Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उर्वरीत समाजसेवकां विषयी

म
मारवा
Fri, 11/13/2015 - 05:24
🗣 96 प्रतिसाद
समाजसेवकांच्या बाबतीत सरळसरळ दोन प्रकारांमध्ये विभागणी करता येते. एक जेन्युइन चांगले समाजसेवक दुसरे उर्वरीत सर्व समाजसेवक. महाराष्ट्रीयन उदाहरणं घेतली तर या समाजसेवेच्या क्षेत्रात काही अतीशय आदरणीय सकारात्मक कार्य करणारे असे महान समाजसेवक लोकं आहेत. उदा. बंग दाम्पत्य , डॉ. कोल्हे , नाडकर्णी, इ. या सर्व अत्यंत संवेदनशील तळमळीने काम करणार्‍या व्यक्ती आहेत ज्यांचे कार्य खरोखर अजोड आहे.अर्थातच अशी माणसं संख्येने फ़ारच कमी आहेत. आता बाकी लेख इतर उर्वरीत समाजसेवकांच्या संदर्भात आहे त्यामुळे जे वरील प्रमाणे जेन्युइन चांगली लोकं आहेत त्यांचा अर्थातच या लेखात व्यक्त झालेल्या विचारांशी दुरान्वयानेही संबध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आता सर्वसाधारण उर्वरीत जे समाजसेवक दिसतात यापुढे त्यांचा उल्लेख उर्वरीत समाजसेवक (उस) असा संक्षिप्त करतो उस चा वापर यासाठी की त्याने जेन्युइन समाजसेवक हे वेगळे आहेत /असतात याची जाणीव कायम राहावी. कृपया खालील चर्चेत वरच्या चांगल्या प्रकारातल्या जेन्युइन समाजसेवकांना विनाकारण ओढु नये ही नम्र विनंती. तर उस हे एक रोचक प्रकरण आहे. सर्वप्रथम पात्रता य़ा क्षेत्रात काम करणारे अनेक जण पात्रता या निकषावर खरे उतरत नाहीत. म्हणजे सोशल वर्क चे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत प्रशिक्षण आहेत पण ते केलेलेच लोक यात काम करतात अस काही फ़ारस आढळून येत नाही. सर्वसाधारण निरीक्षण असे दाखवते की जे सध्याच्या युगाच्या कठोर स्पर्धेत कुठेतरी मागे पडलेले असतात, त्यांच्या अपुर्ण शिक्षणामुळे, वा त्याच्या अभावामुळे अथवा व्यक्तीगत क्षमता /कॅलीबर नसलेले वा गुणवत्तेच्या अभावाने जे कुठेतरी मुळ प्रवाहातुन बाहेर फ़ेकले गेलेले असतात वा मुळातच कमकुवत असल्याने शिरण्यात असमर्थ असतात अशांचाच सर्वाधिक ओढा समाजसेवेकडे असतो. अशा बहुतांश अपात्रांचा च या क्षेत्रात भरणा दिसुन येतो. यामुळे या क्षेत्रात आढळणारा सर्वात मोठा स्वभावविशेष म्हणजे न्युनगंड व या न्युनगंडातुन येणारा एक विशिष्ट उद्धटपणा जो तुम्हाला अगदी गोलापांगरी बुद्रुक ते दिल्ली मेट्रो पर्यंतच्या उस मध्ये सहसा आढळुन येतो. इथे काम करायला मुळात पात्रता प्रशिक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटतच नाही. माझी तळमळ वा मळमळ हीच माझी पात्रता आहे अशा भ्रमात उस वावरतात. त्यासाठी ज्या समस्येवर आपण काम करतो आहे त्याचा आपला काही अभ्यास आहे की नाही तीच्या सोडवणूकीची पातत्रा आहे की नाही याचा विचारही त्यांना शिवत नाही. यांची बोलण्याची शैली ही कायम शिक्षकासारखी असते. उस कायम तुम्हाला साध्या बोलण्यातुनही काहीना काही शिकवणार सकळ जन शहाणे करुन सोडतोच आता असा एक टीपीकल पवित्रा उस मध्ये असतो. आणि दुसरा म्हणजे इतरांना गिल्टी फ़िल करुन देणं सातत्याने. हा उस यांचा आवडता उपक्रम असतो. तुम्ही दिवाळीचा आनंद घेत आहात फ़टाके फ़ोडत आहात उस तुमचा गळा धरेल तुम्ही कसे आत्ममग्न आहात पाड्यावर दिवाळी नाही यंदा , तुम्हाला काही कस वाटत नाही तुमच्या संवेदना बधिर कशा झालेल्या आहेत इ. इ. ह्रेटॉरीक्स उस कडे ह्रेटॉरीक्स ची कमतरता नसते. ते तुम्हाला तुमच्या कोणत्याही नैसर्गिक आनंदापासुन कृत्यापासुन वंचित करुन तुम्ही कसे चुकीचे संवेदनाशुन्य व पापी आहात व तुमच्यावर कुठल्या तरी पाड्यातल्या आदिवासींची जबाबदारी बांधिलकी इ. कशी आहेच व ती निभवण्यात तुम्ही कसे कमी पडलात इ.इ.पटवुन देण्यात ते तरबेज असतात. उस यांची व्यक्तीगत नैतिकता हा तर अत्यंत कळीचा विषय आहे. अण्णा हजारेंचा राळेगण सिद्धी मध्ये एक अत्यंत संवेदनशील असा उपक्रम होता. त्यांच्या गावात जी व्यक्ती दारु पिते म्हणजेच पाप करते त्या व्यक्तीला अण्णा आणि कार्यकर्ते खांबाला बांधुन फ़टके मारीत असत. यावर पत्रकारांनी छेडल असता गांधीवादी अहिंसावादी अण्णा यांनी उस यांच प्रातिनीधीक ठराव अस उत्तर दिलेल आहे. ते म्हणतात हे मी त्यांच्या च (अल्कोहोलीक्स ) च्या भल्यासाठीच हे करत आहे. त्यांना माहीत नाही की ते काय करत आहेत (जीझस स्टाइल ) म्हणून त्यांना याची जाणीव करुन देण्यासाठीच त्यांच्याच कल्याणासाठी हे आहे. हा युक्तिवाद स्वयमेव अतिशय बोलका आहे. प्रत्येक उस यांचा पवित्रा साधारण थोड्याफ़ार फ़रकाने असाच असतो. ( आठवा नुकतचं चार हजार महावीद्यालयीन युवा शिथीलांग रसिकांसमोर असाच एक काव्यगत न्याय केलेला.. जाहीररीतीने करण्या/बघण्यातला आनंद काही वेगळाच असतो नाही ?) एकदा विदर्भातल्या एका तालुक्याच्या गावातल्या मुलींच्या अनाथश्रमात काही कारणाने गेलो होतो. तिथे त्या मुलींना बघितल्यावर एक विसंगती ठळक लक्षात आली ती म्हणजे हेअरस्टाइल मुली अत्यंत गरीब अगदी एका बाजुच्या गावात आणि हेअरस्टाइल अगदी डोळ्यात खुपावी अशी भिन्न विचीत्र म्हणजे त्यांच्या बाकी अवताराला कुठेच न जुळणारी. थोडी विचारणा केल्यावर उत्तर मिळालं की एक शहरातल्या पार्लरवाल्या बाई त्यांच्या नवशिक्या विद्यार्थ्यांना घेऊन येत असतात व या मुलींची मोफ़त कट करुन देतात, नवशिक्यांचा विचीत्र प्रभाव दर्शनीय होता..मग तुम्ही प्रॉपर न्हावी का बोलवत नाही ? आ? यांना कशाला पाहीजे प्रॉपर न्हावी त्यांना काय हिरोइन बनवायचयं अहो इतकं बिचार्‍या त्या बाई मदत करतात सोशल वर्क म्हणुन हेच कीत्ती कौतुकास्पद. गिनीपिग असतात जी बिचारी लोकं अशा आश्रमांमध्ये जेल मध्ये राहतात ती सर्व एक प्रकारची गिनीपीग म्हणून वागवली जातात. जेल मध्ये प्रत्येक स्पीरीच्युअल क्लब चे सभासद नेहमी जात असतात. त्यांना मंत्रोच्चार पासुन ते ध्यान प्रवचन सर्व अगदी सर्व गोष्टींचा एकतर्फ़ी मारा केला जातो. त्यांना ते मुळात हवं की नको हा प्रश्न तर दुरच. मुळात तुम्ही अध:पतित आहात आम्ही विसाव्या मजल्यावर आहोत आम्ही स्वार्थत्याग करुन पदरमोड करुन तुमचं कल्याण च करत आहोत जे कळण्याची तुमची पात्रताच नाही. आणि हा सर्व ढवळाढवळ करण्याचा नैतिक अधिकार आम्हाला आहेच. त्यात प्रश्नच नाही. मागे एक छोटीशी बातमी होती इंडियन एक्सप्रेस मध्ये एकेठीकाणी एका कैद्याने एका अशाच शिबीराला फ़ार जोरदार विरोध केलेला. मात्र अशा बातम्या व अस काही क्वचितच बाहेर येत असत. पडद्यामागे अजुन काय होत असेल माहीत नाही. मुळात चोर जेल मध्ये येतो मोजके जातिवंत गुन्हेगार सोडुन द्या बाकी सहसा तो एका चुकीच्या सामाजिक व्यवस्थेचा परीणामच असतो ना . जिथे साधनांची कमतरता विषमता अन्याय आहे जगणं वैध मार्गाने मुष्कील झालेलं त्यानेच तर माणुस गुन्हेगारीकडे वळतो त्या मुळ व्यवस्थेच्या विरोधात काहीच मुलगामी बदल न करता ही वरवरची मलमपट्टी जी मुळात त्या विषम व्यवस्थेलाच पुरक असे काम करते.. जेल ही उस यांची एक आवडती प्रयोगशाळाच असते. स्टाइल वर अण्णाहजारेइश उद्दाम "वुइ ओन्ली नो व्हॉट इज बेटर फ़ॉर हीम ". अशा अपात्र उस कडुन जे समाजकार्य होते ते अतिउत्साहात नवशिक्या पोहोणारा कसेही हातपाय मारतो त्यासारखे होते. त्यात संबंधितांचे नुकसानही अनेकदा होत असते.एकदा परुळेकरांच्य्या मुलाखतीत एका चांगल्या समाजसेवकाने उस विषयी एक सांगितलेल आठवतय. ते म्हणाले जिथे पुरासारखी आपत्ती येते तिथे सर्वात महत्वाची प्रथम क्रमांकाची गरज असते प्लास्टीकच्या ताडपत्री ची ( त्यांचा अनुभव /अभ्यास आधारीत मत ) पण उस भलत्याच काहीच्या काही वस्तु आणुन टाकतात. हे अपात्रता, अपुरी समज, अपुरे प्रशिक्षण इ. मुळे होत असत. परत आम्ही मदत करतोय म्हणजे मुळात एका वरच्या पातळीला आपसुकच पोहोचतो असा भाव असतो. उस कमालीचे अहंकारी आणि प्रसिद्धीलोलुप असतात मागे एकदा बाबा आमटे यांच्या संदर्भात एका लहान मुलाचा हात त्यांनी जोपर्यंत फ़ोटो काढला गेला नाही तोपर्यंत घट्ट धरुन ठेवलेला अस एक वाचलेल आठवतय. उस तुमच्या ग्रुप मध्ये बसलेला आहे आणि तुम्ही अगदी कुठलाही अगदी तुम्ही क्रॉकरी या विषयावरही बोलत आहात तरी तो तुम्हाला हळुहळु त्याच्या समाजसेवेच्या विषयाकडे वळवणारचं. तुम्ही कुठुनही चर्चेला सुरुवात केली तरी ते तुम्हाला सोशल वर्कच्या ते करत असलेल्या कार्यापर्यंत आणुन सोडतात. अ‍ॅमवे ,चेन मार्केटींग ,विमाएजंट नंतरची ही अत्यंत बोरींग अशी लोक असतात. त्यांच्यात एक तरल अहंकार असतो. ते कायम विसाव्या मजल्यावरुन खाली तुच्छतेने बघत असल्यासारखी बोलतात. सी सॉ च्या खेळामध्ये आपण वरती असतो दुसरा खाली तेव्हा कसा आनंद होतो तसा समाजसेवक कायम वरचढ वरती असहाय पिडीत कायम खालीच या खेळात अहंकाराची फ़ार मोठी तृप्ती होत असते. या ओढीने अनेक इगोइस्टीक्स याकडे मोठ्या उत्साहात वळतात. लोकांनी उदारतेने दिलेल्या निधी चा गैरवापर करणारे तर समाजसेवेच्या सर्वच पातळीवर काम करणार्‍यात आढळुन येतात.अगदी प्रख्यात नावे, शहरात काम करणार्‍या संस्था त्यातलेही गैरवापर करण्यात मागे नसतात. एक स्वानुभवपण आहे सांगण्यासारखा आमच्या कंपनीने एक सीएसआर च्या संबंधित एक फ़ंड समाजकार्य करणार्‍या संस्थेला द्यायची एक योजना होती. त्याच्या समितीवर माझी नेमणूक इतर काही जणांबरोबर केलेली होती. मी सर्वात अपात्र व्यक्ती कंपनीने बहुधा संख्यापुर्तीसाठी मला निवडलेल होत. तर मी नुसताच बसायचो मला आर्थिक व्यवहारात फ़ारशी गती नाही. आमचे इतर दिग्गज मित्र हाताळायचे आणी मी नुसता एक सोबतीला होतो. एक पर्यावरणसंबंधित उस आमच्याकडे आला. त्याने मला संबोधुन अगोदर त्याची योजना मांडली. तो इतका प्रभावी वक्ता होता मी गुंग होऊन त्याच बोलणं ऐकतच राहीलो.भारावुन गेलो.. त्याच्या प्रत्येक वाक्यावर मी सहमत उत्तेजीत...... मग आमच्या सी.ए. मित्राचा टर्न त्याने अत्यंत कोरडेपणाने उस ला काही कागदपत्रांची विचारणा केली ते त्याच्याकडे नव्हते मग ते घेउन या पुढच्या वेळेस या म्हणुन सी.ए. ने कोरडेपणाने त्याला कटवला. मी चकीत मी त्याला दोस्ताने मे जाब विचारला काय खडुस रे तु किती चांगला माणुस काय सुंदर काम करतोय आपण मदत केली पाहीजे इ.इ. त्यावर तो शांतपणे म्हणाला बघ गंमत आता पुढच्या मीटींग मध्ये. पुन्हा पुढच्यावेळेस तो कागदपत्रांसहीत हजर आणि मग आमच्या व्यावहारीक चतुर मित्राने जी उलटतपासणी सुरु केली तर त्या उस ला एकही उत्तर धड देण मुष्कील. ... आर्थिक व्यवहारात अत्यंत संशयास्पद काही अनियमीतता होत्या. पुढच्या वेळेस कागदपत्रं आणतो म्हणाला अन काहीसा नाराजीनेच तो निघुन गेला . आता काही दिवसांनी परत मीटींग तर उस ने एकदम पवित्रा बदललेला..... यावेळेस त्याने ज्या व्हाइट कॉलर अतिशय सोफ़ेस्टीकेटेड शैलीत जशी धमकी आम्हाला दिली ती म्हणजे एक शैलीचा अभ्यासच होता,,,, जर मला डोनेशन नाही मिळालं तर तुमच्या कंपनीच्या पोल्युशन संबंधित अमुक अमुक अनियमितता मी बाहेर काढेन तुम्हाला महागात पडेल वगैरे... तो अनुभव भारीच होता. तो अनुभव मग दुनियादारी च्या फ़ोल्डर मध्ये सेव्ह करुन ठेवला. मुळात समाजसेवक अस्तित्वात असणं हेच समाजाच्या अधोगतीचं निदर्शक आहे. समाजात काही ना काही न्युन विकृती वाईट आहे ज्याच्या उपायासाठी वा पुर्ति साठी समाजसेवका ची गरज आहे. एक विचार येतो जर समाज खरोखर आदर्श अवस्थेत यदाकदाचित पोहोचलाच तर सर्वात अगोदर बेकारीची कुर्‍हाड कोणावर कोसळेल ? अर्थातच समाजसेवकावर हे कामच एक मुळात अ-सर्जनशील आहे. चांगल्या आदर्श समाजात जिथे सर्व लोक स्वयंपुर्ण स्वतंत्र सक्षम आहेत तिथे तर माणुस काहीतरी चांगल्या क्रीएटीव्ह कामात वेळ व्यतीत करेल. समाजकार्याची प्रेरणाच कशी एका नकारात्मकतेतुन सुरु होते कुठेतरी कोणी आजारी आहे पतित आहे उपाशी आहे पिडीत कुठेतरी काही घाण आहे न्युन आहे चला आता स्वच्छतेस निघु या. तर तुमचे काय मत आहे ? याकडे तुम्ही कसे बघता ?

प्रतिक्रिया द्या
14273 वाचन

💬 प्रतिसाद (96)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/13/2015 - 05:29 नवीन
मुद्द्यामुद्द्याशी सहमत. @संदिप डांगे परवा माझ्याकडुन हे मुद्दे मांडायचे राहुन गेलेले.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/13/2015 - 10:57 नवीन
खरे आहे हे चिमणराव, याबद्दल दुमत नाहीच. काळे-पांढरे सगळीकडेच असते हे मी म्हटलेले तेव्हाच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पैसा Fri, 11/13/2015 - 12:49 नवीन
ते सेवा करण्यासाठी येतात का धंदा हे स्पष्ट झाले की कसले आश्चर्य वाटू नये.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Fri, 11/13/2015 - 23:49 नवीन
'उ' हे अक्षरच परजिवी किटकाचे नामाभिधान आहे हाही कसला योगा योग !, उपटसुंभांकडून समाजसेवेचे नाव घेऊन प्रत्य़क्षात केली जाणारी खंडणीखोरी हा खरेच गंभीर चिंतेचा विषय आहे पण तरीही उर्वरीत हा शब्द 'सबघोडे बारा टक्के' न्यायाने अधिक सरसकटीकरण करत नाही का अशी शंका वाटते. बर्‍याच उस(उपटसुंभ समाजसेवक)साठी समाजसेवेच्या नावाखाली खंडणीखोरी हे उपजिवीकेचे साधन होणे या बद्दल 'पै'तैंशी सहमत असलो तरी व्यावसायीक आणि उद्योजक या अनीष्ठ प्रथेतील व्हिक्टीम आहेत. उद्योग व्यवसाय हे समाजाची गरज असतात आणि उद्योग व्यवसायबद्द्ल अनाठायी नकारात्मकतासुद्धा असू नये असे वाटते. मारवांनी जसे त्यांच्या कंपनीतले उदाहरण दिले, मला स्वतःला कंपनींच्या गेटवरील सुरक्षाव्यवस्थे विषयी काही सॉफ्टवेअर/ इक्वीपमेंट्स मार्केटींग करण्याच्या योगाने मुख्य शहरांपासून दूर खासकरून विकसनशील ग्रामीण भागात गेलेल्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीजच्या एच आर. आणि अ‍ॅडमीन्सना स्वतंत्रपणे भेटण्याचे योग आले आणि त्यातील बहुतांश मंडळींनी खंडणीखोरी करणारे 'उस' हि त्यांची मोठीच समस्या असल्याचे सांगितले, अर्थात ऑफ द रेकॉर्डच कारण त्यांच्यासाठी हा सगळा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो. एकीकडे खंडणीखोरांना समाजसेवेच्या नावाने देणग्या द्याव्या लागतात पण प्रत्यक्षात कसलेच सामाजिक काम उभे रहात नाही. ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेते यांनी आमच्या भागात कंपन्या काढल्या पण आमच्यासाठी काहीच सामाजिक योगदान नाही हि भावनाही टिकून राहते. बेकारी असलेल्या समाजात या भावनांना सहज हवे तेव्हा पेटवता येते. मोठ्या कंपन्यांंची स्थिती त्यांच्या स्टाफला उपलब्ध होणारी सेक्युरीटीची सिच्युएशन बरी असते त्या शिवाय राजकारणातल्या मोठ्या उसांना देण्यासाठी मोठा पैसा आणि नेटवर्क असते. पंचाईत छोट्या आणि मध्यम इंडस्ट्रीजची अधिक असते, शहरातून ग्रामीण भागात ये जा करणार्‍या स्टाफची खंउस(खंडणीखोर उपसुंभ समाजसेवक) पासून सुरक्षेसाठी म्हणून तोंड बंद ठेऊन बुक्क्यांचा मार झेलावा लागतो. कोणत्यातरी सबसिड्यांसाठी आणि कधी आदर्शवादामुळे तर काही खर्च वाचतील म्हणून छोटे छोटे व्यावसायीक ग्रामीण भागात इंटीरीयर्स मध्ये इंडस्ट्री काढतात, भारतात आधीच व्यवसायासाठी भांडवल उच्च व्याजदराने मिळवावे लागते बर्‍याच इंडस्ट्रीचे बर्‍याचदा उत्पादनही चालू झालेले नसते आणि या खंउस मंडळींच्या चकरा चालू होऊन त्यांच्या आर्थीक अडचणीत भर पडते. महाराष्ट्रात संपूर्ण जमीन कधीच इरीगेटेड होऊ शकणार नाही म्हणून ग्रामीण भागात उद्योग व्यवसायाच्या वाढी शिवाय विकासासाठी पर्याय नाही हे माहित असलेले अर्थशास्त्रीय सत्य आहे, हि ग्रामीण भागातील खंउस मंडळी उद्योजकांचे जीवन अशा पद्धतीने हैराण करत असतील तर उद्योजक समुदायाची ग्रामीण भागाकडे जाण्यास अडचणींच्या यादीत हि एक महत्वाची भर पडते. खंउस मंडळींनी घेतलेल्या खंडण्यातून स्वतःचे काही उद्योग उभे करून त्यातून रोजगार निर्मिती होते का तर तेही होत नाही, हे सगळे उस ग्रामीण जनतेतूनच तिथल्याच कुटूंबातून असतात त्यांचे कुटूंबीयच वाल्याकोळ्याच्या कुटूंबा प्रमाणे पापाचे धनी होण्यास नाकारणार नाहीत तो पर्यंत या बाबतीत ग्रामीण भागातील उद्योगांनी बाळसे धरण्यासाठी लागणारे समाज परिवर्तन कसे होईल ? हे सर्व वास्तव एखाद्या ग्रामीण पटकथेसाठी चांगला विषय होऊ शकेल असे किंवा कसे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 11/14/2015 - 00:43 नवीन
मारवाजींचा गिनीपिग वाला मुद्दाही मान्य आहे तोही पुर्ण स्वतंत्र धागालेखाने चर्चा करावी एवढा स्वतंत्र विषय नक्कीच आहे पण तुर्तास त्यास हात लावत नाही. तर उस हे एक रोचक प्रकरण आहे. सर्वप्रथम पात्रता य़ा क्षेत्रात काम करणारे अनेक जण पात्रता या निकषावर खरे उतरत नाहीत. म्हणजे सोशल वर्क चे स्वतंत्र अभ्यासक्रम आहेत प्रशिक्षण आहेत पण ते केलेलेच लोक यात काम करतात अस काही फ़ारस आढळून येत नाही. धागा लेखक मारवाजींच्या मनात तयार झालेली प्रतिमा मी या आधीच्या प्रतिसादात नमुद केल्या प्रमाणे खंउस लोकांमुळे तयार झाली असण्याची शक्यता वाटते. एनजीओतून होणार्‍या अधिकृत भरतीसाठी आलेल्या जाहीरातींना तुम्ही अप्लाय करून पहा अनुभव आणि सोशल वर्क अभ्यासक्रम केलेला असल्या शिवाय तिथे नौकरीच्या संधी सहज उपलब्ध होत नाहीत. तेथेही ओळखीतून होणारी भरती होत असावी. (काही खंउस एनजीओ कोणत्याही बेकारांना देणगी कलेक्शनचा जॉब देतात तो अजून एक वेगळ्या अभ्यासाचा विषय असावा) जसे केवळ बिएड अथवा एमएड केलेली प्रत्येक व्यक्ती दर्जेदार पद्धतीने शिकवेल आणि बिएड अथवा एमएड न केलेली व्यक्ती चांगले शिकवूच शकत नाही; किंवा एमबीए आणि सिए केलेले नसणार्‍या व्यक्ती चांगला उद्योग व्यवसाय उभा करूच शकत नाहीत असे नसावे, उलटपक्षी जगात जेवढे म्हणून एमबीए आणि सिए तयार होतात त्यातील कितीटक्के यशस्वी उद्योग उभे करू शकतात ? किती बॅचलर ऑफ सोशल वर्क अथवा मास्टर ऑफ सोशलवर्कची उदाहरणे उत्कृष्ट समाज सेवक म्हणून समोर ठेवता येतात (एनजीओतील डिग्रीहोल्डरकृत भ्रष्टाचार हाही वेगळा विषय आहे), शेवटी हे मनापासून करणार्‍याचे काम आहे येथे मनस्वीच पाहीजे ! संत गाडगेबाबा सारख्या व्यक्तींना अमूक तमूकच डिग्री आहे का हा प्रश्न विचारणे कितपत सयूक्तीक ठरावे ? अर्थात ज्यांना प्रशिक्षण नाही त्यांना प्रशिक्षण देण्याचे मी समर्थन करतो पण समाजसेवेच्या एंट्रीसाठी तशी अट लावणे (एनजीओंनी लावलेलीच आहे) सयूक्तीक ठरते का ? आणखी एक शंका म्हणजे, तुमची माझी प्रत्येकाची इच्छा या क्षेत्रात दिसणारी प्रत्येक व्यक्ती आदर्श संतच असावी अशी असते का ? अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे तिही तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत, त्यांनी एखादे छायाचित्र काढून मागितले तर हा अगदीच न पुरवता येण्यासारखा समाजाला न परवडणारा हट्ट नसावा. आपण नेताजी सुभाषचंद्र बोस असोत अथवा बाळासाहेब असोत यांच्यावर अहिंसावादाची अपेक्षा थोपतो का ? केवळ आपल्या अपेक्षांनी प्रत्येकाला महात्मा गांधी बनवू शकतो का ? समाजसेवेत आदर्शवादाची अपेक्षा असतेच तरीही महात्मा गांधीच्या लेव्हलची टोकाचा आदर्शवाद किती लोक आचरणात आणू शकतात गांधीजींची लेव्हल मिळवण्याची किती जणांची पात्रता असते ? एखादा पक्षी हंस नाही बगळा आहे म्हणून बगळ्याचे अस्तीत्व नाकारण्यातही हशील आहे का अशी जराशी साशंकता वाटते. आदर्शतर दूरच दुर्दैवाने समाजात काही घटकांना अगदी उत्पात मुल्यही असते (ते तसे नसावे पण असते हे वास्तव असते), समाजाचा रोजचा गाडा धकवण्यासाठी यासर्व तडजोडी समाज कुठेतरी स्विकारतही असतो हि सर्व बर्‍याचदा किमानस्वरुपाच्या शांततेसाठी किमानस्वरुपाची सामाजीक राजकीय आणि आर्थीक कॉस्ट असते. समाजाला या सर्व गोष्टीत परीवर्तन होईल हा आशावाद बाळगत रोज दररोजच्या तडजोडीकरत जगावेही लागते. असो सर्व आ़क्षेप समजून घेऊनही; बाळाला धूतलेले पाणी फेकताना बाळ फेकले जाणे उचित ठरणार नाही असे वाटते चर्चा करताना मारवाजींनी मांडलेल्या पहिल्या मुद्याचेच विस्मरण होईल असेही नको..
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/14/2015 - 06:39 नवीन
छान लेख आहे. पूर्णत: सहमत. पण काही उदाहरणे खटकली. उदा. माहितगार यांच्या पोस्टमधील हां मुद्दा.. आणखी एक शंका म्हणजे, तुमची माझी प्रत्येकाची इच्छा या क्षेत्रात दिसणारी प्रत्येक व्यक्ती आदर्श संतच असावी अशी असते का ? अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे तिही तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत, त्यांनी एखादे छायाचित्र काढून मागितले तर हा अगदीच न पुरवता येण्यासारखा समाजाला न परवडणारा हट्ट नसावा. या एका गोष्टीमुळे बाबांच्या आयुष्यभराच्या समर्पणाची किंमत शून्य होते का? आपलं सगळं आयुष्य कुष्ठरोग्यांसाठी वाहिलेल्या बाबांवर हां अन्याय नाही का होणार? बाक़ी एनजीओ वाल्यांनी आर्थिक बाबी सुद्धा पाहायला हव्यातच की. त्यांची वृत्ती जरी समाजसेवकाची असली तरी प्रकृती जपन्यासाठी त्यांनाही पैसे लागतातच की. मग समाजकारणा बरोबर ते करण्यासाठी आवश्यक असलेले आर्थिक बळ उभे कराण्यासाठी थोड़े अर्थकारणही साधले तर बिघडले कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अनिरुद्ध.वैद्य Sat, 11/14/2015 - 04:34 नवीन
धन्यवाद मारवा, आपण उत्तम माहिती सांगीतलीत. मदत करतांना कोणती कागदपत्रे बघावीत, ह्याबद्दल थोडे मार्गदर्शन करू शकाल काय?
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 11/16/2015 - 12:35 नवीन
अनिरुद्ध जी वर लेखातही मी याचा उल्लेख केलेला आहे. मला आर्थिक विषयात फारशी गती नाही. मी यावर भाष्य करण्यासाठी अतिशय अयोग्य अपात्र व्यक्ती आहे. तरी एक ले मॅन्स पाँइट ऑफ व्ह्यु अगदी जुजबी तोडकं मोडकं असे सांगु शकतो की. जे आर्थिक विषयातील तज्ञ विशेषतः सी.ए. इ.यांचा आपण एखाद्या संस्थेला डोनेशन देण्यापुर्वी सल्ला जरुर घ्यावा. सी.ए.तही वेगवेगळ्या सेक्टर मध्ये स्पेशलाइज्ड काम करणारे असतात काही फक्त व्हॅट मध्ये काम करतात काही एक्साइज व सर्व्हीस टॅक्स पुरतेच काम बघतात (बहुतेकदा हे दोन जोडीनेच असत का ते माहीत नाही पण असत) काही ट्रस्ट कोऑपरेटीव्ह सेक्टर इ.मध्ये] माझ्या एक ओळखीचा तरुण सी.ए. आहे तो अगदी सुरुवातीपासुन ओरॅकल इ. कंपन्यामध्ये सॉफ्टवेअर (आर्थिक विषयासंबंधी ) त्यावरच काम करतो. तो म्हणतो मला जरी सीए असलो तरी एक्साइज वगैरेचा काहीच अनुभव नाही. तो त्यावर सल्ला मागितला तर देत नाही दुसरीकडे पाठवतो. असं स्वाभाविक एरीयावाइज एक स्पेशलायजेशन त्यांच्यातही असत. तर आपला सी.ए. जास्त करुन कुठल्या क्षेत्राशी संबधित आहे त्याची माहीती करुन घ्यावी म्हणजे मोकळेपणाने त्यांना विचारुनच घेतलेले बरे राहील. फ्रॉड पकडण्याचा त्यांचा अनुभव त्यांचा अभ्यास असतो ते उदा. १०० खर्चाचे व्यवहार असतील तर नेमके दोन च असे खर्च आहेत ज्यावर बोट ठेवतात आणि तिथे खणुन काढतात हे ते कस करतात त्यांनाच माहीत. ते अडचणीचे प्रश्न विचारतात बरोबर. वर्मावरच बोट ठेवतात. सीएना हे कस केल विचारल तर ते सांगत नाहीत आणि सांगितल तरी आपल्याला समजत नाहीत. थोडफार बॅलन्सशीट वगैरे कळण ती चिल्लर बाब असते त्याने अस समजु नये की आपण तज्ञ आहोत. मग ते अजुन एक इंटर रीलेटेड ट्रॅन्सॅक्शन्स पण ते बरोबर पकडतात. ओनरशीप चे मुद्दे , या एन जी ओ कडे जे अनेक लायसन्स असतात त्याची वैधता, मिळालेल्या कामांचे तपशील, फंड विनीयोग संदर्भात, अनेक प्रकारच्या परवानग्या व ते सहसा कोलॅबरेशन मध्ये काम करतात म्हणजे उदा. एक भला मोठा वॉटर प्रोजेक्ट असतो त्यात एकाच वेळी ७-८ संस्था मिळुन त्यावर काम करतात मग त्या फंड ची एक चेन असते इ. ते फार कॉम्प्लीकेटेड असत. इ. इ. बारा भानगडी असतात. सी.ए.अगदी शांतपणे डिटेक्टीव्ह स्टाइलने हळुहळु कागदपत्रांच उत्खनन करत करत प्रश्नावर प्रश्न विचारत फार भारी पकडतात. मला त्यांचा नेहमीच आदर वाटतो. अजुन एक म्हणजे ते फार व्यावहारीक धुर्त कोरडे चांगल्या अर्थाने असे असतात. सहसा ते असे भावनेत वगैरे वाहवत नाहीत फ्रॉड माणस ओळखण्याची त्यांची क्षमता नॅक सगळ ग्रेट च असत. हे मी तो सीए एक अनुभवी संबंधित क्षेत्रातला आहे असे गृहीत धरुन बोलतोय. तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे एक चांगला संबधित क्षेत्रातला सी.ए. गाठावा आणि त्याचा सल्ला घेऊनच अशा संस्थेला /व्यक्तीला मदत करावी अन्यथा नाही. स्वतः आपल्या सारख्या सामान्य माणसांना ती कागदपत्र काहीच कळत नाहीत. आपण त्यासाठी सीए च्या जजमेंट वरच भिस्त ठेवलेली योग्य असते असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 11/19/2015 - 10:34 नवीन
धन्यवाद !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मुक्त विहारि Sat, 11/14/2015 - 05:41 नवीन
हे नेहमीच त्रासदायक असतात. मग ते शेतातील असोत किंवा समाजातील. प्रदूषण करणे आणि कस घालवणे, ह्यापलीकडे ह्या उसांचा उपयोग नसतो. आमच्या डोंबोलीत असे बरेच उस आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक गरबा, ही त्यांची कुरणे. ह्याशिवाय, साईबाबा-गोंदवलेकर महाराज-अक्कलकोटचे महाराज-गजानन महाराज ही राखीव कुरणे. मंदिरे, तर वंशपरेपरेने राखीव. असो, उसांविषयी बरेच बोलता येईल, ह्या अशा लोकांना फाट्यावर मारणेच उत्तम.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/14/2015 - 06:22 नवीन
पण तरीही उर्वरीत हा शब्द 'सबघोडे बारा टक्के' न्यायाने अधिक सरसकटीकरण करत नाही का अशी शंका वाटते. अगदी अगदी थोडक्यात खरे खुरे समाजसेवक जर १ % असतील तर उरलेले ९९ % डांबरटच असतील हे अमान्य. त्यातून अतिशय वाईट माणूस सुद्धा अनेकदा चांगले समाजसेवेचे काम करून जाताना दिसतो. समाजसेवा हे फुकटच करायचे काम आहे हा एक आपला " लुळी पांगळी श्रीमंती पेक्षा धट्टी कट्टी गरिबी चांगली" या विचारासारखाच कालबाह्य विचार आहे. सविस्तर प्रतिसाद सावकाशीने देतो
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/14/2015 - 06:40 नवीन
अगदी सहमत आहे डॉक्टरसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रकाश घाटपांडे Sat, 11/14/2015 - 07:13 नवीन
सहमत आहे. सब घोडे 'बारात'के असे सरसकटीकरण तर होत नाही ना? अशी शंका येते अवांतर- सब घोडे बारा टक्के मधील बारा टक्के हे बारात के चा अपभ्रंश आहे असे एका चर्चेत वाचले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनंदी गोपाळ Sun, 11/15/2015 - 06:23 नवीन
टका हे चलन आहे. प्रत्येक घोड्याची किम्मत सारखीच, हा तो अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सुबोध खरे Sun, 11/15/2015 - 18:18 नवीन
मारवा साहेब आपण खरे खुरे समाजसेवक जर १ % असतील तर उर्वरित समाजसेवक ९९ % डांबरटच असतील हा निष्कर्ष काढला आहे हा अमान्य आहे. अण्णा हजारे यांची मद्यपीला वागवण्याची पद्धत चुकीची असेल किंवा बाबा आमटेंनी फोटो काढेपर्यंत हात सोडला नाही हेही कदाचित चूक असेल परंतु म्हणून ते दांभिक समाज सेवक झाले हा निष्कर्ष काढणे चूक आहे. कुष्ठरोग्यांच्या मध्ये एक तास काढायला सांगितला तर आजही ९९ % लोक शेपूट घालतील पण ६०-७० वर्षापूर्वी त्यांच्यासाठी आपले जीवन समर्पण करणे हि गोष्ट अशक्यप्राय आहे. पोलिसांनी जर सभ्यपणे वागायचे ठरवले तर १०० पैकी ९९ गुन्ह्यांचा तपास लागणार नाही. आपल्या घरात एखाद्याने चोरी केली आणी आपल्याला खात्री आहे कि तोच चोर आहे तर आपण स्वतः पोलिसांना सांगता साहेब दोन लाथा घाला त्याच्या पार्श्वभागावर म्हणजे कसा पोपटा सारखा बोलू लागेल.तेंव्हा आयुष्यात १००% गोष्टी सनदशीर मार्गानेच झाल्या पाहिजेत हे म्हणणे पण चुकीचे आहे. उस लोकांपैकी बरेच लोक भ्रष्ट असतात, दांभिक असतात, समाजसेवेच्या नावाने आपली पोळी भाजून घेतात हे सर्व मान्य केले तरी आपले सरसकटीकरण पटणारे नाही. बरेच उस सुद्धा काही वेळेस अतिशय उत्तम काम करून जाताना दिसतात. आपल्यापैकी ९९% मिपाकर लौकिकार्थाने समाज सेवक नाहीत परंतु १००% लोकांनी काही ना काहीतरी समाजसेवा केलेली आहेच असे मी नक्की म्हणू शकतो. भले ती फार मोठी नसेल किंवा मी माझ्या काही धाग्यात लिहिले आहे तसे मला सोसंल तेवढी सोशल सर्व्हिस करतो. स्वताच्या शरीराला आणी खिशाला फारशी तोशीस न लावता जमेल तेवढी समाज सेवा मीच नव्हे तर आपण सर्वच जण करत असतो. उर्वरित समाजसेवक आपण म्हणता तसे आपल्या प्रत्येकाला सर्वत्र दिसतात पण काही मोजके खरेखुरे समाजसेवक सोडले तर बाकी सर्व "उस" आहेत हे मात्र मान्य होण्यासारखे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
उ
उगा काहितरीच Mon, 11/16/2015 - 21:09 नवीन
वरील प्रतिसादकर्त्याशी पूर्णतः व धागाकर्त्याशी अंशतः सहमत. विशेषतः लेखात आलेला बाबा आमटे यांचा उल्लेख पटला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मांत्रिक Sat, 11/14/2015 - 06:39 नवीन
मस्त लेख. एका वेगळ्या विषयाची मांडणी झाली आहे. अर्थात समाजसेवा म्हणून आपणच जेव्हा आपल्या कुवतीनुसार थोडे काही काम प्रामाणिकपणे करु तेव्हाच खरी समाजसेवा साध्य होऊ शकते. कारण या क्षेत्रातदेखील अनेक अपप्रवृत्ती पाहिल्या आहेत. त्यामुळे दुसर्यावर चटकन विश्वास बसत नाही.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 11/14/2015 - 09:37 नवीन
मिसळपाववर हल्ली फारसा येत नाही ते बरेच आहे असे हा लेख वाचून वाटले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 11/14/2015 - 10:12 नवीन
थत्ते साहेब १) ही तार्कीक उणीव नाही काय ? मारवाजींनी हाच लेख तुम्ही ज्या संस्थळावर असता तेथे टाकला तर तुम्ही त्या संस्थळावर जाण्याचे टाळाल काय ? २) एखादा विचार पटणे नाही पटणे त्या बद्दल वेगळे मत नोंदवण्याचे स्वातंत्र्य आहेच की, मी स्वतः प्रतिसादांचे दोन भाग करून सहमती असलेला आणि नसलेला असे दोन वेगवेगळे प्रतिसाद दिले आहेतच ना ! मी आणि मारवाजींनी एकमेकांच्या विचारांमधील मर्यादांची जाणीव एकमेकांच्या धाग्यावर जाऊन वेळोवेळी केली आहे पण अशी कॉमेंट मी मारवांना अथवा मारवांनी मला केल्याचे माझ्या स्मरणात नाही. मारवांना त्यांच्या अनुभवातून विचारातून जे जाणवले ते त्यांनी लिहिले. विचारांच्या प्रक्रीया वेगवेगळ्या दिशांनी वेगवेगळ्या पद्धतींनी होऊ शकतात. त्यांचे (मारवांचे अथवा इतर कुणाचे) म्हणणे मला पटो न पटो त्यांचे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मला पूर्णपणे मान्य आहे. आपल्या पेक्षा वेगळे मतप्रदर्शन असेल तर पटले नाही हे नोंदवता येते, आपला स्वतःचा ओपन माइंडेडनेस झाकत अशी टिका अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारी वाटत नाही. असो नितीनजी आमची मिसळपावरील कविता "हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... खास आपल्यासाठी आणि इतरांसाठीही पुन्हा एकदा सादर वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा... निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा.. टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा.. दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा... मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे... हम्माऽऽऽ ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/14/2015 - 14:27 नवीन
ज्जे ब्बात माहितगारभौ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बोका-ए-आझम Sat, 11/14/2015 - 10:59 नवीन
म्हणजे तुम्ही मिपावर येणं कायमचं थांबवाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
र
राही Sat, 11/14/2015 - 13:43 नवीन
लेख आवडला. एका वेगळ्या दिशेने चर्चा सुरू झाली हा फायदा. पण सरसकटीकरण होऊ नये एव्हढेच. या 'चमको' लोकांचा मलाही थोडाफार अनुभव आला. पण त्याच बरोबर काही थोडे खरेखुरे तळमळीचे लोकही असतात. ते आपापल्या शक्त्यनुसार किमान आपले अंगण स्वच्छ ठेवण्याचे काम कष्टाने करत असतात. कष्टाने म्हणण्याचे कारण तेही सोपे नाही. द्वेष, मत्सर, भोचकपणा या स्वभावाचा त्रास अगदी छोट्या चांगल्या कामातही होतो. तरी नेटाने ते आपले काम चालू ठेवतात. काही लोक मुद्दाम काही अधिकचे प्रयत्न न करता जाताजाता जमेल ते काम चमकोगिरी न करता करत असतात. अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत असतात म्हणून काळाकुट्ट अंधार भिववीत नाही.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 11/14/2015 - 14:11 नवीन
अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत असतात म्हणून काळाकुट्ट अंधार भिववीत नाही.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बोका-ए-आझम Sat, 11/14/2015 - 16:45 नवीन
अश्या अनेक पणत्या मंदपणे तेवत असतात म्हणून काळाकुट्ट अंधार भिववीत नाही.
+१. सुंदर वाक्य. बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
न
नाखु Mon, 11/16/2015 - 06:36 नवीन
अगदी छोट्या पणत्यांचेही कौतुक+दखल+मदत केली तरी चांगले आहे. दरवेळी डोंगराइतके काम करणारेच समाज्सेवक आणि बाकी "चिल्लर" असे म्हणणे म्हणजे "@@@चा राजा" ब नवसाला पावणारा गणपती,मानाचा राजा.(इथिएच पूजा करा,प्रार्थना करा) मग काय आपल्या घरातला,सोसायटीतला गणपती गौण आणी दुय्यम ठरवायचा का. अर्थात चमकोंच्या बद्दल निरिक्षणाबाबत सहमत आणि चमकोंच्या उप्द्य्वापाचा त्रास हा खर्या तळमळीच्या कार्यकर्त्यानाही होतेच होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेकपटाईत Sat, 11/14/2015 - 14:41 नवीन
समाजसेवा - शिक्षण, डिग्री, अनुदान या वर आधारित समाजसेवेत भ्रष्टाचार येण्याची शक्यता असतेच. पण चिखल साफ करण्यासाठी चिखलात उतरावेच लागते. बाकी उस म्हणजे वसुली करणारे छुटभैये नेता - वसुली किंवा अनुदानाचा पैसा (देशी/विदेशी) आपल्या राजनीतिक हेतू सिध्द करण्यासाठी वापरतात. त्या साठी NGO. मिशनरी सेवक - मिशनरी असो वा संघ, डेरा सच्चा सौदा, इत्यादी - कुठली हि अपेक्षा न करता आपल्या आदर्शासाठी कार्य करतात, नाव आणि प्रसिद्धी या लोकांना नको असते. समाजसेवेची आर्थिक बाब: ७० हून अधिक वर्ष आणि तीन पिढी कार्यात सलग्न असूनही आमटे कुटुंब आपल्या संस्थेला आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर करू शकले नाही आहे. सर्व आर्थिक बाबींचा आणि मानवीय बळाचा विचार करून, योजनाबद्ध रीतीने कसे कार्य केले जाते, हे त्यांनी व इतर NGO नी स्वामी रामदेव यांच्या कडून शिकले पाहिजे. (उदा: नुकतेच उत्तराखंड आणि नेपाल भूकंपाच्या वेळी शीघ्र योजनाबद्ध रीतीने मदत गरजूंना कशी पोचती केली जाते - त्यांनी केलेल्या कार्याचे अध्ययन केले पहिजे )
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sat, 11/14/2015 - 16:45 नवीन
लेखातील बर्‍याच मुद्द्यांशी सहमत. ... पण, मी काही-- खरोखरीच्या तळमळीने, निस्वार्थ वृत्तीने आणि मुख्यं म्हणजे कसलाही गवगवा न करता कार्य करणारी माणसे पाहिली आहेत. एक माझी वर्गमैत्रीण आहे. आणि वयाने बरोबरीची असली तरी मला तिच्याबद्दल / तिच्या कार्याबद्दल अत्यंतिक आदर आहे. अशा काही व्यक्तींमुळे ' समाजसेवक' म्हणल्यावर, अजूनतरी मनात तिरस्कार दाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 11/14/2015 - 16:53 नवीन
आहेत कित्येक निस्वार्थी अप्रसिद्ध सेवाभावी. म्हणून सरसकटीकरण सोडता इतर सर्व लेख पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा
म
मारवा Sun, 11/15/2015 - 09:42 नवीन
चर्चेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिसादकांचे मनापासुन धन्यवाद ! या लेखाचे शिर्षक पहीला पुर्ण परीच्छेद व जाणीवपुर्वक वापरलेले उस हे संबोधन व दोन प्रकारात केलेली विभागणी. या सर्व खटाटोपाचा हेतु चांगल्या सकारात्मक वेगळ्या श्रेष्ठ संवेदनशील जेन्युइन समाजसेवकांना या चर्चेच्या परीघाच्या बाहेर ठेवण्यासाठी होता. मात्र तरीही.... असो
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 11/15/2015 - 17:48 नवीन
अण्णा हजारे असोत वा बाबा आमटे तिही तुमच्या माझ्यासारखी मंडळी आहेत, त्यांनी एखादे छायाचित्र काढून मागितले तर हा अगदीच न पुरवता येण्यासारखा समाजाला न परवडणारा हट्ट नसावा.>>>>>>>>> म्हणजे त्यांनी दिसेल त्याबरोबर खिदळ्या घालत सेल्फि काढायची का ?
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/16/2015 - 07:43 नवीन
सेल्फि काढल्याने माणूस लहान किंवा मोठा कसा होतो ? माणसाची उंची त्याच्या कतृत्वावरून मोजली जावयास हवी की त्याने सेल्फी काढली म्हणून कमी कि एखाद्याने सेल्फीकाढताना भाव खाल्ला म्हणुन कमी ? मला वाटते अशा तार्कीक विसंगती मानवी स्वभाव स्वत:च्या आधीपासूनच झालेल्या मतास चिटकून राहता यावे यासाठी शोधत अवलंबत असावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
मृत्युन्जय Mon, 11/16/2015 - 07:06 नवीन
उस कमालीचे अहंकारी आणि प्रसिद्धीलोलुप असतात मागे एकदा बाबा आमटे यांच्या संदर्भात एका लहान मुलाचा हात त्यांनी जोपर्यंत फ़ोटो काढला गेला नाही तोपर्यंत घट्ट धरुन ठेवलेला अस एक वाचलेल आठवतय. एका वाक्याने लेखाची चव पुर्णपणेच घालवली. मी काय म्हणतो मारवा शेठ की जर एखाद्याच्या कार्याविषयी माहिती नसेल तर उगा तोंड कशाला उचकटावे? बाबा आमटे प्रसिद्धीलोलुप होते असे म्हणणे हाच एक मोट्ठा विनोद आहे. त्यांच्या कार्याची व्याप्तीच जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही ही असली निरर्थक विधाने करणार हे ओघानेच आले. पण तसे करताना आपण कोणाबद्दल बोलतो आहोत याचा जरा तरी विचार करावा की. राहता राहिला प्रश्न बाबांच्या हात धरुन ठेवण्याचा तर मी काही असे कधी वाचले ऐकले नाही आणि वाचले असते तरी असल्या फालतु कारणांवरुन मी बाबा आमट्यांसारख्या पूज्यनीय व्यक्तीच्या कार्याबद्दल वांझोट्या शंका घेतल्या नसत्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
असंका Mon, 11/16/2015 - 07:10 नवीन
बाबा आमटेंना आपण आपल्या वर्गवारीनुसार (सच्चे समाजसेवक/उर्वरीत समाजसेवक) उर्वरीत समाजसेवक- जे सच्चे नाहीत असे समाजसेव़क म्हणत आहात असा माझा समज झाला आहे. त्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ आपण एक काहीतरी कुठेतरी वाचल्याचं आठवत असल्याचा संदर्भ दिला आहे. मी वर जे म्हणतो ते चुक असेल तर आपल्या लिखाणात एक नकोशी संदिग्धता राहिली आहे हे आपण लक्षात घ्या. मात्र मी जे वर म्हणलेलं आहे ते बरोबर असेल तर- माझे दोन आक्षेप आहेत. १. आपण दिलेला संदर्भ अपुरा आहे. आठवणीतनं काही सांगायला हरकत नाही, पण घटनेबद्दल पुरेशी माहिती सुद्धा दिलेली नाहीत. २. केवळ एका क्षुल्लक घटनेवरून, जिच्यातून आपल्या मते त्यांची प्रसिद्धीची हाव दिसते, आपण त्यांच्या इतर कामाबद्दल, समाजसेवेतील सच्चेपणाबद्दल मोजमाप करायला बघत आहात; हे योग्य नाही. व्यक्तीच्या जीवनाचं मोजमाप करताना केवळ चुकाच बघणं हे आपण योग्य समजता का? (खुलासा- ती घटना आपण खटकणारी म्हणून मांडली असल्याने चुक असं म्हणतोय. मी त्या घटनेला चुक किंवा बरोबर काहीच म्हणत नाही आहे. आपण दिलेली माहिती असं मत बनवण्यासाठी अपुरी आहे.) तुमच्या अनेक लेखांतून इतर चांगल्या समजल्या जाणार्‍या लोकांबद्दलचे आक्षेप सोडले तर काही वाचण्यासारखं सापडत नाही. त्यातून अगदी कृष्ण, ज्ञानदेव यांनाही आपण सोडलेले नाहीत. प्रसिद्धीची हाव वाईट खरी. काय बरोबर ना? अर्थात मी आधी म्हणल्याप्रमाणे वर जे मी म्हणतो ते जर चुक असेल तर हे सगळं गैरलागू आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/16/2015 - 07:46 नवीन
प्रसिद्धीची हाव वाईट खरी. काय बरोबर ना?
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
स
संदीप डांगे Mon, 11/16/2015 - 07:57 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
म
मांत्रिक Tue, 11/17/2015 - 13:17 नवीन
तुमच्या अनेक लेखांतून इतर चांगल्या समजल्या जाणार्‍या लोकांबद्दलचे आक्षेप सोडले तर काही वाचण्यासारखं सापडत नाही. त्यातून अगदी कृष्ण, ज्ञानदेव यांनाही आपण सोडलेले नाहीत. प्रसिद्धीची हाव वाईट खरी. काय बरोबर ना? सहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मारवा Mon, 11/16/2015 - 11:15 नवीन
त्यातून अगदी कृष्ण, ज्ञानदेव यांनाही आपण सोडलेले नाहीत. कृष्ण ? मी आजपर्यंत कृष्णावर एकही लेख वा प्रतिसादातही काहीही लिहील्याच मला तरी स्मरत नाहीये. तरी आपण कुठे वाचलं त्याच कुतुहुल वाटल असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 11/16/2015 - 12:24 नवीन
माझ्याकडनं थोडी मदत- स्मरण व्हावं म्हणून.
एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.
वाटतंय का आपण हे वरचं लिहिलं असेल असं? नसल्यास जरा खालचा लेखही वाचा. http://www.misalpav.com/node/27816 तुमचं आश्चर्य पाहून मात्र भारीच आश्चर्य वाटलं. नाही; अगदी इतकं आश्चर्य वाटल्यासारखं दाखवलंत की मला वाटलं की असं काही आपल्या मनातही कधी आलं नव्हतं की काय. ते म्हणतात ना- पोटात नाही ते ओठावर कसं येणार.... त्या पद्धतीचं. असो.आपल्या कुतुहलाचं शमन मी करू शकलो आहे अशी मला आशा वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 11/16/2015 - 13:03 नवीन
महोदय तुमच्या विधानाने वाटलेल की अगदी पुर्ण लेख वा फार काही दिर्घ अस लेखन मी कृष्ण या विषयावर केलेल आहे की काय म्हणुन ते विचारल होत. हे विधान माझच आहे व चर्चेच्या ओघात तितकच केलेल आहे म्हणुन विसरलो होतो. आशा आहे हे विधान विस्मरणात जाण हा काही गंभीर अपराध आपण मानत नाही. वा यासाठी काही प्रायश्चित्ताची आवश्यकता असेल. बाकी आपण फार बारकाईने माझे लेखन वाचतात व स्मरणात देखील ठेवतात याचा आनंद वाटला. पण त्यापेक्षा आश्चर्य जास्त वाटल हे मात्र खर. पुन्हा एकदा वरील विधानावर १०० % टक्के आजपर्यंत तरी ठाम आहे ते बदलाव अस काही आढळुन आलेल नाही. माझ्या कुतुहलाच शमन करण्यासाठी धन्यवाद इतके चांगले ट्रॅक ठेवणारे वाचक लाभणं याहुन मोठा आनंद तो दुसरा काय असेल ? धन्यवाद पुढेही संदर्भासाठी विचारणा करण्यासाठी आपली मदत लागली तर कृपया उदार मनाने करावी ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Mon, 11/16/2015 - 13:35 नवीन
का नाही? कधीपण सांगा. कृपया माझ्या आक्षेपांचं निराकरणही करण्याचा विचार करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
माहितगार Mon, 11/16/2015 - 13:50 नवीन
वरील विधानावर १०० % टक्के आजपर्यंत तरी ठाम आहे ते बदलाव अस काही आढळुन आलेल नाही.
मारवाजी ते ठिक, कुणी तार्कीक विसंगती दाखवली आणि आपण मोकळेपणाने मत बदलल अशी उदाहरणे असतीलच ना ! त्या संबंधीत धाग्यावर मला जाणवणार्‍या तार्कीक उणीवेची मांडणी सवडीनुसार करेन. मीही व्यक्ती पुजा करत नाही पण तर्कसुसंगततेसाठी आग्रही असतो. बाबा आमटेंच्या छायाचित्र काढून घेण्याच्या हट्टाने बाबा आमटेंच्या कार्याची अथवा त्यांच्या व्यक्तीत्वाची उंची कमी जास्त झाल्याच बहुतांश प्रतिसाद देणार्‍यांना वाटलेल नाही. वर विवेक पटाइतांचा प्रतिसादातील समाजसेवेची आर्थिक बाब: ७० हून अधिक वर्ष आणि तीन पिढी कार्यात सलग्न असूनही आमटे कुटुंब आपल्या संस्थेला आर्थिक दृष्टीने आत्मनिर्भर करू शकले नाही आहे. सर्व आर्थिक बाबींचा आणि मानवीय बळाचा विचार करून, योजनाबद्ध रीतीने कसे कार्य केले जाते, हे त्यांनी व इतर NGO नी स्वामी रामदेव यांच्या कडून शिकले पाहिजे. हे वाक्य बघा याच वाक्यात कोणताही आर्थिक लाभ समोर न ठेवता तीन पिढ्या समाजसेवेत खर्ची घातल्या एवढे किमान क्रेडीट आमटे कुंटूंबाला जातेच. बाबा आमटेंनीही कुष्ठरोग्यांना केवळ फुकटच्या आर्थीक मदतीवर जगण्यास शिकवले नाही त्यांना उत्पादन घेण्यात जेवढे आत्मनिर्भर करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्नही केला. पण अशी विधाने आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करताना हे विसरले तर जात नाही ना अशी शंका वाटते. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 11/16/2015 - 15:22 नवीन
मारवाजी ते ठिक, कुणी तार्कीक विसंगती दाखवली आणि आपण मोकळेपणाने मत बदलल अशी उदाहरणे असतीलच ना ! माहीतगारजी आहेत ना अशी उदाहरणे पुर्वी एकेकाळी मला हीप्पींची क्रांतीकारी स्वरुपाची विचारसरणी फार आवडायची जणु त्यात सर्वंच आलं असं वाटत असे. कालांतराने हळूहळु इतर विचारसरणींचा परीचय अनुभव चिंतन वाद संवाद झाल्यानंतर त्यातील फोलपणाचा त्यातील नकारात्मक बाजु लक्षात आली. मी कुठे चुकत होतो ते लक्षात आलं. आज त्यातील फार थोडा भाग फार सुंदर असा थोडासाच भाग मला महत्वपुर्ण असा वाटतो. बाकी बहुतांश आता पटत नाही. एकेकाळी रुढी कर्मकांड एक निरुपद्रवी रीच्युअल्स आहेत झाल अस वाटायचं याने काय मोठा फरक पडतो. इ. आता त्यामागची श्रुंखला हितसंबंध इ. स्पष्टपणे जाणवतात व ते सर्व इतकं निरुपद्रवी दुरस्थ नसुन आयुष्यावर मुलगामी गहन परीणाम करणारी बाब असते अस लक्षात आलय. त्यामागचा हजारो वर्षांचा प्रभाव कीती आतपर्यंत असतो हे कळल एकेकाळी कम्युनिझम ग्रेट वाटायचा सापडलीच सर्व उत्तर अस वाटायचं आता अजिबात तस वाटत नाही. त्यातल्या असंख्य बकवास बाबी अपुर्णता मुर्खता आता स्वच्छ दिसते. तरीही इतिहासाच्या अन्वेषणा बाबतीतली त्यांची मेथड अजुनही अत्यंत वैज्ञानिक अशीच आहे असे मानतो. बाकी विचार मते आदि बदलत असतात कालची बाद होउन आजची नवी येत असतात. अस होण हेच जिवंत विकसीत होत असल्याच लक्षण आहे असे प्रामाणिकपणे वाटते. इतकच कशाला आत्ता एक विनयकुमार रामचंद्रन या महान न्युरोसायंटीस्ट यांची दोन पुस्तक वाचतोय आणि एक अगदी कालपरवाच देरीदा नावाच्या विचारवंताचा नविन परीचय तुम्ही वाचला असेल शेजारी एक लेख आहे फार चांगला आलेला त्यातुन परीचय झाला त्याच ही थोड थोड घेतलय आता हे दोन्ही फार मोठा नविन विचार देणार अस दिसतय. आतापर्यंतच काय काय मोडुन पडतय माहीत नाही. दुसर तुम्ही म्हणता प्रत्युत्तर एक तर मुळ धागा विषय कोणाचाही असो सहसा मी त्याच्या अवांतर प्रतिसाद देत नाही वाहवतो मीही कधी कधी अवांतर करतो मात्र भान येताक्षणीच तात्काळ थांबतो. आता मुळ लेखक एक भुमिका मांडतो ती त्याच्या लेखातुनच पुरेशी स्पष्ट असावी हे खरय ती मी ठेवतो त्यावर चर्चा अपेक्षीत असते मुळ लेखक एका अवांतर करुन घेऊन गेला तर बाब वेगळी पण ती फिरवुन भलतीकडेच अगदी व्यक्तीगत आणि पुर्ण पुर्वग्रहदुषित पण अगदी चौकटी ताणुनच कोणी मुद्दा फिरवतोय वा चाक रुतवुन ठेवतोय जो अनुभव अनेकदा येतो मग ते चिवडण्यात खरच अर्थ वाटत नाही. आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे जो मी स्वतः विसरुन गेलो तो मुद्दा डोक्यात ठेऊन मग हा आजचा लेख वाचताय हे फ्रेश निष्पक्ष वाचन असु शकत का ? एक प्रतिमा काहीतरी डोक्यात घट्ट आहे अरे हा हा आहे म्हणजे आता अस अस लिहीणार . मी आत्ता वाचल तिथे त्या धाग्यावर एक विस्तृत प्रतिसाद मी दिलेला तिथे ते म्हणता देखील की हो आता कळल मला तुमच म्हणण आता इथे परत तुम्ही कृष्ण ज्ञानेश्वर सोडत नाही ? आता याला काय म्हणाव ? एकतर आपल्याकडे इंडिव्हीज्युअलीझम ची फार धास्ती एकट एकट समोर येतच नाही चार काय म्हणताय अस का तर अस पहीला प्रतिसाद शक्यतो ८० % रीपीट होतो. कॉलींग अमुक कॉलींग मग +१ +१०० आकडीबाज प्रतिसाद विचार काहीच नाही वरचा म्हणाला तो मी असो. सर्वात अर्थहीन काही असेल तर आकडी प्रतिसाद मी जुने लेख वर काढतांना देत होतो फक्त कारण तो एक रेकॉर्ड पटकन सापडावा असा व्हावा यासाठी. चर्चा सघन वन टु वन बेसीस वर डीपर लेव्हल ला जातच नाही सहसा. मुख्य म्हणजे त्याने कोणाचाच काहीच फायदा होत नाही ना लेखकाचा ना वाचकांचा. अमुल्य बॅन्डविड्थ वेस्ट जाते फक्त. असोच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 11/16/2015 - 15:57 नवीन
आपण मनमोकळेपणाने विचार बदलू शकता हे आवडले.
चर्चा सघन वन टु वन बेसीस वर डीपर लेव्हल ला जातच नाही सहसा.
मारवाजी हे होतच असत, माणूसप्राणि केवळ तर्कशुद्ध असता तर त्याला आजची सामाजीक राजकीय वैज्ञानीक आर्थीक स्थिती गाठण्यासाठीही मिलीयन्स ऑफ यिअर्स कदाचीत गेली नसती. आपण आपला विचार व्यक्त करून स्वतःला आणि इतरांना विचार पडताळण्याची संधी देत असतो. या धागा लेखाच्या प्रतिसादातही माझ्या सहित बर्‍याच जणांनी आपले जिथे पटले ते पटले म्हटले आहेच. बर्‍याच जणांनी माझे आणि राहींचे प्रतिसाद लक्षात घेऊन भूमिका बनवली असावी. आपण माझ्या मुख्य प्रतिसादातील मुद्यांना उत्तर दिलेलेच नाही तशी घाई आहे असेही नाही. पण काही जणांचे प्रतिसाद त्यावर आधारीत राहीले असणार आहेत. दुसरेतर वेळेचा अभाव असल्यामुळे त्रोटक संक्षीप्त संवाद हे सध्याच्या काळाचे सर्वसाधारण लक्षण/संस्कृती असावी ती कुठेतरी आहे तशी स्विकारावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Tue, 11/17/2015 - 00:55 नवीन
दुसरेतर वेळेचा अभाव असल्यामुळे त्रोटक संक्षीप्त संवाद हे सध्याच्या काळाचे सर्वसाधारण लक्षण/संस्कृती असावी ती कुठेतरी आहे तशी स्विकारावी लागते. आहे तशी स्वीकारलेलीच आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
संदीप डांगे Mon, 11/16/2015 - 15:59 नवीन
एकतर आपल्याकडे इंडिव्हीज्युअलीझम ची फार धास्ती एकट एकट समोर येतच नाही चार काय म्हणताय अस का तर अस पहीला प्रतिसाद शक्यतो ८० % रीपीट होतो. कॉलींग अमुक कॉलींग मग +१ +१०० आकडीबाज प्रतिसाद विचार काहीच नाही वरचा म्हणाला तो मी असो.
फार मोठी काडी आहे मारवाजी, सांभाळा. इंडिव्हिज्युअलिझमची तुमची स्वत:ची काय व्याख्या आहे ते माहित नाही. पण तुमच्या अपेक्षेवरुन असं दिसतं की इथे प्रतिसाद देणार्‍या प्रत्येक सदस्याची इतर प्रत्येकापेक्षा वेगळी भूमिका असलीच पाहिजे. इथले सदस्य लोक स्वतंत्र विचार करू शकत नाहीत असा मोठा आरोप आपण करताय याचे आपणास भान आहे अशी अपेक्षा धरतो. तुमच्याच प्रतिसादाच्या अनुषंगाने विश्लेषण करायचे तर आधी तुम्हाला हिप्पी आवडले, मग कम्युनिस्ट आवडले, मग आणि कोण कोण आवडले. का बुवा.. का आवडले? ते तर इतर लोकांनी शोधून काढलेले, बनवलेले तत्त्वज्ञान आहे ना? तुमचे स्वतःचे तर नाही. मग दुसर्‍यांच्या तत्त्वज्ञानाला आपले मत बनवतांना तुम्हीही स्वतःचा इंडीव्युजलिजम विसरलात हे लक्षात आले का? मारवाजी, असे नसते. कुणाचं मत आपल्याला पटलं म्हणून आपल्याला स्वतंत्र विचारबुद्धीच नाही असे होत नाही. एखाद्याने मांडलेला एखादा पैलु आपल्यालाही पटतो इतकंच त्याचं महत्त्व. कालांतराने सर्व तत्त्वज्ञानाबद्दल तुमचे विचार बदलले. का? तर तुम्हाला नंतर ते फोल वाटले. फोल तेव्हाच वाटतं जेव्हा आपण एखादी गोष्ट काही अपेक्षेने अंगिकारतो पण ती अपेक्षा पूर्ण होत नाही. आपण त्या तत्त्वज्ञानावर लादलेली अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून ते तत्त्वज्ञान फोल नसतं. इतकीच जर इंडिविज्युलिजमची कळकळ आहे तर आपण स्वतःचे एखादे तत्त्वज्ञान का प्रस्तुत करत नाही? ते होणे नाही. कारण त्यास वेगळा व्यासंग लागतो. उपलब्ध समाजव्यवस्था, साहित्य, चिन्हे यावर आगपाखड अतिशय सोपी असते. बांधावर खड्डा खणणारा मजूरही पंतप्रधानाची अक्कल काढू शकतो. टिका करू शकतो, केली म्हणून आपण फार वैचारिक, विचारवंत झालो असा भ्रम काही लोकांना होतो. पण खरा विचारवंत समाजास नवा उपयोगी विचार देण्यास झटत असतो. त्याची मांडणी समाजास पटते, उपयोगी वाटते म्हणुन अंगिकारली जाते. कालांतराने अवास्तव अपेक्षांचे ओझे सहन झाले नाही की ती मोडून पडते. विचारवंताचे विचार आणि नाव तर कायम राहतं, ते त्याने केलेल्या नव्या मांडणी मुळे. पण नवा विचार न मांडता नुसती टिका करणार्‍यांची नावे दिगंत गाजली असे तर होत नाही. ते का? इच्छा असल्यास पुढे चर्चा करू...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
सुबोध खरे Mon, 11/16/2015 - 16:10 नवीन
सर्वात अर्थहीन काही असेल तर आकडी प्रतिसाद जर मला काही म्हणायचे असेल ते एखाद्याने माझ्यापेक्षा जास्त प्रभावी आणि कमी शब्दात मांडले तर आकडी प्रतिसाद किंवा बाडीस लिहून आपले टंकन श्रम वाचतात शिवाय आपल्याच शब्दात "अमुल्य बॅन्डविड्थ वाचते". तसेही जर आपल्याला अमुल्य बॅन्डविड्थ वाचवायची असेल तर काथ्याकुट करायचाच कशासाठी? शेवटी तुम्ही एखादा बिनतोड मुद्दा मांडून दुसर्याला गप्प करता पण त्याची विचारसरणी किंवा दृष्टीकोन मुळीच बदलत नाही. आपल्याला "मोगा( हितेस, दादा द रेकर) किंवा ग्रेट थिंकर" यांची विचारसरणी बदलून दाखवा असे मी आव्हान करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे Mon, 11/16/2015 - 16:15 नवीन
बाडीस (हे हे, बघा बघा, मी स्वतंत्र विचार करु शकत नाही म्हणून बाडीस नाय केलंय हां)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
असंका Mon, 11/16/2015 - 21:06 नवीन
आता हे बघा कन्फ्युजन साहेब हे जो मी स्वतः विसरुन गेलो तो मुद्दा डोक्यात ठेऊन मग हा आजचा लेख वाचताय हे फ्रेश निष्पक्ष वाचन असु शकत का ? एक प्रतिमा काहीतरी डोक्यात घट्ट आहे अरे हा हा आहे म्हणजे आता अस अस लिहीणार . मी आत्ता वाचल तिथे त्या धाग्यावर एक विस्तृत प्रतिसाद मी दिलेला तिथे ते म्हणता देखील की हो आता कळल मला तुमच म्हणण आता इथे परत तुम्ही कृष्ण ज्ञानेश्वर सोडत नाही ? आता याला काय म्हणाव ?
माझ्या वागण्याबद्दल आक्षेप असतील, तर ते मला नजरेला यायला पाहिजेत ना? असे मेगाबायटी प्रतिसादात लपवून का ठेवता? असो आता उशिराने का होइना पण आक्षेप दिसला तर आहे.- प्रत्येक लेख जरी स्वतंत्र असला तरी एक धागा जर समान दिसत असेल, तर फक्त कुणीतरी पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करू शकू नये म्हणून असा धागा मला दिसलाच नाही असं मी म्हणू शकत नाही. हा पूर्वग्रह आपल्या वागण्यानेच तयार झालेला आहे. तुम्ही स्वत: प्रसिद्धीच्या मोहात पडून फक्त थोरामोठ्यांवर आरोप करत सुटला आहात. त्यांची नावं नसती तर एवढे प्रतिसाद आपल्या लेखाला मिळालेच नसते हे अगदी उघड आहे. कुठलीही लॉजिकल कारणे न देता आपण आपल्या मनाला येइल तसे आरोप करत जाता याची मी उदाहरणे देत आहे. तुमची प्रतिमा माझ्या डोक्यात घट्ट नव्हती. वर लिहिलेला मुद्दा डोक्यात आहे कारण स्पष्ट विचारूनसुद्धा तुम्ही त्याचे उत्तर दिलेले नाहीत. मी विचारलेला प्रश्न असा होता की अर्जुनाला जे वाटले त्याला आम्ही संभ्रम मानतो आणि कृष्णाने त्याला त्या संभ्रमातून सोडवलं. मात्र आपण कृष्णालाच दोषी ठरवून मोकळे झालात ते कसं? जर याचं उत्तर दिलं असेल तर दाखवा. कृष्णाचं एक झालं. तो विषय समजा संपला. मग निष्ठा या विषयावर आपण एक लेख लिहिला होता. तुम्ही निष्ठेला निगेटीव ठरवलंत. तिथला माझा प्रश्नही अजूनपर्यंत अनुत्तरीत आहे. मग ज्ञानेश्वर झाले. आज आता बाबा आमटे. मी कॉम्प्युटर नाही. एक व्यक्ती सातत्याने ज्या गोष्टी समाजात चांगल्या म्हणवल्या जातात त्यांच्याविरुद्ध पुरेशा स्पष्टीकरणाशिवाय बोलत असेल तर ते लक्षात न ठेवणे मला शक्य नाही. त्याला पूर्वग्रहदूषित म्हणायचं तर जरूर म्हणा. सरळ विचारलेल्या शंकांचे सरळ समाधान आपण देत नाही हा माझा अजून एक पूर्वग्रह आहे आपल्याबद्दलचा. तो खोडून काढायचा तर सुरुवात म्हणून माझ्या वरच्या आक्षेपांचे निराकरण करून एक चांगली सुरुवात करता येइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Tue, 11/17/2015 - 02:25 नवीन
कुठलीही लॉजिकल कारणे न देता आपण आपल्या मनाला येइल तसे आरोप करत जाता याची मी उदाहरणे देत आहे. मी त्या राष्ट्रवाद धाग्यावर तुम्हाला एक विस्तृत ७ कलमी प्रतिसाद दिलेला होता. त्यावर तुम्ही मला खालील प्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे. हा तुमचाच प्रतिसाद आहे ना ? की मी चुकीचा टाकलाय ? की मॅनिप्युलेट केलाय ? आता यात तुम्ही म्हणताय आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळल परत ते तुम्ही सारांश रुपाने मांडुन देखील दाखवलय स्पष्ट सहमती देखील दर्शवताय समारोपाच्या शैलीत एक श्लोक ही तुम्हीच दिलाय. आता खरच जर यानंतर तुमची काही शंका शिल्लक होती कृष्ण संदर्भात तर तुम्ही तिथे ती विचारलीच असती. पण तिथे तर तुम्ही काहीच न विचारता समारोप केलेला दिसतोय, धन्यवाद ही दिलेले दिसताय मला, मला कळलय देखील म्हणता मुद्देसुद ही म्हणताय. हे सर्व झाल्यावर आज पुन्हा आता परत वरील तेच सर्व प्रश्न तुम्ही अगदी मी त्या गावचाच नाही अशा शैलीत व जणु आपला हा संवाद झालेलाच नाही अशा इनोसंटली नव्याने विचारताय ज्यावर तुम्ही खालील प्रतिसाद दिलाय ? मग ज्ञानेश्वर हा उल्लेख तुम्ही करता तिथे तर या वेळेस मी बघितल मला तुमचा त्या धाग्यावर एकही प्रश्न प्रतिसाद दिसला नाही आता परत मदत मागतो तुमची तिथे ज्ञानेश्वरी वर तुम्ही मला कोणता प्रतिसाद दिलेला कोणता प्रश्न विचारलेला कृपया निदर्शनास आणावे असेल तर. नाही तर विचारावा पुन्हा नव्यानेच मला तरी दिसला नाही. इथे मात्र आवर्जुन तुम्ही उल्लेख केलात यात खरोखरच काहीच विसंगती तुम्हास दिसत नाही काय ? मग मला तुमचा प्रश्न अप्रामाणिक, सीरीयसली न विचारलेला मान्य करुन पुन्हा अमान्य करणारा, दांंभिक वाटला किंवा तुम्हाला विचारांशी खरोखर काही अगत्य आहे का अशी शंका वाटली तर ती गैर कशी ? इथे तुम्ही ज्या इनोसंटली प्रश्न विचारता तो इनोसन्स मला दांभिक वाटला तर ते गैर कसे ? आता आपल्याला काय म्हणायचे आहे ते मला कळलं. मला आपलं म्हणणं असं आहे असं वाटतं- १. एकसंध मानवसमाज हे आपले दीर्घकालीन उद्दीष्ट/स्वप्न हवे. त्यात राष्ट्र ही संकल्पना हा एक अडथळा आहे/ठरेल. मूळात राष्ट्र ह्या संकल्पनेत काहीही दैवी नसल्याने त्याविरुद्ध जाणे हे शक्य आहे. तसेच त्या संकल्पनेत निसर्गाच्या नियमांचा काहीही सहभाग नसल्याने, ही संकल्पना जेव्हा मानवसमाज सोडेल, तेव्हा ते अनैसर्गिक असणार नाही. २. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ सद्ध्याच्या व्यवस्थेतील तोटे/दोष यांची यादी आपण दिली आहे. हा लेख चांगला मुद्देसूद आणि भावनांना कमीत कमी उत्तेजित करणारा असा होता. सारांश : अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम| उदारचरिताणाम तू वसुधैव कुटुंबकम...|| (बघा आम्ही भारतीय किती श्रेष्ठ- पूर्वीपासूनच हेच सांगत नव्हतो? ;-) ) (या दीर्घ प्रतिसादाबद्दल धन्यवाद!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Tue, 11/17/2015 - 04:20 नवीन
बाबा आमटेंचा विषय चालू होता. तेवढं सोडून आपण सगळं बोलत आहात. वरच्या प्रतिसादातलं आपल्याला सोयीचं जे वाटलं तेवढंच आपण उचलेलं आहे. बाकी कशालाही हात लावलेला नाही. हा दांभिकपणा आहे. मी मात्र मला कदाचित गैरसोयीचं होइल असा कृष्णाचा मुद्दाही संपला असं गृहित धरतो म्हणलेलं आपल्याला दिसलं नाही का? मी स्वतःहून एक ठिकाणी वादात माघार घेत असताना आपण मुद्दे सोडून माझ्यावर वैयक्तिक हल्ले करत आहात. तेही खोटे. मागेही वाद न घालता आपण थेट एक चेष्टा करणारी कविता वगैरे प्रसिद्ध केली होतीत. असे वैयक्तिक हल्ले स्वतःच्याच धाग्यावर करून आपण काय मिळवू इच्छिता? साधी सरळ गोष्ट आपण किती घुमवून फिरवून घेणार? कृपया मूळ प्रतिसादात म्हणलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याचा विचार करावा ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा