झुंज मराठमोळी - मराठीची खांडोळी
कालपासून ईटीव्ही वर एक नवीन 'रियालिटी शो' सुरू झालाय. झुंज मराठमोळी नाव आहे त्याचं. श्रेयस तळपदे त्याचं सूत्र संचालन करणार आहे आणि अनेक मराठी 'सेलिब्रिटी'नी त्यात भाग घेतलाय. त्याचे पहिले दोन भाग काल आणि परवा प्रदर्शित झाले.
तशीही आजच्या घडीला मराठीची वाट लागलेलीच आहे. ती अजून कशी लागावी याची काळजी आपण मराठी मंडळी घेतच आहोत. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, मनोरंजनाच्या वाहिन्या आहेतच, शिवाय असंख्य मराठी (म्हणवणारी) मंडळी हे काम चोखपणे पार पाडत असतात. असो. तर हा झुंज नावाचा कार्यक्रम बघत होतो. अक्षय कुमार किंवा आता रोहित शेट्टी जसा दिसतो, वावरतो अगदी तसाच, श्रेयस तळपदे वागायचा प्रयत्न करतो. ते तितकंसं जमत नाही हा भाग निराळा. हा नक्की मराठी रोडीज चा कार्यक्रम म्हणावा की मराठी फियर फॅक्टर म्हणावा ते कळलं नाही पण रोडीच म्हणायला हवा. त्याच्याच तो जास्त जवळ जातो.
तर त्या कार्यक्रमातील मराठी आणि इतरही संदर्भातली काही निरीक्षणं
१. सुरुवातीपासून `महाराष्ट्रीयन' शब्दाचा वारंवार होणारा प्रयोग. `महाराष्ट्रीयन' हे मुळात शब्दाचं इंग्रजी रूप आहे. म्हणायचं तर मराठी म्हणा की. `महाराष्ट्रीयन' कशाला?
२. पहिल्या दोन भागातील खेळ अगदीच सोपे आणि बाळबोध होते. आणि त्यात त्यांनी आणलेलं हास्यास्पद नाट्य अगदीच वाईट झालं. म्हणजे वराहाच्या मूर्तीखालून हातातले चणे न सांडवता जाण्याचा खेळ. ती वराहाची मूर्ती बघून लगेच ओह माय गॉड वगरे म्हणून डोळे मोठे करण्याचं काहीच कारण नव्हतं. (वराह वराह म्हणणा-या त्या स्पर्धकांना वराह म्हणजे काय हे ठाऊक होतं का हाच मला प्रश्न पडलाय)
३. स्पर्धकांचं आंग्लाळलेलं मराठी कानात टोचत होतं. `मला इमिजिएटली असं फीलींग आलं' 'मी म्हटलं त्याला, आय डोन्ट थिन्क आय्ल बी एबल टू पुल इट ऑफ' अरे काय !? मराठी म्हणवता ना?
४. बर, श्रेयसही तसंच बोलतो. ६०% इंग्रजी. ४०% मराठी, तेही अशुद्ध.
५. `तू असं का म्हणालास?' `तू कधी आलास?' अशा वाक्यातला शेवटचा तो `स' खाऊनच टाकतात आजकाल मंडळी. म्हणालास च्या ऐवजी बोललास, वगैरे च्या ऐवजी वैगरे.... हे वेगळे मुद्दे आहेत.
६. गमतीचा भाग आणखी असाही, की मधे मधे एखादा स्पर्धक इतर स्पर्धकांवर ताशेरे ओढत असतो. त्याला त्याचेही पैसे मिळतात का माहीत नाही. पण ते शेरे इतके मूर्खपणाचे व हास्यास्पद वाटतात ऐकायला, की कार्यक्रमाच्या मनोरंजकतेत कमालीची भर पडते. पराग कान्हेरे विशेष.
एकूणच हा कार्यक्रम बघताना क्षणोक्षण मराठी ची कत्तल होताना दिसते. वाईट वाटतं. हाच कार्यक्रम असं नाही, सगळेच मराठी कार्यक्रम, सगळ्या वाहिन्या, कुणीच शुद्ध मराठीबद्दल आस्था बाळगून नाही. अर्थात यात करु काहीच शकत नाही कुणी फारसं; हां, चार सूज्ञांना सांगून पटवून देऊ शकतो. बाकी सारा मनोरंजनाचा भाग आहे.
मराठी मनोरंजन म्हणजे हिंदीची मारलेली कॉपीका भारतीय मनोरंजन म्हणजे पाश्चात्यांची मारलेली कॉपी ??