Welcome to misalpav.com
लेखक: शरद | प्रसिद्ध:
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ? "अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्‍याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत. माझे महाभारतावरील मत हे "शरद याचे, त्याचे घरातील वातावरण शिक्षण, वाचन, पुण्यातील वास्तव्य" अशा बर्‍याच गोष्टींवर आधारलेले मे २०१५ चे मत असते. उद्या ते तसे असेलच असे अजिबात नाही. म्हणून मी माझे मत देऊं नयेच कां ? तसे अजिबात नाही अह्ल्या व शूर्पणखा यांच्या बाबतीत रामायणात पुरुषी वर्चस्वाची झाक दिसते कां एवढ्यापुरते मर्यादित. अहल्या : (१) ब्रह्मदेवाने विश्वातील स्रर्व सौंदर्य गोळा करून अह्ल्या निर्माण केली व ती गौतमाच्या आश्रमात "ठेव" म्हणून ठेवली. सर्व लोकपाल जिच्या प्राप्तीकरता धडपडत होते तिच्या, त्या अहल्येच्या, मोहांत गौतम पडला नाही म्हणून ब्रह्मदेवाने स्वत: त्यांचे लग्न लावून दिले. गौतम कोणत्याही अप्सरेच्या मोहात पडणारा लंपट नव्हता. (२) अहल्येचा "ज्येष्ठ" पुत्र शतानंद हा जनकाचा पुरोहित होता. म्हणजे अह्ल्या अनेक पुत्र असलेली "लेकुरवाळी" होती. (३) तपोनिष्ट व इंद्रियदमन करणार्‍या नवर्‍याला, काही मुले झाल्यावर, अहल्येने फसवले आहे. त्याबद्दल तिला चूक न वाटता आनंदच वाटतो व इंद्राने गौतमाच्या कोपापासून आपणास वाचवावे असेही ती म्हणते. (४) कोणत्याही काळात, अगदी आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. यात पुरुष संस्कृतीच्या वरचष्म्याचा प्रश्न उद्भवत नाही. (५) गौतमाने "तपाने शुद्ध झाल्यावर, माझ्याबरोबर नांदशील" असे सांगण्याचा मोठेपणा दाखविला आहे. शतानंदानेही "मातेचे दुराचरण आपण रामाला सांगितले ना व रामदर्शन झाल्यावर माझ्या मातेचा माझ्या पित्याशी समागम झाला ना ?" असे विश्वामित्राला विचारले आहे. आजच्या काळातही असा मनाचा मोठेपणा पहावयास मिळतो कां ? (६) आता पुरुषांना अशा प्रसंगी काय शिक्षा झाली ? असा प्रश्न विचारला आहे. प्रथम रावणाचे उदाहरण घ्या. त्रैलोकातील सुंदर स्त्रीयांवर बलात्कार करणे हा उद्योग. एकदा एक अप्सरा कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी संकेत करून त्याच्याकडे निघाली असतांना रावणाच्या नजरेस पडली. तिने त्याला विनवणी केली की मी तुझ्या पुतण्याकडे पूर्वसंकेताने जात आहे, मला सोड. त्याने ऐकले नाही. नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली. रावणासारख्या क्रूरकर्म्याचे सोडा. माझ्या वाचनात ऋषींचे असे वर्तन दोनतीन ठिकाणीच आले. एक विश्वामित्र व अप्सरा. या ठिकाणी अप्सरा त्यांना मोह पाडण्यासाठी योजल्या आहेत.. त्याला बळी पडल्याने फार दोष देण्याचे कारण नाही. दुसरे उदाहरण पराशर-सत्यवती. पराशर सत्यवतीवर मोहित झाल्यावर त्याने तिला उत्तम वर देऊन वश केले आहे. अंधार निर्माण करून तिचा संकोच नाहिसा केला, तिच्या अंगाचा माशांचा वास घालवून तिला सुगंधी केले व प्रसुत झाल्यावर परत कन्यावत्वही दिले. इथेही बलात्कार नाही. एखादे उदाहरण रहिले असेल तर श्री. वल्ली सांगतीलच. आता शूर्पणखेचा विचार करूं शूर्पणखा ही रावणाची बहीण. तिचे लग्न मधु नावाच्या एका दानव राजाशी झाले. रावणाने त्रैलोक जिंकण्याच्या नादात मधूवर स्वारी केली व युद्धात त्याला मारून टाकले. मग या विधवा बहीणीची कटकट लंकेत नको म्हणून तिला दंडकारण्य़ात पाठवून दिले व तेथे खर नावाच्या एका राक्षस सेनापतीला, हा त्याचा भाऊ, तिच्या दिमतीस दिले. तेथे शूर्पणखा स्वच्छंदपणे विहरत असे. राम-लक्ष्मण-सीता दंडकारण्यात रहावयास आल्यावर ही सहज त्यांच्या आश्रमापाशी आली. रामाला पाहिल्यावर ती कामातूर होऊन त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याची चौकशी केली. आदीकवी वाल्मीकि काय म्हणतात ते बघा .."विक्राळ मुख, मोठे पोट, विरूप नेत्र, ताम्रवर्ण केस, कुरूप मुद्रा, भयंकर स्वर, उग्र स्वभाव, वृद्ध वय, कुटिल भाषण, अतिशय दुष्ट वर्तन्यांनी युक्त असलेली ती राक्षसी कामाधिन होऊन उत्कृष्ट मुख, कृश उदर, विशाल नयन, सुंदर केस ,सुरूप मुद्रा, मंजुळ स्वर, सौम्य स्वभाव, तरुण वय, सरल भाषण, न्यायाला धरून असलेले वर्तन असलेल्या रामाला म्हणाली "तूं कोण ?, येथे कशाला आला आहेस ?" सरळ स्वभावाच्या रामाने तिला उत्तर दिले की " दशरथ राजाच्या आज्ञेवरून मी राम, हा माझा भाऊ लक्ष्मण व ही माझी पत्नी सीता..वनात राहण्यासाठी आलो आहोत." तो नंतर तिला "तूं कोण ?" असेही विचारतो. इथपर्यंत सगळे सौजन्याने चालले होते. यावर शूर्पणखा त्याला उत्तर देते " मी इच्छेप्रमाणे रूप धारण करणारी, शूर्पणखा नावाची, रावणाची बहीण आहे. तू माझा चिरकाल भर्ता हो. सीतेचा तुला काय उपयोग ? ही विरूप, दुराचारी, पोट खपाटीला गेलेली मनुष्य जातीची भार्या व तुझा भाऊ यांना मी भक्षण करून टाकीन व नंतर विषयोपभोगाची इच्छा धरून आपण संचार करू." मग राम न रागावता थट्टा करण्याच्या उद्देशाने म्हणाला, " बाई ग , माझा विवाह झाला आहे. सवतीचे जीवन तुजसारखीला बेकारच. तेव्हा तू माझ्या ऐवजी लक्ष्मणाशीच विवाह कर." रामाला सोडून शूर्पणखा लक्ष्मणाला म्हणाली " माझ्या सारखी श्रेष्ठ स्त्री तुझ्या रूपाला योग्य भार्या आहे." मग लक्ष्मण म्हणतो " मी तर दास. माझ्या ऐवजी हा रामच तुला योग्य.. तुझ्या सारख्या सुंदर स्त्रीला सोडून हा कशाला या कुरूप मानवी स्त्री बरोबर संसार करेल?" मूर्ख शूर्पणखेला ते पटले व ती रामाला म्हणाली " या तुझ्या भार्येवरील प्रेमाने तू माझा अव्हेर करत आहेस. तिला मी तुझ्या समक्ष भक्षण करून टाकीन व मग तू सवत नाहिशी झालेल्या माझ्याबरोबर संचार कर." असे म्हणून ती सीतेला खावयास तिच्या अंगावर धावून गेली. मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. शरद
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

शूर्पणखेच्या कुरूपतेचे अवास्तव वर्णन हे लक्ष्मणाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने जोडलेले असावे. मुळात ती तशी नसावी. अन्यथा ती मुळातच विरूप असताना लक्ष्मण आणखी काय करणार होता?

मुळात रामायण हा आर्य आणि अनार्य याचा संघर्ष आहे असे वाटते. दोन्ही संस्क्रूतीत , योग्य अयोग्य या बाबतीतील नियमात, लोकांच्या रुपात फरक असणारच! हे झाले शूर्पणखेच्या बाबतीत ! अहिल्येबद्दल सावकाशीने लिहिनच. रामायणात सर्व व्यक्तिरेखा काळ्या पांढर्‍या रंगात रंगविल्या आहेत हे पटते! अवांतर - संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे जमत नाही . हेल्पा !:(

रेखा , नगमा , श्रीदेवी , भानुप्रिया .... सगळ्या अनार्य द्राविडी स्त्रीया कुरुपच का ? रावणाच्या देखणेपणावर अनेक स्त्रीया मोहीत होत्या असे रामायणातलिहिले आहे ना ?

संस्क्रूती मधील स्क्रु टंकणे जमत नाही .
हीच तर आपल्या संस्कृतीची मर्यादा आहे. चांगला लॉजिकल स्क्रू टाकून भाग जोडावे म्हंटले तर जमत नाही.. खिळे मात्र उभे आडवे कितीही ठोकता येतात!!!! :) :)

:):) म्हणूनच स्क्रुइंग अप हा शब्द आला असावा . असंस्कृत लिखाणाबद्दल क्षमस्व!

असंस्कृत लिखाणाबद्दल क्षमस्व!
अहो तुम्ही क्षमा मागायची काहीच गरज नाही. माझा रोख काहीही झालं तरी रामच कसा चांगला होता असं जे दाखवलं जातं त्यावर होता!!!

आर्य आणि अनार्य संघर्ष- हे आंग्ल इतिहासकारांनी आपल्या डोक्यात डोक्यात टाकलेली मूर्खतापूर्ण संकल्पना आहे. रामायण वाचा - वास्तवात इथे संघर्ष ब्राह्मण रावण आणि इतर जाती क्षत्रिय + निषाद, शबर, भिल्ल, वानर (अर्थात मंडळ कमिशन). पण आंग्ल इतिहासकारानी याला उत्तर (आर्य) दक्षिण (अनार्य) या संघर्षाचे रूप दिले, त्याना देशावर राज्य करायचे होते. बिना रामायण वाचता. तोच इतिहास शिकून आपले अतिविद्वान इतिहासकार त्यांचे वाक्य ब्रह्मवाक्य मानून सत्य कळत असून ही पाहत नहीं. बाकी विशेष मी शौनक गोत्रीय ब्राह्मण आहे. अर्थात माझे पूर्वज (???) कदाचित रावणाच्या राज्यात मोठ्या पदावर असण्याची शक्यता नकारता येत नाही. शिवाय युद्धात त्यांचा रामाच्या हस्ते वध ही झाला असण्याची शक्यता नकारता येत नाही. हा संघर्ष या युगात ही आहे कांग्रेस (ब्राह्मण) विरुद्ध इतर पक्ष.

अर्थात माझे पूर्वज (???) कदाचित रावणाच्या राज्यात मोठ्या पदावर असण्याची शक्यता नकारता येत नाही. शिवाय युद्धात त्यांचा रामाच्या हस्ते वध ही झाला असण्याची शक्यता नकारता येत नाही.
हे काही समजलं नाही. तुमच्या पूर्वजांचा वध झाला, तर तुम्ही इथे कसे?

वंशज पैदा करून मग पूर्वज मरू शकत नाहीत का?

वर लिहिलेली गोष्ट खरी असेल तर राम-लक्ष्मणाचेही चुकलेच. त्या राक्षसीची त्यांनी थट्टा करुन तिला चिडवायला नको होते. खरी परिस्थिती सांगितली तोवर ठीक होते. विनाकारण चेष्टा करण्याचे साहस अंगाशी येऊ शकतेच.

उत्तरकांड सर्ग-२६ नलकुबेराची गोष्ट उत्तरकांड , सर्ग २६ मध्ये दिली आहे. शरद

मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. बरोबर आहे, शिक्षा योग्यच झाली. काही प्रश्न छिद्रान्वेषी वृत्तीने मनात उद्भवतातच, त्याचे कृपया निराकरण करावे: १. राम आणि लक्ष्मण दोघेही तिच्याशी चेष्टेच्या सुरातच बोलत होते म्हणजे त्यांच्या दृष्टीने तिच्याकडुन धोका नव्हता. तिची भाषा प्रथमपासुनच आक्रमक होती. २. राम अणि लक्ष्मणाने शुर्पणखेला म्हणे मारले नाही कारण ती स्त्री होती. मग त्राटिका कोण होती? एखाद्या स्त्रीला कान नाक कापुन विद्रुप करणे ही तिला ठार मारण्यापेक्षा जास्त क्रूर चेष्टा नाही काय? ३. जो राम वालीला "वानर" म्हणुन मारतो तो एका राक्षसीणीला "स्त्री" कसा काय मानतो म्हणे? ४. जर शुर्पणखा सीतेसाठी भविष्यात धोका ठरु शकली असती तर तिला मारुन टाकणे योग्य नव्हते काय? तिला विद्रुप केले असता ती परत सीतेवर हल्ला करुच शकली असती. त्याऐवजी तिचे हात पाय कापणे जास्त योग्य ठरले नसते काय? तिला विद्रुप करणे हे केवळ तिला तुच्छ लेखुन तिची जागा दाखवुन देण्याचा विचार वाटतो.

विश्वामित्र राम-लक्ष्मण यांना यज्ञरक्षणाकरिता घेऊन जात असतांना त्राटिकेने त्यांच्यावर हल्ला केला. विश्वामित्रांनी रामाला त्राटिकेला मारावयास सांगितले. पण रामाने "ही स्त्री, हिचा वध कशाला ?" म्हणून तिचे नाक-कान कापले. मग ती अदृश्य होऊन दगडफेक करू लागल्यावर विश्वामित्रांनी "ही दया दाखविण्याची वेळ नव्हे " असे सांगितल्यावर मग रामाने तिचा वध केला. त्या काळी स्त्रीचा वध करण्याऐवजी नाक-कान कापणे जास्त कडक शिक्षा मानली जात असावी. दोषीला ठार मारण्याऐवजी नाक-कान कापलेले चालते बोलते ध्यान समोर असेल तर इतर लोकांना धाक बसेल. काय ? ( हे राम. मी रामायणामधील गोष्टीच सांगत बसलो तर सुभाषितांचे काय करणार. जाऊं द्या.)

मग रामाने लक्ष्मणाला सांगितले कीं ’तू हीला विरूप करून टाक ".मग लक्ष्मणाने कान व नाक कापून टाकले. स्त्री म्हणून ठार केले नाही. वरील वर्णनावरून लक्षात येईल की शूर्पणखेला शिक्षा ती सीतेला खावयास निघाली म्हणून केलेली आहे. तिच्यावर अन्याय झालेला नाही. +१ सहमत .. पण .. मी ज्या वेगवेगळ्या कथा वाचल्या .. त्या पैकी एका कथाकाराच्या मते शूर्पणखा ही रावणाची बहीण असून , त्याच्याच प्रमाणे रूपवान होती. दुसर्‍या कथेत सांगतात की ती राक्षसी असल्याने, मायावी रूप धारण करून आली होती. आणखी एका कथेत म्हणले आहे, की तिच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशात परकीय आल्याचे कळले म्हणून ती राम आणि लक्षमणांना जाब-सवाल करण्याच्या हेतूने तिथे आली, आणि शस्त्रसज्ज असलेल्या दोघांना पाहून , त्यांच्यावर चाल करून आली. आता खरे-खोटे काय ते रामजाणे.

नंतर ती रडत रडत नलकुबेराकडे गेली. नलकुबेराने रावणास शाप दिला की "रावण इच्छा नसलेल्या स्त्रीवर बलात्कार करेल तर त्याच्या डोक्याचे तुकडे होतील". तेव्हापासून रावणाने तसले उद्योग थांबविले. सीतेला लंकेत नेल्यावर या भीतीनेच ती वाचली. कथा वाल्मिकी रामायणात आहे काय?

आजच्या my choice काळातही, हे नीतीमत्तेला धरून नाही व अह्ल्येला शिक्षा झाली तर तक्रार करण्याचे कारण नाही. हे नीतिमत्तेला धरुन नाही हे ठीक आहे. पण आजच्या काळात नवरा बायकोला कसलीही शिक्षा करु शकणार नाही. माय चॉइस यु सी.

माझ्या मनात कायम एक शंका आहे या गोष्टी खरोखरेच घडल्या होत्या का ? कारण लिखाण दोन प्रकारचे असते. एक घडलेल्या घटना लिहिणे आणि दुसरे काल्पना विलास लिहिणे. रामायण काळातील घटना घडल्या होत्या असे म्हणणारे अनेक भौगोलिक पुरावे देतात. उदा. रामसेतु, दंडकारण्य, श्रीलंका इ. पण या सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन त्यानुसरुन या कथा नंतर लिहिल्या असतील असे तर नसेल का ?

पण या सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन त्यानुसरुन या कथा नंतर लिहिल्या असतील असे तर नसेल का ?
याबद्दल खट्टा मिठा ब्लॉगवर काही वाचले होते. राम कोण देशीचा? : भाग 1 राम कोण देशीचा? - भाग 2 राम कोण देशीचा? - भाग ३

अहो असं काय बोल्ता ब्वा ? रामायण हे आज, साहित्य नसून, खरोखरीच या देशाचा इतिहास असल्यागत त्याचा उहापोह, काहीजणाकडून इथे होतो आहे. तर काही शतकानंतर "शोले" सुद्धा कलेचा आविष्कार नसून, खरोखरीचा इतिहास आहे, असा दावा काहीं लोकांकडून त्यावेळी करण्यात येईल कदाचित. ठाकूरच्या सुनेवर कसा अन्याय झाला, वै विषय तयावेळी चर्चिले जातील बहुदा... काव्य साहित्य आहे त्याला तेच ठेवावे, उगाच त्याचा ओढून ताणून इतिहास बनवू नये !

तर काही शतकानंतर "शोले" सुद्धा कलेचा आविष्कार नसून, खरोखरीचा इतिहास आहे, असा दावा काहीं लोकांकडून त्यावेळी करण्यात येईल कदाचितदेवा पवार नावाचा राक्षस, नरेंद्र नावाचा देवावतार, अजित नावाचा भाऊ देवा देवा देवा एकाच लेखावर दोन दोन दा कस निर्वतायच ब्वा?

१. अहिल्येचे लग्न एका अश्या माणसाशी झाले होते ज्याला तिच्या सौंदर्याशी काडीमात्र घेणे देणे नव्हते. त्यांच्या नैतिकतेचे आणि निरलसतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण जगतसुंदरीचे एका अश्या माणसाबरोबर लग्न लावुन देउन त्याच्याशी संसार करायला भाग पाडावे का? गौतम ऋषींसाठी अहिल्या काय आणि शूर्पणखा काय एकच होती. तिने त्यांची निर्लेपपणे सेवा केली म्हणजे झाले. २. अहिल्या एका इंद्रियदमन करणार्‍या पुरुषाबरोबर संसार करत होती. यात त्या व्यक्तीचा अध्यात्मिक आलेख, मनोनिग्रह, विषयवासनांवरचा विजय या गोष्टी नि:संशय प्रशंसेस पात्र ठरतात मात्र असे करताना ही व्यक्ती आपल्या संसारधर्माशी प्रतारणा करते आहे काय आणि पत्नीला विषयसुख देण्यास कमी पडते आहे काय याचा विचार आपण करतो आहोत की नाही?

हो. इंद्रियदमन करणार्‍याने स्वतः एकट्या नावेत बसावे, उगा तयारेएला पाणी भरा, स्वैपाक करा, पाय चेपा, पूजेची तयारी आणी झोपडीची स्वच्छता करायला सुंदर्‍या कशाला हव्यात? वर आणी मोठेपणा तो केव्हढा? पुरुष ना तो? आणि ती मस्त्यगंधा पराशर तर एकदमच हुकली आहे. कौमार्य परत कस काय येत ब्वा? त्या पोरीच्या शरीराच्या स्पर्शभावना सुद्धा पुसल्या जातात काय? मग आजकाल जे लहाण मुलींवर बलात्कार होतात त्यांच्यावर सर्जरी केली अन त्याचा खर्चापानी दिला की त्यो मानुस येकदम महान होणार का काय?

ते शंभर शकले प्रकरण मागाहून चिकटवले आहे. उगाचच रावणाला सहानुभूती मिळू नये म्हणून. पुराणकथा अशाच बनतात. आपल्या मताला सोयिस्कर तसे रचत जातात आणि तेच सत्य म्हणून खपवत जायचे धंदे म्हणजे पुराणकथा आणि किर्तने. किर्तनकाराची प्रत्येक गोष्ट जणू देवाच्याच तोंडातून ऐकतोय असा विश्वास असणार्‍या भोळ्याभाबड्या जनतेचं समजू शकतं पण... अजूनही पारंपारिक कथाकथनामध्ये स्त्रीने नवर्‍याची दासी बनून राहावे असेच प्रवचन सीतेचे दाखले देऊन वाचाळ किर्तनकार करत असतात. 'सुशिक्षीत व सुसंस्कृत' प्राध्यापकांना असे किर्तन करतांना मी स्वत: ऐकले आहे.

झाला एकदाचा जीव परत जागा. तर माझ म्हणन काय होतं माहिताय का? एव्हढच म्हणन होतं की स्त्रीला जर काम भावना झाली तर ती वाईट कशी काय मानली जाते. थांबा जेवुन येते. माझ्या प्रश्नाचे उत्तर तुअम्च्या पराशर उत्तरातच दडले आहे. एका माणसाला एका स्त्रीची कामना होते अन तो महान ठरतो तुमच्या मते, पण एखाद्या स्त्रीने एखाद्या पुरुषाची कामना केली की तिच्या जबाब्दार्‍या, तिचे पुत्र (ते ही पुन्हा पुरुषच. इस्लाम मातेला सुद्धा स्त्री म्हणुन कमी दर्जाची आणीकनरकाचे द्वार मानतो. आईला सुद्धा बडवायला त्यांना मुभा आहे. मग अहिल्येचा पुत्र त्याला अपवाद कसा? ) याची आठवण होते. जाऊ दे. मी फक्त एकाच गोष्टीने वैतागले होते, अन ते म्हणजे अहिल्येबद्द्ल विवेक पटाईत नी लिहीलेली कथा (जी च्या पुष्ठ्यर्थ ते श्लोक सुद्धा देतात) अरे ही अशी ही वेगळी आहे का म्हणुन सोडुन देण्या ऐवजी वर्षानुवर्षे सर्वांना माहित असलेली कथा पुन्हा रंगवुन सांगायची गरज नव्हती. त्याच ठिकाणी आम्ही सुद्धा ही कथा माहित नसल्याचे सांगितले होतेच.

स्त्रीला जर काम भावना झाली तर ती वाईट कशी काय मानली जाते.
शंभर नंबरी सवाल. आपण "इनॅडिक्वेट" ठरु या भीतिने ग्रस्त असलेले तथाकथित मर्द आपला मर्दपणा जपण्यासाठी स्त्रिच्या कामभावनांना अपवित्र ठरवण्याचे कार्य हिरीरीने करतात. असे पुरुष तेवढ्यासाठी आयुष्यभर एकपत्नी राहण्याचेही स्तोम माजवतात. :-)

"ब्रह्मचर्य हेच जीवन. वीर्यनाश हा मृत्यू." बायकांमुळे कितींदा मृत्यू पत्करावा लागतो ठाऊकै का? ;) जौद्या.

एक लीटर रक्त म्हणजे ----एक थेंब हे न लिहिल्याबद्दल निषेध.

वीर्यापासून परत रक्त बनवण्याचा शोध लागला पाहिजे, म्हणजे रक्तपेढ्या अगदी काँपॅक्ट होतील नै ?

तुम्ही लिहिले त्यापेक्षा वेगळे मी लिहिले नव्हते. कोणा एका माणसाने दुसर्‍याचा विश्वासघात करणे हे कधीही चूकच आहे. मग तिथे बाई का पुरुष हा प्रश्न येत नाही. तसेच विश्वासघाताचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही.

मुळात अहिल्या म्हणजे काय सामानाची गासडी होती काय की खूप लोकांची नजर आहे म्हणून गौतमाच्या घरात टाकून ठेवायला? कोणाचा विश्वास आणि कोणाचा घात?

गौतमांचा त्याग करून निघून जायला अहल्या स्वतंत्र होती. गंगा, ऊर्वशी इ. स्त्रियांनी नवर्‍याला सोडून स्वतंत्र राहिल्याच्या गोष्टीही आहेतच. पण लग्नाचे फायदे पाहिजेत आणि बाहेर मजाही पाहिजे असे करून नवर्‍याचा विश्वासघात करणे चूकच. जसे दुष्यंताने शकुंतलेचा गैरफायदा घेऊन मग पाठ फिरवणेही चूकच.

बरोबर आहे. तिने त्याग करायला हवा होता. पण एक प्रश्न असा पडतो की समजा तिचा त्याग करायचा विचार बिचार काही नाही आणि अचानक नवरा नसताना तिला इंद्र दिसला आणि तिला तो आवडला तर तिने आधी जाऊन घटस्फोटाचा अर्ज करावा की या क्षणाचा आनंद घेऊन मग नवर्‍याचा त्याग केला तर चालेल? गौतमाने शाप न देता "ठीके, तू लग्न मोडले आहेस, आपला आता काही संबंध नाही" एवढे म्हणून तिला सोडले असते तर पुरले नसते काय? की आपल्या मालकीच्या व्यक्तीने मला न सांगता निर्णय घेतला याचे दु:ख इतके असते की पार शाप देणे/जीव घेणे इथपर्यंत जावे लागते?

त्या काळात लग्नाचा विछेद ही आतासारखी वर्षानुवर्षे चालणारी गोष्ट नव्हती. त्यातही गौतमांनी शाप हा इंद्राला दिलेला दिसतो. अहल्येला एकांतवास आणि पश्चात्ताप स्वतःच स्वीकारावा अशी समज दिली आहे ती इंद्राला दिलेल्या शापासारखी भयंकर नाही. शिवाय केल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप झाल्यानंतर पुन्हा तिच्यासोबत रहायची इच्छाही गौतमांनी तिथेच सांगितली आहे.
"इतर कसल्याही प्रकारचा आहार न करतां केवळ वायुभक्षण करून व भस्मात पडून राहून आपल्या कृतकर्माचा पश्चात्ताप करीत तूं हजारो वर्षे या ठिकाणीच वास्तव्य कर, व कोणत्याही प्राण्याच्या दृष्टीस न पडता (कोणासही तोंड न दाखवता) तू येथेच आश्रमामध्ये पडून रहा. राम जेव्हा या वनांमध्ये येईल, तेव्हाच हे दुराचारिणी लोभमोहरहित बनलेली अशी तूं त्याच्या आदरतिथ्याने शुद्ध होऊन आनंदाने माझ्या समीप प्राप्त झाली असतां पूर्ववत सर्वांच्या दृष्टीस पडण्यायोग्य होशील",
मालकीच्या समजलेल्या व्यक्तीने तसेच प्रेमाच्या व्यक्तीने असा काही निर्णय घेतला तर आजही लोक कोणत्याही थराला जातात. स्त्रियांना मालकीची वस्तू समजायला नेमकी कधी सुरुवात झाली असावी हे शोधणे इंटरेस्टिंग ठरेल.

हम्म! अहिल्येला फार कडक शिक्षा नाही केली हे खरेच आहे. ते हजार वर्षे वायुभक्षण वगैरे करणे भस्मात लोळणे व रामाने येऊन पावन करणे ही पोएटिक लिबर्टी दिसतेय. मुळात इंद्र देखणा वगैरे असला तरी नवरा म्हणून गौतम अहिल्येलाही हवेच होते असे दिसतेय. पण एकदा लग्न केल्यावर दुसर्‍या पुरुषाचे क्षणिकही किंवा तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज का केला असावा कोण जाणे? विकनेस ऑफ फ्लेश, दुसरं काय?

पण एकदा लग्न केल्यावर दुसर्‍या पुरुषाचे क्षणिकही किंवा तात्पुरतेही आकर्षण वाटता कामा नये असा साधा सोपा सरळ नियम तिने नजरअंदाज का केला असावा कोण जाणे?
असं मी कुठे म्हटलंय? आकर्षण वाटलं तर "माय चॉईस" म्हणून कबूल करा! फसवाफसवी कशाला? बाकी ते हजार वर्षे वायुभक्षण, रामाने पावन करणे वगैरे मूळ कथेत दिसत नाही. रामाला भेटून त्याचा आदरसत्कार कर असे सांगितलेले दिसते आहे. राम हा एकवचनी, एकपत्नी म्हणून नावाजला गेल्याने त्याच्याबरोबर अहल्येचे काही बोलणे व्हावे अशी योजना दिसते आहे. मर्त्य माणसाला वायुभक्षण वगैरे करून जिवंत रहाणे शक्य नाही हे कोणीही सांगेल. मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. एवढेच माझे म्हणणे. हा धागा आणि चर्चा अहल्येच्या वागण्याबद्दल आहे. गौतम आणि इतर ऋषी म्हटलेल्या लोकांनी स्त्रियांवर कसे अन्याय केले याबद्दल जरूर एखादा धागा काढा. तिथेही त्याबद्दल चर्चा करू! :) बाकी ही कथा वाल्मिकी कधीच्या काळी लिहून गेले. त्यात कित्येकांनी आपल्याला वाटेल तशी भर घातली. त्यात लिहिलेल्या पात्रांनी तेव्हा असे का केले किंवा का केले नाही यावर आता आपंण चर्चा करून कथेत काहीही बदल होणार नसतोच.

मनीषा यांच्या प्रश्नाबद्दलः अहल्येने गौतमाला शिक्षा दिलीच आहे. फक्त ती उघडपणे बोललेली नाही इतकेच. अहल्या गौतमांबरोबर असमाधानी असेल तर तिने तसे स्वतःला आणि गौतमांना फसवत न रहाता सरळ निघून जायचे होते. ती तसे करत नाही. स्वतःला आणि गौतमाला अहिल्या फसवते आहे? कधी ? कुठे? फसवणूक कधी असेल? जेव्हा ती खूप काळ इंद्राबद्दलचे प्रेम म्हणा, आकर्षण म्हणा .. दडवून ठेवून गौतमाचा संसार करत असेल तेव्हा . पण इथे तसे काहीच नाही. या प्रसंगाच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा ती तनामनाने गौतमांचीच पत्नी आहे. इथे सांगितलेल्या कथेप्रमाणे बघीतले तरी .. तिला क्षणिक मोह होऊन ती इंद्राच्या अधीन झाली असा उल्लेख आहे. म्हणजे इंद्राचा मोह मनात बाळगून ती गौतमांच्या संसारात वावरत नव्हती. आणि ही घटना घडून गेल्यावर सुद्धा तिला इंद्राचा मोह असल्याचा कुठे उल्लेख अढळत नाही. किंबहूना इंद्र तिथे असतानाच गौतमांचे तिथे आगमन होते आणि मग तिची शिक्षा सुरू होते. म्हणजे तिचा आणि गौतमांचा संसार तिथेच समाप्त होतो. मग अहिल्या फसवाणूक कधी आणि कशी करणार? मला जी कथा माहीती आहे, त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे. समजा असे मानले की गौतमांना अहिल्येची वागणूक पसंत नाही. म्हणजे ते फिर्यादी आहेत (आजकालाच्या परिभाषेनूसार) मग न्याय करायचा अधिकार त्यांनाच कसा प्राप्तं होतो? म्हणजे तक्रार करणारेच गुन्हा सिद्ध करणार आणि तेच न्यायनिवाडा करून शिक्षा पण तेच देणार? हा अजब प्रकार वाटतो. फक्तं 'असमाधानी आहे', या कारणासाठी कुणीच आपला संसार मोडत नाही, -- अगदी या काळात सुद्धा. पुराण काळात तर असे करणे केवळ अशक्यच .त्यामुळे तिने संसार सोडून निघून जायला हवे, अन्यथा ती तिच्या पतीची फसवणूक असेल, हा सल्ला अगदीच अस्थानी वाटतो आहे. अवांतर : श्रीराम जेव्हा अहिल्या आश्रमात येतात तेव्हा त्यांचे एकवचनी आणि एकपत्नी असण्याचे गुण सिद्ध झालेले नसतात. किंबहूना ते अहिल्याउद्धारानंतर सीता स्वयंवरासाठी जाणार असतात. म्हणजे त्यांना श्रीराम हा ईश्वरी अवतात असल्याचे (अंतर्ज्ञानाने) आधीच माहीत झाले असणार.

त्याप्रमाणे पाहिले तर इंद्र हा गौतमांचाच छद्मं वेष धारण करून आला. म्हणजे ती तिच्या पती समवेत आहे असेच समजत होती. आणि गौतम ऋषी आश्रमात परतल्यावर सत्याचा उलगडा झालेला दिसतो. म्हणजे यात तर फक्तं तिचीच फसवणूक दिसते आहे.
कथा इथेच पुन्हा एकदा वाचा. :) क्षणिक मोह असेल तरी तिला स्वतःला आवरता आले नाही. इंद्र हा इंद्र आहे हे माहीत असतानाच अहल्या त्याच्यासोबत रत झाली. यानंतरही आपले चुकले, किंवा आपल्याला मोह झाला असे ती कबूल करत नाही, तर "गौतमांच्या रागापासून आपल्याला वाचव" अशी ती इंद्राची विनवणी करते. ही तिची स्वतःची आणि गौतमांची फसवणूकच आहे. (ताजा कलमः या कथेकडे तुम्ही आजच्या स्त्रीवादी भूमिकेतून पहात आहात तर मी कोणत्याही दोन माणसातील विश्वासघात या दृष्टीने पहात आहे. काळाच्या ओघात स्त्री आणि पुरुषाचे नाते बदलत आले आहे, मात्र प्रेम, द्वेष इ. मानवी भावना आणि वागणुकीची काही मूल्ये सतत टिकून राहिली आहेत. एकाच कथेकडे बघण्याच्या आपल्या मूळ दृषीकोनातच प्रचंड फरक असल्याने कितीही काथ्या कुटला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तस्मात मी इथेच थांबते. धन्यवाद.)