Welcome to misalpav.com
लेखक: अमोल केळकर | प्रसिद्ध:
आणि अचानक मला शांती भेटली …. रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती . तिला पाहून मी एकदम चमकलो ! शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ? तिच्या बोलण्यात वेगळाच उत्साह दिसत होता. शांते , चल कॉफी पिऊ , मी म्हणले आणि आम्ही दोघे रोहिणी होटेल मध्ये शिरलो. पाण्याचे पेले टेबलावर आदळून वेटर नेहमीच्या ठसक्यात म्हणाला , बोला ! काय पाहिजे ? शांते, काही खाणार आहेस ? नको , कॉफीच घेऊ मी काही ऑर्डर द्यायच्या आत वेटर पुन्हा खासकाला, फिल्टर का नेस ? शांती कांही बोलायच्या आत, मीच बोललो, दोन फिल्टर कोफी मग संभाषणाला शांती नेच सुरवात केली , काय अमोल आज काल भेटत नाहीस? मी नुसताच ह्म्म्म ! नाही आजकाल बायको माहेरी जात नाही का ? नाही निदान पूर्वी बायको माहेरी गेली की तरी भेटायचास - शांती खुदकन हासली , आज शांतीला माझी फिरकी घ्यायची लहर आली होती । बरं बाकी तुमचे खास मित्र , मैत्रीण काय म्हणतात ? तुम्ही काय म्हणे भलतेच स्मार्ट झाला आहात असं कल्पना म्हणाली , काय तो Whats app ग्रुप आहे म्हणे तुमचा … हो ना अग, ' आम्ही विसरभोळे ९१ ' असे नाव ठेवले आहे. माझी कल्पना हां ! मी टिमकी मिरवली ! अरे पण असं नाव? थांब सांगतो, तिचे वाक्य पुर्ण व्हायच्या आताच मी बोललो , अगं आपली बॅच ९१ ची आणी इतके दिवस आपण कुणीच एकमेकांच्या संपर्कात नव्हतो, जणू विसारलो आपण एकमेकांना म्हणून विसरभोळे : ' आम्ही विसरभोळे ९१ ' ती नुसतीच हसली , तूला माहित आहे आपली ' इर्षा ' , ती ग्रुपची अ‍ॅडमीन आहे , खूप अ‍ॅक्टीव असते, तसेच अभिमान , शिखर , शेफाली , जिद्द हे ही भरपूर दंगा करत असतात.. हो पण, मी, कल्पना, भावना हर्ष, आनंद , स्वानंद , विकास , वत्सला त्यांचे काय ? शांतीने शांतपणे विचारले हे पण तुमचे मित्रच आहेत ना? फेसबुक, Whats app वर ते भलेही नसतील , भलेही त्यांच्या कडे तुमच्या सारखा स्मार्ट फोन नसेल पण अधून मधून त्यांनाही भेटा, त्यांनाही काही वेळ द्या की , त्यांच्याशी गप्पा करायला नाही का आवडणार ? मी निरुत्तर , बरोबर आहे शांती तुझे . काही तरी बोलायचे म्हणून बोललो आम्ही स्मार्ट नसलेल्यांनी ही एक ग्रुप नुकताच तयार केला आहे - शांती काय सांगतेस ? मी उडालोच होय , शांती सांगू लागली , आमचा ग्रुप दर महिन्यात एकदा भेटतो , आम्ही गप्प्पा मारतो, एकमेकांचे सुख , दु:ख जाणून घेतो, थोडावेळ थांबतो आणि निघतो . जणू आमची भिशीच म्हण की.. आवडेल तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये ' शांती, भावना, हर्ष, आनंद, स्वानंद, कल्पना यांना भेटायला? माझा चेहरा पडला , कपातील कॉफी कशीबशी संपवली आणि शांतीला म्हणलं , शांती मला महत्वाची मिटिंग आहे, निघायला पाहिजे, परत केंव्हा तुम्ही भेटणार असाल तेंव्हा मला कळवा, मी नक्की येईन फटाफट बिलं दिलं आणि तडक सर्विस सेंटर गाठले, दुरुस्तीला टाकलेला मोबाईल केंव्हा एकदा परत मिळतो असे झाले होते . मोबाईल हातात येताच पहिले स्टेटस फेसबुक, Whats app वर टाकायचे होते ' मला काही काळ शांती भेटली होती ……! ' ( कल्पक ) अमोल केळकर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया