Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

प्रजासत्ताक आणि पद्मश्री सुभाष पाळेकर

न
नितीनचंद्र
Fri, 01/29/2016 - 15:39
🗣 47 प्रतिसाद
२६ जानेवारीच्या पुर्वसंध्येला पद्म पुरस्कार मिळालेल्यांची यादी जाहीर झाली. खरतर त्या सन्माननीय व्यक्तींच्या कार्याची दखल घ्यावी म्हणुन हा सन्मान दिला जातो. पण प्रजासत्ताक दिनाला लष्करी धुरळा इतका उडतो आणि त्यात पद्म पुरस्कारांनी सन्मानीत व्यक्ती, त्यांचे कार्य याची दखल घेण्याची जागा शिल्लक रहात नाही. त्यातुन १० पद्मविभुषण , १९ पद्मभुषण आणि ८३ पद्मश्री ने सन्मानीत अश्या लोकांपैकी अनेक मुळचेच सुप्रसिध्द त्यामुळे आढावा तरी कशाचा घेणार. जय जवान आणि जय किसान ही घोषणा एकत्र दिली जात असली तरी जय किसान ला तितकेसे प्राधान्य प्रजासत्ताक सोहळ्यात नसते कारण हा सर्व सोहळा लष्करी नोकरशाही आणि गणमान्य व्यक्तींच्या सुरक्षा आनि प्रोटोकॉल्स मधे गढुन गेलेला असतो. २६ जानेवारीला शनी शिंगणापुरला महिलांना प्रवेश का नको यामुद्यावरच्या गलबल्यात एका महाराष्ट्रातील एका अपरिचित पद्मश्रींचा प्राप्त शेतकर्‍याचा कार्याचा आढावा घ्यायला कुठल्याही चॅनलला वेळ बहुदा मिळाला नाही . ह्यांच नाव आहे श्री सुभाष पाळेकर. फक्त व्यकंय्या नायडु यांना त्यांची महती माहित होती काय म्हणुन त्यांनी “Congratulations to all Padma awardees… Very happy that for the first time a Padma award is bestowed on a farmer, Shri Subhash Palekar”, -winning-padma-shri अस ट्वीट केल. कारणच तस आहे. विदर्भातले सुभाष पाळेकर आपल्या सेंद्रीय खतांच्या आग्रहामुळे आणि शुन्यावर आधारीत शेती प्रयोगामुळे विदर्भ आणि कर्नाटकात प्रसिध्द आहेत. https://www.youtube.com/watch?v=ESuZc2l-tfY सुभाष पाळेकर म्हणतात एक गाय रोज १० किलो शेणखत देते. ज्यातुन सुमारे २० एकर शेतीला पुरेल इतके शेणखत तयार होते. शेणापासुन शेणखत कसे बनवायचे याचे तंत्र त्यांनी विकसीत केले आहे. जर गाय दुध देत असेल तर तो बोनस अन्यथा भाकड गाय सुध्दा शेतकर्‍यांना वरदान आहे अस त्यांच मत आहे. आंतरजालाची वरची माहिती घेतल्यावर असे कळले की शेणखताच्या वापराने भाताचे दर एकरी उत्पन्न १२ क्विंटल वरुन २० ते २४ इतके वाढते शिवाय औषधे किटक नाशके यांचा वापर कमी करावा लागतो कारण शेणखतामुळे पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी ते आणखी काही प्रयोग सांगतात शिवाय स्वतः ला लागणारे बी- बियाणे स्वतः बनवुन अल्पभु धारक शेतकरी कसे किफायती शेती करु शकतात हे सांगणारे हे शेतकरी आपल्या विदर्भातले आहेत हे वाचुन मला फारच आनंद झाला. नाम ( नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे ) जे काम करत आहेत ते उत्तम आहे पण शेतकरी आत्महत्याच होऊ नयेत म्हणु सर्वांनी श्री सुभाष पाळेकरांचा मंत्र जर गावोगावी पोचवला तर मला वाटत मुलभुत काम होईल. सुभाष पाळेकर यांचे किमान चार व्हिडीओ तर यु ट्युबवर आहेत . आजवर त्यांनी हा संदेश अनेक शेतकरी यांना दिलाय. १. https://www.youtube.com/watch?v=_JOSnwZAzo8 २. https://www.youtube.com/watch?v=nF0nICMUors ३. https://www.youtube.com/watch?v=K3p4cBay8rU ४. www.dailymotion.com/video/x2k3zp4 ही माहिती आपल्याला जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोचवण्यासाठी काय करता येईल ?
वर्गीकरण
शेती आणि शेतकरी

प्रतिक्रिया द्या
24579 वाचन

💬 प्रतिसाद (47)
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/29/2016 - 16:09 नवीन
एका सकारात्मक काम करणार्‍या शेतकर्‍याला यावर्षी पद्म पुरस्कार मिळाला ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे. त्याबद्दल इथे लिहिले आहे हे अत्यंत स्वागतार्ह आहे. सर्वांनी श्री सुभाष पाळेकरांचा मंत्र जर गावोगावी पोचवला तर मला वाटत मुलभुत काम होईल. +१००,०००
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Fri, 01/29/2016 - 16:14 नवीन
नितीनचंद्रजी , खरंच मनापासून धन्यवाद इथे शेअर केल्याबद्दल .
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 01/29/2016 - 16:22 नवीन
पाळेकरांची झीरोबजेटशेती ही संकल्पना खूप वर्षांपासून शेतकर्‍यांमधे माहिती आहे. गेली दोन+ दशके ते याचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. त्यांच्या वेबसाईटवर याविषयी अधिक माहिती मिळेल. http://palekarzerobudgetspiritualfarming.org/ फक्त शेणखतच नाही तर शेण, गोमुत्र, बेसन, गुळ ह्यांपासून बनवलेलं जीवामृत, दशपर्णी, बीजामृत, वाफसा, मल्चिंग, नीमास्त्र, आग्नेयास्त्र, इत्यादी अनेक शेतीहितकारक शोध त्यांनी लावले आहेत. मागच्या दोन महिन्यात एका कंपनीच्या प्रचाराहेतुक मी बर्‍याच शेतकर्‍यांच्या गटांना प्रत्यक्ष भेटलो. ह्यात द्राक्ष, डाळींब, उस वैगरे पिकांचे मोठे-छोटे शेतकरी होते. माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का असा की ह्या सर्व शेतकर्‍यांना सुभाष पाळेकर व त्यांचे प्रयोग ह्याविषयी इत्थंभूत माहिती आहे. त्यांची पद्धती परिणामकारक आहे हेही माहिती आहे. अनेक शेतकर्‍यांनी ह्या पद्धतीचा वापर करून आपल्या पिकांचा दर्जा आणि उत्पादन दोन्ही वाढवले आहे हेही माहिती आहे.. असे शेतकरी त्यांच्या स्वतःच्या गावात आहेत हेही त्यांना माहिती आहे. परंतु ते पाळेकरसंशोधित झीरोबजेटशेतीचा अजिबात अवलंब करत नाहीत. शेतकरी बी-बीयाणे, खते, किटकनाशके ह्यांच्या किंमतींमुळे तोट्यात जातात असा एक सर्वसाधारण समज सामान्य माणसांमधे आहे. जेव्हा मी प्रत्यक्ष ह्या लोकांशी बोललो तेव्हा कळले की फुकटची औषधे, ज्ञान उपलब्ध असूनही हे लोक त्याचा अवलंब करत नाहीत. रासायनिक खते किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या यांची उत्पादने वापरण्याकडे ह्यांचा जास्त कल आहे. कितीही महाग असली आणि परिणाम देत नसली तरी खते-औषधे ही ''कंपन्यांचीच' वापरली जातात. एका मीटींगमधे एक शेतकरी वैतागून म्हणाला की "अशा खूप कंपन्या आमच्या कडे दर दुसर्‍या दिवशी येतात, हे घ्या, ते वापरा अशी गळ घालतात. आता आम्हाला तुम्ही काहीतरी बिनपैशाचे असेल ते उपाय द्या." नंतर आमच्यासोबत असलेले डॉक्टरांनी व्याख्यानात विचारले की तुम्हाला झीरोबजेतशेती माहित आहेका, जीवामृत माहित आहे का? तेव्हा सगळे शेतकरी हो म्हणाले, दहा वर्षांपासून माहिती आहे. वापरता का यावर सगळे गप्प बसले. त्यावर पुढे होऊन मी त्याच शेतकर्‍याला विचारले. "काका, आता हे तर फुकटच आहे. तर का वापरत नाही?" त्यावर तो गप्प बसला. मी ज्या कंपनीचे प्रचारात होतो, त्यांचे औषध पंधरा दिवसातून एकदा फवारायला लागते. ते औषध आधीपासून त्या गावात मिळते. तरी लोक जुन्याच तीन-पाच दिवसांनी मारायला लागणार्‍या औषधांचे फवारण्या का करतात असा प्रश्न पुढे आला तेव्हा मजेदार उत्तर मिळाले जे एका तरुण शेतकर्‍याने दिले. म्हणाला, "काय करणार, तीन-चार दिवसात फवारणी झाली नाही तर अस्वस्थ वाटतं." म्हणजे ह्यांना व्यसन लागले आहे, आम्ही जी औषधे त्यांचे खर्च कमी करण्यासाठी त्यांना देतो ती जैविक असूनही त्यांना नाकारून त्यांचा ओढा रासायनिक कडे आहे. शेतकर्‍यांमधली ही मानसिकता खूप अभ्यासण्यासारखी आहे. पाळेकरांसारखे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व महाराष्ट्रात, तेही विदर्भात असून आपल्याला, शेतकर्‍यांना त्यांचा योग्य वापर करता आला नाही. शेतकर्‍यांचे स्वयंघोषित मसिहा अशा बाबींकडे डोळेझाक करतात. हे बघून खंत वाटावी, उद्वेग वाटावा, नेमके काय वाटावे याबद्दल संभ्रम आहे. पाळेकरांचे पद्म पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन! केवळ इजरायलचे गोडवे गाण्यापेक्षा आपल्याच मातीतल्या, आपल्याच मातीतले उपाय सांगणार्‍या ह्या माणसाकडे शासन, जनतेने पुरेसे लक्ष देणे अस्तित्वासाठी परमआवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 01/29/2016 - 16:52 नवीन
आणि हा धागा टाकून त्यांची अंशतः ओळख करुन दिल्याबद्दल नितीनचंद्र यांचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/29/2016 - 17:06 नवीन
सुभाष पाळेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पद्मश्रीसाठी त्यांची निवड करण्याबद्दल केंद्रसरकारला अनेक धन्यवाद. पाळेकरांच्या कार्याबाबत स्व. श्रीकांत जिचकार यांच्या व्याख्यानात २००३ साली ऐकले होते. या लेखनासाठी नितीनचंद्र यांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/29/2016 - 18:27 नवीन
नितीनचंद्र, ओळखपर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद. पाळेकरांच्या सृष्टीत गोमातेचे स्थान महत्त्वपूर्ण दिसते आहे. अशोक इंगवले या प्रगतीशील शेतकऱ्यानेही गाय केंद्रस्थानी ठेवून श्तीचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. तोही अल्पपीक जमिनीवर. त्यांची जमिनीची प्रत वाढवण्यासाठी शेण वापरायची युक्ती पाळेकरांसारखी आहे. इंगवल्यांवर अधिक माहिती इथे आहे : http://uniquefeatures.in/anubhav/जुलै-२०१०/बळीराजा-शोधतोय-प्रश्नांना-उत्तरं इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. ती म्हणजे यातली गाय ही देशी जातीची वशिंडी गाय आहे. विदेशी जातीची वशिंडहीन गाय अभिप्रेत नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/29/2016 - 23:51 नवीन
लेखनासाठी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 01/30/2016 - 11:37 नवीन
सुरेख ओळख, धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/30/2016 - 11:43 नवीन
आजच्या अ‍ॅग्रोवन मध्ये आलेला लेखः (तिकडे जाऊन वाचण्यापेक्षा इथेच चिकटवतो) स्वतंत्र भारताच्या 67 व्या प्रजासत्ताकदिनी प्रथमच एका शेतकऱ्याचा आणि त्याच्या "झीरो बजेट' नैसर्गिक शेतीचा गौरव करण्यात आला. सुभाष पाळेकर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा विषमुक्त कृषी चळवळीचा गौरवच म्हणावा लागेल. रासायनिक शेतीकडून निसर्गशेतीकडे वळणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना यामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. - डॉ. नागेश टेकाळे (मूळ लेखक) वय वर्ष 67 असलेले सुभाष पाळेकर हे विदर्भामधील अमरावती जिल्ह्यातील बेलोरा या गावचे रहिवाशी आहेत. गेली 25 वर्षे ते भारतभर निसर्गशेतीचा प्रसार करत फिरत आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, पंजाब या राज्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत हजारो निःशुल्क कार्यशाळा घेतल्या आहेत. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला, तेव्हासुद्धा ते आंध्र प्रदेशामधील काकीनाडा येथे एका कार्यशाळेत हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते. विशेष म्हणजे या समुदायात शेकडो कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. सुभाष पाळेकर यांचे वडील नैसर्गिक शेती करत. मात्र कृषी पदवीधर या नात्याने त्यांनी त्यांच्या पारंपरिक शेतीत बदल करून रासायनिक शेतीचा स्वीकार केला. 1973 ते 1985 या 12 वर्षांत सुरवातीस त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. मात्र नंतर उत्पन्नाचा आलेख खाली घसरून त्यांची 40 एकरची शेती तोट्यात जाऊ लागली. येथेच त्यांच्या निसर्ग शेतीच्या कल्पनेचा उदय झाला. रासायनिक खते, कीडनाशके वापरूनसुद्धा उत्पन्न कमी का झाले? शेती नुकसानीत का गेली? या कारणाचा विचार करताना त्यांनी परिसरातील घनदाट जंगलास आपले मित्र बनविले. जंगल भटकंतीत त्यांच्या विचारांना चालना मिळू लागली. त्यांनी जंगलातील गोंड आदिवासींच्या निसर्ग शेतीचा अभ्यास केला आणि प्रश्‍नाचे उत्तर प्राप्त करून समाधानाने ते गावी परतले. 1987 पासून सातत्याने त्यांनी त्यांच्या शेतात निसर्ग शेतीचे वेगवेगळे प्रयोग केले. त्यातून प्राप्त झालेले परिणाम अनेक व्याख्यानातून त्यांनी लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोचविले. गेली 28 वर्ष कष्ट करणारा हा शेतकरी आजही अल्पभूधारक शेतकऱ्यांना निसर्ग शेतीच्या माध्यमातून शाश्‍वत शेतीच्या आनंदी पाऊल वाटेने घेऊन जात आहे. पाळेकर यांनी देशामधील विविध राज्यांमध्ये तयार केलेल्या लाखो पाऊलवाटांचे आज राज्य रस्त्यामध्ये रूपांतर झाले आहे. देशातील 50 लाख शेतकरी आज 10 दशलक्ष हेक्‍टर जमिनीवर निसर्गशेती करत आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रात अजूनही ही पाऊलवाट फारशी मळली नाही. "जिथे पिकते तिथे विकले जात नाही' ही म्हण येथे तंतोतंत खरी ठरते. मी स्वतः मूलभूत विज्ञानाचा अभ्यासक आहे. पाळेकर यांची निसर्ग शेती ही मूलभूत विज्ञानावर आधारलेली आहे. ज्या शेताच्या बांधावर वृक्ष संख्या जास्त असते, त्या शेतातील पिके दुष्काळातसुद्धा तुम्हास शाश्‍वत उत्पन्न देतात. आपण मात्र शेतात त्यांची सावली पडते म्हणून बांध कोरून त्यांना तोडून टाकतो आणि शेत उजाड होते. शेताचा बांध, त्यावरील लहान वृक्ष आणि शेती यांचा जवळचा संबंध आहे, हे मी स्वतः प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. पाळेकरांना निसर्ग समजला, तो त्यांच्याशी बोलू लागला आणि आम्ही मात्र पैशाच्या हव्यासापोटी मुके झालो. पाळेकर यांची नैसर्गिक शेती चार मुख्य तत्त्वांवर आधारलेली आहे. झीरो बजेट, नैसर्गिक मूलद्रव्ये आणि त्यात जैवविविधतेचा सहभाग, मल्चिंग (जमिनीवर पसरलेली पाळापाचोळ्यांची चादर) आणि आंतर व बहुपीक पद्धती. नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी जिवामृत व बीजांमृत या दोन अमृत द्रव्यांची निर्मिती नैसर्गिक साहित्य वापरून केली. केवळ एक देशी गाय एक एकरास अखंड शाश्‍वत शेतीचा मंत्र देते, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले. त्यांच्या नैसर्गिक शेतीसाठी कुठलेही खत अथवा विकतचे बियाणे लागत नाही. पाळेकरांनी 10 किलो शेण वापरून एक एकर वर उत्कृष्ट प्रकारची नैसर्गिक शेती करून दाखविली. निसर्गशेतीमध्ये आंतरपीक व बहुपीक पद्धतीबद्दल ते आग्रही आहेत. यामुळे ठराविक पिकाची जोखीम राहत नाही. बुरशी आणि कीटकांचा उपद्रव कमी होतो आणि शेतामधील पिकांची विविधता कायम राहते. पाळेकर म्हणतात, की नैसर्गिक शेती ही एक साधना आहे. ही साधना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आहे. या उपासनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा स्वाभिमान व आत्मविश्‍वास प्राप्त होतो. फक्त मराठी आणि हिंदीमध्येच व्याख्यान देणाऱ्या या संशोधक शेतकऱ्याच्या कार्याची इंग्रजीमध्ये दोन खंडात अनुवाद झाले आहेत. त्याची ""टेक्‍निक ऑफ स्पिरुच्युएल फार्मिंग'' व ""झीरो बजेट नॅचरल फार्मिंग'' ही दोन इंग्रजी पुस्तके आहेत. पाळेकर म्हणतात, एक रुपयासुद्धा खर्च करून शेती करू नका. त्यांच्या जिवामृत या मिश्रणात देशी गाईचे जे शेण वापरले जाते, ते फक्त जमिनीमधील देशी गांडुळांना सुप्त अवस्थेमधून जागे करण्यासाठी गंध निर्मितीचे कार्य करते. पाळेकर हे शेतजमीन निर्मळ करण्याच्या विरोधात आहेत. शेताच्या बांधावरील मूठभर माती एका एकरातील बहुपीक पद्धतीने शाश्‍वत उत्पन्न देते हे त्यांनी पटवून दिले आहे. मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासामध्ये कच्चे असणाऱ्यांना पाळेकरांचे प्रात्यक्षिकांवर आधारित नैसर्गिक सिद्धांत पचविण्यास कठीण जातात, पण जुन्या पिढीतील शास्त्रज्ञास ते पटतात. देशामध्ये सर्वांत जास्त शेतकरी आत्महत्या या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आहेत आणि त्याचे मूळ कारण विषयुक्त शेतीमध्येच आहे, यातूनच कर्जबाजारीपणा, अवहेलना, नैराश्‍य निर्माण होते. अशा वर्गासाठी निसर्ग शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. भारत सरकारने सुभाष पाळेकर यांना "पद्मश्री' देऊन त्यांच्या निसर्गशेतीचा सन्मान केला आहे आणि सोबत त्यास मान्यतासुद्धा दिली आहे. कर्नाटक व दक्षिणेमधील काही राज्यांत राज्य शासनातर्फे विषमुक्त निसर्ग शेती करणाऱ्या शेतकऱ्यास आर्थिक उभारी मिळेपर्यंत मदतीचा हात व संपूर्ण सुरक्षा उपलब्ध आहे. आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी निसर्ग शेतीची कल्पना राज्यातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी राबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा प्रयोग शासनाने जरूर करावा. 67 वर्षांत प्रथमच एका शेतकऱ्यास, निसर्ग शेतीच्या पुरस्कर्त्यास हा उच्च पुरस्कार प्राप्त झाला आहे. आपल्या राज्याचा आणि येथील शेतकऱ्यांचा हा सन्मान आहे. 9869612531 (लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 01/30/2016 - 11:58 नवीन
अभिनंदन आणि केंद्र सरकाराचे खास कौतुक. एका लायक व्यक्तीला पुर्स्कार दिल्याने या उपेक्षीत ऋषीचे कार्य लोकांसमोर येईल आणि खर्या अर्थाने त्याला चालना मिळेल. आमटे दांपत्याबद्दल पुरस्कार/सिनेमानंतर जास्ती सखोल आणि परिणामकारक लिहिले/वाचले जाऊ लागले हे ताजे उदाहरण. धन्यवाद डांगे आण्णा.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2016 - 12:53 नवीन
सुभाष पाळेकर, ह्यांचा मोबाईल नंबर मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/30/2016 - 12:56 नवीन
त्यांच्या वेबसाईटवरून. ERO BUDGET SPIRITUAL FARMING RESEARCH Development & Extension Movement Shri.Subhash Palekar 19, “CHANDA SMRITEE”, Jaya Colony, Near Telecom Colony, Sai Nagar Post, Amravati– 444 607 ( MAHARASHTRA ) Cell - 09423601004, 09673162240, 09850352745
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 01/30/2016 - 13:16 नवीन
सुभाष पाळेकर ह्यांनी लिहिलेली पुस्तके हवी असतील तर, खालील लिंक बघा.... http://palekarzerobudgetspiritualfarming.org/PDF/Marathi.jpg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदिजोशी Mon, 02/01/2016 - 10:47 नवीन
जाणत्या राजाने सत्ता असताना असले प्रयोग राबवले असते तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 02/02/2016 - 09:46 नवीन
अतिशय योग्य अशा व्यक्तीला पद्म पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या कार्याची उत्तम ओळख यानिमित्ताने झाली. संदीप, जास्तीच्या माहितीसाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 02/02/2016 - 10:28 नवीन
उत्तम माहिती नितीनचंद्र आणी संदीप डांगे. एका सुयोग्य व्यक्तीला पद्म म्मिळाला याचा आनंद आहे.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Tue, 02/02/2016 - 11:24 नवीन
सोशल मार्केटींग नावाने - खालील जाहीराती चालु असतात. मग झीरो बजेट शेती किंवा सेंद्रीय खते यावर अश्या जाहीराती का येऊ नयेत ? १) जहा सोच वहा शौचालय २) बिमा आग्रह ३) .....
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 02/02/2016 - 12:25 नवीन
मग झीरो बजेट शेती किंवा सेंद्रीय खते यावर अश्या जाहीराती का येऊ नयेत ?
त्यांचे बजेट झीरो असेल त्यासाठी ;) मलाही श्री. पाळेकरांबद्दल माहिती नव्हती. पद्म पुरस्कारांच्या मांदियाळीत त्यांचे नाव बघितल्यावर उत्सुकता म्हणून गुगलले होते. त्यांनी सांगितलेले प्रयोग करुन बघायला हवेत. जाता जाता - नवे तंत्रज्ञान नको म्हणून कविता करणारे व शेतकर्‍यास (अ)भयचकित करणारे यावर काही बोलतील अशी भाबडी आशा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 12:42 नवीन
ते काही बोलले तर त्यांचे दुकान बंद होईल असे भय त्यांना वाटत असेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
न
नाखु Tue, 02/02/2016 - 12:53 नवीन
ह्या अन्याच्या फारच भाबड्या अपेक्षा बुवा ! तुला उंटावर बसूनच शहाणे व्हायचयं का? उंटावर बसूनच बरे झाल तू तज्ञ नाहीस ते अन्यथा तुझी खैर नव्हती. अज्ञ बालक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 13:17 नवीन
बरे झाले नाखु काका तुम्ही दुवा दिला ते. झिरोबजेटशेतीबद्दल त्यांची मुक्ताफळे ते शेतीविषयी किती ज्ञान ठेवून आहेत हे स्पष्ट दाखवतायत. असे मित्र असतील तर शेतकर्‍यांना शत्रूंची काय गरज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
आ
आनन्दा Wed, 02/03/2016 - 10:57 नवीन
जाता जाता - पाळेकरांचा झीरो बजेट मधील कीटकनाशकाचा प्रयोग अपघाताने आम्ही केला. म्हणजे आम्ही आधी प्रयोग केला आणि नंतर कळले की पळेकरांनी तो आधीच डॉक्युमेंट केला आहे. तो कल्पनेपलिकडे यशस्वी झाला आणि आता आम्ही १००% सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करू लागलो आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
स
संदीप डांगे Wed, 02/03/2016 - 11:15 नवीन
थेट वापरकर्त्यांचे अनुभव वाचून बरे वाटले, प्रयोगाची विस्तृत माहिती देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नाखु Wed, 02/03/2016 - 12:29 नवीन
इथे माहीती (अगदी तपशील्वार) द्यावी

अगदी लेखमाला झाली तरी बेहत्तर.

धुराळी धाग्यांच्या भाऊगर्दीत एखादा तरी (लाभकर्त्याचा )दर्दी धागा येऊद्या की!!! आनंदी आनंदा गडे जिकडे तिकडे चोहिकडे खुष (मस्करीवाला) नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Wed, 02/03/2016 - 19:42 नवीन
बाडीस!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
म
मोदक Mon, 07/18/2016 - 12:17 नवीन
+१११ प्रयोगाच्या विस्तृत माहितीच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एस Tue, 02/02/2016 - 14:24 नवीन
फार सकारात्मक बातमी. पाळेकरांचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 02/03/2016 - 11:28 नवीन
श्री पाळेकरांचे अभिनंदन! अगदी योग्य व्यक्तीला पद्म पुरस्कार ! अधिक माहिती साठी संदिप यांचे आभार.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र गुरुवार, 02/04/2016 - 03:20 नवीन
आज साम मराठी वाहिनीवर पद्मश्री सुभाष पाळेकर रात्री ८ ते ९ या वेळात संवाद साधणार आहेत . ०२२-६६८४३३३३ या नंबर वर फोनवरून संपर्क साधता येईल.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/04/2016 - 05:53 नवीन
आताच मुटे साहेबाना हा लेख खाराव्द्वाहित पाठवला आहे. पाहू या काय म्हणतात ते. नितीनचंद्र -पद्मश्री पालेकर साहेबांची ओख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/04/2016 - 05:54 नवीन
सदीच्छा इतकेच म्हणतो. अज्ञ शहरी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे गुरुवार, 02/04/2016 - 07:07 नवीन
सहमत व्हावेच लागेल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/04/2016 - 06:58 नवीन
बरोबरीने डांगे साहेबांना आलेले शेतकर्‍यांचे अनुभव पण पाठवा मुटे साहेबांना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/04/2016 - 06:47 नवीन
सुभाष पाळेकर हे एक मोठे नाव आहे आमच्याकड़े _____/\____ एक फ़क्त नोंदवतो पण प्रजासत्ताक दिनाला लष्करी धुरळा इतका उडतो आणि त्यात पद्म पुरस्कारांनी सन्मानीत व्यक्ती, त्यांचे कार्य याची दखल घेण्याची जागा शिल्लक रहात नाही. ठळक केलेली वाक्यरचना थोड़िशी नेगेटिव इफ़ेक्ट देणारी वाटली नितीनचंद्र साहेब, अर्थात इतक्यावरुन तुमच्या हेतुवर किंवा कळकळीवर मी शंका घेणार नाहिये अजिबात तरीही, जे प्रथमदर्शनी स्ट्राइक झाले तितके फ़क्त नमूद केले गैरसमज नसावा (माजी जय किसान आजी जय जवान) बाप्या
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 02/04/2016 - 07:45 नवीन
कदाअचित त्या निमीत्ताच्या रथ संचालनाबद्दल छायाचित्र माहीती प्रसिद्ध होते पण या यथोचेत पुरस्कार्थी बाबत काहीच तपशील्/जाहीरात दखल घेतली जात नाही याची खंत असेल. लष्कराबद्दल अनावधानेसुद्धा कुणी उणे बोलणार नाही खात्री बाळगा. रच्याकाने : बाकीच्यांचा (गणंगांचाही) परिचय दिला जातो सगळ्या निवड्णूकांमध्ये मग अश्या लायक पुरस्कार प्राप्त लोकांची माहीती का देत नाहीत स्थानीक वृत्तपत्रे/प्रसार माध्यमे. काहींचे पुरस्कार वापसी मुळे कळाले यांना कसले पुरस्कार मिळाले होते ते !!! जय जवान) वाल्या बाप्पूसोंचा जाल मित्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 02/04/2016 - 07:51 नवीन
खात्री आहेच श्रीमान! :) (ऋणी मित्र) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ब
बॅटमॅन गुरुवार, 02/04/2016 - 07:40 नवीन
एक नंबर!!!!!!! सुभाष पाळेकरांनी दाखवलेल्या मार्गावर अधिकाधिक लोक जावोत हीच सदिच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/04/2016 - 08:02 नवीन
जसं लष्कराच्या धुरळ्यात चांगले पद्मश्री मागे राहून जातात तसे शारुख खान आमीर खान ऐश्वर्या यांना पद्मभूषण किंवा सैफ अली खान विद्या बालन यांना पद्मश्री मिळाल्यामुळे त्या सन्मानाबद्दलची आमच्यासारख्यांची आत्मीयता हि कमी होते. त्यातून सलीम खान सारखे लोक पद्मश्री परत करतात कारण त्यांना असे वाटते कि आपल्याला पद्मविभूषण ( अगदी गेला बाजार पद्म भूषण) मिळायला पाहिजे होते. सन्मान कुणाला मिळायला हवा या बद्दल मला काहीच म्हणायचे नाही. असो
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/04/2016 - 08:23 नवीन
शारुख खान आमीर खान ऐश्वर्या यांना पद्मभूषण किंवा सैफ अली खान विद्या बालन यांना पद्मश्री मिळाल्यामुळे
मुळात ह्या लोकांना(सेलेब्रिटि) हे पद्म पुरस्कार कोणत्या निकषावर दिले जातात हेच समजत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2016 - 17:35 नवीन
मुलाखत ऐकल्यापासून, श्री.सुभाष पाळेकर ह्यांना भेटायची तीव्र इच्छा झालेली आहे.
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र गुरुवार, 02/04/2016 - 17:45 नवीन
भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा शेतीवर जगणारी लोकसंख्या ७०% होती जी आज स्थलांतरीत होऊन ३० % राहिली आहे. उपयुक्त शेती काही शेतकरी यांच्या वाट्याला खातेफोड करतई १ एकर किंवा त्या ही पेक्षा कमी आहे. ३ लाख शेतकरी यांच्या गेल्या दहा वर्षात आत्महत्या झाल्या आहेत. याचाच अर्थ ३ लाख कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. एकच दिवा दिसतो आहे तो म्हणजे पद्मश्री सुभाष पाळेकर साहेब. अतिशय नम्र, अभ्यासु आणि शेतीचे अधुनिक तज्ञ. गेले ३० वर्षे स्वतः शेती करुन भारतीय समस्या जसे शेती कमी, पाणी कमी, रासायनिक खतांचा बेसुमार वापर त्यामुळे नापिकी, कर्जबाजारी पण आणि सरकारचे अतोनात दुर्लक्ष. यातुन पद्मश्री पाळेकर साहेबांनी शोधलेल्या तंत्रावरची आजची मुलाखत मी शेतकरी नसुन मुद्दाम पाहिली. त्यांचे झिरो बजेट शेती, घरचे बियाणे आणि जीवाम्रुत हे गायीच्या शेणापासुन तयार केलेले खत तसेच दहा प्रकारच्या पानापासुन केलेले किटकनाशक ह्याचे त्यांनी पेटंट न घेता प्रचार केला आहे. त्यांची आकडेवारी सांगते की भारतात ४० लाख शेतकरी त्यांच्या पध्दतीने शेती करुन लाभ मिळवत आहेत. एक मराठवाड्यातला शेतकरी आजच्या साम वाहिनीवरच्या कार्येक्रमात प्रश्न विचारत होता की पाउसच पडत नाही मग शेती कशी करावी. यावर त्यांचे उत्तर अत्यंत प्रभावी होते. ते म्हणाले माझ्या पध्दतीत १०% पाऊस पडला तरी पुरे. एकदा पीक उगवले की आर्द्रतेवर जगवता येते. त्यांच्या पध्दतीने झाडांची मुळे हवेतली आद्रता शोषुन घेतात. आज मी उडालोच जेव्हा ते म्हणाले भारतात ८ कोटी गायी आहेत आणि अख्य्या भारताला माझ्या पध्दतीने शेतीला पुरक खतासाठी फक्त ४ कोटी गायी पुरेत. याही पुढे जाऊन ते म्हणाले की रासायनीक खते यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते पण त्यांच्या खतामुळे ते अजिबात होत नाही . रासायनीक खतांमुले मानवाला हानीकारक अन्नपदार्थांना खावे लागते तसेच ते सेंद्रीय खतांमुळे सुध्दा खावे लागते पण त्यांच्या पध्दतीचे खत मात्र सुरक्षीत आहे. या सर्व कामासाठी मलातर पद्मश्री हा पुरस्कार खुप लहान वाटतो. खरतर मेगासेसे पुरस्काराने किंवा नोबल पुरस्काराने सन्मान करावा अशी ही महान व्यक्ती आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 02/10/2016 - 08:49 नवीन
नितीनचंद्र, पाळेकरांना पद्मश्री पुरस्कार मिळाला यापेक्षा पद्मश्रीस पाळेकरांचा टिळा लागला असं म्हणायला पाहिजे. एकंदरीत यांचं कार्य कुठल्याही पुरस्काराच्या पलीकडलं दिसतंय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
ब
बाजीगर गुरुवार, 02/04/2016 - 18:12 नवीन
26 जाने ला पाहिले. सुभाष पालेकर हे एकच geneunely लायक पद्मश्री होते,ज्यांचा समाजाला उपयोग आहे.बाकीचे आधीच celebrity आणि लाभ मिळालेले आहेत. पाळेकर 20 वर्षापासून प्रबोधन करताहेत,शेतक-यांनी मानसिकता बदलायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ गुरुवार, 02/04/2016 - 19:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Wed, 02/10/2016 - 20:43 नवीन
उत्तम माहिती. रविवारीच सामना मध्ये यांच्याबद्दल वाचले होते. आज अजून माहिती मिळतेय
  • Log in or register to post comments
स
सुनिल जोग Mon, 02/15/2016 - 15:55 नवीन
आता कुठे पद्मश्री पुरस्काराचि इज्जत वाढलि. पाळेकर काका तुम्हला अभिवादन !
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 02/16/2016 - 08:03 नवीन
आजची दै अग्रोवन मधील भर : जपतोय जमिनीची सुपीकता... माणिक रासवे Sunday, February 14, 2016 AT 12:15 AM (IST) Tags: agro special परभणी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सेलू येथे कार्यरत असलेले यांत्रिकी अभियंता प्रदीप केंद्रेकर यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करीत पीक उत्पादनखर्च कमी केला. प्रयोगशील शेतकरी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्यांनी जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात सातत्य ठेवले आहे. शेतमाल विक्रीसाठी स्वतःची बाजारपेठ विकसित केली आहे. प्रदीप सुधाकरराव केंद्रेकर यांचे मूळ गाव झरी (जि. परभणी). त्यांची सनपुरी (जि. परभणी) शिवारात आठ एकर वडिलोपार्जित जमीन आहे. शालेय जीवनापासून त्यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये विविध पीक लागवडीचे प्रयोग सुरू ठेवले. सन १९८६ मध्ये प्रदीप केंद्रेकर परभणी जिल्हा परिषदेच्या सेवेत अभियंता म्हणून रुजू झाले. सेवा काळात त्यांची विविध ठिकाणी बदली झाली. परंतु त्यांची शेतीची आवड कायम आहे. त्यामुळे दर रविवारी ते शेतावर जाऊन पीक नियोजन करतात. तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी पीक व्यवस्थापन, विक्री व्यवस्थेबाबत चर्चा करतात. परिसरातील शेतीमधील प्रयोग पाहून स्वतःच्या शेतीमध्ये अवलंब करतात. पाच वर्षांपूर्वी श्री. केंद्रेकर आठ एकर क्षेत्रावर कापूस, तूर, मूग, ज्वारी या पिकांची लागवड करीत होते. रासायनिक खते, कीटकनाशके, संकरित बियाण्यांचा ते वापर करायचे. त्यासाठी त्यांना वार्षिक ८० हजार ते एक लाख रुपये खर्च येत होता. त्या वेळी खर्च आणि उत्पादनाची जेमतेम बरोबरी व्हायची. नफा शिल्लक राहायचा नाही. परंतु नोकरी असल्यामुळे आर्थिक ताण फारसा जाणवायचा नाही. सन २००५ मध्ये श्री. केंद्रेकर यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांच्या समवेत आर्ट आॅफ लिव्हिंगचा कोर्स केला. या माध्यमातून त्यांना नैसर्गिक पद्धतीने शेतीबाबत माहिती मिळाली. मधल्या काळात त्यांनी या शेतीपद्धतीबाबत माहिती गोळा केली. सन २०१० मध्ये त्यांनी नैसर्गिक शेती करण्यास सुरवात केली. या वेळी त्यांना सुभाष पाळेकर यांच्या चर्चासत्रातून जमिनीची सुपीकता, पीक व्यवस्थापनाबाबत माहिती मिळाली. शाश्वत सिंचनासाठी शेतापासून काही अंतरावरील दुधना नदीवरून आणलेले पाणी त्यांनी सामूहिक शेततळ्यात साठवले आहे. या शेततळ्यातून ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पिकांना दिले जाते. श्री. केंद्रेकर पीक व्यवस्थापनाच्या जमाखर्चाचा हिशेब ठेवतात. त्यामुळे खर्चात बचत करणे शक्य होते. नोकरी करत असल्याने एका मजुराबरोबरीने चौथाही हिश्श्याने पीक व्यवस्थापन ते करतात. जनावरे आणि पीक व्यवस्थापनासाठी एक मजूर रोजंदारीवर असतो. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार मजूर घेतले जातात. येत्या काळात गीर गाईंची संख्या वाढवून तूपनिर्मिती करण्याचा त्यांचा विचार आहे. असे आहे पीक व्यवस्थापन ः १) केंद्रेकर यांची आठ एकर शेती आहे. यामध्ये खरिपात सोयाबीन, तूर, कापूस, बाजरी, अंबाडी आणि हळद लागवड असते. रब्बी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा, तसेच मिरची, टोमॅटो या पिकांची लागवड असते. श्री. केंद्रेकर ज्वारी, गहू, तूर, हरभरा या पिकांच्या सरळ वाणांची लागवड करतात. त्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचे बियाणे उपलब्ध असते. पूर्वी ते बीटी कपाशीची लागवड करायचे. परंतु यंदाच्या वर्षापासून त्यांनी सरळ वाणाची लागवड केली. कपाशीमध्ये बाजरी, अंबाडीचे सापळा पीक लावले जाते. एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर त्यांचा भर आहे. बांधावर झाडोरा आहे, तसेच शेतात सापळा पिकांची लागवड असते. त्यावर पक्षी येतात. हे पक्षी कापूस व तुरीवरील कीड खातात. त्यामुळे पक्ष्यांकडूनच कीड नियंत्रण होते. यंदा त्यांना दोन एकरात आठ क्विंटल कापसाचे उत्पादन झाले. २) गेल्या पाच वर्षांपासून हळदीच्या सेलम वाणाची सरी वरंबा पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर लागवड असते. एक आड एक सरीवर ते तुरीचे बी टोकतात. गेल्या वर्षी त्यांना एकरी ओल्या हळदीचे १०० क्विंटल उत्पादन मिळाले. २५०० ते ३००० रुपये क्विंटल या दराने बेणे म्हणून त्यांनी विक्री केली. सध्या हळदीची काढणी होणार आहे. आंतरपीक तुरीची काढणी झालेली आहे. दोन एकरांतून १० क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. तुरीची डाळ करून परभणी शहरात विक्रीचे त्यांनी नियोजन केले आहे. ३) दर वर्षी रब्बी ज्वारीचे एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ज्वारीची तीन हजार रुपये क्विंटल या दराने ग्राहकांना थेट विक्री केली जाते. ४) गेल्या वर्षी पाण्याच्या ताणामुळे बन्सी गव्हाचे एकरी फक्त ३.५ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा २८ गुंठ्यांवर गव्हाची लागवड केलेली आहे. गेल्या तीन वर्षांपासून केंद्रेकर परिसरातील चार- पाच शेतकऱ्यांच्या बरोबरीने एकत्रित गव्हाची विक्री करतात. सरासरी चार हजार रुपये क्विंटल या दराने थेट ग्राहकांना विक्री केली जाते. काही प्रमाणात बियाण्यांची विक्री ते करतात. ५) गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे आठ एकरांतून खर्च वजा जाता दोन लाखांचा नफा शिल्लक राहिला. हा नफा ते शेतीच्या व्यवस्थापनात गुंतवितात. दर रविवारी शिवारफेरी केंद्रेकर हे जिल्हा परिषदेच्या सेवेत आहेत. त्यांच्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांशी थेट संपर्क येतो. आता त्यांनी शेतकरी गट तयार केला आहे. या गटात २०० शेतकरी आहेत. दर रविवारी शेतातील कामाचे नियोजन करून ते स्वतःच्या शेतावर किंवा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर शिवारफेरीचे आयोजन करतात. या शिवारफेरीत पीक व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जनावरांचे व्यवस्थापन, शेतमाल विक्रीबाबत चर्चा होते. या चर्चेतून अनुभवांची देवाणघेवाण होते. त्याचा पीक उत्पादनवाढीसाठी फायदा होतो. सेंद्रिय खतांच्या वापरावर भर ः
केंद्रेकर यांनी रासायनिक खतांचा वापर बंद केला आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, जीवामृताच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होण्यासाठी त्यांनी लालकंधारी आणि गीर गाईंचे पालन केले आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात १५ जनावरे आहेत. जीवामृत तयार करण्यासाठी देशी गाईचे १० किलो शेण, ५ ते ७ लिटर गोमूत्र, एक किलो गूळ, एक किलो हरभरा पीठ (किंवा कोणत्याही कडधान्याचे पीठ), शेतातील मूठभर माती २०० लिटर पाण्यात मिसळून ठेवतात. हे द्रावण प्लॅस्टिक ड्रममध्ये दोन दिवस ठेवले जाते. त्यानंतर चांगले गाळून ठिबकद्वारे पिकांना दिले जाते. फवारणीसाठी १०० लिटर पाण्यात पाच लिटर जीवामृत मिसळून पहिली फवारणी केली जाते. दुसरी फवारणी करताना १०० लिटर पाण्यात आठ लिटर जीवामृत मिसळून टप्प्या-टप्प्याने चार फवारण्या केल्या जातात. त्याचा पीक पोषणाला फायदा होतो.
घन जीवामृत तयार करण्यासाठी देशी गाईचे १०० किलो शेण हे १० लिटर जीवामृत चांगल्या प्रकारे मिसळले जाते. दोन दिवस सावलीत आणि त्यानंतर उन्हात वाळवले जाते. त्याची पोत्यामध्ये साठवणूक केली जाते. हे खत संपूर्ण आठ एकर शेतीला वापरले जाते. दर वर्षी प्रत्येक पिकाला पेरणीपूर्वी एकरी ५०० किलो घन जीवामृत वापरले जाते. त्यानंतर दोन कोळपणीच्या वेळी ५०० किलो घन जीवामृत वापरले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकली आहे. संपर्क ः प्रदीप केंद्रेकर ः ७५८८१५५९५१
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा