Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह्या कन्नडीगांना आलाय माज

प — पाषाणभेद, गुरुवार, 10/11/2012 - 08:15
ह्या कन्नडीगांना आलाय माज ह्या कन्नडीगांना आलाय माज तो माज आता काढू मोडून अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ|| लई तुरूंगवास करवला रे तुम्ही काय सहन नाही केलं आम्ही मराठीसाठी किती रक्त वाहवलं ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं लई झालं आता उठला मराठी माणूस पेटून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१|| अरे गल्या-बोळांना नावं आमची सार्‍या दुकानांना नावं आमची सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या सारी आडनावं आमची आमची बेळगाव महानगरपालीका आमची एका ठरावानं होईल का तुमची? आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२|| आहे जसं कन्नडी शासन मुजोर त्याला सामील केंद्रशासन कमजोर खेळी दोघांनी केली विधानभवनाची साक्ष आहे जशी उंदराला मांजराची बास झालं लई झालं बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३|| या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची जमवून सारी फौज मराठी माणसाची ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका उगा आमच्यावर वार करू नका महाराष्ट्रात जाण्यासाठी आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४|| -(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा. -पाषाणभेद

प्रतिक्रिया द्या
20997 वाचन

💬 प्रतिसाद (61)
व
विसुनाना गुरुवार, 10/11/2012 - 08:51 नवीन
या लढाईबद्दल कवीला शुभेच्छा. न्या. मेहेरचंद महाजन अहवालानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता तर बेळगावचे नाव बेळगावी झाले आणि तेथे कर्नाटक विधानसभा (पावसाळी/हिवाळी अधिवेशन) स्थापन होत आहे. बीदर-भालकीला महाराष्ट्रातले राज्यकर्ते सोयिस्करपणे विसरले. सांगली जिल्हा-जत तालुक्यातील काही गावांनी आपल्याला कर्नाटकात सामिल व्हायचे आहे असे ठराव केले. बीदर-भालकीचे मराठी लोक कर्नाटकात सुखी आहेत. त्यांना आता महाराष्ट्रात यायचे नाही. अधून-मधून मराठी माणसाला एसेम जोशी आठवतात - म.ए.स. आठवते. असो. अवांतर - आजच 'द हिंदू' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/11/2012 - 18:12 नवीन

आजच 'द हिंदू' या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे?

मला वाटतं अभिनंदनच करावं, मराठी माणसांच्या भावनांचा इतका व्यवस्थित 'चोळामोळा' मराठी माणसाशिवाय कोणीही करु शकत नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
म
मदनबाण Mon, 10/15/2012 - 17:58 नवीन
महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीने विक्रमी वेगाने पूर्ण केले आहे (एका वर्षात) असे कळते. त्यांचे हार्दिक अभिनंदन करावे किंवा कसे? शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या कंपनीचे अभिनंदनच करायला हवे... असो खालची लिंक वाचुन झाल्यावर कोणाचे कोणी आणि का ? अभिनंदन करावे ते सांगता येईल का ? बेळगाववासी जनतेनी देखील बातमी आवडीने पहावी,म्हणजे त्यांना महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग लक्षात येईल ! http://216.15.199.42/dainiksaamana/epaperimages/15102012/15102012-md-hr-7/1035580.JPG
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग
गवि गुरुवार, 10/11/2012 - 08:56 नवीन
कन्नडिगा जनता विरुद्ध मराठी जनता असा घाऊक संघर्ष आणि केवळ भाषेच्या क्रायटेरियाने एका पूर्ण समाजाला शत्रू किंवा दुरित ठरवणारा विचार अयोग्य वाटतो. राजकारणातल्या ठराविक लोकांविषयी विधाने करणे ठीक.. पण सर्वच कन्नड लोक एकाच तागडीत? लढ्यात हुतात्मा झालेल्या लोकांबद्दल अनादर नाही, किंवा कारवार बेळगाव महाराष्ट्रात येण्याला विरोध असण्याचंही कारण नाही पण बल्क हेट्रेड खटकतो. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/11/2012 - 09:02 नवीन
शाहीर, भावना पोहचल्या. बेळगावच्या लोकांनी आता मोठ्या मनाने कर्नाटकात सुख समाधानानं राहाव. आपला भाषाभिमान, भावना, आणि त्याग या गोष्टी ख-या असल्या तरी त्याची तीव्रता तितकीशी उरली नाही. महाराष्ट्रातून आपल्याला फारसा पाठींबा नाही, तेव्हा वर विसुनाना म्हणतात त्यातलं मलाही पटतंय की जर मराठी लोक कर्नाटकात सूखी होत असतील, विकासाच्या विविध सोयी-सुविधा मिळत असतील तर कशाला हट्टाला पेटायचं. भाषाभिमान तसाही जोपासता येईलच की.... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/11/2012 - 10:56 नवीन
हेच म्हणतो. आपल्याच लोकांकडे दुर्लक्ष करायची आपली खोडच आपल्याला नडलीये, बाकी कै नै, त्यामुळे this serves us right :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पाषाणभेद गुरुवार, 10/11/2012 - 09:27 नवीन
सामोपचाराची भाषा केवळ मराठी माणसांनीच जपावी काय? मुळ प्रश्न सोडून असली सामोपचाराची भाषा योग्य नाही.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह गुरुवार, 10/11/2012 - 11:05 नवीन
कॉलिंग जहालभाषाचिकित्सक-निर्माते...घासूगुर्जी.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Fri, 10/12/2012 - 16:33 नवीन
मिपावर हे काम नाना चेंगट उत्कृष्टरीत्या करत आहेत. त्यामुळे त्यांना जर या कवितेत काही जहाल वाटलेलं नसेल तर आम्ही काही त्याबाबत बोलणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
अ
अन्या दातार गुरुवार, 10/11/2012 - 11:49 नवीन
आर्थिक विचार करता सीमावासीयांना महाराष्ट्रात येणे परवडणारे नाही इतर अनेक प्रदेशातही मराठी लोक आहेतच.त्यांचे काय? त्यासाठीही लढा उभा करायचा काय?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 10/11/2012 - 11:54 नवीन
जिथे प्रश्नच अस्तित्वात नाही तर कसला लढा?
  • Log in or register to post comments
न
नाना चेंगट गुरुवार, 10/11/2012 - 14:02 नवीन
हम्म... बेळगाव पाकिस्तानात गेले असते तर असेच वाटले असते का हो? काहि नाही सिंधू अंतरली म्हणणारे वेडे ठरले आहेत या देशात म्हणून...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 10/11/2012 - 14:07 नवीन
भारतातच म्हणतोय ना भो. आम्ही कै इतके हे नै की लगे पाकिस्तानात गेलं तर गेलं असं म्हन्नारे. :) कात्रीतलं बेळगाव वाचून काढा. आलोच देवदर्शन करुन. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
क
कवितानागेश गुरुवार, 10/11/2012 - 14:53 नवीन
अतिशय चांगल्या लेखाचा दुवा दिलात. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
र
रेवती गुरुवार, 10/11/2012 - 15:15 नवीन
चांगल्या लेखाचा दुवा दिल्याबद्दल आभार कि ओ तुमचे, म्हणते मी. लेख वाचून सोडला कि ओ! घरात इतकं कानडी बोललं जात असताना मी शिकले नाही. एक भाषा सहजपणे शिकता आली असती ती राहिली एवढेच वाईट वाटते. पाभेंचा पोवाडा आवडला, पण सामान्य कानडी जंतेनं काय केलं, म्हणते मी! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/11/2012 - 16:31 नवीन
लेख बाकी भारी आहे बघा प्राडॉ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पुण्याचे वटवाघूळ गुरुवार, 10/11/2012 - 15:29 नवीन
बेळगाव पाकिस्तानात गेले असते तर असेच वाटले असते का हो?
म्हणजे कर्नाटक राज्य पाकिस्तानप्रमाणे आपला शत्रू आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? बेळगावात मराठी लोक बहुसंख्य असतील तर ते शहर महाराष्ट्रात यायला हवे असे सगळ्यांनाच वाटते पण तरीही पूर्ण काश्मीर भारतात नाही (आणि पाकड्यांनी आपल्या काश्मीरचा बराच भाग गिळला आहे) याचे दु:ख आम्हाला जितके होते तितके दु:ख बेळगाव महाराष्ट्रात नाही याचे नक्कीच होत नाही. कारण कितीही काहीही झाले तरी आपण सगळे भारतीय आहोत. इथे काही कारण नसताना पाकिस्तानचे नाव तुम्ही आणल्यामुळे कर्नाटक राज्य आपले शत्रू आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे असा कोणी अर्थ काढला तर त्यात काय चुकले? बेळगाव महाराष्ट्रात नसल्यामुळे कर्नाटक राज्य तुम्हाला शत्रू वाटत असेल पण इतरांना तसे वाटायचे काही कारण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
ब
बॅटमॅन गुरुवार, 10/11/2012 - 16:14 नवीन
कैच्याकै अच्रत बव्लत प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 10/11/2012 - 14:48 नवीन
आली भेदक पाषाणी तो...फं जीईईई हां जीईई... आली भेदक पाषाणी तो...फं,उडविण्या झोपं, देऊनी चोप,साल्या त्या कन्नड अप्पांची...। साल्या त्या कन्नड अप्पांची...। करा त्याचा तुंम्ही चोळामोळा,बनवुनी गोळा...। Image removed. डागा तो त्या कन्नड्यांवरती...डागा तो त्या कन्नड्यांवरती...॥ आंम्ही देऊ तुंम्हाला साथ,पाडण्या दात... । घालू ही लाथ त्याच्या-वरती,घालू ही लाथ त्याच्या-वरती...॥ Image removed.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/11/2012 - 16:27 नवीन
दफोराव का उगाच त्रास करुन घेताय ? आपल्या राजकारण्यांना इथे देशाची पडली नाही,तिथे राज्याची कदर कशी करतील ? आज कोल्हापूर,सांगली वगरै भाग बंद होता,त्यात शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींनी बाजार पेठेतील दुकानांवर दगडफेक केली, आता मला सांगा इतकीच दगडफेक करण्याची खाज होती... तर तिकडे बेळगावात जाउन करुन दाखवायची होती ना ! फुकट तुमच्या राज्यातल्याच दुकानदारांचे नुकसान करण्यात कोणती हुशारी ? (माझा कुठल्याही दगड फेकीला पाठिंबा नाही)तसेही महाराष्ट्रात येउन त्यांना काय मिळणार आहे ? वीज ? सिंचनाचे पाणी ? ते तर इथल्या शेतकर्‍यांना देखील मिळत नाही ! त्या पेक्षा कर्नाटक शतपटीने बरे नाही का ?
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 10/11/2012 - 17:36 नवीन
मला सांगा इतकीच दगडफेक करण्याची खाज होती... तर तिकडे बेळगावात जाउन करुन दाखवायची होती ना
+१. सीमाप्रश्नासाठी 'आम्ही रक्त सांडले' असे बा.ठा. सारखे म्हणत असतात सामनातून. कर्नाटकात गेली ४ वर्षे त्यांच्या मित्रपक्षाचे सरकार आहे. त्या पक्षाचे अध्यक्ष मराठी आहेत. मग त्यांना मातोश्रीवर बोलवून का नाही दम भरत? सीमाप्रश्न केव्हाच ईतिहासजमा झाला आहे.ऐतिहासिक दस्ताऐवज बघितलेत तर बेळगाव कन्नड संस्कृतीला अधिक जवळ आहे.मुंबईत गेले २०० वर्षे असंख्य गुजराती असले तरी मुंबई गुजरातची होत नाही.तसेच येथे आहे.केवळ मराठी बहुसंख्य म्हणून महाराष्ट्रात पाहिजे ह्या मागणीला अर्थ नाही. किर्लोस्कर रस्ता/टिळक वाडी/सोन्या मारुती/शिवाजी नगर्/रानडे कॉलनी अशा अनेक भागांची जशीच्या तशी ठेवली आहेत्.म्हणून स्थानिक कन्नड जनतेचे आभार मानायचे की कन्नडीगांना माज आलाय म्हणून ओरड करायची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
द
दादा कोंडके गुरुवार, 10/11/2012 - 18:02 नवीन
लहानपणची खूप वर्षे बेळगावात काढली असल्यामुळे माझीही या बाबतीत काही वर्षापुर्वीपर्यंत टोकदार मतं होती. पण बंगळूरात नोकरी लागल्यापासून त्याची धार निघून गेलीय.;)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/12/2012 - 04:30 नवीन
असलीच बदललेली मतांच्या माणसांच्या प्रतिक्रिया येथे वाचण्यात येत आहे काय? पैसा ताईचे लिहीलेले सत्य आहे. दोन भाषांमध्ये युद्ध होवू नये या मताची तेथील मंडळी आहेत. मराठी माणसांत सामोपचार रोमारोमात भिडलेला आहे. पण तो उस मुळापासून खाण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकार पदोपदीने करत असल्याचे जाणवते. प्रत्येक छोट्या छोट्या कारणांवरून मराठी मंडळींची मुस्कटदाबी चालू आहे. आताच्या विधानसौध भवनावरून त्याचा कळस गाठलेला आहे. तुम्हाला लोकशाही मान्य आहे ना? १. मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला? २. महाजन आयोगाची बेजबादार विधानेच का ग्राह्य धरली जात आहेत? ३. १८५२ पासून बेळगाव नगरपालीकेचे दप्तर मराठीत आहे. असे असूनही २००५ साली कर्नाटकने बेळगाव महानगरपालीका बरखास्त का केली? ४. कानडी भाषेची सक्ती का? ५. सीमाप्रश्नाचे आंदोलन नेहमीच शांततेचे असतांना तेथील जनतेची टाळकी पोलीसांकडून का फोडली जातात? या सारखे असंख्य प्रश्नांची उत्तरे कर्नाटकाकडून मिळतील काय? एक सासू सुनेला ज्याप्रमाणे टोमणे मारते (येथे विद्वान मंडळींडून 'सासू-सुन वाद' आदी फालतू चर्चा/ वाद अपेक्षीत नाहीत.) किंवा एखादा शिरजोर शेजारी ज्याप्रमाणे आधीच्या भांडणाचा राग मनात धरून वेळोवेळी पाणउतारा करतो त्याप्रमाणे कर्नाटक सरकार सीमावासीयांचा करत आलेले आहे. एक महत्वाचा मुद्दा येथे मांडतो. कर्नाटकाने ऐवीतेवी कानडीची सक्ती केली आहेच.त्यामुळे बळजबरी नव्या पिढीला कानडी शिकावे लागत आहे. हळूहळू कानडी जाणणार्‍यांची लोकसंख्या वाढत जाईल. तेथील नविन पिढीला कानडी इतिहास शिकावा लागेल. लहाणपणी जे शिकतो ते लक्षात राहते. ती मते पक्की बनत जातात. माझेच उदाहरण घ्या. मला जयप्रकाश नारायण यांच्याबद्दल शालेय शिक्षणात एकही वाक्य नव्हते. त्यामुळे नक्की त्यांच्याबाबत काय झाले हे ओझरतेदेखील माहित नाही. पुढे मोठे झाल्यावर त्यांच्याबद्दल कामानिमीत्ताने म्हणा किंवा इतरकारणे वाचण्याची गोडी राहीली नाही. असो. तर पुढेमागे जर कधी सीमाभागात 'कोणत्या भागात जायचे' याबद्दल मतदान झाले तर ते मतदान महाराष्ट्राच्या विरूद्ध जावू शकते. असलेला प्रश्न रेंगाळत ठेवणे, भिजत घोंगडे ठेवणे, काळ हाच एक उपाय आहे हे मानणे हे वैशिष्ठ्य केवळ भारतीय न्यायसंस्थेत व लोकशाहीत आहे. असल्या प्रकारच्या मुद्यांमुळेच भारतात विविध प्रश्न रेंगाळत पडलेले आहेत. सीमा भागातले लोक महाराष्ट्रात आले की त्यांचे काय भले होणार? - हा प्रश्न गैरलागू आहे. प्रश्न जेव्हा भाषा संस्कृती जगणे आदींवर येतो तेव्हा माणसाला आपली माती गोड लागते. भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते. आणखी एक लक्षात घ्या. सीमाभागातले लोक काही नोकरी करणारे उपरे, बिहार युपीमधून आलेले किंवा बांग्लादेशी नव्हेत. किंवा सीमाभाग हा पाकव्याप्त काश्मिरही नव्हे. शांततेने विचार करण्याची पात्रता त्यांचीही आहे. पण त्या शांततेला उसाचे मुळ समजा व तो उस कर्नाटकाने मुळापासून खावू नये. बाकी बेळगावी विधानसभा सभागृहाचे बांधकाम करणार्‍या महाराष्ट्रातील (पुण्यातील) अस्सल मराठी उद्योजक श्री. बी.जी. शिर्के (शिर्के सिपोरेक्स फेम) यांच्या शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.या केवळ मराठी कंपनीला काम देण्याचा कर्नाटकी कावा दिसतो. तो कावा शिर्केंना समजला नसेल तर ते वर प्रतिक्रियांच्या मतांसारखेच दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
प
प्रचेतस Fri, 10/12/2012 - 05:14 नवीन
पाभेंच्या शब्दाशब्दाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मदनबाण Fri, 10/12/2012 - 05:34 नवीन
दफोराव तुमच्या भावना मी समजु शकतो...बेळगावच्या लोकांच्या भावनाही सर्वांना माहित आहे,पण ज्या बेळगाववासी जनतेला महाराष्ट्रात यायचे आहे त्यांच्या या भावनांची कदर महाराष्ट्रातील "मराठी"नेत्यांना आणि महाराष्ट्र शासनास आहे का ? याचे उत्तर जर हो असते तर तर मग न्यायालयाने जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले असतानाही महाराष्ट्र सरकारच्या आणि तथा कथीत बेळगावी जनतेच्या बाजुने लढा उभारण्याचा आव आणणार्‍यांच्या नाकावर टिच्चून बेळगावात विधानभवन कसे उभे राहिले ? विधानभवन बांधुन पूर्ण होउन उद्धघाटाचा प्रसंग येई पर्यंत ही सवे मंडळी कुठे होती ? इतके दिवस झोपी गेलेली याची "अस्मिता" कशी जागृत झाली ? इतके दिवस ही मंडळी कुठले रान फुंकायला गेली होती ? शिवसेनेने महाराष्ट्रातल्या काही भागात बंद पाळायला लावला,काय फायदा त्याचा ? महाराष्ट्रातल्याच स्थानिक नागरिकांना मात्र हा फुकटचा जाच सहन करावा लागला नाही का ? राष्ट्रपती प्रणवमुखर्जींना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देणारी हीच शिवसेना आहे ना ? त्या पाठिंब्याचे हे उद्गघाटनरुपी फळ मिळाले ना ? महाराष्ट्रात / मुंबईत मराठी माणुस / शाळा यांची स्थिती उत्तम आहे ? मराठी अस्मिता म्हणवता आणि महाराष्ट्रातल्या मुंबईतच मराठी पाट्या लावण्यासाठी /मराठी चित्रपट चित्रपट गॄहात लावण्यासाठी आंदोलन करावे लागते हा विरोधाभास नाही का ? बेळगावात कानडी सक्तीची केली जाते,पोलिस फक्त कानडीतच बोलतात याचा अर्थ कर्नाटक सरकार हे गृहित धरुनच चालत आहे की बेळगाव त्यांच्या राज्याचा भाग आहे,आणि त्यांची "कानडी" अस्मिता त्यांनी सोडली नसुन त्याचा अवलंब करण्यास ते तिथल्या जनतेला भाग पाडत आहेत ! महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी अस्मिता समोरच्याने हिंदी बोलताच त्याला हिंदी मधुन उत्तर देण्यातुनच उघडी पडते असे तुम्हाला वाटत नाही का ? जरासे अवांतरः--- आपल्याच देशातल्या दोन राज्यांमधे अशी भांडणे लागावीत याचे मला फार वाईट वाटते ! :( विविधतेतुन एकता ही आपल्या देशाची खरी शक्ती ! पण आज सर्वत्र याचा आभाव जाणवायला लागला आहे. :( कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नसुन प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देशाच्या राष्ट्रपतीने उद्धघाटन करावे हे मला सर्वात दुर्दैवी वाटते. थोडक्यात फेल्युअर ऑफ गव्हर्नस अशी परिस्थीती देशात सर्वत्र असल्याचे मला वाटते आणि जाणवते देखील ! जे देशाच्या भविष्यासाठी आणि सुरक्षतेसाठी चांगले लक्षण नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 10/12/2012 - 06:36 नवीन
मग बेळगाव नगरपालीकेने १९५६ मध्येच महाराष्ट्रात राहण्याचा केलेला ठराव का दडपला गेला?
माझ्या माहितीप्रमाणे राज्यांच्या सीमा ठरवताना खेडे हा घटक मानून सलगतेच्या दृष्टीने सीमा ठरविल्या गेल्या होत्या. निपाणीमध्ये आणि बेळगावमध्ये मराठी बहुसंख्या आहे हे मान्य.पण आजूबाजूच्या कन्नडबहुल प्रदेशात जर निपाणी आणि बेळगाव ही मराठी बेटे असतील तर मात्र अशी बेटे महाराष्ट्रात सामील होऊ शकणार नाहीत. निपाणीहून बेळगावही ७०-८० किलोमीटरवर आहे.मधल्या खेड्यांमध्ये लोकसंख्येचे भाषिक वर्गीकरण कसे आहे याविषयी माहिती आहे का? याच न्यायाने अक्कलकोट हे महाराष्ट्रातील इतर मराठीबहुल प्रदेशातील कन्नड बेट झाले आणि त्यामुळेच अक्कलकोट कर्नाटकात सामील होऊ शकले नाही/शकणार नाही. तेव्हा अनुक्रमे बेळगाव आणि अक्कलकोट पालिकांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकात सामील व्हायचे ठराव पास केले तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही.(ही सगळी माहिती मिपावरच जुन्या कोणत्यातरी चर्चेत वाचली आहे. मी गेल्या चार वर्षांमधील मिपावरील सगळ्या चांगल्या चर्चा वाचल्या आहेत).
महाजन आयोगाची बेजबादार विधानेच का ग्राह्य धरली जात आहेत?
ही विधाने बेजबाबदार आहेत असे मराठी म्हणून आपल्याला वाटत असेल पण कायद्याच्या दृष्टीने ती विधाने बेजाबदार आहेत का?
सीमाप्रश्नाचे आंदोलन नेहमीच शांततेचे असतांना तेथील जनतेची टाळकी पोलीसांकडून का फोडली जातात?
याचे अजिबात समर्थन होऊ शकणार नाही.
लहाणपणी जे शिकतो ते लक्षात राहते. ती मते पक्की बनत जातात.
नाही हो. या बाबतीत अगदी पूर्णपणे असहमत.लहानपणी इतरांचे ऐकून पोपटपंची करून तिच आपली ठाम मते आहेत असे अनेकांना वाटत असते.पण मोठे झाल्यावर, जास्त अनुभव घेतल्यावर, जास्त जग बघितल्यावर या तथाकथित ठाम मतांना चॅलेन्ज नकळत केले जाते (आणि असा विचार करणे हेच मॅच्युअर झाल्याचे लक्षण आहे) आणि मग या मुळातल्या ठाम मतांच्या अगदी विरोधी मते बनतात हे अनेकदा बघायला मिळते. घरच्यांच्या प्रभावामुळे मी पण एकेकाळी महात्मा गांधींना टकल्या वगैरे म्हणत असे. माझा जन्म गांधींच्या जन्मशताब्दी वर्षातला.आणि नेमक्या त्याच वर्षी माझा जन्म का झाला असे मला कित्येक वर्षे वाटत असे.एकेकाळचा मी अत्यंत कटटर भारतीय संस्कृतीवाला होतो.तीच मते माझी आजही असती तर मलाही इथे धर्ममार्तंड म्हटले गेले असते.साधारणपणे कॉलेजातून बाहेर पडून नोकरीला लागायची वेळ आली (अयोध्या आंदोनलनाच्या पूढेमागे) तेव्हा हळूहळू माझी मते बदलत गेली. आणि आता पूर्ण विरूध्द मते आहेत. तेव्हा लहानपणची मते ठाम असतात हे मी स्वतः माझ्याच उदाहरणावरून अजिबात मान्य करणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
ब
बाळ सप्रे Fri, 10/12/2012 - 08:23 नवीन
लहानपणीच्या मतांबाबत एकदम सहमत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
द
दादा कोंडके Fri, 10/12/2012 - 21:46 नवीन
हे माझं आवडतं गाणं. शंकर महादेवननी (हो तोच मराठी अभिमान गीत गाणारा. :)) सुंदर गायलंय.
भले तुम्ही बंगलोरला नोकरी करत असाल पण तेथे तुम्ही मराठी शब्द ऐकले की तुम्हाला प्रसन्न वाटत असेल हे नक्की. उगाच नाही येथील ऑनलाईन मराठी साईटवर मन मोकळे करायला परदेशातूनही लोक येतात ते.
काही नाही हो 'वेवलेंग्थ' जुळण्यासाठी भाषा खूप महत्वाची नाहीये. आणि मराठी-मराठीचं काय घेउन बसलात? सीमावासीयांच्या लढ्याला पाठींबा सोडा, आपल्या पुण्या-मुंबईतली लोकं आपल्या पोरांना मराठी मिडीयममध्ये घालायला तयार आहेत का ते सांगा? आणि परदेशी लोकांच्या तर..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Sat, 10/13/2012 - 04:11 नवीन
>>>>.....जर निपाणी आणि बेळगाव ही मराठी बेटे असतील तर मात्र अशी बेटे महाराष्ट्रात सामील होऊ शकण>>>>......... अहो, महाराष्ट्र एकिकरणाची मागणी अवास्तव वाटली काय? आम्ही इंदूर, देवास, गोवा (गोवा आधी महाराष्ट्रात येणार होतो हे लक्षात घ्या. कोकणी ही बोलीभाषा आहे मराठीची), सुरत, बडोदा, बर्‍हाणपुर झालंच तर म्हैसूर, ग्वाल्हेर आदी मराठीबहूल प्रदेश (तुमच्या भाषेत बेटे) काही मागत नाही आहोत. जे न्याय्य आहे ते तर पदरात पाडण्यासाठी लढतायेत. बाकी मराठी-इंग्रजी शिक्षण, भाषेने काय फरक पडतोय असली इतरत्र चर्चेतली / प्रतिसादातली विधाने पाहून आपल्याच माणसांबद्दल इतर सुखी माणसे कशी विचार करतात ते पाहून विषाद वाटला. मुळ प्रश्न कन्नडीगांच्या दंडेलीचा आहे. (आता वर कवितेत कन्नडीगांचा उल्लेख असल्याचे पाहून कुणीतरी सार्‍याच कन्नडीगांना माज आला आहे का? असा प्रश्न विचारलेला आहे. अहो सारेच कन्नडीगा नाहीत तसे. अगदी आपण बोलतो तसे कवितेत लिहीता येत नाही. काही गोष्टी संदर्भाने समजून घ्यायच्या असतात. अन कविता ही त्वेशाने लिहीली आहे. खालील कडवे निट वाचा. उगा आमच्यावर वार करू नका महाराष्ट्रात जाण्यासाठी आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू) त्यात लिहीलेय की उगा आमच्यावर वार करू नका. आपची डोकी (पहिल्यांदा) तुम्ही फोडली तर तुमचीही डोकी फोडू. (अर्थात खरोखर असे केवळ डोकी फोडण्याच्याच उद्देशाने कुणी करत नसते. पण कर्नाटक सरकारच्या पोलिसांना तशा ऑर्डर्स असतात. हे वेळोवेळी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणार्‍या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जाणवले आहे.) कर्नाटक सरकारने जी बळजबरी चालवलेली आहे अन त्यांच्या पराकोटीच्या भाषाभिमानाचा त्रीव निषेध. (किंवा तसला भाषाभिमान आपण कधी जपायला शिकणार?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके
ब
बॅटमॅन Sat, 10/13/2012 - 10:34 नवीन
कोकणी ही मराठीची बोलीभाषा नाहीये. कैच्याकै विधाने करत जाऊ नका. आणि महाराष्ट्रातले नेतृत्व भोंगळ, दुर्लक्ष करणारे आणि कर्नाटक आग्रही असल्याने या प्रश्नाचा निकाल महाराष्ट्राच्या बाजूने लागणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पाषाणभेद Mon, 10/15/2012 - 04:08 नवीन
>>>कोकणी ही मराठीची बोलीभाषा नाहीये. माफ करा. माझा मराठीचा भाषाभिमान जरा जास्तच होत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 10/15/2012 - 13:23 नवीन
माफ करा. माझा मराठीचा भाषाभिमान जरा जास्तच होत होता. नाही नाही तसे मुळीच नाही. हल्ली भाषिक अस्मिता सर्वांच्याच जास्त तीव्र आहेत. :) फक्त आरोप दुसर्‍यावर करायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
प
पुण्याचे वटवाघूळ Sun, 10/14/2012 - 05:35 नवीन
गोवा आधी महाराष्ट्रात येणार होतो हे लक्षात घ्या.
माझ्या माहितीप्रमाणे गोव्यात सार्वमत घेतले होते आणि सार्वमतात लोकांनी राज्य स्वतंत्र ठेवावे असा कौल दिला.त्यामुळे गोवा आधी महाराष्ट्रात येणार होते या बोलण्याला काय अर्थ आहे?आधी म्हणजे नक्की कधी?
सुरत, बडोदा, बर्‍हाणपुर झालंच तर म्हैसूर, ग्वाल्हेर आदी मराठीबहूल प्रदेश (तुमच्या भाषेत बेटे) काही मागत नाही आहोत.
बर्‍हाणपुर चे माहित नाही पण वरील यादीतील इतर कोणत्याही ठिकाणी मराठी लोकांची बहुसंख्या नाही.बडोदा, ग्वाल्हेर, इंदोर या ठिकाणी मराठी लोक बरेच असले तरी बहुसंख्य नक्कीच नाहीत.त्यामुळे तुम्हाला ही शहरे महाराष्ट्रात सामील व्हावी असे लाख वाटत असले तरी ते शक्य नाही.
त्यांच्या पराकोटीच्या भाषाभिमानाचा त्रीव निषेध. (किंवा तसला भाषाभिमान आपण कधी जपायला शिकणार?)
म्हणजे आपलाही तीव्र निषेध कधी होणार याची वाट बघत आहात का? बेळगाव महाराष्ट्रात यावे हे मलाही वाटते.पण आपला वाद आपल्याच लोकांशी आहे कोणा परक्याशी नाही हे विसरून चालायचे नाही.तेव्हा महाराष्ट्र सरकार कोर्टात गेले आहे तो मार्ग योग्य आहे आणि त्याच मार्गाने जाही, उगीच बंद, तोडफोड करून आपल्याच मालमत्तेचे नुकसान करू नये. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये दुसरे विधानभवन बांधत आहे ही माहिती महाराष्ट्र सरकारला किंवा कोणालाच नव्हती का?ती माहिती असेल तर वेळीच कोर्टात जाऊन त्या बांधकामाला स्थगिती मिळवायचा प्रयत्न का झाला नाही? एकीकरण समितीकडे समजा कोर्टात जायला पैसे नसतील पण राज्य सरकारकडे तर होते किंवा शिवसेनेकडे तर होते. मग तो प्रयत्न का झाला नाही?की कर्नाटक सरकारने एका रात्रीत बांधकाम उरकले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
च
चिरोटा Sun, 10/14/2012 - 06:09 नवीन
आता चान्स गेला बेळगाव घ्यायचा.रायचूर साईडला ट्राय मारुया. राष्ट्रपती काँग्रेसचे,महाराष्ट्रात सरकार त्यांचेच्.कर्नाटकात सरकार भाजपचे.असे असले तरी मुखर्जींनी महाराष्ट्र सरकार्/शिवसेना ह्या दोघांनाही फाट्यावर मारून उदघाटन केले. महाराष्ट्र काँग्रेस नेते/राष्ट्रवादी नेते/शिवसेना नेते ह्यांना त्यांचे राज्याबाहेर स्थान काय हे कळले असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुण्याचे वटवाघूळ
प
पैसा गुरुवार, 10/11/2012 - 18:39 नवीन
भावना पोचल्या! गेल्याच आठवड्यात रामनगरवरून हळशी इथे गेले होते, प्रकर्षाने लक्षात आलेली गोष्ट म्हणजे सगळीकडे घरांच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या मराठीत आहेत. रस्त्यावरच्या सरकारी पाट्या फक्त कानडी भाषेत आहेत, कुठेही हिंदी इंग्लिश सुद्धा वापरलेलं नाही. साहजिकच ठिकठिकाणी थांबून लोकांना रस्ता विचारणे भाग होते, कारण हळशी हे बर्‍यापैकी आत आहे. आणि मराठीत विचारलेल्या प्रश्नाना सगळे लोक अगत्याने गोड हेल काढत मराठीत उत्तरे देत होते. जागोजागी सरकारी प्राथमिक शाळा मराठीत दिसत होत्या. हीच परिस्थिती गेल्या वर्षी कारवारला जाताना पाहिली होती. बेळगाव शहरात मात्र एखाद्या पोलिसाला मराठीत काही विचारले तर कानडीत उत्तरे मिळायची. सर्व पोलीस कानडी आहेत अशी माहिती एका रिक्षावाल्याने दिली होती. बेळगावचे कानडीकरण सरकारतर्फे जोरदार चालू आहे. शिवाय हा भाग मराठी म्हणून विकसकामांच्या बाबतीत सरकारतर्फे दुर्लक्ष चालू आहे. हळशी इथे रोज १४ तास वीज नसते कारण लोडशेडिंग अशी माहिती मिळाली. गेली २० वर्षे अनमोडमार्गे बेळगावला जाते आहे. एकदाही रस्ता चांगल्या अवस्थेत बघायला मिळाला नाही. गोव्याची सीमा ओलांडली की बेळगावपर्यंत फक्त खड्डेच आहेत. दर वेळी हाडे खिळखिळी झाली की परत बेळगावला येणार नही म्हणते आणि ४/६ महिन्यांनी परत जाते! तेव्हा कर्नाटकात लोक सुखी आहेत यात काही तथ्य नसावे. सहजच गेल्या वर्षी मराठी दिनाला येळ्ळूरबद्दल अपर्णाने लिहिलेल्या लेखाची आठवण आली. बेळगाव प्रश्न म्हणजे फक्त बेळगाव शहराचा प्रश्न नव्हे, तर आसपासच्या बर्‍याच मोठ्या भागाचा प्रश्न आहे, आणि कोणत्याही देशव्यापी पक्षाच्या पाठिंब्याशिवाय ही चळवळ लोकांनी इतक्या वर्षांनी देखील चालवली आहे याबद्दल त्यांचं कौतुक वाटतं. ते खरे मराठी भाषेचे प्रेमी. आमच्यासारखे आंजावर चर्चा करत बसत नाहीत. की मराठीचा उद्घोष करत स्वत:च्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत. त्या सगळ्यांना इथून पाठिंबा देणं यात फार काही अर्थ नाही म्हणून सलाम म्हणते. त्याच वेळी सरसकट कानडी सामान्य लोक वाईट असेही म्हणवत नाही. कितीतरी चांगले कानडी लोक भेटले आहेत. आणि कानडी शिकण्याचा मोडकातोडका प्रयत्न केला आहे. कानडी आणि मराठी असे वेगळे प्रदेश खरे तर भौगोलिक दृष्ट्या नाहीतच. असलेच तर कोकण आणि घाट आहेत! शिवाय मराठी आणि कानडीत बरेच साम्य असणारे शब्द आहेत. दोन भाषांमधे वैर असू शकत नाही. बेळगावचा प्रश्न सोडवण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला खर्‍या अर्थाने रस किंवा इच्छाशक्ती नाही हेच खरे!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 10/11/2012 - 19:06 नवीन
ते खरे मराठी भाषेचे प्रेमी. आमच्यासारखे आंजावर चर्चा करत बसत नाहीत. की मराठीचा उद्घोष करत स्वत;च्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालत नाहीत. १००% सहमत ! जर कर्नाटक सरकार बेळगाव आणि इतर भाग त्यांचा आहे असा दावा सांगुन कानडीची सक्ती करत असेल तर त्यात त्यांचे काय चुकले ? महाराष्ट्रात मराठी शाळांची दुरावस्था सगळ्यांना माहित आहे.मध्यंतरी असेही वाचनात आले होते की मुलींच्या शाळेत स्वच्छतागॄहेच नाहीत !‘अशा शाळांपेक्षा जनावरांचे कोंडवाडे बरे’ तेव्हा कर्नाटकात लोक सुखी आहेत यात काही तथ्य नसावे. जरा हे देखील वाचावे मग... महाराष्ट्रात दुष्काळ हटत नसेल तर कर्नाटकात जाण्यात गैर काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रभाकर पेठकर Sat, 10/13/2012 - 21:24 नवीन
त्याच वेळी सरसकट कानडी सामान्य लोक वाईट असेही म्हणवत नाही. कितीतरी चांगले कानडी लोक भेटले आहेत.
लोकं वाईट नसतात. स्वार्थी राजकारणी प्रत्येक घटनेला, विचारांना वेगळा रंग देऊन हेच सत्य आहे असे सतत भासवत राहतात. ह्या क्लुप्तीला अनेक सर्वसामान्य फसतात आणि दोन प्रदेशात वैमनस्य निर्माण होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ज
जयंत कुलकर्णी Fri, 10/12/2012 - 05:31 नवीन
नुकतेच कर्नाटकात फिरुन आलो. तेथील स्वस्ताई व जीवनमान बघून मला तर असे वाटले की पुणेच कर्नाटकात सामील करावे म्हणजे आपल्या नादान राज्यकर्त्यांपासून आपली सुटका होईल. तेथे एका मराठी माणसाशी बोललो त्यानेही याच भावना व्यक्त केल्या की महाराष्ट्रात जाऊन काय मरायचे आहे का आम्हाला ?.........
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 10/12/2012 - 06:06 नवीन
पण उद्या मुंबईमधे बिहारी/युपी वाल्यांची संख्या वाढली आणी ते बोंबाबोंब करु लागले तर मुंबई बिहारला जोडुन द्यावी काय? मग तिथेही कोणी सत्तुगुड डॉट कॉम वर अशीच एखादी कविता लिहीलच की.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/12/2012 - 06:11 नवीन
इरसाल, अहो प्रश्न काय तुम्ही बोलताय काय? अहो हा सीमाभागाचा प्रश्न आहे. सीमाभाग. दोन प्रदेश जेथे मिळतात तो. तुमच्या शेजारच्या घराची भिंत. समजले? अन हा सीमाभाग बळजबरी दुसर्‍या भागात ढकलला गेला आहे अन त्यावर अत्याचार चालू आहे. तुमचा मुलगा शेजारच्यांनी पळवला आहे अन त्यावर त्यांची भाषा, इतिहास शिकण्याची त्यांनी बळजबरी चालवली आहे. समजले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ब
बाळ सप्रे Fri, 10/12/2012 - 06:46 नवीन
बेळगावच्या विभाजनाचा विकल्प नाही का? अर्धं त्यजति पंडीतः
  • Log in or register to post comments
म
मी_आहे_ना Fri, 10/12/2012 - 07:15 नवीन
पाभे, आपल्या भावना समजू शकतो. पण जसं भारताबद्दलचा अभिमान भारताबाहेर राहूनही जपता येतो तसा मराठीबद्दलचाही येइलच की. शिवाय वर कोणितरी म्हणल्याप्रमाणे, मित्रपक्षाचे सरकार असूनही 'सो कॉल्ड' मराठी माणसांची कदर करणार्‍या पक्षानी घोंगडं भिजतच ठेवलंय आणि ते वाळवतोय असं दाखवण्यासाठी २-४ काठ्या मधेच कधीतरी हाणायच्या, हे तर आता नित्याचेच झाले आहे... मूळात राज्या-राज्यातल्या सीमांवरून भांडून आणि ते पिढ्यांन्पिढ्या ठसठसवून, एकसंध भारत राष्ट्र म्हणून केव्हा विचार होणार (हे फक्त मराठी माणसांनी करायचंय असं म्हणायचं नाही, कन्नडिगांनीही हा विचार करावाच...जरूर) अश्याने 'विविधतेतून एकता'च गमावून बसतोय आपण.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 10/12/2012 - 07:23 नवीन
हा हा हा 'विविधतेतून एकता', भाईचारा या लादलेल्या गोष्टी आहेत साहेब. मुळात सारी माणसं असतात. त्यांच्यात मानवी प्रवृत्ती असते हे लक्षात घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना
म
मी_आहे_ना Fri, 10/12/2012 - 08:27 नवीन
मूळात सगळी माणसं असतात हे मान्यच, पण एकाच देशातल्या राज्या-राज्यात सीमावाद कशाला? महाराष्ट्रात तर 'आपलं झालं थोडं अन् व्याह्यानी धाडलं घोडं' अशी अवस्था व्हायची... ठीक आहे, केंद्र-शासित तर केंद्रशासित (केंद्रात शासन आहे, असं गृहित धरतो) (तिथे नविन कुठली नदी आहे काय जिथे कागदो-पत्री धरण बांधता येइल किंवा कोळसा खाण वैग्रे, किंवा 'हिल स्टेशन' ची जागा... अर्थातच नसेल, नाहीतर 'मोठ्या साहेबांणी' लक्ष घातले असते की हो... ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद
म
मी_आहे_ना Fri, 10/19/2012 - 07:06 नवीन
माझ्या वरच्या प्रतिक्रियेत म्हणल्याप्रमाणे "आपलं झालं थोडं..." साठी - हा घ्या पुरावा (आधी म्हणल्याप्रमाणे, भावनांचा आदर आहेच..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी_आहे_ना
प
पाषाणभेद Fri, 10/12/2012 - 07:26 नवीन
मुळ भांडण जर सुटता सुटत नसेल तर मध्यम मार्ग म्हणुन हा भाग केंद्रशासीत करावा असलीही मागणी आता होतीये.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 10/12/2012 - 07:34 नवीन
महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भाची मागणी बोथट करण्याच्या उद्देशाने नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला, तिथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. साधारण तशीच कृती कर्नाटक सरकारने बेळगावी लोकांच्या मागणीला बोथट करण्यासाठी (बेळगावी लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी असे म्हणत नाही) केली आहे. तिला माज म्हणणे आणि विधान भवन तोडून टाकू असे म्हणणे जरा जास्तच वाटते.
  • Log in or register to post comments
प
पुण्याचे वटवाघूळ Fri, 10/12/2012 - 08:16 नवीन
महाराष्ट्राने स्वतंत्र विदर्भाची मागणी बोथट करण्याच्या उद्देशाने नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला, तिथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन भरते. साधारण तशीच कृती कर्नाटक सरकारने बेळगावी लोकांच्या मागणीला बोथट करण्यासाठी (बेळगावी लोकांचे लांगूलचालन करण्यासाठी असे म्हणत नाही) केली आहे. तिला माज म्हणणे आणि विधान भवन तोडून टाकू असे म्हणणे जरा जास्तच वाटते.
शू...काहीतरी काय बोलता थत्तेचाचा. आम्ही मराठी आणि ते कन्नड. म्हणजे आमचे ते योग्यच आणि त्यांचे ते चुकीचेच.काय समजलात? (हा उपहास आहे हे सांगायलाच नको).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ब
बॅटमॅन Fri, 10/12/2012 - 07:45 नवीन
ಆದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಸೇರಿದಂತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಇರ್ಬೇಕು !!!!!! ;) (ಒಂದು ಜಜ್ವಲ್ಯ ಮರಹಟಾ- ಗೋಥಮಪಲ್ಲಿನ ಬ್ಯಾಟ್ ಮ್ಯಾನಪ್ಪಾ )
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 10/12/2012 - 07:54 नवीन
आदरे बेळगावी सेरिदंते महाराष्ट्र एरबेकु. (ओंदु जाज्वल्य मरहटा-गोथम्पल्लिन ब्याट म्यानप्टा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा