Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:
सध्या प्रसारमाध्यमांत एक विषय चर्चेला असतो – तो म्हणजे ‘अफगाणिस्तानमध्ये काय होणार पुढच्या वर्षी?” यात अनेक उपविषय आहेत. अमेरिकन सैन्य माघारी जाणार का? तालिबानशी शांतता बोलणी होणार का? सत्तेवर कोण येणार? अमेरिका माघारी गेल्यावर जी पोकळी निर्माण होईल ती कोण भरून काढणार? भारत काय करणार? भारत अफगाणिस्तानला मदत करत राहणार का? अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा भारताची कुरापत काढणार का? अफगाणिस्तानमध्ये जे काही घडतं आहे किंवा घडणार आहे, त्याला भारताच्या दृष्टीने खरंच काही महत्त्व आहे का? मी अर्थातच अफगाणिस्तान, पाकिस्तान, तालिबान, भारताचं परराष्ट्रीय धोरण या विषयांची अभ्यासक नाही. पण योगायोगाने गेले साडेतीन महिने काबूलमध्ये राहण्याची, इतर चार प्रांतांना भेटी देण्याची आणि अनेक स्थानिक स्त्री-पुरुषांशी, शासकीय अधिका-यांशी बोलण्याची संधी मला मिळाली. अफगाणिस्तानविषयक चर्चेत वास्तवाधारित भर घालण्याचा हा एक प्रयत्न. ***** “इंदी?” माझी कुणाशीही ओळख करून दिली की पहिला प्रश्न हा असणार याची मला अफगाणिस्तानमधल्या साडेतीन महिन्यांच्या वास्तव्यात सवय होऊन गेली होती. काबूल, मोहम्मद राकी (कापिसा), चरिकार (परवान), समंगन (आयबॅक), जोझजान, मझार ए शरीफ (बाल्ख) – शहर कोणतंही असो, प्रांत कोणताही असो, समोरची व्यक्ती शासकीय अधिकारी असो की सामान्य व्यक्ती असो हा प्रश्न येणारच. इंदी म्हणजे हिंदी – म्हणजे हिंदुस्तानी. मी होकार दिला की मग भारत-अफगाणिस्तान मैत्रीवर समोरची व्यक्ती हमखास बोलायचीच. आणि संवादाची अखेर “२०१४ मध्ये सगळे परत गेले तरी भारत मात्र आमच्या मदतीस राहील याची आम्हाला खात्री आहे,” असा आशावादही व्यक्त व्हायचा. या देशात मी जितक्या स्त्री-पुरुषांशी बोलले, त्यातले पन्नास साठ टक्के लोक उर्दू बोलू शकतात. यातले अनेकजण भारतात किमान एकदा तरी येऊन गेले आहेत आणि बाकीच्यांचं ‘एकदा तरी भारतात जायचं’ हे स्वप्न आहे. इथले लोक प्रामुख्याने व्यापार, औषधोपचार आणि शिक्षण या तीन गोष्टींसाठी भारतात येतात. एका स्त्रीने मला “आम्ही हनिमूनसाठी दिल्लीत गेलो होतो” असं अगदी आनंदाने सांगितलं. भारतात यायचं म्हणजे दिल्लीत असं नाही. पुणे शहरात दोन हजार अफगाण विद्यार्थी शिकतात – असं मला पुण्यात शिकून आलेल्या आणि सध्या चरिकार इथं एका एनजीओत काम करणा-या ‘सईद अब्दुल वहाब हशिमी’ असं लांबलचक नाव असणा-या तरुणाने सांगितलं. काहीजण पंजाब, असम अशा राज्यांतही शिकत आहेत. अनेक सरकारी अधिकारी विविध परिषदा, बैठका, प्रशिक्षण यासाठी भारतात जात असतात. दिल्लीतल्या प्रगती मैदानात आणि मुंबईत गोरेगाव परिसरात भरणा-या प्रदर्शनात इथल्या अनेक स्त्रिया आपली उत्पादनं विकतात. भारत त्यांच्यासाठी एक स्वप्न आहे, उद्या आपल्याला आपल्या देशात इतक्याच मुक्तपणे वावरता येईल अशी त्यांना आशा आहे. “भारतात आम्हाला फार चांगली वागणूक मिळाली’ असं सगळे लोक आवर्जून सांगतात. अर्थात इथल्या संदर्भात चांगली वागणूक म्हणजे पोलिसांनी न हटकणं, मोकळेपणाने प्रवास करता येणं, चित्रपट पाहता येणं, स्त्रियांना ‘चादर’ (चाचामधला चा) न घेता वावरता येणं – इत्यादी. गेल्या दहा वर्षांत भारताने या देशात अब्जावधी रुपयांची मदत दिली आहे. रस्तेबांधणी, विद्युतनिर्मिती, शिक्षण , वैद्यकीय सेवा – अशा अनेक क्षेत्रांत भारत सरकार मदत देते आहे. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भारतीय लोक काम करत आहेत. पण सामान्य अफगाण माणसाला या मदतीची माहिती असतेच अशातला भाग नाही. भारताचा दुसरा “अनियोजित” कार्यक्रम तिथं जोरात चालू आहे. तो म्हणजे हिंदी चित्रपट आणि हिंदी मालिका. एफएम रेडिओ स्टेशनवर हिंदी गाणी चालू असतात. अनेक लोकांच्या मोबाईल रिंगटोन हिंदी गाण्यांच्या आहेत. आमच्या चालकाने एकदा काबूल शहरात दोन किलोमीटरचा वळसा घालून मला ‘अमिताभ बच्चन यहा आया था शुटिंग के लिये’ असं म्हणत ती जागा दाखवली आणि मी तो चित्रपट (बहुतेक ‘खुदा गवाह’) पाहिलेला नाही हे कळल्यावर करूण नजरेने माझ्याकडे पाहिलं होतं. इथं चित्रपटगृह आहेत – पण स्त्रिया अर्थातच तिथं जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत. त्याची कसर त्या टीव्हीवरचे चित्रपट आणि मालिका पाहून भरून काढतात. ‘बालिकाबधू’ वगैरे मालिकांबद्दल स्त्रिया भरपूर बोलतात. दोन संवेदनशील मुद्द्यांवर कुणाशीही बोलायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण थोडी ओळख झाली की हे दोन मुद्दे लोक आपणहून बोलायचे. हे दोन मुद्दे लोकांच्या विचारविश्वात तरी एकेमेकांचा अटळ हिस्सा आहेत – तालिबान आणि पाकिस्तान. पाकिस्तान-अफगाण नातं गुंतागुंतीचं आहे. तालिबान राजवटीत अनेकांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतरण केलं होतं. भारतात यायचं तर विमानाने यावं लागतं – तो खर्च सगळ्यांनाचं परवडत नाही. पाकिस्तानमध्ये रस्त्याने जाता येतं. पाकिस्तानमधून कच्चा माल आणि तयार वस्तू आणण्याचं प्रमाण खूप मोठं आहे. आज अफगाणमध्ये इंग्रजी भाषा बोलणारे तीस ते चाळीस वयोगटातले अनेक स्त्री पुरुष आहेत (यांना आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये मोठ्या पगाराच्या नोक-या आहेत) आणि त्यातल्या बहुसंख्य लोकांच शिक्षण पाकिस्तानमध्ये झालं आहे. धार्मिक अफगाण लोकांना भारताबद्दल कितीही प्रेम असलं तरी भारतात जास्त संख्या आहे ती हिंदू लोकांची. आणि हिंदू म्हणजे काफिर. त्याउलट पाकिस्तान म्हणजे मुस्लीमबहुल देश – त्यामुळे तो जवळचा. भारताप्रमाणे पाकिस्तानमध्येही मोठ्या संख्येने अफगाण लोक आहेत. ब्रिटीशांनी लादलेल्या ड्युरंड सीमारेषेमुळे पश्तून समाज अफगाण आणि पाकिस्तानमध्ये विभागाला गेला आहे. अफगाणिस्तानने ही सीमारेषा कधीच मान्य केलेली नाही. एप्रिल महिन्यात पाकिस्तान काही ठिकाणी अफगाण सीमारेषेवर इमारती बांधल्या; त्याच काळात पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या. या काळात पाकिस्तानच्या विरोधात अनेक प्रांतांत मोठी निदर्शने झाली. लोकसहभागातून झालेली निदर्शनं शांततामय होती. भूतकाळाबद्दल चर्चा नाही केली तरी सगळी चर्चा २०१४ पर्यंत येऊन ठेपायाची. ‘२०१४’ हा अफगाणिस्तानमधला सध्याचा कळीचा मुद्दा आहे. एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्राध्यक्ष निवडणूक आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी दोन टर्म्स पूर्ण केल्या असल्याने घटनेनुसार तिसरी निवडणूक लढवू शकत नाहीत. सर्वसंमतीचा उमेदवार ठरण्याची शक्यता अजिबात नाही, त्यामुळे निवडणूक अपरिहार्य आहे. त्याला जोडून प्रोविन्शियल कौन्सिलच्याही निवडणुका आहेत. ३४ प्रांत आहेत – तिथले उमेदवार ठरणं, निवडणुकांचा प्रचार आणि नि:पक्षपाती निवडणुका – हे सारेच असे मुद्दे आहेत की जिथं एरवीही शांततेचा भंग होतो. हा तर मुळातच अशांत प्रदेश. थोडीथोडकी नाही तर काही अपवाद वगळता सुमारे दोनशे वर्ष अशांत असणारा प्रदेश. त्यामुळे या संधीचा कोण गैरवापर करेल का हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच. दुसरं म्हणजे या निवडणुकीच्या आधी सगळं विदेशी सैन्य (इंटरनॅशनल सिक्युरिटी असिस्टन्स फोर्स – आयएसएएफ) अफगाण भूमीवरून माघारी घेतलं जाईल असा सर्वानुमते बॉनमध्ये २०११ साली करार झाला आहे. २००१ पासून आयएसएएफ इथं आहे, २००३ पासून त्याची जबाबदारी ‘नाटो’कडे आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांचेही सैन्य आयएसएएफमध्ये नाही असे दिसते. या ‘ट्रान्झीशन’ची सुरुवात आधीच, २०१० पासून झाली आहे आणि टप्याटप्प्याने प्रांतातून पद्धतशीर सैन्य माघारी घेतली जात आहे. मार्च २०१४ च्या अखेरीस अफगाणच्या संरक्षणाची जबाबदारी पूर्णत: ‘अफगाण नॅशनल सिक्युरीटी फोर्सेस’ (एएनएसएफ) आणि त्याचाच भाग असलेली ‘अफगाण नॅशनल आर्मी’ (एएनए) यांच्याकडे येईल. नाटो सैन्याने आत्ताही ‘फक्त आवश्यकता भासल्यास प्रत्यक्ष मदत’ आणि ‘प्रशिक्षण’ या दोन भूमिका घेतल्या आहेत – ज्या सर्वानुमते ठरल्या आहेत. एएनए अफगाण सिक्युरिटी फोर्सेसचा एक भाग म्हणून २००२ मध्ये तयार करण्यात आली. सीमेचं रक्षण करणं, दहशतवादाशी मुकाबला करणं, बेकायदेशीर गटांचा नायनाट करणं आणि अफगाण पोलिसांच्या मदतीने अंतर्गत सुरक्षा अबाधित राखणं या एएनएच्या चार मुख्य जबाबद-या आहेत. आज एएनएचे बळ दोन लाखापेक्षा जास्त आहे (अफगाणची लोकसंख्या सुमारे साडेतीन कोटी आहे!) – ज्यात ३८० स्त्रियाही आहेत. एनएकडे ९६ लढाऊ विमानं आहेत आणि हवाईदलाचे बळ सुमारे ७००० आहे. हवाईदलात २७ स्त्रिया आहेत असेही एक बातमी सांगते. यासोबत २०१० मध्ये ‘अफगाण लोकल पोलिस’ (एलपी)ची स्थापना करण्यात आली आहे. सुमारे दोन लक्ष प्रशिक्षित पोलिस आज काम करताहेत. पण अनेक ‘पोलिस’ प्रशिक्षण घेऊन कामावर रुजू झालेच नाहीत अशी संख्या बरीच मोठी आहे – त्यामुळे एएलपीच्या वाढीचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला आहे. अफगाण आर्मी आणि पोलिसांबद्दल विस्ताराने सांगायचं एक कारण आहे. अफगाणिस्तानमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत असतात. जून महिन्यात राष्ट्राध्यक्ष निवास, विमानतळ, सुप्रीम कोर्ट, एएनएसएफ चेकपोईंट अशा अतिमहत्त्वाच्या ठिकाणी आत्मघाती पथकांनी हल्ले केले. यातल्या प्रत्येक हल्ल्यात दहशतवादी मारले गेले आणि त्यामुळे अफगाण आर्मी आता सक्षम झाली आहे असा निष्कर्ष अनेकजण काढताना मी ऐकलं आणि वाचलं. असा निष्कर्ष काढणारे अधिकृत अधिकारी होते – शासनाचे, सैन्याचे हा योगाग्योग नाही. कारण सामान्य माणसाचं या हल्ल्यांबाबत वेगळं मत आहे. आणि इथं पाकिस्तान परत येतो. या दहशतवादी हल्ल्यांबाबत तीन मतं दिसून आली. एक मत – तालिबान सशक्त आहे. मुल्ला उमरने म्हटलंय की, “नाटो सैन्य परत गेलं की आठवडाभरात मी काबूलवर (आणि पर्यायाने देशावर) कब्जा करेन” , यावर अनेकांचा विश्वास बसला आहे. मलाही तशी शक्यता वाटते. काबूल शहरात सध्या इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्ले होतात हे पुरेसं बोलकं आहे. दहशतवादी मारले गेले – यात काही नवल नाही – ते मरायलाचं आलेले असतात जाणीवपूर्वक! ते जाता जाता इतक्या लोकांना मारू शकतात हे चिंताजनक आहे. दुसरं मत – जे विनोदी वाटतं ऐकताना – पण खूप लोक मांडतात – ते म्हणजे हे दहशतवादी हल्ले म्हणजे अमेरिकेचा डाव आहे. असे हल्ले होत राहिले की परकीय सैन्याच्या मदतीविना आपला निभाव लागणं कठीण आहे असं अफगाण सरकारला वाटायला लागेल आणि मग नाटोने माघारी जाऊ नये अशी अधिकृत विनंती होईल. राष्ट्राध्यक्ष निवासावर झालेल्या हल्ल्यात हल्लेखोर नाटोची बोगस ओळखपत्र घेऊन आले होते आणि त्यांच्या अंगावर नाटोचे गणवेश होते – यावरून लोकांनी बहुधा असा निष्कर्ष काढला असावा. हे मत इतक्या मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळालं मला की तसा काही पुरावा माझ्यासमोर नसतानाही माझा त्यावर विश्वास बसायला लागला होता. अमेरिकेवर अफगाण लोकांचा किती राग आणि किती अविश्वास आहे हे यातून स्पष्ट दिसतं. नाटोच्या अनेक हल्ल्यात सामान्य निरपराध नागरिक मारले जातात आणि तरी आपण काही करू शकत नाही – ही अफगाण लोकांची हतबलता आहे आज – ती कधी हिंसेत बदलेल ते सांगता येत नाही. तिसरं मत आहे पाकिस्तानच्या सहभागाचं. तालिबान दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये आश्रयच नाही तर प्रशिक्षण आणि इतर सोयी मिळतात असं अनेक अफगाण लोक छातीवर हात ठेवून सांगतात. ‘आमच्या देशात शांती झाली तर त्यांना काय काम उरणार’ असं उद्वेगाने म्हणतात. पाकिस्तान इस्लाम म्हणून आपला, पाकिस्ताननं आपल्याला निवारा दिला म्हणून आपला – पण तोच पाकिस्तान आपल्या देशात दुफळी माजवतोय म्हणून त्यांचा राग – अशी मिश्र भावना पाकिस्तानबद्दल वारंवार आढळते. ‘या पाकिस्तानचं नेमकं करायचं काय’ असा प्रश्न सामान्य माणसाला पडलेला दिसतो. या पार्श्वभूमीवर अफगाण आर्मीबद्दल असलेला विदेशी लोकांचा विश्वास मला अनाठायी वाटतो. एकदा एका मंत्रालयात माझी गाडी यायला उशीर झाला तेव्हा नाईलाजाने मला अफगाण पोलिसांबरोबर तासभर काढावा लागला. रमदानमुळे शासकीय कार्यालयं अर्धा दिवस काम करतात – जवळजवळ सगळे कर्मचारी गेले होते निघून. इथं रस्त्यावर एकटीने फिरणं अशक्य आहे आणि टॅक्सीने जाणं तर आणखी अवघड. अपहरण आणि खंडणी हा इथला एक मोठा व्यवसाय आहे. तर मोडक्यातोडक्या हिंदीत आम्ही गप्पा मारत होतो – मुख्यत्वे हिंदी सिनेमा हा विषय. तेवढ्यात मंत्रालयात आतून एक माणूस आला – तो स्टाफ असावा त्यांचा. मी तिथं बसलेली पाहून प्राथमिक चौकशीनंतर त्याने मला एकदम दरी भाषेत विचारलं, “पण तुमचं सरकार तालिबानला पाठिंबा का देत नाही, दिला पाहिजे’. मी अवाक् झाले आणि “दरी नाही” असं म्हणत गप्प बसले. ते अफगाण पोलिसही तितकेच उत्सुक होते तालिबानविषयी चर्चा करायला – त्याची खरं सांगायची तर मला भीती वाटली. अफगाण पोलिस किंवा आर्मीच काय इतर कितीतरी लोक तालिबानचे पाठीराखे आहेत असं दिसतं. काही भीतीने बोलत नाहीत तालिबान विरोधात – २०१४ मध्ये ते परत आले तर काय घ्या – असा विचार लोक करतात; पण अनेकांना मनातून तालिबानने फार काही चुकीचे केले असं वाटत नाही. एकदा एक शिकलेला, इंग्रजी बोलणारा, सरकारी अधिकारी असणारा पन्नाशीचा पुरुष मला म्हणाला, “स्त्रियांनी बुरखा वापरायचा आणि पुरुषांनी दाढी वाढवायची एवढे दोन त्रास सोडले तर तालिबान राजवट काही वाईट नव्हती”. हे मत कितपत प्रातिनिधिक आहे हे मला नाही सांगता येणार. पण काबूल शहरात हे मत ‘एक’ असेल तर देशाच्या अन्य भागात असं मत असणारे लोक संख्येने नक्कीच जास्त असणार! भारत-अफगाण संबध आज चांगले आहेत – शासकीय पातळीवर आणि लोकांच्या मनातही. ते असेच चांगले राहणं पाकिस्तानच्या योजनेत बसत नाही. त्यामुळे ३ ऑगस्टला जलालाबाद इथल्या भारतीय दूतावासावर झालेला हल्ला काळजी वाढवणारा आहे. भारतीय राजदूत अमर सिन्हा यांच्या हत्येची सुपारी दिली गेल्याची बातमी वाचनात आली. त्यानंतर भारतीय राजदूतांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पण धोका आहेच. एकदा भारतीय लोकाना इथं ‘असुरक्षित’ केलं की भारताची अफगाणमधली आर्थिक गुंतवणूक आपोआप कमी होईल आणि मग अफगाण-भारत भावनिक नातं, आपुलकी पण कमी होईल असा प्रयत्न आहे. पुढच्या काळात भारतीय लोकांना ‘टार्गेट’ केलं जाईल अफगाणिस्तानमध्ये – अशी शक्यता आहे. मुळात “ज्यांनी सोमनाथ लुटलं आणि ज्यांनी कंदहारला विमान पळवून नेलं अशा अफगाणला आपण मदत करायची गरजच काय” असा प्रश्न अनेक भारतीयांना पडतो; अनेकांनी मी अफगाणिस्तानमध्ये काम करायला गेले तेव्हा नाराजी व्यक्त करत हे वाक्य मला ऐकवलेलं आहे. इतिहासाचा बदला घेता येत नाही असं माझं मत आहे. पूर्वी घडलेल्या गोष्टींचा हिशोब आज आपण अफगणिस्तानबरोबर चुकता करण्याची भाषा वापरत असू – तर ती एक घोडचूक ठरेल. अफगाणिस्तान आज जात्यात असेल तर आपण सुपात आहोत. लोकनियुक्त सरकार येणार, यादवी युद्ध होणार आणि तालिबान राजवट परत येणार अशा तीन शक्यता आहेत २०१४ मध्ये. या तीनही शक्यता सध्या तरी तितक्याच प्रबळ आहेत. २०१४ नंतर अफगाणमध्ये यादवी युद्ध झालं किंवा तालिबान परत आले तर ते दोन्हीही आपली डोकेदुखी वाढवणारं ठरेल. अफगाण शांत असणं, तिथे लोकशाही शासनप्रणाली असणं, अफगाणची आर्थिक स्थिती स्थिर असणं, अफगाणमध्ये धार्मिक उन्मादाचं वातावरण नसणं, अफगाणमध्ये चांगले रस्ते, शिक्षण आणि आरोग्यसेवा असणं – यासाठी खूप वाटचाल करावी लागणार आहे अजून. त्यासाठी आपली मदत लागेल त्यांना. असा ‘स्थिर’ अफगाणिस्तान केवळ अफगाण लोकांच्याच नाही तर भारताच्याही हिताचा आहे. झळ सोसूनही आपण अफगाणिस्तानला मदत केली पाहिजे. नाहीतर आज कंदाहार, गझनी, घोर.... या ठिकाणी जे घडतंय, ज्या अराजकाची तिथं शक्यता आहे – त्यापासून आपण काही फार दूर नाही. उद्याचा अफगाण आपल्याला आपण परवा कुठं असू त्या शक्यता सांगतो आहे. अफगाण लांब नाही – तो अनेक अर्थानी जवळ आहे आपल्या. *** अन्यत्र पूर्वप्रकाशित
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अफगाणिस्तानला जाणे अजिबात कठिन नाही, पण जाउन राहणे ? सोल्लीड डेरिंग पायजे बॉस..... सलाम तो बन्ताईच हय.... मग कोणी काहीही म्हणो. आई आपल्या चरणावर माझे डोके ठेव्ल्याची स्मायली इथे कल्पावी!

अफगाणिस्तानला प्रत्यक्ष वास्तव्य करून आलेल्या व्यक्तिचे प्रत्यक्ष अनुभव मराठीत प्रथमच वाचायला मिळाले. लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे. अवांतर - यापूर्वी परदेशांत राहणार्‍या अफगाणी लोकांचे अनुभव निनादच्या लेखनातून वाचायला मिळाले. अफगाण लोकांना भारताबद्दल वाटणारी आत्मियता त्यातही दिसून आली होतीच.

अफगाणिस्तानातली ground reality मांडल्याबद्दल धन्यवाद! जवळजवळ सर्वच मुद्दे पटले. "इतिहासाचा बदला" घेण्याची वृत्ती ठेवणं म्हणजे घोडचूकच ठरेल. मुळात “ज्यांनी सोमनाथ लुटलं" ते आणि "ज्यांनी कंदहारला विमान पळवून नेलं" ती अफगाणी लोकं इतिहासातल्या वेगवेगळ्या कालखंडातले प्रतिनिधी होते, ते सध्याच्या सर्वच अफगाणी लोकांचे प्रतिनिधी असावेत असं समजणं हे चुकीचं ठरेल असं वाटतं. पाकिस्तानातील निवडणूकांच्या आधी "स्थिर पाकिस्तान भारताच्या हिताचा" असं मत मांडणारे बरेच होते, तेच विवेकी भारतीय 'स्थिर अफगाणिस्तान(ही) भारताच्या हिताचा" हे मान्यच करतील. (फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही स्थिर असण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे too good to be true अशी अवस्था आहे!)

लेख आवडला. अफगाणिस्तानात इन जनरल देशभावनेचा पोत कसा आहे ? एक इन्स्टिट्युट म्हणुन देशाकडे बघतात का ते लोक? प्रच्छन्न का होइना पण कम्युनिस्ट विचारसरणी बघायला मिळते का थोडीतरी? कल्याणकरी राज्याच्या त्यांच्या काय कल्पना आहेत? तिथे बँकींग आणि इतर ट्रॅडीशनल आर्थीक संस्था किती मॅच्युअर्ड आहेत?

लेख प्रचंड आवडला. तुमच्या कार्याची कक्षा अटकेपार गेलेली आहे हे पाहून साश्चर्य अभिमान वाटला. अफगाणिस्तानात गेलेल्या मराठी व्यक्तीचे विचार पहिल्यांदाच पाहतो आहे. स्थिर अफगाणिस्तान भारताच्या हिताचा आहे हे मौर्यकाळापासून असलेलं समीकरण आहे. गांधार देशात गडबड झाली की मध्यदेशातही ती गडबड फैलावायला वेळ लागायचा नाही. तस्मात गांधार देशास मदत करणे हा भारताचा स्वार्थ आहेच. पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर तर ही गरज अजूनच वाढली आहे. तालिबान्यांनी हत्या केलेल्या सुस्मिता बॅनर्जी यांचं बंगाली आत्मचरित्र सध्या वाचतोय त्यातून बरीच माहिती कळतेय. ते सगळं तुम्ही अनुभवलं असल्याने लिहाल असं वाटलं. पण लेखाचा फोकस वेगळा आहे असं जाणवतंय तस्मात दुसर्‍या एखाद्या लेखात हे सगळं कव्हर करावं अशी नम्र विनंती आहे. तिकडे तुम्ही कुणाकुणाला भेटला, काय अनुभव आले, आधीच काफिर आणि त्यात स्त्री म्हणून काही त्रास झाला का, खाणं कसं, इ.इ. शिवाय जालावर १९३०-४० सालच्या काबूल युनवर्शिटीचे काही फटू दिसतात. तेव्हाच्या अफगाण युवती मिनिस्कर्टात पाहून प्रचंड धक्का बसलेला अजून आठवतोय. लोकांना याबद्दल काय वाटतं? आधीच्या तुलनेत नंतरचं कसं इ.इ.? पाकिस्तानात अनागोंदी असली तरी तिथले इंटुक लोक संख्येने कमी असूनही शर्थीने किल्ला लढवतात. अफगाण इंटुक कोणी सापडले की नाही? (इंटुक शब्द त्याच्या तिरस्कारयुक्त अर्थच्छटेविना वापरला आहे.) जाता जाता आमची अफगाण आठवण सांगतो. देश वलांडून कधी गेलो नै पण काही गांधारदेशीय अस्मादिकांच्या कॉलेजात होते. टिपिकल पठाणाची प्रतिमा असते त्याला अगदी विपरीत, माझ्यापेक्षाही बुटके अन दुर्बळ वाटावेत असे होते. तर त्यांच्या रूमवर एकदा गेलो की जमल्यास 'दारी' शिकवा म्हणून. गप्पा सुरू झाल्या. इतक्यात एक श्रीलंकन तिकडे आला. तोही मुस्लिमच होता. त्याच्याशी ओळख करून देताना एक अफगाण म्हणतो कसा, "हाय, धिस इस बॅटमॅन, अवर मुस्लिम ब्रदर फ्रॉम इंडिया." मला असा शॉक बसला, मी लगेच क्लॅरिफाय केले की बाबारे मी हिंदू आहे म्हणून =)) तेव्हा दाढी वाढवली होती किमान दीड आठवडाभर तस्मात लगेच मलाही म्लेंछ समजला तो =)) मग तो विषय तेवढ्यावरच थांबला. लोक चांगले होते एकूण, पण या प्रकाराने चांगलीच करमणूक झाली.

अत्यंत साध्यासोप्या शब्दात अफगाणिस्तानातलं लोकमताचे पैलू मांडलेले आहेत. तालिबान सारख्या चळवळीची जगात असलेली प्रतिमा आणि प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्या माणसांच्या मनात असलेली प्रतिमा यात किती प्रचंड तफावत आहे हे दिसून आलं. सामान्यपणे मीडियामध्ये तालिबानची बलस्थानं काय आहेत असा गंभीर विचार करण्यापेक्षा तालिबानच्या कृष्णकृत्यांवरच भर दिला जातो. जनतेला तालिबानविषयी नक्की काय आकर्षण आहे? अशी काय राजकीय-सामाजिक परिस्थिती होती जीत तालिबानची राजवटही 'चांगली' वाटावी?

मी वाचले आहे त्यावरून हे थोडे बिरबलाच्या रेघेसारखे असावे. जरी धार्मिक राजवट आली, जरी कडक निर्बंध आले तरी त्या आधी असलेली टोळीयुद्धे व अस्थिरता कमी झाली म्हणून. केवळ तुलनेने.

आणि तुम्हि फक्त काबूलमधेच नाहि तर ईतर प्रांतातपण राहून आलात! सुंदर लेख आहे हा. खरं म्हणजे तिथलं खाणं-पिणं (हॉटेल्स, फळं-भाज्या?), रिक्षा/टॅक्सी काहि मिळायचं का, हवामान, साधारण परीसर (मॉल्स होते का? वाण्याची दुकानं? रस्ते/स्टेशनं कशी वाटली?), एकटीने फिरलात का? अफगाणी अधिकारी बरोबर नसताना तिथल्या नागरीकांशी बोलायची संधी मिळाली का? वगैरे खूप प्रश्नांबद्दल उत्सुकता आहे. होपफुली तुम्हि त्यावर पण अजून लिहाल. अशा सुंदरशा लेखमालिकेची हि सुरूवात आहे असं समजतो!

वरील प्रतिक्रिया वाचल्यावर लेखात फटू नाहीयेत हे लक्षात आले. शक्य असल्यास प्रतिक्रियांमध्ये अथवा या विषयावरील पुढच्या लेखामध्ये तुम्ही काढलेले अफगाणिस्तानचे फटू टाकावेत.

लेख आवडला. अनुभव-विचार देखील आवडले. जर एनजीओ / नॉन प्रॉफिट कडून जाणे झाले असले आणि प्रत्यक्ष कामाचे अनुभव देखील सांगता येणे शक्य असले (confidential नसले) तर ते येथे अवश्य सांगावेत. वास्तवीक "काबूलीवाला" आणि "पठाण" यांचा अगदी महाराष्ट्राशी संबंध देखील अनेक पिढ्यांचा आहे. मी कधी कधी येथे (अमेरिकेत) गोर्‍यांना अफगाणांबद्दल सांगताना कौरवांच्या अर्ध्या जीन्स अफगाणि होत्या इथपासून ते पानीपतापर्यंत सगळ्याची आठवण करून देतो. :) माझी एक वैयक्तीक आठवणः अमेरीकेत एकदा टॅक्सीतून जात असताना टॅक्सीड्रायव्हर ऐसपैस (इंग्रजीत) गप्पा मारायला लागला. मी कुठला, काय करतो वगैरे सगळे चालले होते. त्याच्या प्रश्नांवरून तो बहुतेक पाकीस्तानी अथवा उत्तरे कडील भारतीय असेल असे वाटले. नाव अहमद का असे काहीसे असल्याचे मागे लावलेल्या आयडीवरून लक्षात आले. म्हणून बिचकत विचारले की "बाबारे तू कुठला? पाकीस्तानातला का?" तो तात्काळ (अक्षरशः) गरजला: "नाही नाही, मी तुझा मित्र आहे, मी अफगाण आहे, पाकीस्तानी नाही!" :-) पूर्वी घडलेल्या गोष्टींचा हिशोब आज आपण अफगणिस्तानबरोबर चुकता करण्याची भाषा वापरत असू – तर ती एक घोडचूक ठरेल. १००% सहमत. गेल्या १० वर्षात जी काही मदत भारताने केली आहे ते योग्यच आहे. पण या संदर्भात मी कधी अफगाणांच्या विरोधात कुठल्याच विचारसरणीचे भारतीय असलेले ऐकलेले नाही, त्यामुळे मला व्यक्तीगत ती काळजी वाटत नाही. तसे विरोधात असते तर भारतात जिथे जिथे अफगाण विद्यार्थी आहेत तिथे कुठेही त्यांना त्रास झाल्याचे दिसले असते आणि अफगाण जनतेच्या बोलण्यावागण्यातून देखील दिसले असते. किंबहूना मला वाटते तसा अनुभव कुठल्याच बाहेरच्या देशातील मुस्लीम व्यक्ती - विद्यार्थ्यांना भारतात येतो असे वाटत नाही. अर्थात हा वेगळा मुद्दा आहे. विषयांतर वाटले असल्यास क्षमस्व...

प्रत्यक्ष अफगाणिस्तानात मिळालेला अनुभव म्हणजे अफलातूनच! अफगाणिस्तानचे भारताशी संबंध चांगले आहेत. तसे काही पाकिस्तानी लोकांनाही भारताचे कौतुक असते. पण अफगाणी लोकांना असणारे भारताविषयीचे प्रेम जरा जास्त आहे असा माझाही आजवरचा अनुभव आहे. तथापि तालिबानी राजवटीविषयी अफगाणी लोकांना पुन्हा प्रेम वाटू लागले असेल तर ते आपल्याला (भारताला, बिगर मुस्लिम लोकांना) घातकच आहे. तालिबान हे वहाबी मुस्लिम पंथाचे पुरस्कर्ते आहेत. रानटी, आदिम, असहिष्णू, कालबाह्य अशा इस्लामवर आधारित समाज त्यांना निर्माण करायचा आहे. ज्या निर्दयपणे त्यांनी बुद्धाचे प्रचंड पुतळे तोफा मारुन नष्ट केले त्यावरुन त्यांना दुसरा कुठलाही धर्म सहन होत नाही हे दिसते. जिथे स्त्रियांना शिक्षण देणे हा गुन्हा समजला जाऊ शकतो, स्त्रीला बुरखा घातला नाही म्हणून दंडुके हाणले जातात तिथे बिगरमुस्लिमांचे काय होत असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. अमेरिका गेल्यावर पुन्हा अशी तालिबानी सुरू होणार असेल तर अरबी पैसा पुन्हा तिथे वळणार आणि त्या पैशावर नवे अतिरेकी निर्माण होऊन काशंमीरमार्गे ते भारतात घुसणार असे दुष्टचक्र पुन्हा सुरु होईलसे दिसते आहे. कठिण आहे! भारतात जसे भ्रष्टाचाराला, बजबजपुरीला, घराणेशाहीला, गैरशिस्तीला कंटाळलेला सामान्य नागरिक "ह्याच्यापेक्षा मिलिटरी राजवट आणून एकेकाच्या **वर हंटर हाणले पाहिजेत" इत्यादि संवाद म्हणून जातो तसे अफगाणी लोक तालिबानबद्दल बोलत असतील अशी एक आशा.

>>>“ज्यांनी सोमनाथ लुटलं आणि ज्यांनी कंदहारला विमान पळवून नेलं अशा अफगाणला आपण मदत करायची गरजच काय” अफगाण हा संदर्भ फार कमी वेळा ऐकण्यात आला आहे. अफगाणाइवजी मुस्लिम असा शब्द अनेक वेळा ऐकला आहे. आणि हे बहुतांशी पाकिस्तान, बांगलादेशी लोकांच्या संदर्भात चर्चेत व्यक्त होत असते. अनेक लोकांना कंदहार हे अफगाणमधे असल्याचे ठाउ़कच नसते. माहित असते ते इतकेच कि एक मुस्लिम राज्यकर्ता येऊन आक्रमण करुन सोमनाथ लुटून गेला. इत्यादी. लेख आवडला. अमेरीकन सैन्य, माणसं आणि मनोवृत्ती ज्या ज्या भुभागातुन काढता पाय घेईल तो भुभाग एक ना एक दिवस नक्कीच समृद्ध आणि स्थ्रिर बनेल. पण जोवर ते होत नाही तोवर उत्तर अमेरीका सोडून उर्वरीत पृथ्वीवर महागाई, जुलूम, युद्ध आणि रक्तपात यांचा अनिर्बंध वावर होत रहाणार हे निश्चित. मग तो अफगाण असो की भारत किंवा आफ्रिकेतील एखादा देश.

मस्त! आखोदेखां हाल अतिशय आवडला. नुसता आवडलाच नाही तर आमच्यासारख्या अशा विषयात प्रचंड रस असणार्‍यांनी निव्वळ बातम्यांवरून लावलेले अंदाज किती खरे? किती हवेतले? याचाही ठोकताळा बांधण्यासाठी असे लेख उपयुक्त आणि महत्त्वपूर्णही असतात. अनेक आभार!

अतिशय सुरेख लिहिलं आहे. मी खरं तर तुम्हांला सुचवणार होते की लिहा ह्या विषयावर, त्या अगोदरच तुमचा लेख आला हे बघून आनंद झाला! :) अजूनही लिहा. तुमच्या नजरेतली अफगाणी सामान्य व्यक्ती कशी आहे, त्यांच्या समाजजीवनाचा पोत - ह्याबद्दल अजून लिहाल? अफगाणी स्त्रियांबद्दलही. पुन्हा एकदा शुकरान :)

फारच सुंदर लेख ! प्रत्यक्ष तीन-चार महिने तेथे राहून लिहिलेला लेख म्हणून (आणि अगोदरपासून तुमच्या वैचारिक समतोल लेखनाची ओळख पहिल्यापासून आहेच त्यामुळेही) मोठ्या उत्सुकतेने वाचला. लोकजीवनाचं आणि सद्यव्यवस्थेचं केलेलं विवेचन भावलं... सद्यपरिस्थितीच्या सीमा माहीत असल्याने संयमित पण माहितीपूर्ण लेखन केले आहे. जर अजून काही लिहिणे शक्य असल्यास वाचायला नक्कीच खूप आवडेल. अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत हे सयामिज ट्रिप्लेट आहे. त्यांत पाकिस्तानचे राजकीय-सैनिकी वातावरण, धोरणे आणि महत्त्वाकांक्षा पाहता पहिल्यापासून पाकिस्तानला अफगाणिस्तान आपले अंकित राष्ट्र असावे असेच वाटते आहे. त्याकरिता स्टेट स्पॉन्सर्ड टेरॉरिझमची नीती बाळगणे यात त्यांना काही वावगे वाटत नाही हे उघड सत्य आहे. इतकेच नाही तर राजकीय स्वार्थाकरिता (स्वतःवर अंतर्गत आतंकवादासारख्या अनेक समस्या ओढवून घेऊनही) अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांचा पाकिस्तानी मोठ्या खुबीने उपयोग करून राजकीय आणि आर्थिक फायदा करून घेण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानात मैत्रिपूर्ण संबंध स्थापित करून ते टिकवून ठेवणे हे भारतीय सरकारच्या प्रबळ इच्छाशक्ती, कुशल जागतिक राजकारणी डावपेच आणि त्यांच्या कणखर अंमलबजावणीखेरीज शक्य नाही. याबाबतीतला आतापर्यंतचा अनुभव फार आशादायक नाही. त्यांत अफगाणिस्तानातील सर्वसामान्य जनतेतील धार्मिक मतांचा प्रबळ प्रभाव आणि सद्याच्या अनुशासनातील कमतरता यांचा पाकिस्तान पुरेपूर फायदा उठावीत राहिले आहे आणि भविष्यातही तेच करेल यात काही शंका नाही. २०१४ मध्ये जागतिक संरक्षक फौजा निघून गेल्यावर केवळ अफगाणिस्तानचाच नाही तर भारताचा कस लागणार आहे. पाश्चिमात्य देशांकडून त्यांच्या अर्थ आणि सुरक्षा समीकरणात जेवढे महत्त्व भारताला त्यांपेक्षा जास्त अपेक्षा ठेवणे म्हणजे दिवास्वप्नच होईल. भारत सरकारकडे काहीतरी गुप्त योजना असावी आणि ती यशस्वी व्हावी असे स्वप्न पाहणेच आता हातात आहे !

हमीद करझाईंच्या मागच्या भेटी वेळी NDTV वर झालेल्या चर्चांमुळे या विषयातली उत्सुकता बरीच वाढली होती. तुमच्या लेखामुळे, बरीच सुंदर माहिती मिळाली. माझं वैयक्तिक मतानुसार भारताने अफगाणीस्तानला सर्वोतोपरी मदत करणे हे क्रमप्राप्तच आहे. अफगाणिस्तान जितका शांत असेल ते भारतच्या फायद्याचे म्हणता येईल. या गोष्टीची भारताला संपूर्ण जाणिव असल्याने भारताने सुमारे 2 अब्ज अमेरिकन $ची मदत अफगाणिस्तानला देण्याचे मान्य केले आहे. ही मदत आर्थिक, वैद्यकिय, संरक्षण या सर्व स्वरुपात दिली जातिये. भारताची अफगाणिस्तान मध्ये असलेली मोठी आर्थिक गुंतवणुक, म्हणजे भारताचे काबुलच्या पश्चिमेकडील असलेले हजिगाक (Hajigak) लोहाच्या खाणी आणि 218 किलोमीटर झारंज - देलाराम (Zaranj-Delaram) रोड, जो अफगाणिस्तानला इराणमधील बंदरांशी जोडतो. याच मार्गाने भारत अफगाणिस्तानला मदत पाठवतो (याचेही कारण पाकिस्तानच) अजुन एक महत्वचा मुद्दा म्हणजे, २०१७ पासून सुरु होणारी भारत - तुर्कमेनिस्तान गॅस परियोजना, जी अफ्गणिस्तान मधुन जाणार आहे. त्यासाठी देखिल अफगाणिस्तानात शांतता नांदणे आवश्यक आहे. ---राहुल---

आमच्या चालकाने एकदा काबूल शहरात दोन किलोमीटरचा वळसा घालून मला ‘अमिताभ बच्चन यहा आया था शुटिंग के लिये’ असं म्हणत ती जागा दाखवली आणि मी तो चित्रपट (बहुतेक ‘खुदा गवाह’) पाहिलेला नाही हे कळल्यावर करूण नजरेने माझ्याकडे पाहिलं होतं. खुदा गवाह हा चित्रपट काबुलच्या चित्रपट गॄहात जवळपास १० आठवडे हाउस फुल चालला होता. बाकी,अमेरिकन आणि इतर सैन्यानी तिथुन तळ हलवला तर पुन्हा तिथे तालिबानचीच राजवट येईल याची मला खात्री वाटते. ह्या अमेरिकन लोकांचे काही खरे नाही,मित्र-मित्र म्हणवुन कधी पाठीत खंजीर खुपसतील हे सांगता येत नाही आणि वेळेवेळी त्यांनी हे सिद्ध केले आहे. त्यांचे ब्रीद वाक्य : इन द इनरेस्ट ऑफ अमेरिका हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.त्यांचा इंटरेस्ट फुलफिल करण्यासाठी ते काहीही करु शकतात हे सुद्धा नेहमी डोक्यात ठेवले पाहिजे. ज्या तालिबानचा नायनाट करण्यासाठी अमेरिकेने अख्खा अफगाणिस्तान २००१ पासुन उधवस्त केला,बरं याच तालिबान मंडळींनी कतारची राजधानी दोहा मधे ऑफिस थाटले,कशासाठी ? तर अमेरिकेला त्यांच्याशी शांततेच्या आणि प्रेमाच्या गप्पा मारायची इच्छा झाली.तालिबानला नष्ट करु म्हणणारे ओबामा प्रशासन लगेच एका पायावर मांडवलीसाठी तयार झाले. संदर्भ :- US, Taliban to meet in Qatar for 'key milestone' toward ending Afghanistan war बरं हे सगळं बाहेर आल्यावर हमिद करझई खवळणार नाही तर काय ! ते खवळल्यावर अमेरिकेने परत नेहमी प्रमाणे सारवा सारव सुरु केली. संदर्भ :- Taliban office row puts talks with US on hold U.S. Scrambles to Save Taliban Talks After Afghan Backlash Taliban Political Office Raises Alarm Bells In Kabul आता तालिबान आणि पाकिस्तान या मेतकुटा बद्धल... तर यांच मेतकुट टिकुन आहे ते अफुच्या प्रचंड नफ्यावर आणि अफुच्या शेतीवर नियंत्रण आहे तालिबानचे.तालिबानचे आपण काही वाकडे करु शकत नाही,उलट तेच आपली चांगली पाचर मारत आहे हे अमेरिकेला चांगलेच समजलेले आहे. तसेही अमेरिकेला त्यांची टेक्नॉलॉजी टेस्ट करण्यासाठी,बॉम्ब टेस्ट करण्यासाठी इराक, अफगणिस्तान यांच्या सारखे देश टेस्ट फिल्ड म्हणुन आयतेच मिळतात्...मग काय वापरा आणि टेस्ट करा.आता त्यांच्या "इंटरेस्ट" संपला की अफगाणिस्ताला टाटा-बाय बाय करतीलच. अमेरिकेने म्हणे अफगाणिस्तानात {ज्या प्रमाणे इराक मधे वापरले त्याच प्रमाणे} क्लस्टर बॉम्ब आणि स्टीकी बॉम्ब चा मुक्त हस्ताने वापर केला.लादेनला शोधण्यासाठी केलेली तोराबोरा पर्वतरांगांची लढाई तर फारच प्रसिद्ध आहे.असे म्हंटले जाते की या लढाईत तर अमेरिकेने काही अणु बॉम्बचाही वापर केला. {याची सत्यता मला पूर्णपणे पडताळता आली नाही,तरी जालावरील काही संदर्भ खाली दिलेले आहेत.} काही संदर्भ :- Cluster munition Battle of Tora Bora US used Nukes on Iraq, Afghanistan’: Atomic bomb dropped on Tora Bora: Expert 'Sticky bombs,' like those used in Iraq, now appearing in Afghanistan NUKING TORA BORA {काही डिटेल्स आणि रिपोर्ट. हा दुवा पीडीएफचा आहे.} जाता जाता :- जगातल्या शांतता टिकवण्याचा मक्ता जणु आपल्याचकडे आहे अशा गमजा मारणारा अमेरिका नक्की कसा आहे ? न्युक्लिअर टेस्टिंगसाठी हे काय करु शकतात... हे जरासे जाणुच घ्यायचे असेल तर खालच्या दुव्यांवर टिचकी मारायला विसरु नका. Bikini Atoll Bikini Atoll {विकी दुवा}

अमेरिकेने म्हणे अफगाणिस्तानात {ज्या प्रमाणे इराक मधे वापरले त्याच प्रमाणे} क्लस्टर बॉम्ब आणि स्टीकी बॉम्ब चा मुक्त हस्ताने वापर केला. हे असे वाचावे :- अमेरिकेने म्हणे अफगाणिस्तानात {ज्या प्रमाणे इराक मधे वापरले त्याच प्रमाणे} क्लस्टर बॉम्ब आणि BLU-82 {Daisy Cutter }बॉम्ब चा मुक्त हस्ताने वापर केला.स्टिकी बॉम्बचा वापर तालिबान ने अमेरिकेच्या विरोधात केला.या बॉम्बसाठी लागणारे कच्चा माल अर्थाताच पाकिस्तान मधुन मिळवला.ते आधी हा बॉम्ब बनवण्यासाठी पाकिस्तान मधुन fertilizer आणायचे आता सध्या त्यांनी हा उध्योग बंद करुन potassium chlorate वापरायला सुरुवात केली आहे.

ज्यांनी सोमनाथ लुटलं
लेकरांना इतिहास तोच शिकवावा जो त्यांना देशाची सद्ध्य परिस्थिती एकजुटीने सुधरवायचे बळ देईल लियोलोड पोएट्श्च (अ‍ॅडॉल्फ हिटलर चा इतिहास शिक्षक) वरील आचार्यांच्या प्रमेया नुसार आपण आपल्या जनांस "सुभाषबाबुंना मदत करणा-या जिंदादिल अफगाणांची मदत आपण केलेची पाहीजे" असे शिकवावे!! (जे विचारतील त्यांना) अफगाणीस्तान चे काय होईल ते खरेच भारतासाठी भयानक महत्वाचे आहे, डीटेल संध्याकाळी टाकतो सविस्तर उत्तर ह्यावर, अतिशय मस्त लेख खुप खुप आवडला, सद्ध्या आजच्या वर्तमानपत्रां नुसार, अफगाणीस्तान ने अमेरीकेच्या विरोधाला न जुमानता ८८ कैदी सोडायचे ठरवले आहे (मानवीय दृष्टीकोनाने) परत बागरम एयरबेस वरुन पण अमेरीका अन अफगाणांची भांड्याला भांडी लागतातच आहेत. पुढे खुप काही होणार ह्याचाच तर हा ट्रेलर नसावा ?

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. केवळ अफगाण लोकांना भारतीयांबद्दल प्रेम वाटतं असं नाही, तर भारतीय माणसांनाही अफगाण लोकांबद्दल आस्था आहे - असं मी अफगाण लोकांना सांगत असे; त्याची प्रचिती देणारे प्रतिसाद आहेत. अनेक प्रतिसादकांनी माहितीत मोलाची भर घातली आहे, त्यांचेही आभार. काही प्रश्न, काही सूचना आल्या आहेत; त्याविषयी थोडंस. तत्पूर्वी हे लक्षात घ्यावं की माझा अफगाणिस्तानचा अनुभव अनेक अर्थांनी अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तर मला देता येणार नाहीत - ती मला माहिती नाहीत; तर काही गोष्टी गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेता सांगता येणार नाहीत. त्याबद्दल सर्वांनी क्षमा करावी . १. आदूबाळ, धगधगता अफगाणिस्तान ही अमेरिकेची - पर्यायाने नाटोची अपरिहार्य गरज आहे असं मत हल्ली बनत चाललेलं आहे... असं मी ज्यांच्याशी बोलले त्या अनेक अफगाण नागरिकांना वाटतं!! २. बर्फाळ लांडगा; हो, इतकं सोपं नाही त्या देशात जाणं - पण इतकं अवघडही नाही - मला एक डझनभर तरी भारतीय तिथं भेटले - आणि आणखी जास्त भारतीय तिथं असतीलही. ३. श्रीरंग जोशी, बॅटमॅन - अफगाणिस्तानवरचं हे पहिलंच मराठी लेखन नक्कीच नाही (कदाचित आंतरजालावरचंही नाही). श्रीमती प्रतिभा रानडे यांचं 'अफगाण डायरी' आणि श्री. निळू दामले यांचं 'अवघड अफगाणिस्तान' ही दोन्ही पुस्तकं जरुर वाचावीत अशी मी शिफारस करेन. ४. बहुगुणी, (फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही स्थिर असण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे too good to be true अशी अवस्था आहे!) हीच तर आपली काळजी आहे! ५. अर्धवटराव, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी या विषयावर अधिक काही लिहिलं तर त्यात नक्की देईन. - मला समजलंय ते सांगेन - ती 'उत्तरं' असतील का हे सांगता नाही येणार :-)

लेख खूप सुंदर झाला आहे. अतिशय आवडला. तिथे जाण्याची जोखीमयुक्त संधी तुम्ही स्वीकारलीत याचे कौतुक आणि अभिमान वाटला. पुढील लेखाची आणि त्यात तिथल्या सामाजिक वातावरणाविषयी लिहाल अशी अपेक्षा. या पूर्वी प्रतिभा रानडे (अफ्गान डायरी?) आणि फिरोझ रानडे यांच्या लेखांतून वीस-पंचवीस वर्षांपूर्वींच्या अफ्गानिस्तानची मराठीतून सुंदर ओळख झाली होती. या अत्यंत सुंदर लेखाला छोटेसे ठिगळ जोडीत आहे. सोविएत रशिया आणि अमेरिका या दोघांचा विस्तारवाद आणि परस्परांविषयी भय आणि अविश्वास यांच्या कात्रीत सापडून अफ्गानिस्तानची राखरांगोळी झाली. सोविएत रशियाने त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी अफ्गानिस्तानमध्ये प्रथम राजकीय हस्तक्षेप आणि मग सैन्यप्रवेश केला. त्यांना शह म्हणून अर्थात अमेरिकेने अफ्गान मुजाहिदांना शस्त्रे आणि रसद पुरवली. या मुजाहिदांतून पुढे तालिबानी घडले. सोविएत रशियाचे बाहुले सत्ताधारी बाब्रक करमाल किंवा नजिबुल्ल अहमद्जाइ वगैरे हे धर्माविषयी त्यातल्या त्यात तटस्थ होते. नजिबुल्लाने तर स्त्रियांनाही काही सवलती दिल्या होत्या. त्या काळात भारतात 'डावीकडे झुकणारा मध्यममार्ग' सत्तास्थानी होता. अर्थातच या बाहुल्यांना भारताची सहानुभूतीच नव्हे तर पाठिंबाही होता. त्या काळी अनेक अफ्गान मुत्सद्द्यांची आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची मुले भारतात शिकत असत. नजिबुल्ला यांचे काही शिक्षण कश्मीरातल्या बारामुल्ला येथे झाले होते. (पुढे फारुख अब्दुल्ला, पूर्णो संगमा आणि शरद पवार यांच्यातल्या मैत्रीमुळे पुणे हे कश्मीरी आणि पूर्वभारतीय विद्यार्थ्यांचे आवडते गंतव्यस्थान बनले.) हे सत्ताधारी आतून भारताला अनुकूल होते आणि या काळापासूनच भारतातून प्रत्यक्ष मदत अफ्गानिस्तानात जाऊ लागली. नंतर जेव्हा नजीबुल्ला यांना तालिबान्यांनी अनन्वित अत्याचारांनंतर सर्वांसमक्ष झाडाला टांगून मारले तेव्हा भारतातले अनेक लोक हळहळले. इस्पितळे, शाळा, सडकाबांधणीच्या लोकोपयोगी कामापासून सुरुवात करीत पुढे अफ्गानिस्तानात भारतीय वावर बराच वाढला. सोविएत सैन्य माघारी गेल्यावर तालिबान शिरजोर झाले आणि पाकिस्तानचे पारडे जड होऊन भारताचा प्रभाव थोडासा झाकोळला. तरी पण ऐतिहासिक आग्रा शिखरपरिषदेत "अफ्गानिस्तानशी आमचे रक्ताचे नाते आहे" असे जेव्हा मुशर्र्फ कंठरवाने सांगत होते तेव्हासुद्धा हे मदतकार्य कोणताही गाजावाजा न करता चालू होते. गेल्या वीसपंचवीस वर्षांचा आढावा घेता भारताचे अफ्गानविषयक धोरण सबूरीचे पण सूक्ष्म शिरकावाचे राहिले आहे आणि अतिशय मुत्सद्दीपणाने पडद्याआड ते राबवले जात आहे.

एकच प्रतिसाद फार मोठा होतोय म्हणून वेगवेगळ्या भागांत टाकतेय. ६. बॅटमॅन, तुम्ही काबूल विद्यापीठाच्या फोटोंचा उल्लेख केलाय ते खरंय. त्यामुळे मधल्या काळात अफगाण लोकांना काळ काही दशकं मागे गेल्यागत वाटतोय. स्त्रियांची परिस्थिती तर फार अवघड आहे. त्या अनुभवांबद्दल लिहायला हवं खरं अधिक सविस्तर. बघू कसं जमतंय ते! ७. राजेश घासकडवी, एक तर अगदी सर्वांना 'तालिबान' चांगलं वाटतं असं नाही म्हणता येणार. काही लोकांचा तालिबानला पाठिंबा आहे असं म्हणता येईल. बाकी खाली फारएन्ड यांनी म्हटल्याप्रमाणे ती काहीशी 'बिरबलाची रेघ' आहे - त्याला एक इतिहास आहे. ब्रिटिश-रशियाचा 'ग्रेट गेम', टोळीयुद्धं, रशियान आक्रमण, मुजाहिद्दीन अशा पार्श्वभूमीवर 'तालिबान' आले. पण तो एका स्वतंत्र लेखाचा (की लेखमालिकेचा?)विषय आहे. ८. मिसळपाव, तुम्ही विचारलेल्या मुद्द्यांबद्दल पुष्कळ काही सांगता येईल - मी अजून काही लिहिलं या विषयावर तर सांगेन तेही :-) ९. श्रीरंग जोशी, अफगाणिस्तान हे 'युद्धक्षेत्र' असल्याने फोटो काढायला अनेक ठिकाणी बंदी आहे तर अनेक ठिकाणी ते सुरक्षित नाही. तरीही मी काही फोटो काढलेत - नंतर शेअर करते. १०. विकास, तुमचा टॅक्सीवाल्याचा अनुभव माझ्या अनुभवाशी अगदी जुळणारा आहे. अफगाणं विद्यार्थ्यांना भारतीय वास्तव्याच्या अनुभवाबद्दल चांगलं बोलताना ऐकलं आहे नेहमीच. सुदैवाने अफगाणिस्तानला मदत करण्या ची दूरदृष्टी आणि शहाणपण ('विस्डम' या अर्थी) भारत सरकारने नेहमीच दाखवलं आहे.

धन्यवाद, स्त्रियांच्या आणि एकूणच परिस्थितीबद्दल जितके सविस्तरपणे लिहायला जमेल तितके लिहा-जितपत माहिती उघड करणे तुम्हाला योग्य वाटते तितपतच लिहा अर्थात हेवेसांनल. बाकी तुम्ही म्हणता ती पुस्तके आहेतच, पण ज्या लोकांशी माझी आंजापुरतीही का होईना थोडीशी ओळख आहे त्यांमध्ये असा अनुभव पहिल्यांदाच वाचलेला पाहिला. :)

यापूर्वी प्रतिभा रानडे यांची अफगाण डायरी वाचलेली होती. तीही आवडली होती. त्यानंतर दशके उलटल्यावरचा अफगाणिस्तान अजूनही जुन्याच काळात जगत राहणे आपल्याला परवडणारे नाही. प्रसंगी पदरमोड करून त्यांच्या राहणीमानात, साक्षरतेत, विचारसरणीत परिवर्तन घडवत राहण्याची संधी आपण गमावता कामा नये. त्याकरता येत्या निवडणुकीत भारतात सशक्त, क्रियाशील आणि प्रचंड जनाधार असलेले स्थिरपद सरकार स्थापित व्हावे हीच सदिच्छा! आपल्याला युद्धप्रवण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. आपण तिचा निर्भयपणे स्वीकार केलात आणि साहसी सफर करून सहिसलामत सुखरूप परत आलात. सोबत प्रत्यक्ष अनुभवाची शिदोरी आणलीत. तिचा यथार्थ अन्वय इथे सादर केलात. ह्याखातर मनःपूर्वक धन्यवाद. अफगाणिस्तानाबाबत वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक जनमत तयार करण्यात हा लेख मोलाची भूमिका बजावेल ह्या तिळमात्र संशय नाही!

११. हुप्प्या, 'तालिबान'बद्दल बाकीच्या जगात जी प्रतिमा आहे, त्याहून काहीसं वेगळ म्हणणं आहे काही अफगाण लोकांचं. मला भेटलेल्या काही लोकांच्या मते 'तालिबान वाईट नाही, तेही आमचेच आहेत. पण या ओसामा वगैरे मंडळींनी तालिबानचं (आणि आमचं) नुकसान केलंय." शिवाय अमेरिकेला टक्कर देण्याची शक्ती फक्त तालिबनजवळ आहे असं मानणारेही लोक आहेत. तालिबानला दूर ठेवण्यापेक्षा त्यांना प्रक्रियेत सामावून घेण्यावर काही लोक भर देतात. यावर स्वतंत्र चर्चा करावी इतका हा मोठा विषय आहे. १२. मारकुटे, सोमनाथ आणि कंदहार यांना 'इस्लाम'चा संदर्भ असतो जास्त, 'अफगाण' चा कमी हे बरोबर आहे - तो सर्वसाधारणपणे. पण मला याला अपवाद असणारे लोक भेटले - ज्यांचा अफगाणिस्तानच्या परिस्थितीचा अभ्यास आहे अशा काही लोकांची मतं आहेत ती! बाकी अमेरिकन सैन्याबाबत तुम्ही व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत आहे. १३. ऋषिकेश, तितकासा आँखोदेखा नाहीये हा, म्हणजे परिस्थितीमुळे मी लोकांमध्ये मिसळण्यावर अनंत मर्यादा होत्या ... पण अनुभवावर आधारलेला आहे हे नक्की! १४. यशोधरा, अफगाणी स्त्रियांबद्दल मी खूप काही शिकले ... पाहू कधी जमतंय लिहायला ते! १५. इस्पीकचा एक्का, अफगाणिस्तान-पाकिस्तान-भारत हे सयामिज ट्रिप्लेट आहे याच्याशी अगदी सहमत आहे मी. आपल्याला एकमेकांच्या सोबत जगायला शिकण्याविना पर्याय नाही. भारत सरकारचं परिस्थितीचं आकलन सध्या चुकतंय की काय अशी शंका वाटते - पण तुमच्यासारखीच मलाही आशा आहे की गोष्टी ठीक होतील. आपण सामान्य माणसं याव्यतिरिक्त फार काही करु शकत नाही हे खरंच!

अफगाण स्त्रियांचे जीवनमान आणि समाजातील स्थान याविषयी वाचावयास आवडेल. तालिबानला जगाने फासलेला काळा रंग प्रत्यक्षात भुराही असण्याची शक्यता आहे, असे मत झाले. शिवाजीमहाराजांना नाही का काही पाश्चात्य इतिहासकारांनी 'बंडखोर' ठरवले ?

मला वाटते येथे आपण नकळत शिवाजीमहाराज (मराठा सैन्य) आणि तालिबान यांची तुलना करत आहात, ज्याच्याशी असहमत आहे. शिवाजी हा धार्मिक असेल कदाचीत पण शिवशाही ही धार्मिक होती असे, अर्थात धर्मग्रंथावर आधारीत होती असे म्हणता येणार नाही. शिवाजीच्या काळातले काही नियम कदाचीत आत्ताच्या काळाची फुटपट्टी वापरली तर अमानुष वाटतीलही पण ते खर्‍या अर्थाने जुलमाविरुद्ध होते (उ.दा. रांजे गावचा पाटील), कुठल्यातरी संस्कृती रक्षणाच्या नावाखाली वाटेल तसे नव्हते. केवळ स्त्री यासंदर्भातच तुर्त बोलूयातः त्याकाळी बायकांना कदाचीत आत्तापेक्षा जास्त मर्यादा असतील पण पण तालीबान्यांसारखी दडपशाही नव्हती. चांगलेवाईट सोडून द्या, पण शिवाजीच्या राजकारणात जिजाबाई बोलू शकत होती, हिरकणीचे नाव तर अजरामर झाले आहेच (जी रात्री देखील घरी आली नाही म्हणून तिला शिक्षा झाली नाही), शिवाजीच्या पश्चात सोयराबाईने मराठा सरदारांच्या मदतीने राज्य गिळंकृत करू शकत होती, (नंतर संभाजीने तीला मारले ते स्त्री म्हणून नाही) संभाजीच्या बायकोला इतर मराठा सरदारांबरोबर औरंगजेबाने पकडून नेले. तिने त्याला देखील वर (मानाने) तोंड ठेवून संताजीचे कापलेले शीर दाखवायला सांगितले... इत्यादी. यात एकच गोष्ट सांगायची आहे की स्त्री ही नुसतीच बोलू शकत नव्हती तर तिच्या बोलण्यास मान देखील मिळायचा. त्या उलट तालीबानने काय केले? इस्लामी राजवट आणायच्या नावाखाली बायकांना, विशेष करून पाक-अफगाण सीमेच्या आजूबाजूच्या जनतेस पूर्ण दबावाखाली आणले. गुगलल्यास अथवा विकीवर अनेक फोटो बघायला मिळतील. येथे ते मुद्दामून टाकत नाही... आणि असले वागणे एक सौदी अरेबिया सोडल्यास इतर कुठल्याही विकसीत/विकसनशील सीमेवरील इस्लामीक राज्यात बघायला मिळणार नाही. गेल्या वर्षी बॉस्टनमधे एका एनजीओ संस्थेतील मुलींशी बोलण्याचा प्रसंग आला होता. ती अफगाणिस्तान-पाकीस्तान सीमेवर जेथे तालीबान्यांमुळे बायका मागे पडल्या आहेत तेथे शिकवण्याचे काम करत आहे. तेथे या बायकांचा विश्वास संपादन करत केलेल्या कामाबद्दल आमचे बोलणे चालले होते. तिच्या म्हणण्याप्रमाणे, वयाच्या चाळीसाव्या वर्षा पर्यंत बायकांना एकटे बाहेर पडू दिले जात नाही. आणि बायका बुरख्यात कायम हव्यात तो मुद्दा वेगळाच. शिक्षण शून्य, वैद्यकीय व्यवस्था शून्य. खाली सुबोध खरे यांनी देखील त्यांच्या अनावस्थेवर लिहीलेले आहेच. बाकी अनेक मुद्दे आहेत. पण तुर्तास एक स्त्री हाच मुद्दा लिहीला आहे. थोडक्यात एखाद्या जदुनाथ सरकारांनी आढ्यता ठेवत शिवाजी आणि मराठ्यांवर लिहीले असले तरी शिवाजीची तुलनाच करायची असली तर त्याच्या नंतरच्या शतकातील अमेरीकेतील ब्रिटीशांच्या विरोधातील लढवय्यांशी करावी लागेल. असो. यावर अधिक नंतर कधीतरी वेगळ्या चर्चेत. "शिवाजी = तालिबान" हे पाहून राहवले नाही, म्हणून अवांतर...

कुडंट अग्री मोर. स्नेहांकिता यांच्या भावना पोचल्या पण तुलना अस्थानी आहे.

शिवाजीची तुलनाच करायची असली तर त्याच्या नंतरच्या शतकातील अमेरीकेतील ब्रिटीशांच्या विरोधातील लढवय्यांशी करावी लागेल. असो. यावर अधिक नंतर कधीतरी वेगळ्या चर्चेत. "शिवाजी = तालिबान" हे पाहून राहवले नाही... सहमत.

आभार बिपिन कार्यकर्ते, फारएन्ड, विश्वनाथ मेहेंदळे १९. अरुण जोशी, इतिहासाचा हिशोब चुकता करण्यात काही फायदा नसतो - आपल्याला पुढं जायचंय; मागं नाही असं मला वाटतं. इतिहासाकडून शिकणं वेगळं आणि इतिहासाचा वापर करुन सूड उगवणं वेगळं. पण असो, हे विषयांतरच म्हणावं लागेल. बाकी १९८८ पासून ती सुरु होतेच आहे. कारण तिथली अस्थिर परिस्थिती - जी जगाला माहिती आहेच, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही लिहित नाही. २०. rahulvg, माहितीबद्दल आभार. हमीद करझाई यांच्यावर स्थानिक प्रसारमाध्यमांत बरंच काही लिहून येतं जे आपल्याला फारसं माहिती नाही. २१. मदनबाण, 'दोहा' प्रकरण घडत असताना मी काबूलमध्ये होते आणि स्थानिक लोकांच्या त्या सगळ्या प्रकरणावरच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. मुळात तालिबानशी संवाद साधण्याबद्दल मतभेद नाहीत. हा संवाद कोणी साधायचा, कोणाला तो अधिकार आहे याविषयी मतभेद आहेत. तुम्ही दिलेले दुवे माहितीपूर्ण आहेत.

२२. सोन्याबापु(पू), तुमच्या सविस्तर प्रतिसादाची वाट पाहते. पाकिस्तानमधून पण काही तालिबान कैद्यांची सुटका होते आहे. याचे परिणाम काय होणार याबाबत सगळे आत्ता फक्त अंदाज बांधू शकतात. २३. राही, श्री. मुकुंद रानडे ('प्रसिद्ध स्त्रीचा नवरा' म्हणून मग ते फिरोझ म्हणवून घ्यायला लागले स्वतःला - श्रीमती प्रतिभा रानडे यांचे लेख प्रसिद्ध व्हायला लागले तेव्हा!) भारतीय अधिकारी म्हणून तिकडे काम करत होते. १९७९ मध्ये रशियन फौजांनी आक्रमण केलं तेव्हा रानडे कुटुंबिय काबूलमध्ये वास्तव्य करत होते. 'अफगाण डायरी'त त्या अनुभवांच अतिशय सविस्तर वर्णन आहे. भारताचे अफ्गानविषयक धोरण सबूरीचे पण सूक्ष्म शिरकावाचे राहिले आहे - सहमत आहे. २४. नरेंद्र गोळे, आपण व्यक्त केलेल्या आशावादाबाबत आभार. २५. मुक्तविहारी, आभार. २६. स्नेहांकिता, तालिबान 'भुरा' आहे असं नाही म्हणता येणार -विशेषतः स्त्रियांसाठी तालिबान परत येणं फार धोक्याचं आहे.... !!

मला वाटते मनोहर की माणूस मध्ये मुकुंद रानडे लिहीत असत (राधा आणि श्याम असे काहीसे संवादात्मक सदर होते, आठवणी अंधुक आहेत. पण ते सदर खूप लोकप्रिय होते.) तेव्हाही बहुतेक ते 'फिरोझ'च होते. आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांनी याबद्दल सविस्तर लिहिले आहे. आर्किटेक्चरसाठी ते नेहमी कमानकला हा शब्द वापरीत ते लक्षात राहिले आहे. कदाचित आचवलांनी तो आधी वापरला असावा. आर्कवरून आर्किटेक्चर आले, पण सध्याचे आर्किटेक्चर म्हटले की डोळ्यांसमोर कमानी येत नाहीत. त्यामुळे हा मूलगामी शब्द वेगळा वाटून लक्षात राहिला. अवांतर आहे खरे, पण निरुपद्रवी असल्याने चालून जावे.

लेख आवडला. काही दिवसापुर्वी "ईराणमधुन सुटका" हे विदुला टोकेकर अनुवादित पुस्तक (मुळ पुस्तक - आउट ओफ इराण, ले़खिका - सुझान आझादी) वाचले. त्यामु़ळे ईराण मधील सद्य परिस्थितीवर अधिक माहितीपर लेख अपेक्षित आहे.

आवडला,तसेच अफगाणिस्तान मधील सद्य परिस्थीती काही प्रमाणात समजली,दोन तीन वर्षांपुर्वी,एका खाजगी अरब पतपेढीत काही कामानिमित्त जात होतो तेव्हा तेथील एक उच्चपदस्थ अधिकारी ती नोकरी सोडुन अफगाणिस्थान येथे चालले होते,हे ऐकुन त्यान्चे घरातील त्याना जावु नये असा विरोध/विनन्ती करत होते,ते का हे आत्ता तरी पूर्ण समजले.

आवडला. वर इस्पिकचा एक्का, नरेंद्र गोळे व राही ह्यांच्या प्रतिसादांत मला जे काही हा लेख वाचून वाटले, ते अचूक आलेले आहेच. लेखावरील चर्चा, त्यातील लेखिकेची उत्तरे, सर्वच काही विलोभनीय. राही, मला वाटते आपण उल्लेखिलेली लेखमाला फिरोझ रानडे 'माणूस' मधून लिहीत असत. अवांतरः एका चांगल्या विषयावर संयमित लेख आल्यावर, त्यावरील प्रतिक्रीयाही तितक्याच माहितीपूर्ण, संयमित असतात ह्याचा, हा लेख म्हणजे उत्तम उदाहरण आहे. ह्याउलट, ह्याच वेळी ह्याच संस्थळावर, दुसर्‍या एका सामाजिक, राजकीय विषयावरील चर्चा मिपा प्रशासनास लवकरच वाचनमात्र करावी लागली; सुरूवातीचा अत्यंत असभ्य भाषेत लिहीलेला लेख बराच 'टोन डाऊन'करून पुनःप्रकाशित केला तरीही त्यावरील प्रतिसादांची पातळी तशीच राहिली. एकाच वेळी आलेल्या भिन्न प्रकृतिच्या ह्या दोन लेखांतील फरक लक्षात घेण्याजोगा आहे.

सगळ्या विषयाबद्दल लोकांची भावना सारखीच तीव्र कशी बरे असेल? ह्या लेखात आपल्यापासून शेकडो मैल दूर असणारा पण भारताशी नाते असणारा देश आणि तिथे एका भारतीयाला आलेला अनुभव. दुसर्‍या लेखात (ज्याविषयी तुमच्या मनात किल्मिष आहे) तो विषयच असा ज्वलंत आहे. अमुक एका व्यक्तीचे अमुक एका पक्षाबद्दलचे मत. ते मत, ते व्यक्त करण्याची पद्धत, ते व्यक्त करण्याची जागा हे सगळे वादाचे मुद्दे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना तीव्र असणारच. त्या विषयावर वेगळ्या पद्धतीने विचार मांडले जाणार प्रसंगी प्रकरण हाताबाहेर जाणार आणि संपादकांना हस्तक्षेप करावे लागणार हे स्वाभाविक आहे. संपादकांना असे ज्वालाग्राही विषय चर्चिलेच जाऊ नये असे काही वाटत असेल तर त्यांना तो अधिकार आहेच. ज्यांना ज्या विषयात रुची आहे त्यांनी त्या विषयात सहभागी व्हावे. मिसळ आणि सत्यनारायणाचा प्रसाद दोन्ही आपल्या जागी शोभतात. पण ह्यातील एकाने दुसर्‍या सारखे वागण्याची अपेक्षा करणे हे वेडेपणाचे आहे. असो.