अजित पवार, धरण आणि धमकी
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व आज पुन्हा "बोललं". पाणी प्रश्न सोडवायचा आहे ना? मग सुप्रिया सुळेंनाच मतदान करा. तसं नाही केलं तर तुमच्या गावचं पाणीच बंद करू, अशी धमकी अजित पवार यांनी दिल्याचं वृत्त आज 'मुंबई मिरर'नं दिलं. काकांचा "विनोद" ताजा असतानाच पुतण्याच्या नवीन वाचाळतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस् ची पुन्हा दातखीळ बसली आहे.
'एखाद्या गावानं माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात जाऊन मतदान केल्यानं ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र मला जर समजलं की मासाळवाडी गावाने पक्षाच्या विरोधात मतदान केलं तर गावाला पाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा' असं हे महाशय म्हणाले.
महाराष्ट्र टाईम्स च्या वृत्तानुसार 'भारतीय लष्करात जवान असलेल्या संदीप ठोंबरे यांनी २००६ मध्ये पक्षाकडून पाणी प्रश्न सोडवला जाईल असे वचन देण्यात आल्याची आठवण करून दिली. यानंतर अजित दादांनी त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, असे धमकावले'.
धरणाचे पाणी वाढवण्याची अभिनव योजना सादर केल्यानंतर अजित दादांनी एक मानभावी उपोषण केलं होतं. आता ही धमकी पहाता माध्यमे याचा सक्रीय पाठपुरावा करणार हे निश्चित. सकाळ मध्ये मात्र ही बातमी 'अजितदादांच्या बदनामीचे षडयंत्र' अशा प्रकारे दिली गेली आहे.
जनतेने असल्या माजोरड्या नेत्यांना मतपेटीतून पेकाटात लाथ घालून उकिरड्यावर फेकावे.जनतेच्या पायात निवडणुकांपुरत्या पैशाच्या बेड्या घातल्यावर जनता कशाला त्यांना लाथा मारतेय. मुळात ह्या आणि अशा अनेक नेत्यांनी इतक्या वर्षात आपल्या जनतेचे पद्धतशीर ब्रेन वॉशिंग करुन त्यांची दुरचा विचार करण्याची मतीच कुंठीत करुन ठेवली आहे. जनतेला काहीही कळत नाहीये आता.