"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन... "
कदाचीत हे शिर्षक बघून गोंधळला असाल... पण हा प्रश्न माझा नसून, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलेला प्रश्न आहे, "What the hell is going on in this country,"
टाईम्स ऑफ इंडीया मधील या बातमी प्रमाणे, पुण्यातील उद्योजक हसन अली यांच्या पन्नासहजारकोटी रुपयांच्या करचुकवेगिरी संदर्भात न्या. रेड्डी आणि न्या. निज्जर, वरील शब्दात आपला उद्वेग दाखवत पुढे (दम देत) म्हणाले की, फक्त करचुकवेगिरी म्हणत काळ्या पैशाकडे असे दुर्लक्ष जर सरकार करू लागले तर न्यायालयाला चौकशीप्रक्रीयेवर नियंत्रण ठेवावे लागेल. सकाळ मधील या बातमी प्रमाणे, "हसन अली याने विदेशी बॅंकांत सुमारे आठ अब्ज डॉलर ठेवले असून त्याचे आंतरराष्ट्रीय शस्त्र व्यावसायिक अदन खशोगी याच्याशी संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री राम जेठमलानी, पंजाबचे माजी पोलिस प्रमुख के.पी.एस.गिल, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि इतरांनी या काळ्या पैसा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेत त्यांनी परदेशात असलेला 70 लाख कोटी रुपये काळा पैसा देशात परत आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती."
आजच्याच वृत्तपत्रात अजून एका महत्वाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढत, पी.जे. थॉमस यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या मुख्य आयुक्तपदावरील नियुक्ती सरकारला रद्द करण्यास भाग पाडले आहे.
एकूणच या सर्व प्रकरणांचे आणि कोर्टाच्या न्यायनिवाडा पद्धतीबद्दल वाच्य करताना टाईम्सने "चळवळी न्यायव्यवस्था" अर्थात "जुडीशिअल अॅक्टीव्हिजम" असे म्हणले आहे. जे काही काळ अस्तित्वात होते. पण मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायमुर्ती बालकृष्णन असताना तीन वर्षे गप्प झाले होते. हेच माजी न्या. बालकॄष्णन आता मानवी हक्क आयोगाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या जावयासकट अगदी जवळच्या नातेवाईकांवर कोट्यावधी रुपयांच्या करफसवेगिरी आणि इतर प्रकरणात आरोप आहेत. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला देखील चालू आहे.
पण, सधारण दहा महीन्यांपुर्वी न्या. एस एच कापाडीया हे प्रमुख न्यायाधिश झाले आणि परत 'योग्य' जनहितकारी अर्जांना प्राधान्य मिळू लागले. जर "अयोग्य" जनहीतकारी अर्ज असेल तर ते करणार्यांना दंड... "I come from a poor family. I started my career as a Class IV employee and the only asset I possess is integrity." हे न्या. कापडीयांचे शब्द वाचले आणि भारताला खरेच "अधुनिक रामशात्री" मिळाला अशी आशा वाटली.
तरी देखील हे वाचताना अस्वस्थता आली. न्यायालयाने खर्या अर्थाने "आंधळ्या न्यायदेवतेच्या" आदेशाने जरी प्रामाणिक निर्णय घेतले असले तरी, अशी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची हतबल अवस्था येणे, म्हणजे अखेरचा पर्याय वाटतो.
मात्र या संदर्भात डोक्यात प्रश्न आले:
- न्यायालयाने दिलेले निर्णय हे कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत असले तर अशा न्यायव्यवस्थेस "अॅक्टीव्हिझम" म्हणावे का?
- जर हे न्याय, घटनेच्या आणि कायद्याच्या सीमेच्या बाहेर दिलेले असले तर ते जरी खर्या अर्थाने खर्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असले तरी ते योग्य ठरतात का?
- जर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले काम करत नसतील, अशा लोकप्रतिनिधींचे सरकार जर एका पाठोपाठ एका भ्रष्टतेच्या प्रकरणात अडकत असेल आणि म्हणून जर चांगल्या आणि चळवळ्या प्रमुख न्यायाधीशाच्या जोरावर देश चालू लागला तर खरेच लोकशाही असे म्हणायचे का?
प्रतिक्रिया