मंगळ कार्य !
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड?
ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.."
हा मला दुसरा धक्का .. !
एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी?
शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही..
नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.."
तर कसले काय,
आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !
प्रतिक्रिया