Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नथ्थुरामचा उदो उदो

स
संदीप ताम्हनकर
Fri, 06/05/2015 - 15:31
🗣 32 प्रतिसाद
नथ्थुराम गोडसे यांची जयंती आणि पुण्यतिथी आता साजरी करू लागलेत लोक. नथ्थुरामचे मंदिर बांधायचा प्रस्ताव आहेच. सोशल नेटवर्किंगवर नथ्थुरामचे गोडवे गाणा-या कविता, लंबेचौडे लेख लिहून नथ्थुराम कसा महान देश भक्त होता, गांधीजींचा खून करून नथ्थुरामने कसे देशावर उपकार केले आहेत, नथ्थुराम नसता तर अस्से झाले असते वगैरे मुक्ताफळे उधळली जात आहेत. एक दोन पिढ्यापूर्वी मनाची नाही तरी जनाची तरी थोडीफार लाज होती. सध्या ती ही नाही असे दिसते. दिवसेंदिवस वाढणारा कट्टरपणा, तारतम्याचा अभाव, ढोंगी अस्मिता, जातीयवाद असे असतांना, धर्माभिमानी, आडमुठ्या विचारांच्या लोकांसमोर वाद घालणे निरर्थक असले तरी एकंदरीत समाजासमोर सत्य इतिहास आणि संतुलित विचार ठेवणे गरजेचे आहे. १. संघवाले गांधीजींच्या खुन्याचे जाहीर समर्थन करत नाहीत. काही मोजके लोक आणि फाळणी निर्वासित सध्या नथ्थुरामचा जयघोष करतायत. स्वातंत्रवीर सावरकर स्वतः गांधीजींच्या खुनाच्या खटल्यात आरोपी होते. त्यांनी कधीही कुठेही गांधीजींच्या हत्येचे जाहीर समर्थन केलेले नाही. नथ्थुरामने हत्येचा स्पष्ट कबुली जबाब दिला आहे, सावरकरांनी नाही. सावरकरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. २. 'नथ्थुराम' गोडसे असे नाव आहे, नथुराम नव्हे. नथ्थुराम चे पाळण्यातील नाव रामचंद्र होते. लक्ष्मी आणि विनायक गोडसे या त्याच्या आई वडिलांचे तीन मुलगे वारले. मुलगे जगत नसल्यामुळे त्यांनी नवस केला आणि त्यानंतर जन्मलेल्या नथ्थुरामला मोठा होई पर्यंत मुलीसारखे वाढवले गेले. म्हणजे अंगात झगा, केसांच्या वेण्या, रिबिनी इत्यादी. मुख्य म्हणजे त्याचे नाक टोचून नाकात नथ घातलेली असे. नथ घातलेला राम म्हणून नथ्थुराम. या प्रकारचा नथ्थुरामच्या मानसिकतेवर फार मोठा आणि खोलवर परिणाम झाला असणे शक्य आहे आणि साहजिकही आहे. नथ्थुराम ने विवाह केला नाही. तत्कालीन पौरुषत्वाच्या कल्पनेतून काहीतरी भव्य करून दाखवण्याची उर्मी त्याच्यात होती. या संबंधी तज्ञांनी संशोधन करणे आणि समाजासमोर मांडणे गरजेचे वाटते. ३. नथ्थुराम आणि टोळीने गांधीजींच्या खुनाचे अनेक प्रयत्न केले. दर वेळेला नथ्थुराम केवळ नियोजन करणार आणि प्रत्यक्ष हल्ला कधी 'मदनलाल पहावा' तर कधी 'शंकर किस्तय्या' करणार असे नियोजन असे. असे काही प्रयत्न फसले. त्यामुळे पैसे आणि साधने पुरवणा-या कटवाल्यांचा दबाव वाढू लागला. त्यानंतरच्या तिरमिरीत आता जे काही करायचे ते मी एकटाच करणार असे ठरवून गांधीजींच्या खुनाचे कृत्य नथ्थुरामने केले. ४. नथ्थुरामला पंडित या पदवीने संबोधन करण्याचीही पध्धत दिसते. त्याला ही पदवी कोणी आणि कधी दिली हा संशोधनाचा विषय आहे. नथ्थुराम शालांत परीक्षाही उत्तीर्ण नव्हता. पुण्यात येउन नंतर तो इंग्रजी शिकला. नथ्थुरामने फार काही पांडित्यपूर्ण साहित्य निर्मिती करून ठेवली आहे असेही नाही. त्याचे कोर्टातील प्रत्यूत्तराचे भाषण हे त्याचे सर्वात जास्त प्रसिद्ध साहित्य आहे. त्या निवेदनात गांधीजी हेच कसे दोषी आहेत आणि त्यांना नैसर्गिक मृत्यू यायच्या आधी गोळीने संपवणे कसे आवश्यक आहे यावरच भर आहे. पांडित्य कुठेही दिसत नाही. असे करण्याचा अधिकार त्याला कोणी दिला? या संबंधी एक शब्दही नाही. पंडित असलेल्या व्यक्तीला वैचारिक विरोधाचा इतर कोणताही मार्ग न वापरता डायरेक्ट गोळी का वापरावी लागली याचा ही विचार करणे गरजेचे आहे. ५. नथ्थुराम जसा होता तसे जगाला. प्रश्न आज नथ्थुरामला डोक्यावर घेऊन नाचणा-यांचा आहे. आपण असे नक्की कशासाठी करतो आहोत याचा कधी शांतपणे विचार केला तर बरे. गांधीजींचा द्वेष आणि नथ्थुरामचा उदो उदो केवळ fashion म्हणून करणे वेगळे. अन्यथा गांधीजींच्या पायाच्या नाखातल्या मातीचीही नथ्थुरामची लायकी नाही.
वर्गीकरण
इतिहास

प्रतिक्रिया द्या
10713 वाचन

💬 प्रतिसाद (32)
आ
आदिजोशी Fri, 06/05/2015 - 15:34 नवीन
:) :) :)
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 06/05/2015 - 15:39 नवीन
नथुरामाने गांधींना मारून चूक केली. त्यामुळे काँग्रेस प्रवृत्तीवरचा विश्वास उडायला ६० वर्षे अधिक लागली. परत भारतीय राजकारणाची दिशा कायम बहुसंख्यांकांचे दमन म्हणजेच न्याय अशी राहीली. त्यापेक्षा गांधी अजून काही वर्ष जगले असते तर लोकांना त्यांच्या तत्वज्ञानाचे फोलपण लवकर कळून त्यांचे स्थान लोकांच्या मनातून लवकर उतरण्यास मदत झाली असती. तशीही गांधी जावे आणि पटेलांऐवजी नेहरू यावेत अशी ब्रिटीशांची देखील इच्छा होतीच.
ज
जिन्क्स Fri, 06/05/2015 - 16:13 नवीन
आजकाल "गांधीजींचा द्वेष आणि नथ्थुरामचा उदो उदो केवळ fashion" असं करण्यात सगळ्यात आघाडीवर काही कलाकार आहेत. त्यातलेच एक आपले शरद पोंक्शे. एक नाटक जरा काय चालालं, ह्या माणसाने त्यातली भुमिका जरा जास्तच सिरियस्ली घेतली. जिथे जाइल तिथे गांधीजींच्या द्वेशाचे गरळ ओकत असतो.
स
सुबोध खरे Fri, 06/05/2015 - 16:21 नवीन
द्वेष करण्याच्या नादात नथुराम वर बरेच संशोधन केले आहे कि. बढीया है!
अ
अत्रन्गि पाउस Fri, 06/05/2015 - 17:32 नवीन
का कायसेसे म्हणतात म्हणे याला ... रावणाला पण मुक्ती मिळाली म्हणे कारण द्वेषा पोटी का होईना सतत रामाचे चिंतन ....
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आशु जोग Fri, 06/05/2015 - 18:03 नवीन
अमुक तमुक जातीचे लोक नथूचा उदो उदो आणि गांधींचा द्वेष करतात असे काही आहे का...
प
प्यारे१ Fri, 06/05/2015 - 19:36 नवीन
एका ब्रिगेडी पुस्तकात विषाचा अणू म्हणजे विष्णु वाचल्यावर पुस्तक ठेवून दिलं होतं. त्या पुस्तकाच्या लेखकानाही मागे टाकणारे लिखाण मिपावर आलेले दिसते आहे. पु (विनोदी) ले शु
र
रमेश आठवले Sat, 06/06/2015 - 00:06 नवीन
---त्यानंतरच्या तिरमिरीत आता जे काही करायचे ते मी एकटाच करणार असे ठरवून गांधीजींच्या खुनाचे कृत्य नथ्थुरामने केले.---- हे खरे नाही. गांधी खुनाच्या खटल्यात एकूण बारा आरोपी होते . त्यापैकी सावरकर यांची निर्दोष ठरवून मुक्तता करण्यात आले. उरलेल्या ११ पैकी पैकी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशीची शिक्षा झाली. बडगे हा माफीचा साक्षीदार झाला, परचुरे यांची शिक्षे नंतर चाललेल्या कारवाईत निर्दोष म्हणून सुटका झाली . बाकीच्या सात जणाना जन्मठेप झाली. न्यायमूर्ती आत्मचरण यांनी आपल्या निकालात असे म्हटल्याचे वाचनात आले आहे. Godse was the arm and Apte was the brain behind the assassination. Therefore, Apte is also to be hanged till death.
H
hitesh Sat, 06/06/2015 - 19:16 नवीन
माननीय मोदीनी बांगला देशला नुकतीचजमीन दिली व दोनशे की किती कोटी रु दिले. नेहरुनी चीनला जमीन गिळु दिली व गांधीजीनी पाकला ५५ कोटी दिले म्हणुन बोंबलणारे कुठे गेले ? कुठे नेऊन ठेवलाय नत्थुराम माझा ???
H
Hrushikesh Marathe Sun, 06/07/2015 - 05:45 नवीन
२०० कोटी वाटले नाहीत हो..दोन अब्ज डॉलरचे कर्ज... गांधी आणि मोदी गुजरातेतले असले तरी कॉंग्रेस्सी विचरसरणीचे नाहीत..
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sun, 06/07/2015 - 07:20 नवीन
ते पंचावन्न कोटी आजवर पाकिस्तानला दिलेलेच नाहीत. नथुराम्वाले खोटेच बोंबलत फिरत असतात... पैसे दिले म्हणुन. खरं बोलायला शिका जरा.
↩ प्रतिसाद: Hrushikesh Marathe
ज
जयंत कुलकर्णी Sun, 06/07/2015 - 13:34 नवीन
मला वाटते ७५ पैकी २० कोटी दिले व उरलेल्या ५५ देण्याआधी काश्मिरचा प्रश्न सोडवा असे पाकिस्तानला सांगण्यात आले....
↩ प्रतिसाद: hitesh
च
चिनार Mon, 06/08/2015 - 06:24 नवीन
हितेश च बरोबर आहे ! राहुल गांधीला पंतप्रधान करा ... करा करा प्लीज ..राहुल गांधीला पंतप्रधान करा .. पण एक गोष्ट कळली नाही..या धाग्यात मोदी उगवले मधूनच ?
↩ प्रतिसाद: hitesh
म
मृत्युन्जय Mon, 06/08/2015 - 09:07 नवीन
१. बांगला देशाला जमीन देण्यावर आजवरच्या सर्व सरकारचे एकमत होते. सर्व कायदेशीर बाबी पुर्ण होण्यात वेळ गेला. मोदींच्या कार्यकाळात याची अंमलबजावणी झाली २. दोनशे कोटी दिलेले नसून. दोनशे कोटींचे "लाइन ऑफ क्रेडिड" दिले आहे. आपल्याला फरक माहिती असण्याची शक्यता नाही तरी बघा जमले तर. समजा दोनशे कोटी दिले जरी असले तरी जी राजकारणाची गरज असते ती पुर्ण करावीच लागते. ३. गांधीजींनी पाकला ५५ कोटी देणे ही सुद्धा त्या काळची गरजच होती. ५५ कोटींबद्दल वाद घालणारे आणि २०० कोटींवरुन टीका करणारे यात अर्थाअर्थी फार फरक नाही. असलाच तर एवढाच की सूडाच्या त्या नाट्ञात ५५ कोटी दिले नसते तरी राजकीयदृष्ट्या ते अजिबात अयोग्य नव्हते, ४. नेहरुंनी चीनला केवळ जमीन बळकावुच दिली नाही तर वरती" जाउ देत नाहितरी त्या जमिनीवर काही उगवत नव्हते" असे निर्लज्ज विधान देखील केले. चीनचे युद्ध हे भारताच्या गचाळ आणि बिनडोक परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा परिपाक होता. जगातले यच्च्यावत सगळे तज्ञ युद्धातल्या दारुण पराभवासाठी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांना जबाबदार धरतात हे कदाचित ग्रेटथुंकरांना माहिती नसावे. असो. असोच. .
↩ प्रतिसाद: hitesh
र
रमेश आठवले Mon, 06/08/2015 - 15:29 नवीन
ब्रिटीश जनरल हेंडरसन ब्रुक्स यांना भारत सरकारने आपल्या चीनशी झालेल्या युद्धातील पराजयाचे मूल्यमापन करायला सांगितले होते. त्यांनी दिलेला अहवाल आज पर्यन्तच्या सर्व रंगाच्या सरकारांनी गुपित ठेवला आहे. हा नामुष्की लपविण्याचा प्रकार आहे असे वाटते.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
निनाद मुक्काम … Sat, 06/06/2015 - 23:18 नवीन
गांधी जगायला हवे होते त्यांनी त्यांच्या सावलीत वाढलेल्या इंदू कडून लोकशाहीचा गळा घोटलेला पाहिला असता १९६२ ला अहिसंक तत्वांचा झालेला पराभव देखील पाहिला असता मग बेजिंग पर्यंत पदयात्रा निघाली असती . महापुरुषांचा पराभव त्याचे अनुयायी करतात पण हा पराभव त्या महापुरुषाच्या हयातीत झाला तर ...... असो
R
rjun Sun, 06/07/2015 - 05:38 नवीन
स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य नागरिक आम्ही ...........उदो उदो करण्याचा आम्हाला अधीकार आंबेडकरानी दिला आहे . तुम्ही त्यानच्याशी वाद घाला ----------------------------------------------- u r not always right but right is always right . u no right ? i m right..... - rjun
अ
अवतार Sun, 06/07/2015 - 07:35 नवीन
अफझलखान आणि औरंगझेब यांचा उदो उदो करायचा अधिकार देखील या स्वतंत्र भारतातील स्वतंत्र नागरिकांना आंबेडकरांच्या घटनेनेच दिलेला आहे. या गोष्टींवर आक्षेप घेणाऱ्यांनीही आंबेडकर यांच्याशीच वाद घालावा.
अ
अवतार Sun, 06/07/2015 - 11:21 नवीन
जर काही विशिष्ट व्यक्तींसाठीच राखीव असावेत असे वाटत असेल तर तसे जाहीर करावे. त्याचबरोबर आणखी एका फाळणीसाठी तयार राहावे.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
क
काळा पहाड Sun, 06/07/2015 - 11:25 नवीन
बद्दल तसं समजायचं तर तसंच समजा. बाकी फाळणी वगैरे विसरा. का गुजरात विसरला?
↩ प्रतिसाद: अवतार
अ
अवतार Sun, 06/07/2015 - 11:36 नवीन
१९४७ पर्यंत आणि १९८४ पासून २००२ पर्यंत ज्यांनी केले आणि ज्यांनी भोगले त्यांच्या काहीही विस्मरणात गेलेले नाही. म्हणूनच फाळणीचा मुद्दा विसरता येत नाही.
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ज
जयंत कुलकर्णी Mon, 06/08/2015 - 06:48 नवीन
अवतार साहेब, कशी फाळणी अभिप्रेत आहे तुम्हाला तेही सांगा जरा..........म्हणजे कुठकुठले प्रांत नवीन देशात घालायचे आहेत तुम्हाला तेही एकदा कळू द्या ना आम्हा पामरांना.... आणि महंमद बीन कासिम पासून १९४७ पर्यंत म्हणायचे आहे का तुम्हाला ? का त्याही अगोदरपासून ते सांगितलेत तर बरे होईल.
↩ प्रतिसाद: अवतार
क
काळा पहाड Mon, 06/08/2015 - 09:41 नवीन
ठेवलीय फाळणी. सरदार पटेलांचा एक ड्वायलॉग जो निजामाच्या दूताला - कासीम रिझवी (जो एम.आय.एम चा तेव्हाचा प्रमुख होता) - सांगितला होता तो सांगतो: "उस समय, आपको क्या लगता है, हम क्या कर रहे होंगे"? तेव्हा आता फाळणी वगैरे करण्याचे दिवस गेले. अभी तो चार साल है. अभी तो पिक्चर बाकी है मेरे दोस्त.
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 06/07/2015 - 12:08 नवीन
अन्यथा गांधीजींच्या पायाच्या नाखातल्या मातीचीही नथ्थुरामची लायकी नाही.
लेखातल्या ह्या वाक्याशी अगदी सहमत. बावनकशी सोन्याची तुलना मातीशी म्हणजे अगदीचं मुर्खपणा नै का?
स
संदीप डांगे Sun, 06/07/2015 - 12:37 नवीन
च्यामारी, दोघा इसमांना मरुन कित्येक दशक झालेत. तरी हे दोन्हीकडचे लोक इतकं कशासाठी फुदकतात देवजाणे?
च
चिनार Mon, 06/08/2015 - 06:27 नवीन
स्वातंत्रवीर सावरकर स्वतः गांधीजींच्या खुनाच्या खटल्यात आरोपी होते. त्यांनी कधीही कुठेही गांधीजींच्या हत्येचे जाहीर समर्थन केलेले नाही. नथ्थुरामने हत्येचा स्पष्ट कबुली जबाब दिला आहे, सावरकरांनी नाही. सावरकरांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
मग ही गोष्ट कोन्ग्रेस ने मान्य का केली नाही ? आणी हे जर कोन्ग्रेस ला मान्य होते तर स्वातंत्रवीर सावरकरांवर इतके वर्ष अत्याचार का करण्यात आले ?
म
मदनबाण Mon, 06/08/2015 - 07:18 नवीन
वेदीवर या राही मी स्थिर जाता जाता :--- आत्मबल अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। बॅ.वीर सावरकर

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'
व
विनोद१८ Mon, 06/08/2015 - 08:11 नवीन
माझे व इतरांचे योग्य ते विधायक प्रतिसाद का उडविले ????
म
मृत्युन्जय Mon, 06/08/2015 - 09:08 नवीन
मस्त धागा. पुढील गरळीसाठी शुभेच्छा.
म
मुक्त विहारि Mon, 06/08/2015 - 12:45 नवीन
+१
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विजुभाऊ Mon, 06/08/2015 - 14:07 नवीन
नथुराम हा भेक्कड इसम होता. एखाद्या म्हातार्‍याला त्याच्या पाया पडण्याचे नाटक करुन ठार मारणे यात कसला आला शूरवीर पणा. असो. जेथे अक्कल बंद पडते तेथे गोळ्यानी बोलले जाते.
ब
बॅटमॅन Mon, 06/08/2015 - 14:18 नवीन
अगदी असेच.
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा