Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वासोटा - बामणोली ते चोरवणे

स
सतीश कुडतरकर
Sat, 02/14/2015 - 12:33
💬 41
वासोटा- बामणोली ते चोरवणे कामाच्या धबडग्यात आणि पोटापाणाच्या उद्योगात एव्हढा गुंतून गेलो होतो की मलापण गड किल्ल्यांचा विसर पडायला लागला होता. डोंबिवलीहून कल्याणला राहायला गेल्यामुळे तर मित्रपरिवाराचे दर्शनसुद्धा दुर्लभ झाले होते. अक्षरश ७ वर्षे सर्वांपासून दूर कुठेतरी राहायला गेल्यासारखं वाटत होत. रोजचा कल्याण ते अंधेरी प्रवास म्हणजे एक दिव्यचं. रात्री बारा-एक वाजायचे घरी यायला. पण मनात कुठेतरी डोंबिवलीप्रेम जागृत होत. परत सगळ्या मित्रांना भेटायला उत्सुक झालो होतो आणि त्यातच डोंबिवलीमध्ये परतण्याचे माझे प्रयत्न चालू होते आणि एक दिवस आपल्या घरट्यात परतलो. बराचश्या मित्रांची लग्न झाली होती आणि सगळे जण आपापल्या संसारात रमले होते. सुटलेली पोट तेच सुचवत होती. अशातच डोंबिवलीला परत आल्यामुळे माझ्या ट्रेकींगच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. लगेच सगळ्या मित्रांच्या गाठीभेटी सुरु झाल्या, पण सगळ्यांनी जणू माझ्या आनंदावर विरजण घालण्याचा विडाच उचलला होता. जवळपास सगळ्यांनीच ट्रेकींग सोडून दिल होत. तशातच एकदा थोबाडपुस्तकावर एक 'मित्र विनंती' दिसली. नाव वाचले संजय गवळी. खूप वर्षानंतर भेटला तोही थोबाडपुस्तकावर. मग एक दिवस प्रत्यक्ष भेटलो आणि बोलता-बोलता अस कळल कि त्यालासुध्दा ट्रेकींगची आवड आहे आणि त्याने जवळच्या मित्रांबरोबर २-३ ट्रेक केले आहेत. माझ्या आशा पल्लवित झाल्या. लागलीच ट्रेकसुद्धा ठरवला हरिश्चंद्रगड. त्यानंतर राजमाची २ वेळेस (लोणावळा आणि कर्जत दोन्ही बाजूने), राजगड असे ट्रेक सुरु झाले. पण एक गड मात्र खूप वर्षांपासून मनात घर करून राहिला होता 'वासोटा'. आता मात्र वासोटा करायचाच हे मी आणि संजयने नक्की केल. आमच्यासोबत आता नवीन मित्र मंडळी जमा झाली होती. त्यातच माझे गिरीविराज हायकर्स मधले सहकारी दर्शन एडेकर व वासू दळवी, हे दोघे हि येण्यास तयार झाले. दर्शन आणि वासू सर्पमित्र असल्याकारणाने जंगलाचेसुद्धा चांगले ज्ञान होते त्यामुळे माझा आणि संजयवरचा ताण थोडा कमी झाला होता कारण बाकी सगळे सवंगडी नवीनच होते. आमचे नवीन साथीदार प्रमोद तायडे, जंगबहादूर, श्रीनिवास गवळी हे सुद्धा येण्यास तयार झाले. आंतरजालावर माहिती काढण्यास सुरुवात केली पण कुठेच वासोट्याविषयी संपूर्ण माहिती मिळाली नाही. काही ब्लॉग्समध्ये नागेश्वर गुहेमध्ये राहू शकतो अस वाचल होत, पण ती माहितीसुद्धा जुनी आणि अपूर्ण होती त्यामुळे त्या माहितीविषयी संपूर्ण खात्री नव्हतीच. शेवटी तिथे गेल्यावरच पाहू अस ठरलं. श्रीनिवासने आमदार कोट्यातून त्याच्या ओळखीने, जाताना कल्याणवरून महालक्ष्मी एक्सप्रेस आणि येताना चिपळूण वरून राज्यराणी एक्सप्रेसचे आगाऊ तिकीट काढले. कारण आमचा मार्ग ठरला होता तो असा- कल्याण-सातारा-बामणोली-वासोटा-नागेश्वर गुहा (रात्री गुहेत मुक्काम)-चोरवणे-चिपळूण-ठाणे-डोंबिवली. खूप वर्षापासूनचे स्वप्न खरे होणार म्हणून मला तर अक्षरशः पोटामध्ये गुदगुल्या होत होत्या. ७ फेब्रुवारी २०१३ च्या रात्री मी, संजय, जंग, आणि प्रमोद डोंबिवलीहून निघालो. श्रीनिवास अंबरनाथवरून कल्याणला येणार होता. वासू आणि दर्शन कल्याणमधेच होते. सर्वजण कल्याणला फलाट क्र. ५-६ वर गोळा झालों. बरोबर ९.२५ वाजता महालक्ष्मी एक्सप्रेस गाडी सुटली. आम्ही आगाऊ बुकिंग केल्यामुळे आणि सातही तिकीट confirm झाल्यामुळे प्रत्येकाला बर्थ मिळाला होता. त्यामुळे प्रवासाची दगदग होणार नव्हतीच. पण कोणाच्याही मनात झोपण्याचा विषयच नव्हता. आम्ही सगळे खालच्या २ बर्थ वर बसून गप्पा गोष्टी करत होतो. आणि उरलेले बर्थ आम्ही TC च्या मागे भटकणाऱ्या लोकांना देऊन टाकले होते तेही फुकट. सकाळी ३.४० ला सातारा रेल्वे स्थानकात उतरून चहा घेतला जेणे करून अंगामध्ये तरतरी येईल. आता बामणोलीला जाण्यासाठी सातारा एस टी स्थानक गाठायचे होते. सातारा स्थानकातून २ रिक्षा पकडून ४.२० ला एस टी स्थानकात उतरलो. बामणोली गाडी सकाळी ६ वाजता होती. बरोबर ६ वाजता बामणोली गाडी लागली आणि सकाळी ७ वाजता एकदाचे बामणोलीला उतरलो. बामणोलीला उतरून पोटपूजा केली आणि बोटीसाठी शोधाशोध सुरु झाली. पण बामणोलीकराना कुठे घाई होती. बोट १० वाजता निघणार होती आणि त्याची बुकिंग ९.३० ला सुरु होणार होती. त्या नंतर परत जंगल विभागाची परवानगी आवश्यक होती. त्यांच कार्यालय ९.३० ला उघडणार होत. तो पर्यंत आम्ही आमची पक्षी निरीक्षणाची हौस भागवून घेत होतो. दर्शन आणि वासू कुठे काही वळवळतय का ते पाहत होते. आम्हाला बुकिंग कार्यालयाच्या उजव्या हाताला एका उंच झाडावर एक घारीसारखाच पक्षी दिसला, संजय ने त्याची ओळख करून दिलि- ब्राह्मणी घार.
From VASOTA 07FEB2013
बरोबर ९.३० ला बुकिंग कार्यालय उघडले आणि बोटचे दरपत्रक पाहून आमचे डोळेच दिपले. १२ जणांच्या ग्रुपसाठी एक बोट आणि तिचे भाडे रु. ३२००/-. (मी कुठल्यातरी ब्लॉगमध्ये रु. ७००/- वाचले होते.) आमचा ७ जणांचा ग्रुप होता. आम्ही एक बोट बुक केली. तिथले दरपत्रक पाहून थोड्या वेळाने एक ४ जणांचा ग्रुप आमच्याकडे आला कारण आम्ही फक्त ७ जण आहोत याची त्यांना माहिती मिळाली होती. आमच्या बोटमध्ये ५ जागा शिल्लक होत्याच, त्यांनासुद्धा आमच्या बोटमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. आम्हाला सुद्धा हा व्यवहार चांगला वाटला, कारण भाडे आता आम्हा ११ जणांमध्ये विभागणार होते, त्यामुळे आम्हीसुद्धा खुश होतो. लागलीच आम्ही आमचा निर्णय बोट मालकाला सांगितला. पण बोट मालकाला आणि एकंदर तिथल्या संपूर्ण व्यवस्थेला आमचा व्यवहार मान्य नव्हता. तिथल्या व्यवस्थापनाने त्या ४ जणांना वेगळी बोट करण्यास भाग पाडले. त्यांना मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली आणि जंगल विभागाकडे मोर्चा वळवला कारण आता पुढची पायरी म्हणजे त्यांची परवानगी आवश्यक होती. वासोटा जंगल, अभयारण्य म्हणून घोषित झालेले आहे. बाकी मंडळी तो पर्यंत जंगल विभागाच्या कार्यालयात ठाण मांडून बसली होती. त्यांची परवानगी घेतली, तिथे सुद्धा प्रवेश फी रु. ४००/- भरले + गाईड चे रु. २००/- भरले. म्हणजे जवळपास ७ जणांसाठी रु. ४०००/- इथेच खर्च झाले होते. गाईड घ्यावाच लागतो, कारण वासोट्यावर राहण्यास परवानगी नाही. हा गाईड म्हणजे बोट चालक, तोच तुम्हाला वासोटा फिरवून परत बोटीने बामणोलीला आणून सोडतो. आमची नागेश्वर गुहेमध्ये राहण्याची आशा मावळली होती. थोडे हिरमुसले होऊन बाहेर एक चिंतन शिबीर भरवलं. सर्वानुमते अस ठरवण्यात आले कि आजच वासोटा करून लगेच नागेश्वरच्या बाजूने खाली चोरवणेकडे उतरायचे. जंगल विभागतर्फे चौकशी दरम्यान आम्ही आमचा चोरवणेला उतरण्याचा निर्णय सांगितला. तिथे बसलेल्या अधिकाऱ्याने प्रथम नकार घंटा वाजवली. तो काही ऐकतच नव्हता. त्याला वाटत होत आम्ही चोरवणेला न उतरता नागेश्वर गुहेत मुक्काम करू. पण आम्हाला मात्र कोणत्याही परिस्थितीत चोरवणेला जायचेच होते कारण आम्ही ट्रेनचे आगाऊ आरक्षण चिपळूणवरून केले होते. सरते शेवटी खूप विनंती केल्यावर त्याने एका अटीवर परवानगी दिली आणि दम भरला. नागेश्वर गुहेत अजिबात मुक्काम करायचा नाही, कितीही थकलात, पाय अगदी गळ्यात आले तरी, धड्पडलात, पडलात, मोडलात तरीही कोणत्याही सबबीशिवाय खाली चोरवणेला उतरून जायचे, अन्यथा मुक्काम करतेवेळी पकडले गेल्यास कैद किंवा आर्थिक दंड रु. ५००००/- प्रत्येकी भरावा लागेल, अथवा सात वर्षे कैद. आमच्याकडून एक प्रतिज्ञा पत्र लिहून घेण्यात आले, कि आम्ही स्वताच्या जबाबदारीवर पुढची वाटचाल करू. हुश्श… अखेर परवानगी मिळाली.
From VASOTA 07FEB2013
आमचा भरपूर वेळ म्हणजे जवळपास ३ तास बामणोलीमध्ये फुकट गेले होते. त्यामुळे आता आम्हाला पुढे काय वाढून ठेवलय याची काळजी वाटायला लागली. सकाळी बरोबर १० वाजता बोट चालकाने आमच्या पाठपिशव्या तपासल्यावर बोट चालू केली. इथे फक्त आमचीच तपासणी केली गेली, अन्य कोणत्याही ग्रुपची नाही, कारण बाकीचे सगळे ग्रुप परत येणार होते. बोटी मध्येच आम्ही रात्री घरातून घेतलेल्या पोळीभाजी आणि मटणाचा फडशा पाडला. कधी एकदा वासोटा पाहतोय अस झाल होतो, पण तो काही अजूनही दर्शन देत नव्हता, जवळपास अर्ध्या तासाने बोट एका डोंगराला वळसा घालून पलीकडे गेल्यावर ज्यासाठी आलेलो त्या वासोट्याने दर्शन दिले. थोडा वेळ सगळे पाहतच राहिलो आणि बोटी मध्येच फोटोसेशन उरकलं.
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
बरोबर ११.३० वाजता मेट इंदवली म्हणजे वासोट्याच्या पायथ्याशी उतरलो. आता आम्हाला घाई करायची होती, तेव्हढ्यात वासोट्याच्या प्रवेश द्वारावर परत एक सुरक्षा चौकी होती, हिला सुरक्षा चौकी न म्हणता तिथल्या आडगावातल्या गावकऱ्यानी आपल्या पोटपाण्यासाठी केलेली स्वयंघोषित व्यवस्था म्हणा हव तर. यांच काम म्हणजे कोणी प्लास्टिक पिशव्या किती आणल्या आहेत ते पाहणे, जेणे करून येते वेळी तेव्हढ्याच पिशव्या परत आणल्या आहेत कि नाही हे ते लोक तपासतात. अस त्याचं म्हणण होत. आणि कोण किती पिशव्या नेतात याची मोजदाद एका वहीत ठेवताना आम्ही पाहत होतो. पण त्यात सुद्धा सातत्य अस नव्हत. ४ जणामध्ये एकाची पिशवी तपासात होते. वर साहेबांशी बोलाव लागेल अशी हूल देवून फोनवर बोलण्याच नाटक चालू होत. कारण त्यांना आमच्याकडून काहीतरी मिळण्याची अपेक्षा होती. त्यांना रु. १००/- देऊन पुढे निघून गेलो. त्यांचाही काही दोष नव्हता त्यामध्ये, कारण त्यांच्याकडे उत्पन्नाच कोणतच साधन नाही, या लोकांची जमीन धरणाच्या पाण्यात बुडिताखाली आली आहे.
From VASOTA 07FEB2013
शेवटी सगळे अडथळे पार करून एकदाचे वासोट्याच्या मार्गाला लागलो. ठळक वाट आहे, कुठे हि चुकण्याचा संभव नाही, नाहीतरी वाटाड्या आपल्या सोबत असतोच. वाटेत सुरवातीलाच एका पडक्या मंदिरापाशी एक ओढा लागला, त्यात पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. काही वेळेस आपण नमुने गिरी करतो. एव्हढा अथांग जलाशय पाठी मागे टाकून आलो होतो, पण बाटल्या भरण्याची आठवण राहिली नव्हती. आणि इथे आता ओढ्यामध्ये पाणी साफ करून भरत होतो. हि अशी नमुने गिरी करणारे आम्ही एकटेच नव्हतो, दुसरा एक ग्रुपसुद्धा आम्हाला पाहून तेच करत होता. मध्ये मध्ये इथल्या जंगलात आढळणाऱ्या प्राण्याविषयी माहिती फलक लावले होते. प्राणी पाहायचे हेतूने आलात तर आपला रसभंग होण्याचा संभव आहे, त्यामुळे या माहिती फलकावरच समाधान मानावे लागेल. या वाटेवर माणसांचा राबता असल्याकारणाने प्राणी जवळपास फिरकण्याची शक्यता शुन्य. मध्येमध्ये झाडांवर अस्वलांनी आपल्या नखांनी ओरखडे काढल्याच दिसत होत. तीच काय ती जंगली प्राण्याच्या अस्तित्वाची खुण.
From VASOTA 07FEB2013
त्यात काही काही नग असे येतात कि त्यांना जंगल, प्राणी याविषयी काडीचाही गंध नसतो, ते फक्त पिकनिकसाठी आलेले असतात, मस्त पैकी फोन वर गाणी लावून जंगल ट्रेक करतात. अशाच एका नगाला गाणी बंद करायला लावली. सगळ्यात पुढे श्रीनिवास (वजन ८५ किलो) होता, जवळपास पळतच होता. मस्त पैकी २०-२५ किलो वजन होत त्याच्या पाठपिशवीच, काय काय घेऊन आला होता देव जाणे. त्याला पळताना पाहून आम्हाला हसू आवरत नव्हत. कारण ट्रेकच्या सुरवातीला पळणाऱ्यांची काय अवस्था होते ते आम्हाला चांगलच माहिती होत. आम्ही मात्र मजल-दरमजल करत चालत होतो. प्रमोद जो वजनाने जवळपास ९० किलो होता, त्याच्या बरोबर राहणे क्रमप्राप्त होत, त्याचा हा दुसराच ट्रेक. शेवटी श्रीनिवास पहिल्यांदा वासोट्यावर पोहोचला आणि आमची वाट पाहत तिथेच थांबला. आम्ही सुद्धा रमत गमत सरतेशेवटी बरोबर ३.३० वाजता वासोट्याच्या माथ्यावर पाय ठेवला, खर तर उशीरच झाला होता, पण माझे लक्ष फक्त घड्याळाकडे लागले होते, कारण आम्हाला नुसताच वासोटा करून परत फिरायचे नव्हते, तर नागेश्वरकरून चोरवण्याला उतरायचे होते आणि सूर्यास्त व्हायला फक्त २.३० तास उरले होते. गाईडला विचारले तर तो म्हणाला नागेश्वरला जायला २ तास तरी लागणार आणि तिथून चोरवणे जवळपास ४ तास. म्हणजे आम्हाला आता संपूर्ण काळोखातच ट्रेक करावा लागणार होता आणि तो हि या जंगलातून. आता मात्र आमचे धाबे दणाणले होते, ट्रेकची जी मजा असते ती निघून त्याची जागा आता काळजीने घेतली होती. वासोट्य़ावरील पाण्याचं टाकं
From VASOTA 07FEB2013
प्रमोद, जंग आणि श्रीनिवास पूर्ण थकलेले होते पण आता आम्हाला आराम करायला अजिबात वेळ नव्हता. धावत-पळत वासोटा माथा फिरलो, आणि ज्या ठिकाणी उतरायचे त्या चोरवणे गावाचा कानोसा घेतला. डोंगरांच्या घड्यांवर घड्या पडल्या होत्या, आणि शेवटच्या घडीच्या मागे चोरवणे गाव दिसत होता. आम्ही वरूनच वाटेचा अंदाज बांधला, कारण खाली उतरल्यानंतर चोरवणे गाव दिसणार नव्हते. दूर डोंगरांच्या पलीकडे ते दिसत होते, लक्षपूर्वक डोंगररांगा पाहिल्या आणि वासोट्यावरून निघालो.
From VASOTA 07FEB2013
वासोट्यावरून खाली उतरताना १५-२० मिनिटानंतर एक वाट डावीकडे वळते. तीच वाट नागेश्वरकडे जाते, तिथे एक बोर्डसुद्धा लावलेला आहे. मळलेली पायवाट असल्याकारणाने चुकण्याचा संभव नव्हता, प्रश्न होता तो फक्त वेळेचा आणि पायात गोळे आलेल्या सवंगड्यांचा. श्रीनिवासने धावत-पळत वासोटा माथा गाठला होता पण आता उतरताना मात्र त्याची हवा निघाली होती. वजनाने जास्त असल्यामुळे त्याच्या पायावर खूप दाब येत होता. त्याची ती वजनदार पाठ्पिशवी आता मी घेतली होती. आम्ही सुद्धा थकलेलो होतो पण तोंडावर आणि देहबोलीतून दाखवून देत नव्हतो, नाहीतर पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या ट्रेकला आलेल्या सवंगड्याचा आत्मविश्वास डळमळला असता. या तिठ्यावर थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी थांबलो. तेव्हढ्यात घू-घू चा आवाज येत होता. सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागलो, तर तो आवाज आणखी जवळ यायला लागला. आता मात्र घाबरगुंडी उडाली होती, कारण तो आवाज मधमाशांचा होता, त्यांचा एक मोठा थवा बरोबर आमच्या डोक्यावरून दुसरीकडे स्थलांतर करीत होता. ताबडतोब पाठ्पिशवी उघडली आणि त्यातून चादरी काढून सर्वांनी आपापल्या अंगावर घेतल्या. कारण नुकतीच डांग्या सुळक्यावर मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या संदीपची आठवण झाली आणि अंगावर एक शहारा आला. मधमाशा निघून गेल्या होत्या. आम्हीसुद्धा पुढच्या प्रवासाला निघण्यासाठी तयार झालो. आता यापुढे एकांमेकांमध्ये थोडेसे सुद्धा अंतर ठेवायचे नाही अशा सूचना सगळ्यांना दिल्या कारण आता पुढची वाटचाल घनदाट जंगलातून करायची होती. प्रोस्ताहन देत एकमेकाला धीर देत होतो. सगळ्यात पुढे वासू आणि दर्शन, सगळ्यात मागे मी असा क्रम ठेवला होता. चालताना सारखा मागे वळून पाहत होतो, न जाणो एखाद्या बिबळ्याला आवडायचो आणि घेऊन जायचा मागच्या मागे. जवळपास तासाभरात जंगलातून बाहेर पडून एका कड्याच्या टोकाशी पोचलो, आता वासोटा आमच्या डाव्या बाजूला होता आणि आम्ही वासोटा माथ्याच्या पायथ्याशी होतो. पुढे ताई तेलणीचा सुळका आणि मागे वासोटा
From VASOTA 07FEB2013
नागेश्वर
From VASOTA 07FEB2013
इथे थोडीशी विश्रांती घेऊन पुढच्या वाटेचा अंदाज घेतला. ती वाट आता कड्याच्याच कडे-कडे ने नागेश्वरकडे जात होती. थोडा जरी पाय घसरला तर सरळ २००० फुट खोल दरीमध्ये. आम्हाला काळजी होती ती प्रमोद, जंग आणि श्रीनिवासची, कारण तिघांचेही पाय लटपटायला लागले होते. तिघानाही धीर दिला आणि पुढे वाटचाल सुरु ठेवली. वाट ठीक ठिकाणी कोसळली होती, आणि मातीची घसरगुंडी तयार झाली होती. तरीही कसरत करत करत, प्रमोदला आधार देत देत नागेश्वर-चोरवणे-वासोटा यांच्या तिठ्यावर पोचलो होतो. घड्याळात पाहिले तर ५ वाजत आले होते. आता प्रमोद पूर्ण थकल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज होती, त्याच्या बरोबर मीसुद्धा तिथेच थांबलो आणि बाकीचे पाचही जण नागेश्वर ला गेले. नागेश्वर आता फक्त २००-२५० फुटावर होत. बाटल्या सुद्धा रिकाम्या झाल्या होत्या, त्या पण भरून घ्यायच्या होत्या, कारण आता वाटे मध्ये चोरवणे शिवाय कुठेही पाणी नव्हते आणि आम्हाला जवळपास आणखी ४ तास चालायचे होत. नागेश्वरच्या पायऱ्या आणि मागे दिसणारा वासोटा
From VASOTA 07FEB2013
नागेश्वर गुहेमागील पाण्याचं टाकं
From VASOTA 07FEB2013
मी आणि प्रमोद त्या तिठ्यावर बसलेलो असताना सातारकरांचा ५-६ जणांचा स्थानिक ग्रुप तिथे आला होता. त्या लोकांनी आमची विचारपूस चालू केली, कारण संध्याकाळी यावेळेस त्याठिकाणी कोणी असेल याची त्यांना कल्पना नव्हती. आम्ही त्यांना चोरवणेला जात असल्याच सांगितलं, त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आम्हाला दरडावून, आमची तक्रार जंगल विभागाकडे करण्याचा दम भरायला लागले. आमचंही डोकं तापलेलं असल्यामुळे आम्हीही त्यांना खुशाल तक्रार करा म्हणून सांगितलं. आम्ही ऐकत नाही असे पाहिल्यावर आवाज थोडा मवाळ झाला आणि एक दुसराच प्रस्ताव आमच्यापुढे मांडला. ते एका बोटीमधून तापोळ्याहून आले होते आणि आम्हाला सुद्धा त्यांच्या बोटीमधून तापोळ्यास नेण्यास तयार होते. त्यातील एकाचे तापोळ्याला हॉटेल होते आणि तो तिथे आमची रात्री राहण्याची सोय करणार होता. माझ्या मनात शंका उत्पन्न झाली, कारण बामणोली ते तापोळा बोटीचे भाडे रु. ४५००/- होते. त्याच्या वागण्यात शुद्ध धंदेवाईकपणा आला होता. त्यांच्या तावडीत अडलेली गिऱ्हाईक सापडलेली होती. म्हणजे आम्हाला ७-८ हजारांचा फटका पडणार होता. ताबडतोब त्याला उडवून लावले, त्यासरशी त्यांना सुद्धा कळून चुकलं, त्यामुळे आमच्या नादाला न लागता नागेश्वरगुहेकडे निघून गेले. तिकडे त्यांना आमची बाकीची मंडळी भेटली, त्यांना सुद्धा तेच सांगायला लागले, आमच्या मंडळीनीसुद्धा त्यांना झिडकारून लावले. त्या वेळेत पुढच्या वाटेचा अंदाज घेण्यासाठी मी प्रमोदला तिथेच बसवून पाहणी करायला गेलो. पुढे एक तुटलेले रेलिंग दिसत होते, आणि त्यापुढे सरळसोट कडा. तिथल्या पायऱ्यासुद्धा तुटून गेल्या होत्या आणि फक्त भुसभुशीत सिमेंट तेव्हढे राहिले होते. मध्येच एक लाकडाचा ओंडका अडकून राहिला होता आणि तोच एक आधार होता त्या घसर गुंडीवर. आधीही प्रस्तरारोहण केलेलं असल्यामुळे खाली उतरलो, आणि थोडेसे पुढे गेल्यावर डाव्या हाताला ९० अंशाच्या कोनात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या आणि तिथे एक साखळी बांधलेली दिसली. जवळपास १५०-२०० फुटाचा तो कडा होता आणि zigzag पद्धतीने त्या पायऱ्या खाली उतरत गेल्या होत्या, त्याच्या पुढे पायवाट पण दिसत होती.
From VASOTA 07FEB2013
आता फक्त प्रश्न हा कडा उतरायचा होता आणि तो हि काळोख व्हायच्या आधी. ५.३० वाजले होते, बाकीची मंडळी बाटल्या भरून परत आली होती आणि आम्हीही वेळ न दवडता खाली उतरण्याची तयारी केली. वासू आणि दर्शन माझ्याबरोबर प्रस्तरारोहण करीत असल्याने ते सुद्धा अनुभवी होते, सगळ्यात पुढे दर्शन आणि वासू, मागे मी अशी क्रमवारी लावून, खालि उतरण्यास सज्ज झालो. मध्ये संजय बाकीच्यांना सांभाळण्यासाठी राहिला होता. पण सुरुवातीलाच घसरगुंडी असल्याकारणाने मी पण माझी मागची जागा सोडून मध्ये आलो. मी प्रमोदचा हात धरून त्याला उतरण्यासाठी मदत करत होतो, संजय जंग ला मदत करत होता आणि दर्शन श्रीनिवासला मदत करत होता. तिघांचेही पाय लटपटत होते. सुर्य आता समोरच्या डोंगराआड जाण्यासाठी धडपडत होता आणि आम्ही काळोख होण्याआधी या कड्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी धावपळ करत होतो. मला भीती वाटत होती ती प्रमोदची, आधीच त्याच वजन ९० किलोच्या आसपास आणि त्याचा हात माझ्या हातात होता, मनात आल हा खाली धडपडला तर याच्या बरोबर मीसुद्धा सरळ खाली जाणार होतो. पण धोका तर पत्कारायचाच होता. थकलेल्या तिघांना धीर देत देत शेवटी जवळपास पाऊण तासाने त्या कड्याच्या खाली उतरलो. एक लढाई जिंकली होती, आता पुढे वाट थोडी रुंद झाली होती आणी स्पष्टपणे उजव्या हाताच्या डोंगरालगत जाताना दिसत होती. सुर्यसुद्धा त्या डोंगराच्या मागे गेला होता आणि अंधार पसरण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र आम्हाला घाई करणे जरुरी होते, कारण अजूनही आम्ही जंगलातच होतो. सकाळपासून फक्त चालत होतो त्यामुळे थकवा तर सगळ्यांनाच आला होता. थोडीशी विश्रांती घेवून परत पुढची वाटचाल सुरु केली, वाट डोंगराला लागुनच जात होती आणि आणखी रुंद झाली होती. जवळपास तासाभराने एका छोट्याशा पठारावर पोहोचलो. तिथूनच पुढे गावकऱ्यानी बांधून काढलेल्या पायऱ्या दिसत होत्या. याच पठारावर विश्रांती घेतली, जेवणाचा तर विसर पडला होता, फक्त बिस्कीट, फरसाण आणि लिंबू सरबत पिवून परत पुढच्या वाटचालीकरिता सज्ज झालो. आता संपूर्ण काळोख पसरला होता, घड्याळात पहिले तर ७.१५ झाले होते. पायऱ्या दिसल्यामुळे गाव जवळ आल्यासारखे वाटत होते आणि नवीन हुरूप आला अंगामध्ये. आता श्रीनिवासची ती २०-२५ किलोची पाठपिशवी घेवून माझे सुद्धा खांदे दुखायला लागले होते. पण इलाज नव्हता कारण तो स्वताच इतका गळपटलेला होता कि त्याला स्वतालाच स्वताच वजन जास्त वाटत होत. इथून परत आम्ही आमच्या पहिल्या formation मध्ये आलो. वासू पुढे आणि सर्वात मागे मी. पायऱ्या उतरताना सारखा टोर्चचा उजेड मागे टाकून बघत होतो, कारण आता माझी सुद्धा फाटलेली होती. मिट्ट काळोख पसरला होता, चांदण्याचा उजेड तर अजिबात नव्हता. सारख वाटत राहायचं माझ्या मागून कोणीतरी येतंय. पायऱ्या सुद्धा संपायचा नाव घेत नव्हत्या. जवळपास ८.१५ च्या दरम्यान एका ओढ्यामध्ये उतरलो आणि इकडे आता पायऱ्या संपल्या होत्या. त्या ओढ्यातूनच समोर दोन वाटा फुटल्या होत्या, म्हणजे दोन्ही बाजूला कच्चा रस्ता होता. कपाळावर हात मारला आणि तिथेच बसलो. आता डोके चालेनासे झाले होते, पायांनी तर कधीच साथ सोडली होती, तरी पण ओढत ओढत इथ पर्यंत आलो होतो. आणि आता पुढे कोडे पडले होते, कोणता रस्ता पकडायचा? रानात एव्हढ्या रात्री तर कोणीच नसणार, शेवटी बाकीच्यांना तिथेच थांबवून मी, वासू आणि दर्शनने समोरच्या डोंगराकडे उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने जावून शोध लावण्याचा निर्णय घेतला. मध्ये मध्ये प्राण्यांचे भयानक ओरडण्याचे आवाज येत होते, त्यामुळे काळोखाची भयानकता वाढली होती. जवळ पास १० मिनिटे चालल्यानंतर तो रस्ता ९० अंशाच्या कोनात डोंगराला समांतर असा वळला होता. त्यामुळे खात्री पटली कि याच डोंगराच्या मागे चोरवणे गाव असावे. खरतर हा अंदाजच होता, आणि हा अंदाज चुकला असता तर रात्रीचे जंगलातच भरकटत राहिलो असतो. परत मागे येवून बाकीच्यांना तयार केल आणि जाण्यासाठी निघणार तोच संजयने शंका उपस्थित केली, दुसर्या बाजूच्या रस्त्याला लांबवर कुठे तरी त्याला दिवा पेटताना दिसला होता. कदाचित कुठल्या तरी गाडीचा असावा. पण त्याला त्यापासून परावृत्त करून उजव्या हात कडच्या रस्त्याला लागलो. आता रस्त्यावर शेण पडलेलं दिसत होत. त्यामुळे गाव याच रस्त्यावर असण्याचा आमचा अंदाज खरा ठरणार अस वाटत होत. वाटेत विन्चवांची शाळा भरली होती. जिकडे पाहावे तिकडे विंचू दिसत होते. त्यामुळे जपून चालावं लागत होत. आणि अचानक काळोखातून काहीतरी चमकल्याचा भास झाला. भास नव्हता तो, कोणीतरी आमच्या दिशेने टोर्चचा उजेड पाडत होत. आता मात्र पायांनी express way पकडला होता. त्या उजेडाच्या दिशेने चालत गेलो आणि हाक मारली आणि आम्हाला समोरून प्रतिसादसुद्धा मिळाला. तो माणूस चोरवणे गावातलाच होता आणि शिकारीच्या उद्देशाने जंगलात आला होता. त्याच्याकडून पुढच्या रस्त्याची माहिती करून घेतली आणि पुढे निघालो. आता गाव फक्त १५-२० मिनिटे लांब राहिला होता. बरोबर ९.30 वाजता गावात प्रवेश केला होता. खाली उतरल्या बरोबर रस्त्याच्याकडेला एक विठ्ठलाचे मंदिर लागते आणि त्याच्या विरुद्ध बाजूला शाळा होती. म्हणजे आमच्या मुक्कामाला योग्य ठिकाण. मंदिराच्या खालच्या अंगाला एक दुकान चालू होत, तसेच धावत त्या दुकानात जावून शाळेत राहण्याची परवानगी घेतली. शाळेत अंग टाकल आणि आजच्या दिवसाचा हिशोब केला, आम्ही जवळपास १२ तास फक्त चालत होतो. आता जेवणाची सोय करायची होती. ती जबाबदारी मी, दर्शन आणि वासू ने उचलली. श्रीनिवास ने तर चक्क लोळणच घेतली होती. त्याच्या पाठ्पिशवी ने माझा कंबरड मोडल होत आणि लोळण मात्र त्याने घेतली होती. २ चूल मांडल्या, भात आणि दुकानातून घेतल्याला अंड्याची आमटी केली. झोपायला ११ वाजले होते. पण एव्हढ अंग दुखत असून सुद्धा सुखरूपपणे पोहोचल्याचा आनंद जास्त होता.
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
चोरवणे गावातून दिसणारा नागेश्वर आणि वासोटा परिसर. डाव्या हाताच टेकाड म्हणजे नागेश्वर, त्याच्या उजव्या बाजूचे टेकाड म्हणजे ताई तेलनीचा किल्ला आणि एकदम उजव्या बाजूला वासोटा. खाली चोरवणे गावातील डांगेवाडी.
From VASOTA 07FEB2013
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. पाहतो तर जंग आणि संजयने आता चुलीचा ताबा घेतला होता. लवकर उठून चहा आणि रात्रीच्या उरलेल्या भाता मध्ये मटार टाकून मस्त पैकी फोडणीचा भात केला होता. चहा आणि नाश्ता करून आता सगळेच पक्षी निरीक्षणासाठी निघालो. संजय आणि दर्शन पक्षांची ओळख करून देत होते. चोरवणे गाव डोंगरपायथ्याशी आणि जंगलाच्या सीमेवर असल्याने इथे विपुल प्रमाणात वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. आम्ही जिथे उतरलो होतो ती चोरवणे गावातील डांगवाडी मधील शाळा होती. मुख्य गाव नदीच्या पलीकडे उजव्या बाजूला होते. शाळेमध्ये पाण्याची टाकी बसवली आहे आणि दररोज ती पम्पाद्वारे भरण्यात येते, त्यामुळे पाण्याची चांगली सोय आहे. आज आमच्या कडे भरपूर वेळ होता, आम्ही रात्री ११ वाजता चिपळूण वरून सुटणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेसची तिकीट काढली होती, आणि चोरवणे गावातून चिपळूणला जाण्यासाठी शेवटची बस संध्याकाळी ५ वाजता होती. त्यामुळे संध्याकाळ पर्यंत गावातच आराम करण्याचा निर्णय घेतला.
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
From VASOTA 07FEB2013
पक्षी निरीक्षणावरून परत आल्यावर, कोंबडी करण्याचा विचार केला. शाळेजवळच घर असलेल्या एका काकूंकडे कोंबडीची चौकशी केली. त्यांनी पुढे मुख्य गावात दुकान असल्याच सांगितलं आणि स्वतः भाकऱ्या करून द्यायची तयारी दाखवली. दर्शन आणि वासू कोंबडी आणायला गेले आणि आम्ही बाकी मंडळी अंघोळ करण्यासाठी नदीवर निघून गेलो. श्रीनिवास अजूनही उठला नव्हता. आम्ही नदीवरून परत आलो तरी दर्शन आणि वासू चा काहीच पत्ता नव्हता. तोपर्यंत आम्ही भात लावून ठेवला आणि त्यांची वाट पाहत रस्त्याकडे डोळे लावून बसलो. जवळपास १२ वाजत आले होते, त्यांना जावून २ तास तरी होवून गेले होते, थोड्या वेळाने मुख्य गावातला रस्ता आणि डांगवाडीतून निघणारा रस्ता एकत्र मिळतात, तिथे हे दोघे येताना दिसले. त्यांना उशीर का झाला याची आणि चोरवणे ग्रामस्थांच्या माणुसकीची कथा सांगितली ती अशी:
From VASOTA 07FEB2013
हे दोघे कोंबडीचे दुकान शोधत शोधत मुख्य गावात पोहोचले, पण दुकान बंद होते, घरात ४ दिवसांपूर्वी कोणीतरी मयत झाल्या कारणाने मालकाने दुकान बंद ठेवले होते. त्याने दुसऱ्या दुकानाचा पत्ता सांगितला. हे दोघेहि त्या दुसऱ्या दुकानात गेले तर ते हि दुकान बंद. कारण हा दुकानदार (सुभाष) हि पहिल्या दुकानदाराच्या दुखात सहभागी होता, त्यामुळे तो सुद्धा कोंबडी देऊ शकत नव्हता. त्याने या दोघांची चौकशी केली, आणि आम्ही काल पासून कसे पळत पळत वासोट्या वरून इकडे आलो याची कथा एकून त्याला या दोघांची दया आली. त्याने सरळ आपल्या खिशात हात घातला आणि आपल्या बाईकची चावी वासूच्या हातात दिली. त्याने वासूला तिवरे गावात जावून (अंतर: ७-८ k.m.) कोंबडी अणायली सांगितली. कोणतीही ओळख देख नसताना त्याने आपली गाडी या दोघांच्या हवाली केली होती. पण आता वासू आणि दर्शनला त्याची गाडी घेवून जाणे प्रशस्त वाटले नाही म्हणून ते निराश होवून परत यायला निघाले. त्या दोघांची तोंड बघून त्या दुकानदाराला दया आली, त्याने सरळ बाईकला किक मारली आणि या दोघांना तिवरे गावात घेवून गेला आणि परत चोरवणे ला आणून सोडलं, तेही एकही रुपया न घेता. वर परत कधीतरी राहायलाच या यापेक्षा चांगला पाहुणचार करतो म्हणून सांगितला. हि कथा एकूण आम्हीहि त्या दुकानदाराला मनोमन धन्यवाद दिले. आता चुलीची जबाबदारी सकाळपासून जंगने घेतली होती. आज पहिल्यांदाच U.P. पद्धतीची कोंबडी खाणार होतो. जंग ने सुद्धा मस्त पैकी फक्त कांद्यावर शिजवलेली (पाणी नाही) कोंबडी बनवली होती, मसाले आणि पाणी नंतर टाकले. एवढी मस्त झाली होती कि एक थेंब रस्सा किंवा एखाद हाडूक सुद्धा बाकी ठेवलं नव्हत. काकूनि दिलेल्या भाकरीचे पैसे द्यायला संजय गेला तर, त्या पैसे घ्यायला तयारच होत नव्हत्या. त्यांचा मुलगा मुंबईला होता आणि त्या एकट्याच गावी राहत होत्या. कदाचित त्या आपला मुलगा आमच्यामध्ये पाहत होत्या. शेवटी संजय ने जबरदस्ती पैसे ठेवले. चोरवणे गावात माणुसकीचे असे एकापेक्षा एक धक्के बसत होते कि, कालचे वाईट अनुभव विसरूनच गेलो होतो. चोरवणे गावाने आमच्यावर माणूसपणाचे थोर संस्कार केले होते आणि ते पुढील आयुष्यात कायम उपयोगी पडणार होते. निघतेवेळी शाळे जवळच्या विलास जाधवांच्या दुकानात जावून गावकऱ्यानी केलेल्या मदतीसाठी आभार प्रदर्शन केले आणि ५ वाजताची एस टी पकडून ६.३० वाजता चिपळूण मध्ये पोचलो. रात्री ११ वाजता चिपळूणवरून ट्रेन पकडून सकाळी ६ वाजता ठाण्याला उतरलो आणि तिथून अर्ध्या तासात डोंबिवली. टीप: या आधी वासोट्यावर जाण्यासाठी कोणतीही खात्रीशीर माहिती आंतरजालावर न सापडल्यामुळे इथे लिहिण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एव्हढ काहीतरी लिहिलंय. व्याकरणाच्या चुका असल्यास क्षमस्व. वासोटा जंगल अभयारण्य असल्याचे भान ठेवून वागावे. जोरजोरात गाणी बजावणे टाळावे. आपण जंगली प्राण्यांच्या प्रदेशात वावरत आहोत याचे भान ठेवावे. नागेश्वर गुहेत मुक्काम करणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे आपणही कायद्याचा मान राखावा आणि प्राण्यांनासुद्धा त्यांची जागा द्यावी. आपल्यातीलच काही लोक हा ट्रेक चोरवणे गावातून नागेश्वर पर्यंत करतात आणि मुक्काम सुद्धा करतात, परंतु ते सुद्धा बेकायदेशीर आहे आणि नैतीकेला धरून नाही. भलेही नागेश्वर चिपळूण तालुक्यात येत असेल तरी नागेश्वर-वासोटा हा अभयारण्याचाच भाग आहे आणि तुम्ही जंगल विभागाच्या पूर्व-परवानगी शिवाय प्रबेश करत आहात, हे लक्षात ठेवावे. फक्त स्थानिकांना इथे मुक्त प्रवेश आहे???? आपले कपडे जंगल परिसराशी मिळते जुळते वापरा, आम्ही तर अक्षरशः रंगीबेरंगी कपडे घातले होते. आम्ही केलेल्या चुका इतरांनी गिरवू नयेत म्हणून हा लेखप्रपंच. धन्यवाद! सतीश कुडतरकर डोंबिवली

प्रतिक्रिया द्या
16589 वाचन

💬 प्रतिसाद (41)
स
सुहास झेले Sat, 02/14/2015 - 13:14 नवीन
अतिशय थरारक आणि माहितीयुक्त ... वासोटाबद्दल जास्त माहिती नाही आंतरजालावर. हा लेख वाचनखूण साठवला आहे :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/14/2015 - 13:21 नवीन
@अतिशय थरारक आणि माहितीयुक्त>> +++++१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 02/14/2015 - 13:14 नवीन
सॉलिड ट्रेक ! मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रे !! अभ्यारण्य असो वा इतर जंगल, पूर्ण माहिती आणि तयारी शिवाय जाणे शौर्याचे तर नाहीच पण महागातही पडू शकते हीच वाचकांसाठी धोक्याची सूचना. मात्र योग्य काळजी आणि परवानग्या घेऊन जाणे उत्तम... ट्रेकसारखा शारिरीक आणि मानसिक आनंद आणि ताकद देणारा दुसरा छंद विरळाच आहे. चोरवणे गावकर्‍यांच्या सहृदय व माणूसकीच्या वागणूकीबद्दल हॅट्स ऑफ ! असेच फिरत रहा आणि आम्हाला तुमचे अनुभव सांगत रहा !
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Mon, 02/16/2015 - 11:55 नवीन
आताच पंधराएक दिवसांपूर्वी एका 'जाणत्या' तरुण ट्रेकर्सने वासोट्यावर मुक्काम केल्याचे फोटो FB वर टाकले होते. मी लेख इथे टाकण्याचं प्रयोजनच मुळी अस होत कि इतरांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकून चुकीचा पायंडा पडू नये आणि इतरांना योग्य ती तयारी करून कायदेशीरपणे ट्रेक आखता येईल. मी इतरांना हाच सल्ला देईन कि नागेश्वरला राहण्याचा अट्टाहास सोडून चोरवणेला रहा. मस्त गाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हाडक्या Sat, 02/14/2015 - 13:46 नवीन
सातार्‍याजवळ असल्याने बर्‍याचदा वासोट्यास जाणे झाले आहे (बामणोलीच्या बोटवाल्यांशी बर्‍याचदा याच लुटीबद्दल वाद पण केलेत.) पण कधी चोरवण्याच्या वाटेस नाही गेलो. बाकी छान लिहिआता, आता पुढच्या वेळेस चोरवण्याचा विचार नक्की.
  • Log in or register to post comments
स
सांगलीचा भडंग Sat, 02/14/2015 - 14:13 नवीन
अप्रतिम आणि सविस्तर माहिती !!!
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Sat, 02/14/2015 - 15:34 नवीन
सही लिहीलेस रे सतीश.. आता अजून येवूदेत...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 02/14/2015 - 17:15 नवीन
खूप तपशीलवार आणि मस्त लिहिलेत. एकच नंबर!!!!!
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 02/15/2015 - 09:01 नवीन
नागेश्वरालाही आता मुक्काम करायला बंदी आहे ही माहिती नवीनच आहे. बाकी बामणोलीच्या लुटीच्या प्रकाराबद्दल सहमत. हरामखोर लेकाचे!
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Sun, 02/15/2015 - 17:16 नवीन
होय, नागेश्वरलाही आता मुक्काम करू देत नाहीत. बाकी बामणोलीच्या लुटीच्या प्रकाराबद्दल सहमत. हरामखोर लेकाचे! >>>> अगदी खरे...नक्की आणी सध्याची माहीती नाही पण २ वर्षांपुर्वी तापोळा आणी बामणोली येथील बोट संघटनेचे बरेच वाजले होते आणी जंगलखात्याने बामणोली येथून मेटइंदवलीला बोट सोडण्यास बंदी केली होती, तेव्हा वासोट्याला फक्त तापोळ्यावरुनच जावे लागायचे.. संरक्षीत जंगल, दुर्गम किल्ला आणी ट्रेकर्सच्या राबत्यामुळे इथे जबरदस्त मोनोपॉली चालते. खरेतर कुसापुरला जायला तापोळ्यावरून जि.प. ची बोट आहे. जी फक्त १५ रु. तापोळा ते कुसापुर सोडते. तिथून एका दिवसात नागेश्वर वासोटा करून परत कुसापुरला येता येते पण ह्या सोईचा हे बोटवाले ट्रेकर्सला वापर करू देत नाहीत कारण त्यांचा धंदा बुडतो. आणी आतातर कोयना-चांदोली एकत्रीत व्याघ्रप्रकल्प जाहीर झाल्यावर अजूनच कठीण झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सतीश कुडतरकर Mon, 02/16/2015 - 06:40 नवीन
चोरवण्यातील गावकरी खरोखरीच आतिथ्यशील आहेत, पण माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे बंदी आवश्यकच आहे नाहीतर आपल्यातीलच काहीजण त्याचाही AMK करून टाकतील. प्राण्यांसाठी अशाही खूपच कमी जागा उरल्या आहेत. उदयाच्या महाशिवरात्रीला तिकडे अक्षरशः हैदोस असणार आहे. नागेश्वर जर buffer zone आहे तर जुना वासोटा Core Zone आहे. अभयारण्याचा गाभा आहे. महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये कोकण बाजूचे गावकरी तिवरे गावाकडून जुन्या वासोट्यावर फिरायला येतात, येताना शिकारीची तयारी पण करून येतात. साताऱ्याच्या लुटीबद्दल सहमत! पण आपल्या ट्रेकचे व्यावसायीकरण झाल्यापासून याला ऊत आलेला आहे. त्याच्या मुळाशी स्थानिक समस्या जरूर आहेत, कारण यांच्या जमिनी धरणाच्या पाण्यात बुडिताखाली आलेल्या आहेत. बोटींना फक्त शनिवार-रविवार या दिवशीच प्रवासी मिळतात, त्यातच दर शनिवार-रविवारी सगळ्यांनाच प्रवासी मिळतीलच असे नाही. त्यामुळे एकदा जरी प्रवासी मिळाले तर, संपूर्ण महिन्याचे उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सूड Mon, 02/16/2015 - 16:43 नवीन
>>चोरवण्यातील गावकरी खरोखरीच आतिथ्यशील आहेत
गैरसमज हो!! आवळा देऊन कोहळा कसा काढून घ्यायचा ते चोरवण्यातल्या लोकांकडनं शिकावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
स
सतीश कुडतरकर Mon, 02/23/2015 - 06:17 नवीन
आपणास कोणता त्रास झाला हे समजल्यास इतरांना भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकेल. कृपया सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
क
कंजूस Mon, 02/16/2015 - 01:29 नवीन
सर्व तपशिलासह छानच लेख लिहिला आहे त्याचा पुढे नंतर जाणाऱ्यांना नक्कीच उपयोग होईल. बामणोलीकडून बोटीने जाणाऱ्यांस फार त्रास होतो त्यापेक्षा खेड/चिपळूण कडून नागेश्वरला जा असा सल्ला मला एका डोंबिवलीतल्या मित्राने दिला होता त्याप्रमाणे मी २००६ नोव्हेंबरात नागेश्वरला गेलो होतो. मला वासोटा करण्यात आणि बोटीच्या प्रवासाचे आकर्षण नव्हते. फक्त कोयना रान कसे आहे हे पाहायचे होते.त्याचा एक धावता वृत्तांत इतरत्र लिहिला होता त्या लेखाची लिंक इथे पाहा.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Mon, 02/16/2015 - 06:48 नवीन
नमस्कार डोम्बिवलीकर! तो लेख वाचलाय मी आधीही! आताच पंधराएक दिवसांपूर्वी एका 'जाणत्या' तरुण ट्रेकर्सने वासोट्यावर मुक्काम केल्याचे फोटो FBवर टाकले होते. मी लेख इथे टाकण्याचं प्रयोजनच मुळी अस होत कि इतरांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकून चुकीचा पायंडा पडू नये आणि इतरांना योग्य ती तयारी करून कायदेशीरपणे ट्रेक आखता येईल. मी इतरांना हाच सल्ला देईन कि नागेश्वरला राहण्याचा अट्टाहास सोडून चोरवणेला रहा. मस्त गाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
च
चिप्लुन्कर Mon, 02/16/2015 - 05:44 नवीन
चिपळूणच्या लोकांना वासोटा आणि नागेश्वर हि हक्काची ट्रेकींग ची ठिकाणे आहेत . एकदा चिपळूण वरून जाऊन हाच ट्रेक उलट्या मार्गाने करून बघा . चोरवणे मधील माणसे फार चांगली आहेत . नवीन लोकांसाठी माहिती , जंगलात बर्याच वेळेला स्थानिक ( बामणोली बाजूकडील खास करून ) त्रास देतात त्यांना टाळणे हाच उत्तम उपाय . अभयारण्यात काहीही उपद्य्रव न करणाऱ्या लोकांना जंगल विभाग कर्मचारी फार आढेवेढे न घेता मदत करतात असा अनुभव आहे . बाकी विंचू आणि जनावर (साप ) यांचा त्रास रात्री फार असतो ( पण आपण त्यांच्या जागी आहोत हे लक्षात ठेवले तर फार बरे.) तसेच साधारण रात्री संध्याकाळी फिरणे टाळणे बरे.
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Mon, 02/16/2015 - 12:50 नवीन
चोरवण्यातील गावकरी खरोखरीच आतिथ्यशील आहेत, पण माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे बंदी आवश्यकच आहे नाहीतर आपल्यातीलच काहीजण त्याचाही AMK करून टाकतील. प्राण्यांसाठी अशाही खूपच कमी जागा उरल्या आहेत. उदयाच्या महाशिवरात्रीला तिकडे अक्षरशः हैदोस असणार आहे. नागेश्वर जर buffer zone आहे तर जुना वासोटा Core Zone आहे. अभयारण्याचा गाभा आहे. महाशिवरात्रीच्या दिवसांमध्ये कोकण बाजूचे गावकरी तिवरे गावाकडून जुन्या वासोट्यावर फिरायला येतात, येताना शिकारीची तयारी पण करून येतात. हि माहिती तिवरे गावातील मित्राकडून मिळाली आहे. आणि आम्हीही ट्रेक दरम्यान शिकारी पाहिलेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर
म
मॅक Mon, 02/16/2015 - 08:52 नवीन
खुप छान....... मलापण अस काही तरी करायच आहे........
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/16/2015 - 15:23 नवीन
@मैक ,हा ट्रेक करून पाहा: आसनगाव रे स्टेशन -चौंढे बसने ४०किमी - चौंढे कॉलनी -ट्रेक- घाटघर- चार किमी -साम्रद मुक्काम- ट्रेक- कल्याण दरवाजाने अवघड चढ-रतनगड -मुकाम- ट्रेक- उतरून -अमृतेश्वर -ट्रेक होडीने पलिकडे -मुरशेत - शेंडी- भंडारदरा MTDC -बसने इगतपुरी मार्गे -कल्याण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मॅक
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 02/16/2015 - 15:38 नवीन
सतीश, थोडेसे विषयांतर आहे :( पण .. @ मैक आणी कंजूस - हा पण ट्रेकरूट मस्तच आहे. आम्ही केला होता ७ वर्षांपुर्वी पण थोडासा वेगळा साकुर्ली - डेणे - वोरपड - करोली घाट - साम्रद - त्रंबक दरवाज्याने रतनगड - रतनवाडी - शेंडी (धरणाच्या बॅकवॉटर मधून होडीने) - परत.. अफलातून आणी भन्नाट ट्रेक.. अवांतर @ कंजूस - साम्रद वरून कल्याण दरवाज्याने रतनगडावर जाता येते हे माहीत नव्हते.. कल्याण दरवाज्याची जागा बघता हा रूट भारी असेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
प
प्रचेतस Mon, 02/16/2015 - 17:11 नवीन
कल्याण दरवाजा बऱ्याच वर्षांपासून वापरात नाहिये. दरड कोसळल्यामुळे वाट पूर्णत: बंद झालीय. तांत्रिक साधनांशिवाय पर्याय नाही. बाकी रतनगड पाहताना मला जीवधनचीच खूप आठवण येते इतकी समानता किल्लेबांधणीत त्या दोघांची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
क
कंजूस Mon, 02/16/2015 - 17:38 नवीन
तो नेढ्याच्या खालचा दरवाजा जिथे तुटलेला जिना आहे तो म्हणायचा आहे(नाव चुकले असेल). तिथून खालची काळू नदी दिसते. साम्रदकडून येताना खुट्याला वळसा घालून नंतर एका उभ्या ओढ्यातून चढावे लागते.खाली पाहायचे नाही. संपूर्ण ट्रेक एका दमातच केला पाहिजे असे नाही. तुकड्या तुकड्यात दोन तीन ट्रिपांत करता येतो .कोणाची परवानगी काढावी लागत नाही. पाणी नाही मिळाले तर उंबरं आणि अळू (इकडचे थोडे लहान असतात) खायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 02/16/2015 - 17:52 नवीन
तो रस्ता त्र्यंबक दरवाजाचा. खुट्टा आणि रतनगडाच्या खिंडीतुन एका बाजूला रतनवाडीत उतरता येते तर दुसऱ्या बाजूने बाण सुळक्याची वाट आहे. ओढ्यातून वर आल्यावर कड्यातील आडवी वाट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ल
लॉर्ड फॉकलन्ड Mon, 02/16/2015 - 09:31 नवीन
खुप छान फोटो आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 02/16/2015 - 10:37 नवीन
खुप मस्त लिखान आणि ट्रेक. मात्र बरोबर नवखे ट्रेकर्स असतानाही अबघड ट्रेक करणे खरोखर अवघड होत असेन ना ?
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/16/2015 - 11:03 नवीन
अजुन एक मस्त भटकंतीचे वर्णन.. एक माहीती हवी होती....जंगली जयगड वासोट्याजवळच कुठे आहे का? शिवाय चकदेव आणि शिंदी गावावरुन कोकणात उतरणारी वाट ह्याबद्दल काही माहीती मिळेल का? शक्यतो जंगल विभागाच्या कचाट्यात न सापडता ट्रेक आखता येईल का?
  • Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 02/16/2015 - 12:48 नवीन
राजेंद्रजी, जंगली जयगड वासोट्याजवळच कुठे आहे का?>>> नाही, जंगली जयगड वासोट्याजवळ नाही तो कोयना धरणाच्या भिंतीजवळ आहे. हेळवाक/कोयनानगर वरून नवजा गावात एक रोड जातो तिथून १.५ तास लागतो. शिवाय चकदेव आणि शिंदी गावावरुन कोकणात उतरणारी वाट ह्याबद्दल काही माहीती मिळेल का? >>> नक्की कुठल्या वाटेची माहीती हवीय? कारण चकदेव आणी शिंदी गावातून कोकणात दोन वेगवेगळ्या वाटा वेगवेगळ्या गावात उतरतात. शिंदीतून तर दोन वाटा उतरतात. शक्यतो जंगल विभागाच्या कचाट्यात न सापडता ट्रेक आखता येईल का?>>> हा हा हा.. कोडं आहे हे पण सोडवता येते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/17/2015 - 10:56 नवीन
जंगली जयगडच्या माहीतीबद्दल आभार. चकदेववरुन एक लाकडी/बांबुची शिडीची वाट कोकणात उतरते त्याबद्दल विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
स
स्वच्छंदी_मनोज Tue, 02/17/2015 - 11:57 नवीन
राजेंद्रजी, चकदेव वरून ती वरून ती वाट कोकणात आंबोली (खेड तालुक्यातील जगबुडी नदी काठाचे, सिधुदुर्गातील नव्हे :)) गावात उतरते.. आणी तिथली लाकडी/बांबुची शिडी काढून आता तिथे दोन टप्प्यातील लोखंडी शिडी बसवलीय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 02/18/2015 - 08:01 नवीन
लोखंडी शिडी केलीये का? मस्त. जायचे ठरले की अधिक माहीतीसाठी व्य.नी. करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वच्छंदी_मनोज
न
नया है वह Mon, 02/16/2015 - 12:52 नवीन
छानच लेख आहे ! मस्त वर्णन आणि प्रकाशचित्रे!
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 02/16/2015 - 14:23 नवीन
मद्त आमचा वासोटा ट्रेकः रात्री पुण्यातुन कारने निघायचे होते १० च्या सुमारास आणि सातार्‍यात एकाकडे मुक्काम होता. ज्या मित्राची कार न्यायची होती त्याचा येता येता छोटा अपघात झाला त्याला आणि कारलापण विशेष काही झाले नाही पण तो येतच नाही म्हणाला. आयत्या वेळी दुसर्‍या मित्राची कार घेऊन गेलो. निघायला १२.३० वाजले. सातारला ३.१५-३.३० ला पोचलो. सकाळी बामणोलीला गेलो. वनखात्याची परवानगी काढायला गेलो पण हाय रे कर्मा.. जंगलात वाघमोजणी सुरु असुन अजुन १५ दिवस तरी जंगल बंद आहे असे समजले मग महाबळेश्वर, प्रतापगड, मकरंद्गड (रात्री मुक्काम) असा ट्रेक केला. वासोट्यावर राहता येत नाही पण पायथ्याला वनखात्याचे तंबु आहेत तिकडे पैसे भरुन राहता येते असे समजले. तसेच बामणोली गावकर्‍यांकडुन ऐकलेली अजुन एक हकीकत.. एक ट्रेकर्सचा ग्रुप रात्री वासोट्यावर राहणार नाही अशी हमी देऊन गेला. वनखात्याच्या कर्मचार्याला रात्री वासोट्यावर जाळ दिसला, त्याने लगेच साहेबांना सांगितले. मध्यरात्री साहेब स्वतः वर गेले. ज्या म्होरक्याने वर राहणार नाही अशी हमी दिली होती त्याच्या मुस्काटीत मारली, रात्रीच सर्वांना खाली उतरवले. उघड्यावर रात्र काढायला लावली आणि जबर दंड (कि लाच ?) घेऊन सकाळी त्यांना सोडुन दिले. असो हेच साहेब जंगलात जायची परवानगी देतानासुध्दा तोंडी परिक्षा घेत. उदा. जंगलात अस्वले खुप आहेत फटाके वगैरे आणले आहेत ना त्यांना पळवुन लावयला? खरच ज्यांनी आणलेले असायचे ते लगेच उत्साहाने हो-हो म्हणायचे, मग साहेबाची अशी सटकायची की बास ;) वासोटा परत करायची ईच्छा आहे. ते वनखात्याच्या तंबुंबद्दल खात्रीशीर माहिती कोणी सांगु शकेल का?
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Wed, 02/18/2015 - 06:01 नवीन
हो! मेट इंदवलीला वनखात्यातर्फे तंबूमध्ये राहण्याची सोय होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
स
स्वच्छंदी_मनोज Mon, 02/16/2015 - 14:35 नवीन
वासोट्यावर राहता येत नाही पण पायथ्याला वनखात्याचे तंबु आहेत तिकडे पैसे भरुन राहता येते असे समजले>>> वासोट्याच्या पायथ्याला म्हणजे मेट इंदवलीला वनखात्याचे तंबु आहेत.. तिथे राहायची सोय असेल कदाचीत..
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/17/2015 - 01:48 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
न
निमिष ध. Tue, 02/17/2015 - 18:01 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल अनेक आभार. वरती राहता येत नाही ही मला सुद्धा नविनच माहिती आहे. तुमचे वर्णन आणि फोटो आवडले. लिहित रहा :)
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 02/18/2015 - 05:01 नवीन
लहान मुलांसाठी फार अवघड ट्रेक आहे का? वय वर्ष ७ व १३. तसेच वासोट्याच्या पायथ्याला म्हणजे मेट इंदवलीला वनखात्याचे तंबुमध्ये निवासाची सोय आहे काय त्याची परवानगीचा द्रावीडी प्राणायाम आहे काय? ते वनखात्याच्या तंबुंबद्दल खात्रीशीर माहिती कोणी सांगु शकेल का?
  • Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर Wed, 02/18/2015 - 06:20 नवीन
हो! ट्रेक अवघड नाही. दीड दोन तासात माथ्यावर पोहोचतो. वासोट्याच्या पायथ्याची चौकी अर्थात मेट इंदवलीला वनखात्यातर्फे तंबूमध्ये राहण्याची सोय होते. जंगल असल्याने लहान मुलांना आपल्या जबाबदारीवर नेणे. इथे चौकशी करून पहा- ०२१६२ - २३३६१४ आणि २३६६४४ (वन विभाग सातारा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
क
कंजूस Wed, 02/18/2015 - 14:56 नवीन
मुलांसाठी योग्य ट्रेक सुचवतो: अ) पुण्याकडून-बस/कार ने भिमाशंकरला जाऊन MTDC त राहाणे -साक्षीविनायक ,हनुमानतळे जाणे ब)मुंबईकडून- पनवेल ते धोधाणी बसनेच जाणे -धोधाणी गाव ते वरती माथेरानचा सनसेट पॉइँट ट्रेक अडीच तास अधिक एक तास बाजार वर राहून दुसरे दिवशी खाली नेरळ स्टेशनला जाता येईल {यासाठी कारने धोधाणी नको}.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश कुडतरकर
न
नि३सोलपुरकर Wed, 02/18/2015 - 14:00 नवीन
सतीशराव,मस्त लेख आहे छान वर्णन आणि प्रकाशचित्रे. अवांतर : साहेबपुढच्या वेळी एखादा सोपा ट्रेक करताना जरा हाक मारा आम्हालाही, बघुया जमतय का ?
  • Log in or register to post comments
ब
बापू नारू Wed, 02/25/2015 - 09:37 नवीन
लेखच इतका छान आहे तर प्रत्यक्ष tracking ला किती मज्जा आली असेल... खूप मस्त वर्णन..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा