Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कैकेयीला का शिक्षा नाही?

श
शेखर काळे
Sat, 06/13/2015 - 23:51
🗣 20 प्रतिसाद
बर्‍याच दिवसांनी स्व. सुधीर फडके यांनी गायलेले गीतरामायणातील 'माता न तू वैरिणी' हे गीत ऐकण्याचा योग आला. त्यांनी या गाण्यात आपल्या स्वरांतून भरताच्या मनातील भाव इतक्या परिणामकारकरीत्या प्रकट केले आहेत, की श्रोत्याच्या मनात तो प्रसंग मूर्तीमंत उभा राहतो. माझ्या मनात असा प्रश्न आला आहे की कैकेयीला दशरथाच्या मृत्यूचे कारण होणे आणि रामाला वनात जाण्यास भाग पाडणे या कृत्यांबद्दल काहीच शिक्षा मिळालेली नाही. रामायण-कालात बर्‍याच गुन्ह्यांना तात्काळ शिक्षा मिळायची - ऊदा. श्रावणाच्या आईवडिलांनी दशरथाला शाप देणे, रामाने शंबुकाचा वध करणे, गौतमाचा अहिल्येला शाप, आणि सर्वप्रसिद्ध रामाने सीतेचा त्याग. पण मग तोच नियम कैकेयीला लागू झालेला दिसत नाही. असे का? यात काही राजकारण असावे असे मला वाटते. जाणकार व अभ्यासू यावर प्रकाश टाकतील आणि आपले अभ्यासपूर्ण मत देतील अशी अपेक्षा आहे. रामायणात लिहिलेले आहे की कैकेयीचा विवाह अशा अटीवर झाला होता की तिच्या मुलाला राजपद मिळावे; कारण दशरथ राजाला त्याच्या इतर राण्यांकडून संतती प्राप्त होत नव्हती. पण तशी ती दशरथाला कैकेयीकडून देखील प्राप्त झाली नाही - तेव्हा हे अटीचे कलम रद्द होत नाही काय? बरं, बर्‍याच अभ्यासकांनी, आणि रामायणातही, म्हटलेले आहे की तशी कैकेयी वाईट स्त्री नव्हती. पण मला असे वाटते की हे स्पष्टीकरण ओढून ताणून आणलेले आहे. कैकेयी जरूर एक महत्वाकांक्षी स्त्री होती. तिला स्पष्ट दिसत होते की तिच्या मुलाला राज्य मिळणे शक्य नाही; कारण परिस्थितीच अशी आली की दशरथाच्या सगळ्या राण्यांना जवळ जवळ एकाच वेळी मुले झाली (अवांतर: हे खरे आहे का? सगळी मुले काही दिवसांच्या अंतरांनी जन्मली की काही वर्षांनी?) आणि तिचा मुलगा सगळ्यात वडील नव्हता. यामागे गांधार राज्याचे काही राजकारण होते का? जेव्हा कैकेयीने आपली मागणी दशरथाच्या पुढे मांडली (रामाला वनवासात पाठवणे वगैरे) तेव्हा तो नाही म्हणू शकला नाही. कैकेयी (व तिच्यामागून गांधार) दशरथावर इतका दबाव टाकू शकले की त्याला नाही म्हणता आले नाही व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला (आणखी एक उदाहरण स्व. लालबहादूर शास्त्री दबावामुळे व कदाचित ताश्कंद करारावर मनाविरुद्ध सही करावी लागली). पुढे रामायणात कैकेयीचा काहीच फारसा भाग नाही - इतकी महत्वाकांक्षी स्त्री एकदम मागे पडलेली दाखवलेली आहे. किंवा असेही झाले असावे की शिक्षा तर झालेली आहे परंतु रामायणाकाराला ते दाखवायचे नाही - त्यामुळे कैकेयीला मागे सारण्यात आले व तिचा उल्लेख केवळ इतरांबरोबर होऊ लागला. या विषयावर काही प्रकाश टाकावा ही विनंती आहे.

प्रतिक्रिया द्या
6499 वाचन

💬 प्रतिसाद (20)
व
विकास Sun, 06/14/2015 - 03:08 नवीन
कैकयी गांधार देशाची कन्या होती? नीट आठवत नसल्याने विकीसंदर्भ पाहीला तर त्याप्रमाणे ती सध्याच्या युक्रेनची होती! पण दुसरीकडे (विकीवरच) असे देखील म्हणले आहे की ती सध्याच्या पाकीस्तानातील पंजाबमधल्या भागातील आहे... भरताने नंतरच्या काळात गांधार जिंकला आणि तक्षशीला स्थापली...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 06/14/2015 - 05:55 नवीन
विकिपीडियातल्या संदर्भ विश्वसनीय नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
शेखर काळे Sun, 06/14/2015 - 09:55 नवीन
गांधार देशाची नव्हती. मी चुकीचे लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
क
कंजूस Sun, 06/14/2015 - 03:10 नवीन
या नाट्यात बरेच अनुत्तरित प्रश्न आहेत आणि पुराणातल्या बय्राच अशा गोष्टींचे समर्थन-पुर्वकर्मामुळे असं घडणारच होतं अमुक अमुक त्याला निमित्त होईल.शिवाय राजा हा सर्वात मिंधा असणारा आणि मित्र नसणारा शापित(वगैर) प्राणी असतो.त्याला वरवर सर्व अधिकार आहेत असा भास होत असला तरी एक राण्यांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या हातातले एक बाहुले असतो.एखाद्या व्यक्तिने अनुचित वर्तन केले की लगेचच काही अप्रिय घटना घडली की शिक्षा (वरून) झाली असं म्हणण्याचा प्रघात होता.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/14/2015 - 05:11 नवीन
कैकैयी ही गांधार देशीची नव्हती. ती केकय देशाशी राजकुमारी असून केकय हा प्रांत सध्याच्या काश्मिराच्या जवळपास कुठेतरी होता. बियासच्या वरच्या भागात. बाकी रामायण हे काल्पनिक असून तत्कालीन समाजात आदर्श पुरुष कसा असावा हे समाजाला समजावून सांगण्यासाठी रामायण महाकाव्य रचले गेले असे माझे मत. त्यामुळे सर्व पात्रांचे महत्व जेव्हढ्यास तेव्हढेच आहे. कैकेयीची शिक्षा म्हणजेच तिला दशरथाच्या मृत्युकरवी आलेले वैधव्य आणि स्वपुत्र भरताकडून दुरुत्तरे ऐकण्यास मिळणे. त्यानंतर भरत जेव्हा रामाला भेटण्यासाठी जेव्हा चित्रकूटावर गेला तेव्हा कौसल्या, सुमित्रेबरोबर कैकेयीही त्याजबरोबर होती असे उल्लेख आहेत.
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Sun, 06/14/2015 - 09:53 नवीन
केकय देशीची होती. तिला मिळालेले वैधव्य हे तिचे एकटीचेच नव्हते. आणि दुरूत्तरे ऐकायला मिळणे ही काही शिक्षा नाही. तुमच्या शेवटच्या वाक्यात माझे म्हणणे अधिक स्पष्ट झाले आहे - ते म्हणजे राम वनात गेल्यानंतर कैकेयीचे महत्व कमी झाले आहे - किंबहुना तिचा रामयणात पुढे काही फारसा ऊल्ले़खच नाही. बाकी रामायण काल्पनिक आहे की नाही यावर भाष्य करण्याइतका माझा या विषयाचा एवढा अभ्यास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मुक्त विहारि Sun, 06/14/2015 - 05:30 नवीन
कैकेयी आणि मंथरा, ह्यांना एकच शिक्षा दिल्या गेली. मुलींचे नामकरण करतांना ही २ नावे वगळतात.
  • Log in or register to post comments
श
शेखर काळे Sun, 06/14/2015 - 09:57 नवीन
यात कैकेयीला शिक्षा ती काय ? मी मेल्यावर इतरांनी त्यांच्या मुलांचे नाव 'शेखर' ठेवले किंवा न ठेवले .. मला काय त्याचे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बोका-ए-आझम Sun, 06/14/2015 - 07:51 नवीन
बा.भ.बोरकर आपल्याला कवी म्हणून जरी माहीत असले तरी त्यांनी गद्यही लिहिलेलं आहे. त्यांची कादंबरी ' प्रियकामा ' ही कैकेयीवर आहे. प्रियकामा हे तिचं मूळ नाव. कैकेय हे तिच्या देशाचं नाव. कादंबरीत तिला अत्यंत सकारात्मक दृष्टीने दाखवलेली आहे. असंही प्रतिपादन आहे की कैकेयीमुळेच राम वनवासात जाऊन पुढे रावणाचा वध झाला. म्हणजे तिने एकप्रकारे चांगलंच केलं.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 06/14/2015 - 08:11 नवीन
ते बा.भं.चे लेखनस्वातंत्र्य आहे. पण मूळ वाल्मिकीरामायण असं काहीच सांगत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनिता ठाकूर Sun, 06/14/2015 - 08:07 नवीन
एका युद्धात कैकयीने राजा दशरथाला मदत केल्यामुळे राजा तिला दोन वर माग असे सांगतो. त्या वेळी कैकयी ते वर राखून ठेवते व योग्यवेळी माझ्या इच्छा सांगीन असे म्हणते. ती हे विसरूनहि जाते. रामाला राज्याभिषेक करायची वेळ येते तेव्हा कैकयीहि आनंदात असते. पण तिची दासी मंथरा तिला ह्या दोन वरांची आठवण करून देते. मंथरा सुचविते की एका वराने रामाला वनवासात पाठव आणि दुसर्‍या वराने भरताला राज्याभिषेक करून घे.आपल्या मुलाला राज्य मिळावे ह्या लालसेपायी कैकयी ही इच्छा दशरथाला सांगते. आपण दिलेले वर पूर्ण करणे हे राजाचे कर्तव्य असल्यामुळे राजाला तिची इच्छा पुरी करावी लागते. त्यामुळे कैकयीला शिक्षा करण्याचा प्रश्णच उद्भवत नाही. माझ्या लहानपणी मी ऐकलेल्या गोष्टीनुसार मी हे लिहिले आहे. इथले जाणकार योग्य ती माहिती देतीलच.
  • Log in or register to post comments
च
चिगो Sun, 06/14/2015 - 10:09 नवीन
मी जे वाचलंय ते असं.. राजा दशरथाला श्रावणाच्या मात्यापित्यांनी शाप दिला होता की तू पुत्रवियोगाने मरशील. आता पुत्रवियोग म्हणजे एक तर तो दूर जाणार किंवा त्याचा मृत्यु. तसेच 'रघुकूल रित सदा चली आई, प्राण जाई पण बचन न जाई" हेपण आहेच.. कैकयीला राजा दशरथाने 'तुझा मुलगाच राजा बनेल' असे वचन दिले होते.. म्हणूनच कैकयीला पॉजिटीव्हली दाखवणारी बाजु म्हणून तीने तिला मिळालेल्या वर/वचनाचा फायदा घेऊन रामाचा जीव (ज्यायोगे त्याचा वियोगाने विकल होऊन दशरथाला म्रूत्यु आला, मृत्युने विकल होऊन नाही) आणि रघुकूलाची इभ्रत दोन्ही वाचवले, असं दहा-बारा वर्षांपुर्वी वाचल्याचं आठवतंय. संदर्भ आठवत नाहीय. हे जर खरं असेल (कथनात) तर त्यासाठी तिला सन्मानच मिळायला हेवा, शिक्षा नाही..
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Sun, 06/14/2015 - 11:39 नवीन
पण शिक्षा होण्यासाठी कैकयीने असा कोणता गुन्हा केला होता? तिने दशरथाकडे ज्या दोन मागण्या केल्या त्या तिच्या स्वतःच्या मुलाला राज्यप्राप्ती व्हावी म्हणून! त्या योग्य का अयोग्य हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून. पण तो गुन्हा असू शकत नाही! शेवटी एखाद्यासाठी खूप चांगली वाटणारी कुठलीही गोष्ट दुसर्यासाठी खूप वाईट असू शकते!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sun, 06/14/2015 - 11:52 नवीन
कथेच्या बांधणीच्या स्वरुपात काही धागे नंतर शेवट परिणामकारक करण्यासाठी प्रारंभास नुसतेच सोडून दिलेले असतात. रामायण काल्पनिक रचलेली कथा आहे हे त्याच्या मांडणीवरून लक्षात येते. दशरथाचा पुत्रवियोगाचा शाप, रावणाचा परस्त्री-स्पर्शाचा शाप, लक्ष्मणरेषा, मारिचवध, जटायु-रावण युद्ध, शुर्पणखाप्रकरण वैगेरे जोडकथा याचा पुरावा म्हणून बघू शकतो. कैकेयीचे पात्र हे काल्पनिक कथेच्या स्वरूपात पाहिले तर पुढले नाट्य अधिक खुलवण्यासाठी तीच्या वर मागण्याचे नियोजन कळून येते, पण रामायण-महाभारत ह्या हॅरी पॉटर-लॉर्ड ऑफ द रिंग सारख्या काल्पनिक कथा नसून प्रत्यक्ष इतिहासाचे दस्तावेजीकरण आहे असे मानणार्‍यांशी चर्चा करणे कठीण जाते. माझ्या मते हे या कथाकारांचे सार्‍या लेखकजगाने हेवा करावे असे यश आहे.
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 06/14/2015 - 13:31 नवीन
फरपटत गेलेल्या हतबल पुरुषांचा इतिहास म्हणजे हिंदु धर्म
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 06/14/2015 - 18:13 नवीन
वाह! छान शोध लावलात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
श
शब्दबम्बाळ Sun, 06/14/2015 - 18:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
स
संदीप डांगे Sun, 06/14/2015 - 18:15 नवीन
काही खास व्यक्तिगत अनुभव...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
न
नगरीनिरंजन Sun, 06/14/2015 - 17:15 नवीन
आपल्या अपत्यांचे हित पाहणे हा मातेचा धर्म आहे आणि कैकेयी धर्माप्रमाणेच वागली. निव्वळ मोठा भाऊ म्हणून रामाला गादी मिळावी या आर्बिट्ररी नियमाला तिने आव्हान दिले यासाठी उलट तिचे कौतुक व्हायला हवे. कैकेयी स्वतः कर्तृत्ववान होती आणि चौदा वर्षं अयोध्येचे राज्य उत्तम सांभाळून भरतानेही कर्तृत्व सिद्ध केलेच वर राम परतल्यावर गादी सोपवून स्वतःच्या निरीच्छपणाचीही प्रचिती दिली. आता भरत पुरुषोत्तम की राम असा प्रश्न पडला की नाही?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sun, 06/14/2015 - 20:11 नवीन
ऐतिहासिक व्यक्तींना देव बनविने व त्यांच्या यशापयशाला दैवी मानणे ही आपल्या समाजाची खूप मोठी चूक आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा