Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

क
क्लिंटन
Sat, 02/07/2015 - 18:34
🗣 107 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी शक्य झाल्यास रजा घेऊन निकालांसाठी नवा धागा चालू करेन. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवालांनी ज्या हिंमतीने हा सामना लढविला आहे त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.विशेषत: एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा दिल्लीत मोठा पराभव झाला होता, नंतरच्या काळात अनेक महत्वाचे साथीदार सोडून गेले, योगेन्द्र यादव यांच्याबरोबरही मतभेद आहेत असे चित्र होते आणि मतदानाला १५ दिवस राहिलेले असताना शांती भूषण या आआपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महत्वाच्या नेत्याने केजरीवालांनाच बदला अशी मागणी केली या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तसेच दिल्लीसारख्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत काही दशके होत असताना तिसऱ्या पक्षाला चंचूप्रवेश करणेच मुळात कठिण होते.ते त्यांनी केलेच.आणि आता सर्व एक्झिट पोल्स कॉंग्रेसला ५ पेक्षाही कमी जागा देत आहेत (काही शून्य जागा सुध्दा देत आहेत) म्हणजे केजरीवालांनी कॉंग्रेसला दिल्लीतून जवळपास हद्दपार केले आणि परत दिल्लीचे राजकारण दुरंगी केले या दाखविलेल्या हिंमतीबद्दल केजरीवालांना माझ्यासारख्या आआपविरोधकाकडूनही १०० पैकी ११० मार्क. जर आआपला यश मिळाले तर १. आआप: हा विजय नक्कीच आआपसाठी मोठा मनोबल उंचाविणारा असेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे केंद्रात नरेंद्र मोदींना सामोरे जायला लागणार आहे त्याच गोष्टीला (लोकांच्या आपणच वाढविलेल्या अपेक्षांना सामोरे जाणे) भविष्यात केजरीवालांनाही सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कारभार करायला हवा. धरणे धरणे आणि राज्यकारभार या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. असे रस्त्यावरचे राजकारण करणे हे बेजबाबदारपणाचे आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. तसेच दिल्ली हे अजूनही पूर्ण राज्य नाही आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आहेत त्या चौकटीतच राहून काम केले पाहिजे.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही अधिकार द्या ही मागणी रास्त आहे आणि त्यासाठी घटनात्मक मार्ग अवलंबल्यास कोणाचीही हरकत त्याला असेल असे वाटत नाही.पण मागच्या वेळी जो आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखविला तो हद्दपार करावा ही अपेक्षा नक्कीच आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वबळावर सरकार येणार आहे तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले तर दोष इतर कोणावरही ढकलता येणार नाही ही परिस्थिती नाकारून चालणार नाही. तसेच दिल्ली म्हणजे सगळा देश नाही हे पण केजरीवालांनी (आणि त्यांच्या समर्थकांनी) लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे ९५% पेक्षा जास्त शहरी राज्य आहे.दिल्लीत ज्या मार्गांचा पक्ष वाढवायला उपयोग झाला तेच मार्ग सगळ्या देशात उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणातच अपेक्षा ठेवाव्यात.मागच्या वेळी विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकसभेत १०० जागा जिंकणार अशा अपेक्षा, कोणी कोणी तर केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला निघाले होते.असल्या अपेक्षा ठेवायला योग्य वातावरण दिल्लीतील विजयामुळे निर्माण होईल असे वाटत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केजरीवालांना पक्ष एकत्र ठेवता आला पाहिजे.शेवटी आम आदमी पक्ष म्हणजे ’चळवळ्या’ लोकांचा पक्ष आहे.त्यात विविध मतेमतांतरे असलेल्यांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात आपापसातल्या भांडणांचे जाहिर प्रदर्शन इतक्या वेळा आआपने केले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मतदार केजरीवालांना परत संधी द्यायला तयार झाले असतील तर त्या लोकभावनेवर स्वार होऊन पक्ष एकत्र ठेवणे आणि राज्यकारभार करणे ही कौशल्याची गोष्ट आहे.ती केजरीवालांना साधता यायला हवी. २. भाजप: पक्षासाठी हा पराभव नक्कीच धक्कादायक असेल.विशेषत: २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा विजयरथ जो चौफेर उधळला होता त्याला अटकाव नक्कीच बसला असे चित्र या पराभवातून उभे राहिल.मतदान व्हायच्याही आधी ही निवडणुक म्हणजे मोदी सरकारवरील सार्वमत नाही अशी पूर्वी कॉंग्रेसचे नेते भाषा करायचे ती भाषा भाजपवाले करत होते ती नक्कीच धक्कादायक आहे.हा पराभव झाल्यास सर्वात पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांनी त्या पराभवाची जबाबदारी जाहिरपणे स्विकारायला हवी.अन्यथा कॉंग्रेसमध्ये चालायचे तसे-- जिंकल्यास श्रेय गांधी घराण्याचे आणि पराभव झाल्यास दोष इतर कोणाचा अशी परिस्थिती भाजपमध्ये मोदी-शहांच्या नावाने उभी राहिल्यास ते योग्य नाही.असे करणे म्हणजे परिस्थितीपासून दूर पळून आत्मवंचना करणे हा त्याचा अर्थ होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा पराभव नक्की का झाला हे आत्मपरिक्षण करणे योग्य ठरेल.लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा एका रात्रीत पूर्ण होतील अशी कोणाचीच अपेक्षा नाही.पण निदान त्या दिशेने पावले पडत आहेत हे चित्र निदान वरकरणी नाही.धोरणे बनविण्याच्या दृष्टीने पावले पडत असतीलही कदाचित पण अजून ’अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत तेव्हा लोक कुठे आहेत ’अच्छे दिन’ हा प्रश्न नक्कीच विचारणार आहेत.तेव्हा मतदारांना गृहित धरून चालायचे नाही. मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल.त्यामुळे कारभारात सुधारणा करून त्याची फळे दिसायला पुरेसा वेळ आहे.त्या संधीचा पूर्ण फायदा पक्षाने उठवायला हवा. दिल्लीत पराभव झाला असला तरी आभाळ कोसळलेले नाही.शेवटी दिल्ली म्हणजे लोकसभेत अवघ्या सात जागा असलेले छोटे राज्य आहे.पण या पराभवानंतर कोषात जाऊन यानंतरच्या काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये (विशेषत: बिहारमध्ये) पराभव झाल्यास मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील.२०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,आसाम) भाजपला आसाम सोडून इतर राज्यांमध्ये फार चमकदार कामगिरी करता येणे कठिण आहे.तेव्हा बिहारनंतर थेट मार्च २०१७ मध्ये गोवा,पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच निवडणुका असतील.तेव्हा मधल्या काळात नरेंद्र मोदींची पकड ढिली होत आहे हे चित्र उभे राहणे भाजपला परवडणार नाही. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणुकांचे महत्व लक्षात यावे. दुसरे म्हणजे दिल्ली भाजप हे एक दुभंगलेले घर गेली कित्येक वर्षे आहे ही परिस्थिती बदलायला हवी. सतत एकमेकांशी भांडणार्‍या स्थानिक नेत्यांना नारळ देऊन मीनाक्षी लेखींसारख्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी केली तर ते चांगले ठरेल. दुभंगलेले सैन्य घेऊन आयत्या वेळी सेनापती बदलून युध्द जिंकता येत नाही हे भाजपने दिल्लीत १९९८ मध्ये अनुभवले तेच २०१५ मध्ये अनुभवले असे चित्र उभे राहिल.त्या दृष्टीने निदान पुढच्या निवडणुकांसाठी तरी भाजपने आतापासून लोकांसमोर एकजुटीने सामोरे जावे हे इष्ट. ३. कॉंग्रेस: हे निकाल मात्र कॉंग्रेस पक्षाची झोप उडवतील हे नक्कीच.दिल्लीमध्ये ७० पैकी ५ पेक्षा कमी जागा मिळणे म्हणजे पक्षाची मोठीच वाताहत झालेली असेल.पक्षाला राहुल गांधी नवी दिशा देऊ शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द होईल.अजय माकनसारखा चेहरा पुढे करूनही आणि दिल्लीमध्ये १५ वर्षे काम करूनही इतका मोठा पराभव का पदरी पडला याचे आत्मपरिक्षण करणे नक्कीच गरजेचे असेल.१९७९ ते १९९७ या काळात विरोधी पक्षात असताना इंग्लंडमधील लेबर पक्षाने टोनी ब्लेअर हे नवेच नेतृत्व पुढे आणले आणि मग सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या त्याप्रमाणे कॉंग्रेसला नक्कीच स्वत:ला रिइन्व्हेंट करायला हवे.

प्रतिक्रिया द्या
16195 वाचन

💬 प्रतिसाद (107)
व
विकास Sun, 02/08/2015 - 17:36 नवीन
पाण्यात रहाणार्‍याला काठावरच्या माणसापेक्षा पाण्याचे तापमान अधिक जाणवत असावे... :) असेच काहीसे हा प्रतिसाद वाचताना जाणवले. तरी देखील कधी कधी त्यातून एकतर्फी विचार होण्याचे भय देखील असते. (ही आपल्यावर अथवा इतरांवर टिका आहे असे कृपया समजू नयेत). आपला सर्व प्रतिसाद एक लॉजिक म्हणून पटला. मोदींना चॅलेंज देयचे असेल तर केजरीवालांना नुसती अस्थिरता आणून चालणार नाही. तर काहीतरी भरीव करून दाखवावे लागेल. नाहीतर ते दिल्लीपुरतेच मर्यादीत राहतील.... काँग्रेस केवळ पैशाच्या जोरावर परत येऊ शकेल असे वाटत नाही. त्यांना नेतृत्व लागेल. ते देखील सर्वमान्य - म्हणजे गांधी घराण्याचेच. काँग्रेसच्या दृष्टीने विचार कराल तर, सोनीया आता सक्रीय राजकारण किती करू शकतील यावर शंका आहे. राहूल गांधी पुढच्या मिनिटाला काय करतील याची भिती आहे. प्रियांका गांधींमधे आजीचे नेतृत्व गूण असतीलही कदाचीत... पण नवर्‍याने जरा जास्तच गूण उधळले आहेत आणि मोदी सरकारने ते हुकमाचे पान अजून राखून ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेसला घरघर लागली आहे असेच आज तरी दृष्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 06:09 नवीन
राजकारण कोळून पिणे म्हणतात तो प्रकार काँग्रेसने नक्कीच केला आहे.काँग्रेस पक्ष अशाप्रकारची खेळी नक्कीच करू शकतो. एकतर काहीही झाले तरी यावेळी काँग्रेसला निवडणुक जिंकता येणार नाही हे त्यांना सुध्दा माहित आहे.तेव्हा पडद्याआड राहून आआपच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर हल्ला करणे (आणि तेही पडद्याआड राहून) आणि आआपने दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करता आली नाहीत की--"बघा दिल्लीत सरकार आम्हीच चालवू शकतो" असे म्हणत आआपला गेलेली भाजपविरोधी मते परत आपल्याकडे खेचून आणणे ही खेळी असू शकेल ही शक्यता आहेच. पण यात केजरीवाल अपयशी ठरतील हे मोठे गृहितक आहे आणि तो एक प्रकारचा जुगार आहे.तो जुगार खेळायला काँग्रेस पक्ष तयार आहे असे दिसते. काँग्रेसला भाजप जिंकण्याऐवजी आआप जिंकलेला कधीही परवडेल आणि आवडेलही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ह
हाडक्या Mon, 02/09/2015 - 11:55 नवीन
मला आप आवडत नाही पण तुमचे प्रतिसाद विचित्र आहेत आणि खासकरून हा तुमचा प्रतिसाद कुठेतरी खटकतोय असे नाही का वाटत हो पटाईत साहेब ? म्हणजे बघा,
दिल्लीतले ७०% मतदाता अनिधिकृत कोलोनीत राहतात)
ज्या राज्यातील (शहरातील) ७०% मतदार अनधिकृत घरांत राहतात तिथे अनधिकृतताच अधिकृत म्हणावी लागेल की नै ? आणि आधीची सगळीच प्रशासने/ विरोधी पक्ष हे होईपर्यंत झोपली होती काय ?
२० घरांपैकी ६ वीज चोरी करताना पकडल्या गेले होते. त्यांचे वोट आपलाच गेले.
म्हणजे सगळे चोर आपला वोट करतात आणि ते जाहीरपणे सांगत पण फिरतात ! भारीये बाबा.
किरण बेदी आल्यावर ईमांदारीचे राज्य येईल , जे कुणालाच नको होते.
इथे आपमध्ये आल्यावर लोक स्वच्छ/पवित्र होतात तसेच तुम्ही भाजपामध्ये पवित्र करायला लागलात की. त्या आल्या तर इमानदारीचे राज्य, ते पण जिथली बहुसंख्य जनता भ्रष्टाचारी आहे! बिचारीची वाईट अवस्था झाली असती की हो मग.
दिल्ली विजयाचा उपयोग केजरीवाल, देशात अस्थिरतेचे वातावरण पसरविण्या साठी करतील.
आधी कुठेतरी बोलल्याप्रमाणे, केजरीवालला कसलीही सहानुभुती नाही आणि तो किंवा त्याचा पक्ष देशात अस्थिरतेचे वातावरण पसरवू शकतात असे वाटत नाही. जनता तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त शहाणी आहे. काँग्रेसला घरी बसवून त्यांनी त्याचा प्रत्यय दिलाय हे पण लक्षात घ्या.
बाकी सर्वांचे खापर केंद्र सरकार वर फोडून अराजकता माजविली जाईल. आणि याचा फायदा कॉंग्रेस पक्ष घेईलच यात नवल नाही
इतर काही दूध-धुले नाहीत आणि असल्या गोष्टी सगळ्यांनीच केल्यात आणि करतात. इतरांनी फायदा घेतला तसाच काँग्रेसपण घेईल. काँग्रेसला परत परत संधी मिळते त्यातच समजून घेतले पाहिजे. (निवडून येत असतील तर ती तशी मिळावी, त्यात गैर काही नाही. ही लोकशाही आहे, कोणाला अस्पृश्य करण्यात काही हशील नाही.) तटस्थ असलो तरी हा "आप"परभाव पटला नाही. त्यामुळे तुम्ही मांडत असलेल्या इतर वस्तुस्थितीजन्य मुद्द्यांच्या (फॅक्ट्स) विश्वासार्हतेस धोका निर्माण होतो. तुम्ही म्हणता तसे बहुसंख्य दिल्लीकर अनधिकृत घरांत रहात असतील, चोरी (वीज्/पाणी) करत असतील तर त्यांना तसेच सरकार मिळणार. तुमच्यासारखे आणि इतर अल्पसंख्य प्रामाणिक नागरिक फार फार तर त्याविरुद्ध लढा देऊ शकता नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ब
बहुगुणी गुरुवार, 02/12/2015 - 21:29 नवीन
या निवडणूकीत एका वोट ची किंमत हजार रुपये होती. आमच्या उत्तम नगरच्या आपच्या उम्मेद्वाराच्या गोदामातून ८८०० बाटल्या पोलिसांनी जब्त केल्या तरी ही दारू वाहत होती. बहुतेक निवडणूक जिंकेल. मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्‍याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
व
विकास गुरुवार, 02/12/2015 - 21:45 नवीन
बापरे! (का आपरे?) हे काँग्रेसकडून झाले असते तर काही वाटले नसते.. कारण की: १९८५ साली ठाण्यात काँग्रेसच कडून निवडून आलेल्या खासदारांच्या हापिसच्या बाहेर एक असाच मदीरायुक्त पिंप जनतेला आनंद लुटण्यासाठी म्हणून ठेवला होता. त्या पिंपाचा नळ किंचीत गळत असल्याने ती मदीरा थेंब थेंब बाहेर पडत होती. कर्मधर्मसंयोगाने त्याच्याच वर भिंतीवर काही महीनेच आधी शहीद झालेल्या इंदीराजींचे पोस्टर होते आणि त्यावर घोषणा होती, "इंदिराजी की अंतिम इच्छा बूंद बूंद से देश की रक्षा!" (हा विनोद नाही, त्या वेळेस माध्यमात आले होते. पण गुड ओल्ड डेज... त्यावेळेस असल्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नसे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
न
नांदेडीअन Fri, 02/13/2015 - 07:54 नवीन

मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्‍याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.

दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. TOI ने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून Clarification सुद्धा छापले होते. इलेक्शन कमिशननेसुद्धा कुठेही नरेश बाल्यान यांचे नाव घेतल्याचे मला आठवत नाही. I answered all questions I was asked, in future also if I'll be summoned I will extend full cooperation. - Naresh Balyan ‍^ ANI ची बातमी एखाद्या जागी दारू पकडल्या गेली तर स्वतः पोलिस कमिशनर कॅमेर्‍यापुढे येऊन बाईट देतांना आजवर मी तरी पाहिले नव्हते. दिल्ली पोलिस कुणाच्या ऑर्डवर काम करते हे जाणून घेण्यासाठी राज्यघटना वाचण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे फक्त ‘आप’ च्या उमेदवारावर आरोप का लावल्या गेले असतील हे सहज समजण्यासारखे आहे. कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवरांचे दारू वाटतांनाचे व्हिडिओ यूट्युबर उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही यातच सगळे आले. समजा चौकशीअंती स्पष्ट झाले की दारू नरेश बाल्यान यांचीच होती, आणि तरीही आम आदमी पार्टी जर तेव्हा त्यांचा बचाव करताना दिसून आली तर ते निषेधार्हच असेल ! आप असा एकमेव पक्ष आहे ज्याला अधिकृत विपक्ष नाही, पण त्यांचे लाखो कार्यकर्तेच त्यांच्यासाठी विपक्षाचे काम करतात. अवांतर - दिल्लीचे सध्याचे पोलिस कमिशनर भिम बस्सी मला निरज कुमार यांच्यासारखेच वाटतात. इंडिया टुडे च्या कार्यक्रमात या निरज कुमारांनी अरविंद केजरीवालची टिंगल उडवतांना स्वतःची पातळी दाखवून दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
व
विकास Fri, 02/13/2015 - 17:44 नवीन
दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. दि हिंदू मधे आलेल्या कालच्या बातमीनुसारः "The land records show the godown as an inherited property owned by the Balyan family, but the electric meter on the premise is issued in the name of the wife of Naresh’s cousin Leela Ram." याच बातमी नुसार, त्याने आपला काही संबंध नाही म्हणून सांगितले, जे देखील खरे असू शकते. पण मग पोलीसांकडे जायला वेळ का लावला? हा प्रश्न राहतोच. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नांदेडीअन
L
llपुण्याचे पेशवेll Sun, 02/08/2015 - 05:31 नवीन
लेखातल्या बहुतांश मतांशी सहमत आहे. काही गोष्टीत मला जे वेगळे वाटते असे, १. हा पराभव म्हणजे मोदींचा/अमित शहांचा पराभव आहे का? -असेलही कदाचित, पण तसे नाही. दिल्लीतली अनेक मित्रांचे मत असे की दिल्लीत केजरीवाल आणि पार्लिमेंट मधे नरेंद्र अशी घोषणा दिल्ली निवडणूकीत आपवालेच देत होते. त्यामूळे दिल्लीतल्या यशामुळे जरी केजरीवाल मोदिंशी टक्कर घेउ पाहत होते त्या साफ आपटले. त्याच्या बरोबर उलटा न्याय जो दिल्लीकरांनी आधीच निर्धारीत केलेला होता तो इथे व्यक्त होताना दिसत आहे. म्हणजे उठवळ मिडीया देखील जे काही दाखवत आहे की मोदीनी वचने पाळली नाहीत म्हणून हा पराभव दिल्लीत होत आहे; असे मला वाटत नाही. २. क्र १ चा कदाचित भाजप धुरीणाना अंदाज असल्याने त्यानी शेवटपर्यंत निवडणूका पुढे ढकलून आप फुटेल कसा हे पाहीले. जरी तेव्हाचे (लोकसभा २०१४ नंतरचे दिल्ली विधानसभेचे) ओपिनियन पोल काहीही म्हणत असले तरी)क्र १ मुळे भाजप पिछाडीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र, हरियाणा इत्यादी निवडणूकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कदाचित निवडणूक टाळली असेल. अन्यथा हमखास विजय मिळेल अशी खात्री असलेली निवडणूक मोदी-शहा सोडतील असे वाटत नाही. अन्यथा शिवसेनेला सोडून एकट्याने लढण्याचा धाडसी निर्णय देखील या नेतृत्वानेच घेतला होता. हे ही विसरता उपयोगी नाही. असो. पुष्कळ वाद-प्रतिवाद होतील पण जनता जे ठरवेल ते खरे.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 06:15 नवीन
पहिला मुद्दा शक्य आहे. विशेषतः २०१३ डिसेंबरनंतर केजरीवाल मुख्यमंत्री असतानाही आआपचे बरेच मतदार लोकसभेत नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपला मते देतील ही शक्यता व्यक्त करण्यात येत होतीच.लोकसभेच्या वेळी त्याचा भाजपला फायदा झाला पण यावेळी फटका बसणार असे दिसते. तरीही महाराष्ट्र आणि हरियाणाबरोबर दिल्लीत मतदान झाले तर त्याचा महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमधील मतदानावर कसा काय परिणाम झाला असता? शेवटी मतदान एकत्रच झाले असते ना. कदाचित त्याचा झारखंड आणि काश्मीरमधील मतदानावर परिणाम झाला असता.तरीही ऑक्टोबरमध्ये नाही तरी डिसेंबरमध्ये झारखंड आणि काश्मीरबरोबर दिल्लीत मतदान घेता आलेच असते. जुनी विधानसभा बरखास्त करायला इतका वेळ का लावला हे न उलगडलेले कोडे आहे.
अन्यथा शिवसेनेला सोडून एकट्याने लढण्याचा धाडसी निर्णय देखील या नेतृत्वानेच घेतला होता. हे ही विसरता उपयोगी नाही.
याला अगदी +१००.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मित्रहो Sun, 02/08/2015 - 05:37 नवीन
आप जिंकेल असे वाटते आणि आपचा विजय कदाचित भारतात लोकशाही आहे हे दाखवून देणारा असेल. माढे दोन सहकारी दिल्लीचे आहेत ते आणि त्यांचे कुटुंब केजरीवालने ४९ दिवसात राज्य सोडले तरी केजरीवलांना संधी द्यायला संधी द्यायला हवी हे लोकसभेत झालेल्या तमाशानंतरही म्हणत होते. गेली कित्येक वर्षे भारतातल्या निवडणुकात दोनच मुद्दे आहेत १)तू माझ्यापेक्षा आधिक भ्रष्ट २) कोण आधिकसेक्यलर. पुढे जाउन भारतातील निवडणकांमधे धोरणे आणि मुद्दे यांची चर्चा होइल ही अपेक्षा. आजतरी आपकडे धोरणे नाहीत फक्त चांगल्या माणसांचा पक्ष येवढेच. लोकांनी मोदींना विकासपुरुष म्हणून निवडून दिले हेही भाजपने ध्यानात ठेवावे लागेल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 09:33 नवीन
गेली कित्येक वर्षे भारतातल्या निवडणुकात दोनच मुद्दे आहेत १)तू माझ्यापेक्षा आधिक भ्रष्ट २) कोण आधिकसेक्यलर. पुढे जाउन भारतातील निवडणकांमधे धोरणे आणि मुद्दे यांची चर्चा होइल ही अपेक्षा./blockquote> हो बरोबर. तू माझ्यापेक्षा जास्त भ्रष्ट आणि जास्त जातीयवादी हेच दोन मुद्दे जास्त प्रमाणावर राजकारणात राहिले आहेत. पण शेवटी लोकशाहीमध्ये लोक जसे असतात तसेच त्यांचे नेतेही असतात.आपण स्वतः कुठल्या ना कुठल्या प्रकारे भ्रष्ट असतानाही (भले ते सिग्नल मोडल्याबद्दल पोलिसाने पकडल्यावर ५०-१०० रूपयात पटविणे असो की ऑफिसमध्ये खोटी मेडिकलची बिले देणे असो) इतरांकडून स्वच्छ असायची अपेक्षा करणे असा दुटप्पीपणा आपण सगळेच करत असतो. तसेच कुणाही नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीचे अडनाव मुद्दामून विचारणे (म्हणजे त्या आडून अप्रत्यक्षपणे नक्की जात कुठची हे विचारणे) हे पण काही कमी कॉमन नाही.तरीही आपल्या नेत्यांनी मात्र जातीपातींना फाट्यावर मारवे अशी अपेक्षा आपण ठेवतो. तेव्हा आपल्यासारख्या समाजात हे होणे अपेक्षित आहेच.
आजतरी आपकडे धोरणे नाहीत फक्त चांगल्या माणसांचा पक्ष येवढेच.
आआप चांगल्या माणसांचा पक्ष असे म्हणणे मला तरी जड जाते.त्याविषयी पूर्वी खूप चर्चा मिसळपाववरच झालेली आहे.त्यामुळे त्यावर जास्त लिहित नाही.
लोकांनी मोदींना विकासपुरुष म्हणून निवडून दिले हेही भाजपने ध्यानात ठेवावे लागेल.
पण भाजपमधीलच कट्टर हिंदुत्ववादी मंडळींकडे बघून त्यांना हे भान असेल असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
म
मित्रहो Mon, 02/09/2015 - 11:46 नवीन
हा यथा राजा तथा प्रजा किंवा त्याच्या अगदी उलट you deserve the ruler the way you are हा नाही. मी भ्रष्ट की तू भ्रष्ट या प्रकारामुळे राजकारण वैयक्तीक पातळीवर येत मुळ मुद्द्यावर चर्चा होत नाही. आजतागायात हेच होत आले आहे. आजतागायात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा फायदा भाजप(जनसंघ)ला झाला मग ते जेपीचे असो किंवा व्ही पी सिंगांची बोफोर्स तोफ असो. यावेळेस कुणीतरी दुसराच त्याचा फायदा घेतोय. प्रथमच बीजेपी विरुद्ध सारे हे चित्र उभे राहीले आहे. ज्यांना बीजेपी नकोय ते काँग्रेसकडून आआपकडे वळलेय. एक्झीट पोलचेच आकडे घेतले तर काँग्रेसचे आठ ते दहा टक्के मत आआपकडे वळलेय. असेच ध्रुवीकरण इतर राज्यांच्या निवडणुकात पण होउ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:51 नवीन
आपले म्हणणे बरोबर वाटते आहे. आप कडे धोरणे नाहीत म्हणण्यापेक्षा, ते धोरणे कसे पुर्णत्वास न्हेतील असे प्लॅन नाहीये असे वाटते. बघु या काय होयील ते पण जर आप ने दिलेले मुद्दे व्यव्स्थीत पुर्णत्वास न्हेले नाहे तर आप साठी ते कायम स्वरुपी धोकादायक असेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो
न
नांदेडीअन Sun, 02/08/2015 - 05:55 नवीन
According to Today’s Chanakya—the survey agency that the entire BJP loves for its accurate prediction of the Lok Sabha results—Kejriwal is the overwhelming favourite of every caste, class, community and religion in Delhi. Muslims, Sikhs, Brahmins, Banias, Dalits, OBCs have all voted for him in near-identical numbers. Kejriwal is also the favourite of the youth, middle-aged and the old. This is a truly representative government; his victory would be a triumph of Indianness, a feat Sonia Gandhi loyalist Janardhan Dwivedi had recently attributed to Modi.
^ FirstPostवरील एका आर्टिकलमधून साभार.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/08/2015 - 09:07 नवीन
प्रतिक्रिया द्यायला आवडेल. परंतु निकालापर्यंत थांबतो आणि निकालावर आधारीत नंतर प्रतिक्रिया देतो.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 02/08/2015 - 17:08 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ज
जयंत कुलकर्णी Sun, 02/08/2015 - 17:53 नवीन
मला वाटते की टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन स्थापन करण्याची नितांत गरज आता आहे. कारण निवडणूका जिंकण्यासाठी काही लोकांच्या खिशातून पैसे लाटायचे आणि खिरापतीसारखे वाटायचे हे किती काळ चालणार. जे लोक, कंपन्या पैसे देतात त्यांना ते खर्च कसे करावेत यात काही मत आहे की नाही....हा खरा प्रष्न काही काळानंतर ऐरणीवर येणार हे निश्चित.... हेन्री डेव्हिड थोरोच्या एका लेखाचे मी येथे भाषांतर केले होते त्यात तो म्हणतो....... "सर्व मतदान हे एखाद्या खेळासारखे असते. फक्त त्याला एक नैतिकतेचा मुलामा दिलेला असतो. या खेळात आपल्याला चांगले आणि वाईट या दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची असते आणि हा एक प्रकारचा जूगारच असतो. मी चांगल्याच्या बाजूने मत टाकतो पण विजय चांगल्याचाच होईल का या बाबतीत मी बेफिकीर असतो. ते मात्र मी बहूमतावर सोडतो. म्हणजे मला जे चांगले वाटते, व जे चांगले आहे हे इतरांना चांगले वाटले नाही किंवा त्यांना तसे पटवले गेले की संपले. यामुळे होते काय की जर त्यांच्या उपयोगी एखादा उमेदवार पडला तर तो चांगला असे समिकरण तयार होते. याचा दुर्दैवाने असा अर्थ होतो की तुम्ही अत्यंत दुबळ्या आवाजात एका मताद्वारे सांगत असता की चांगले काय आणि वाईट काय ! आणि दुबळ्यांच्या मताला तीच किंमत मिळते जी मिळायला पाहिजे.''
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 09:12 नवीन
टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन
फार मोठी गरज आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
द
दुश्यन्त Sun, 02/08/2015 - 18:55 नवीन
टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन म्हणजे नक्की कुणाची संघटना ? अप्रत्यक्ष कर तर मला वाटते सर्वच लोक (गरीब/ श्रीमंत ) भरत असतात. आपल्याकडे काही लोकांना उगाचच वाटते कि खास करून मध्यमवर्गीय उच्च -मध्यमवर्गीय नोकरदार वगैरे लोक जो प्रत्यक्ष कर भारतात त्यावर देश चालत असतो. गरिबांसाठी कल्याणकारी योजना म्हणजे पैश्याचा अपव्यय नव्हे. सर्वाना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व समाजवादी वाटत असले तरी तेच योग्य आहे मात्र सगळी सरकारे गरिबांच्या उत्थानाच्या गप्पा मारतात त्यांना प्रगतीच्या संधी, कल्याणकारी योजना यावर पाहिजे तेवढे लक्ष कुणीच देत नहि.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Mon, 02/09/2015 - 04:00 नवीन
खर्च केल्यास टॅक्स भरावा लागतो त्या करदात्यांविषयी मी बोलत नाही. अर्थात मी म्हणतो आहे ते डे ड्रिमिंग आहे याची मला कल्पना आहे. एक कल्पना म्हणा हवी तर......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दुश्यन्त
ज
जयंत कुलकर्णी Mon, 02/09/2015 - 04:02 नवीन
मी कंपन्या असेही म्हटले आहे. मध्यमवर्गाला त्यांचे पैसे देश चालवत नाहीत याची पूर्ण कल्पना आहे/असावी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ह
हाडक्या Mon, 02/09/2015 - 12:04 नवीन
जयंत कुलकर्णींंशी सहमत (तात्विकदृष्ट्या),
टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन म्हणजे नक्की कुणाची संघटना ?
फार फार तर "डायरेक्ट टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन" म्हणा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
स
सुबोध खरे Sun, 02/08/2015 - 19:18 नवीन
देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व चुकीचे असून देशाच्या साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा असे तत्व हवे.
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/08/2015 - 21:13 नवीन
देशाची साधन संपत्ती राखण्याची आणि वृध्दींगत करण्याची जबाबदारी नक्की कोणाची? आपली जनता हक्काबद्दल बोलते, जबाबदारी कडे मात्र... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Sun, 02/08/2015 - 21:31 नवीन
मी तर म्हणेन साधन सामुग्रीचं रक्षण आणि संवर्धन करणारे प्रथम अधिकारी असायला हवेत. बरेच वेळा गरिब रिमेन्स गरिब बाय चॉईस. मध्यंतरी शेतकामगार मिळत नाहि म्हणुन शेतकर्‍यांची परवड आणि त्याच वेळी हाताला काम नाहि म्हणुन रोजगार हमि योजनेवर करोडो रुपये पाण्यात गेल्याचं उदाहरण कुठेतरी वाचलं होतं (बहुतेक लोकसत्ता). हा ताळमेळ बसवणं खरच गरजेचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 05:52 नवीन
देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व चुकीचे असून देशाच्या साधन संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असावा असे तत्व हवे.
+१. याच्याशी काही प्रमाणात साधर्म्य असलेली माझी एक कॉन्स्पिरसी थिअरी लिहितो. राजकारणी लोक आपली व्होट बॅंक जपायला कुठल्याही थराला जातात हे अनेकदा बघायला मिळाले आहे.एखादा पक्ष गरीबांची बाजू घेतो त्या पक्षाचे हितसंबंध बहुतांश लोक गरीबच असावेत यात गुंतलेले असतात असे म्हणता येईल का? याचे कारण समजा लोकांना श्रीमंत करणे म्हणजे आपल्या हक्काच्या व्होटबॅकवर परिणाम करणे किंवा स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारणे.किती पक्ष तसे खरोखरच करू शकतील? दुसरे म्हणजे एकदा एखाद्या पक्षाची एक प्रतिमा झाली की ती बदलणे फार कठिण असते.म्हणजे काहीही झाले तरी भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल.वाजपेयी सरकारने राम मंदिराचा मुद्दा एन.डी.ए सरकारच्या कार्यक्रमातून दूर ठेवला तरी सरकारचा छुपा अजेंडा तोच आहे अशा स्वरूपाचेच बोलले जात होते. त्याच न्यायाने एखादा गरीबांची बाजू घेणारा पक्ष असेल तो प्रो-गरीब म्हणूनच ओळखला जाणार. तेव्हा माझा दावा असा की गरीबांची बाजू घेणारा पक्ष हा गरीबी दूर करण्यासाठी फारसा उपयोगी नाही.त्याउलट श्रीमंतांची बाजू घेणाऱ्या पक्षाला आपली व्होट बॅंक वाढवायला अधिकाधिक लोकांना पहिल्यांदा मध्यमवर्गात आणि नंतर श्रीमंत वर्गात आणण्यात इन्सेन्टिव्ह असतो. तेव्हा श्रीमंतांची बाजू घेणारा पक्ष हा अधिक चांगल्या पध्दतीने गरीबीविरूध्द पावले उचलू शकतो अशी माझी कॉन्स्पिरसी थिअरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 05:19 नवीन
भाजपचा विजय झाला तर तो आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस यांच्यापेक्षाही ओपिनिअन पोल आणि एक्झिट पोल वाल्यांचा मोठा पराभव असेल. २००४ मध्ये या पोलवाल्यांना मोठा धक्का बसलाच होता त्याची पुनरावृत्ती होईल आणि स्वत:ची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी त्यांना अधिक कष्ट घ्यावे लागतील. भाजप भाजपचा विजय झाल्यास मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा विजयरथ उधळला आहे तो चालूच आहे असे चित्र उभे राहिल.यातून नरेंद्र मोदींचे भारतीय राजकारणातील निर्विवाद स्थान पक्के होईलच. पण त्यात धोका असा की कोणताही समर्थ विरोधी पक्षच न उरल्यामुळे काहीही झाले तरी लोक आपल्यालाच मत देतील ही जी मतदारांना गृहित धरायची प्रवृत्ती काही प्रमाणात पक्षामध्ये दिसत आहे ती वाढीस लागेल.पक्षाच्या आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे देशाच्या आणि देशातील लोकशाहीच्या दृष्टीने हे धोक्याचे असेल. दिल्ली भाजपच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे तिथल्या स्वत:ला स्वयंभू समजणाऱ्या नेत्यांना किरण बेदी मुख्यमंत्री झालेल्या आवडतील असे वाटत नाही.मदनलाल खुराणांसारखे सर्वमान्य नेतृत्व दिल्ली भाजपकडे नाही.सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी पोलिसी खाक्या चालणार नाही तर सर्वांना बरोबर घेऊन, कधी चुचकारत, कधी पडती बाजू घेत पुढे जावे लागेल.ते किरण बेदींना कितपत जमेल हा पण प्रश्न आहेच. दिल्लीत विजय झाल्यास तो विजयही दिल्लीतील भाजप नेतृत्वावर लोकांनी दाखविलेला विश्वास असेल असे म्हणणे नक्कीच जड जाईल. परत एकदा लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावावर लोकांनी मते दिली म्हणून तो विजय साध्य झाला असेच म्हणायला हवे.पक्षाच्या दिल्लीतील भवितव्याच्या दृष्टीने हे नक्कीच धोकादायक आहे.इतर राज्यांमध्ये भाजपचे खमके आणि जनाधार असलेले नेते आहेत तसे दिल्लीत कोणीच नाही.मदनलाल खुराणांना दिल्ली भाजप नक्कीच मिस करत असेल.भाजपचा विजय झाला तरीही भविष्यात मीनाक्षी लेखी यांना दिल्लीत पुढे आणायला हवे असे मला वाटते.एकतर त्या तरूण आहेत, अभ्यासू आहेत आणि मुख्य म्हणजे शांत आणि समतोल आहेत असे दिसते. याचा फायदा पक्षाने करून घ्यायला हवा. आआप आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यास मात्र पक्षाच्या अस्तित्वाच्याच दृष्टीने ते धोक्याचे असेल.मुळात पक्षात किती मतभेद आणि भांडणे आहेत हे जगजाहीर आहेच.केजरीवालांनी आपल्या अहंमन्य स्वभावामुळे अनेकांना दुखावले आहेच.आणि असे दुखावल्या जाणाऱ्यांमध्ये शांती भूषण, प्रशांत भूषण या महत्वाच्या पक्ष संस्थापकांचाही समावेश आहे. त्यातून सत्तेचे लोणीसुध्दा नसेल तर अशा दुखावल्या गेलेल्या मंडळींना पक्षाबरोबर राहण्यास काहीच इन्सेन्टिव्ह राहणार नाही.नंतरच्या काळात केजरीवालांनी पक्ष व्यवस्थित सांभाळला नाही तर आआपचा अगदी मनसेसुध्दा होऊ शकतो. कॉंग्रेस कॉंग्रेस पक्षाच्या दृष्टीने भाजपचा दिल्लीतील विजय ही आआपच्या विजयापेक्षा अधिक जास्त वाईट बातमी ठरेल. आआप जिंकला तर निदान विरोधी पक्षाचा विजय झाला आणि महत्वाचे म्हणजे केजरीवाल त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले की आआपला मिळालेली भाजपविरोधी मते आपल्याकडे परत येतील हा अंदाज कॉंग्रेसचा असेल.भाजपचा विजय झाल्यास ते ही होणार नाही. अनेकदा दिल्ली कॉंग्रेसचे खरोखरच वाईट वाटते.अगदी अलीकडच्या काळापर्यंत १५ वर्षे दिमाखात राज्य करूनही आणि काम करूनही पक्षाची इतकी दयनीय अवस्था का व्हावी?शीला दिक्षित यांनी २०१३ च्या निवडणुकांपूर्वी--’कोण केजरीवाल’? हा खोचक प्रश्न विचारला होता त्याचा पश्चात्ताप त्यांना जन्मभर करावा लागेल असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:14 नवीन
विश्लेषण योग्य ... पण पराभुत आपचे विश्लेषण चुकीचे वाटले सत्तेच्या लोण्याची हाव ठेवुन पक्षात येणारे असतील ही, परंतु बरेचसे कार्यकर्ते .. नेते हे आप मध्ये फक्त पदासाठी.. सत्तेच्या लोभा साठी आलेले नाहीत. इतर राजकिय पक्षांप्रमाणेच हे पण असेच असे मत घेवुनच आपण असे बोलु शकतो. आंदोलनातुन मिळालेल्या नेत्यांना फक्त सत्ताकारणाच करावयाचे आहे असे नसते. भांडन कुठल्या पक्षात नसते.. आपचे भांडण सरळ सरळ टीव्ही वरती दिसते.. कारण बाकी पक्षांप्रमाणे स्टेटस साठी आणि पैश्याच्या जोरावर न्युज दाबायला आप ला येत नसेल असे वाटते. आप सत्तेतुन पाय उतार झाल्यावर न्युज चॅनेल कधी त्यांच्याबद्दल चांगले बोललेले मला आठवत नाही. म्हणजे काहीच चांगले न घडवता लोक त्यांना मत देतायेत हे म्हणने चुकीचे आहे. त्यामुळेच वयक्तीक अहं असु शकतो.. बर्याचदा चांगल्या गोष्टींचा अहम पण इतर सहकार्‍यांना योग्य वाटत नाही.. पण मनसे होईल ही गोष्ट चुकीची वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
व
विटेकर Mon, 02/09/2015 - 05:26 नवीन
नेहमी प्रमाणे क्लिन्टन यांचे उत्तम विश्लेषण ! भारतीय लोकशाही प्रबुद्ध होत आअहे असे वाटत असताना राजधानीत मात्र स्वार्थी लोकांची बजबजपुरी आहे असे वाटते. दिल्लिकर अजूनहे स्वतःच्या पलिकडे पहायला तयार नाहीत. भाजपाचा दिल्लितील पराभव हा मोदींच्या धोरणाचा पराभव आहे असे इतक्या लवकर म्हणणे चुकीचे ठरेल .कॉन्ग्रेसने आणि अन्य विरोधी पक्षांनी कितीही ओरड केली तरी मोदिंबाबत लोकांचा भ्रमनिरास झाला आहे असे वाटत नाही. भाजपाचा पराभव हा कदाचित दिल्लीतील लोकांची लोकशाहीची कमी समज, देशाचे काहीही होऊ दे, माझा फायदा झाला पाहीजे ही कोती विचारसरणी , हेच असू शकेल असे वाटते. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. कसलेही धोरण नसलेला कुत्र्याच्या छत्रीसारखा उगावलेला पक्ष कशाचे कल्याण करु शकेल ? यापेक्षा कॉन्ग्रेस सत्तेवर यायला हवा असे जरूर वाटते आहे. भाजपाला चाप लावायला त्याचे अधिक गरज आहे. ओन सेकन्ड थॉट .. काही साध्या साध्या चुका ज्या भाजपाने केल्या ( हर्षवर्धन डावलणे , निवडणूकांना उशीर करणे , पक्ष बांधणी न करणे ) त्या ही मुद्दामच केल्या की काय असे वाटते . कारण जरी समजा आप आले तरी ते फार काळ कारभार करु शकतील असे वाटत नाही , अश्या वेळी ही संधी कॉन्ग्रेसच्या ऐवजी आप ने घेतेली की एका दगडात दोन पक्षी ! कोन्ग्रेसचे आणखी ह्युमिलेशन होईल आणि आप या निवडणुकीनंतर कायमची संपेल. ( आप राज्यकारभार करु शकणार नाही याची माझ्याप्रमाणे अनेकांना खात्री आहे , भाजपाच्या धुरंधराना हे माहीत नसेल काय ?)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:25 नवीन
भाजपाचा पराभव हा कदाचित दिल्लीतील लोकांची लोकशाहीची कमी समज, देशाचे काहीही होऊ दे, माझा फायदा झाला पाहीजे ही कोती विचारसरणी , हेच असू शकेल असे वाटते. लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते हे पुन्हा एकदा सिद्ध होईल. कसलेही धोरण नसलेला कुत्र्याच्या छत्रीसारखा उगावलेला पक्ष कशाचे कल्याण करु शकेल ?
अतिशय चुकीचे मत.. म्हणजे तुमचे असे म्हणणे की दिल्लीतील लोकआंना कमी समज आहे. मात्र भाजप खुप चांगला पक्ष. मला हेच कळत नाही लोक आपल्या म्हणण्याला पटवण्यासाठी दुसर्यांचा असा अनादर का करत असतात, म्हणजे आपल्याला तेव्हडे कळते बाकीच्यांना नाही. असे समजने खुप चुकीचे आहे. आणि दुसर्याला कमी लेखन्याची चुक पुढे खुप महागात पडते.. जसे गेल्या निवडनुकीत आप ला कमी लेखले होते तसे. ---------- दुसरी गोष्ट, चिंचवड मध्ये भाजप निवडुन आला.. का तर अनधिकृत बांधकामे नियमित करुन दिली जातील .. हे सुद्धा वयक्तीक स्वार्थाकडे झुकणारे नाही वाटत का ? नाहितर राष्ट्रवादीच्या आयात उमेदवाराला भाजप ने तिकट दिले होते. अनधिकृत बांधकामांविरोद्धत उत्कृष्ट काम करणार्या श्रीकर परदेशींची उचलबांगडी आणि अश्या लोकांना असल्या अस्वासनां साठी निवदुन देणे हे सुद्दा याच स्वार्थी बजब्जपुरीत येत नाही ही कमाल. असो.. आपणास भाजप कसा योग्य वाटतो ते ठिक पण दुसरे कसे स्वार्थी .. बावळट आणि आपण तेव्हडे चांगले हे चुकीचे आहे. लोकांना योग्य प्रशासन आप देवु शकतील असे वाटले असेन कारण त्यांनी कॉन्ग्रेस आणि भाजपे ची सरकारे पाहिलेली आहेत, भाजप महानगरपालिकेत ही होताच. त्यामुळे त्यांना वेगळा ऑप्शन पाहिजे असेन . बाकी आप कडे धोरणे नाही असे म्हणणे ही योग्य नाही. जर निवडुन आल्यावर ते कळेल . बघु जमले तर धोरणांवर एक धागा यावा लागेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
र
रमेश आठवले Mon, 02/09/2015 - 05:37 नवीन
आपल्या ४९ दिवसाच्या कारकिर्दीत आप ने मतदारांना वीज व पाणी यांच्या वापरात खूप सवलती दिल्या आणि इतर सवलतींची आश्वासने दिलि. त्यामुळे आप चे सरकार आले तर निदान या सवलती पुन्हा मिळतील यांची खात्री असल्याने बहुसंख्य आणि म्हणजेच गरीब वर्गातल्या लोकांनी आप ला मते दिली असावीत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:31 नवीन
ह्म्म.. कदाचीत असे ही असेन की ह्या बेसिक गोष्टी इअतर कोणी देवु शकले नाहीत आता हे तरी बघु . किंवा उद्योगधंद्यांना पाठपुरवठा करता करता, बेसिक सामान्य लोकांना पाहण्यास इअतर कोणाला वेळच नसेल असे ही वाटले असु शकते ना. गोश्ट तीच असते पण त्याला अनेक कंगोरे असु शकतात. वाजपेयींच्या निवडनुकीवेळेस .. समान नागरी कायदा आणाणर या गोष्टीसाठी मी भाजप ला मत दिले होते. ते तर आले नाहीच , पण नंतर तो मुद्दा पण पुन्हा कधी दिसला नाही. मग माझ्यासारखे नागरीक इतर कोणी त्यांनी दिलेली अश्वासने पाळतील असे वाटुन दुसरीकडे वळतील असे वाटल्याने त्यात वावगे काही नसते. -- लोकांनी फक्त प्रामाणिकतेला मते दिलेली नाहित तसे असते तर मनमोहन सिंग ही पुन्हा देशात सत्तेवर आले असते. लोकांना विश्वास पण वाटावा लागतो आणि तो आप कडे सध्या आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 02/09/2015 - 06:46 नवीन
अरविंद बद्दल लई काही माहिती आहे जी इथे नाही शेयर करू शकत!!! तरीही आप नको यायला असे मनापासुन वाटते आहे.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 02/09/2015 - 07:17 नवीन
तुमाले कोन इचारुन राह्यते वो बाप्पु, थे "आप"ले दिल्लीकर तं उड्या मारून रायले ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 02/09/2015 - 07:28 नवीन
सालं तेच तर रडणे आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ह
हाडक्या Mon, 02/09/2015 - 12:13 नवीन
अरविंद बद्दल लई काही माहिती आहे जी इथे नाही शेयर करू शकत!!!
सोन्याबापु व्यनि करता काय ? जाणून घ्यायची इच्छा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 12:42 नवीन
लई काही माहिती
अर्र्र्र्र्र्र् !! इलेक्शन अगोदर भाजपाला दिली असती तर आप हारलं असता ! काय राव तुम्ही ! गेला बाजार एका राज्याचे राज्यपालपद घालवलतं !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 02/09/2015 - 12:58 नवीन
नको हो!!! राज्यपाल पद म्हणजे बिन नखा चा वाघ्या!काय करायचे घेऊन!! आम्ही आपले नोकरच बरे!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
प्रसाद१९७१ Mon, 02/09/2015 - 07:33 नवीन
माझ्या मते, भाजप हरला तरी मोदींनी काळजी करु नये. भाजपकडे चांगला मुख्यमंत्री नसल्यामुळे भाजप हरला आहे. अगदी आत्ता जरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या तरी दिल्लीत भाजपच्या ६ जागातरी नक्की येतील. लोक फार हुषार आहेत. केंद्रात मोदी आणि राज्यात केजरीवाल असे मत देणारे बरेच आहेत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 10:54 नवीन
जिंकले तर मोदी आणि हरले तर बेदी ! इथे जिंकायची खात्री नाही म्हणून तर मुख्यम्ण्त्रीपदाचा उमेदवार घोषित केला . या पूर्वी लोकसभेनंतरच्या निवडणूकींमध्ये भाजपाने मुख्यम्ण्त्रीपदाचा उमेदवार घोषित केला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
च
चिगो Mon, 02/09/2015 - 08:49 नवीन
आआपला बहुमत मिळेल, असं सर्व्हे सांगताहेत. मी आआप आणि केजरीवाल ह्यांनी विजयी व्हावं की नको, ह्याबाबतीत संभ्रमात आहे. एकीकडे वाटतं कि त्यांनी बहुमताने जिंकून यावं म्हणजे मग सरकार चालवनं म्हणजे नुस्त्या फुशारक्या मारणं, दुसर्‍यांवर आरोप करणं, तमाशे करणं इतकंच नसून एक 'सिरीअस जॉब' आहे हे कळेल. कदाचित राजनैतिक परिपक्वतापण येईल आणि भारतीय राजकारणाला एक वेगळा आयाम लाभेल. दुसरीकडे त्यांच्या ४९ दिवसांचा तमाशा आठवला कि वाटतं, नको.. बहुमतात आले, तर अजून जास्त माज येईल. "बाकी सगळेच भ्रष्टाचारी"चा मंत्र असल्याने येताजाता अधिकार्‍यांची शरम काढणे, त्यांना टाकून बोलणे आणि एकूणच सावळागोंधळ वाढेल.. मी 'जनरलायझेशन'पासून नेहमीच दूर राहतो, मात्र बर्‍याच आआप समर्थकांची वागणूक मला ह्या पक्षाच्या उथळतेबद्दल आणि त्याच्या अराजकता-प्रेमाची खात्री पटवते. मतदान संपल्यानंतरही, अजूनही २००४च्या शाही इमामनी भाजपाला देऊ केलेल्या पाठींब्याबद्दलच्या बातम्या डकवून दिशाभुल (कुणाची ते तेच जाणोत) करण्याचा प्रयत्न करणारे आआप समर्थक बघितले की किंव वाटते..
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 02/09/2015 - 11:01 नवीन
एक मार्मीक भाष्य आपकी परछाईयां आपकी पहचान है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
क
कपिलमुनी Mon, 02/09/2015 - 09:20 नवीन
पुन्हा त्रिशंकू येइल असे वाटते . कारण भाजपाने भरपूर जोर लावला आहे तिकडे दुर्लक्ष करून चालणार नाही . काँग्रेस आणि इतर पक्ष -अपक्ष किती जागा घेतात यावर बरेच अवल>बून आहे
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 09:41 नवीन
मी निवडणुकांचा अंदाज गेली कित्येक वर्षे व्यक्त करत आहे. माझे अंदाज कधी बरोबर आले तर अनेकदा चुकले.अनेकदा माझ्या अंदाजांमध्ये आणि प्रत्यक्ष निकालात अगदी मोठा फरक होता (जसे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये झाले). पण तरीही एकंदरीत निवडणुकांच्या कलाच्या बाबतीत मात्र बहुतांश वेळी माझे अंदाज बरोबर ठरले होते.पण यावेळी मात्र मी पूर्णपणे ब्लॅन्क आहे.आआप पुढे असेल असे वाटत असले तरी तो दावा १००% खात्रीने करणे अजूनही जड जात आहे.एखाद वेळेस काही पोल म्हणत आहेत त्याप्रमाणे निवडणुका एकदम एकतर्फी सुध्दा होतील.तरीही निवडणुका एकदम एकतर्फी होतील याची चिन्हे २०१३ मध्ये कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान यात दिसत होती तशी यावेळी दिल्लीत तरी नक्कीच दिसत नाहीत.तेव्हा उद्या खरोखरच इंटरेस्टिंग दिवस असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जयंत कुलकर्णी Mon, 02/09/2015 - 11:34 नवीन
क्लिंटन एक सल्ला..... या अशा लेखात (विश्र्लेषण) तुमची कुठलिही इच्छा प्रकट होऊ नये असे वाटते. त्या साठी वेगळा धागा मात्र जरुर काढावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 11:50 नवीन
धन्यवाद जयंत कुलकर्णी. माझी इच्छा इतर धाग्यात यापूर्वीच प्रकट केली आहे :) आणि माझा अंदाज वर लिहिल्याप्रमाणे असला तरी तो अंदाज व्यक्त करायला लागणारा नेहमीचा कॉन्फिडन्स नाही :( असो. पुढील निवडणुकांच्या वेळी तुमचा सल्ला लक्षात ठेवेनच. भारतात निवडणुकांना काही कमी नाही.दरवर्षी कुठल्यातरी निवडणुका चालू असतातच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ग
गणेशा Mon, 02/09/2015 - 11:54 नवीन
येस, आप बद्दल आपली मते टोकाची आहेत .. एकदम वेग वेगळी. परंतु येथीलच नाही, बरेच आधीच्या वेगवेगळ्या धाग्यावरचही तुमची मते आवडतात. त्यामुळे प्रत्येक आपल्या धाग्यांचा रिप्लायकर्ता नसलो तरी एक वाचक आहे. लिहित रहा... आणि एक.. कधी कधी आपण टोकाचा मुद्दा पकडुन बसतो त्यामुळे काही चांगल्या गोष्टी पण आपण त्याच टोकामुळे पाहु शकत नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 14:05 नवीन
प्रतिसादाबद्दल आणि प्रतिसाद न वाचताही वाचनमात्र राहिलेल्या सर्वांना धन्यवाद. लवकरच निकालांसाठीचा धागा सुरू करत आहे.उद्या सकाळी जसे कल/निकाल यायला लागतील तसे त्या धाग्यावर पोस्ट करेनच.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Mon, 02/09/2015 - 14:21 नवीन
प्रत्यक्ष दिल्लीमधे प्रचार काळात असलेल्यांचे मत आप च्या बाबतीत वेगळे आहे. उद्याच्या निकालात ते सर्वाना कळेलच
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Mon, 02/09/2015 - 14:31 नवीन
प्रत्यक्ष दिल्लीमधे प्रचार काळात असलेल्यांचे मत आप च्या बाबतीत वेगळे आहे. उद्याच्या निकालात ते सर्वाना कळेलच
हो निकालाची अगदी आतुरतेने वाट बघत आहे.इतकी वाट कुठल्याही मतमोजणीच्या दिवसाची बघितलेली नाही--अगदी १६ मे ची सुध्दा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति अळवणी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा