एक मरा'ठी', लाख मरा'ठी'
मोर्चाला उदंड प्रतिसाद! खरंच गंमत वाटते या सगळ्या लोकांची. केवढा जमाव, केवढी बांधाबांध, घोषणा, सोशल मिडियावर संदेश... सॉलिड सगळं. पण नक्की कशासाठी आहे हे? असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला केला तर कदाचित उत्तर चटकन मिळणार नाही. कारण तसा विचारच केलेला नसेल. आणि तेच हवं असतं मोर्च्याच्या मागे असणार्या मंडळींना. पण आश्चर्य वाटतं की कुणाचाच विचार व्यापक कसा होत नाही? पदोपदी आपल्याला मॅनिप्युलेट केलं जातंय तरी कळूच नये ही गोष्ट? म्हणजे मोजके लोक हजारो लोकांना एका अशा गोष्टीसाठी एकत्र आणू शकतायत, जी गोष्ट मिळेल, न मिळेल, तिचा आपल्याला नेमका काय फायदा होईल याची काडीमात्र कल्पना त्या लोकांना नाही. यायचं फक्त एकत्र! तेही सहपरिवार, कामधंदे सोडून. अरे विचार करा ना थोडा... टीव्हीवर बघितलं मी, एक लहानगं मूल बाबांच्या कडेवर बसून माईक समोर धरताच म्हणालं 'एक मराठा, लाख मराठा'. बाबा पण लगेच 'शाब्बास!' म्हणाले त्याला. कीव करावीशी वाटली. काय करतोय आपण? त्या मुलाला काहीच कळत नाही तो पाठ केलेलं म्हणाला. पण त्याच्या बाबांनी नीट विचार केला का, की आपण हे सगळं कशाला करायचंय? त्यात आपलं नक्की उद्दिष्ट काय आहे? आरक्षण! बरं आरक्षण म्हणजे काय? त्याने आपण नेमकं काय साधू? ते आपल्या विकासाला कारण होईल का राजकरण्यांच्या? एकदम कुणीतरी उठावं, आणि 'मी तुला न्याय मिळवून देईन' म्हणत आपल्या खांद्यावर हात टाकावा.. यातलं काळंबेरं कसं काय दिसत नाही तिथे जमलेल्या एकालाही? अरे केवढं काय काय त्या मोर्चासाठी; टीशर्ट, झेंडे, बॅनर, जाहिराती... कोण पैसे देतंय याला? का? वास्तविक या जगात कुणालाच कुणाबद्दल इतका पुळका नसतो हे सूज्ञ जाणतीलच. सो इट इज क्लियर की यामागचा हेतू दुसराच आहे आणि जमलेली माणसं ही केवळ निमित्त ठरतायत.
आणि मग दुसरीकडे अजून कुठल्या एका समाजाचा क्रांती मोर्चा निघाला. आणखी एका समाजानेही व्हॉट्सॅपवर संदेश फिरवला, 'आम्ही पण मोर्चा काढणार, स्वयंशिस्तीची ताकद वगैरे दाखवणार'. आनंद आहे. डिव्हाईड अँड रूल इंग्रजांनाही जेवढं जमलं नाही तेवढं आपल्याच लोकांना जमलंय. तिथे अमेरिकन व्हिजाच्या कार्यालयात कुठल्या भाषेत घोषणा होतात, कॅनडात तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कुठली आहे गूगल करून बघा. इथे आपण आपल्या आपल्यातच शक्तीप्रदर्शनं करून कुठे जातोय, वर की खाली ते वेळीच समजा. इथे महाराष्ट्रात मराठी माणसालाच आरक्षण द्यायची वेळ आलीय ऑलरेडी! त्यामुळे मराठा किंवा अजून कुणाला आरक्षण मिळो न मिळो काहीही फरक पडणार नाहीये हे लक्षात घ्यायला हवं. तो फरक पडूच द्यायचा नाहीये खरं तर धूर्त राजकारण्यांना. त्यामुळे हे मोर्चे कशाच्या पार्श्वभूमीवर प्रेरित केले जातायत, वगैरे सगळं नीट विचार केला तर स्पष्ट दिसेल. पण नेमका तोच आपण करत नाही आणि हरत जातो. इतर भाषिक (जातींमधे न अडकता) किती व्यवस्थितपणे आपापल्या लोकांचं हित जपतात ते शिकण्यासारखं आहे. आपल्या माणसाला थोडं नुकसान करूनही धंदा मिळवून देतील, मग भले बाकी वेळी फसवेगिरी करतील पण आपल्या वर्तुळाबाहेर काम जाऊ देणार नाहीत.
शक्तीचं नुसतं प्रदर्शन करून काय मिळवतोय आपण? उपयोग कधी करणार? आणि उपयोग म्हणजे डोकी बाजूला ठेवून जाळपोळ करणं नव्हे, तर वर्तणुकीत, धोरणांत प्रगल्भता आणणं, जाती-उपजातीच्या जरा पुढचा विचार करणं. लाकडाच्या मोळीची गोष्ट; एकीचं बळ आपण शिकलोत, माकड आणि मांजराची खव्याची गोष्ट आपण शिकलोत, शिकलोत ना? मग त्यात सगळं स्पष्ट सांगितलंय, पण विसर पडलाय आपल्याला. आपण विचारच करत नाही. आणि याचा पुरावा मोर्चातल्या तरूण, सुशिक्षित लोकांना बघून मिळालाच. वाईट वाटलं. आणि हे असंच होत राहणार असं विदारक चित्रही दिसलं. वी आर बीईंग फूल्ड, मॅनिप्युलेटेड इन द नेम ऑफ अॅन इल्यूजनरी इंटरेस्ट. खरं तर आज एक मरा'ठी' लाख मरा'ठी' म्हणण्याची गरज आहे; पण तसा मोर्चा कधी निघेल का ते ठाऊक नाही. कदाचित नाहीच.
मुख्यमंत्र्यांच्या आप्ताना मात्र अगदी तत्परतेने भरपाई मिळण्याचा चमत्कार घडतो तर गारपीट आणि अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्यांसाठी जाहीर झालेली भरपाई त्यांना मिळत नाही. परंतु मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्रीपद भूषविणार्या पतंगराव कदमांच्या मतदारसंघात अतिवृष्टी सोडा सर्वसाधारण पाऊसही झालेला नसताना पाच कोटीची भरपाई मिळण्याची किमया घडते. हे सगळे प्रकार `आमचं ते आमचं आणि तुमचं ते ही आमच्याच बापाचं’ अशाच खाक्याने सगळा कारभार सुरू असल्याचे द्योतक आहे. चार वर्षे झोपन राहायचे. आपले आणि आपल्या पक्षाचे कोटकल्याण करण्यात मग्न रहायचे व निवडणुका तोंडावर आल्या की आपण जनतेसाठी फार काही मोठे करीत आहोत, असा आव आणण्यासाठी धावत पळत फुसक्या योजना गाजावाजा करून सुरू करायच्या या आजवरच्या खटाटोपामुळे या सगळ्या योजनांचा फजितवडा होतो आहे, हे आमचे सरकार आणि सत्ताधारी पक्ष कधी समजून घेणार?
========== हे डोळ्यासमोर दिसत असूनही ज्यांनी केले त्यांना जाब विचारावा वाटत नाही? हात बांधले आहेत का मोर्च्याकर्यांचे कुणी? का मोर्चा बोलविता धनीच या वाटमारीत असल्याने विचारायची लाज वाटते?