पाकिस्तानी खेळाडू आणि आयपीएल - भारतीय क्रिकेट बोर्डाचे धोरण ??
भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सोडलेय. अर्थात आजच्या तारखेला. कारण हि धरपकड चालूच असते. पण सध्या तरी या दोन देशांमध्ये अमन की आशा क्रिकेटच्या माध्यमातून करण्याबाबत कोणी पुढाकार घेत नाहीये. त्या अंतर्गत आपण पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जात नाही (आता तिथे कोणीच जात नाही ती गोष्ट निराळी) तसेच ते आपल्याकडे येत नाहीत. ना आपण तटस्थ ठिकाणी त्यांच्याशी खेळतो. फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमनेसामने येतो तेव्हाच काय ती लढत. (आता इथे दरवेळी ती कशी ना कशी होतेच हा एक योगायोगच).
असो, पण आता येऊया तात्कालिक विषयावर, आयपीएलवर.
आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू नकोत हे धोरण एकमताने पास झाले आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील होतेय. अगदी बॉलीवूड किंग खान शाहरुख खानने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवायला हवे या वादग्रस्त विधानावरून वादही घालून झालेत. पण तरीही भारतीय क्रिकेट वा आयपीएल जेव्हा जेव्हा बघितले जाते तेव्हा तेव्हा काही पाकिस्तानी खेळाडूंचे दर्शन हे होतेच. यात सर्वात प्रथम नाव येते ते वासिम अक्रम यांचे. भारताचा सामना म्हटले म्हणजे शाझ आणि वाझ करत वासिम आणि शास्त्रीची जोडगोळी असतेच. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडू नको म्हणताना कोलकत्याचा प्रशिक्षक म्हणून वासिम अक्रम हा दिसतोच. (हा शाहरुखच्याच मालकीचा संघ याला योगायोगच समजूया.) पण अक्रमच्या विनम्र स्वभावामुळे त्याच्याबद्दल नेहमीच एक आपुलकीच वाटते हे ही खरेच.
असो, त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो रमीझ राजा यांचा. हा मुख्यत्वे कॉमेंट्री बॉक्समध्ये आढळला जातो. खरे तर याच्या पाकिस्तानी खेळाडूंचीच सतत लाल करण्याच्या धोरणामुळे याची कॉमेंट्री नेहमीच डोक्याला त्रास देते. तरीही सुहास्य वदन आणि लाघवी स्वभावामुळे त्याला सहन केले जाते. तदनंतर एक आपले अलीम दार हे पंच दिसत असतातच, मात्र ते आयसीसी पॅनलतर्फे असल्याने त्यांना अटकाव करने भारतीय बोर्डाच्या अखत्यारीत येत नसावे. एक वकार युनुस नामक वेगवान गोलंदाज होता, तो देखील अधूनमधून अश्याच क्रिकेटला पूरक जोडधंद्यानिमित्त भारतीय भूमीवर दिसत असतो.
यंदा तर काय बाबा आयपीएल शारजा, अबूधाबी, दुबई वगैरे भाई लोकांच्या देशात असल्याने माझ्या अपेक्षा उंचावल्या होत्याच. तश्या त्या पुर्णही झाल्या जेव्हा ‘शोएब अख्तर’ सोनी-सेटमॅक्स चॅनेलवाल्यांच्या स्टुडिओत दिसायला लागला. हा मात्र मला कधीच विनम्र, सुस्वभावी, सुसंस्कृत न वाटता उलट रावळपिंडीचा गुंडाच वाटला. हा मला तेव्हाही आवडायचा नाही आणि आजही बघवत नाही (खरे तर म्हणूनच हा धागा काढावासा वाटला) बरे त्याच्या सोबतीला बसवले पण कोणाला, तर श्री अजय जाडेजा. कोर्टात काय सिद्ध झाले आणि काय नाही हे मला माहीत नाही पण अजय जाडेजाला बघून नेहमीच माझ्या मॅचफिक्सिंगच्या कटू आठवणी जाग्या होतात. शोएब अख्तरच्या जोडीला बसवायला हाच सापडावा हा एक योगच झाला. हा शोएब अख्तर आयपीएलमध्ये जेव्हा खेळला तेव्हा शाहरुखच्याच संघातून खेळला यालाही योगायोगच समझा.... श्या.. धागा भरकटतोय, मूळ मुद्यावर येतो !
इथे कोणी मला सांगेल का की भारतीय भूमीवर किंवा आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू नकोत याबाबत आयपीएल वा भारतीय क्रिकेटबोर्डाचे धोरण नक्की काय आहे?
फक्त क्रिकेट खेळायला आणि खेळून पैसे कमवायला मनाई आहे पण त्याच खेळाशी संबंधित इतर सारे उद्योग करून, हो अगदी जाहिरातीही करून पैसे कमवायला बंदी नाही आहे का? असायला नको का? (सध्याच्या इलेक्शन फीवरमुळे यात अजून एक प्रश्न वाढवतो - अबकी बार मोदी सरकार आले तर पुढच्या आयपीएलला हेच धोरण कायम राहणार का बदलणार?)
अमन की आशा? ते काय असतं?ते एक सरकारी धोरण आहे. त्याचा विरोध करणे हा विरोधी पक्षांचा निवडणूक अजेंडा आहे.१) पण मिपावर बरेच आय पी एल विरोधक दिसत आहेत. २) तसेच क्रिकेटमध्ये रस असणारे फारच कमी सभासद दिसत आहेत.जर पहिल्या कारणाने आपण हा धागा काढला नसेल तर ते चूक आहे. जर दुसर्या कारणाने काढला नसेल तर ओके. क्रिकेट न आवडणे आणि आयपीएलचा राग असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात घ्यायला हवे सर्वांनीच. आयपीएल हा क्रिकेटचा मांडलेला बाजार आहे. त्यामुळे मूळ क्रिकेट या खेळालाच बदनाम करण्यात काही अर्थ नाही. क्रिकेट न आवडणार्यांनी आयपीएलमध्ये गैरव्यवहार चालतात हे बोलून क्रिकेटला टारगेट करणे चुकीचे आहे तसेच क्रिकेटप्रेमींनीही क्रिकेटच्या प्रेमाखातर आयपीएलमधील चुकीच्या गोष्टींचे समर्थन करने चुकीचे आहे. असेच दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, देव आणि काही मंदीरांनी श्रद्धेच्या चालवल्या बाजाराबद्दल असेच म्हणता येईल. नास्तिकांनी त्याकडे बोट दाखवत देवाला टारगेट करू नये कारण कोणता देव सांगत नाही ते तसे करायला. तसेच आस्तिकांनी देखील या बाबत आपले डोळे उघडे ठेवावेत, देवाच्या नावावर जे काही चालेल त्याची निव्वळ देवावरच्या श्रद्धेपोटी पाठराखण करण्यात काहीच हशील नाही.