आपण नक्की कोठे चाललो आहोत?
गेली काही वर्षे पर्यावरण, हवामान, हरित गृह परिणाम, ऋतुमानातील अनियमितता, जल/ वायू/ अन्न प्रदूषण इ. विषयी आपण ऐकत आहोत आणि संपूर्ण जगात एक मोठा वर्ग या विषयी अतिशय गंभीर असून या विषयी सतत जागृती करीत असतो. कारण याचा थेट परिणाम पृथ्वीवरील समस्त जीवमात्रांवर होणार आहे. याला संपूर्णपणे जबाब्रदार मानव जात असून आपल्या येणाऱ्या पिढ्या कदाचित आपल्याला यासाठी कधीच माफ करणार नाहीत.
भारतामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध NGO , विचारवंत, शास्त्रज्ञ या विषयी प्रबोदन करीत आहेत तसेच वेगवेगळे कायदे, नियम, मानके, शिक्षा यांच्या तरतुदी सुधा आहेत. पण एकूणच या विषयाचा जितका व्हावा तितका गंभीर विचार आणि कृती या विषयी भारतात आणि बहुतांश जगात फारशी होताना दिसत नाही.
नाही म्हणायला प्रगत राष्ट्रांमध्ये बहुतांश नागरिक तिथल्या सरकारने, स्थानिक प्रशासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करताना दिसतात याचे कारण त्यांना मिळालेले बाळकडू आणि जागरूक असलेले तिथले प्रशासन.
नोकरी निमित्त या विषयाशी बराच संबंध आला. मध्यपूर्वेत , युरोपात विविध प्रकल्पांवर काम करताना हा विषय प्राधान्याने समोर आला. याविषयावरील तज्ञ मंडळींचे विचार, व्याख्याने ऐकायला मिळाली, या अनुषंगाने बऱ्याच चर्चा हि घडल्या. आजकाल भारतातही काही प्रमाणात या विषयी जागरूकता येताना दिसते आहे. एकूणच हा प्रकार फारच गंभीर आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान एका बाजूने प्रगती करत असतांना त्याचे होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम टाळू शकत नाहीये. पण त्याहूनही भयंकर आणि गंभीर प्रकार हा आहे कि या उत्पादनानामधून आणि संशोधनामधून येवू घातलेले अनेक गंभीर दुष्परिणामांची कल्पनाच सर्वसामान्यांपर्यंत पोचविली जात नाहीये. अर्थात आज एकूणच सगळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि संशोधन हे व्यवसायाभिमुख ( commerce centered) असल्याने मुख्य उत्पादन हे "डंके कि चोट पर" जाहिरातबाजी करून जगभर खपवले जाते ( त्याचे दुष्परिणाम उघड न करता.) आणि प्रत्येक गोष्टीची तांत्रिकता आपल्याला माहिती नसल्याने आपण काही प्रश्नही विचारू शकत नाही. याशिवाय अजून एक मोठी मानसिकता आपल्याकडे दिसून येते ती म्हणजे म्हणजे प्रगत राष्ट्रांकडून जे जे आलं ते म्हणजे अत्यंत शुद्ध, अद्ययावत आणि उच्चतम असणारच. आपले राजकारणी आणि राज्यकर्ते या विषयी कितपत जागरूक आहेत या विषयी शंकाच आहे. तसेच गेल्या काही दशकातील एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधी करार आणि घडामोडी पाहिल्या तर (प्रगत) आंतरराष्ट्रीय समूहाचे प्रचंड दडपण ( त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी) आपल्या सरकारवर आहे आणि ते आपण झुगारून देवू शकत नाहीये हे स्पष्ट दिसते आहे. . असो हा मुद्दा वेगळा आहे.
आधुनिक मानवाने वैज्ञानिक प्रगती करताना अत्यंत गंभीर भविष्याला जन्म दिलेला आहे. आधुनिक यन्त्रिकिकरणचे युग सुमारे ३०० वर्षापूर्वी सुरु झाले असं मानूया. जागतिकीकरणाचे युग कदाचित तेव्हाच सुरु झाले असावे. पण विशेषतः गेल्या ७०- ७५ वर्षात जगभरात विज्ञानाने ज्या वेगाने मुसंडी मारली आहे ती पाहताना समस्त मनुष्य जमात थक्क झाली आणि त्याचे कौतुक करण्यात गुंग झाली, इतकी कि हे होतांना या सर्वाचे दुष्परिणाम आपल्याला दिसलेच नाहीत. (माझ्यासारख्या १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात किंवा ७०च्य सुरवातीला भ्हारतात जन्मलेल्या पिढीने विज्ञानिकारणाचा हा टप्पा खूप जवळून पहिला आहे.) अति महत्वाकांक्षी व्यावसायीकारणाने हे सर्व दुष्परिणाम हेतू पुरस्सरपणे तसेच पुरेशा अभ्यास आभावी दुर्लक्षित केले. आज आपण सर्व ( मानव) या व्यावसायीकरणाचा एक भाग आहोत आणि या मार्गावर इतके पुढे आलो आहोत कि आता परत फिरणे अशक्य आहे. रासायनिक औषधे, जंतुनाशके, कीड आणि कीटक नाशके, रासायनिक खते, प्लास्टिक, संगणक कचरा, स्वयंचलित वाहने, विद्युत निर्मिती, जंगल तोड यातून झालेला हरित गृह परिणाम, रासायनिक कचऱ्याच्या विल्हेवाटिचा प्रश्न या सर्वातून झालेले जल वायू आणि जमिनीचे प्रदूषण, जमिनीचे नपिकेपण, अन्नधान्यात मिसळलेलि रसायने, यासार्वांवर कडी म्हणून जैवतान्त्राज्ञानातून निर्माण झालेले जेनेटिकली मोडीफायीड अन्नधान्य प्रजाती, मांस निर्मिती तसेच दुग्ध निर्मिती साठी निर्माण केलेल्या संकरीत प्रजाती, या सर्वांमुळे आणि यांच्या संक्रमणामुळे आपोआप निर्माण होणार्या किडी, विषाणू, जीवाणू आणि रोग, हवामान बदल हे आपण कसे नियंत्रित करणार आहोत?
आपल्याला जे तंत्रज्ञान दिसते तेच सगळे नाही कारण प्रगत राष्ट्रांमध्ये असणारी महाभयानक सत्तास्पर्धा अजून भयंकर संशोधनाला जन्म देत आहे. अत्यंत वेगाने विकसित होणारे कम्युनिकेशन तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक्स आणि मेकॅनिकल तंत्रज्ञान भयन्कारी आयुधं आणि शस्त्रांना विकसित करत आहे जी अजून जगासमोर आलेलीही नाहीत. क्लोनिंग, सायबोर्ग, स्वतः शिकणारी ( सेल्फ लर्निंग) आणि त्यातून स्वतः एकटेपणाने निर्णय घेवू शकणार्या यंत्रमानवांच्या विकसिकारणात मिळत असलेले यश पाहता काही वर्षात मनुष्य जातीवर The Matrix, Terminator , सारखी परिस्थिती मानव जातीच्या विनाशाचे करण बनेल, का पर्यावरणाचा संपूर्ण ऱ्हास होवून अखिल जीव मात्र संपुष्टात येतील?
मानव जातीचा इतिहास काही लाख वर्षांचा आहे असं गृहीत धरलं तर ज्या विज्ञानाचे गोडवे गात आपण मोठे झालो तेच विज्ञान येत्या काही शे वर्षात संपूर्ण पृथ्वीवरील प्राणीमात्रांचा नायनाट करेल? हे सगळंच आता आपल्या नियंत्रणा बाहेरचं दिसतंय.
तुम्हाला काय वाटते? आज पासून ५०-१०० -२००-३०० वर्षांचा फक्त विचार केला तर मानवी जीवन कसे असेल? पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रांची आणि पर्यावरणाची काय परिस्थिती असेल?
माणूस २००/३०० वर्षात कदाचित अन्य ग्रहावर वस्ती करेलहा असला भारी विचार बरेचदा मलाही पडतो. सोबत तो दिवस बघायला कदाचित आपण जिवंत नसणार याचेही वाईट वाटते. पण मग वाटते किती जण जातील, कितींना परग्रहवारी परवडेल.. उरलेले कित्येक लाचार या पृथ्वी नामक तेव्हाच्या दलदलीत खितपत पडतील.. माझे वारस वंशज माझे नाव घेऊन तिथे जातील की इथेच संपुष्टात येतील..