Welcome to misalpav.com
लेखक: आनंद घारे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मंगलयानाच्या मोहिमेचा फायदा आणि तोटा यावर बराच विचार झालेला आहे. अनेक लोकांना याबद्दल उत्सुकता वाटत असावी असे मला वाटले. या लेखाचा उद्देश सोप्या भाषेत तांत्रिक माहिती करून देणे एवढाच आहे.

छान लेखमाला सुरु होणार असे दिसत आहे :) अवकाशामधल्या (स्पेसमधील) निर्वात पोकळी(व्हॅक्यूम)मधून पुढे जात राहणा-या वाहनाला कसलाच विरोध नसतो, त्यामुळे तिथे भ्रमण करतांना ऊर्जा खर्च होत नाही आणि ती पुरवावीही लागत नाही. एक शंका निर्वातात घर्षण शून्य असते पण उपग्रह जेव्हा जेव्हा स्पेस मध्ये असतो तेव्हा कायम त्यावर बाकीच्या ग्रहांच्या वा सूर्याच्या गुरुत्व शक्तीचा परिणाम टाळण्या साठी यानाला कायम काही उर्जा खर्च करावीच लागत असणार ना ? सायकलच्याच उदाहरणात जर सायकल उतारावर जात असेल पण मागून जर एखादा शक्तिशाली चुंबक तिला खेचत असेल तर सायकलस्वाराला नक्कीच जास्त जोरात पॅडल मारावे लागेल तसेच यानाचे पण कायम पूर्ण प्रवासात होते का?

सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कसा असतो आणि त्याचे काय परिणाम होतात याची चर्चा उत्तरार्धात देणार आहे.

बाकीच्या ग्रहांच्या वा सूर्याच्या गुरुत्व शक्तीचा परिणाम अवकाशातल्या सर्वच गोष्टींवर (आपल्यावरसुद्धा) होतच असतो. ज्योतिष सांगणारे ज्या प्रकारचा परिणाम सांगतात ते मला इथे अभिप्रेत नाही. या गुरुत्वाकर्षणामुळे मंगलयानाच्या प्रवासावर होणारे परिणाम असे आहेत. मंगळयानाचा बहुतेक सगळा प्रवास सूर्याच्या भोवती फिरण्याने होणार असल्याचे मी दुसर्‍या भागात सविस्तर लिहिले आहे. जेंव्हा हे यान मंगळाच्या जवळ जाऊन पोचेल तेंव्हा ते त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने त्याला घिरट्या घालू लागेल. गुरु, शनी वगैरे इतर महत्वाचे ग्रह फार दूर असल्यामुळे त्यांच्या आकर्षणाची शक्ती अत्यंत क्षीण झालेली असते. प्रुथ्वीच्या परिभ्रमणावर इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम सुद्धा अत्यंत नगण्य असा असतो, पण खूप बारकाईने निरीक्षण केल्यास तो मोजता येतो. बहुतेक वेळा हे ग्रह निर्निराळ्या दिशांना असल्यामुळे त्यांचे आकर्षण वेगवेगळ्या दिशांना खेचत असते. त्यामुळे त्यांचा एकंदर परिणाम कमी होतो

लेख मस्त आहे आणि लेखमाला पण छानच होणार आहे! इंधन कधी लागते आणि लागत नाही याची माहिती एकदम रोचक. आपली मंगळस्वारी मंगळापासून बरीच योजने लांबच असणार आहे आणि ती देखील अंडाकृती आकारातील घिरट्यांमधे असणार आहे, असे ऐकलेले आहे. त्याची काही लॉजिकल कारणे असतील असे वाटते. त्या संदर्भात पण वाचायला आवडेल... पुढच्या भागाची वाट पहात आहे.

सूर्यमालिकेतील पृथ्वासकट सर्वच ग्रहांच्या तसेच आपल्या चंद्राची कक्षा या सगळ्या कक्षा लंबवर्तुळाकार आहेत. जवळ जवळ सारे कृत्रिम उपग्रहसुद्धा पृथ्वीभोवती अशाच कक्षांमध्ये फिरत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होणारे एकमेकांभोवती फिरणे नेहमी अशाच प्रकारचे असते. याचे शास्त्रीय कारण सविस्तरपणे समजावून सांगण्यासाठी भूमितीतल्या आकृती आणि काही सूत्रे (फॉर्म्यूले), समीकरणे (इक्वेशन्स) वगैरे मांडावी लागतील. कदाचित एक वेगळा लेखच लिहावा लागेल. थोडक्यात सांगायचे झाल्यास कोणतीही वस्तू न्यूटनच्या नियमानुसार विशिष्ट गतीने सरळ रेषेत पुढे जात असते. यामुळे ती जर सरळ रेषेत वर जात नसेल तर आडव्या किंवा तिरक्या अशा एका वेगळ्याच दिशेने पण पृथ्वीपासून दूर जात असते. गुरुत्वाकर्षणाचा जोर (फोर्स) मात्र फक्त पृथ्वीच्या मध्यबिंदूच्या दिशेने तिला ओढत असतो. यामुळे ती वळते आणि पृथ्वीच्या जवळ येते. प्रत्येक क्षणी हे दूर जाणे आणि जवळ येणे अगदी नेमके तितकेच असले तर ती वस्तू पृथ्वीच्या मध्यबिंदूपासून तितक्याच अंतरावर राहील आणि ती वर्तुळाकार कक्षा असेल. पण तसे सहसा नसते. त्यामुळे ती वस्तू काही काळ दूर दूर जाते आणि काही काळ जवळ जवळ येते, त्या वेळी तिची गतीही बदलत असते. असे भ्रमण लंबवर्तुळाकाराच्या आकारात होते. लंबगोलाला दोन मध्यबिंदू असतात. वर्तुळात ते एकवटलेले असतात किंवा त्यांच्यामधले अंतर शून्य असते. यामुळे वर्तुळ हा लंबगोलाचा (की लंबवर्तुळाचा) म्हणजे इलिप्सचा एक विशिष्ट प्रकार आहे असे म्हणता येईल.

ह्या माहितीबद्दल धन्यवाद. जालावर जेंव्हा मी मंगलयानाच्या संदर्भात प्रथम वाचले तेंव्हा माझा गैरसमज झाला होता की तसे मुद्दाम केले होते पण खात्री नव्हती.

माझे काही बाही लिहिणे चाललेलेच असते. मिसळपाववर ते वाचले जाईल असे जेंव्हा मला वाटते, तेंव्हा ते इथे चिकटवून देतो.

थोड कळतय, थोड नाही. पण आपल्या कृपेने कुणी बोलायला, चर्चा करायला लागल तर निदान काय बोलताहेत ते समजेल तरी. धन्यवाद घारेकाका.

लेख माहिती पूर्ण . घारे काकांच्या ब्लोंगचा मी फ्यान आहेच्चे ! यावरून काही वर्षापूर्वीची एक गंमत आठवली. पुण्यातील एक चार्टर्ड अकौंटट यानी बोस्टन येथे एक चोवीस फुटी विमान विकत घेतले. एक्ट्याने त्यानी ते बोस्टन वरून पुण्यास आणले. फक्त अटलांटिक सागरात एका रिफुएलिंग आयलंड पर्यंत एका निग्रोने त्यान सोबत केली.त्यांचे व्याख्यान झाल्यावर त्याना भेटलो व हे विमान चालवणे परवडते कसे असे विचारले " एव्हिएशन चा लोड सोडल्यास आकाशातून कार न्यावी इतकाच खर्र्च येतो " असे त्यांचे उत्तर होते.

नमस्कार घारे काका, मी तुमच्या सगळ्या अनुदिनींचा चाहता आहे. हा लेख व इतरही लेख मी तुम्च्या अनुदिनी वर आधीच वाचलेले आहेत. विज्ञानातील इंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द हे काम तर खुपच कठिण.

(पण साध्या शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द या वर मी. पा. वर मी एक धागा काढणार आहे.)

अत्याधुनिक तन्त्रज्ञानाच्या क्षेत्रात कामाचे ढीग उपसताना तुम्हि समान्यांसाठी केलेले हे ज्ञान संवर्धन स्तुत्य आहे. एवढी माहिती वाचायला आम्हाला वेळ काढावा लागतो; तेथे तुम्ही़ टंकन कसे करता म्हणजे कंटाळा कसा येत नाही. खुप खुप धन्स आणि पुढील लेखनास शुभेच्छा!

Book Antiqua

लेखन आणि माहिती आवडली. :) पुढच्या भागाची वाट पाहतो. जाता जाता :- या मंगळ यानाचे लाईव्ह टेलिकास्ट पाहत होतो तेव्हा एक गोष्ट पाहिली होती की ज्या अपेक्षित मार्गावरुन हे यान जायला हवे होते त्यापेक्षा थोड्या वरुन ते चालले होते. {हे दाखवल्या जाणार्‍या ग्राफ मधे स्पस्ट दिसत होते.}

अग्निबाणाच्या कप्प्यांमध्ये किती इंधन आणि प्राणवायू ठेवायचा हे ठरवले जाते. त्यावरून एकंदर किती ऊर्जा द्यायची याचे गणित केले जाते. त्याचा जेंव्हा स्फोट होतो त्या क्षणी किती मिलिसेकंद किंवा मायक्रोसेकंदांमध्ये ती ऊर्जा किती प्रमाणात बाहेर पडेल यावर नियंत्रण नसते. हवेचा विरोध हा रॉकेटच्या वेगावर अवलंबून असतो तसेच त्या क्षणी हवेचा दाब, आर्द्रता, ढग, धुळीचे कण, वा-याचे प्रवाह वगैरे कित्येक बाबींवर अवलंबून असतो. त्यावरही कोणाचे नियंत्रण नसते. एका मर्यादेच्या पलीकडे वाईट हवामान असले तर उड्डाणाचा बेत लांबणीवर टाकणे एवढेच करता येते. याच कारणांमुळे अपेक्षित ट्रॅजेक्टरी आणि प्रत्यक्षातला मार्ग यांची तुलना करून त्यानुसार उपाययोजना केली जाते. कोणतेही चांगले यंत्र डिझाइन करतांनाच ते कसे चालणार आहे याचा एक अंदाज केला जातो, ते कसे चालते आहे याचे निरीक्षण करून प्रत्येक महत्वाच्या पॅरामीटरची मोजणी, तुलना आणि त्यात बदल करण्याची क्षमता किंवा सोय त्यात केली जाते. मंगलयान अपेक्षेपेक्षा थोड्या वेगळ्या वाटेने चालले असले तरी हा फरक अपेक्षित होता आणि मर्यादेच्या आत होता म्हणून त्याला यशस्वी उड्डाण असे ठरवून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि एकमेकांचे अभिनंदन केले

प्रतिसादातूनही उत्तम माहिती मिळाली आणि तीही सोप्या भाषेत. धन्यवाद!