‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो
दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’. त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले.....
काहीतरी भव्य दिव्य केले तर नामरूपी कीर्ति युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजी पर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यांमुळे त्यांची नामरूपी कीर्ति अजूनही जिवंत आहे. आता निम्नवर्गीय परिवारात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किले सरकारी कारकून झालेल्या माझ्या सारख्याला आयुष्यात आपण काही भव्य-दिव्य करू असे कधीच वाटले नाही. बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी समाजसेवा करण्याची इच्छाशक्ती ही नव्हती. सारांश काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते.
समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामा बरोबर रावण ही अमर झाला आणि गांधी सोबत गोडसे ही. तुकाराम महाराजांनी म्हंटले आहेच पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आता माझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी ही करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडूच मध्यम वर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. ह्या मार्गावर जाणे ही शक्य नव्हते.
आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर, इत्यादींचे नावे ही काही काळापर्यंत लोकांच्या लक्ष्यात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच निघून गेली होती. आता संसारात राहत असताना थोडेफार समाज कार्य केले किंवा त्याचा दिखावा केला तर कमीत-कमी जिवंत असताना तरी आपले नाव काही लोकांच्या लक्ष्यात राहते. पण इथे ही लोचा झाला. एक तर सरकारी नौकरी आणि ती ही स्टेनोग्राफर,पीए आणि पीएस. येस येस करण्यात ३३ वर्षे निघून गेली. त्यात ही १८ वर्षे पंतप्रधान कार्यालयात. सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९-११च्या दरम्यान घरी पोहचणे. गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाज कार्य तर सोडा घरची सर्वकामे सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्य परिस्थिती अशी आहे गली-मोहल्यात ही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.
आता एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे लेखकू बनणे. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावे लागत नाही, मेहनत आणि अभ्यास ही करावा लागत नाही. फक्त मनातील कल्पना कागदावर उतरव्याच्या असतात. वयाच्या पंचविसित लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता, काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठविल्या होत्या. पण कोणीही तय छापल्या नहीं किंवा परत ही पाठविल्या नाही. फक्त पोष्ट्खात्याची शंभर एक रुपयांची कमाई झाली. अखेर थकून-भागून कवी/ लेखक बनण्याचा नाद सोडून दिल्या. आपले काही नाव होऊ शकत नाही, हे सत्य स्वीकार केले.
पण म्हणतातन एक मार्ग बंद झाला कि दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षे निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावला. कदाचित् माझ्या सारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा. या वेळेपर्यंत माझ्या मनात आपण मराठी आहोत, याचा स्वाभिमान ही जागृत झाला होता.इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट मराठी सृष्टी ही होती. या साईटमध्ये चक्क 'आपल्यातला सुप्त लेखक जागवा’ असे आव्हान होते. आंधळा एक डोळा मागतो इथेतर दोन दोन डोळे ते ही मुफ्त में. प्रथम विश्वास झाला नाही, भीत-भीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला. आश्चर्य म्हणजे पहिला टाकलेला लेख दुसर्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय, मनातील दडलेली अमर होण्याची/ प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली. स्वत:चा ब्लॉग ही स्वतच्या नावानेच बनविला. जे जे मनात आले आणि टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची, कसला ही विचार कारण्याची आवश्यकता भासली नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती चूक दुरुस्त करतातच. चिंता करण्याची गरजच भासली नाही. काही महिन्यातच मराठीच्या इतर उदा. मिसळपाव, ऐसीअक्षरे, आणि नुकतीच ग्लोबल मराठी बाबत कळले. अश्यारितीने मी ही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो.
आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/ कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे. पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवर ही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिले तरी निदान ५००-१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईटस् वर वाचतीलच. (मराठी लिहिलेली अधिकांश छापील पुस्तके ३०० लोक ही वाचत नाही). एक मात्र खंर, निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपले नाव लक्ष्यात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी अंतर्जालीय लेखकांची दखल घेईल अशी आशा आहे.
💬 प्रतिसाद
(14)
उ
उगा काहितरीच
Mon, 07/27/2015 - 17:50
नवीन
लिहीत रहा , आमच्यासारख्यांना थोडे अनुभव वाटत रहा .
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/27/2015 - 18:01
नवीन
छान आहे!!! प्रामाणिकपणे गोष्टी लिहील्या आहेत. असो. लिखते रहो!!!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Mon, 07/27/2015 - 18:24
नवीन
प्रांजळ आत्मनिवेदन आवडले. लिहीते राहून कीर्तीरूपे काहीकाळ तरी रहाता येईलच.
तरी एक आपुलकीचा सल्ला देतो. पंचावन्न-साठानंतर दृष्टी जास्त झपाट्याने खालावते. मला नेत्रविशारदाने कॉम्प्युटरादिचा उपयोग अगदी कमी करायला सांगितल्याने नाईलाजाने मिपावर लिहिणे, वाचणे, प्रतिसाद देणे अगदी कमी करावे लागले आहे. (डोळ्यांची शक्ती होता होईल तो चित्रकलेसाठी जपायची आहे). तेंव्हा जरा जपून.
- Log in or register to post comments
ज
जडभरत
Mon, 07/27/2015 - 18:40
नवीन
मला नेत्रविशारदाने कॉम्प्युटरादिचा उपयोग अगदी कमी करायला सांगितल्याने नाईलाजाने मिपावर लिहिणे, वाचणे, प्रतिसाद देणे अगदी कमी करावे लागले आहे.
आपल्यासारख्या धमाल व्यक्तिचा मिपावर कमी वावर ही गोष्ट जरा खराब वाटते.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Tue, 07/28/2015 - 17:00
नवीन
सुचणे बाबत धन्यवाद. पण कार्यालयात आजकाल सर्व कामे संगणकावारच होतात. त्या मुले नाईलाज आहे.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 07/28/2015 - 17:19
नवीन
तेच म्हणतो. तुम्ही कार्यालयाच्या कामानंतर घरी येऊन पुन्हा जर रात्री वगैरे लेखन करत असाल, तर डोळ्यांवर फार ताण पडेल. कार्यालयातच लेखन करत असाल, तर ठीक.
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 07/28/2015 - 17:23
नवीन
पटाईतराव, तुमचा पुढील लेखः
"मिपाने निकम्मा कर दिया साहिब, वर्ना हम भी आदमी थे काम के".
(प्रेरणा: गालिबचा सुप्रसिद्ध शेर)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 07/27/2015 - 18:26
नवीन
लिहित रहा. वाचत राहूच.
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 07/28/2015 - 05:00
नवीन
प्रांजळ मनोगत आवडलं.
तुमच्या सारख्या राजहंसानेच असा विचार केला तर माझ्यासारख्या कावळ्याने काय करावे?
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 07/28/2015 - 07:15
नवीन
शेजारच्या फांदीवरील का वळा !!!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Tue, 07/28/2015 - 08:52
नवीन
कावळ्याच्या चोचीतीले गांडूळ.
पैजारबुवा
- Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी
Tue, 07/28/2015 - 14:00
नवीन
पैजारबुवा - खरं तर तुम्हीही राजहंसच आहात पण अन्योक्तीमधल्या एका पायावर ध्यान करण्याचे नाटक करणार्या बकाप्रमाणे ;-) .
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 07/28/2015 - 07:26
नवीन
?
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 07/28/2015 - 17:16
नवीन
लिहीत रहा! तुमचं लिखाण खूप आवडतं.
- Log in or register to post comments