- 5652 views
आजच सकाळी दैनिक दिव्य मराठी त आलेल्या एका बातमीने लक्ष वेधुन घेतले. ती अशी की महाराष्ट्राचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांनी कुठल्याशा कार्यक्रमात (राजकारण्यांच्या टीपीकल तुलादान इ. सारख्या) स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेतला व दुधाची भरपुर नासाडी या कार्यक्रमात त्यांच्या निष्टावंत कार्यकर्त्यांनी केली. या घटनेवर डॉ. राणी बंग यांची प्रतिक्रीया आली आहे ती अशी की,
राज्यातील बरीच मुले अन स्त्रिया कुपोषणाच्या जंजाळात अडकल्या असताना स्वत:वर दुधाचा अभिषेक करुन घेण्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ़ यांचे कृत्य लज्जास्पद अन घृणास्पद असुन यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला एक प्रकारे ठेच पोहोचली आहे. अभिषेकासाठी वापरण्यात आलेल्या दुधाची रक्कम कुपोषण असलेल्या भागातील मुलांच्या शाळा अथवा एखाद्या बालसंगोपनगृहाला देउन मुश्रीफ़ व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रायश्चित्त घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या दुध हे पुर्णान्न आहे. राज्याने अजुनही दुग्धोत्पादनात स्वयंपुर्णता मिळवली नाही. बरयाच स्त्रीयांना अन बालकांना त्यांचे आरोग्य राखण्यासाठी दुधाची गरज आहे परंतु गरीबीमुळे ते त्यांना मिळत नाही. असे असतांना दुधाची अशी नासाडी व्हावी ही वेदनादायक बाब आहे. त्या पुढे म्हणतात की मुश्रीफ़ पालकमंत्री असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, संग्रामपुर, जळगाव जामोद हे तालुके कुपोषणग्रस्त आहेत. मेहकर तालुकाही काही प्रमाणात या समस्येने ग्रासला आहे याचेही भान त्यांना (मुश्रीफ़ांना) कसे राहीले नाही ?. देवांच्या मुर्तीवर केले जाणारे असे अभिषेकही आपणास मान्य नसुन त्याकरीता वापरण्यात येणारे दुध एखाद्या बालकाश्रमाला दिल्यास ती भक्ती परमेश्वराला अधिक प्रिय होईल. इत्यादी. असे त्या म्हणाल्या.
वरील मागणी अत्यंत योग्य आहे. डॉ. राणी बंग जे काही बोलल्या त्यातला शब्द न शब्द अक्षरश: खराच आहे. याचे कारण त्यांची संस्था कुपोषणा वर अनेक वर्षे अत्यंत महत्वाचे असे काम गेली कित्येक वर्षे अत्यंत निष्ठेने करीत आहेत. हे सर्व तर आपल्याला माहीत आहेच. पण त्यांचा वरील शब्द कीती कळकळीतुन आलेला आहे कीती सच्चा आहे हे मला अतिशय तीव्रतेने जाणवले याचे कारण वरील बातमी वाचल्या बरोबर अतिशय तीव्रतेने आठवला तो राणी बंग यांच्या संस्थेसंदर्भात वाचनात आलेला एक सुंदर लेख जो मला खात्रीने आठवतो साप्ताहीक सकाळ च्या काही वर्षांपुर्वीच्या दिवाळी अंकात आलेला होता.( फ़क्त वर्ष नेमके आठवत नाही पण अगदीच जुना ही नाही प्लिज कुणाकडे असल्यास नेमका संदर्भ द्यावा ) तर त्या लेखात एक याच राणी बंगांविषयी एका घटनेचे वर्णन आलेले होते ती अशी की,
डॉ.राणी बंग या ज्या आदिवासी भागात काम करतात तेथे च एक गरीब आदिवासी स्त्री होती जीने नुकताच एका बाळाला जन्म दिला होता आणि झाल अस होत की काही वैद्यकीय कारणास्तव या आदिवासी बाईला पान्हा फ़ुटला नव्हता त्यामुळे ती स्वत:च्या बाळाला स्वत:चे दुध पाजण्यास असमर्थ होती. बाळ अतिशय कुपोषीत व जगेल की वाचेल अशा अवस्थेतच होते. आईचे दुध बाळा साठी सुरुवातीच्या काही महीन्यात तरी कीती महत्वाचे असते ते आपल्याला माहीतच आहे. हे न होण्यामागे ही त्या आदिवासी दुर्देवी बाईची गरीबी/ कुपोषण हीच कारणे अर्थातच होतीच. आणि त्याच वेळेस डॉ. राणी बंग यांनी ही एका बाळाला जन्म दिला होता. तेव्हा ही आदिवासी बाई त्यांच्या कडे पेशंट म्हणुन आलेली होती व तिची ही अडचण डॉ.राणींना समजली. तेव्हा डॉ. राणी बंग यांनी स्वत: त्या आदिवासी बाईच्या बाळाला आपलं (आपल्या पोटच्या बाळांसाठीचं दुध ) शेअर करुन त्या आदिवासी बाईच्या बाळाला त्यांनी वाचवल होत. त्या स्वत:च्या बाळाबरोबरच अर्ध अर्ध शेअर करुन दोन्ही बाळांना स्वत:च दुध पाजतं असत. व असं करुन त्यांनी त्या गरीब आदिवासी बाईच्या बाळा ला कुपोषणापासुन वाचवुन एक प्रकारे संजीवनी च दिली. असा अनुभव त्या लेखात दिलेला होता.
यामुळे ही वरील मुश्रीफ़ यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली दुधाची नासाडी खरोखरच डॉ.राणी यांच्या संवेदनशील मनाला कीती वेदना पोहोचवत असेल याची जाणीव एका क्षणात कुठलेही स्पष्टीकरण न देताही होते. आणि त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यावरुन व या घटनेवरुन मनात त्यांच्या विषयीचा असलेला आदर अनेक पटींनी वाढतो.
बर यातही विशेष म्हणजे या घटनेचा उल्लेखही त्यांनी स्वतहुन कधी केलेला नाहीये त्यांच्याबद्दल कोणी तरी दुसरयाने च सांगितलेल आहे.आजच्या “करुन दाखविले” चे होर्डींग बनवुन रस्त्यावर लावण्याच्या जमान्यात इतकी संवेदनशीलता इतकी माणुसकी इतक प्रेम कोणा मध्ये इतरांविषयी असु शकत हेच फ़ार दुर्मिळ वाटत. ते दोन्ही ही ( डॉ.राणी व डॉ. अभय बंग ) स्वत:विषयी कीती कमी बोलतात या संदर्भातील अनिल अवचट यांच्या “कार्यरत” या पुस्तकातील हा खालील उतारा ही पुरेसा बोलका आहे.
अभय, राणीला स्वतःविषयी बोलायला नको असायचं. विशेषतः राणीला काही विचारलं तर ती म्हणायची, "ते तू अभयला विचार." हळूहळू त्यांचं मागचं समजायला लागलं तेंव्हा लक्षात आलं, की ही दोघं म्हणजे भलतेच स्कॉलर लोक आहेत. आपल्याकडे मेडीकलला अॅडमिशन मिळणं हेच मुळात केवढं अवघड असतं. अॅडमिशन मिळाल्यावर मुलं तर चार बोटं वर चालायला लागतातच; पण त्यांचे पालकही तरंगू लागतात. इथं अभय आणि राणी MBBS काय MD काय सगळ्या विद्यापीठात पहिले तर आलेच, पण ते ही सुवर्णपदक मिळवून. अभयला MBBS ला तीन विषयांत सुवर्णपदकं होती. राणीला MD ला मिळालेलं सुवर्णपदक विद्यापीठात त्या आधी कितीतरी वर्षं कुणालाच मिळालेलं नव्हतं. MBBS नंतर अभय चंदीगडच्या, संपूर्ण भारतात अग्रगण्य असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल रिसर्च (PGI) मध्ये गेला. तिथे काही काळ काम करून नंतर प्रवेशपरीक्षा असते. तिथं तो रेकॉर्ड मार्क मिळवून पहिला आला, नंतर दोघंही अमेरिकेतल्या बाल्टिमोर येथील जॉन्स हाफकिन्स विद्यापीठात शिकायला गेले. 'पब्लीक हेल्थ' या क्षेत्रातला जगातला 'लास्ट वर्ड' समजली जाणारी ही संस्था. सर्व जगातून तिथं विद्यार्थी येतात. तिथल्या सगळ्या विद्यार्थांत तर अभय पहिला आलाच; पण त्याला ९९% मार्क पडले. त्या विद्यापीठाच्या इतिहासात कुणाला इतके मार्क पडले नव्हते आणि अजूनपर्यंत कुणाला पडले नाहीत. राणीची आई त्या काळात वारली. तिला थोडे दिवस इकडे यावं लागलं तरीही तिला ८०% मार्क पडले. हे सर्व मला तुकड्या तुकड्यानं दीड वर्षांच्या काळामध्ये समजलेले तपशील. याहून किती आहे, ते माहिती नाही.
प्रकार:
विषय: