खंत वेड्या मनाची (गझल)
मुकी जाहली आज सारीच झाडे, जणु जाहल्या सुन्न या रानवेली
जिथे भेटलो बोललो रोज होतो, रया तेथली आज सारीच गेली
कधी पाखरे गायली रोज होती, तुझ्या स्वागताची किती गोड गाणी
आता पाखरांचा कुठे न सुगावा, कशाने अशी पाखरे पांगलेली
असे साचली या जगतात साऱ्या, तुझी आठवण अती रम्य वेडी
हवी वाटते जी मनाला तरीही, उगा अंतरी या कुठे बोचलेली
कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात
जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली
मला सापडेना मुळी तोच धागा, सुटे काळजाची जिथे प्रश्नमाला
कसा श्रावणाचा उन्हाळाच झाला, किती घालमेल मनी चाललेली
आता सोबती त्या रिकाम्याच वाटा, जिथे ना निवारा नसे गारवाही
दिलासा मनाला असे एक मात्र, स्मृती आपुली ती तिथे दाटलेली
उडे आसमंती उगा धुळमाती, ऋतु कोणता हा मनाला कळेणा
किती आज ओढ आकाशी ढगांना, कुठे जावयाची असे लागलेली
कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले
तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली
अजुनी या वेड्या मनी खंत माझ्या, तुझी शेवटी भेट झालीच नाही
तुझ्या पावलांचे ठसे शोधताना, कडा लोचनांची ही पाणावलेली
-शार्दुल हातोळकर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukrey