांच्याकडे ननि म्हणतात त्याप्रमाणे हॉलमार्कवाल्या शिक्क्यांची नाणी, बिस्किटे, विटा मिळतात. भारतात शक्यतो सगळ्यांचे एक तरी लॉकर असतेच पण इथल्या ब्यांकेतही दरसाल $३७ आकारून लहानसे लॉकर मिळते.
हे माहित नव्हते. म्हणजे एकतर आमचे 'विशिष्ठ' खाते नसावे किंवा वरीलपैकी एका ब्यांकेने ही माहिती दिली नाही.
सगळ्या शाखांमध्ये समान सेवा देता येत नसल्याचे कारणही असावे. आता विचारीन.
कागदी सोने किवा दुकानातून घेतलेले सोने . हे आपण आपल्या कुवती नुसार ठरवावे .
जसे मी (बायको मुळे ) दर महिन्याला एक ग्रॅम सोने घेतो. थेंबे थेंबे तळे साठे.!
पण जर मला एकदम मोठी इनवेस्टमेंट (१०-१२ किलो) करायची असेल तर मी कागदी सोने घेणे या वर सहमत होईल .
पण घरातील सोने हे आडी अडचणीला कामात येऊ साकते .
प्रतिक्रिया