नथ्थुरामचा उदो उदो
नथ्थुराम गोडसे यांची जयंती आणि पुण्यतिथी आता साजरी करू लागलेत लोक. नथ्थुरामचे मंदिर बांधायचा प्रस्ताव आहेच. सोशल नेटवर्किंगवर नथ्थुरामचे गोडवे गाणा-या कविता, लंबेचौडे लेख लिहून नथ्थुराम कसा महान देश भक्त होता, गांधीजींचा खून करून नथ्थुरामने कसे देशावर उपकार केले आहेत, नथ्थुराम नसता तर अस्से झाले असते वगैरे मुक्ताफळे उधळली जात आहेत. एक दोन पिढ्यापूर्वी मनाची नाही तरी जनाची तरी थोडीफार लाज होती. सध्या ती ही नाही असे दिसते. दिवसेंदिवस वाढणारा कट्टरपणा, तारतम्याचा अभाव, ढोंगी अस्मिता, जातीयवाद असे असतांना, धर्माभिमानी, आडमुठ्या विचारांच्या लोकांसमोर वाद घालणे निरर्थक असले तरी एकंदरीत समाजासमोर सत्य इतिहास आणि संतुलित विचार ठेवणे गरजेचे आहे.
१. संघवाले गांधीजींच्या खुन्याचे जाहीर समर्थन करत नाहीत. काही मोजके लोक आणि फाळणी निर्वासित सध्या नथ्थुरामचा जयघोष करतायत. स्वातंत्रवीर सावरकर स्वतः गांधीजींच्या खुनाच्या खटल्यात आरोपी होते. त्यांनी कधीही कुठेही गांधीजींच्या हत्येचे जाहीर समर्थन केलेले नाही. नथ्थुरामने हत्येचा स्पष्ट कबुली जबाब दिला आहे, सावरकरांनी नाही. सावरकरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
२. 'नथ्थुराम' गोडसे असे नाव आहे, नथुराम नव्हे. नथ्थुराम चे पाळण्यातील नाव रामचंद्र होते. लक्ष्मी आणि विनायक गोडसे या त्याच्या आई वडिलांचे तीन मुलगे वारले. मुलगे जगत नसल्यामुळे त्यांनी नवस केला आणि त्यानंतर जन्मलेल्या नथ्थुरामला मोठा होई पर्यंत मुलीसारखे वाढवले गेले. म्हणजे अंगात झगा, केसांच्या वेण्या, रिबिनी इत्यादी. मुख्य म्हणजे त्याचे नाक टोचून नाकात नथ घातलेली असे. नथ घातलेला राम म्हणून नथ्थुराम. या प्रकारचा नथ्थुरामच्या मानसिकतेवर फार मोठा आणि खोलवर परिणाम झाला असणे शक्य आहे आणि साहजिकही आहे. नथ्थुराम ने विवाह केला नाही. तत्कालीन पौरुषत्वाच्या कल्पनेतून काहीतरी भव्य करून दाखवण्याची उर्मी त्याच्यात होती. या संबंधी तज्ञांनी संशोधन करणे आणि समाजासमोर मांडणे गरजेचे वाटते.
३. नथ्थुराम आणि टोळीने गांधीजींच्या खुनाचे अनेक प्रयत्न केले. दर वेळेला नथ्थुराम केवळ नियोजन करणार आणि प्रत्यक्ष हल्ला कधी 'मदनलाल पहावा' तर कधी 'शंकर किस्तय्या' करणार असे नियोजन असे. असे काही प्रयत्न फसले. त्यामुळे पैसे आणि साधने पुरवणा-या कटवाल्यांचा दबाव वाढू लागला. त्यानंतरच्या तिरमिरीत आता जे काही करायचे ते मी एकटाच करणार असे ठरवून गांधीजींच्या खुनाचे कृत्य नथ्थुरामने केले.
४. नथ्थुरामला पंडित या पदवीने संबोधन करण्याचीही पध्धत दिसते. त्याला ही पदवी कोणी आणि कधी दिली हा संशोधनाचा विषय आहे. नथ्थुराम शालांत परीक्षाही उत्तीर्ण नव्हता. पुण्यात येउन नंतर तो इंग्रजी शिकला. नथ्थुरामने फार काही पांडित्यपूर्ण साहित्य निर्मिती करून ठेवली आहे असेही नाही. त्याचे कोर्टातील प्रत्यूत्तराचे भाषण हे त्याचे सर्वात जास्त प्रसिद्ध साहित्य आहे. त्या निवेदनात गांधीजी हेच कसे दोषी आहेत आणि त्यांना नैसर्गिक मृत्यू यायच्या आधी गोळीने संपवणे कसे आवश्यक आहे यावरच भर आहे. पांडित्य कुठेही दिसत नाही. असे करण्याचा अधिकार त्याला कोणी दिला? या संबंधी एक शब्दही नाही. पंडित असलेल्या व्यक्तीला वैचारिक विरोधाचा इतर कोणताही मार्ग न वापरता डायरेक्ट गोळी का वापरावी लागली याचा ही विचार करणे गरजेचे आहे.
५. नथ्थुराम जसा होता तसे जगाला. प्रश्न आज नथ्थुरामला डोक्यावर घेऊन नाचणा-यांचा आहे. आपण असे नक्की कशासाठी करतो आहोत याचा कधी शांतपणे विचार केला तर बरे. गांधीजींचा द्वेष आणि नथ्थुरामचा उदो उदो केवळ fashion म्हणून करणे वेगळे. अन्यथा गांधीजींच्या पायाच्या नाखातल्या मातीचीही नथ्थुरामची लायकी नाही.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'