Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Fri, 01/30/2015 - 06:11
बायल्यावाणी कायले मरतं? : नागपुरी तडका

बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
सरणावरुन उठ... आनं... मशाल हाती धर ...!!

तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला?
येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला?
त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून
संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून
लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!!

कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड
आला दिवस तसा... मानून घे तू गोड
कुणी आला ’यम’ दारी... शब्द त्याचे छाट
“पिकलं तवा लुटलं”... झालं फ़िट्टमफ़ाट
धमन्यामंधी बारुद भर... आनं... आवाज मोठा कर ...!!

जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून
श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून
तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर
एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!

कायदा तुह्या विरोधात... ’अभय’ नाही तुले
म्हूनशान लढले भाऊ.... शरद जोशी - फ़ुले
तुह्यी हाक घेण्यासाठी... सरकार मूकं-बह्यरं
आपण सारे मिळून लढू... करू त्याले सह्यरं
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!

                                  - गंगाधर मुटे ’अभय’
------------------------------------------------------


प्रतिक्रिया द्या
14142 वाचन

💬 प्रतिसाद (56)
व
विटेकर Fri, 01/30/2015 - 06:15 नवीन
मजा आली ! सुरेख
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:29 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/30/2015 - 06:50 नवीन
लै भारी ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:29 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चुकलामाकला Fri, 01/30/2015 - 07:30 नवीन
सहमत!!
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:30 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
स
सस्नेह Fri, 01/30/2015 - 07:51 नवीन
उचित अन झणझणीत कविता..! 'बायल्या' या शब्दाबद्दल असहमत. 'बाई'चं मरण एखाद्या पुरुषानं मरून दाखवावं, तर मानू.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 01/30/2015 - 08:02 नवीन
ओ अनहिता .. वाच्यांश नको लक्ष्यांश पहा ना ! आणि बोलीभाषेतील शब्द आहे , तेव्हडे स्वातन्त्र्य द्या की कवीला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:31 नवीन
विशेष धन्यवाद सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
व
विशाखा पाटील Fri, 01/30/2015 - 08:02 नवीन
जोशपूर्ण कविता! स्नेहांकिताशी सहमत. उलट अशा शेतकऱ्यांच्या बायकाच तर हिमतीने लढतायत. मुळात 'बायल्या' आणि 'मर्द' अशा कल्पनांमधून बाहेर पडायला हवं.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 01/30/2015 - 08:04 नवीन
शेतकर्‍यांनी आत्महत्या करू नयेत , प्राप्त परिस्थितीत धीराने उभे रहावे.. अशासाठी कोणी संस्था/ व्यक्ती काम करते का ? (राजकीय नको) तिथल्या मानसिकतेवर आणि सामाजिक परिस्थितीवर काम करण्याची इच्छा आहे
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Fri, 01/30/2015 - 13:49 नवीन
शेतकर्‍यांना तुमच्या सारख्या शहरी एसी मधे बसणार्‍या आणि शेतीतलं ओ की ठो न कळणार्‍या बूर्झ्वा लोकांनी उपदेश करू नयेत, नाहीतर मुटेसाहेब तुम्हाला धडा शिकवायला तुमचं नाव या खालील यादीत टाकतील.
ज्यांनी केली दुर्गती... त्यांची यादी कर एकटा नको मरू... संग... दहा घेऊन मर ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:39 नवीन
उगीच चिंता वाहून चिंताग्रस्त होऊ नका. तुम्ही सुद्धा शेतकर्‍यांना देशोधडीला लावणार्‍यापैकी असाल, असे तुम्हास वाटत असेल तरी तुमच्यापेक्शा मोठे "लुटारु" खूप आहेत. त्यामुळे तुमचा नंबर यादीत इतक्या लवकर येण्याची शक्यता नाही. ;) तुमचा नंबर लागेपर्यंत कैक पिढ्या उलटून गेलेल्या असतील. तेव्हा तुम्ही नसालच. मग चिंता कशाला?:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:34 नवीन
बर्‍याच सामाजिक संस्था आहेत. पण आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहे. अशा संस्थाना मानसिक समाधान मिळवता येते मात्र उपयोगीता शून्य असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
क
काळा पहाड Fri, 01/30/2015 - 13:55 नवीन
लुटारुंचे रचू थर... आनं... नाचू गच्चीवर ...!!
काय डोळ्या समोर चित्र येत नाही हो. लुटारू म्हणजे सावकार गव्हर्मेंट म्हट्ले तर त्यांचे थर कुठे लावणार? गच्चीवर की थरावरून गच्चीवर जाणार?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 14:07 नवीन
गच्ची म्हणजे मान, गळा. नाचू त्यांच्या मानगुटावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Fri, 01/30/2015 - 15:05 नवीन
हां आत्ता उलगडा झाला. मुटेसाहेब तिथे तारांकित नोट लिहा ना राव पस्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना समजायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ग
गंगाधर मुटे Mon, 02/02/2015 - 22:56 नवीन
@ स्नेहांकिता, @ विशाखा पाटील या कवितेपुरता विचार केल्यास बायल्या या शब्दाचा बाई या शब्दाशी काहीही संबंध नाही. मर्द ज्या अर्थाने आला त्याच्या विरोधाभासी शब्द बायल्या. - बायल्यावाणी हा शब्द या कवितेचे बलस्थान आणि मर्मस्थान आहे. या शब्दामागे शेतकर्‍याला चेतवनारी चेतना आहे. - प्रचलित बोली भाषेचे संकेत पाहता आणि या कवितेत एकूणच जो वऱ्हाडी संस्कृतीचा फॉर्म वापरला त्यात हा शब्द चपखल बसतो व योग्य संदेश देवून जातो, असे वाटते. - पण हो, बायल्या शब्दामुळे बायकी या अर्थाने स्त्रीचे अवमूल्यन सूचित होते का? हा प्रश्न मलाही पडला होता. पण तरीही मी बायल्या शब्द बदलला नाही... कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... स्त्रीत्व हा दोष नाही ... तर स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे... इथे स्त्री म्हणून कोणी तिला तुच्छ लेखणे असे अभिप्रेत नाहीये... तर पुरुषाने स्त्रीत्व दर्शवणे हा दोष मी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय. पुरुषी स्त्री आणि स्त्रैण पुरुष .. या दोन्ही अवस्थेत मग तृतीयपंथी सूचित होतो... जी जीवनाची अपवादात्मक अवस्था आहे... आणि निकोप समाजाला आजीबात अभिप्रेत नाही... त्या अर्थाने बायल्या शब्द फारसा चुकत नाही.. असे माझे मत आहे.. आणि निराशेला आत्महत्येकडे जाऊ देण्यापेक्षा तिच्यात संताप, विद्रोह ओतणे लाखपट चांगले... त्या अर्थाने सुद्धा बायल्या हा शब्द मला सटीक आणि प्रासंगिक वाटला.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/03/2015 - 07:22 नवीन
स्प्ष्टीकरणाबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
स
संदीप डांगे Tue, 02/03/2015 - 22:05 नवीन
शब्दांच्या कितीही कोलांटउड्या तुम्ही मारल्यात तरी बायल्या शब्दाचा अर्थ तुम्ही सांगता तसा नाही आहे. स्नेहांकिता ताईंनी घेतलेला आक्षेप बरोबर आहे. विदर्भात वर्हाडी भाषेत बायल्या ह्या शब्दाचा अर्थ स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष असाच आहे. तर कोणत्या स्त्रीप्रमाणे वागणारा पुरुष? सामान्यपणे सगळीकडे स्त्रियांना दुर्बल, भित्र्या, अडाणी आणि परावलंबी समजतात. त्या कठीण प्रसंगांना तोंड देऊ शकत नाहीत, कच खातात किंवा निर्णय घेऊ शकत नाहीत. सामान्यपणे स्त्रिया अशाच असतात असा समज आहे. त्यामुळे असा वागणारा पुरुष पौरुषत्व विसरला आहे असे समजले जाते. पौरुषत्व म्हणजे काय तर अश्या स्त्रियांच्या विरुद्ध वागणूक असणे. तर अशी गंगाधर साहेबांची आणि तत्सम समाजाची पौरुषत्वाची व्याख्या. त्यामुळे बायल्यासारखा वागू नको असं म्हणताना ते पुरुषांना बायकांसारखा वागू नको असे म्हणत आहेत. आता स्पष्टीकरण द्यावे लागतंय तर शब्दांचे बुडबुडे उडवत आहेत. ज्या अर्थी मर्द शब्द वापरला आहे त्यावरूनच तो पुरुषी अहंकारातून स्फुरलेला आहे हे स्पष्ट आहे. "एक पुरुष असून तू बाइसारखे हात पाय गाळून बसला आहे" असा सरळ अर्थ आहे म्हणजेच स्त्रिया हतबल होऊन बसतात, त्या लढू शकत नाहीत असा काही समज आहे. गंगाधर यांनी म्हटल्याप्रमाणे बायल्या म्हणजे हिजडा तर नाहीच नाही. एखादी व्यक्ती घाबरट आहे का लढवैय्या वृत्तीची आहे हे तिच्या लिंगावरून कधीच ठरत नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना चेतवण्याच्या निमित्ताने भलतीच मानसिकता मुन्टेनी चेतवू नये. माझे काही चुकत असेल तर मुन्टेसाहेबांनी ह्या वाक्याचा अभिप्रेत अर्थ सोदाहरण स्पष्ट करावा : स्त्रैण असणे हा पुरुषातला खरा दोष आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
ग
गवि Wed, 02/04/2015 - 07:35 नवीन
सर्वप्रथमः बायकांना अवमानकारक ठरेल असं कोणीही बोलू अथवा लिहू नये हे योग्य आणि पूर्ण मान्य आहे. बांगड्या भर, वगैरे वाक्प्रयोग अत्यंत अवमानकारक समजले जातात आणि बर्‍याचदा स्त्रियांकडूनही पुरुषाला वापरले जातात. आता प्रश्न आहे सदरहू कवितेचा. त्यात खेड्यातल्या शेतकर्‍याला आवाहन कम आव्हान आहे. कविता वाचनासाठी सर्वांना खुली असली तरी त्याचे टारगेट शेतकरी आहे. भाषाही स्थानिक आहे, लहेजाही गावरान बोलीचा आहे. याचाच अर्थ की कुठेना कुठे ती थेट टारगेट ग्रुपनेही ऐकावी, म्हणावी, वाचावी, म्हणून दाखवावी या उद्देशाने लिहिली गेली आहे, केवळ शहरी क्राउडला फॅन्सी गावरान कविता देण्यासाठी नव्हे. आता प्रथम उद्देश आहे तो शेतकर्‍याला पेटवण्याचा आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा. त्याच्या आसपासची पुरुषप्रधान संस्कृती गृहीत धरुन त्याला अपील होईल अशी भाषा वापरताना प्रत्येक क्षणी कवीने स्त्रीविषयक जागृतीचा अन्य लार्जर हेतूही सतत मनात बाळगला आणि बळंच एक्झेक्यूट केला पाहिजे असं वाटत नाही. सध्या त्या शेतकर्‍याला त्याच्या वातावरणातल्या मर्यादित संदर्भांत "बाईसारखा वागू नको मर्दासारखा वाग" असं म्हणणं हे त्याला आव्हान देऊन झडझडून लढायला उभा करण्यासाठी प्रभावी, पुरेसं आणि आवश्यक आहे. निराशेच्या गर्तेत आणि आत्महत्येच्या छायेत असलेल्या, स्त्रीपुरुष समानता वगैरे प्रांतामधे मागे असलेल्या त्या शेतकर्‍याला त्याही अवस्थेत आधी स्त्रीपुरुष एक असतात, सर्व जाती सारख्या, सर्व धर्म समान इ इ अशा प्रबोधनाचे प्राथमिक धडे देऊन मग आत्महत्येचा मार्ग न पत्करण्याचे पुढचे धडे सर्वसमतोल सांभाळणार्‍या सपक भाषेत द्यावेत यात कोणतीही उत्स्फूर्तता नाही. इथे मला वाटतं शेतकरी "हँगिंग ऑन लास्ट फिंगर" अशा कडेलोटाच्या अवस्थेत जणू लटकतो आहे आणि त्याला तातडीने खाड्कन प्रभाव करणारा चालू उताराच हवाय.. तो आदर्श समतोल उपाय असला पाहिजे हे शक्य नाही. शेतकरी उभा राहील, प्रगती करेल अन समृद्ध होईल तेव्हा तो स्त्रीपुरुष समानता, स्वातंत्र्याचा सन्मान, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आणि तत्सम अधिक तरल संकल्पना समजण्यासाठी योग्य स्थितीत येईल. तेव्हा सध्या या स्टेपला बायल्यागत मरु नको हे परिणामकारक असेल तर तसे असू दे. कवी, लेखक यांनी लिहिताना समतोल विचारांनीच लिहिलं पाहिजे असं नाही असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 08:22 नवीन
कविता अथवा लेखनात असे शब्दप्रयोग, विचार एखाद्या पात्राच्या तोंडी घालणे योग्य वाटते.. कारण असे लोक (पात्रासारखे) असु शकतात .. नव्हे असतातच.. अशा प्रतिभावान पात्रयोजनेने लेखक अथवा कवी विविध भिन्न विचारधारा दाखवू शकतो.. पण जेव्हा कवी अथवा लेखक स्वतः एखादा संदेश देत असतो (जसे या कवितेत) तेव्हा हे शब्द विचार हे त्याचेच असतात.. अशावेळी अशा शब्दांची/विचारांची पूर्ण जवाबदारी घ्यावी.. अथवा ते शब्द वापरू नयेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/04/2015 - 08:35 नवीन
इथे कवी हे पात्र शेतकरी या पात्राला उद्देशून आवाहन करत आहे. लेखनाची शैली प्रथमवचनी किंवा थर्ड पार्टी कशीही असू शकते. म्हणजे बायल्यावाणी काय मरतोस कवी अभय म्हणे शेतकर्‍याला बांगड्या भर त्यापेक्षा त्याची बायको म्हणे त्याला वगैरे असे हेच शब्द पात्रांकडून बोलून घेतल्यासच जास्त स्वीकारार्ह ठरावे असे नव्हे. इथे कवी आणि पात्र एकाच जगात आहेत आणि इतरांना कथा सांगण्यापेक्षा त्या शेतकर्‍याशी संवादावर भर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 08:49 नवीन
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात .. तेव्हा मग असं म्हणायचं नव्हतं वगैरे सारवासारव करायची नसेल तर शब्द जपूनच वापरावेत.. आणि या विषयावर भर आहे म्हणून बाकी गोष्टी वाचकांनी सांभाळून घ्याव्यात हे पटत नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/04/2015 - 08:55 नवीन
प्रथमवचनी शैली म्हणजेच ते शब्द/विचार तुमचे स्वतःचे असतात
तृतीय किंव अन्य कोणत्याही वचनी शैलीतही ते लेखकाचेच विचार असतात. इथेही कवी हा एक पात्रच आहे हे मी अधोरेखित करु इच्छितो. हा अग्रलेख किंवा एखाद्या समितीचा शिफारस अहवाल किंवा न्यायालयाचे निकालपत्र नाही की ज्यामधे बॅलन्स साधला जावा. सारवासारवीलाच माझा विरोध आहे. जे लिहिलं त्या शब्दाच्या योग्यतेविषयी कारणमीमांसा करावी. शब्दाचा अर्थ तसा अभिप्रेत नव्हता असं नंतर म्हणणं हा योग्य डिफेन्स नव्हे हे मान्यच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ग
गणेशा Tue, 02/03/2015 - 10:06 नवीन
अतिशय परखड आणि वास्तव दर्शविणारी कविता.. सुरेख कविता म्हणावी तर ज्या भयान स्थितीबद्दल कविता आहे त्याने सुरेख पण म्हणता येत नाही. वास्तव खरेच बदलेल का हा प्रश्न आहे. हाताची बोटे सारखी नसली तरी माळेचे मणी कायम सारखेच असतात.. आणि राजकारणी हे माळेच मणीच असल्याने सारखेपणा त्यांच्यात असतोच आणि तोच येथे घातक आहे.. लिहित रहा ... वाचत आहे
  • Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे Wed, 02/04/2015 - 07:22 नवीन
@संदीप डांगे, चर्चेचे स्वागत आहे. तुम्ही म्हण्ता तशी भिती मलाही वाटली होती. मी लिहिले ते योग्य आहे याची मला खात्री आहे पण कवितेतून अर्थ बाहेर पडताना वाचकापर्यंत कसा पोचतो, याला जास्त महत्व आहे. त्यामुळे ही कविता प्रकाशित करण्यापूर्वी मी २६ लोकांकडे मेलव्दारे पाठवून त्यांची मते विचारली आणि चुकीचा तर अर्थ जाणार नाही ना, याची विचारणा केली. त्यांनी पुरेपूर समर्थन करून खोलवर पाहिले तर तसा अर्थ जाणार नाही याची ग्वाही दिली. त्यानंतरच ही कविता प्रकाशित केली. या कवितेवर अधिक सविस्तर चर्चा करायला मला आवडेल. यथावकाश मी माझे मत व्यक्त करतो.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 02/04/2015 - 08:51 नवीन
पूर्वी, जेंव्हा असे शब्द प्रचलित झाले तेंव्हा 'लढणे' हा प्रांत पुरुषांचाच होता. ह्याला कारण निसर्गानेच पुरुषाला शारीरिक दृष्ट्या सबल आणि स्त्रीला दुर्बल बनविले आहे. ह्यावर तरी दुमत नसावे. बौद्धीक पातळीवर स्त्री-पुरुष एकच असले तरी लढण्याच्या शारीरिक पातळीवर दोघात फरक आहे. स्त्रीयांनी ह्या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला तरी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाकडून राखी बांधून घेते तेंव्हा त्याने तिचे रक्षण करावे असा संकेत त्या मागे असतो. 'मुलींसारखा रडू नकोस', 'मुलींसारखा भांडू नकोस', 'घाबरतोस काय मुलींसारखा' हे आणि अशी अनेक वाक्ये कानावर पडत आम्ही लहानेचे मोठे झालो. आता काळ बदलला आहे. स्त्रीने बरीच प्रगती केली आहे हे कौतुकास्पद असले तरी नैसर्गिक फरक तसेच आहेत. त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. लचकत-मुरडत चालणारा पुरुष किती बायकांना नवरा म्हणून आवडेल? पुरुषाने कसे असावे, दिसावे, वागावे ह्याचे कांही अलिखित नियम आहेत त्या विपरीत, स्त्रीत्वाकडे झुकणारे वर्तन, दिसणे, वागणे दिसले की त्याला 'बायल्या' म्हणतात. त्यात स्त्रीयांना अपमानीत करण्याचा उद्देश नसुन पुरुषातील स्त्रीत्वाचा प्रभाव अधोरेखित करण्याचा असतो. मला तरी 'बायल्या' हा शब्द आक्षेपार्ह वाटत नाही.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 09:08 नवीन
स्त्रीसुलभ हालचाली/दिसणे वगैरेसाठी बायल्या म्हणणे.. आणि 'घाबरतोस काय मुलींसारखा?? मर्दासारखं वाग' या दोहोत नक्की फरक आहे.. पहिल्यात बायल्या आक्षेपार्ह नाही पण दुसर्‍यात नक्की आहे.. घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? त्याच शब्दांना चिकटून का रहा??.. जे वाटतं तेच शब्दात उतरतय याची काळजी घेतली की स्पष्टीकरण देत बसायची गरज नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Wed, 02/04/2015 - 16:49 नवीन
>>>> घाबरणे यात शारिरीक ताकदीपेक्षा स्वभाव्/ वृत्तीचा जास्त वाटा आहे हे तरी मान्य असेल आपल्याला तर.. उलट शारीरिक अक्षमतेची जाणिव असल्यामुळेच माणूस (स्त्री/पुरुष) घाबरत असतो. कितीही शूर पुरुष असला तरी सशस्त्र अणि नि:शस्त्र लढाईत नि:शस्त्र माणूस शारीरिक इजेला घाबरूनच मागे हटतो. साधे, बायका उंदराला घाबरतात त्यातही तो चावेल आणि आपल्याला इजा होईल हीच भिती असते. कुत्र्याला घाबरणारी माणसेही कुत्रा आपल्याला चावेल आणि आपल्याला शारीरिक इजा होईल हीच भिती असते. अशा हजारो उदाहरणांमधून स्वभावापेक्षा शारीरिक अक्षमताच भितीला कारणीभूत असते हे सिद्ध होते. >>>>काळाप्रमाणे विचार बदले आहेत तसे शब्दप्रयोगही बदलायला काय प्रॉब्लेम आहे?? हरकत कांहीच नाही पण वास्तव स्विकारण्यात तरी काय समस्या आहे. स्त्रीयांची शारीरिक अक्षमता आजही वास्तव आहे. ते नैसर्गिकही आहे. नैसर्गिक वास्तव स्विकारण्यास नाकारणे हे वादळात वाळूत तोंड खुपसून बसणार्‍या उंटासारखे आहे. ह्यात स्त्रीयांनी अपमानीत होण्यासारखे तर अजिबात कांही नाही. इथे पुरुषाचे वर्चस्व दर्शविणे नसून स्त्री-पुरषांच्या नैसर्गिक शरीररचनेमुळे निर्माण झालेले शब्दप्रयोग आहेत. असा शब्दप्रयोग केल्याने स्त्रीया सामाजिक प्रगतीत मागे पडतील किंवा टाळल्यानेच पुढे जातील असे कांही नाही. स्त्रीयांकडूनही 'पुरुषीवृत्ती' असा सरसकट शब्दप्रयोग केला जातो. बलात्कारासारख्या अत्यंत गंभीर अपराधातही, त्या अपराध्याला वेगळेकाढून संबोधण्याऐवजी 'बलात्कारी पुरुषीवृत्ती' असे बोलले जाते. त्यात तर गंभीर अपराधात समस्त पुरुषवर्गालाच दूषणे दिली जातात. असो. विषय भरकटू नये म्हणून इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 02/05/2015 - 06:39 नवीन
घाबरणे आणि शारिरीक अक्षमता याबाबतच्या मताशी असहमत ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/04/2015 - 09:21 नवीन
'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. सहमत. बाकी, चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 02/05/2015 - 11:38 नवीन
त्यामुळे 'बायल्या' ह्या शब्दप्रयोगाने कांही आभाळ कोसळलं नाही. असे शब्दप्रयोग तीव्रतेने खटकावेत असे नाहीत. हल्ली स्त्रीयांना कोणीच कमी लेखत नाही, लेखू नये. समानतेच्या ह्या काळातही कांही असमानताही राहणारच. पेठकरांशी सहमत आहे. स्त्रीवर्गाचा आई-बहिणींचा पूर्ण आदर राखुनही ' केवळ' एखाद्याला बायल्या म्हणल्याने त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा किंवा स्त्रीत्वाचा अवमान होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सस्नेह गुरुवार, 02/05/2015 - 11:59 नवीन
अवमानाचा प्रश्नच नाही. 'बाई' किंवा 'बायले'पण इतके कच्चे नसते, हेच सांगायचे आहे. बाकी, धागाकर्त्यांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे हे विशेषण वापरले आहे, हे त्यांच्या स्पष्टीकारणावरून दिसते आहे, तेव्हा वाद कशाला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ऋ
ऋषिकेश Wed, 02/04/2015 - 09:30 नवीन
ललित लेखनात किंवा कवितेत सामाजिक विधान नसून भावनांचे प्रतिबिंब असते असावे. त्या साठी लेखक कवीला त्याला योग्य वाटेल ती शब्दयोजना करू देणे आवश्यक वाटते. अललित लेखनात / एखाद्या विधानात/ भाषणात असे शब्द, भाषा कितीही अयोग्य असली (आहेच) तरी कविता, ललित लेखनात असे शब्द येणे गैर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Wed, 02/04/2015 - 09:37 नवीन
कारण पुरुषाने पौरुष्य विसरणे ... किंवा स्त्रीने स्त्रीत्व सोडणे या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक आहेत... - पौरुषत्व म्हणजे लढणे आणि स्त्रीत्व म्हणजे रडणे असा जो अर्थ लावला जातो, त्यावर आक्षेप आहे. पुरुषाने लढावे आणि स्त्रीने लढू नये, स्त्रीने रडायलाच हवे आणि पुरुषाने अजिबात डोळ्यातून पाणी काढू नये, स्त्रीने घाबरावे आणि पुरुषाने घाबरू नये, असेही आग्रह धरणं चुकीचे आहे. लहानपणापासून दोघांच्याही मनावर जे बिंबवल जातं/गेलं, त्यामुळे त्यांच्यावर उगाच ओझं टाकलं जातं. एखाद्या कठीण प्रसंगात पुरुषाने रडले तर काय चुकले? परंतु रडणं हे त्याचं काम नाही, असं शिकवलं गेल्यामुळे त्याला लोकलाजेस्तव तसे करता येत नाही. त्यातून त्याचीही घुसमट होत असेल का? असाही एक प्रश्न आहे. राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा. एवढं सोडता, बाकी कविता आवडली आहेच.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 02/04/2015 - 09:47 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
ग
गवि Wed, 02/04/2015 - 09:54 नवीन
राहता राहिला मुद्दा, टार्गेट ग्रुपचा. ही कविता फक्त शेतकरी पुरुषांसाठी आहे हे मान्य असलं तरी जे चुकीचे समज समाजात आहेत, त्यालाच पुन्हा अधोरेखित केले आहे. तो शेतकरी घरातल्या बाईला एरवी म्हणतोच, 'तुले काय कळते! मी मर्द हाये, गप बस...' त्याच्या पुरुषी अहंकाराला अजूनच हवा.
हे सर्व शतप्रतिशत बरोबर. पण साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. इथे केवळ स्त्रीला दिला जाणारा कमीपणा अधोरेखित होऊ नये म्हणून "बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 10:03 नवीन
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" असं म्हणण्याला काय साहित्यिक अर्थ राहील?
योग्य शब्दरचना सुचत नाही म्हणून कालबाह्य विचाराच्या शब्दरचनेला "नेटिव्ह" म्हणत किती वेळ धरुन बसणार?? योग्य शब्द सुचणे आणि वापरणे हीच तर खरी प्रतिभा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 10:15 नवीन
"बायल्यावाणी काय मरतोस?" या नेटिव्ह रचनेऐवजी "भित्र्या व्यक्तीप्रमाणे काय मरतोस?" किंवा "पळपुट्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे काय मरतोस?" किंवा "शूरवीर मानवाप्रमाणे ऊठ" "धाडस असलेल्या स्त्री अथवा पुरुषाप्रमाणे ऊठ"
यात दिलेल्या बाकी शब्दरचना अशा दिल्या अहेत की "बायल्यावाणी काय मरतोस?" हे एकद उजव वाटावं.. आणखी प्रयत्न केल्यास याहून चांगलं नक्कीच सुचेल .. पण ते 'बायल्यावाणी' खटकलं तरच !! e.g. भ्याडावानी काय मरतोस. शूरावानी मर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Wed, 02/04/2015 - 11:31 नवीन
तुम्ही तुमचा मुद्दा उत्तमपणे स्पष्ट केलाय आणि तुम्हाला काय म्हणायचंय ते व्यवस्थित मांडलंय. ते समजतंही आहे. तुम्ही या मताशी प्रामाणिक आहात हेही कळतंय. पण इथे मुद्दा कोणती शब्दरचना कशापेक्षा जास्त चांगली असा नाहीच. माझा मुद्दा त्याहून वेगळा आहे. इथे भ्याडासारखे किंवा कुत्र्यासारखे किंवा जनावरागत मरु नको, योद्ध्यासारखे किंवा लढवय्यासारखे किंवा वाघासारखे लढ असे अनेक प्रकारे मांडता येईल. पण लेखकाची प्रतिभा अशी आल्टरनेट रचना शोधण्यात आहे असं तुम्ही जे म्हणताय तेच मुळात मला मान्य नाहीये. समाजात लेखक जे पाहतो ते तो व्यक्त करतो. समाजात जसं पहायला त्याला आवडेल तेही व्यक्त करतो पण त्याला पहायला जे आवडेल तसं दर्शवण्यासाठी रचना बदलून सुधारणा अधोरेखित करण्यासाठी प्रचारकी वाक्यांनी तो कलाकृतीच्या उत्स्फूर्ततेला मारत नाही. सिगरेट आरोग्याला अपायकारक आहे म्हणून चित्रपटात किंवा कादंबरीतही एखाद्या आजोबांचे पात्र बिडी पिणारे न दाखवता फक्त बदामदूध पिणारेच दाखवावे म्हणजे लेखकाने अधिक प्रतिभा दाखवली असं होत नाही. इन गिव्हन कंडिशन्स, "बायल्यावानी कायले मरतं" यात जी उत्स्फूर्तता आणि वास्तवता आहे ती इतर अधिक चांगल्या भासणार्‍या पण संतुलित उत्तम शब्दरचना शोधून काढण्यात नाही असं माझं म्हणणं आहे. जेव्हा बायलेपणा म्हणजे नाकर्तेपणा ही समजूत नष्ट होईल तेव्हा त्याचं लेखनसिनेमातलं प्रतिबिंबही नष्ट होईल. समाज सुधारण्याचा मूल उद्देश ठेवून पथनाट्य आणि प्रचारकी व्हिडिओ बनवता येतील पण उत्स्फूर्त लेखन / कलाकृती नाही. तुम्ही थेट शब्दात लोकांपुढे विचार मांडण्याविषयी म्हणालात ते बरोबरच आहे. उदा. मुटेसाहेब समजा एखाद्या शेतकरीविषयक सुधारणा सुचवणार्‍या कमिटीवर असतील आणि त्यांनी त्यांच्या सरकारला दिलेल्या अहवालात /रिपोर्टात "शेतकर्‍यांनी बायकीपणा सोडावा" असा उल्लेख केला तर तो खचितच अनुचित असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Wed, 02/04/2015 - 13:15 नवीन
वर ऋशिकेशनेही म्हटल्याप्रमाणे ललित लेखन कविता आणि भाषण अथवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे अहवाल वगैरे यातील फरक आहेच.. हा दृष्टीकोन पटला पण तरीही प्रथमपुरुषी शैलीत अगदी निषेध करण्याइतक नसलतरी थोडसं खटकतच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 02/04/2015 - 10:19 नवीन
साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्यात समाजाचं प्रतिबिंब दिसतं. ते प्रतिबिंब बोचरं करुन चुका सर्वांना दाखवून देणं हा भाग साहित्य / कलाकृतीतून करता येतो. पण जे काही समाजात सध्या दुरित अप्रिय अयोग्य आहे ते साहित्यात टाळून किंवा उलट प्रकारे दाखवून समाज बदलेल अशी अपेक्षा म्हणजे कोंबडं झाकून सूर्य न उगवण्याची अपेक्षा आहे. सहमत आहे. मुटे सरकार, पुढल्या वेळी अशा कवितेत ''अरे, लेका मानसावानी कायला मरतंय, टर्मीनेटरमधल्या त्या अर्नॉल्ड सारखं ठोकून मर'' असं करा. मग, इथे माणसाची किंमत कमी झाली असं कोणी म्हणु नये म्हणजे झालं. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
पैसा Wed, 02/04/2015 - 15:02 नवीन
तुह्यावाणी लाखो मेले... काही फ़रक पडला? येथे सारे निगरगट्ट ... काही बदल घडला? त्यायच्यावाणी तू बी... फ़ुक्कट जाशीन मरून संसाराची धूळधान... व्हईन आणखी वरून लढल्याबिगर मोक्ष नाय.. कृष्णवचन स्मर ...!! कर्जपाणी, घेणंदेणं... आता चिंता सोड आला दिवस तसा... मानून घे तू गोड *** जेव्हा पाय चालणारा... रस्ता जातो खुटून श्वासाभरल्या विचारांचा... धागा जातो तुटून तेव्हा तरी निग्रहाने... विवेकाला स्मर
हे भाग आवडले. पण लढा परिस्थितीबरोबर दिला पाहिजे. माणसांबरोबर नव्हे. बाकीची माणसं शेतकर्‍याचे शत्रू नसतात तर त्याचेच भाऊ, बहिणी, नातेवाईक असतात. यावेळी शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा विषय सोडून कवितेसंदर्भात कवितेतील शब्दयोजना आणि भाषा या इतर विषयावर चर्चा झाल्याचे पाहून आनंद झाला!
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Wed, 02/04/2015 - 19:51 नवीन
+१ अगदी हेच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गणेशा गुरुवार, 02/05/2015 - 11:11 नवीन
बायल्यावाणी कायले मरतं? मर्दावाणी मरं!
जर एखादा शेतकरी आत्मह्त्या करणार असेन तर त्याला परावृत्त करण्यासाठी त्याच्या मनाला लागेल असे वाक्य म्हणुन कवीने वरती वाक्यरचना केली आहे, त्या शेतकर्‍याला परावृत्त करताना फक्त तोच डोळ्यासमोर ठेवुन आपल्या भाषेतील शब्द/वाक्य त्याने बोलले आहे त्यावेळेस .. इअतर समाज्/बाई/माणुस यांचा या वाक्याशी अर्थ लावणे कदाचीत विपर्यास वाटतो. मुळ कविता आणि त्याच्या अर्थापलिकडे फक्त शब्दावरुन आलेले रिप्लाय योग्य वाटत नाहित असो.
  • Log in or register to post comments
ह
हाडक्या गुरुवार, 02/05/2015 - 18:49 नवीन
+१ .. मुटेसाहेब, अगदी ओघवती रचना आहे हो. जे आपल्या मनात त्या क्षणी सुचेल ते लिहावं. वाढत्या सेंसॉरशीपचा उगी धसका वाक्यावाक्यास घेऊ लागल्यास अवघड होईल की . :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा
ग
गंगाधर मुटे Sat, 02/07/2015 - 19:29 नवीन
चांगली चर्चा झालीय. सर्व प्रतिसादकांचे मनपूर्वक आभार. यथावकाश माझे मत लिहितोय.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/09/2015 - 11:42 नवीन
कविता टाकल्यावर एकच प्रतिसाद लिहित जा आभाराचा. आणि त्यात काय लिहायचं ते एकदाच.... पुन्हा पुन्हा लिहित बसु नये असं माझं मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे
क
कपिलमुनी Wed, 02/11/2015 - 13:56 नवीन
बायल्या शब्दाबद्दल छिद्रन्वेषी होण्याचे कारण नव्हते. कितीतरी वेळा स्त्रियासुद्धा दुसर्‍या स्त्रीला फारच पुरुषी दिसत आहे! असे म्हणते..पुरुषी वागते असे म्हणतात ! बाकी भावनांओ को समझो . एवढेच म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा