म्हटलं तर अनावश्यक..
मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण...
इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी.
म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्या पांढुरक्या प्रतिक्रिया..
एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत..
...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या..
कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्या..
कोणाच्या तडकावणार्या..
उदाहरणे पुरेत.. :)
ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल.
....
..
..
तर मूळ काथ्याकूट विसरलोच..
...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता...
कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस.
पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला.
हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं.
पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही.
..............................
प्रतिक्रिया