Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्री.जपे यांचा युक्तिवाद

य
यनावाला
Mon, 02/01/2016 - 17:21
🗣 89 प्रतिसाद
श्री.जपे यांचा युक्तिवाद आमच्या सहनिवासात (सोसायटीत) जपे आडनावाचे एक कुटुंब राहाते. दोन मुले आणि त्यांचे आई-वडील अशी चार माणसे. आई-वडील नामांकित कंपन्यांत उच्च पदावर. मुलगी बारावीत, मुलगा दहावीत. लगतचे दोन फ्लॅट जोडून केलेला चार बेड रूम आणि मोठा हॉल असा त्यांचा फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. चारही माणसे चांगल्या स्वभावाची आहेत. श्रीमंतीचा गर्व नाही. प्रदर्शन नाही. जपे कुटुंब सज्जन, सुसंस्कृत आहे. कुटुंबातील माणसे धार्मिक वृत्तीची आहेत. सगळे सणवार साजरे करतात. कधी सत्यनारायण पूजा असते. होम-हवन तर प्रत्येक महिन्याला असते. सकाळी चार पुरोहित येतात. हॉलमध्ये होमकुंड पेटवतात. मोठमोठ्याने आरोह-अवरोह करीत संस्कृत मंत्र म्हणतात. अग्नीत आहुत्या टाकतात. हे हवन अडीच-तीन तास चालते. दार बंद असते . बाहेरच्या खिडक्या उघड्या असतात. त्यांतून धूर निघून जातो. कुणाला तसा त्रास होत नाही. एका रविवारी वृत्तपत्रात माझा लेख छापून आला. त्यात नास्तिक मत मांडले होते. कालबाह्य रूढी, निरर्थक कर्मकांडे यांवर टीका होती. त्या दिवशी श्री.जपे आमच्या घरी आले. "या! या ! ! बसा. आज इकडे येणे कसे झाले ?" मी स्वागत केले. "आजच्या पेपरात तुमचा लेख छापून आला आहे. तो वाचला." " तुम्हांला न आवडणारे विचार त्यांत आहेत." मी हसत म्हणालो. " लेख चांगला लिहिला आहे. तुमची मते तुम्ही मांडली आहेत. मला विचारायचे होते की आमच्याकडे जे कधी कधी होम-हवन चालते त्याचा तुम्हाला काही त्रास होतो का? तुम्ही सोसायटीच्या कार्यकारी मंडळावर आहात म्हणून विचारले. " "छे! छे! ! मुळीच नाही. त्यात त्रास होण्यासारखे काय आहे? तुमच्या विरुद्ध कोणी कधी तक्रार केलेली नाही. मला वाटते तुमच्याविषयी सर्वांचे चांगले मत आहे." "तुमचा आजचा लेख वाचून मला आपले वाटले." "छे! असा गैरसमज करून घेऊ नका. लेखात यज्ञासारख्या कालबाह्य कर्मकांडावर टीका अवश्य केली आहे. पण त्या लेखाचा तुमच्या होम-हवनाशी काही संबंध नाही. तसे माझ्या मनातही नव्हते. असे लेख मी लिहितच असतो." "ठीक आहे. या संदर्भातील माझ्या शंकेचे निरसन झाले. तुम्हांला राग येणार नसेल तर आणखी एक शंका विचारायची आहे." "राग ? अहो, राग कसला? अवश्य विचारा. काहीही विचारा. मी उत्तर देण्याचा प्रयत्‍न करीन. " "माणसाने सदाचारी, सद्वर्तनी असावे. सत्य बोलावे. कुणाला फसवू नये. अन्याय करू नये. कुणाचा अपमान होईल असे बोलू नये. आपल्या वागण्याने इतरांना त्रास होणार नाही हे पाहावे. हे सर्वमान्य आहे. आस्तिक माणूस असा असू शकत नाही काय ?" "असतात . अनेक आस्तिक असे सज्जन असतात. यांत शंका नाही. तुम्ही तसे एक आहातच." "धन्यवाद ! मग सर्वांनी देव-धर्माचा त्याग करावा. कर्मकांडे करू नयेत. कशावर श्रद्धा ठेवू नये. चिकित्सा करावी. सर्वांनी नास्तिक व्हावे. असा प्रचार का करावा ?आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्‍न का करावा? प्रत्येकाला आपल्या विचारसरणी अनुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य आहे ना?" "हो. तसे घटनादत्त स्वातंत्र्य, किंबहुना अधिकार आहे. याविषयी दुमत नाही. तुम्ही मोजक्या शब्दांत चांगला युक्तिवाद केला. पण असे पाहा, धूम्रपान करण्याचे स्वातंत्र्य (काही नियम पाळून) सर्वांना आहे. असे असता "धूम्रपान करू नये. ते आरोग्याला घातक असते ." असा प्रचार समाजसेवक करतातच ना? किंबहुना शासनसुद्धा करते. ते समाजाचा हितासाठी असते. श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. आता तुमच्याकडे होणार्‍या होम-हवनाचे उदाहरण घेऊ. त्यात हवी म्हणून जाळले जाणारे उपयुक्त पदार्थ वाया जातात. ते सोडा. त्याचे प्रमाण नगण्य असेल. पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही. त्यामुळे एकूण समाजाची प्रगती खुंटते." "तुम्ही म्हणता त्यात तथ्य असावे असे वाटते. मी यापूर्वी असा विचार कधी केला नव्हता. ऐकला/वाचला नव्हता. " " कल्पना आहे. मी पाहातो की तुम्ही उभयता दिवसभर कामाला जाता. व्यग्र असता. या चक्रात अशा अन्य विषयावर विचार करण्यास तुम्हाला उसंत मिळणे शक्य नाही. हे समजते. आज तुमची जी आर्थिक सुस्थिती आहे त्यामागे तुम्हा दोघांची शैक्षणिक पात्रता, बुद्धिमत्ता, कष्ट, तुमची संयत वागणूक, निर्व्यसनीपणा, ही कारणे आहेत. त्याच्याशी होम-हवनाचा काही संबंध नाही." "आमची देवावर श्रद्धा आहे. लहानपणापासून आहे. परंपरेने चालत आलेले सण-उत्सव आम्ही साजरे करतो. हिच्या माहेरी सत्यनायणाची पूजा बरेचदा होत असे. म्हणून आम्ही करतो. त्यामागे काही ठरलेला हेतू असतो असे नाही. खरे सांगायचे तर होम-हवन करतो ते मुलांच्या भल्यासाठी. त्यांचे आरोग्य चांगले राहावे. सवयी चांगल्या लागाव्या. त्यांनी सद्गुणी व्हावे म्हणून. लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून नव्हे." "तुमची चिंता मी समजू शकतो. पण तुमच्या मुलांना वाईट संगत लागणार नाही. ती सद्वर्तनी होतील. हा आशीर्वाद नव्हे. त्याने काही साधत नाही. केवळ मनाला बरे वाटते. माझ्या विधानामागे आधार आहे. पालकांच्या वर्तणुकीचा परिणाम अपत्यांवर होतोच. घरात मद्यपान होत असेल तर मुले व्यसनी होण्याची शक्यता अधिक असते. पण तुमच्या घरात तसे काही दिसत नाही. म्हणून मुले सद्वर्तनी होण्याचा संभव अधिक आहे. पण त्याचा होम-हवनाशी कांही संबंध नाही. होम-हवन केल्याने मुले सद्गुणी होतील ही तुमची आशावती श्रद्धा आहे. " "आपली चर्चा वेगळ्याच विषयाकडे वळली." "अहो, विषयाला धरून बोलायचे म्हणजे ही काय वादविवाद स्पर्धा आहे का परिसंवाद आहे ? तिथे व्यासपीठावरसुद्धा वक्ते विषय सोडून भरकटतात. हे आपले साधे बोलणे आहे. विषय निघेल तसे बोलायचे. असो. मघाशी तुम्ही म्हणालात की आपले विचार दुसर्‍यावर लादण्याचा प्रयत्‍न का करायचा ? तर तसे नव्हे. माझ्या बुद्धीला जे विचार पटलेले असतात आणि जे लोकांच्या हिताचे आहेत असे प्रामाणिकपणे वाटते ते विचार लेखात मांडतो. त्यांच्या समर्थनार्थ युक्तिवाद लिहितो. लोकांनी ते वाचावे. त्यांच्या बुद्धीला पटेल ते घ्यावे. अशी अपेक्षा असते. त्यात कुणावर काही लादण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येकाने स्वबुद्धीने विचार करावा असे लेखात लिहिलेले असते. सर्वसामान्यपणे प्रत्येक माणसाला तर्कबुद्धी असते. बालपणापासून देवा-धर्माविषयी झालेल्या संस्कारांमुळे ती दूषित होते. पूर्व संस्कार प्रयत्‍नपूर्वक बाजूला सारून शुद्ध तर्काने विचार केला तर जे सत्य आहे, वास्तव आहे तेच माणसाला पटेल. असा विश्वास वाटतो." "तुमच्या या विचारसरणीची मला कल्पना नव्हती. " "विवेकवादी विचारसरणी अशीच असते. कोणतेही तत्त्व केवळ वेदांत आहे, पुराणांत आहे, गीतेत भगवंतांच्या मुखी आहे म्हणून ते सत्य असले पाहिजे असे मानू नये. जे बुद्धीला पटेल, आपल्या अनुभवांशी सुसंगत असेल , कॉमनसेन्सला खरे वाटेल तेच सत्य मानावे. तसेच माणसाच्या अधिकृत ज्ञानभांडारातील तत्त्वे नियम खरे मानावे." "माणसाचे अधिकृत ज्ञानभांडार म्हणजे काय ?" " भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." "आता लक्षात आले माझ्या. अद्यापि असा विचारच केला नव्हता. शेवटी एक प्रश्न विचारायचा आहे." "विचारा ना. प्रश्नांची उत्तरे देणे आवडते. इतकी वर्षे शिकवत होतो. तेव्हा अनेक विद्यार्थी प्रश्न विचारायचे. मेंदूत प्रश्न उद्भवणे आणि तो विचारणे ही चांगली गोष्ट आहे." "बहुसंख्य लोक देवाच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात. तुमची तशी श्रद्धा का नाही ?" "माझी कशावरच श्रद्धा नाही. अनेक जण देवावर श्रद्धा ठेवतात म्हणून मी ठेवावी असे नाही. ते असो. देवाच्या अस्तित्वाविषयीं सांगायचे तर त्या संदर्भात अनेक प्रश्न मेंदूत उद्भवतात. पण एकाचेही समाधानकारक उत्तर मिळत नाही. म्हणून देवाचे अस्तित्व सत्य मानत नाही. देव जर आहे तर आपले अस्तित्व सर्वांना नि:संदिग्धपणे पटेल असा पुरावा तो दाखवत का नाही ? तो इतका दडून, गुप्त का राहातो ? म्हणजे तो सर्वांना दिसायला हवा असे नव्हे. पण त्याचे अस्तित्व पटावे. त्याच्या ज्या गुणधर्मांचे वर्णन करतात त्यांचा प्रत्यय यावा. तो कधीच कसा येत नाही? देव सर्वज्ञ आहे. सर्वसाक्षी आहे. सर्वसमर्थ आहे. म्हणजे त्याला सर्व समजते. दिसते. तो काहीही करू शकतो. तसेच तो दयाळू आहे. अनाथांचा वाली आहे. न्यायी आहे असे सांगतात. मग:, * देवाच्या समोरील दानपेटी फोडून त्यांतील पैसे कसे चोरता येतात.? * देवाच्या अंगावरील दागिने, मुकुट चोरीला कसे जातात ? * निष्पाप, निरपराध बालिकेवर अत्याचार होतो तेव्हा देव काहीच करू शकत नाही हे कसे? * समाजात अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक असतात. त्यांचे देव निर्दालन का करत नाही ? मग देव न्यायी कसा? * देवदर्शनाला गेलेले भक्त कधी देवळातील गर्दीत चिरडून कसे मरतात ? देव आपल्या भक्तांना वाचवू शकत नाही हे कसे ? असे अनेक प्रश्न आहेत. पण सर्वांत गहन प्रश्न असा की हे सगळे धडधडीत सत्य दिसते त्यावर काही विचार न करता तुमच्यासारखे उच्चशिक्षित लोक देवाचे असित्व खरे कसे मानतात ? " "मी प्रश्न विचारायला आलो आणि तुम्हीच अनेक प्रश्न उपस्थित केले ! मेंदूत प्रश्न उद्भवले पाहिजेत. त्यांची उत्तरे शोधायला हवीत. हे तुमचे म्हणणे मला पटले. तुमच्या या सर्व प्रश्नांवर विचार करीन. बरे. आता तुमचा अधिक वेळ घेत नाही. येतो. " "अवश्य यावे. आपले सदैव स्वागत आहे." ..........................................................................
वर्गीकरण
चर्चा

प्रतिक्रिया द्या
23562 वाचन

💬 प्रतिसाद (89)
अ
अर्धवटराव गुरुवार, 02/04/2016 - 08:17 नवीन
आपण सर्वांनी पंखा बघितला आहे. पंखा फिरताना पात्याच्या शेवटी स्पीड सर्वाधीक असते. सेण्टर कडे जावं तशी स्पीड कमि होते. सेण्टरपासुन परत लांब जावं तर स्पीड वाढत जाते. सेण्टरवर स्पीड शुण्य असते. तो सेण्टर पॉईण्ट म्हणजे आत्मतत्व.
साधना केल्याने आत्मतत्वाची अनुभूती येते म्हणजे नेमेके काय होते?
स्थीर आणि फिरणारे, सगळेच पॉईण्ट्सच आहेत हे कळतं.
साधना स्वतच्या शरीरावर आणि मनावर करायची असते असं तुमचे म्हणणे आहे. तर साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?
उपर्निर्दिष्ट एक विशिष्ट प्रकारचा कंड शमवणे म्हणजे साधना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ग
गामा पैलवान गुरुवार, 02/04/2016 - 22:43 नवीन
अर्धवटराव, कसलं समर्पक उदाहरण दिलंय तुम्ही. तुमच्या ताजमहालास माझी वीट लावू इच्छित नाही. धन्यवाद ! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
संदीप डांगे Fri, 02/05/2016 - 03:34 नवीन
चांगले उत्तर. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 04:51 नवीन
तुम्ही दिलेल्या उदाहरणाने दोन प्रश्नांची उत्तरे मिळाली.
उपर्निर्दिष्ट एक विशिष्ट प्रकारचा कंड शमवणे म्हणजे साधना.
या वाक्यातील "कंड" ह शब्द साधना, आत्मतत्व आणि अनुभूती यांच्या "गटात न बसणारा" शब्द आहे. :) शिवाय "साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?" या प्रश्नाचे उत्तर त्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अर्धवटराव Fri, 02/05/2016 - 08:17 नवीन
धाग्याच्या अनुषंगाने कंड शब्द वापरला... सदर धाग्यावर तसंही आत्मानुभूती वगैरे गोष्टी काहि कामाच्या नाहित.
शिवाय "साधना करणे म्हणजे नेमके काय करणे?" या प्रश्नाचे उत्तर त्यात नाही.
ऑन सियीयन नोट, साधना 'करणं' असा काहि प्रकार नाहि. कारण साधना न करण्याचं ऑप्शनच अव्हेलेबल नाहि. तुमच्या खिशातल्या पैशाचं मुल्य तुम्ही काहि प्रयत्न करा वा न करा, कमि जास्त होत असतं. प्रत्येक श्वासागणिक आपलं आरोग्य बरं किंवा वाईट होत असतं. काहि लोक प्रयत्नपूर्वक संपत्ती वाढावतात, आरोग्य कमावतात हा भाग वेगळा. त्याच प्रमाणे साधना आपसूक होतच असते. वर म्हटल्याप्रमाणे स्थीर आणि अस्थीर बिंदुंमधलं अंतर कापण्याची प्रक्रीया प्रत्येक सजीवात सतत सुरु असते. तिची इंटेन्सिटी वाढवायला काहि उपचार आहेत. ते काय व कसे आहेत हा निराळा विषय आहे (आणि मला वाटतं तुम्हाला ते ठाऊक आहे). असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 02/05/2016 - 18:23 नवीन
अगदी नेमके उत्तर.
ते काय व कसे आहेत हा निराळा विषय आहे (आणि मला वाटतं तुम्हाला ते ठाऊक आहे). असो.
होय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
प
प्रसाद१९७१ Tue, 02/02/2016 - 04:48 नवीन
अरे बापरे, हे आले आपला नेहमीचाच लेख घेउन.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 02/02/2016 - 04:58 नवीन
सुंदर लेख. आवडला.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 05:17 नवीन
श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही. हीच गोष्ट कॉम्प्लान,बुस्ट, फ्यारेक्स/ लाक्तोजन,फ़ेअर आणि लव्हली इ अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल. याबद्दल आपले काय मत आहे?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 05:25 नवीन
हीच गोष्ट कॉम्प्लान,बुस्ट, फ्यारेक्स/ लाक्तोजन,फ़ेअर आणि लव्हली इ अनेक गोष्टीबद्दल बोलता येईल.
डॉ. खरे, तुमचे म्हणणे खरे आहे. :) मार्केटींगवाल्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद१९७१ Tue, 02/02/2016 - 05:29 नवीन
श्रद्धेमुळे माणसाची अतोनात हानी झाली आहे. होत आहे. अंत्यसंस्कार, बारावे, तेरावे, श्राद्ध अशा कर्मकांडांना किती खर्च येतो ? तो सर्व अनावश्यक असतो. त्याने काही साध्य होत नाही.
त्याने काही साध्य होत नाही हे चुक आहे. हे सर्व जो कोण करतो त्याला त्यातुन काहीतरी मिळतच असते. मानवजात पक्की स्वार्थी आणि हिशोबी आहे. काहीतरी फायदा होत नसेल तर अजिबात खर्च वगैरे करणार नाही कोणी. ज्या अर्थी लोक खर्च करतात त्या अर्थी त्यात त्यांना काहीतरी परतावा मिळत असतोच ( किंवा मिळेल असे वाटत असते )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गवि Tue, 02/02/2016 - 09:09 नवीन
परफेक्ट लिहीता तुम्ही. अगदी मनातलं बोललात. जे काळासोबत नष्ट झालं नाही ते सर्वांना गरजेचं असल्यामुळेच टिकवलं गेलं. योग्य अयोग्य हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 18:30 नवीन
अतिशय "प्रॅक्टिकल" प्रतिसाद. आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 05:41 नवीन
साहेब मानसिक शांतीची किंमत काय? अन्यथा साईबाबांच्या मूर्तीला हिरेजडीत मुकुट लोक का अर्पण करतात? चोरी केली तरी दानधर्म करून त्यातून होणार्या पापाच्या टोचणीतून मुक्ती मिळवण्यासाठीच लोक असे करतात. कोणतीही गोष्ट मानसिक समाधानासाठीच होत असते. माणसे कर्मकांड का करतात? आपण सर्वांचे सर्व चांगलेच करत आहोत मग आपले चांगलेच होणार हा एक विश्वास( कदाचित अंध) त्यामागे असतो. मी माझ्या मुलाला कॉम्प्लान देते कारण त्याने त्याचे चौरस आहार मिळून पोषण होईल हा "विश्वास" असतो. एखादी गोष्ट महाग म्हणजे चांगली हा हि एक (अंध) विश्वासच. शिलाजित, स्टे ऑन, "एनर्जी फोर्ट", "बैद्यनाथ व्हीटा एक्स गोल्ड सुपर स्ट्रॉंग", सारख्या गोळ्या घेणारे लोक सुद्धा याच विश्वासाने घेत असतात कि यामुळे आपल्याला तारुण्य जोम आणि स्टेमिना( भरपूर वेळ संभोग करण्याचा) मिळेल. यांच्यावर कोणी टीका करताना आढळत नाही. दुर्दैवाने बहुसंख्य नास्तिक लोक "मन" हा भाग गृहीत धरतच नाहीत. कर्मकांड करणारे बहुसंख्य लोक हे या मनाच्या शांती साठीच करीत असतात.आणि त्याला लागणारा पैसा हा ते मिळवत असलेल्या पैशाचा एक छोटासाच भाग असतो. त्यामुळे अशा टीका करणाऱ्या लोकांकडे बहुसंख्य लोक दुर्लक्ष करतात.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 02/02/2016 - 18:27 नवीन
श्रद्धा ही जोपर्यंत तुम्ही फारसा विचार करत नाही तोपर्यंत जगण्याला नक्कीच आधार देते. मी वयाची जवळपास पंचवीसेक वर्ष सश्रद्ध होतो. अगदी "ईश्वराच्या ईच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही" या कॅटेगरीतला सश्रद्ध. काहीही प्रसंग आला तरी "देवा, वाचव रे बाबा" असं तोंडून निघायचे. किंबहूना देव आपल्याला या प्रसंगातून तारून नेईल अशी श्रद्धा असायची. प्रत्येक वेळी काही निभावून जायचंच असं नाही. पण "तो आपल्या सोबत आहे" ही भावना परिस्थितीला सामोरं जायचं बळ द्यायची. पुढे वर्षागणिक माझे विचार निरिश्वरवादाकडे झुकू लागले. प्रसंग यायचे थांबले नाहीत. आता असा प्रसंग आला की मी स्वतःलाच विचारतो, "भेंडी आता कुणाला हाक मारायची?" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 06:08 नवीन
डॉ. खरेंचे दोन्ही प्रतिसाद खूप आवडले, बाकी नेहमीचंच दळण. चालु द्या. ह्या एकतर्फी लढाईला आमचा पास.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/02/2016 - 07:21 नवीन
ज्यांना रस असेल फक्त त्यांच्यासाठीच... "The Journey of Self Discovery" बाकी चालु ध्या... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- तिसरी पास तरुणाने बनवले हॅलिकॉप्टर
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/02/2016 - 07:53 नवीन
पण तुमच्याकडे कामासाठी चार बाया येतात. त्या हा हवनविधी पाहातात. मंत्रोच्चार ऐकतात. त्यांना वाटते की या साहेबांच्या घरात लक्ष्मी नांदत आहे त्याचे कारण हा होमविधी. आणि हे मंत्र. आपण असे काही केले तर आपल्यावरही लक्ष्मीची कृपा होईल. हा समज त्या वस्तीत सगळीकडे पसरतो. मोठ्या लोकांचे अनुकरण अशी माणसे करतातच. काही जण आपल्या घरात हवनविधी करून घेतात. दोन-चार हजार रुपये वाया घालवतात. ही त्यांच्या कष्टाची कमाई असते. देवा धर्माच्या नावाखाली अनेक जण श्रद्धाळूंना लुटत असतात हे स्पष्ट दिसतेच. आमचा विरोध आहे तो या फसवणुकीला. या लुबाडणुकीमुळे गरीब कुटुंबांची आर्थिक प्रगती होत नाही.
हे काही पटले नाही बुवा. आम्ही एलीडी टीव्ही घेतला. घरात येणार्‍या कामवालीने किती / केवढ्याला वगैरे विचारुन २ महिन्यात तीस हजाराचा टीव्ही घेतला. मग आमच्यामुळे तिची आर्थिक प्रगती खुंटली की काय? कोण्त्याही प्रकारची लुबाडणुक थांबवायची असेल तर डोके ताळ्यावर ठेवण्याची गरज असते. आपल्याला जे आवडेल, पटेल, झेपेल, परवडेल आणि ज्याचा इतरांना त्रास होणार नाही त्या गोष्टी अवश्य कराव्यात. मग ते देव धर्म असेल, दारु असेल किंवा इतर काही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 07:57 नवीन
असं काय करता सौंदाळाभौ, बुद्धीवादी आहेत ते, त्यांचं सगळं पटायलाच पाहिजे. उन्हे बोले ना, खुंटती करके, तो खुंटतीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा
म
मृत्युन्जय Tue, 02/02/2016 - 09:00 नवीन
किती प्रभावी अणि मुद्देसूद बोलता हो तुम्ही. मला तर वाटले होते की चर्चेअंती जपे घरी जाउन देवघर घण घालुन फोडणार आणि सगळे देव टॉयलेट मध्ये नेउन फ्लश करणार. असो. पुढच्या चर्चेच वृत्तांत देखील द्या बरं का प्लीज. तोपर्यंत तरी जप्यांना देवबाप्पा बुद्धी देइल अशी अपेक्षा (अर्र देव नाहिच नाही का? मग जप्यांना आपोआप ब्रह्मज्ञान प्राप्त होइल अशी अपेक्षा)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 09:07 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मारवा Tue, 02/02/2016 - 17:43 नवीन
" भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र, शरीर शास्त्र, आरोग्य शास्त्र, मानववंश शास्त्र, अशा विविध ज्ञानक्षेत्रांतील संशोधकांनी अथक प्रयत्‍न करून अनेक तत्त्वे शोधली. अनेक निसर्गनियम शोधले. ते पुन:पुन्हा तपासले. त्यात वेळोवेळीं सुधारणा केल्या. त्या सत्य नियमांचा, तत्त्वांचा संग्रह म्हणजे मानवी ज्ञानभांडार. त्यात सतत भर पडत असते. ते सर्वांना मुक्तपणे उपलब्ध असते. त्यावर कोणाचा एकाधिकार नसतो. आपण शाळा-कॉलेजांत जे ज्ञान म्हणून शिकतो ते या भांडारातील असते. जगभरातील सर्व अधिकृत शिक्षणसंस्थांत हेच ज्ञान शिकवतात. या ज्ञानसंचयातील नियम,तत्त्वे, विश्वासार्ह असतात." इतका जरी नीट समजला तरी फार मोठा बदल होइल. गोष्ट छोटी...... डोंगराएवढी.............
  • Log in or register to post comments
P
palambar Tue, 02/02/2016 - 19:05 नवीन
चांगला लेख , मला पटला. कर्मकांड करण्याचि जरुरि नाहि , पण मन ताब्यात ठेवण्यासाठि , मानसिक आधारासाठि काहितरि उपाय लागतो त्या साठि श्रद्धा हा एक सोपा उपाय आहे असे वाट्ते .
  • Log in or register to post comments
V
viraj thale Tue, 02/02/2016 - 19:14 नवीन
gods particles higs-boson
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Wed, 02/03/2016 - 16:34 नवीन
यनावाला सर, तुम्ही तोंड दाबून बुक्क्यांचा मार देता बुवा!!! म्हणजे कोणाला न डिवचता,सयंत भाषेत,छान छान
  • Log in or register to post comments
य
यनावाला गुरुवार, 02/04/2016 - 09:23 नवीन
हार्दिक आभार सर्वश्री ...प्रचेतस, ...संदीप चंदने, ...रामपुरी, ...सतीश गावडे, ...आत्मबंध, ...नादखुळा, ...पगला पयोधर,...लंबूटांग,...आनंदा,...मारवा,...पलंबर,...यॉर्कर , तसेच ...अजया या सदस्यांनी "जपे...." लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 02/04/2016 - 10:07 नवीन
:) पगला पयोधर हा शब्द अगदी काळजाला भिडला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
य
यनावाला गुरुवार, 02/04/2016 - 16:30 नवीन
श्री.पगला गजोधर यांचे नाव पगला पयोधर लिहिले ही माझ्या हातून मोठी चूक घडली. श्री.गजोधर यांची क्षमा मागतो. श्री.प्रचेतस यांनी ती चूक निदर्शनाला आणून दिली. त्यांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बॅटमॅन Fri, 02/05/2016 - 12:47 नवीन
पगला पयोधर रोफळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ्ळ =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/04/2016 - 10:40 नवीन
लेखाला अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. त्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! अन्य काही सदस्यांचे या लेखाविषयी प्रतिकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. त्याविषयी ना खंत ना खेद. "कोणी निंदा, कोणी वंदा । असे हा लोकहिताचा धंदा ।"
काही सदस्यांचे या लेखाविषयी अनुकूल मत आहे. ते त्यांच्या श्रद्धासरणी अनुसार स्वाभाविक आहे. असे नाही वाटत का?
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 02/05/2016 - 13:27 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
य
यनावाला Fri, 02/05/2016 - 16:19 नवीन
@ तर्राट जोकर .......... काही सदस्यांनी अनुकूल प्रतिसाद दिले आहेत. ते त्यांच्या विचारसरणी अनुसार स्वाभाविक आहेच. तसेच त्या सदस्यांना धन्यवाद देणे हे सुद्धा स्वाभाविकच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 02/05/2016 - 20:38 नवीन
जे अनुकूल ते 'विचार'सरणीवाले | जे प्रतिकूल ते 'श्रद्धा'सरणीवाले || कूSSSल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यनावाला
आ
आनन्दा गुरुवार, 02/04/2016 - 11:53 नवीन
बाकी यनावालांना मिपाचे "राहुल द्रविड" पुरस्कार द्यावयास काय हरकत आहे? मागचे २-३ महिने ते सलग बॅटिंग करत आहेत. चौकार षटकार न मारता संथपणे २ शतकी ३ शतकी ़हेळ्या केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव मी मांडत आहे.
  • Log in or register to post comments
P
palambar गुरुवार, 02/04/2016 - 18:42 नवीन
जरुर देण्यात यावा, टिका सहन करुन आपले विचांर शांतपणे व्यक्त करणे हि सोपि गोश्ट नाहि.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/04/2016 - 18:51 नवीन
डिस्कवरी सारख्या चॅनेलवर पण आता प्रेतआत्मा/भूत वगैरेच्या खर्या घटना(?) दाखवतात,आणि तेही अमेरिकेमधल्या बर का!!! मग प्रेतात्मा असेल तर देवही असणार कि,
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 02/05/2016 - 22:59 नवीन
बाकी काही म्हणा, यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे. ती नास्तिपक्षावर आहे म्हणून त्यांना नास्तिक म्हणायचं. अन्यथा ते कट्टर आस्तिकाहून कोणत्याही प्रकारे कमी नाहीत! श्रद्धा असणं महत्त्वाचं. मग ती अस्तिपक्षावर असो वा नास्तिपक्षावर! कीप इट अप. -गा.पै.
  • Log in or register to post comments
य
यनावाला Sat, 02/06/2016 - 16:50 नवीन
श्री.गामा पैलवान लिहितात,
,"....यनावाला यांची श्रद्धा वादातीत आहे."
"माझी कशावरही श्रद्धा नाही" असे लेखात स्पष्ट म्हटले आहे.ते सत्य आहे. सर्वसाधारण बोलण्यात आपण "श्रद्धा, निष्ठा,विश्वास" हे तीन शब्द सामान्यपणे समानार्थी वापरतो. ते ठीक आहे. पण या तीन भिन्न संकल्पना आहेत. प्रत्येकाचा विशिष्ट अर्थ आहे, असला पाहिजे. श्रद्धा आख्यानात हे अर्थ स्पष्ट करण्याचा यथामती प्रयत्‍न केला आहे. त्यांतील श्रद्धाव्याख्या अशी: ....... "१: श्रद्धेची परिभाषा (व्याख्या) सर्वसमर्थ सर्व व्यापक । संकटमोचक अलौकिक । जगनिर्माता जगच्चालक । देव ऐसे नाम तया ॥१॥ आहे तो हे मानणे सत्य । पूजा-पाठ-प्रार्थना नित्य । करी विघ्नांचे पारिपत्य । जाणावी मूळ श्रद्धा ही ॥२॥ श्रद्धेची परिभाषा परिसा । जे कुठे न दिसे माणसा । जयाचा काही प्रत्यक्षसा । अनुभव न ये कधीही ॥३॥ ज्याच्या सत्यतेची शक्यता । तर्कबुद्धीने शोध घेता । युक्तिवाद काही करिता । निघे निष्कर्ष नकार। ॥४॥ ज्ञानक्षेत्रीं वैज्ञानिकांनी । निसर्गनियम संशोधुनी । पुन:पुन्हा ते तपासोनी । ज्ञानभांडार निर्मियले ॥५॥ मानवी ज्ञानसंचयीं या । नाही स्थान श्रद्धाविषयां । आत्मा-पुनर्जन्म-ब्रह्म-माया । आदि विषय श्रद्धेचे ॥६॥ हे सत्यज्ञानाचे भांडार । यांतील तत्त्वांचा आधार । घेवोनिया केला विचार । तरी बुद्धीस पटेना॥७॥ ऐसे तत्त्व सत्य मानणे । पूर्वसंस्कारांच्या कारणे । ही तर्कहीन वृत्ती जाणे । श्रद्धा नामे प्रसिद्ध ॥८॥ असत्य हे बुद्धीसी कळे । परी भावनेसी न वळे । ते मानणे भावनाबळें । सोपी व्याख्या श्रद्धेची ॥९॥
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/07/2016 - 10:21 नवीन
यनावाला, श्रत् म्हणजे ऐकलेले (वा अनुभवलेले) ते धा म्हणजे धारण करायची शक्ती अशी श्रद्धा या शब्दाची फोड आहे. साहजिकच श्रद्धा ही मनाच्या क्षमतेची निदर्शक आहे. हिचा विश्वासाशी थेट संबंध नाही. विश्वास नसलेले श्रद्धावान असू शकतात. याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते नरेंद्र असतांना नास्तिक आणि ब्राह्मोसमाजी होते. मात्र असं असलं तरी देवासंबंधी काही ऐकलं तरी त्यावर मनन चिंतन केल्याखेरीज त्यांना चैन पडंत नसे. थोडक्यात तुम्ही ज्याला श्रद्धा म्हणता त्याला मी विश्वास म्हणतो. फक्त इतकाच फरक आहे. त्यामुळे तुमची नास्तिपक्षावरची श्रद्धा (= मनोक्षमता) तशीच राहू द्यावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा