Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ह..ह..ह..ह. हरिश्चंद्रगड

व
वेल्लाभट
Wed, 01/07/2015 - 13:18
💬 53
नमस्कार.... २०१५ ची पहिली ट्रेकमोहीम हरिश्चंद्रगडावर करून झालेली आहे. त्याचा सचित्र वृत्तांत सादर आहे. ब्लॉगचा दुवा हा. आजवर ट्रेकिंग करणा-या कुणालाही भेटलो आणि लोहगड, तिकोना, राजगड, रायगड, नाणेघाट इत्यादी नावं मी घेतली, की 'अरे! तू हरिश्चंद्रगड ला जा; वेडा होशील.' असं तो म्हणणार हे अगदी निश्चित होतं. त्यामुळे हरिश्चंद्रगड हा काहीतरी भारी प्रकार आहे हे मला पक्कं कळलेलं होतं. जालावर, ब्लॉग्सवर जेवढं त्याबद्दल वाचत गेलो, तेवढी तिथे जायची उत्कंठा वाढत गेली. पण 'जमेल का?' हा प्रश्न पडल्याने तीन चार वेळा बेत पुढे ढकलण्यात आला. अखेर 'जमेल का?' ला 'जमवूच' असं बदलून हरिश्चंद्रगड मोहीम आखली. मोहीम झाली. जबरदस्त झाली. आणि आता कुणी हरिश्चंद्र ला जा असं म्हणेल तेंव्हा मीही म्हणेन 'जा म्हणजे काय? गेलोय मी!' 2331 गड तर ठरला. हरिश्चंद्रगड. तारीखही ठरली. आता कसं जायचं हा प्रश्न होता. चार (किंवा त्याहून जास्त) वाटा असलेल्या या पर्वतावर कुठल्या वाटेने जावं हे कळत नव्हतं. पाचनई सोप्पी, तोलार खिंड लांब, नळीची वाट कठीण असे पर्याय होते. शेवटी भेळवाल्याला जसं तीखा/मीठा/मिडियम मधलं मिडियम सांगावं तशी (आमच्यासाठी) मिडीयम कठीण म्हणजेच तोलार खिंडीची वाट आम्ही सर्वानुमते निवडली. 2341 अनुप, स्वानंद, मी, आणि प्रसन्न सकाळी ९ च्या ठोक्याला खिरेश्वर गावातील मेमाण्यांच्या घरात थडकलो. गाडीचा धुरळा बसेस्तोवर चहा पोह्यांची व आमलेट-भाकरीची ऑर्डर सुटलेली होती. आजूबाजूला उंचच उंच सह्यकडे होते. थंड हवा सुटलेली होती. लांब पूर्वेकडे पिंपळगावच्या धरणाचा विशाल जलाशय संथ पसरलेला होता. मधूनच एखादा बगळा येऊन अंगणातल्या झाडावर बसत होता. एकंदरित निवांत अनुभवायचं वातावरण होतं. परंतु आमच्या कार्यक्रमाच्या रुपरेषेत त्या वेळी निवांतपणा नव्हता. पोटभर नाश्ता करून सॅक सोबत उन्हांना अंगावर घेत आम्ही वाट चढायला सुरुवात केली. 2412 सोबतीला दोन छोटे सवंगडी घेतले. वाट चुकून वेळ जाऊ नये म्हणून. त्यांना टाटा केल्यावर पुढे जराशी वाट तरीही चुकलोच तो भाग वेगळा. तर सुधीर आणि गौरव आम्हाला एक-सव्वा तासात तोलार खिंडीत घेऊन गेले. पहिला पडाव पार. पुढे रॉकपॅच च्या सुरुवातीला त्यांना अच्छा केला, आणि आम्ही पुढे निघालो. रॉकपॅच म्हणावा तितका अजिबात कठीण नाही. कठीण झाला असता त्या ठिकाणांवर लोखंडी कुंपण लावलेलं असल्यामुळे तो अजूनच सोपा झाला आहे. इथे काही इन अ‍ॅक्शन फोटो झाले. जिकडे बघावं तिथे भरभरून सह्याद्री पसरलेला होता. साधारण पाउण तासात रॉक पॅच चढून आम्ही दुसरा पडाव पार केला. 2465 एक झटपट लिंबू सरबताची फैर झाडली आणि मग आम्ही पुढे निघालो. अधून मधून क्लिका क्लिकी चालूच होती. सात टेकड्या ओलांडून जाण्याचा हा तिसरा टप्पा होता. इथे जराशी वाट चुकलो आम्ही, पण पुन्हा योग्य रस्ता मिळालाही. दरम्यान भास्कर ला फोन लावून आम्हाला रस्ता मिळत नाहीये असं सांगण्यात आलं होतं, आणि योग्य वाटेवर अर्धं अंतर गेल्यावर आम्हाला त्या भास्करचं दर्शन झालं. तो बिचारा जवळपास एक दोन किमी आम्हाला शोधत शोधत आला होता. माणुसकीचं जिवंत उदाहरण या अशा माणसांमध्ये बघावं. मग भास्कर पुढे, आम्ही मागे. रॉकपॅच पासून दोन तासात आम्ही हरिश्चंद्रेश्वराजवळ पोचलो. विश्रांतीथांबे धरल्यास पायथ्यापासून पाच तास. 2468 तिथे एका खोपट्यात पिठलं, भाकरी, कढी आणि ठेचा असं फर्मास जेवण तयार होतं. या अशा दमल्या भागल्यानंतर मिळणा-या, चुलीवरच्या साध्या सरळ जेवणाची सर इतर कशालाही येणार नाही. त्यात हसतमुखाने वाढणारी तितकीच साधी सरळ मंडळी असतील तर विचारायलाच नको. तृप्त होऊन, थोडी हरिश्चंद्रेश्वराजवळ क्लिकाक्लिकी करून मूळ मुद्द्याकडे वळलो. 2471 2474 कोकणकडा! सतराशे फूट उंच, नागफण्यासारखे अंतर्वक्र कातळदिव्य म्हणजे हरिश्चंद्रगडाची खरी ओळख. इथे जाऊन तुम्ही नि:शब्द नाही झालात तर नवलच. सह्याद्रीचा हा अशक्य आणि अफाट आविष्कार बघण्यासाठी मी आसुसलो होतो. चार वाजून गेले होते आणि कोकणकड्यावरचा सूर्यास्त आम्हाला चुकवायचा नव्हता. झपाझप पावलं टाकत अर्ध्या तासात 'भास्कर कोकणकडा' या भास्करच्या हॉटेलाजवळ पोचलो. तिथे मामा, म्हणजेच भास्करचे वडील उभे होते. इतक्यात भास्करही आला. तंबू कुठे लावायचा ते सांगून आम्ही चहाची फर्माइश केली. मामांनी अगदी आमच्या मनातलं ओळखलं, आणि म्हणाले, "तुम्ही जा कड्यावर, मी चहा तिथे घेऊन येतो" आयला! कोकणकडा, संध्याकाळ, सूर्यास्त, थंडगार वारा, बेमिसाल नज़ारा, चार मित्र आणि वाफाळता चहा; म्हणजे; याहून भारी काय? 2496 2562 कड्यावर गेलो, झोपून दरीत बघणं झालं, सैरभैर जिकडे तिकडे फोटो काढून झाले, चहा पिऊन झाला आणि एक कधीही न विसरता येणारी संध्याकाळ मनात घर करत मावळतीला लागली. आजकाल हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी नाशिककडून एक सोप्प्पा मार्ग सुरू झाल्याचं कळलं. इतका सोपा की आबालवृद्ध अगदी आरामात तिथे पोचू शकतात. त्याची प्रचीती कोकणकड्यावर जमलेल्या गर्दीतून आली. अर्थात आम्ही त्यापासून लांबच रहात होतो त्यामुळे आमच्या आनंदात मिठाचा खडा पडला नाही. 2593 सूर्य अस्ताला गेला आणि आम्हीही परत आमच्या तंबूकडे परतलो. ताजेतवाने झालो. जेवायला अवकाश होता. त्यामुळे भास्करच्या हॉटेलाबाहेरच खडकांवर आम्ही चौघे, पुण्याहून आलेले आमचे चार मित्र, तिथे आलेलेल आणखी दोन तीन जण अशी गप्पांची मैफल जमवली. अर्थातच चहा हातात होता. तासभर गप्पात गेला. एव्हाना थंडी वाढलेली होती. आम्ही भास्करच्या हॉटेलात आत चुलीजवळ जाऊन बसलो. डाळ, भात, पापड, लोणचं असा बेत होता. भास्करची आई चुलीवर स्वयपाक करत होती. गरम गरम भात, अफलातून अशी आमटी म्हणजे डाळ, असंख्य वन्स मोअर मिळवणारा पापड, आणि चटक्क्कदार लोणचं मनसोक्त खाऊन, मनोमन 'अन्नदाता सुखी भव' म्हणून आम्ही तंबूत परतलो. थंडी मी म्हणत होती. अंथरूणं, पांघरुणं, स्वेटर, कानात कापूस, कानटोप्या, पायात मोजे असा प्रत्येकाने आपापला बंदोबस्त केला. झोपेची आराधना सुरू झाली. पण थंडी वाढतच होती. स्वानंद सोडून आम्ही तिघेही चळवळत होतो. उपडं, कुशीवर, मुटकुळं करून, उलटं, सुलटं असे झोपण्याचे सगळे प्रकार चार एक तास करून झाले पण झोप लागेना. अनुपच्या म्हणण्याप्रमाणे, 'थंडीमुळे बळी कसे आणि का जात असतील त्याची पुसटशी कल्पना आली.' शेवटी पाच वाजता मी आणि अनुप तसेच कुडकुडत भास्करच्या हॉटेलाशी गेलो, हाक मारली आणि शेकोटीसाठी चार लाकडं दे अशी मागणी केली. मामा उठले आणि आम्हाला शेकोटी पेटवून देऊन गेले. शेकोटीची ऊब आम्हाला जाणवायलाच मुळी अर्धा तास गेला. मग कुठे जरा बरं वाटलं. अगदी उजाडेपर्यंत मग दोघे तिथेच बसून होतो. 2673 पुढे प्रसन्न आणि स्वानंदही आले. कड्यावर लगबग सुरू झाली. कुणी तारामतीला जायला निघाले, कुणी परत जायला निघाले, तर कुणी फोटो काढण्यात गुंतले. आम्ही तारामतीला जाणार नव्हतो. नाश्ता करून आम्हाला परत फिरायचं होतं. त्यामुळे चहा, बिस्किटं, सोबत आणलेले केक, खाकरा, असं खाऊन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. खरं तर कोकणकड्यावरून पुन्हा एकदा वाकून बघायची इच्छा होती कारण कोकणकडा पुरलाच नव्हता, पण ढग आणि धुक्यामुळे वीस पंचवीस फुटापलिकडे काहीही दिसत नव्हतं, त्यामुळे प्रश्नच नव्हता. भास्करचे आभार मानून, पुन्हा येण्याची निश्चिती देऊन आम्ही निघालो. सुमारे चार तासात आम्ही पुन्हा खिरेश्वरला मेमाण्यांच्या घरी होतो. aaa aaaa हरिश्चंद्रगडाने पहिल्या भेटीत अपेक्षेपेक्षा बरंच काही दिलं होतं, पण ते पुरलं बाकी अजिबात नव्हतं. त्यामुळे परत येणं तर नक्की होणारच. कोकणकड्याने मला इतकी भुरळ घातली आहे, की घरी येऊन 'कोकणकड्यावर 'अस्सं' झोपून खाली बघायचं' हे सांगताना घराच्या फरशीतूनही माझ्या डोळ्यांना ती खोल दरी दिसत होती.

प्रतिक्रिया द्या
18355 वाचन

💬 प्रतिसाद (53)
स
स्पार्टाकस Sat, 01/17/2015 - 03:15 नवीन
नऊ वाटा आहेत हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी! मागे कुठल्यातरी धाग्यावर मी या सर्व वाटांचा उल्लेख केला होता. यापैकी आठ वाटांनी मी चढलो-उतरलो आहे. ९ व्या वाटेने रॅपलिंग करुन उतरलो आहे, पण चढलेलो नाही! ही ९ वी वाट म्हणजे अर्थातच कोकणकडा हे वेगळं सांगायला हवं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 01/17/2015 - 20:58 नवीन
दहावी वाट किरणने ओपन केलीय रोहिदास शिखराच्या बाजूकडून. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पार्टाकस
व
वेल्लाभट Fri, 01/16/2015 - 10:03 नवीन
स्वॅप्स यांची मेहनत आणि माहिती त्यांच्या प्रतिसादातून दिसते. उत्तम प्रतिसाद. अनेक धन्यवाद ! नकाशा सहीच.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा