Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ कर..

प — प्राजु, Wed, 07/13/2011 - 22:06
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर विसर तो इतिहास सारा जाळुनीया राख कर वेड होते त्या शिवाला मोगलाशी भांडला वेड 'तात्या'ला तुझे जो सागरी झेपावला यायचे ते ना पुन्हा, तू वाट बघणे बास कर.. षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर टांगण्या वेशीवरी तव लक्तरे सारे पुढे चिंधड्या तव अस्मितेच्या फ़ाडती मुंग्या -किडे ना कुणी तुज रक्षण्याला, तू अपेक्षा लाख कर!! षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर कोण मेले, काय झाले, ना इथे पडले कुणा मी नि माझे घर सुखी बाकी कुणी काही म्हणा भाडखाऊ लोकशाही, 'भारतीया तूच मर!" षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर दोष कोणा काय देऊ,भगवते, तू सांग ना धाडसी नेतृत्व नाही, हा तुझा ठरला गुन्हा चाड ना येथे कुणाला, हेच आता मान्य कर षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर! षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर - प्राजु

प्रतिक्रिया द्या
27727 वाचन

💬 प्रतिसाद (91)
प
प्रियाली Sun, 07/17/2011 - 03:43 नवीन
तो तुमचा "षंढपणा" म्हणायचा की "पौरुष"?
अं? पौरुषाचा संबंध काय? सरसकट सर्वांना आधीच षंढ म्हणून जाहीर केले आहे ना? ;) पुरुष आहेतच कोण आता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
ग
गंगाधर मुटे Sun, 07/17/2011 - 05:37 नवीन
क्रुतीशून्य नेत्यांच्या आशावाद बाळगण्याच्या गोष्टी केवळ पोकळ वल्गना ठरतात, हे तुम्ही समजून घ्यावे. या वाक्यात "पोकळ वल्गना" म्हणून तुम्हाला व्यक्तिगत हिनविले आहे का? (तुम्ही कृतिशून्य नेते आहात काय?) मी व्यक्तीगत पातळीवर उतरत नाही कारण या देशाच्या दुर्दशेला किंवा वाढलेल्या दहशतवादाला किंवा मुंबईत झालेल्या बाँबस्फोटाला तुम्ही व्यक्तीगत जबाबदार नाहीत. व्यक्तीगत पातळीवर येणे सर्वांनीच टाळले पाहिजे. ....................... <<<<< तुमचा "षंढपणा" म्हणायचा की "पौरुष"? >>>>>> बॉम्बस्फोट होतात, माणसे किड्यामाकोड्यासारखे मरत्तात, शासन ढिम्म आहे, प्रशासन मख्ख आहे, अशा परिस्थितीत या देशाचा एक नागरीक म्हणून मला जर संताप वगैरे काहीच येत नसेल ते मर्दानगीचे लक्षण नक्कीच नाही, असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
स्वानन्द Sat, 07/16/2011 - 16:01 नवीन
उदाहरण बरोबर आहे.. पण एक फार मोठा फरक आहे तो सरकारच्या विश्वासार्हतेचा!! सरकारला खरेच या घटनांचे हवे तितके गांभीर्य आहे की नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्यात दोष कुणाचा? नवनवे भ्रष्टाचार उघडकीला येत असताना आणि अधिआधिक वारंवारतेने हल्ले होत असताना... असा विचार लोकांनी केला तर त्यात त्यांचे चुकले असे ही म्हणता येत नाही. दरवेळी संशयाचा फायदा सरकारला मिळेल याही भ्रमात सरकारने असू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
पंगा गुरुवार, 07/14/2011 - 18:26 नवीन
'ला पिला दे साक़िया, पैमाना पैमाने के बाद, होश की बाते करूंगा होश में आने के बाद'ची चाल या कवितेला फिट्ट बसते. गाऊन पहावी.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Wed, 07/27/2011 - 05:59 नवीन
पंगा, एक्दम चपखल. - (साकिया) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
इ
इंटरनेटस्नेही Fri, 07/15/2011 - 19:43 नवीन
अतिशय उत्तम कविता. आवडली.
  • Log in or register to post comments
र
रेवती Sat, 07/16/2011 - 03:20 नवीन
कविता चांगली झाली आहे. संताप मागल्या स्फोटाच्यावेळी फारच झाला होता. यावेळी असहाय्य वाटलं आणि नंतर त्या बातमीपासून स्वत:ला वेगळं केलं. सुरक्षेत अतोनात वाढ हा पर्याय आहेच्......पण पोलिसांना त्यांचं काम करू देणारे शासनही हवे. जून २७ चा इंडीया टुडे चाळला फक्त.........फारच वाईट.
  • Log in or register to post comments
य
योगप्रभू Sat, 07/16/2011 - 09:28 नवीन
इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, इन्स्टंट पॅसिफिकेशन, इन्स्टंट रिअ‍ॅक्शन.. सगळं कसं इन्स्टंट झालंय. ही कविताही त्यापैकीच एक. बरं भावनांचा क्षोभ झाला म्हणून एकदम टोक गाठायचे का? उद्वेगापोटी आपण काहीही लिहून जातो का? सचिन शून्यावर बाद झाल्यावर ' म्हातारं झालंय ते. संघातून हाकलून द्या' इतक्या लेव्हलच्या प्रतिक्रिया आणि त्याने शतक झळकवले की ' सचिन इज गॉड' असल्या महान उदातीकरणाच्या प्रतिक्रिया. म्हणजे एक तर हे टोक किंवा ते टोक. विचारांचा पेंड्युलम मध्ये स्थिर होऊच द्यायचा नाही का? अर्थात या भारतीय मानसिकतेचे आश्चर्य वाटत नाही म्हणा. एक तर बेफाट कल्पना किंवा मग आत्मपीडन. १९६२ च्या चीन आक्रमणाच्या वेळी आपल्या कवींनी 'हटवा मागे पिशाच्च पिवळे' असल्या हास्यास्पद ओळी रचल्या होत्या. नंतर पराभव पाहिल्यावर 'जरा ऑंख मे भरलो पानी' म्हणून लागले रडायला. मला प्रामाणिकपणे असे वाटते, की ज्यावेळेस समाजाने दौर्बल्य झटकून खंबीरपणे उभे राहायचे असते त्यावेळेस 'सगळी लेकरे षंढ आहेत' असले विचार अवसानघात करतात. त्यामुळे कविता आवडली नाही आणि पटलीही नाही. 'रात्रीच्या गर्भात वसे उद्याचा उषःकाल' हे वेळोवेळी घडत असते. 'वन्ही तो चेतवावा, चेतविताच चेततो' असे समर्थ रामदास म्हणून गेले आहेत. एकीकडे वयाची ८० ओलांडलेला म्हातारा निबर कातडीच्या मस्तवाल पोळांशी झुंज घेतोय तिथे मायभूची लेकरे षंढ कशी असतील?
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Sat, 07/16/2011 - 10:24 नवीन
सहमत त्यात परदेशात (सुरक्षीत) बसुन मायभुमीच्या लेकराना षंढ म्हणण्याचा निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 07/22/2011 - 09:11 नवीन
>>त्यात परदेशात (सुरक्षीत) बसुन मायभुमीच्या लेकराना षंढ म्हणण्याचा निषेध. यात परदेशात असण्याचा किंवा नसण्याचा काय संबंध? एखादा माणूस सध्या परदेशात आहे म्हणून त्याला टीका करण्याचा अधिकार नाही का? आणि परदेश सुरक्षित आहे म्हणून त्यांना हा हक्क नाही हे तर खूपच मजेदार आहे. त्या हिशोबाने पुणे हे मुंबई पेक्षा जास्त सुरक्षित आहे. कोल्हापूर तर फारच, कारण अजूनतरी तिथे अतिरेकी हल्ला झाला नाही. मग कोल्हापूर किंवा पुण्यात राहणाऱ्या माणसाला या परिस्थितीमुळे प्रक्षोभित होण्याचा हक्क नाही का? की कमी आहे ? कधी कधी मला परदेशी राहण्याऱ्या भारतीयांवर टीका करणाऱ्यांच्या मनात असूया आहे असे वाटते. तुमच्या मनात ती नसावी केवळ वैचारिक गोंधळ असावा ही अपेक्षा. अजून एक :- विषयाला फाटे फुटू नयेत म्हणून सांगतो. माझा आक्षेप परदेशाच्या मुद्द्याला आहे. षंढ म्हणण्याचा निषेध करण्याला नाही. तो ज्याला हवा त्याने करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 07/22/2011 - 09:28 नवीन
हा ऊंटावरुन शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. कारण तिथे बसुन काहीच करायचे नसते आणि काय करायला पाहीजे ह्याचे फुकट सल्ले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 07/22/2011 - 11:08 नवीन
तुम्ही इथे बसून काय करता आहात हे कळले तर आनंद होईल. आणि तुम्ही काही करत नसाल तर इतरांना दोष देण्याचा नैतिक हक्क आहे का तुम्हाला? उद्या समजा तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि १-२ वर्षांसाठी गेलात तर त्या काळात काही बोलणार नाही का भारतातल्या प्रश्नांवर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 07/22/2011 - 11:56 नवीन
तुम्ही इथे बसून काय करता आहात हे कळले तर आनंद होईल तुम्ही तिथे बसून काय करता आहात हे कळले तर जास्त आनंद होईल उद्या समजा तुम्हाला परदेशी जाण्याची संधी मिळाली आणि १-२ वर्षांसाठी गेलात ..... बर्‍याचदा जाउन आलो , पण कोणावरही टीका केली नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 07/22/2011 - 12:26 नवीन
>> तुम्ही तिथे बसून काय करता आहात हे कळले तर जास्त आनंद होईल मी इतर कुणाला "उंटावरून शेळ्या हाकणारा" म्हटले नाही. त्यामुळे मी काही करतो किंवा नाही हे सांगून काय फरक पडणार? तुम्हाला मुद्दा कळत नाही आहे की उगाच पडती बाजू झाकायला काहीतरी युक्तिवाद करत आहात. खरे तर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. तुम्ही इथे राहूनही काहीही करत नाही आहात. नाही तर प्रतिप्रश्न न करता मला किमान १-२ गोष्टी तरी सांगितल्या असत्या. आणि हो, मी इथे आहे तिथे नाही. >>बर्‍याचदा जाउन आलो , पण कोणावरही टीका केली नाही टीका केली नाहीत तो तुमचा वैयक्तिक निर्णय झाला. त्या दरम्यान टीका करण्याचा हक्क तुम्हाला होता की नाही (तुमच्याच मते) हा माझा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Fri, 07/22/2011 - 14:26 नवीन
मी इतर कुणाला "उंटावरून शेळ्या हाकणारा" म्हटले नाही छान. मि ही ज्यानी हाकल्या त्यानाच म्हटले , तुम्हाला म्हटले नाही . उगाच स्वतः:वर कशाला ओढुन घेताय. त्यामुळे मी काही करतो किंवा नाही हे सांगून काय फरक पडणार? मलाही लागु उगाच पडती बाजू झाकायला ...... हे उगीच डीवचणे झाले. अर्थातच मला काही फरक पडत नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे वादच संपला त्या दरम्यान टीका करण्याचा हक्क तुम्हाला होता की नाही हक्क असला वा नसला तरी काही तारतम्य आणि संकेत पाळायचे असतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
स
सोत्रि Wed, 07/27/2011 - 06:24 नवीन
योगप्रभू, अगदी सहमत, शब्दाशब्दाशी सहमत. सध्याच्या अनागोंदी परीस्थितीत सरकारवर दडपण आणून जनहितार्थ काम करयाला भाग पाडणे गरजेचे आहे. अण्णा हजारेंची लोकपाल बिलासाठीची चळवळ हे काहीतरी करण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे, नुसते षंढ-षंढ म्हणुन धाय मोकलण्यापेक्षा आता 'सामाजिक उठाव' करणॆ गरजेचे आहे. इजिप्त, ट्युनिशिया इथल्या जनतेने ते दाखवून दिले आहे, तिथली जनता (खरोखरीच षंढ असणारी आणि नसणारी) रस्त्यावर उतरली आणि सत्ता उलटवुन टाकली. खाली कोणीतरी "उंटावरून शेळ्या हाकणे" असा प्रतिसाद टाकला आहे. बहुतांशी त्या प्रतीसादाशीही सहमत. हे म्हणजे मस्त पक्वान्ने खाउन वर स्वीट डीश खाउन, ढेकर देत देत, "अरेरे किती गरीब लोक हे, ह्यांच्यासाठी कोणीच काही करत नाही, 'कोणीतरी' काहीतरी करा रे ह्यांच्यासाठी, मला खुप राग येतोय आणि उद्विग्नताही येतेय कोणिच काही करत नाहे म्हणुन....ऑऑऑब्ब्ब" असे आहे. - (जमीनीवरचा शेळीहाक्या) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू
ज
जयंत कुलकर्णी Wed, 07/27/2011 - 07:00 नवीन
जेव्हा एखादी चर्चा होते किंवा वाद होतो तेव्हा मला या वाक्यांची फार मजा वाटते. १ तुला त्यातले काय कळते ? २ त्यांच्या जागी बसून बघ कसे होते ते. ३ नुसती चर्चा करून काय होणार ? करत तर काहीच नाही तुम्ही. ४ लोका सांगे ब्रह्म्ज्ञान स्वतः कोरडे पाषाण. ५ तुम्ही नुसते उंटावरून शेळ्या हाकणार. ६ त्यातले तज्ञ असताना तुम्ही कशाला शहाणपणा सांगताय ? इ. इ. इ. हे सगळे पाळायचे म्हटले तर आपल्या हातात फक्त मतदानाचा हक्क उरतो. ते केल्यावर गुपचूप घरी पडावे. कारण वरील वाक्ये आपल्या तोंडावर कोणीही केव्हाही फेकू शकतो. उदा. त्रिलोकेकर साहेबांना असे विचारता येईल की त्यांनी हजारेंना आत्तापर्यंत एखादेतरी पत्र लिहीले आहे का? का त्यांच्या कार्याला भेट दिली आहे का ? नसेल तर त्यांनी बोलू नये असेही म्हणता येईल. पण त्यांनी तसे केले नाही याचा अर्थ असा नाही की ते म्हणत आहेत ते चूक आहे. कारण जगातल्या प्रत्येक गोष्टीचा उगम हा विचार आहे. त्यामुळे जरी त्यांनी त्या चळवळीत भाग घेतला नसेल तरीही एक नागरीक म्हणून, एक माणूस म्हणून त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मी त्यांना असे म्हणू शकत नाही की तुम्ही नुसती बडबड करत आहात. ते जे काम करत आहेत त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गोष्टींवर परिणाम होतच असतो. कदाचित मला काय म्हणायचे आहे ते मी नीट मांडू शकलो नसेन. पण जरा विचार केलात तर माझे म्हणणे आपल्याला पटण्याची शक्यता आहे. विनंती आहे की चर्चेत शक्यतो अशी वाक्ये टाळावीत व वस्तुस्थितीला, इतिहासाला व तर्काला जास्त महत्व द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
सोत्रि Wed, 07/27/2011 - 08:18 नवीन
जयंतजी, मला ह्या प्रतिसादातुन स्वतःला डिफेंड करायचे नाही. तुमचे मुद्दे मान्य.
ज्यावेळेस समाजाने दौर्बल्य झटकून खंबीरपणे उभे राहायचे असते त्यावेळेस 'सगळी लेकरे षंढ आहेत' असले विचार अवसानघात करतात
हा मुद्दा मला आधिच्या प्रतिसादात अधोरेखित करायचा होता. आधीचा पुर्ण प्रतिसाद "क्रियेवीना वाचाळता व्यर्थ आहे" ह्या उक्तीचे समर्थन करणारा होता. आता तो थोडासा अतिरंजीत झाला असु शकेल पण भावना मोकळ्या होत्या, कोणाला नावे ठेवण्याचा किंवा 'टोचवण्याचा' उद्देश अजिबात नव्हता. - (इतीहासकार आणि तर्कतीर्थ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ज
जयंत कुलकर्णी Wed, 07/27/2011 - 08:28 नवीन
आपल्या सगळ्यांचा उद्देश चांगलाच आहे या बद्दल माझ्या मनात कसलीच शंका नाही. मला फक्त आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची होती की जेव्हा एखादा हातगाडीवाला पंतप्रधानांवर कडवट टिका करेल तेव्हा आपण त्याचेही म्हणणे ऐकून घेतले पाहिजे. तुला रे काय कळतय त्यातले असे म्हणून कसे चालेल ? ऐकले म्हणजे चर्चा चालू होते व अनेक मुद्दे नव्याने मिळतात किंवा कदाचित त्यातून मार्गही सापडू शकतो. ही आपल्यावर किंवा आपल्या प्रतिक्रियेवर टिका नाही. हे एक निरिक्षण आहे. असो. कॉकटेल बद्दल काही शंका आहेत त्या आपल्याला व्यनितून विचारणार आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ग
गंगाधर मुटे Sat, 07/16/2011 - 10:12 नवीन
आता कुणी कुणाचे कान पकडू नये वादात या कुणीही सहसा पडू नये ते दान का मिळाले? जे टाळले सदा असले पुन्हा नव्याने सहसा घडू नये शोधेन मीच माझा, रस्ता पुन्हा नवा त्या मूक दर्शकांनी सहसा रडू नये निद्रिस्त मीच केल्या माझ्याच जाणिवा संवेदनेवरी या मीठ रगडू नये सजतात रोज येथे कित्येक मैफ़िली कोणास न्याय्य मुद्दा का सापडू नये? झाले अता पुरेसे, ते बोलले बहू बाळंत होत ना ती, चर्चा झडू नये
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Tue, 07/19/2011 - 12:38 नवीन
प्राजक्ता, अतीशय 'वृत्त'बद्ध आणि अर्थपूर्ण अशी कविता लिहून तू तर 'छक्का'च मारला आहेस. (कोटी मुद्दाम वापरली आहे!) सुंदर कविता. प्रत्येक कडव्यातली प्रत्येक ओळ अर्थपूर्ण आहे. कुठलीही ओळ कमी नाहीं किंवा कुठलीही ओळ जास्त नाहीं. अगदी सुयोग्य लांबीची मस्त कविता. छान चाल लावून 'आकाशवाणी'वर रोज सार्‍या महाराष्ट्राला/ भारताला ऐकवावी अशी ही कविता आहे. त्यातल्या त्यात शेवटचे कडवे मस्त आहे! घालुनी मग शेपट्या, करतील ते नीषेधही वाटुनी नोटा जरा देतील त्यावर लेपही घोषणा अन भाषणांची, मोज लांबी हात भर! षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर अशाच अर्थपूर्ण कविता रचत जा.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Wed, 07/20/2011 - 18:51 नवीन
प्राजूजी तुमची कविता म्हणजे भीषण उपहास.. सद्यपरिस्थितीचा.. खरोखरच मला वाटतं मायभूमीलाच श्रद्धांजली वहायला हवी..अशी वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल गुरुवार, 07/21/2011 - 17:21 नवीन
समर्पक ......
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/21/2011 - 22:52 नवीन
ज्यांना ही कविता पटली आणि ज्यांना नाही पटली त्या सर्वांचे मनापासून आभार. एक गोष्ट इथे नमूद करू इच्छीते, ही कविता कोणाही एका व्यक्तीवर नाहीये. ही कविता देशाचं सुरक्षा धोरण, ते ठरवणारी खुर्चीतली मंडळी आणि या दहशत वादाला उत्तर न देता, शांतपणे बसून राहणारं सरकार यांच्यासाठी होती/आहे. ज्यांना पटली त्यांना धन्यवाद ज्यांना नाही पटली, तरी छान छान! (यात माझं काहीच जात नाहिये.) मी अमेरिकेत राहते, म्हणून मी देशाच्या सद्द्यपरिस्थितीवर बोलू नये असे म्हणणार्‍या लोकांना योग्य जागी मारण्यात आलेले आहे. जिथे जन्म घेतला, जिथे बालपण गेलं, जिथे शिक्क्षण झालं... त्या मातीबद्दल बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे मला. अगदी तिथे राहणार्‍या लोकांइतकाच! आपण षंढ आहोत की नाही (फिजिकली नव्हे), हे विचार करायला प्रत्येकाला देवाने योग्य ती बुद्धी दिलेली आहे. कविता नक्की कशावर आहे हे समजण्याचीही बुद्धी आहेच सर्वांकडे. त्यामुळे षंढ म्हंटल्यामुळे मी कोणाची माफी वगैरे नक्कीच नाही मागणार. तशी कोणी अपेक्षाही करू नये. कवितेतले मत माझे आहे.. आणि ते तसेच राहिल. त्याच्याशी कोणी सहमत व्हावे अशी इच्छा अजिबात नाही. असो.. या कवितेवरचा माझा शेवटचा प्रतिसाद! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही गुरुवार, 07/21/2011 - 23:16 नवीन
अतिशय समतोल प्रतिसाद प्राजुतै!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
श्रावण मोडक Sat, 07/23/2011 - 16:12 नवीन
ही कविता कोणाही एका व्यक्तीवर नाहीये. ही कविता देशाचं सुरक्षा धोरण, ते ठरवणारी खुर्चीतली मंडळी आणि या दहशत वादाला उत्तर न देता, शांतपणे बसून राहणारं सरकार यांच्यासाठी होती/आहे.
हा खुलासा केल्याबद्दल धन्यवाद. या खुलाशाने कवितेतील 'षंढ सारी लेकरे' ही शब्दरचना, किंवा तिच्या प्रकाशनाचा नेमका काळ, एवढेच अधोरेखीत होते आणि आत्ताच्या खुलाशानुसार देशाची सुरक्षा ठरवणाऱ्यांना 'षंढ' म्हटले या तथ्याने ही कविता तात्कालीक संतापाचा बुडबुडा ठरते. देशाच्या सुरक्षा धोरणावर कवितेतून आक्षेप घ्यायला माझी हरकत नाही, पण ही कविता त्या धोरणाचा आक्षेप आहे असे मानायचे असेल तर ही कविता पोरवयाचीही नाही. कारण या धोरणाविषयी प्राजु यांना काय कळते हा प्रश्न आहे. 'दहशतवादाला उत्तर न देता शांतपणे बसून राहणारं सरकार' हे किंवा असे मत असण्याचा प्राजु यांना अधिकार आहे. पण इथेही हे कोणी सांगितलं, असा प्रश्न आहेच. एकूणच ही दोन्ही मतेच राहतात, आणि ही मते व्यक्तिसापेक्ष बदलत जातील. आणि म्हणूनच या कवितेतील 'षंढ' या शब्दाच्या संदर्भात झालेल्या टीकेला प्राजु स्वतःच अधिक वजन प्राप्त करून देतात. मग या अधोरेखील केलेल्या मुद्यांसंदर्भात, षंढ या शब्दाच्या योजनावरून कोणी कवयित्री परदेशस्थ असण्याचा मुद्दा काढला (म्हणजे, तू तर तिथं आहेस. तुला यातलं काय माहितीये, तुला हा टीकेचा अधिकार नाही, असा मुद्दा काढला) तर, तोही बुडबुडाच असतो पण, तोही अधिकार या पद्धतीच्या लेखनातून निर्माण झालेला असतोच. मात्र, तुम्ही अमेरिकावासी आहात म्हणून तुम्हाला भारताविषयी बोलण्याचा अधिकार नाही, हे नामंजूर. आज भारतात नाहीत म्हणून ते भारतीय नव्हेत, इतकी भारतीयत्वाची व्याख्या संकुचित नाही आणि नसावीही. प्रत्येकाला मते असणार, ती व्यक्त होणारही. त्यांना फाट्यावर मारण्याचे अधिकारही प्रत्येकाला असतो. त्यांचा वापर करता येतोच. त्यामुळे, काही कळत नसताना दहशतवादविरोधी धोरणाला हरकत घेणे हे एक मत असते आणि ते फाट्यावर मारता येते; त्याचप्रमाणे, तुम्ही अमेरिकावासी असल्याने तुम्हाला काय अधिकार हा प्रश्नदेखील एक मत आहेच, ते फाट्यावर मारता येतेच. एकूण, तुम्ही - आम्ही एकमेकांना फाट्यावर मारत राहू. सार्वजनिकामध्ये एक चांगला करमणूकप्रधान राडा केल्याचे श्रेय सर्वांना मिळेल. आधी आपणच 'सारी लेकरे' असं म्हणायचं आणि मागाहून आपल्या वैयक्तीक मताचे आरोपण कवितेवर करत त्याचा संकोच करू पहायचा हा लिहिलेल्या मजकुराविषयीचा प्रामाणिकपणा नव्हे. यापेक्षा, 'होय, तो माझा संताप आहे, त्यातून व्यक्त झालेली ती प्रतिक्रिया आहे' असा खुलासा अधिक श्रेयस्कर ठरला असता. आधी म्हटल्याप्रमाणे ही कविता आता चांगली रचना नाही. ती मताची पिंक आहे. फरक इतकाच की पिंक टाकताना फवारा उडलेला नाही, पिंक धारदार योग्य ठिकाणी गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सोत्रि Wed, 07/27/2011 - 06:31 नवीन
मोडक अतिशय सडेतोड, यथायोग्य आणि संयमित प्रतिसाद. (मी तुमचा पंखा झालोय ह्या प्रतिसादानंतर.)
आधी म्हटल्याप्रमाणे ही कविता आता चांगली रचना नाही. ती मताची पिंक आहे. फरक इतकाच की पिंक टाकताना फवारा उडलेला नाही, पिंक धारदार योग्य ठिकाणी गेली आहे.
_/\_ _/\_ _/\_ - (पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
प
प्रियाली Sat, 07/23/2011 - 16:39 नवीन
षंढ सारी लेकरे गं मायभूमी माफ़ कर
एक गोष्ट इथे नमूद करू इच्छीते, ही कविता कोणाही एका व्यक्तीवर नाहीये. ही कविता देशाचं सुरक्षा धोरण, ते ठरवणारी खुर्चीतली मंडळी आणि या दहशत वादाला उत्तर न देता, शांतपणे बसून राहणारं सरकार यांच्यासाठी होती/आहे.
या दोन्ही वाक्यांतून असे दिसते की केवळ सरकारात असणारी (फारतर देशाची सुरक्षा व्यवस्था पाहणारी) माणसेच फक्त मायभूमीची लेकरे आहेत आणि त्यांनाच षंढ म्हटले आहे. तसे असल्यास मिपावरील अनेकजण षंढ नसल्याची शक्यता वाढलेली आहे आणि बहुतेक परदेशस्थ मिपाकर षंढ नसल्याची शक्यता दिसते पण याच बरोबर ते मातृभूमीची लेकरेच नसण्याचीही शक्यता मोठी दिसते. या सर्वाला सुदैव म्हणावे की दुर्दैव? सध्या तरी कविता नको पण खुलासा आवर असे म्हणावेसे वाटले. :( यापेक्षा तो एक भावनिक आवेग होता त्याला शब्दशः घेण्याची तसदी घेऊ नये इतके म्हटले असते तर पुरेसे झाले असते पण या खुलाशाने गोंधळ निर्माण झाला आहे.
मी अमेरिकेत राहते, म्हणून मी देशाच्या सद्द्यपरिस्थितीवर बोलू नये असे म्हणणार्‍या लोकांना योग्य जागी मारण्यात आलेले आहे. जिथे जन्म घेतला, जिथे बालपण गेलं, जिथे शिक्क्षण झालं... त्या मातीबद्दल बोलण्याचा अधिकार नक्कीच आहे मला. अगदी तिथे राहणार्‍या लोकांइतकाच!
याच्याशी मात्र सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
पंगा Sat, 07/23/2011 - 17:24 नवीन
...एका गोष्टीचा अजूनही खुलासा झाला नाही. (अर्थात, आग्रह नाही - शेवटी, You don't owe the world an explanation - पण तरीही, कुतूहल आहे.) लोकशाही ही नेमकी 'भाडखाऊ' कशी?
मी अमेरिकेत राहते, म्हणून मी देशाच्या सद्द्यपरिस्थितीवर बोलू नये असे म्हणणार्‍या लोकांना योग्य जागी मारण्यात आलेले आहे.
हे कोणताही खुलासा न देऊन अधिक प्रभावीरीत्या करता आले असते, असे वाटते. असो. ज्याचीत्याची पद्धत निराळी.
आपण षंढ आहोत की नाही (फिजिकली नव्हे), हे विचार करायला प्रत्येकाला देवाने योग्य ती बुद्धी दिलेली आहे.
अगदी. (माझ्यापुरतेच बोलायचे झाले, तर कोठल्यातरी सोम्यागोम्याने मला षंढ म्हटल्याने मी षंढ ठरतही नाही, आणि 'मी तसा नाही' हे ठसवण्यासाठी मला त्याविरुद्ध पुरावा (प्रात्यक्षिक वगैरे?) देण्याची गरजही भासत नाही.)
त्यामुळे षंढ म्हंटल्यामुळे मी कोणाची माफी वगैरे नक्कीच नाही मागणार.
माफी मागूही नये आणि मागावी अशी अपेक्षाही कोणी करू नये. तसेही, माफी मागण्याने नेमके काय साध्य होते? An insincere apology is worse than no apology.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अजातशत्रु Tue, 07/26/2011 - 10:27 नवीन
असेच म्हणतो. लोकशाही ही नेमकी 'भाडखाऊ' कशी ? हे समजले नाहि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा
म
मूकवाचक Fri, 07/22/2011 - 14:54 नवीन
कै. शहीद हेमन्त करकरे यान्ची एक मुलगी अमेरिकेत स्थायिक झाली आहे. दुसरी युके मधे शिकते आहे. कै. शहीद विजय साळसकर यान्ची मुलगी उच्च शिक्षणासाठी युके मधे होती असे कालच वाचले. त्या मिपा सदस्य आहेत असे क्षणभर गृहीत धरून मान्यवर मिपा सदस्यान्च्या मते भारतात घडणार्या घडामोडीबद्दल आपल्या (टोकाच्या वगैरे पकडून) प्रतिक्रिया देण्याचा नैतिक अधिकार या तीन आजी/ माजी परदेशस्थ व्यक्तीना कितपत आहे/ असावा?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/23/2011 - 18:30 नवीन
कवीने खुलासे करत बसू नये असे माझे मत होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे Sun, 07/24/2011 - 08:54 नवीन
प्राजक्ता, तुझी कविता सुरेख आहे व ती मला खूप आवडली. इथे झालेली टीका मनावर घेऊन 'मिपा'करांवर रागावू नकोस. अशाच चांगल्या आणि अर्थपूर्ण कविता लिहीत जा व इथे पोस्ट करत जा.
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Sun, 07/24/2011 - 15:07 नवीन
मला पन एक कविता सुचते आहे. . एक दोन तिन चार टेररीस्ट झालेत फार . पाच छे सात आठ टेररिस्टाला करुन सपाट . नौ दहा अकरा बारा टेररीस्टाचे वाजवु बारा. . तेरा चौदा पंधरा सोळा टेररिस्टाविरुद्ध होउ गोळा , सतरा अठरा एकोनिस विस टेरस्टाचा पाडु किस.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 07/24/2011 - 16:01 नवीन
अप्रतीम बडबड गीत!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
इ
इरसाल Mon, 07/25/2011 - 14:59 नवीन
सतरा अठरा एकोनिस विस टेरस्टाचा पाडु किस. टेररीस्टाचा घेवू कीस हे यमक जुळतं का पहा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
म
मूकवाचक Mon, 07/25/2011 - 15:31 नवीन
जगाला प्रेम अर्पावे ... (यमक पण जुळले आणि मूळ काव्याच्या आशयातली चूकही दुरूस्त झाली.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
स
सुधीर काळे Tue, 07/26/2011 - 13:26 नवीन
प्राजक्ता, आज तुझी ही कविता 'चितपावन' या संस्थळावर 'एका अज्ञात कवी कविता' म्हणून प्रसिद्ध झाली. मी त्यांना ती तू लिहिली आहेस असतीकळविले आहे. लोकांच्या प्रतिक्रियाही चांगल्या आहेत. नंतर सार्‍या प्रतिक्रिया एकत्र करून तुला कळवेन.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 07/27/2011 - 09:24 नवीन
"राजकारण आणि क्रिकेट ह्यातले सगळ्यांना सगळे कळते" असे आमचे कणेकरगुर्जी म्हणतात ते काय खोटे नाही.
  • Log in or register to post comments
स
सुधीर काळे गुरुवार, 07/28/2011 - 12:37 नवीन
प्राजक्ता, 'चितपावन' संस्थळावर तुझी कविता गाजत आहे.... आजच एकाने पूर्ण कवितेचे शब्द माझ्याकडे मागितले आणि मी ती ते तिथे डकवलेही!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत राजवाडे Sat, 08/06/2011 - 02:06 नवीन
उस्फुर्त कविता आहे. आर्त...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा