वाल्मिकीचा वाल्या कोळी होतो तेव्हा ….
फडणवीस नानांना सोशल मिडिया वरून पडणारे शिव्या शाप बघून खरच वाईट वाटलं …
गेली ५ वर्ष स्वतःचे ईमान न विकता सत्ताधार्यांचे वाभाडे काढणारे फडणवीस अक्षरशः केविलवाण्या चेहऱ्याने स्वताचा बचाव करत होते … त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता लपत नव्हती …पण हे सारे असे का घडले ?
भाजपला मिळालेल्या यशाचा इतका माज चढला का ?
का सेनेचा मूर्खपणा सगळ्यांना नडला ?
शरद पवारांचे मुरब्बी राजकारण सगळ्यांना भारी पडले म्हणावे ?
का आपमतलबी आणि अप्पलपोटेपणाचा नमुना म्हणायचा ?
या सगळ्या प्रश्नांची माझ्या परीने केलेली हि उकल …
भाजप ला यश पचवत आले नाही हे तर खरेच आहे… लोकसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारे मोदी कुठे आणि बहुजन समाजाला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारे, अजित पवारांना बेड्या ठोकायची भाषा करणारे नेते कुठे ?
भाजप ने युती तोडली पण ते एका अर्थी योग्यच होते. सेनेच्या हटवादी आणि एककल्ली नेतृत्वापासून सुटका करून घेणं गरजेच होतंच … लोकसभेला मोदींमुळे निवडून आलेल्या खासदारांच्या बळावर वल्गना करणाऱ्या सेनेला त्यांची जागा दाखवून देण्यात काहीच चूक नव्हतं … पण सेनेने प्रचारात अगदीच खालची पातळी गाठली आणि निकालानंतर सहज एकत्र येऊ शकणारे एक-मेकांचे वैरी झाले…
सेनेची तऱ्हाच वेगळी, शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या उद्धवना (आणि इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या त्यांच्या वारसांना) कोणीतरी स्वाभिमान या शब्दाचा अर्थ सांगणारी डिक्शनरी भेट देण्याची गरज आहे … निकाल लागताच आम्ही भाजप बरोबर जाऊ असे जाहीर न करता स्वाभिमानाची बिरबली थाटाची खिचडी शिजवत बसल्याचे परिणाम आज ते भोगत आहेत …
पण हे सगळ असूनही कालचा प्रसंग टाळता आला असता … दिल्लीच्या नेत्यांना राज्याची समीकरणे न समजल्याने सगळाच गोंधळ झाला … फडणवीसांना शिवसेनेला बरोबर घेण्याची मनापासून इच्छा होती असे वाटत होते … राष्ट्रवादीचा पाठींबा म्हणजे असंगाशी संग इतकं तर ते नक्कीच ओळखून आहेत … पण मोदी -शहा जोडीने शत्रूचा(कॉन्ग्रेस ) शत्रू तो आपला मित्र म्हणून राष्ट्रवादी ला जवळ करायचं धोरण आखलं … राज्यातल्या जनतेमध्ये राष्ट्रवादी बद्दल असलेल्या रागाचा आणि संतापाचा अंदाज फडणविसांना नक्कीच असणार … म्हणूनच ते शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करत राहिले … पण सरकारमध्ये जाण्याचे दरवाजे शिवसेनेने "अफजल खान" आणि "मोदींचा बाप" बरळून स्वतःच बंद केले होते … त्यामुळे सेनेला अद्दल शिकवण्यासाठी मोदी -शहा आतुर झाले असतील तर त्यात चूक काहीच नाही …त्यात भर घातली ती फडणवीस यांच्या दिल्लीतल्या भाजप मधल्याच हितशत्रूंनी ….
त्यात सेनेच्या अपरिपक्व नेतृत्वाने तळ्यात मळ्यात करून स्वतःचे हसे करून घेतले आणि असलेली bargain power घालवून ठेवली ….
या सगळ्या गोंधळाचा फायदा शरद पवारांनी उचलला नसता तरच नवल … त्यांनी एकाच वेळी किती पक्षी मारले बघा …
१. शिवसेना आणि भाजप मध्ये दुरावा निर्माण केला - A divided house is easy to rule.. आणि स्वतःचा खरा शत्रू कोण हे न ओळखता येणाऱ्या, स्वताच्या बळाच्या अवास्तव कल्पना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पवारांचं काम अगदीच सोप करून ठेवलं आहे …
२. अजित पवार यांचे पक्षातले वाढते वर्चस्व एका झटक्यात कमी केले …. पाठींबा असेपर्यंतच अजित पवार आणि त्यांचे सहकारी चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचतील … पाठिंब्याच्या नाड्या अर्थातच शरद पवारांच्या हातात असतील … त्यांचे निमूट ऐकण्याशिवाय "टगे गैंग"कडे पर्याय नाहीये …
३. भाजप सरकार काम सुरु करायच्या आधीच बदनाम झालं आहे … लोकांच्या रागाला आणि रोषाला त्यांना सामोरं जाव लागणार आहे….
४. सत्तेचे फायदे असेहि राष्ट्रवादीला (पवारांना) मिळत राहणार आहेत … भाजप मध्ये निवडणुकी आधी गेलेली १०-१५ डोकी आणि बाहेरून दिलेला पाठींबा याच्या बळावर पवार हवे तसे खेळू शकतात …
५. स्थिरते साठी भाजप च्या सरकारला बिनशर्त पाठींबा देऊन त्यांना लोकांपर्यंत त्याचं काम पोचवायची संधीच न देता १-२ वर्षात परत निवडणुका लादायच्या … लोकांचा विश्वास गमावून बसलेला भाजप, केंद्रातला सत्तेतला वाटा गेलेली, स्वाभिमानाचा मुद्दा आणि लढायची उमेद हरवलेली शिवसेना … मोदिंसमोर हतबल काँग्रेस … मग सत्ता कोणाची ??
या जाळ्यामध्ये भाजप आणि सेना अलगद अडकले आहेत … मोदींना सरळ दोन हात करायची माहित आहे … गनिमी कावा हा याच महाराष्ट्राच्या मातीत पिकतो… त्यांना जो पर्यंत हा सापळा कळेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल …त्यांच्या पाठीत राष्ट्रवादीचा खंजीर खोलवर रुतलेला असेल….
वाईट याच वाटत कि, या सगळ्यात फडणवीस यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक माणसाचा बळी जाणार आहे …अशी माणसे आधीच दुर्मिळ होत चालली आहेत…
एका वाल्मिकीचा परत वाल्या कोळी झालेला बघणे इतकंच आता महाराष्ट्राच्या हातात आहे …
Copied from my Blog: http://kahitariasech.blogspot.in
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }