Welcome to misalpav.com
लेखक: मनो | प्रसिद्ध:
ही वेळ कुणाच्याही आयुष्यात येऊ नये. त्याचं वय फक्त ८ वर्षाचं. मनसोक्त खेळायचं हुंदडायचं ते वय . पण आज तो एका गाडीत मागल्या सीटवर कसाबसा श्वास घेत आपल्या मृत्युशी झगडत होता. गाडी रोजच्या रात्रीच्या मालवाहक trucks च्या रांगेत अडकली होती आणि त्याचा बाप त्या चक्रव्यूहातून दवाखान्याचा रस्ता शोधत होता. त्याचा बाप हा एक अमेरिकन पत्रकार, new york times सारख्या प्रतिष्ठीत वृत्तसंस्थेचा भारतीय उपखंडातला वार्ताहर. बायको, ब्राम आणि एडन ही दोन मुले असे चौकोनी कुटुंब. दिल्लीत काम करायची संधी चालून आली तेंव्हा त्याने ती उत्साहाने आणि पूर्ण तयारीनिशी पत्करली. दिल्ली म्हणजे असह्य उन्हाळा, डेंगूच्या साथी, पाठ न सोडणारे भिकारी अशी काहीशी अडचणींची यादी त्याच्या मनात होती, पण ते शहर त्याच्या मुलांसाठी किती धोकादायक आहे याची सुतराम कल्पना त्याला नव्हती. दिल्लीत मृत्यू हा चोरपावलांनी हवा, पाणी, अन्न आणि माश्यांच्या रूपाने येतो. दरवर्षी लाखो लोक त्यामुळे मरण पावतात अथवा आयुष्यभर त्याचे परिणाम भोगतात. ब्रामच्या वडिलांसाठी मग हा एक अभ्यासाचा विषयच बनून गेला. मग त्यातून हे कळले की लहान वयात प्रदूषणात राहिल्याचे परिणाम किती घातक आणि अपरिवर्तनीय असू शकतात. आणी मग सुरु झाली स्वतः बरोबरचीच एक झुंज, एक खंत की स्वतःच्या प्रगतीसाठी मी माझ्या मुलांच्या निरोगी बालपणाची किंमत दिली. हे सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे. http://www.nytimes.com/2015/05/31/opinion/sunday/holding-your-breath-in-india.html हे वाचून मला माझ्या देशाची लाज वाटली. कदाचित एका उपऱ्या आणि शब्दसामर्थ्य लाभलेल्या पत्रकाराने खोडसाळपणे लिहिलेला लेख म्हणून हे विसरता येईल. पण एका ८ वर्षांच्या चिमुरड्याला आणि त्याच्यासारख्या हजारोंना आपण त्यांचे बालपण परत देऊ शकू का ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

ही घटना आणि हा लेख या सर्वांपलिकडे जाऊन भारताच्या तथाकथित विकासाचा एकूणच आढावा घेतला पाहिजे. पाश्चिमात्य देशांची प्रगती आणि तिथला पैसा एवढेच आपल्याला दिसते. पण तिथे नियम-कायदे पाळण्याला दिले जाणारे महत्त्व, पर्यावरणाबाबतची सजगता, स्वच्छता, नागरिकांच्या सुरक्षिततेला व आरोग्याला दिले जाणारे प्राधान्य ह्या गोष्टी मात्र आपण सोयिस्कररित्या विसरतो. आपल्याला सर्व स्वस्त पाहिजे असते. पण त्याच्यापायी पर्यावरणाच्या नाशाकडे इथे दुर्लक्ष केले जाते. दिल्लीतल्या पंधरा वर्षांपूर्वीच्या गाड्या वापरातून बाद करण्याचा आदेश देऊनही तिथे काय परिस्थिती आहे हे दिसतेच आहे. फार कशाला, पुण्यातही प्रदूषणाची पातळी ओलांडली गेली तरी आपण काय करतो आहे हे विचार करण्यासारखे आहे.

हेच म्हणतो...आपल्याकडे सगळे नियम खुंटीला टांगलेले असतात...पण चूक नक्की कोणाची...नियम न पाळणाऱ्या लोकांची कि शिक्षा न करणाऱ्या अधिकाऱ्यांची??

दोघांचीही आहे. आपल्याकडे नियम व कायदे मुद्दाम तोडण्याला प्रतिष्ठा आहे. ही प्रवृत्ती ठेचायची तर एकीकडे कडक कायदे + कठोर अंमलबजावणी आणि दुसरीकडे नियम पाळण्याला इन्सेन्टिव्ह + जनजागृती हे दुहेरी उपाय करावे लागतील.