किकलीच्या मध्ययुगीन परिसरात
बरेच दिवस चंदन वंदनच्या पायथ्याशी असलेल्या किकलीचे मध्ययुगीन मंदिर बघायला जायचे होते. तो योग अखेर आला आणि ८ ऑगस्टच्या शनिवारी मी, बुवा, गणेशा आणि किसनदेव असे पुण्याहून एकत्र निघालो.
पुणे सातारा रस्त्यावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर आधी वाईचा सुरुर फाटा येतो. त्यानंतर लगेच ४/५ किलोमीटर अंतरावर हमरस्त्यावरच भुईंज गाव लागते. तिथून डावीकडे वळल्यावर पाचेक किमी अंतरावर किकली गाव. गावाच्या सुरुवातीलाच किसनवीर साखर कारखाना आहे. तर किकलीच्या गावच्या मागेच चंदन वंदन हे दोन्न बलदंड जोडकिल्ले उभे आहेत. ह्या चंदन वंदन शिवाय ह्या परिसरातील इतर किल्ले म्हणजे केंजळगड, वैराटगड, कल्याणगड, कमळगड, पाण्डवगड, अजिंक्यतारा, रोहिडा ही भोज शिलाहार ह्याची निर्मिती. ह्यांतील उंचीने कदाचित सर्वाधिक चंदन वंदनच असावेत.
चंदन वंदनला जाण्यासाठी किकलीतूनच पुढे ३ किमी असलेल्या बेलमाची गावात जावे लागते. ह्या बेलमाच्या पण दोन. एक खालची बेलमाची तर दुसरी किंचित उंचीवर असलेली वरची बेलमाची. आमचा उद्देश मात्र चंदन वंदन सर करण्याचा नसून किकली गावातले मध्ययुगीन मंदिर पाहण्याचा तसेच तिथले मोठ्या संख्येने असलेले वीरगळ बघण्याचा होता.
किकली गावाच्या अगदी सुरुवातीलाच उजवीकडे श्री भैरवनाथ मंदिराकडे जाणार्या पायर्या व मंदिराच्या नावाची कमान दिसते. १५/२० पायर्या चढूनच आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात येतो. प्रवेशद्वारातून आत येताच मोठे पटांगण आहे व त्यापुढे मुख्य मंदिर आहे.
चंदन- वंदन
मंदिर प्रवेशद्वार
प्रवेशद्वारातून दिसणारे मुख्य मंदिर
प्रवेशद्वारातून आत येताच मधे पटांगण आहे व दोहो बाजूंना ग्रामपंचायतीची शाळा आहे. उजव्या हाताला एक उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष आहेत. ह्या उद्ध्वस्त मंदिराशेजारीच झाडोर्यात गणेशवंदना कोरलेला एक भग्नावस्थेतला स्तंभ आडवा पडलेला आहे.
उद्ध्वस्त मंदिराचे अवशेष
गणेशवंदना कोरलेला भग्नावस्थेतला स्तंभ
मुख्य मंदिराच्या बाहेर २ भव्य दिपमाळा आहेत. मंदिराचा बाह्य भागा साधा आहे तर पूर्वीचे शिखर नष्ट झालेले आहे त्यामुळे मंदिराची मूळची शैली नेमकी कुठली ह्याचा अंदाज बांधता येत नाही पण महाराष्ट्रातील इतर ह्याच काळातील मंदिरांसारखी ह्याची शैली पण भूमिज असावी असा कयास बांधता येतो. आता प्रश्न येतो मंदिराचा कार्यकाळ नेमका कुठला? चंदन वंदन ही शिलाहारांची निर्मिती असल्याने साहजिकच ही शिलाहारांची निर्मिती वाटते पण तसे नसावे. शिलाहारांची इतर मंदिरे जसे कुकडेश्वर, अमृतेश्वर, नागेश्वर ह्यांपेक्षा ह्या मंदिराची शैली भिन्न आहे. तिचे साधर्म्य यादवकाळातील मंदिरांशी जास्त जाणवते. मला स्वतःला हे मंदिर आणि त्यांतील मूर्तींची शैली ही पिंपरी दुमाला, लोणी भापकर आणि पेडगाव येथील मंदिरांच्या शैलीशी जास्त मिळतीजुळती वाटली.
सिंघण यादवाने १३ व्या शतकात खिद्रापूरनजीक भोजराजा शिलाहाराचा पाडाव करुन कोल्हापूर शिलाहारांची राजवट नष्ट केली तत्पुर्वीच सिंघणाच्या आक्रमणात हा भाग यादवांच्या राज्यात सामील झाला व यादव राजवटीतच ह्या मंदिराची उभारणी झाली असावी.
ह्या मंदिराची रचना तशी अनोखी. आधी मुखमंडप. येथे नंदीमंडप हा स्वतंत्र नसून मुखमंडपातच नंदी सामावलेला आहे. त्यानंतर येतो तो सभामंडप आणि समोर मुख्य गर्भगृह आणि डाव्या-उजव्या बाजूला अजून दोन गर्भगृहे. ह्या प्रकारच्या तीन गर्भगृहांच्या रचनेला 'त्रिदल गाभारा' असे म्हणतात. मुखमंडप आणि सभामंडप हा नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे.
मंदिरांच्या बाह्यभिंतींच्या भागात कसलेही कोरीव काम नाही. ते आहे फक्त मुखमंडपाच्या समोरील आणि डाव्या-उजव्या बाजूच्या भिंतींवर. त्यावर काही मैथुन शिल्पे, काही वादक व व्यालांची विविध शिल्पे कोरलेली आहेत.
भैरवनाथ मंदिर, किकली
मुखमंडप
मुखमंडपाच्या समोरील बाजूस विविध प्रकारचे व्याल कोरलेले आहेत. सर्वसाधारणपणे व्याल म्हणजे सिंहाचे वरील दोन्ही पाय उंचावलेले असे स्वरूप. दा़क्षिणात्य मंदिरांवर व्याल मोठ्या संख्येने कोरलेले आढळतात. येथे मात्र व्यालशिल्पांना केवळ सिंहाचेच मुख नसून गज, अश्व, शुक, मेष, गर्दभ अशी विविध मुखे कोरलेली आहेत.
मेषव्याल --------------शुकव्याल -------------- अश्वव्याल --------------वृषभव्याल
-
--
--
गर्दभव्याल --------------------- सिंहव्याल ------------------------ वराहव्याल---------व्याघ्रव्याल
--
--
--
मुखमंडपाच्या भिंतीवरील वादक
मुखमंडपावरील शिल्पे- गरुड, विष्णू, मैथुनशिल्प, ऋषी व त्याखालील व्यालपट्टीका
ह्या शिवाय येथे एक प्रसवेचेही (बाळाला जन्म देत असलेली स्त्री) शिल्प आहे.
प्रसवा
चला तर आता मुखमंडपातून सभामंडपात जाऊयात.
सभामंडपाचे प्रवेशद्वार अतिशय नक्षीदार असून त्याच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल, सेवक, शैवप्रतिहारी वगैरे कोरलेले आहे. प्रतिहारींच्या खालच्या भागात हत्ती व शरभ आदी कोरलेले आहेत. द्वारपट्टिकेवरील गणपती नसून तपस्व्याची मूर्ती कोरलेली आहे. मला सर्वप्रथम ती मूर्ती महावीरांची वाटली. पण ते महावीर नसावेत कारण मंदिर पूर्णपणे शैव आहे.
सभामंडपाचे प्रवेशद्वार
प्रतिहारींच्या हाती नेहमीच एक लांबुळकी पिशवी दिसते ह्याचा अर्थ असा की मंदिराच्या बांधकामासाठी ह्या पिशवीतून ते धन, जल आदी आणत आहेत.
प्रवेशद्वारावरील भैरव द्वारपाल, प्रतिहारी
गज व शरभ
प्रवेशद्वाराच्या उंबर्यावरील नक्षीकाम
सभामंडप अतिशय नक्षीदार स्तंभांवर तोललेला आहे आणि स्तंभांवर मध्यभागी काही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत तर स्तंभाच्या खलाच्या भागात सुरसुंदरी, भैरव आदि शिल्पे कोरलेली आहेत.
आता सभामंडपांतील स्तंभांवरची काही निवडक शिल्पे पाहूयात.
सभामंडपाची रचना
हे आहे तीन धडे व चारच पाय असणारे आभासी शिल्प. अशी शिल्पे पिंपरी दुमाला, भुलेश्वर, पेडगाव अशा मंदिरांतही आहेत.
आभासी शिल्प
याजनंतर येते ते त्रिविक्रमाचे शिल्प. स्तंभाच्या दोन बाजूस दोन प्रसंग कोरलेले आहेत. एका बाजूस वामन अवतार तर त्याच्या शेजारील बाजूस त्रिविक्रम अवतार.
छत्रीधारी वामन बळीराजाच्या दरबारात तीन पावले भूमीचे दान मागायला आलेला दिसतो आहे. ह्याच्या पुढच्या अर्ध्या भागात बळी राजा कमंडलूतून वामनाच्या हातावर पाणी सोडून दान देतो आहे तर शेजारी शुक्राचार्य वामनाचे कपट ओळखून त्याला बळीला अटकाव करत आहे.
ह्याचाच शेजारी स्तंभाचे दुसरे बाजूस त्रिविक्रमाचे शिल्प आहे. दोन पावलांनी आकाश व जमीन वापून विष्णू प्रकट झाला आहे. तिसर्या पावलाने बळीचे मस्तक व्यापून त्याला पाताळात जागा दिलेली आहे तर बळीचे शेजारी गरुड आणि एक विष्णूगण दिसत आहे.
वामनावतार
त्रिविक्रम
रामायणातीलही विविध प्रसंग येथील स्तंभांवर कोरलेले आहेत.
रामहस्ते सुवर्णमृगाचे रूप धारण केलेल्या मायावी मारीच राक्षसाचा वध
राम हनुमानाची भेट
सुग्रीवाकडून रामाच्या शरकौशल्याची तालवृक्षांचा छेद करुन होणारी परिक्षा व शेजारी वाली सुग्रीव युद्ध
रामहस्ते वालीवध
हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस व राक्षसींचे सीतेला रामाचे तुटलेले मायावी मस्तक दाखवून धमकावणे
हा बहुधा कुंभकर्णवध अथवा रावणवध
रामायणाशिवायही इतरही काही प्रसंग येथे कोरलेले आहेत.
हे बहुधा महाभारतातील भीमाचे गजयुद्ध असावे
हा बहुधा शिव असावा कारण शेजारी नंदी आहे. पण सिंहामुळे प्रसंग कोणता आहे ते समजत नाही.
शिवतांडवाचे प्रसंगही स्तंभांवर कोरलेले आहेत.
शिवतांडव १
शिवतांडव २
कलशपूजन करणारे हंस
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे.
पौराणिक शिल्प
स्तंभाच्या खालच्या बाजूसही काही सुरसुंदरी, हरिहर आदींच्या मूर्ती आहेत.
हरिहर
नर्तकी
अभिसारिका आणि तिला त्रास देणारे मर्कट
दर्पणसुंदरी
सभामंडपाच्या छतावरील कोरीव काम व त्यात खुबीने कोरलेले कमळ अतिशय देखणे आहे. आवर्जून बघावे असेच.
छतावरील नक्षीकाम
ह्यानंतर तीन्ही गर्भगृहांच्या प्रवेशद्वारात द्वारपाल, प्रतिहारी यांची शिल्पे कोरलेली आढळतात. गर्भगृहांत शिवलिंगे व भैरवाची मूर्ती आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार
गर्भगृहे
गर्भगृहे
मंदिराचा अंतर्भाग
ह्यानंतर मंदिराच्या बाह्यभागात फेरफटका मारायला निघालो. एकूण साधीच रचना विशेष असे काहीच नाही. एका ठिकाणी अशाच त्रिदल गाभार्याने युक्त असलेल्या मंदिराचा नुसता पायाच आढळतो. इथे मंदिर बांधावयाचे काम राहून गेलेले असावे.
मंदिराचा बाह्यभाग
इतक्यात पाऊस धूम धूम कोसळू लागला आम्ही पुन्हा मंदिराच्या आवारत आलो.
कोसळता पाऊस
दिपमाळा
मंदिरातून बाहेर आलो. आता किकली गावाकडे निघालो. किकली हे वीरांच गाव. पूर्वी कधीतरी कदाचित शिलाहार यादव संघर्षात येथे मोठे धूमशान झालेलं असावं त्याची साक्ष इकडचे शेदीडशे वीरगळ देत आहेत. गावात जिकडे बघावं तिकडे वीरगळाच दिसतात. विहिरीच्या भिंतीला वीरगळ, दुकानाच्या भिंतीपाशी वीरगळ, गटारावर उभे वीरगळ, घरांच्या भिंतीत चिणले गेलेले वीरगळ, गावच्या चावडीवर वीरगळ, पारावर वीरगळ. जिकडे बघावे तिकडे वीरगळच वीरगळ. तेही विविध प्रकारचे. तीन पट असलेले, चार पट असलेले, घोडेस्वारांशी युद्ध, पदातींशी युद्ध, तलवारीने युद्ध, गदायुद्ध. अक्षरश: पारणे फिटते डोळ्यांचे.
काही वीरगळ
खरोखरच वीरांचे गाव, वीरगळांचे गाव, लढावू गाव.
पूर्वजांच्या बलिदानाची ही स्मारके अशी भग्नावस्थेत आणि कशीही पडलेली पाहूनच आम्ही पुढे निघालो.
आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
💬 प्रतिसाद
(117)
द
द-बाहुबली
Tue, 09/01/2015 - 12:36
नवीन
सर्वच फोटो अन माहिती सु रे ख.
- Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर
Tue, 09/01/2015 - 12:44
नवीन
मस्तच!!!. अश्या कोरीव काम असलेल्या ठिकाणांना भेट देतेवेळेस तुमच्या लेखांची आठवण येतेच
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/01/2015 - 12:58
नवीन
कुठे मंदिरं, शिलालेख, दगडं दिसली की या वल्लीची आठवण येतेच येते.
देवा वल्लीचं वेड असंच वाढु दे....!
वल्लीसेठ, लेख भारीच.आवडला.
(वल्लीच्या ऐवजी प्रचेतस कधीच म्हणनार नाही)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 09/02/2015 - 15:36
नवीन
ह्या एका मुद्द्यावर आपलं एकमत झालं हो सर :)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 09/02/2015 - 15:59
नवीन
+१००
वल्ली शेठन कधी प्रत्यक्ष भेटलेलो नाही परंतु वल्ली म्हटल्यावर आपलेपणा वाटतो.
प्रचेतस म्हणजे कोणी तरी विद्वान वयोवृद्ध असा इतिहासाचा संशोधक असल्याचा भास होतो.
आमच्या माहितीत एका ५ वर्षाच्या मुलाचे नाव व्यंकटेश नितीन जोशी( आजोबांचे नाव ठेवले होते) असे होते. त्याच्या शिक्षिकेने त्याला नाव नितीन व्यंकटेश जोशी असे लिही सांगितल्याचा किस्सा आठवतो.
"प्रचेतस" नाव ठेवण्यात त्यांचा काहीतरी नक्की हेतू असणारच
असो. आपले लेख उत्तम असतात. ते एक आपल्या प्राचीन ठेव्याबद्दल दृष्टी देतात. भरभरून लिहित राहा.
नाहीतरी डोळे सर्वानाच असतात पण "दृष्टी" फार कमी लोकांना असते.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 09/02/2015 - 16:17
नवीन
तीच इच्छा आहे पण दु दु मिपाकर्स पूर्ण होउ देत नाहीत =))
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Tue, 09/01/2015 - 12:45
नवीन
सॉल्लीड मस्तच...
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 09/01/2015 - 12:52
नवीन
मस्तच.पुलेप्र.
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 09/01/2015 - 12:53
नवीन
सुंदर लेख व सुंदर छायाचित्रे. तुमच्या लेखांच्या रूपाने एक अनमोल ठेवा संग्राह्य होत आहे.
खालील प्रसंग कुठला ते अजिबातच ध्यानात येत नाही. येथे एका फळावरुन गरुड आणि हनुमानाची ते फळ ओढून घेण्यासाठी जोराची चढाओढ चालू असलेली दिसते. डावीकडे स्वयं विष्णू तर उजवीकडे अश्वमुख असलेला विष्णूभक्त तुंबरु उभा आहे. या प्रसंगाचा फोटो मात्र टाकायचा राहिला असावा असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 13:07
नवीन
लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
योग्य ते छायाचित्र तिथे अपडेट केले आहे.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/01/2015 - 12:53
नवीन
..............
देवळे छानच, पण वीरगळांनी खरेच पारणे फिटले.
बाकी काही निरीक्षणे म्ह. छतावरील कमळाचे डिझाईन होयसळ शैलीशी सिमिलर वाटते. मुखमंडप शैलीही तिकडचीच आहे खास.
इतके वीरगळ तेच्यायला, कोणीतरी ष्टडी केला पायजे यांचा. :(
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 13:10
नवीन
इकडील मंदिरांची शैली मुख्यतः चालुक्य शैलीवरुनच प्रेरित आहेत. छतावरील असे कमळही इकडील बर्याच मंदिरांमध्ये दिसते.
होयसळांनी मात्र नंतर त्यांची खास प्रचंड अलंकृत अशी शैली निर्माण केली. यादवांची मंदिरे मात्र त्यामानाने खूपच कमी अलंकृत आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/01/2015 - 13:20
नवीन
ओह रैट्ट. ते एक कन्फूजन झाले खरेच.
- Log in or register to post comments
च
चिगो
Wed, 09/02/2015 - 09:41
नवीन
इतके वीरगळ, म्हनजे त्या गावी कुठलेतरी मोठे युद्ध झाले असले पाहीजे. शेवटच्या फोटोत तर मार्बलवाल्याच्या दुकानात मार्बल मांडतात, तसे वीरगळ मांडलेले आहेत..
धागा आवडलाच, वल्ली..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 09/01/2015 - 13:00
नवीन
>>>>> आता लक्ष्य होते ते शेरी लिंबच्या बारा मोटेच्या विहिरीचे. त्याविषयी पुन्हा कधीतरी.
नै नै लवकर टाका पुढील भाग.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 09/01/2015 - 13:05
नवीन
वल्ले भौ.. ग्रेट आहात. मी या परिसरात वाढलोय. लहानपणी वैराटगड आणि आसपासचे डोंगर म्हणजे नेहमीची फिरण्याची ठिकाणं. इतरदेखील बरीच पडकी मंदिरे पाहिली आहेत पण या परिसरात विशेषकरुन किकलीला एवढं काही असेल असं कधी वाटलं नव्हतं. भुईंज, वाई आणि एकंदर कृष्णेच्या या परिसरात अजून बरंच काही रोचक असेल असं वाटतं.
(कृष्णेच्या पाण्यावर वाढलेला)
[अवांतर : आमच्या शाळेत किकलीची टिकली लईच फेमस होती. या निमित्ताने जुन्या आठवणी जाग्या झाल्या हो. ;) ]
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 09/01/2015 - 13:45
नवीन
आयला सातारकर?
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 09/01/2015 - 15:04
नवीन
पक्का सातारकर... :)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 09/01/2015 - 13:15
नवीन
पूर्वजांच्या अनमोल कलाकृतीचे तपशील किती बारकाईने टिपलेत !
कोणतेही शिल्प डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिल्यापेक्षा तुमच्या कॅमेर्यातून पहावे !!
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 09/01/2015 - 13:19
नवीन
व्वा, मस्तच. असे काही बघितले की आपण पुण्यापासून फार फार लांब रहात असल्याबद्दल खंत दाटून येते.
- Log in or register to post comments
स
सुधांशुनूलकर
Tue, 09/01/2015 - 13:19
नवीन
फोटो आणि माहिती मस्तच.
एवढ्याचसाठी प्रचेतसबरोबर लेणी आणि पुरातन मंदिरं, शिल्पं बघायला जायचं...
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 09/01/2015 - 13:40
नवीन
मिपाचा मलिक-ए-मंदिर
एवढंच म्हणतो.
( मलिक-ए-मंत्र यांच्याच गावचे ना?)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 09/01/2015 - 13:43
नवीन
झक्कास वर्णन.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 09/01/2015 - 13:51
नवीन
नेहमीप्रमाणे अभ्यासू लेख.
आमच्या गावाशेजारचं गाव पण जाणं नाही झालं कधी.
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 09/01/2015 - 14:04
नवीन
मस्त लिहिलं आहेस वल्ली. ते गर्भगृहातील खांबांचे रंग मूळ स्वरुपातील आहेत की आता कोणी फासलाय रंग?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 14:16
नवीन
बहुतेक खांब मूळ स्वरूपातच आहेत. ज्या खांबांना रंग दिसतोय ते भैरवनाथाची मूर्ती असलेल्या गाभार्यातील आहेत. ती भैरवनाथाची मूर्तीशिवकालीन असावी.
- Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन
Tue, 09/01/2015 - 14:09
नवीन
लेखकाच नाव न वाचाताच पूर्ण लेख वाचून काढला आणि वल्ली शिवाय इतका ताकदीचा लेख कोण लिहु शकतो हे पाहण्यासाठी लेखकाच नाव पाहील "प्रचतेस" ....
वल्लीराव काय झाल नाव बदलल तरी आम्ही वल्लीच बोलणार
- Log in or register to post comments
स
स्वच्छंदी_मनोज
Tue, 09/01/2015 - 14:25
नवीन
वल्लीराव मस्तच लिहीले आहेस..
दिवसांगणीक तुझा मंदीरशिल्पाचा अभ्यास वाढत चालला आहे असे जाणवते (असाच अभ्यास वाढूदे आणी आम्हाला अजून लेखांची मेजवानी मिळूदे. अजून बरीच मंदीरे बाकी आहेत :))
ते विहीरीच्या लेखाचं मनावर घेच लवकर.
- Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर
Tue, 09/01/2015 - 14:28
नवीन
लेख वाचून मी आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र श्री.मा.भावे अशा आम्ही दोघांनी ह्या दोन किल्ल्यांना आणि किकली गावाला सुमारे ४० वर्षांपूर्वी भेट दिली होती त्याची आठवण झाली. तेव्हा माझ्याकडे एक साधा बॉक्स कॅमेराच होता आणि ते फोटो कोठे आणि केव्हा गळबटले हेहि आता आठवत नाही.
तुमच्या चित्रातील पुण्याकडून पाहिल्यावर उजवीकडे दिसतो तो चंदन आणि डावा वंदन. दोनांमध्ये तो थोडा उंच आहे. आम्ही प्रथम चंदनवर चढलो पण तेथे काहीच उरले नव्हते. तेथून मधल्या खोलगटीतून वंदनकडे गेलो. तेथे मात्र एका वाड्याचे अवशेष, ब्राह्मण आळी नावाच्या एका भागाचे अवशेष - ही माहिती आम्ही तेव्हा किंवा नंतर कोठूनतरी मिळवली असणार कारण जागेवर दगडमातीच्य ढिगांव्यतिरिक्त असे काहीच निदर्शक उरलेले नाही - आणि एक शिवमंदिराचे स्पष्ट रूप असलेली पण आता मशिदीत बदललेली एक पडकी इमारत दिसली. जवळच एक गुहा होती आणि तुळाजी आंग्रे ह्याला तेथे कैदेत ठेवले होते हे नंतर वाचायला मिळाले. तेव्हा बांधल्या जाणार्या धोम धरणाचा थोडा फुगवटा अणि दक्षिणेस सातारा शहर हेहि वरून दिसत होते.
परतीसाठी वंदनच्या सोंडेवरून किकली गावात उतरलो. भैरवनाथाचे मंदिर पाहिलेच पण तेव्हा त्याचा जीर्णोद्धार झाला नव्हता. (तो अलीकडेच केला गेला अहे अशी माहिती.) खास ध्यानात आलेली गोष्ट म्हणजे गावाच्या चावडीजवळ अस्ताव्यस्त विखुरलेले १००-१५० वीरगळ. काही चावडीच्या चौथर्याला टेकवून उभे केले होते पण अन्य बरेच इकडे तिकडे अस्ताव्यस्त विखुरलेले होते. जवळच्या घरांच्या भिंतींमधूनहि काहींचा तयार घडीव दगड म्हणून मुक्तहस्ते वापर केला गेला होता. हा देखावा पाहून हळहळत आम्ही गाव सोडले.
(असे वीरगळ दुर्लक्षित पडलेले बर्याच जागी पाहिलेले आहेत. फार दूर कशाला, पुणे-पौड रस्त्यावर जेथे घाटी सुरू होते तेथे पिरंगुट (का भुगाव?) येथे एक देऊळ आहे. त्या देवळाच्या परिसरात असेच डझन-दोन डझन वीरगळ पडलेले आढळतील. काही वीरगळ घरांच्या भिंतीमध्येहि बसवलेले आहेत. 'वीरगळ' हा शब्द कन्नड असून कै.ग.ह.खरे ह्यांनी तो मराठीत रूढ केला असे कोणी बोलल्याचे आठवते. हा शब्द मोल्सवर्थमध्ये नाही.)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 15:15
नवीन
धन्यवाद काका तुमच्या माहितीबद्दल.
वीरगळ हा शब्द कन्नड नसून तो वीरकल्लू ह्या कन्नड शब्दाचा अपभ्रंश आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा.
पिरंगुट/भूगाव इथल्या वीरगळांबद्दल कधी ऐकले नाही पण हिंजवडीनजिकच्या माण गावात डझनावारी वीरगळ आहेत. अगदी पुण्यातही शनिवारवाड्यानजीकच्या कुंभारवाड्याजवळ असलेल्या एका मंदिराच्या दारात दोन पुरुषभर उंचीचे वीरगळ आहेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 09/01/2015 - 15:47
नवीन
हे कुठले मंदिर?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 16:47
नवीन
मंदिराचं नाव नेमकं आठवत नाही. बहुतेक मांगिरबाबा मंदिर आहे. अर्थात मंदिर लै अलीकडचं आहे.
- Log in or register to post comments
द
दिपस्तंभ
Fri, 09/07/2018 - 22:19
नवीन
महादेव मंदिरात
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 09/01/2015 - 14:59
नवीन
इतक्या सुरेख मंदिरांची माहिती/ फोटो पाहून नेहमी वाटतं की या अशा वास्तूंची, मंदिरांची देखभाल, संवर्धन, भग्न अवशेष रिस्टोर करण्याचं काम सरकार नीट करते का? पुरेशी आर्थीक मदत पुरवते का?
हे असे स्थळ युरोप मधे असते तर त्याला हेरिटेज साईट घोषित करून त्याला भलीमोठी आर्थीक मदत मिळाली असती आणि हा प्राचीन वारसा नीट सांभाळला असता. आपल्याकडे असे काही प्रयत्न होतात का?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 16:50
नवीन
भारतीय पुरातत्व खात्यांकडून काही महत्वाच्या वास्तूंची उत्तम देखभाल होते. मात्र अशा कमी माहिती असलेल्या ठिकाणांची देखभाल करण्यात पुरातत्व खाते निश्चितपणे कमी पडते. दगडांवरचे मार्किंग्स, फुटकळ कुंपण ह्यापलीकडे त्यांचे काम जात नाही.
मात्र वेरुळ अजिंठासारख्या लेण्यांची खात्याकडून उत्तम प्रकारे देखभाल होते असा अनुभव आहे.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Tue, 09/01/2015 - 17:28
नवीन
पुरातत्व खत्याचं विकेंद्रीकरण तसेच "हौशी संशोधक/अभ्यासक" यांच्या मार्फत जतनासाठीची व्यवस्था असा काही उपाय असू शकेल काय ?
(आधीच असल्यास कल्पना नाही म्हणून विचारतोय.)
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 09/01/2015 - 15:46
नवीन
अप्रतिम. हा वल्ली यांचा आयडि आहे का ?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 16:51
नवीन
होय. :)
- Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर
Tue, 09/01/2015 - 16:13
नवीन
ह्या माहितीपूर्ण लेखातील एक तपशील दुरुस्त करू इच्छितो.
लेखामध्ये सातार्याच्या किल्ल्याला 'अजिंक्यतारा' असे संबोधले आहे. सध्या हेच नाव सर्वांच्या तोंडी असते असे जाणवते. मी सातार्यात आपले लहानपण घालवले आहे आणि आम्ही ह्या किल्ल्यास त्याच्या मूळच्या 'अजमतारा' ह्या नावानेच ओळखत होतो. त्याचे 'अजिंक्यतारा' असे नामान्तर मूळ नाव माहीत नसल्याने आणि 'अजिंक्य' असा किल्ला म्हणून 'अजिंक्यतारा' असा गैरसमज सहजगत्या निर्माण होऊ शकत असल्याने झाला आहे.
औरंगझेब आपल्या आयुष्याची शेवटची २५ वर्षे महाराष्ट्रामध्ये इकडच्या 'बंडाळ्या' मोडण्यासाठी जातीने उपस्थित होता हे आपणास माहीतच आहे. त्यामध्ये १६९९ साली त्याचा मुक्काम सातारच्या परिसरात होता. (सातारच्या उत्तर सीमेवर करंजे म्हणून गाव आहे. त्या गावात त्याचा तळ होता अशी माहिती आम्हास आमच्या शिक्षकांनी शाळेत दिली होती.) सातारचा किल्ला जिंकण्यासाठी त्याला वेढा घालण्यात आला पण किल्ल्याने बरेच दिवस झुंज दिली. अखेर बादशहाचा मुलगा आणि घोषित वारस मुहम्मद अझम शाह ह्याच्या मध्यस्थीने किल्लेदार सुभान ह्याने किल्ला खाली करून दिला आणि 'As the fort was captured through the mediation of the Prince, it was named 'Azamtara' पृ.२६३, भाग ४३ 'म’आसिर-ए-आलमगिरी'. ही घटना १८ एप्रिल १७०० ह्या दिवशी घडली.
औरंगझेबाच्या मृत्यूनंतर घोषित वारस मुहम्मद अझम शाह हा अहमदनगरमध्ये तख्तावर बसला पण त्याचा सत्ताकाळ दोनतीन महिनेच टिकला. त्याचा धाकटा भाऊ बहादुरशहा पहिला ह्याने तख्त त्याच्याकडून हिसकावले.
ह्याच मोहिमेमध्ये मुघल फौजेने सातार्याजवळचे वसंतगड आणि परळी (सज्जनगड) हे किल्लेहि घेतले. पैकी परळीच्या किल्ल्यामध्ये मुख्य दाराच्या आतमध्ये एक तत्कालीन संगमरवरी लेख पाहायला मिळतो. लेख (बहुधा) फारसी असावा पण त्याचे मराठी भाषान्तर जवळच लावले आहे. त्यातील एकच वाक्य आठवते 'ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवीत आहे' असे काहीसे तेथे लिहिले आहे. किल्ला आदिलशहाने बांधला होता आणि तो 'नवरस' हा शब्द आपल्या इमारतींच्या नावात वापरत असे म्हणून परळीचे नाव बदलून ते 'नवरसतारा' असे करण्यात अले अशी माहिती म'आसिर-ए-आलमगिरीमध्ये आहे. किल्ल्यातील मंदिर पाडण्यात आले आणि तेथील आदिलशाही मशिदीस रंगरंगोटी करून स्वतः बादशहाने तेथे नमाज पढला हा तपशीलहि उपलब्ध आहे. मशीद अजून उभी असून पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली आहे पण वापर नसल्याने पडझड झालेल्या अवस्थेमध्ये आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 16:39
नवीन
आझमतारा हे नाव मोंगलानी किल्ला घेतल्यावर किल्ल्यास दिले हे माहीत होतेच. पुढे ताराबाईंनी किल्ला जिंकल्यावर ह्याचे नामकरण अजिंक्यतारा असे केले. भोजाच्या राजवटीत ह्या किल्ल्याचे नाव सप्तर्षी होते असे कुठेतरी वाचल्याचे आठवतेय.
- Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर
Tue, 09/01/2015 - 17:57
नवीन
ताराबाईने किल्ल्याचे नाव 'अजिंक्यतारा' केले ह्यास काही आधार आहे काय?
अन्यथा १८८५ मध्ये छापलेल्या ब्रिटिश काळातील Gazetteer of Satara District मध्ये किल्ल्याचे नाव सर्वत्र 'सातार्याचा किल्ला' असेच दिले आहे. 'अझमतारा' हे नाव आणि त्याचा इतिहासहि नोंदवला आहे. (प्रू.५८६ च्या पुढेमागे पहा.)
अन्यहि दोन कारणांसाठी ताराबाईने हा बदल केला असण्याची शक्यता मला दिसत नाही. एकतर 'अस्मितेमधून नावे बदलणे' हा १९४७ नंतरचा विचार आहे. मराठेशाहीच्या काळात 'मुस्लिम आक्रमणाच्या आणि अन्यायाच्या खुणा नामान्तरातून पुसणे' ह्या विचाराचा उगम झाला नव्हता. हिंदु-मुस्लिम तेढहि स्थानिक पातळीवर विशेष नसे. दुसरे म्हणजे ताराबाई सत्तेमध्ये सातार्याला राहिली असली तरी ते फार थोडे दिवस असेल. १७०८ मध्ये शाहू सुटून आल्यावर सातार्याच्या परिसरातच दाखल झाला आणि ताराबाई पन्हाळ्याकडे गेली असा इतिहास आहे. इतक्या थोडया दिवसात आणि अन्य झगडे विसरून किल्ल्याचे नाव बदलणे ह्यावर तिने प्राधान्याने ध्यान दिले असेल हे विश्वसनीय वाटत नाही. तदनंतर तिचा सातार्यात प्रदीर्घ वास झाला पण तो नजरकैदेमध्येच. नाव बदलण्याची कसलीच सत्ता तिच्याकडे तेव्हा नव्हती.
सातार्याचा इतिहास 'असा घडला सातारा' ह्या नावाने सातार्यातील एक जुने शिक्षक कै.गो.रा.माटे ह्यांनी १९७०च्या पुढेमागे लिहिला आहे. त्यातहि किल्ल्याचे नाव 'अजमतारा' असेच मिळते. (नावाचा मूळ अर्थ माहीत नसल्याने आम्ही जुने सातारकर त्याला 'अजिमतारा' अथवा किल्ल्यातील मंगळाईच्या देवळावरून 'मंगळाईचा किल्ला' असेच म्हणत असू.)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 19:43
नवीन
तसा ठोस आधार मजकडे नाही. ताराबाईने किल्ला घेतल्यावर नाव बदलले होते असे कुठेतरी वाचल्याचे नक्कीच आठवतेय. कदाचित आझमताराचा अपभ्रंश नंतर अजिंक्यतारा असा झाला असावा,
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 09/02/2015 - 09:15
नवीन
सारे सातारकर , ठोस आधार नसल्या शिवाय बोलणार्यांचे लोकांचे घर सातार्याचा खुप बाहेरच्या एका गावात बांधत असत ... तेव्हा पासुन त्या गावाला ठोसेघर असे नाव पडल्याचा बखरींमध्ये उल्लेख आहे !
=))
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Wed, 09/02/2015 - 14:07
नवीन
=))
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Tue, 09/01/2015 - 17:28
नवीन
वाईच्या पश्चिमेला भोगाव हे गाव आहे तिथेही एक शिव मंदिर आणि वामन पंडित यांची समाधी आहे
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Tue, 09/01/2015 - 17:34
नवीन
आम्ही बघीतलय पण तुमच्यासारख आम्हाला काय कळत नाय.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 09/01/2015 - 17:51
नवीन
त्याबद्दल पुढच्या भागात येणारच आहे.:)
- Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर
गुरुवार, 09/03/2015 - 17:30
नवीन
ह्या भोगाव - भुगाव ह्या गावी मी २००८-०९ सालच्या माझ्या भारतभेटीमध्ये गेलो होतो. तेथील जवळच्याच पांडववाडी - पांडेवाडी गावात आमच्या विस्तारित कोल्हटकर कुटुंबाची एक शाखा पेशवाईच्या दिवसात भरभराटीला आलेली अशी होती. (नंतरच्या सर्व पिढया नागपुरापासून सांगलीपर्यंत फैलावल्या आहेत.) आता भुगावात फक्त एक कोल्हटकर कुटुंब राहते. ते गाव आणि आसपासचा परिसर पाहण्यासाठी मी त्या कुटुंबप्रमुखांबरोबर आधीपासून संपर्क साधून मी मुद्दाम गेलो होतो. त्यांनी अतिशय आस्थापूर्वक आमचे स्वागत करून आसपासचा सर्व परिसर आम्हाला हिंडून दाखविला. (माझी धाकटी बहीण माझ्याबरोबर होती. ’माहेरवाशीण पहिल्यांदा घरी आली’ असे म्हणून त्यांनी तिला एक साडीचोळी भेट दिली.)
त्या समयी मी भुगावमधील कृष्णेकाठची वामनपंडिताची समाधि पाहिली होती. तिचा आणि तिच्यावरील लेखाचा असे मी तेव्हा काढलेले फोटो. ही समाधि धोम भागातील ’हरि’ नावाच्या वामनाच्या कोणी शिष्याने गुरुस्मरणार्थ उभारली आहे असे वि.ल.भावे म्हणतात. तेव्हा समाधीवरून वामनकवि भुगावचा असे म्हणता येत नाही असे वाटते. समाधीवरील लेखामध्ये ’यथार्थदीपिके’चा उल्लेख आहे असे दिसते.
(वर उल्ल्लेखिलेली कोल्हटकर शाखा म्हणजे रघूजी भोसलेचा दिवाण आणि बंगालच्या स्वारीचा प्रमुख भास्कर राम ह्याची शाखा. बंगालमध्ये ’बार्गीं’च्या बरोबर प्रसिद्ध वा कुप्रसिद्ध असलेला ’भास्करपंडित’ हाच. त्याच्याबद्दल, त्या शाखेबद्दल आणि पांडववाडी परिसरात मी घेतलेल्या अन्य छायाचित्रांबद्दल ह्या धागाकर्त्याचा त्या परिसराबद्दल लेख जेव्हा येईल तेव्हा पूर्णतेच्या हेतूने तेथे लिहीन. सध्या येथे इतकेच म्हणतो की यथार्थदीपिकाकार वामन, वामनपंडित, ’सुश्लोक वामनाचा’ मधला वामन, यमक्या वामन हे एक का अनेक ह्याबद्दल अभ्यासकांमध्ये मतान्तरे आहेत.)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/03/2015 - 17:48
नवीन
धन्यवाद काका.
वामनपंडिताची मूळ समाधी साताऱ्या जवळ कोरेगाव येथे आहे असे वि.ल. भावे म्हणतात. सारस्वताच्या पुरवणीमध्येही तुळपुळे काहीसे असेच म्हणतात.
समाधीकडे येतानाच एक कसलीही कलाकुसर नसलेले एक यादवकालीन मंदिर आहे. स्तंभांवरुन त्याचे प्राचीनत्व सहज लक्षात येते. तेथे जवळच झाडाझाडोऱ्यांत एक वीरगळ आहे. ह्याची छायाचित्रे पुढच्या भागात देईनच.
बाकी ही पांडववाडी/ पांडेवाडी म्हणजे समोरच्याच पांडवगडाच्या पायथ्याचं गाव दिसतंय.
- Log in or register to post comments
अ
अरविंद कोल्हटकर
गुरुवार, 09/03/2015 - 19:11
नवीन
वि.ल.भावे दोन्ही समाध्यांचा उल्लेख करतात आणि असेहि म्हणतात की दोन समाध्या असणे हे वामनहि दोन असण्याचा खात्रीलायक पुरावा मानता येत नाही.
हे तुम्ही उल्लेखिलेले देऊळ समाधीशेजारीच आहे आणि त्याचेहि छायाचित्र माझ्याकडे आहे. आमचे मार्गदर्शक कोल्हटकर ह्यांच्या सांगण्यानुसार देऊळ कोल्हटकर कुटुंब तेथे भरभराटीत होते तेव्हा त्यांनी बांधलेले आहे. (मी पुरावा मागितला नाही आणि त्यांच्याजवळहि आता नसावा.)
पांडववाडी पांडवगडाच्या पायथ्याशी आहे आणि पांडवगडाचा कोल्हटकर कुटुंबाशी 'इनाम/अधिकार' असा काही संबंध असावा. भास्कर राम ह्याचे वडील रामाजीपंत शाहू सुटून महाराष्ट्रात परतला तेव्हापासून त्याच्या बाजूचे होते. त्यातून त्यांना ही इनामे/अधिकार मिळाले असावेत.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »