Welcome to misalpav.com
लेखक: मन | प्रसिद्ध:
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. एक विद्यार्थी. . . गविकाकांचे उत्तरः श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार. गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न. तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात. तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो. याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो. तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा. आपला का?का?. गवि. . . . ता.क.: वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. द.ही.: फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल. --मनोबा व गविकाका
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हॅ हॅ. व्यनीत आलेले प्रश्न अग्राह्य धरले जातील. पब्लिक सदराचे प्रश्न पब्लिकमधेच विचारणे. :) खाजगी असेल तर श्री. रा. रा. मन (सूत्रधार) यांस व्यनि करावा. ते नाव गाळून येथे प्रश्न आणतील. कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देण्याचा हक्क राखून ठेवण्यात येत आहे. उत्तरांना शिरेसली घेतल्यास जबाबदारी प्रश्नकर्त्याची राहील. हा एक गंमतीचा कट्टा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. इत्यादि. बाकी सूचनापाट्या बनवण्याची जबाबदारी पुणेकर असलेल्या मन यांजवर टाकत आहे.

लग्न करावे कि करू नये ?(वेडावणारे मुखचिन्ह)
उत्तरः श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. आपण विचारलेल्या प्रश्नाअखेरीस दिलेल्या चिन्हामुळे आपल्या प्रश्नात छद्माचा अंतर्भाव झाला आहे असे जाणवते. तेव्हा प्रथम सल्ला असा की लग्न करावे की नाही या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा. आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. सल्ला असा की उडी टाका. याचे कारण म्हणजे लग्न हे काही दिव्य अद्वितीय अनुभव आहे असे नव्हे, पण आयुष्यात पहिली वीसतीस वर्षे आपण एकटेच असतो. आणि कदाचित उत्तम आरोग्य असल्यास शेवटीही दहावीस वर्षे तरी एकटे असण्याची संधी किंवा सक्ती होण्याची बरीच शक्यता असते. आयुष्य एकच आहे असे गृहीत धरता बिनएकटेपणा, अर्थात कायमचा जोडीदार असण्यातले सुख अनुभवण्याचा ऑप्शन मधल्या काळात घेतला नाही तर उघडं यायचं अन उघडं जायचं या दोन टोकांमधे पूर्णकाळ एकटे राहणे हा एकसुरी ऑप्शनच पदरी पडतो. त्यामुळे एकूण दोन ऑप्शन्सपैकी दोन्ही अनुभवण्याचा ऑप्शन असल्याने एक ऑप्शन ऑप्शनला टाकू नये आणि विवाहसुख अनुभवावे असे सुचवून पाहतो. त्याचे आणखी एक फळ म्हणजे पोरेबाळे. लग्न केल्यास रीतसर बाप होऊन बाळाची मायेची ऊब अनुभवता येते. लहानपणी खुद्द अनुभवलेल्या आईच्या ऊबेपेक्षा जास्त समाधान आणि शांती मिळते. बाकी सर्व रद्दबातल झाले तरी पोरांनी आपल्याला बाबा म्हणून कुशीत शिरणे या क्षणाचा अनुभव लग्नाचे बाकीचे संपूर्ण लडतर झेलण्यास पुरेसा ठरावा. लग्नानंतर आपले अनुभव कळवावेत. आपला काका.

श्री. स्पा यांस अनेकोत्तम प्रणाम. या प्रश्नाच्या गंभीर विचाराआधी लग्न या विषयाविषयीचे हे छद्म मनातून काढा.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl.gif आता तुमचा मूळ प्रश्नः लग्न करावे का नाही. हा निर्णय तसा सोपा आहे. आर्थिक पैलूतून पाहता लग्न करणे हा एक अत्यंत खर्चिक मार्ग ठरु शकतो. मी सध्या आपल्या मनात फक्त भावनिक पैलू आहे असं गृहीत धरतो. म्हणजेच सध्या पोहोण्याच्या तलावाच्या काठावर उभे राहून नाक मुठीत धरुन उडी टाकू की नको अशा विचाराने तुम्ही पुढेमागे हेलकावत आहात. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif साफ खपल्या गेलो आहे =))

एकदा दालन तयार झालं कि मिपाकरांच्या सपोर्ट देण्या-घेण्याला तसाही ऊत येईल. आणि तिथेही कंपूबाजी करुन ग्रूप थेरपीची हौस भागवुन घेतील मिपाकर ;)

मा. श्री. तथास्तु. आपणास कितपत मऊ क्वायर हवे आहे याची मर्यादा प्रत्येकाच्या गादीविषयक आवडीनिवडीवर ठरत असल्याने हा निर्णय अंदाजानेच घ्यावा असे माझे मत आहे. काथ्याच्या गादीवर बसल्यावर काही टोचू नये इतपत बारीक कुटावा. धन्यवाद.

चड्डीविषयी प्रश्न असल्याने प्रश्नकर्त्याचे वय दहा वर्षे किंवा कमी आहे असे गृहीत धरतो. आपापला वयोगट समजून नाडी बांधता सोडता यायला लागेपर्यंत इलॅस्टिक वापरावे, अन्यथा लघुदुर्घटना होऊ शकतात. तसेच कृपया फक्त गहन प्रश्नच विचारावेत. कळावे.

छे छे दहा वर्षे पण खुप झाले. नुकताच जन्म झाला आहे आमचा ;) एक महिना किंवा थोडा जास्त. हा प्रश्न गहन कसा नाही यावर आपले मत मांडावे ही नम्र विनंती

गविकाका , फ़ाट्यावर मारण्याला माज म्हणतात का? असल्यास तो कसा उतरावावा?

अडचण-१ मी एक शाम-ळु तरुण आहे.आमची एक कुटुंब मैत्रिण आहे पण तिला सतत पट्ट्य्यानेच बोलायची सवय आहे कधी कधी ती तोंडातही मारते, क्रुपया काय करावे हे सुचवावे. अडचण-२ तसेच माझे एकदा गावात व एकदा रात्रपाळीवर असताना दोन तरुणींशी संधान जुळले त्यातल्या दोघीही मला चुना लावुन घरातील तसेच माल मधील शोपिंग केलेले सामान(ते सामान नव्हे) घेवुन पळुन गेल्या सध्या मी एकटाच हात चोळत बसलो आहे काय करु ?

या दोन्ही घटना तुमच्याबाबत घडल्या आहेत काय? चमचाभर पाण्यात नाक बुडवून वगैरे... आमचेही २ प्रश्न १) तुमच्याकडे कोल्हापुरी चपला आहेत का नाही? त्यांचा शस्त्र म्हणून वापर करता येतो हे माहित आहे का? २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे?

१) दुसर्‍या कारणामुळे घरात एकही चमचा शिल्लक राहिलेला नसल्याने आपला सल्ला फॉलो करु शकत नाही क्षमस्व. २) या दोन्ही तरुणी एकत्र पळून गेल्या किंवा कसे? भेंडी हमने तो उ बारे में सोचा ही नही.इ तो नया अँगलवा आ गया, कहानी मा टिवस्ट !!!! त्या पळुन गेल्यावर आम्ही पोस्ट इन्क्वायरी केलेली नाही.

काहीकाळ ते जागृत करणारे वाचन थांबवल्यास कंटाळून आत्मभानाच्या आत कर्बद्विप्रणील वायू जमा होईल आणि ऑपॉप पुन्हा झोपी जाईल. यानेही फरक न पडल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.

श्री. इरसालजी. गगनविहारी या शब्दाचा अर्थ "ग" ची बाधा झालेला आणि हवेत चालणारा मनुष्य असा होतो. "ग"चा अर्थ माहीत नाही. क्षमस्व. -काका

गविकाका मला वाचवा... प्रश्न १ कुठ्ल्या मार्गाने माझ्या आत्म्याला अनुभूती मिळून माझ्या मनोज्ञ मानसिकतेला महदोत्क्ट प्रचिती मिळेल..? प्रश्न २ माझा नवाकोरा महागडा मोबाईल हरवला आहे, तो मी कसा परत मिळवू?

मा. श्री योगी९००जी. प्रथम समस्या जटिल आहे. इसपगुल, धौतीयोग चूर्ण वगैरे वापरुन पहायला हरकत नाही. फायदा न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. दुसर्‍या समस्येबाबतः समस्या जटिल किंवा गहन नसल्याने प्रश्न डिसक्वालिफाय होत आहे. क्षमस्व.

बाकी पब्लिकने आपापले सल्ले द्यायला तात्त्विकदृष्ट्या हरकत नसावी!

हो.. अगदी अगदी. मी आठवड्यातून एकदाच देणार आहे. बाकी सर्व पब्लिकच्या सल्ल्यांसाठीच आहे. :)

काका, तुम्हाला टंचनिका आपलं टंकनिका कुठे मिळाली? तिला तुम्ही कसे खुश ठेवता? उत्तरांचे छाप तुम्ही तयार करुन ठेवलेत का? तुम्ही गविकाका कसे झालात?

हे प्रश्नाचे उत्तर नाही. गांभीर्याने विचारलेल्या प्रश्नांना गांभीर्याने उत्तरे दिली जावीत अशी अपेक्षा गैर नसावी. प्रदुषण झाले आहे श्वास घेतांना त्रास होतो काय करु या प्रश्नाला प्रदुषण झाले म्हणून श्वास घेऊ नका असे उत्तर चुकीचे असते.

हा प्रश्न गहन आहे. याला प्रश्नराज हा किताब दिला पायजे. हा प्रश्न धागाकर्ते श्री. मन यांस विचारणे लागू ठरावे. बाकी आपण एकटेसुद्धा पुरेश्या संख्येने प्रतिसाद देता आहातच त्यामुळे प्रतिसादसंख्येचा तुटवडा पडण्याची काळजी करणे हे उपाशी माणसाने आगोदरच हाजमोला मागवून ठेवण्यापैकी आहे.