नॉमिनी ..हक्क व अधिकार
नेहमीच्या 'शेअरबाजार' या विषयाकडुन थोडे विषयांतर करतो क्षमस्व.... 'नॉमिनेशन' या महत्वाच्या मुद्द्याबद्दल लिहितो आहे . मी विषयांतील तज्ज्ञ् नाही सबब चुकभुल द्यावी घ्यावी.
नॉमिनीचे खरे अधिकार कोणते?? त्याची भुमिका मालकाची की विश्वस्ताची ?? मालकी हक्काची निश्चिती करत असताना प्राधान्य क्रमाने हक्क कुणाचा ?? नॉमिनीचा, वारसा हक्क कायद्याने असलेल्या वारसाचा की मृत्युपत्रांत उल्लेल्ख केलेल्या एखाद्या अन्य व्यक्तीचा ??.... हे नेहेमी उद्भवणारे आणि जटिल प्रश्न आहेत जे आजपावेतो अनेक न्यायालयीन निवाड्यांच्या भट्टीतुन तावुन सुलाखुन निघाले आहेत.
बॅंक खाती, विविध इन्व्हेस्ट्मेंट्स, शेअर्स, विमा पॉलिसीज, प्रॉव्हीडट फंड आणि स्थावर मालमता अशा वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळ्या कायद्यातील लागु कलमांच्या आधारे या प्रत्येक प्रकारच्या मालमत्तेचा मालकी हक्क कसा ठरेल, या बाबत निश्चित असे ( परंतु वेगवेगळे) मापदंड न्यायालयीन निर्णयांतुन अस्तित्वात आहेत. उदा. अहमदाबाद उच्च न्यायलयाने 'केसरीबाई वि. धर्माबाई' ह्या खट्ल्यांत, दिल्ली उच्च न्यायलयाने 'फौजा सिंह वि. कुलदीप सिंह' या, तर तामिळ्नाडु उच्च न्यायलयाने 'करुप्पा गोंदर वि. पलानीअम्मल' या खट्ल्यांत पॉलिसीचे पैसे हे नॉमिनीस मालकी हक्काने मिळावेत असा निर्णय दिला होता, उलट दुसरीकडे, अशा्च अनेक खटल्यांत अन्य काही उच्च न्यायालयांतुन '-- नॉमिनीची भुमिका ही केवळ विश्वस्ताची असुन केवळ विमा कंपनी कडुन पैसे स्विकारण्यापुरती मर्यादित आहे. ते पैसे मृत्युत्राप्रमाणे वा वारसा कायद्या प्रमाणे मृताचे कायदेशीर वारसाकडे सुपुर्द करणे वा अशा रकमेचे वारसांदरम्यान यथास्थित वाट्प करणे ही त्याची जबाबदारी आहे--' अशी कायदेशीर भुमिका घेण्यांत आली होती.
या सर्व संभ्रमाचे पार्श्वभुमीवर, आयुर्विमा पॉलिसीच्या मालाकी ह्क्कासंदर्भांत इन्शुरन्स कायदा 1939 मधील कलम 39 ह्या निर्णायक कलमाचा अर्थ लावत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 'सरबती देवी वि. उषा देवी' या प्रकरणांतील निर्णयाने पडदा पडला. या महत्वपुर्ण निकालांत मा. सर्वोच्च न्यायलयाने (1) इन्शुरन्स कायद्यामध्ये नॉमिनीला वारसदाराचा दर्जा दिल्याचे कोठेही सुचित केलेले नाही आणि (2) सदर कलमांत नॉमिनीने पैसे स्विकारावेत असे म्हणले आहे पण पैशांच्या मालकीबद्दल काहीही म्हणलेले नाही...... ही महत्वपुर्ण निरिक्षणे नोंदवुन 'नॉमिनी' अशा मिळालेल्या रकमेचा केवळ विश्वस्त आहे, मालक नाही असा निवाडा केला आणि तदनंतर आजतागायत हीच भुमिका विमा पॉलिसी संद्रभांत मार्गदर्शक म्हणुन कायम आहे.
मात्र विमा पॉलिसीसंद्र्भात दिलेल्या ह्या निर्णयानंतर नॉमिनेशन याच विषयावरील आणखी एक महत्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. महत्वाचे म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थेतील नॉमिनेशनबद्दल़ हा निकाल असल्याने तो आपणा बहुतेकांशी संबधीत आहे व म्हणुनच माझे नेहमीचे विषय सोडुन कायद्याच्या जंजाळांत शिरण्याचे धाडस मी केले आहे.
ईंद्राणी वाही वि. निबंधक सहकारी गृहनिर्माण संस्था ह्या खटल्यांत मुळ सभासदाने आपले मालकीचे रहाते फ्लॅटचे नॉमिनेशन आपल्या मुलीच्या (ईंद्राणी वाही) नावे केले होते. मात्र सदर गृहस्थांचे मृत्युपश्चात त्यांच्या पत्नीने वारसाहक्क कायद्याचा आधार घेत सदर फ्लॅट आपल्या नावे करण्याची विनंती सोसायटीला केली. त्याचवेळी मुलीने नॉमिनेशन आपल्या नावे असल्याने फ्लॅट आपल्या नावे व्हावा अशी भुमिका घेतली...
सदर खटल्यात अगदी निबंधकांपासुन ते पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत वेगवेगळ्या पातळीवर अनेक महत्वाचे मुद्दे अगदी तपशीलवार तपासले गेले, नेहमीप्रमाणे अन्य निवाड्यांचे संदर्भ व त्यांची कारणमिमांसा झाली. शेवटी एकदा एकाच्या तर नंतरच्या अपिलांत विरोधी बाजुने असे उलट फेर होता होता मा. सर्वोच्च न्यायालयाने नॉमिनीच्या बाजुने निर्णय देत असताना नॉमिनेशन केले असल्यास अन्य कोणत्याही पुराव्याची ( वारसादाखला वा प्रोबेट वा अन्य) गरज नाही व असा फ्लॅट नोमिनीच्या नावे तबदील करणेत यावा असा महत्वपुर्ण निर्णय दिला...
अर्थात नॉमिनी नेमताना कोणत्रे निकष असावे याचीही अतिशय सखोल चर्चा या निकालपत्रांत केली आहे आणि ती ही या निकालपत्रांतील महत्वाची बाजु आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या संपत्तीच्या वाटपाचे निकष वेगवेगळे आहेत आहेत असा निष्कर्ष आपल्याला यातुन काढता येईल.
(कोणास या निवाड्याचा अभ्यास करावयाचा असल्यास व मला व्यक्तिगत विनंती केल्यास मी हे २२ पानी निकालपत्र उपलब्ध करुन देवु शकेन..) - (Adv नसलेला) प्रसाद भागवत
वेगवेगळ्या संपत्तीस्त्रोतांचा बाबतीत नॉमिनीची भुमिका ही वेगवेगळी असेल.नॉमिनीला कायद्यापेक्षा वेगळी भूमिका घेता येत नाही... या केससंबंधी कायदासंम्मत "संपत्तीस्त्रोत व त्यावर अवलंबून असणारे त्या संपत्तीचे वाटप करणार्याचे हक्क" वर लिहिले आहेतच. सदर खटल्याच्या निकालपत्रात... (अ) संपत्तीस्त्रोत हा सोसायटीचा विषय नाही व त्यामुळे सोसायटीने त्याचा विचार न करता नॉमिनेशनमध्ये लिहिल्याप्रमाणे कारवाई करावी. (आ) संपत्तीस्त्रोत या किंवा इतर मुद्द्यावर एखाद्या वारसाला नॉमिनेशनला विरोध करावयाचा असल्यास त्याने तसा दावा कोर्टात करून कोर्टाकडून आदेश/निर्णय घ्यावा... असे म्हटले आहे.