Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

“काल-प्रवास” (टाईम ट्रॅवल)

आ
आतिवास
Mon, 10/20/2014 - 12:48
💬 12 प्रतिसाद
प्रास्ताविक: “कालकूपि” (टाईम मशीन) मधून प्रवास करणं; भूत अथवा भविष्यकाळात जाता येणं ही काही तज्ज्ञांच्या मते निव्वळ कविकल्पना आहे. त्यांच्या मते प्रत्यक्षात असं काही घडल्याचा पुरावा नाही; आणि असं काही घडण्याची शक्यताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही. पण एक तर आपल्याला भूतकाळाचं परिपूर्ण ज्ञान आहे असं समजण्यात आपण चूक करत आहोत. कुणाला माहिती कशाच्या पायावर आपली आजची इमारत उभी आहे ते! ज्ञाताहून अज्ञात अधिक आहे. शिवाय कोणे एके काळी अशक्य वाटणा-या कल्पना आज आल्या आहेत ना अस्तित्वात? मानवी मनाची ताकद तर्काच्या ब-याच पल्याड असते. म्हणून “टाईम मशीन” आज ना उद्या अस्तिवात येईल असं मला वाटतं. त्यातून कुठे जायचं याची स्वप्नं पहायलाही मला आवडतं. पण ते असो. तो आजचा आपला मुख्य विषय नाही. मुख्य विषय आहे – “काल-प्रवास” (टाईम ट्रॅवल) केल्याचा माझ्याकडे असलेला पुरावा. योगायोगाची बाब अशी, की एका वेगळ्या विषयावर संशोधन करत असताना अचानक काही कागदपत्रं नुकतीच माझ्या हातात आली. त्यावरून असं निष्पन्न होतंय, की “टाईम मशीन”, “टाईम ट्रॅवल” या काही केवळ रिकामटेकड्या लेखकांनी रचलेल्या कल्पना नाहीत. असा प्रवास प्रत्यक्ष केला गेला आहे; त्याचं शब्दांकन केलं गेलं आहे. तेही अमेरिका किंवा जपानमध्ये नाही, तर या प्राचीन भारतवर्षात! विश्वास नाही बसत? ठीक आहे. सांगते मी सविस्तर. भाषांतरात काही उणिवा राहिल्या आहेत याची मला जाणीव आहे. पण तरी आशय नक्कीच पोचेल तुमच्यापर्यंत. वाचून बघा आणि सत्य-असत्याचा निर्णय तुमचा तुम्हीच करा. ***** कोवळा नचिकेत अत्यंत बुद्धिमान आणि ओजस्वी होता. त्याच्या वयाच्या मनाने तो अत्यंत प्रगल्भ होता. त्याची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती. शिवाय अत्यंत नम्र, कसली म्हणून घमेंड नव्हती त्याच्यात. खरं तर नचिकेतच्या या रूपाची ओळख त्याच्या संपर्कात येणा-या सर्वांना होती आणि त्याला विपरीत नचिकेत कधी वागला नव्हता. पण नचिकेतच्या स्वभावाचा आणखी एक पैलू मात्र जवळजवळ कुणालाच माहिती नव्हता. नचिकेत जितका बहिर्मुखी वाटायचा सगळ्यांना, तितकाच तो अंतर्मुखी होता. त्याला असंख्य प्रश्न पडायचे. सुरुवातीला तो सारखे प्रश्न विचारायचा – तातांना विचारायचा, गुरुजींना विचारायचा, सोबत्यांना विचारायचा. पण त्याला हळूहळू लक्षात येत गेलं, की जी उत्तरं तात किंवा गुरुजी देताहेत; त्याला तसा काही अर्थ नाही. म्हणजे त्याला तात्पुरती गप्प करायची ती उत्तरं; पण थोडा विचार केला की त्या उत्तरांत काही दम नाही हे त्याच्या लक्षात यायचं. तात समोर असताना तर हल्ली नचिकेत फारसा बोलत नसे. एक तर ते त्यांच्या व्यापात व्यग्र होते; आणि दुसरं म्हणजे त्यांना नाही आवडायचे नचिकेतचे प्रश्न. गुरुजीही हल्ली त्याला प्रश्न विचारण्यापासून प्रवृत्त करायचे – मग समजून उमजून नचिकेत पण गप्प बसायला लागला. प्रश्न थांबले ते फक्त बाहेरच्या लोकांसाठी – स्वत:शी मात्र नचिकेतचा वाद-संवाद चालू होता; त्यात काही खंड पडला नव्हता. ***** अगदी लहानपणापासून नचिकेतला सभोवताली घडणा-या गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल होतं. झाडं, डोगर, घरं, जमीन, आकाश – एका जागी स्थिर असतात; पण प्राणी, पक्षी, माणसं मात्र इकडे-तिकडे भटकू शकतात, एक जागा सोडून दुसरीकडे जाऊ शकतात याचं त्याला नेहमी आश्चर्य वाटे. यांच्या हालचालींचं काही नक्की गणित दिसत नव्हतं. आज चालतील, उद्या निवांत बसतील तर परवा धावतील – कशाचा काही भरोसा नाही यांचा. त्याउलट वारा – कुठून येतो, कुठं जातो माहिती नाही. त्याच्या येण्याजाण्याचा काही अंदाज बांधता येतो – पण खात्री नाही. तेच पावसाचं. एरवी कुठं असतो हा पाऊस? चंद, सूर्य आणि रात्रीच फक्त दिसणा-या त्या चांदण्या - यांची तिसरीच गोष्ट. माणूस, वारा, पक्षी यांच्यापेक्षा चंद्र-सूर्याची गोष्ट वेगळी. रोज सकाळी सूर्य उगवणार म्हणजे उगवणारच – या सूर्याला कोणी नियम घालून दिला असेल असा. तो चंद्र ठराविक दिवसांनी काही काळ दिसत नाही – तेव्हा तो कुठं असतो? हे सगळे कुठून येतात? कुठं जातात? परत पहिल्या ठिकाणी कसे येतात? कुणाच्या हुकुमावरून? आजूबाजूच्या माणसांमधले बदल पाहून नचिकेत अधिकच गंभीर झाला. लहान मुलं जन्माला येतात, ती मोठी होतात आणि तोवर म्हातारी माणसं मात्र श्वास थांबवतात आणि नाहीशी होतात. माणसं मरतात म्हणजे कुठं जातात? ही इतकी नवीन बाळं जन्म होईपर्यंत कुठं असतात? हे चंद्र, सूर्य जसे पुन्हापुन्हा येतात तशी ही मेलेली माणसंचं लहान मुलं म्हणून पुन्हा जन्माला येतात की काय? पण कोण ठरवतं हे सगळं? काय गुपित आहे नेमकं? कुणाला माहिती असेल ते? नचिकेत जसजसा मोठा झाला तसतसा ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या दोन संकल्पनांबाबत तो अधिक सखोल विचार करायला लागला होता. अगदी नेमकं सांगायचं तर या विचारांत त्याने एक ‘तप’ व्यतीत केलं होतं – कुणाच्याही मार्गदर्शनाविनाच. या प्रवासात त्याला ‘भौतिक शक्ती’चा म्हणजे जडद्रव्य मानल्या जाणा-या वस्तूंच्या शक्तीचा अजून चांगला उपयोग करता येईल अशी कल्पना सुचली होती. नचिकेतची विचार करण्याची ही पद्धत कालविसंगत होती. कारण सभोवताली जो तो विद्वान फक्त ‘मनाच्या’ ताकदीबद्दल बोलायचा. मानसिक शक्तीने सगळं काही साध्य होतं अशी त्याच्या भोवती विचारसरणी होती. भौतिक शक्तीचा नुसता विचार करणं देखील हिणकस मानलं जात होतं. पण नचिकेतला ‘मानसिक शक्ती’ला मर्यादा आहेत असा प्रत्यय अनेकदा आला होता. निव्वळ मानसिक शक्तीने सत्याचा अनुभव येत नाही, आलेला अनुभव कुठल्याही निकषांवर तावून सुलाखून बघता येत नाही हे त्याला कळत होतं. सत्याचा शोध व्यक्तीसापेक्ष असतो हे खरं, पण त्याची सिद्धता मात्र व्यक्तीनिरपेक्ष असायला हवी अशी नचिकेतची धारणा होती. जे तर्कसंगत नाही, ते केवळ जुनं आहे म्हणून त्याला जास्त किंमत द्यायची हे नचिकेतला पटत नव्हतं. काही नवे प्रयोग करून पाहायला हवेत; आणि या नव्या प्रयोगात भौतिक शक्तीचा यथोचित वापर होऊ शकतो अशी त्याची मनोमन खात्री पटली होती. त्या दिशेने त्याची वाटचाल आता एका विशिष्ट निष्कर्षाप्रत येऊन ठेपली होती. ‘आपला शोध आपण जाहीर करू तेव्हा समाजधुरीणांच्या काय प्रतिक्रिया येतील’ याविषयी अजून त्याच्या मनात शंका होती. त्याने भौतिक शक्तीचा वापर करणं बुजुर्गांना मान्य होणार नाही याचा त्याला अंदाज होता. आपल्या यशाने त्यांना कसा धक्का बसेल याचं चित्र नजरेसमोर येताना नचिकेतच्या चेह-यावर मंद हसू उमललं. आणि दुस-या क्षणी त्याच्या कपाळावर आठी उमटली. त्याचा इतका महत्वाचा प्रयोग चालू असताना त्यासाठी वेळ देण्याऐवजी त्याला या फडतूस कार्यक्रमात भाग घ्यावा लागत होता. काय ही सक्ती? तात त्यांना काय करायचं ते करोत, मला कशाला यात गुंतवताहेत? केवढा वेळ वाया जाणार या समारंभात! तो नसला तर नाही का चालणार? ***** नीट पाहिल्यावर नचिकेताच्या लक्षात आलं की हा समारंभ काही नेहमीसारखा लवकर आटोपणार नाही; काहीतरी मोठं प्रकरण दिसतंय यावेळी. फारच आवाज, गोंधळ आहे; आणि किती लोक ये-जा करताहेत सारखी? सगळे धावपळीत दिसताहेत! तात म्हणाले होते काहीतरी या कार्यक्रमाविषयी महिन्याभरापूर्वी – पण खरं तर नचिकेतने त्यांच्या बोलण्याकडे फार काही लक्ष दिलं नव्हतं. तो आज्ञाधारक मुलगा आहे – पण कधीकधी तो तंद्रीत असतो, त्यामुळे विसरतो. तात राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे सारखे काहीतरी ‘महत्त्वाचं’ करत असतात आणि नचिकेताला सांगत असतात. ‘आपण तेव्हा नीट ऐकायला पाहिजे होतं तात काय सांगतात ते, आणि सौम्य पण स्पष्ट नकार द्यायला होता या समारंभात सामील व्हायला’ असा विचार नचिकेतच्या मनात आला – पण आता त्याला उशिर झाला होता. नचिकेत काळजीत पडला. राजा वाजश्रवस, नचिकेतचा ‘तात’ देखील काळजीत होता. हा मुलगा सदैव कसल्या तंद्रीत असतो, हे त्याला कळत नव्हतं. राजपुत्र या नात्याने नचिकेतला त्याने काही कमी पडू दिलं नव्हतं. पण राजपुत्र असणं म्हणजे केवळ सुखाचा उपभोग घेणं नव्हे किंवा फक्त स्वत:ला जे पाहिजे ते करणं नव्हे. उपभोगासोबत कर्तव्यही असतात. पण नचिकेताला ना उपभोगात रस होता ना कर्तव्यांत. तो सदा एका वेगळ्याच विश्वात असतो हल्ली. त्याचं शरीर इथं असतं, पण मन भलतीकडेच. काळ मोठा कठीण आहे सध्या, वाजश्रवस विचार करत होता स्वत:शी: लोकांना राजा म्हणजे सर्वसत्ताधीश, अमाप संपत्ती हे दिसतं. पण राजाला कर्तव्यांचं किती ओझं असतं हे माझं मलाच माहिती आहे. नचिकेतचं भवितव्य ठरवण्याची आता वेळ आली आहे. ‘पित्याचा वारसा पुत्राकडे जावा’ अशी परंपरा आहे खरी, पण वास्तवात ते काही तितकं सोपं नाही. राजपुत्राला अनेक अनौपचारिक परीक्षांना सामोरं जावं लागतं, राजदरबारातल्या विद्वान आणि अनुभवी मंडळीच्या विविध अपेक्षांना पुरं पडणं काही सोपं नाही. त्यांचं समाधान झालं तरच ही गादी नचिकेतला मिळणार. नाहीतर राजदरबारी शोधतील कुणी नवा मुलगा आणि माझ्या मनात नसतानाही मला राज्यावर पाणी सोडावं लागेल. हा विश्वजित’ यज्ञ म्हणजे एक निमित्त आहे, ही आहे नचिकेतची परीक्षा. त्याची निवड झाली तर माझा अधिकार कायम राहील. काहीही झालं तरी हे साम्राज्य दुस-याच्या हाती जाता कामा नये. अर्थात नचिकेत तसा गुणी मुलगा आहे. नचिकेत बुद्धिमान आहेच, राज्य चालवण्यासाठी आवश्यक कौशल्यंही त्याच्यात आहेत. त्याच्यात शोधून पण दोष सापडणार नाही इतकं व्यवस्थित मी त्याला तयार केलं आहे. प्रजेला नचिकेत आवडतो, त्याच्यावर प्रजेचं आदरयुक्त प्रेम आहे हे अनेकदा दिसलं आहे. शिवाय नचिकेतमध्ये काही आध्यात्मिक शक्ती आहेत असंही लोकांना वाटतं ही उत्तम बाब आहे. राजपुत्राच्या आध्यात्मिक शक्तीमुळे ब्राह्मणावृंदाचा निदान काही वर्ष तरी त्रास नाही. पण राजपुत्राला या सगळ्या गोष्टीचं काही सोयरसुतक दिसत नाही. सगळ्या प्रजेचं लक्ष याच्याकडे असताना हा असा गंभीर आणि विचारमग्न का आहे? याच्या मनात काय चालू आहे नेमकं? काहीतरी विपरीत घडणार आहे अशी वाजश्रवसला मनोमन भीती वाटते आहे. पण ही भीती दुस-या कुणाला या अशा नाजूक वेळी सांगताही येणार नाही. न जाणो, अफवा पसरायची आणि राजदरबारी दुस-याच एखाद्याचं नाव पुढे आणायचे! आपणच आपली नचिकेतवर नीट नजर ठेवावी म्हणजे झालं! चार दिवस निभावले हे, की सगळं व्यवस्थित होईल. ***** ‘दानधर्म’ हा या ‘विश्वजित’ यज्ञाचा एक आवश्यक विधि. गरीब आले, विद्वान आले, लुळेपांगळे आले. शेकड्यांनी नाही तर हजारोंनी आले. सगळ्यांना काही ना काही देणं; त्यांचं समाधान होईल तोवर देणं भाग आहे. वाजश्रवसला आपण महत्प्रयासाने कमावलेलं धन असं अपात्री उधळून टाकायला खरं तर आवडत नाही. ‘या सगळ्या आळशी लोकांना दोन चाबूक मारून कामाला लावायला पाहिजे’ असं त्याला वाटतं; पण या क्षणी असं काही बोलायचं तर लांब, विचार करूनही चालणार नाही. हसतमुखाने धन वाटलं पाहिजे. राजा म्हणून त्याचं हे कर्तव्य आहे, ते पार पाडायलाच पाहिजे. कोषागार रिकामा होतो आहे. जमीन, सोने, दागिने, गोधन, घोडे, हत्ती ... एकामागून एक त्याच्या हातातून जाताहेत. अजून बरीच गर्दी आहे मंडपाबाहेर. त्यांनाही रिकाम्या हाताने परत पाठवता येणार नाही. आपण कंगाल झालो तरी चालेल पण एकही प्रजाजन आज रिक्त हाताने पाठवता येणार नाही. नोकर गायींचा एक नवा कळप घेऊन आले आहेत. या गायी धष्टपुष्ट दिसत नाहीत. या आहेत म्हाता-या गायी, भाकड गायी, मरणपंथाला टेकलेल्या गायी. त्यांचे अखेरचे पाणी पिऊन झाले आहे; शेवटचे गवत खाऊन झाले आहे; त्यांचे शेवटचे दूध केव्हाच काढले गेले आहे; त्या गलितगात्र आहेत. अशा गायी दान देणे योग्य नाही याची वाजश्रवसला जाणीव आहे; पण त्याचाही नाईलाज आहे. देण्यायोग्य सारे देऊन झाले तरी यज्ञमंडपात अजून इच्छुकांची गर्दी आहे. त्यांना जे शिल्लक आहे ते दिले पाहिजे. आता कुणाला नाही म्हणणे शक्य नाही, नचिकेतच्या भवितव्याच्या दृष्टीने आता कुणालाही दुखावता कामा नये. एकदा नचिकेतची राजा म्हणून निवड झाली की आज गेलेले सारे धन दामदुपटीने परत येईल. काही दिवसांचा तर प्रश्न आहे आता; कदाचित काही तासांचाच! नेमक्या त्या क्षणी नचिकेत तंद्रीतून जागा झाला. ‘भाकड गायी दान देऊन तातांना पुण्य मिळणार नाही, उलट ते पापाचे धनी होतील’ या जाणीवेने नचिकेत चिंताक्रांत झाला आहे. तात दांभिकपणा का करताहेत? चांगल्या गायी लपवून भाकड गायी का दान देताहेत? आत्ता आपण गप्प बसलो, तर या दांभिकपणात, या पापात आपणही सामील होणार. नकोच ते राज्यपद! राजा व्हायचं आणि स्वार्थाने पापाचं धनी व्हायचं – कोणी सांगितलाय हा उद्योग करायला? नचिकेताला तिथून निघून जावं वाटतं, त्याला तातांना जाब विचारावासा वाटतोय. त्याला भर यज्ञमंडपात या विधिचा फोलपणा सांगावासा वाटतोय. नचिकेतला उभा राहताना पाहून वाजश्रवसच्या काळजाचा ठोका चुकतो. नचिकेत ‘भाकड गायींचे दान शास्त्रसंमत नाही’ याची पित्याला आठवण करून देतो आणि उपरोधाने विचारतो, “मला कुणाला दान द्याल तुम्ही?” यज्ञाचे ज्येष्ठ ऋत्विज यातून काहीतरी मार्ग काढतील या अपेक्षेने वाजश्रवस शांत राहतो; पण ते तर नचिकेतकडे भारावल्या नजरेने पाहताहेत. पूर्ण यज्ञमंडपाची नजर नचिकेतवर खिळली आहे. लोकांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला दिसतो आहे. पुढच्या क्षणी प्रजा वाजश्रवसकडे अपेक्षाभंग झाल्याच्या नजरेने पाहते आहे, काहींच्या चेह-यावर तिरस्कार प्रकट होतो आहे. नचिकेतसारख्या बुद्धिमान आणि गुणी पुत्राने भर सभेत आरोप केला म्हणजे वाजश्रवसने नक्कीच जाणूनबुजून लांछनीय कृत्य केले आहे; शंकाच नाही काही. “मला कुणाला दान द्याल तुम्ही?” नचिकेत दुस-यांदा विचारतो. हजारो लोकांच्या या गर्दीत स्वत:च्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू यावी इतकी शांतता आहे. सगळ्यांच्या नजरा वाजश्रवसवर रोखलेल्या आहेत. आता मात्र वाजश्रवसची सहनशक्ती संपते. “हे माझं साम्राज्य आहे, यासाठी मी रक्त ओतलं आहे. माझ्या आयुष्याचा, माझ्या नावाचा, माझ्या कीर्तिचा, माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. आता मी गप्प बसलो, तर आजवर कमावलेलं सारं धुळीस मिळेल. माझ्याच प्रियतम पुत्राने माझी प्रतिष्ठा अशी मातीमोल करावी हे हृदयद्रावक आहे खरं – पण आता गप्प बसून चालणार नाही. हा माझा पुत्र असला तरी या क्षणी हा माझा शत्रू होऊन समोर आला आहे, त्याचा नायनाट करण्याविना गत्यंतर नाही”, वाजश्रवस विचार करतो आहे. “या मुलाला नको ते प्रश्न विचारायची खोड आहे – आपण ती नष्ट करू शकलो नाही हे दुर्दैवच. पुत्राच्या मूर्ख वागण्याने प्रजेला संभ्रमात टाकले आहे, प्रजेने त्याच्यावर विश्वास ठेवला तर मला वनवासात जावं लागेल हे राज्य सोडून. आता या मुलाचा त्वरित बंदोबस्त केलाच पाहिजे.” शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कार घडेल अशी आशा वाजश्रवसला आहे. पण नाही! “मला कुणाला दान द्याल तुम्ही?” नचिकेत तिस-यांदा विचारतो. शांत स्वरांत, ठामपणे, स्वत:ची वेदना लपवत वाजश्रवस म्हणतो, “नचिकेत, माझ्या प्रियतम पुत्रा, मी तुला यमराजाला दान देतो.” यज्ञमंडपात उपस्थितांच्या अंगावर जणू वीज कोसळली. सगळे अवाक् झाले. आपण एका ‘न भूतो न भविष्यति’ अशा क्षणाचे साक्षीदार आहोत या जाणिवेने अनेकांच्या हृदयाचे स्पंदन क्षणभर थांबले. मग भानावर येऊन कोणीतरी वाजश्रवसचा जयजयकार केला. ‘स्वत:च्या प्रिय पुत्राचं यमराजाला दान’ – केवढा मोठा त्याग आहे हा! असा त्याग ना आजवर कोणी केला, ना भविष्यात कोणी करेल. अत्यंत उच्च दर्जाचे आध्यात्मिक स्वरूपाचे दान आहे हे – जे केवळ वाजश्रवससारखा पुण्यवान पिता करू शकतो. मग आणखी कोणीतरी नचिकेतचा जयजयकार केला. असा दान देणारा पिता विरळा आणि असे दान मागणारा पुत्र त्याहून विरळा! ***** तातांची आज्ञा ऐकून नचिकेत क्षणभर गोंधळला. आपण आपल्या इच्छेने मरू शकत नाही याची नचिकेतला जाणीव आहे. आपले तात आपला वध करू शकणार नाहीत, त्यांचं हृदय इतकं कठोर नाही याचीही नचिकेताला जाणीव आहे. मग आता यमराजाकडे जायचं कसं? न गेलो, तर पित्याच्या आज्ञेचा भंग होईल, तोही प्रजेसमोर! तसं करून चालणार नाही, मग मी सुपुत्र म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहणार नाही. त्यामुळे यमराजाकडे जायला तर हवं – पण कसं? विचार करताकरता नकळत त्याच्या सोन्याच्या अंगठीत बसवून घेतलेल्या एका खड्याला नचिकेतचा स्पर्श झाला; आणि त्याचा चेहरा उजळला. हीच वेळ आहे ‘भौतिक शक्ती महत्त्वाची आहे’ हे गृहितक तपासून पाहण्याची. नचिकेतकडे विचार करायलाही वेळ नाही. एका क्षणात त्याने निर्णय घेतला. प्रजा जयजयकारात मग्न असताना, हजारो लोकांच्या साक्षीने, ज्यात असंख्य विद्वज्जनही होते त्यांच्या साक्षीने, हतबल पित्याच्या समोर नचिकेत अदृश्य झाला. गर्दी पुन्हा एकदा चकित झाली. अनेकांच्या अंगावर काटा आला, कैक लोकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. वाजश्रवसच्या आध्यात्मिक शक्तीचा याहून कोणता मोठा पुरावा पाहिजे? त्याचे शत्रू आता राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाहीत. अशा पुण्यवान पित्याचा तितकाच पुण्यवान पुत्र! दोन पुण्यात्म्यांचे दर्शन आज झाले! पुन्हा एकदा वाजश्रवस आणि नचिकेत यांचा जयघोष सुरु झाला. ***** भौतिक आणि मानसिक शक्तींचा संगम कसा साधायचा याबाबत नचिकेतच्या मनात हजारो कल्पना येऊन गेल्या होत्या आजवर. प्रयोग अयशस्वी झाला तर काय याचा विचारही केला नव्हता त्याने – कारण ती कल्पनाही भयावह होती. भौतिक आणि मानसिक यांच्यात परंपरा ‘मानसिक’ सामर्थ्याच्या बाजूने झुकली होती. त्याचा प्रतिवाद करताना कळत-नकळत नचिकेत भौतिक सामर्थ्याच्या बाजूला झुकला होता. पण आज प्रत्यक्ष कल्पना अंमलात आणताना नचिकेतने भौतिक आणि मानसिक दोन्ही शक्तींचा यथायोग्य वापर केला होता. एकाच शक्तीवर जोर देण्याऐवजी भौतिक सामर्थ्य आणि मानसिक सामर्थ्य यांचा समतोल साधत वाटचाल केली तर अनेक नवी क्षितिजे पादाक्रांत करता येतील याची नचिकेतला प्रचिती आली. आपण असे क्षणात अदृश्य झाल्याचा उपस्थितांवर काय परिणाम होईल याचा विचार आणि त्याची चिंता करत बसायला नचिकेतकडे त्याक्षणी वेळ नव्हता. पण जे झाले त्यातून अनेक नव्या शक्यता नचिकेतला दिसू लागल्या. उरलेलं आयुष्य मानसिक आणि भौतिक शक्तींच्या संतुलनाचे अधिक प्रयोग करण्यात घालवायचा, राजा बनायचं नाही हे नचिकेतचं त्या क्षणी पक्कं ठरलं. ***** Rest, as they say, is a History! नचिकेतचा “काल-प्रवास” उत्तम रीत्या शब्दबद्ध झाला आहे. त्यासंबधी अधिक माहिती जाणून घेण्यास उत्सुक असणा-या वाचकांनी ‘कठोपनिषद’ जरूर वाचावे. नचिकेत यमाकडे गेला; तिथे तीन दिवस आणि तीन रात्री त्याने उपाशीतापाशी यमाची कशी वाट पाहिली; यमराज आणि नचिकेत यांची भेट; यमराजाने नचिकेतला दिलेले तीन वर .... सगळं वर्णन आहे कठोपनिषदात! त्याची सविस्तर चर्चा इथं नको. महत्त्वाचा मुद्दा असा की, मानवी ज्ञात इतिहासात “काल-प्रवास” करणारा नचिकेत हा पहिला मनुष्य आहे. तो भविष्यात गेला (यमराजाची भेट म्हणजे मृत्यू, आयुष्याचा शेवट) आणि सुरक्षित परत आला. त्याचे तात आणि प्रजाजन त्याला ओळखतील अशा पूर्वीच्याच रुपात तो परत आला. अर्थात कशामुळे ते नक्की नाही सांगता येणार (संशोधन करावं लागेल) पण त्याच्या समकालीनांना नचिकेतच्या ‘काल-प्रवासाची’ काही कल्पना आलेली दिसत नाही, ते कायम ईश्वरेच्छा, नचिकेतची पुण्याई, यमराजाची कृपा, नचिकेतची आध्यात्मिक ताकद अफाट असल्याने तो यमराजाला भेटून परत येऊ शकला असे समजत राहिले. नचिकेतसारख्या बुद्धिमान आणि चाकोरी तोडणा-या माणसानंद इतरांपासून सत्य लपवून ठेवलं असेल असं प्रथमदर्शनी वाटत नाही. कदाचित काळाच्या ओघात नचिकेतने लिहिलेला “काल-प्रवासाचे मूलभूत सिद्धान्त” (बेसिक कन्सेप्ट्स ऑफ टाईम ट्रॅवल) हा ग्रंथ नष्ट झाला असेल; कदाचित ते ज्ञानही नष्ट झालं असेल अज्ञानातून, वापर न झाल्याने. एकदा ज्ञान नष्ट झालं की उरतात त्या फक्त “कथा” – दुर्दैवाने तसंच काहीसं इथंही झालं असेल असं वाटतं. ***** समारोप: मूळ कागदपत्रं वाचून त्यांचा अर्थ लावण्यात बरेच दिवस गेले. तोवर आणखी एक बातमी मिळाली. काही नवी (म्हणजे जुनीच पण नव्याने) कागदपत्रं सापडली आहेत. ती अजून पूर्ण वाचून व्हायची आहेत. पण थोडक्यात सांगायचं तर “नचिकेतच्याही आधी एका स्त्रीने असा “काल-प्रवास” केला होता” असं नुकतंच उघडकीस आलं आहे. म्हणजे पहिल्या “काल-प्रवासा”चं श्रेय पुरुषाला नसून एका स्त्रीला आहे. नचिकेत आपलाच आहे, त्यामुळे त्यातही आनंद होताच, पण तो मान भारतीय स्त्रीला मिळण्यात एक भारतीय स्त्री म्हणून मला विशेष आनंद होतोय. विशेष म्हणजे या भारतीय स्त्रीने काही सिद्ध करण्यासाठी नाही तर एका पुरुषाचा (अर्थात तिच्या पतीचा) जीव वाचवण्यासाठी “काल-प्रवास” केला. यातला परोपकार या “काल-प्रवासा”ला ‘मानवी चेहरा’ देतो हे निर्विवाद! बरोबर आहे तुमचा अंदाज! मानवी ज्ञात इतिहासात पहिला “काल-प्रवास” केला तो सावित्रीने! होय, तीच ती सत्यवान- सावित्री मधली सावित्री. पण इथंही अभ्यासकांत वाद आहेत. वाद नसतील तर ते तज्ज्ञ कसले म्हणा! नचिकेत यमराजाच्या घरी पोचला होता तर प्रत्यक्ष यमराज सत्यवानाचे प्राण हरण करण्यासाठी पृथ्वीतलावर आले होते – त्यामुळे सावित्रीचा प्रवास “काल-प्रवास” नाही असं काही लोकांचं मत आहे. याही क्षेत्रात स्त्री विरुद्ध पुरुष असा वाद निर्माण होणं मला दुर्दैवी वाटतं. पण नाईलाज आहे. सध्या अनेक विषयातली तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन सावित्रीच्या “काल-प्रवासा”विषयी संशोधन करण्याची योजना बनवत आहेत. त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे, स्वयंसेवी कार्यकर्त्या स्त्री-पुरुषांचीही गरज आहे. निवडक लोकांना “काल-प्रवासा”ची संधी मिळेल. नोंद: ‘कठोपनिषद’ माझं अत्यंत आवडतं उपनिषद आहे. माझ्यासाठी ते अमूल्य आहे. त्यातल्या मूळ कथेचा आधार घेऊन केलेला हा कल्पनाविलास आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. *****

प्रतिक्रिया द्या
7530 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ज
जेपी Wed, 10/22/2014 - 06:26 नवीन
निवडक लोकांना “काल-प्रवासा”ची संधी मिळेल. माझा नंबर लागेल का ?
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 10/24/2014 - 08:48 नवीन
"मी पयला" चळवळीच्या संस्थापकांचा नंबर न लागून कसं चालेल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ए
एस Wed, 10/22/2014 - 07:55 नवीन
एका वेगळ्या पद्धतीने केलेला विचार.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 10/22/2014 - 18:34 नवीन
अतितरल कल्पनाविलास. काल ही चौथी मिती मानली तर नचिकेताचा त्याहीपुढच्या एखाद्या मितीत प्रवेश झाला असण्याचीही शक्यता आहे. लेख त्याच्या वेगळेपणामुळे विशेष उठावदार झाला आहे.
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 11/05/2014 - 08:05 नवीन
धन्यवाद स्वॅप्स आणि स्नेहांकिता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 10/27/2014 - 06:06 नवीन
१५०-२०० वर्षांपुर्वी विमानं, पाणबुड्या, रॉकेट्स आणि रोबोट्स हे सगळं अशक्यप्राय वाटतं होतं. कोणाला माहीत उद्या काल प्रवासही शक्य होईल. टेलिपोर्टेशनला काही अंशी यश मिळालेलं आहेचं. :)
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 11/05/2014 - 08:06 नवीन
शक्यतेच्या शक्यता फार मोठ्या आहेत आणि आज कदाचित आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
P
Pradip kale Mon, 11/03/2014 - 14:54 नवीन
Nachiketacha pravas ha "kal-pravas" asala tarihi to kahi anshi "parlok pravas" mhanaje dusarya vishwatil pravas vatato. mi ji yapurvi nachiketachi katha "nachiket aakhyan" ya granthat vachali tyavarun ase vatate .
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Wed, 11/05/2014 - 08:09 नवीन
ही कथा म्हणजे अर्थातच कल्पनाविलास आहे. तुम्ही म्हणता तसा त्याचा परलोक प्रवास असाही अर्थ लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pradip kale
प
पैसा Mon, 11/10/2014 - 18:06 नवीन
जबरदस्त कल्पनाविलास आहे, पण महत्त्वाचं म्हणजे त्या कथेला घेतलेला नचिकेताच्या कथेचा आधार! खूपच छान! ज्ञानलालसा असलेला छोटा नचिकेत आणि इहलोकीच्या धनाचा तसंच परलोकीच्या सुखाचा लोभी त्याचा पिता, ज्ञानदान करणारा साक्षात मृत्युदाता यम! सगळंच विलक्षण आहे, आणि त्याला सजवलेला कालप्रवासाचा साज या सगळ्याला अधिकच विलक्षण बनवतो आहे! मस्त!
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Sun, 11/30/2014 - 06:36 नवीन
कथा आवडली…. इंग्रजी सिनेमा यावर नक्की निघू शकेल. कॉपी राईट जप या कथेचे….
  • Log in or register to post comments
आ
आतिवास Fri, 12/19/2014 - 10:07 नवीन
कॉपी राईट जप या कथेचे… थोडा ट्विस्ट सोडला, आणि अर्थ काहीसा वेगळा लावला आहे हे सोडलं; तर कथा फार जुनी आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा