नोटा बदलल्यात आता व्यवहारही बदला
८० च्या जमान्यात दूरदर्शनवरील एका लघुकथा सिरिअलचा एक एपिसोड आठवतोय. त्या एपिसोडची स्टोरीलाईन अशी होती कि,
हरियाणातल्या एका खाप पंचायतीच्या मिटिंगमधे एका प्रेमप्रकरणाचा निवाडा चालू असतो. हलक्या जातीच्या बाबुलालला त्याच्या प्रेमाची शिक्षा म्हणून खापपंचायत वाळीत टाकण्याची शिक्षा देते आणि बाबुलाची गावात परवड सुरु होते. बाबुलाल कसाबसा त्या गावात तग धरून असतो.
इकडे काही दिवसांत पंचायतीच्या ऑफिसमधे जुने रॉकेलचे कंदील बाद करून जास्त प्रकाश देणारे गॅस बर्नरचे दिवे घेतले जातात(Gas mantle). पण हे दिवे पेटवायचे कसे हा मोठा प्रश्न असतो. गावातल्या कोणालाही या नव्या टेक्नॉलॉजिबद्दल माहित नसतं. कर्णोपकर्णी काही दिवसांनी पंचायतीला समजतं कि "बाबुलालला" हे दिवे कसे पेटवायचे ते चांगलं माहित आहे. शहरातल्या लग्नांत हेच दिवे घेऊन बँड पथकाबरोबर फिरायचं काम बाबुलालने केलेले असते. आता पंचायतीत बाबुलालची डिमांड वाढते. बाबुलालही परिस्थितीचा फायदा घेत स्वतःच्या डिमांड पंचायतीकडून कबुल करवून घेत आपल्या प्रेयसीबरोबर लग्न करून सुखाने गावात जीवन जगतो. (शाम बेनेगल डायरेक्टर असावेत बहुतेक)
हा एपिसोड मला त्या वयात खूपकाही शिकवून गेला. माझा स्वतःचा बोध असा होता कि ज्या सर्कलमध्ये आपण वावरतो त्या लोकांपेक्षा आपलं ज्ञान एक पाऊल पुढे असल्यास आपलं महत्व आबाधित रहातं. वाघ मागे लागल्यास आपल्याला आपल्या मित्रापेक्षा फक्त पाच फूट पुढे पाळता आलं बस झालं. प्रोफेशनल जीवनात एका कंपनीत मॅकेनिकल ड्राफ्टमन म्हणून करिअरची सुरवात करत पुढे पार्टटाईम शिकत शिकत एका MNC कंपनीचा IT मॅनेजर होण्यापर्यंतचा माझा प्रवास हा वरील बोधावरच आधारित आहे.
IT मॅनेजर म्हणून माझ्या कंपनीत मी तीन-चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केलेत (त्याबद्दल लिहीन कधीतरी). ‘मॅनेजमेंट डिसिजन’ किंवा ‘IT गाईड लाईन्स’ अश्या गोंडस नावाखाली कंपनी स्टाफला नवीन टेक्नोलॉजीकडे ढकलत असतो. रामा गड्याला राखुंडी ऐवजी डिशवॉशर दिला कि कसा गोंधळ होतो तोच प्रकार कंपनीच्या गो-लाईव्ह प्रकरणात होतो. १५-२० दिवस गोंधळ होतो पण नंतर परिस्थिती पूर्वपदावर येते.
वरील सर्व उदाहरणांचा "नोट बंदिशी" तसा काही संबंध नाहीये पण हे सुचवायचं आहे कि स्वतःला अपडेट ठेवणे हा टिकून रहाण्याचा आणि गैरसोय टाळण्याचा राजमार्ग आहे. पैसा विनिमयाच्या नवीन डिजिटल पद्धती या वेळीच अंगिकारल्या नाहीत तर नोटबंदीच्या रांगेत परत उभे रहाण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. या नोट बंदीच्या धामधुमीत सर्वांत शांत होते ते ऑनलाईन व्यवहार करणारे. माझ्या बाबतीतही अगदी भाजीपाल्यापासून ते कामवालीच्या पगारपर्यंत ऑनलाईन पेमेंटची सवय लावून घेतल्यामुळे "नोटबंदीच्या" भूकंपात माझ्या मिसेसला बँकेत लाईन लावावी लागली नाही. हाथखर्चासाठी जावं लागेल पण तोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आलेली असेल. नोटा बदलीहि करायच्या आहेत पण घाई नाहीये.
मोदींच्या कॅम्पेनच काय होईल ते येत्या काही वर्षांत कळेलच. पण सुज्ञ मिपाकरांना या सर्व अमृतमंथनातून एक गोष्ट लक्षात आली असेलच कि "ऑनलाईन व्यवहार, प्लास्टिक मनी" हे शब्द आता सतत आपला पाठपुरवठा करत रहाणार. नोटबंदी सारखे स्ट्राईक पुढेही होत रहातील. डिजिटल व्यवहारांकडे स्वतःला वळवणं हि काळाची गरज आहे. मात्र बऱ्याच मंडळींची ऑनलाईन व्यवहाराबद्दल एक भीतीची भावना असते.
नेमकी कोणती भीती वाटते?, इच्छा आहे पण कसं करायचं?, कोणती काळजी घ्यायला पाहिजे? कोणत्या साईट्स खरेदीसाठी भरवशाच्या आहेत? याबद्दल बऱ्याच मिपाकरांना प्रश्न पडत असतील. मिपावर बरेच आयटी तज्ज्ञ आणि ऑनलाईन खरेदीचा अनुभव असणारी मंडळी देखील आहेत. तुमचे प्रश्न, शंका, अनुभव नेमक्या मांडल्यात तर माझ्यासकट इतर मिपाकरहि समर्पक उत्तरं देतील.
उदा. (माझा अनुभव)
गेली २ वर्षे मी "भाजीवाला डॉट कॉम" साईटवरून भाज्या खरेदी करतो. फ्री घरपोच डिलिव्हरीसाठी कमीतकमी ३०० रुपयाचं बंधन असतं, नारळ खराब निघाला, काकडी कडू निघाली तरीही परत करता येते. साईटवर असलेल्या वॉलेटमध्ये पैसे भरून खरेदी केल्यास कॅशबॅकहि मिळते. COD सुविधाही आहे. बाजारातील भाजीचे भाव आणि इथले भाव यात फार तफावत जाणवली नाही.(To be check). वर्षभराचा भाजीपाल्याचा रेकॉर्ड पहाता येतो. नोटबंदीच्या काळात या साईटवरून शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही मदत करता आली.
(तूर्तास यांची सेवा ठाणे शहरापुरती मर्यादित आहे).
स्वतःला अपडेट ठेवणे हा टिकून रहाण्याचा आणि गैरसोय टाळण्याचा राजमार्ग आहे.+१००० त्याचबरोबर... अनुचित लोभ टाळून आणि तोशीस पडली तरी, कायदेशीरपणे व नीतीमत्तेने वागले तर, रात्रीची झोप खराब होत नाही. रात्रीच्या उत्तम झोपेइतके* मोठे धन या जगात नाही, हा स्वानुभव आहे ! :) ====== * : तसेही, रात्रीची पूर्ण झोप झाल्यावरही, कधिही व कोठेही पाच मिनिटांत डाराडूर झोपू शकतो असा आमचा लौकीक आहे ;) :)