चौदहवी कि रात
चौदहवी कि रात
१९९२ साल आठ ऑक्टोबर सकाळ
एक तरुण युगुल आदल्या दिवशी (०७ ऑक्टोबर १९९२) लग्न झालेलं. अत्यंत उत्साहात आणी आनंदात मुलुंडहून बसने मरोळपर्यंत आणी त्यापुढे रिक्षाने सांताक्रूझ विमानतळावर सकाळी १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघाले. विमान १२ ला कोईम्बतूर ला पोहोचले. विमानातील एक मध्यमवयीन गृहस्थाने विचारले तुम्ही उटी ला जात आहात? ते हो म्हणाले. असेच एक दुसरे नाव परिणीत जोडपे त्यानाही त्याने विचारले. तो उटीच्या एका हॉटेलचा मालक होता त्याला उटीला जायचे होते. दोन जोडपी आणी तो असे पाच जण माणशी ५० रुपये देऊन मारुती व्हान ने निघाले. २५० रुपये देऊन वेगळी टैक्सी करायला लागली नाही म्हणून आनंदात त्या हॉटेल मालकाने सर्वाना थंड गार नारळ पाणी पाजले. ते दोघे कुणूरला उतरले. तेथे सिम्स पार्क जवळ नौदलाचे एक डनमोअर हाउस म्हणून विश्राम गृह आहे तेथे पोहोचले. तेथे त्यांना तीन बाजूनी काच असलेलं एक दालन (SUITE) राखीव ठेवलेलं होतं. आतापर्यंत आपल्याला लक्षात आला असेलच ते युगुल म्हणजे मी आणी माझी पत्नी. या विश्राम गृहातील पाच दालनात तिन्ही दिवस आम्ही दोघंच होतो. हॉटेलच्या खोल्यांपेक्षा बरीच मोठी अशी खोली, मोठे अटैच्ड बाथरूम आणी कपडे बदलायला वेगळी खोली असे असल्याने त्याला दालन म्हणतो आहे.
२०१५ साल ८ ऑक्टोबर( पूर्ण २३ वर्षांनी) तेच युगुल ( म्हणजे आम्हीच दोघं- युगुल म्हटलं की कसं एकदम तरुण झाल्यासारखा वाटतं ) मुलुंडहून मेरू टैक्सीने त्याच १० च्या मुंबई कोईम्बतूर विमानाने निघालो. कोईम्बतूर हून कुणुरला टैक्सीनेच गेलो( मार्गे ध्यानलिंग). आम्ही कोईम्बतूरवरून प्रथम ध्यानलिंग या जागी गेलो अतिशय स्वच्छ, शांत आणि सुंदर जागा आहे. तेथे फोटो काढायला परवानगी नाही परंतु खालील दुव्यावर सर्व माहिती फोटोसकट उपलब्ध आहे. रस असेल त्यांनी जरूर पहावी आणि भेट द्यावी अशी जागा आहे. http://www.dhyanalinga.org/
त्याच डनमोअर हाउस मध्ये दालन राखीव ठेवले होते. आश्चर्य म्हणजे आतापण अख्ख्या विश्राम गृहात आम्ही दोघेच होतो. तेवीस वर्षांनी त्याच ठिकाणी तेच आम्ही दोघे त्याच दिवशी त्याच दालनात मधुचंद्रासाठी आलो होतो. ( कितव्या ते विचारू नये) २३ वर्षापूर्वी ८ ते ११ ऑक्टोबर त्रयोदशी चतुर्दशी आणि कोजागरी पौर्णिमा असे दिवस होते.तेंव्हा चौदहवी कि रात होती आणी माझी नवपरिणीत बायको, रात्री जवळ जवळ पूर्णत्वाला पोहोचलेला चंद्र हवेत सुखद गारवा, अख्ख्या विश्राम गृहात आणी बाहेरच्या बागेत आम्ही दोघेच.
त्याच आठवणीना परत उजळवण्यासाठी मी त्याच तारखा निवडल्या होत्या. यावेळेस मात्र आम्ही इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे ८-११ ऑक्टोबर २०१५ ला गेलो होतो.
नौदलाच्या विश्रामगृहात परत त्याच खोलीत राहायला मिळावे हा योगायोग. हा योग जुळून यावा हा प्रयत्न वर्षे करीत होतो. पण मुलांच्या परिक्षी मुळे ते जमून येत नव्हते. या वर्षी कसेही जमवायचे हे मी ठरवले होते. याचे खास कारण म्हणजे २३ वर्षापूर्वी बायको २३ वर्षाची होती आता ४६ झाली म्हणजे आता तिच्या आयुष्यातील जास्त काळ आईवडिलांपेक्षा माझ्या बरोबर गेला होता. इतक्या सुंदर सहवासाचा समारंभ साजरा केला पाहिजेच म्हणून या वर्षी जाणे आवश्यक होते. त्यावेळेस असलेला सहायक डेव्हिड दुर्दैवाने ख्रिस्तवासी झाला होता पण तेंव्हाच खानसामा फिलिप मात्र अजून तेथेच होता.
असो. आम्ही विश्रामगृहाच्या बाहेर असलेल्या बागेत, सिम्स पार्क मध्ये आणी उटीच्या बोटानिकल गार्डन मध्ये काढलेल्या फुलांचे फोटो इथे देत आहे.
![]()
तेंव्हा आमच्या मधुचंद्राचा खर्च रुपये ११०००/- झाला होता.यातील विमानाच्या तिकिटांचा खर्च १०,०००/- मला सुटीच्या प्रवासाचा भत्ता(एल टी सी) म्हणून परत मिळाला होता. आताचा खर्च रुपये ३०,०००/- ( विमानाच्या तिकिटाच्या खर्चा सहित) झाला. यात तीन दिवस टैक्सीचा खर्च १००००/- झाला. तेंव्हा दोघे तरुण होतो आणि पगार आजच्या मानाने फारच कमी होता पण तरीही चारच दिवसाच्या सुटीमध्ये कुणुरपर्यंत जाऊन आलो होतो.
तेथील प्रत्येक गोष्टीची आठवण अजूनही मनात ताजी होती आणि आजही त्यातील बऱ्याचशा जागांचे व्यापारीकरण झालेले नाही हे पाहून फार छान वाटले.
दुसर्या दिवशी आम्ही विश्राम गृहाच्या जवळच असलेल्या सिम्स पार्क मध्ये गेलो ३० एकर क्षेत्रफळ असलेले हे उद्यान अतिशय सुंदर आणि कमी गर्दी असलेले छान ठिकाण आहे. जवळ जवळ तिन्ही दिवस आम्ही वेळ मिळेल तसे आत जाऊन शांतपणे बसत होतो.
पहिल्या दिवशी आम्ही कूणूर मध्येच फिरलो.
२३ वर्षापूर्वी उटी मध्ये एका उपाहारगृहात तेंव्हा आम्ही मिनी मील घेतले तेंव्हा १६ रुपये होते ज्यात नारळीभात आणि दही भात होता लोणचे चटणी आणि पापड यासकट.
आजही आम्ही मिनी मिल घेतले त्याचे रुपये ६० फक्त ज्यात चिंच भात, नारळी भात आणि बीसी बेळे भात होता लोणचे चटणी आणि पापड यासकट.
तेंव्हाही मध्येच पाऊस पडे आणि आताही मध्येच पाऊस पडला.आयुष्यात उत्तम गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी खिशात फार पैसे लागत नाहीत.पण आपली पंचेंद्रिये शाबूत असावी लागतात. सुदैवाने मला किंवा माझ्या पत्नीला कोणताही आजार नाही कि कोणतेही पथ्य नाही.
संध्याकाळी कुणुरच्या बाजारात फिरत असताना एका छोट्या टपरीवजा हॉटेलात छान भज्यांचा वास आला. आम्ही आत पहिले तर तेथे एक अण्णा कच्च्या केळ्याची भजी तळत होता. त्याला त्या भजांची मागणी केली आणि मिरचीच्या भजान्बद्दल विनंती केली. त्याचा माणूस बाजारात जाऊन मिरच्या घेऊन आला. मिरच्यांची आणि केळ्याची भजी खाऊन झक्कपैकी दोन कप कडक कॉफी घेतली. साधी सन राईजची कॉफी होती पण ज्या तर्हेने त्याने उंचावरून ओतून फेस आणून दिली त्याने तो फरक पडला. एवढे सर्व होऊन बिल रुपये ३६/- फक्त. त्या कुकला आणि वेटर ला आम्ही १४ रुपये टिप म्हणून दिले त्यावर त्यांनी अतिशय कृतज्ञतेने आम्हाला धन्यवाद दिले. साध्या माणसाना पैश्याची किंमत जास्त असते. ठाण्याला मामलेदार कडे मिसळ खायला गेल्यावर तेथे गल्ल्यावर पैसे भरून दहा रुपये टीप जेंव्हा वेटरला देतो तर त्यांना त्याची खूप जास्त किंमत असते. या विरुद्ध तारांकित हॉटेलात वेटर कमी टीप दिली तर नाराजीने बघतात असे अनुभव आहेत.
दुसर्या दिवशी उटीला गेलो, जाताना वाटेत दोडाबेट्टा हे निलगिरीमधील सर्वोच्च शिखर येथेही गेलो. तेथून बोटानिकल गार्डन येथे गेलो आणि शेवटी तेथील तलावात नौकानयन करून संध्याकाळी परत आलो.
हि ठिकाणे प्रसिद्ध असल्याने याबद्दल जास्त काही लिहिण्यात अर्थ नाही जिज्ञासूनी गुगलून पाहावे.
या लिखाणाचा मूळ मुद्दा असा आहे कि संसारातील जंजाळात कितीही अडकला असाल तरी नवरा बायकोने स्वतःसाठी थोडासा वेळ काढणे फार आवश्यक आहे. प्रत्येक पुरुषात एक प्रियकर असतो आणि त्याने आपल्या प्रेयसीकडे परत "वेगळ्या" नजरेने पाहायला शिकले पाहिजे. तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये एक अवखळ तरुणी असते.लग्नात जामानिमा करणाऱ्या एखाद्या केस पिकलेल्या आजीला आजोबांनी चिडवले असता ती लाजताना पहा मग तुम्हाला लक्षात येईल. त्या तरुणीला परत उजाळा देऊन तर पहा. सोन्यासारखी आपली नाती पॉलिश केल्यावर कशी झळाळून उठतात ते. यासाठी लग्नानंतर प्रत्येक थोड्या फार कालावधी नंतर प्रत्येक युगुलाने स्वतःसाठी थोडासा वेळ काढून ठेवला पाहिजे. आपल्यातील या प्रियकराला किंवा अवखळ प्रेयसीला वर आणले पाहिजे आणी आपल्या फिकट होत चाललेल्या चित्रात नवे रंग भरले पाहिजेत.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राधा ना बोले ना बोले ना बोले रे... :- Azaad