(व्हॅलेंटाईन डे म्हणलं की निसर्गातील सर्व घटकांना त्रास द्यायला हवा का?)
लेखाची प्रेरणा ही आणि इतर अनेक. :)
बरेच दिवस लिहायचे डोक्यात होते पण राहून जात होते. आता फेब्रुवारी महीना उजाडला म्हणल्यावर जगभर व्हॅलेंटाईन डे चे वारे वाहू लागतात त्यामुळे ही वेळ, या संदर्भातील विचार व्यक्त करण्यास आणि विचारांचे आदानप्रदान करण्यास योग्य आहे; असे वाटत असल्याने आता लिहीत आहे. मिपाकरांनो, कृपया गैरसमज नसुंदेत, पण "आक्षेप हा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासंदर्भात नसून, साजरे करण्याच्या पद्धतीबद्दल आहे". कारण चुकीच्या पद्धतीमुळे निसर्गातील सर्व घटकांना त्रास होतो. यात मानव, त्यातही "पुरूषमाणूस" हा देखील निसर्गाचा घटक असल्याचे विशेष करून लक्षात ठेवलेले आहे.
या दिवसाच्या निमित्ताने गुलाबांच्या फुलांची अक्षरशः कत्तल होते. दुसर्या दिवशी नुसती सुकलेली फुलेच रहातात. आता हे कोणी देवाला वाहीलेल्या फुलांच्या आणि नंतर त्याचे होणार्या निर्माल्याच्या बाबतीत पण होते, मग येथे झाले म्हणून काय बिघडले असे देखील म्हणू शकतात. थोडक्यात काय आम्ही पण आमचा खारीचा वाटा उचलणार असे म्हणायचे झाले!
या दिनाचा अजून एक आक्षेपार्ह भाग असतो, तो म्हणजे चॉकलेट्सचा. किती ती चॉकलेट्स आणि किती त्यांचे ते प्रकार! बरं त्यात नको इतकी साखर असते, नको इतके अधिक स्निग्धांशाचे दूध असते. त्याचे परीणाम हे पूर्वपश्चिम वृद्धीसाठी शरीरावर होतात. त्या व्यतिरीक्त चॉकलेट्च्या चांद्या, चकचकीत कागदांनी केलेले त्यांचे खोटे खोटे गुच्छ वगैरे मुळे सर्व कागदांचा कचरा होतो ज्याने आधीच कमी पडत असलेल्या जागेवर कचरा झाल्याने वाढ होते. तुम्ही म्हणाल आता एका चांदीने काय फरक पडतो? पण असा विचार करा की व्हॅलेंटाईन दिन हा विशेष करून तरूणाईमधे प्रिय आहे. (कालांतराने काय होते माहीत नाही, पण तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे). आता भारतात आजमितीस मला वाटते साधारण ४३-४४ कोटी तरूण जनता भारतात आहे. आता इतक्या जनतेने एक चॉकलेट खाल्ले, एक गुलाब वापरला, तर किती कचरा होणार याचा विचार करा! त्यात अजून बाहेरचा खाण्याचा आणि पिण्याचा खर्च गृहीत धरा...
आता अजून एक महत्वाचा मुद्दा: व्हॅलेंटाईन डे चे निमित्त करून केवळ सभोवतालच्या हरीत निसर्गालाच त्रास सहन करावा लागतो असे नाही तर या दिनाचे निमित्त होऊन निसर्गातील पुरूषप्राणी अधिकच दीन होतो. असा निसर्गाला त्रास देण्याचे काम हे त्याच्या माथीच येते. का? तर त्यावरून प्रेमाची किंमत ठरणार असते? पण ज्या गोष्टींचा दुसर्या दिवशी कचरा होतो अथवा प्रेमापेक्षा शरीरच पूर्व-पश्चिम वृद्धींगत होऊ शकते त्यातून प्रेमाची किंमत कशी बरं ठरवता येते?
पण अशी नुसतीच टिका करत बसण्याऐवजी, काही गोष्टी या निमित्ताने एकमेकांना सुचवाव्यात असे वाटते. अजून १० पेक्षा अधिक दिवस व्हॅलेंटाईन दिनास राहीले आहेत. तो पर्यत या जुनाट पद्धतीत बदल करण्याचा खोक्याबाहेर विचार करता येईल असे वाटते...
सर्व प्रथम, प्रेम हे एका दिवसासाठी निव्वळ शोऑफ अर्थात दाखवायची वस्तू नाही हे ध्यानात घ्या. आपल्या सहचारी व्यक्तीस तसे ते नुसते दाखवत न बसता ते दिवसेंदिवस वृद्धींगत कसे होत आहे हे देखील समजूंदेत. त्यासाठी निसर्गाची हानी करणार नाही अशी प्रत्येकाने प्रतिज्ञा घेतली पाहीजे. समाजात वजन वाढणे महत्वाचे असते, पण त्यासाठी चॉकलेट्स आणि बाहेरचे अरबटचरबट खाणे-पिणे योग्य आहे का ह्याचा देखील विचार करा. त्या ऐवजी आपल्या सहचारी व्यक्तीस घरीच साधा स्वैपांक करायची गळ घालून त्याचे मनमोकळेपणाने कौतुक करा. त्यातून प्रेम पण कळेल, गुलाब पण द्यावे लागणार नाहीत आणि चॉकलेट्स आदींचे परीणाम पण भोवणार नाहीत.
बघा विचार करा आणि अजून देखील काही सुचवता आले तर या धाग्यात अवश्य सुचवावेत ही विनंती
प्रतिक्रिया