Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म

आ
आदित्य कोरडे
Sun, 01/08/2017 - 05:44
🗣 121 प्रतिसाद
उमेदवाराने प्रचार करताना किंवा मते मागताना त्याच्या किंवा मतदारांच्या धर्म, जात, संप्रदाय किंवा भाषेच्या नावावर मते मागणे हे बेकायदेशीर आहे असा महत्वाचा निकाल हल्लीच म्हणजे २ जाने.२०१७ रोजी दिला आहे. खरेतर ह्यात आश्चर्यजनक किंवा अगदी विचारप्रवर्तक असे काही नाही. भारताच्या घटनेप्रमाणे इथे निवडून येणारा लोकप्रतिनिधी मग तो हिंदू मुस्लीम, ब्राह्मण, मराठा, महार, ओ बी सी कुणीही जरी असला तरी तो त्याच्या धर्माचे किंवा जातीचे प्रतिनिधित्व करीत नसतो तर तो अखिल भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतो. इतका साधा अर्थ ह्या निकालाचा आहे. भारतीय संविधानाने अगदी सुरुवातीपासूनच धर्म निरपेक्ष असे रूप धारण केले आहे नव्हे तो त्याचा गाभा आहे. पण प्रत्यक्षात स्थिती अशी आहे कि जात, धर्म, वंश, प्रादेशिकता, भाषा अशा निरनिराळ्या गटात आपली लोकशाही विभागली गेलेली आहे. स्वातंत्र्य मिळताना ५६५ संस्थाने आपण मोडीत काढली पण भारतीय मन, ते सरंजामशाहीच राहिले. त्यामुळे निरनिराळ्या पक्षांच्या रूपाने नवी-जुनी घराणी पुन्हा आपली सरंजामशाही मनोवृत्ती जोपासत आहेत घराणेशाही वाढवत आहेत. तोंडाने लोकशाही, समाजवाद धर्म निरपेक्षता अन काय काय बोलतात पण वागताना?ह्या पक्षांचे आणि त्यांच्या मालकांचे वर्तन अगदी मध्ययुगीन राजे महाराजान्साराखेच आहे.त्यांच्या अनुयायांचे वर्तन हि तसेच. वैयक्तिकबाबीत, खाजगीमध्ये माणसाला त्याच्या धार्मिक समजुती बाळगण्याचे, पाळण्याचे स्वातंत्र्य जरी घटनेने आपल्याला दिलेले असले तरी आरोग्य, सामाजिक व वैयक्तिक नीतिमत्ता, अन सुरक्षितता यांना विरोधी जाणारे धर्माचे आणि व्यक्तीचे आचरण अवैध ठरवून पर्यायी योग्य व वैध आचरण कोणते हे ठरवण्याचा अधिकार घटनेला आहे.ह्याचा सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतो. ह्या टप्प्यावर कुरुन्द्करांसारख्या साक्षेपी विचारवंताची आठवण येथे झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी समजावून सांगितलेला सेक्युलारीझाम ह्या निमित्ताने इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला समजलेला कुरुन्दकर गुरुजींचा सेक्युलरिज़म (खालील लेख नरहर कुरुंदकरांच्या ‘जागर’ ह्या पुस्तकातील लेखामधल्या विचारावरून लिहीलेला आहे.) Secularism ह्या शब्दाचं नक्की मराठी भाषांतर कारण तसं अवघड काम आहे. अधर्मी, निधर्मी, धर्मातीत ह्या शब्दांनी secularism चा अर्थ नीटसा स्पष्ट होत नाहीच पण इहलोकवादी किंवा इहलौकिक या सारख्या शब्दांनी सुद्धा तो स्पष्ट न होता उलट गोंधळ वाढण्याचीच शक्यता जास्त . त्यातून secularism ला दीर्घ असा इतिहास असून तिचा क्रम क्रमाने विकास होत गेला असल्याने , हि संकल्पना तिचा इतिहास, तिचा विकास समजून घेणे आणि ह्या शब्दाच्या भाषांतराच्या भानगडीत फारसं न पडणं हेच श्रेयस्कर. आता secularism ची व्याख्या न करता secularism धर्माची जी व्याख्या करते ती पाहणे इथे उद्बोधक ठरावे किंवा अशा प्रकारे धर्माची व्याख्या करणारी विचार प्रणाली म्हणजेच secularism असे म्हणणे इथे सयुक्तिक ठरावे . तर फार तपशीलात न जाता सांगायचे तर “धर्म महणजे माणसाच्या फक्त पारलौकिक जीवनाचा विचार करणारी संस्था किंवा संकल्पना” अस secularism मानतो. जगातल्या एकही धर्माला हि व्याख्या पटणार नाही आणि धर्माची हि सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे ह्या एका(च) बाबतीत जगातल्या सर्व धर्मांचे एकमत होईल . कोणताही धर्म स्वतःला फक्त इहलौकिक किंवा पारलौकिक मानीत नहि. किंबहुना सर्व धर्म इहलोक आणि परलोक हि फक्त संकल्पना म्हणून पृथक आहेत असा दावा करतात . इथे जे करायचे ते परलोकातील जीवन सुसह्य व्हावे म्हणूनच करायचे हा सर्व धर्मांचा अट्टाहास, त्याकरता प्रत्येक धर्माने त्याच्या अनुयायान्करिता काही श्रद्धा आणि चालीरीती तयार करून ठेवल्या आहेत. त्यांचा आधार जर तुटला तर सर्व धर्म हवेत तरंगू लागतील, ते निष्प्रभ होतिल. उदा . गाय हे इहलोकातील एक जनावर. तिला खाणारे प्राणो, अगदी मानव सुद्धा इहलोकातील . जर गाय खाणे हे पाप असेल आणि त्यामुळे परलोकात यातना भोगाव्या लागतील असे धर्माने सांगितले नाही तर धर्माचा इहलोकातील आधार म्हणजे अनुयायांना नियन्त्रीत करायचा अधिकार तुटेल. तेव्हा सर्व धर्म अशी परिस्थिती निर्माण होऊ न देण्याची काळजी घेताना दिसतात. जो परलोक कुणीही पहिला नाही तेथील इष्ट अनिष्ट परिणामासाठी इहलोकातील अचारावर बंधन टाकणे हा सर्व धर्मांच्या विचारांचा पाया आहे आणि सर्व धर्मांना फक्त पारलौकिक बाबी पुरते मर्यादित करून त्यांचा इहलौकिक प्रभाव नाममात्र करणे हा secularism चा गाभा आहे. हा पारलौकिक अधिकाराचा मुद्दा दिसतो तितका साधा किंवा निरुपद्रवी नाहि. बोरातल्या आळीत तक्षक लपवा तसा धर्माचा सारा विखार ह्यात दडलेला असतो. माणूस मेल्यावर जरी त्याचा आत्मा परलोकात जातो आणि तेथे तो शरीरापासून वेगळा असतो तरी इहलोकातील पापपुण्यापासून तो मुक्त असत नहि. त्यामुळे धर्म इथे इहलोकात माणसाचे आयुष्य नियंत्रित करतो. जेव्हा secularism धर्म हि फक्त पारलौकिक बाबींवरचे नियमन करणारी संकल्पना मानतो तेव्हा तो धर्माचे इहलोकातील अस्तित्व नाममात्र करतो. त्या अर्थाने secularism हा धर्म द्रोह आहे. मग या पार्श्व भूमीवर भारतीय संविधान secular आहे म्हणजे काय?भारतीय राजकारणात secularism चा विचार हा अल्पसंख्यांकांच्या हित रक्षणा संदर्भात करण्याची घोडचूक नेहमीच केली जाते जी कि secularism च्या मूळ संकल्पनेला मारक आहे. Secular राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण होत असेल तर ती एक अनुषंगिक बाब झाली, secularism फक्त अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणासाठी नसतो तर तो मुख्यत्वे बहुसंख्यांकांच्या हित रक्षणासाठी व हितसंवर्धनासाठी असतो हि बाब नजरे आड करून चालणार नाही. जर secularism समाजाला धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त करून समतेकडे आणि विकासाकडे घेऊन जात असेल तर त्याला समाजातील बहुसंख्यान्कांच्या हिताला नजरेआड करून कसे चालेल? भारतात हिंदू हे बहुसंख्य(८५%) आहेत म्हणून secularism ह्या ८५% हिंदूंना धर्माच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आवश्यक आहे. मुसलमान किंवा ख्रिश्चन या देशात असले काय किंवा नसले काय secularism ला त्याने काही फरक पडत नाही कारण secularism सामाजिक पातळीवर धर्माचे प्रभाव क्षेत्रच मानत नाहि. याचा अर्थ असा नव्हे कि मी सर्व मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची गोष्ट करतो आहे. secularism हा सामाजिक जीवनात धर्माचे अस्तित्व मान्य करत नसल्याने ज्या कोणा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनांना तो आपल्या धर्म स्वातंत्र्यावर घाला वाटतो त्यांनी पर्यायी देशांचा विचार करावा. जे कोणी हिंदू मुस्लिमांना भारतातून हाकलून द्यायची बात करतात किंवा स्वप्नं बघतात त्यांनी एक गोष्टं समजून घेतली पाहिजे कि २०-२५ कोटी लोकसंख्येला देशातून हाकलून देणे हि सोपी गोष्ट नाही आणि ती हिंसा आणि अत्याचाराविना घडणे शक्य हि नाही. हिंसा आणि विध्वंस ह्या गोष्टी मुल्यांचा ऱ्हास करतात हजारो वर्षांचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठेवा त्यामुळे मातीमोल होतो. राजा राम मोहन राय ते अगदी आजच्या नरेंद्र दाभोल्करांसारख्या समाज सुधारकांनी जे काही थोडफार या हिंदू समाजाला आधुनिक, समजूतदार, विज्ञाननिष्ठ, सहिष्णू बनवलं आहे ते सगळ समूळ नष्ट होण्याचा धोका यात आहे. एवढी मोठी किंमत देणे आपल्याला परवडणार नाही. Secularism ची गरज आपल्याला मुस्लिमांच्या हितरक्षणासाठी नाही तर गेल्या २०० - २५० वर्षातल्या पुरोगामी हिंदू चळवळीने जे काही या हिंदू धर्माला दिले आहे , जे काही थोडे फार प्रबोधन झाले आहे त्याच्या रक्षण व संवर्धनासाठी आहे. मानवी मनाची धर्माच्या गुलामगिरीतून सुटका तीन प्रकारंनी होऊ शकते १) पराभव- ह्या मुळे प्रस्थापित धर्मश्रद्धांना धक्का बसतो आणि त्यामुळे त्या धर्मातील विचारवंत वेगळा विचार करू लागतात आणि प्रबोधनाची एक सुरुवात होते पण मुळात त्या करता त्या धर्मात नव्या विचाराला कमीत कमी मांडण्याची तरी परंपरा असावी लागते अन्यथा उलट हि होऊ शकते. जसे कि १९ व्या शतकाच्या मध्यावर इस्लाम बाबत झाले. तोपर्यंत जगात अस्तित्वात असणारी २ महान मुस्लिम साम्राज्य, एक- भारतातील मोगल आणि दोन- तुर्कस्तानातील ओट्टोमान साम्राज्य क्रमाने निष्प्रभ आणि पराभूत होत गेली ह्याचा धक्का तत्कालीन मुस्लिम विचारवंतांना बसला पण त्यामुळे ते अधिक मुलतत्ववादी आणि कर्मठ बनत गेले. हा इतिहास बराच विस्तृत आहे आणि त्याबद्दल नंतर एखाद्या वेगळ्या लेखात लिहिता येईल पण इथे मुद्दा हाच कि प्रचलित धर्म श्रद्धांचा पराभव हा प्रबोधनाचा खात्रीलायक मार्ग मानता येत नाही २)धर्मातील अंतर्गत विचार प्रवाह किंवा कलह - हा प्रकार हि सर्व धर्मांबाबत झालेला आढळतो आणि त्यामुळे नवा पंथ किंवा धर्माचे नवे रूप तात्कालिक प्रबोधनकारी , जास्त सहिष्णू वाटते पण प्रत्यक्षात फक्त जरासा जास्त सहिष्णू पण मूलतः स्थितिवादी आणि सर्वसमावेशक असे धर्माचे रूप अविच्छिन्न राहते . ३)तिसरे म्हणजे विज्ञान धर्माला मान्य नसणारी पण नाकारता न येण्याजोगी सत्ये प्रस्थापित करते आणि या सत्यांभोवती तत्कालीन समाजाचे हितसंबंध निर्माण होऊ लागतात त्यामुळे धर्म जो समाजाच्या व माणसाच्या आयुष्यातील सर्व लहान सहन बाबीचे नियंत्रण करू पाहतो त्याच्या आणि ह्या नव-प्रस्थापित हितसंबंधांमध्ये संघर्ष अटळ ठरतो पुढे जाण्या अगोदर इथे मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे . सामान्यत्वे हिंदू धर्म हा परमत सहिष्णू , विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. पण हि विशेषणे तकलादू आणि अर्धसत्य विशद करणारी आहेत. हि गोष्ट खरी कि हिंदू धर्मियांनी कधी बाह्य समाजांवर आक्रमण करून स्वतःचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास नाही पण तस जर पाहू गेले तर बाह्य आक्रमण कारी जरी त्यांच्या विजेत्या धर्माच्या पताका घेऊन इथे आले असले तरी त्यांचा मूळ हेतू/ किंवा आक्रमणाचे मुख्य कारण हे संसाधनांची / अन्नाची/ जगण्या योग्य सुविधांची कमतरता हेच होते. भारतीय उपखंडात तशी परीस्थिती फारशी नसल्याने फक्त हिंदू च नाही तर इथले सर्व धर्म हे परिस्थितीवश अनाक्रमक व तुलनेने कमी क्रूर आहेत. हा एक मुद्दा सोडला तर हिंदू हे सुद्धा काही कमी कर्मठ नहित. स्वधर्मीय स्त्रिया, अस्पृश्य आणि मागासांशी त्यांची वर्तणूक काही माणुसकीची खचितच नव्हती आणि नाहि. तसं पाहू जाता हिंदू इतकी चिवट माणसं इतरत्र सापडण मुश्किल. चार्वाकापासून ते बसवेश्वरापर्यंत आणि राजा राम मोहन राया पासून ते अगदी महात्मा फुले, कर्व्यांपर्यंत असंख्य सुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला म्हणावी तशी साद काही या समाजाने दिली नाही. हा समाज एखाद्या मोठ्या प्रचंड सुस्त अजगर सारखा आहे, तो हलतच नाही किंवा फारच थोडा हालचाल करतो. या सर्व महान लोकांना या हिंदू समाजाने पचवून टाकले आहे आणि वर अजून ढेकर ही दिला नाही. अहो जो समाज अंधश्रद्धे वर प्रहर करणाऱ्या गाडगे बाबांचा देव करून त्याला नवस बोलतो , म. फुल्यांच्या प्रतिमेच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालतो आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या राष्ट्र्पुरुषाला जाती च्या कुम्पणा मध्ये अडकवतो त्याला सहिष्णू तरी कसे म्हणावे. पुढे जाण्या अगोदर इथे मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे . सामान्यत्वे हिंदू धर्म हा परमत सहिष्णू , विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. पण हि विशेषणे तकलादू आणि अर्धसत्य विशद करणारी आहेत. हि गोष्ट खरी कि हिंदू धर्मियांनी कधी बाह्य समाजांवर आक्रमण करून स्वतःचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास नाही पण तस जर पाहू गेले तर बाह्य आक्रमण कारी जरी त्यांच्या विजेत्या धर्माच्या पताका घेऊन इथे आले असले तरी त्यांचा मूळ हेतू/ किंवा आक्रमणाचे मुख्य कारण हे संसाधनांची / अन्नाची/ जगण्या योग्य सुविधांची कमतरता हेच होते.नवविजित प्रांतातील आपली सत्ता दृढ मुल करण्यासाठी एतद्देशीयांची संस्कृती व त्यांचा धर्म समूळ नष्ट करून आपल्या बरोबर आणलेला - विजेत्यांचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादणे हे आक्रमकांचे एक धोरण असे. भारतीय उपखंडात तशी परीस्थिती फारशी नसल्याने फक्त हिंदू च नाही तर इथले सर्व धर्म(जैन, बौद्ध, शीख) हे परिस्थितीवश अनाक्रमक व तुलनेने कमी क्रूर आहेत. हा एक मुद्दा सोडला तर एतद्देशिय हिंदू हे सुद्धा काही कमी कर्मठ नहित. स्वधर्मीय स्त्रिया, अस्पृश्य आणि मागासांशी त्यांची वर्तणूक काही माणुसकीची खचितच नव्हती आणि नाहि. तसं पाहू जाता हिंदू इतकी चिवट माणसं इतरत्र सापडण मुश्किल. चार्वाकापासून ते बसवेश्वरापर्यंत आणि राजा राम मोहन राया पासून ते अगदी महात्मा फुले, कर्व्यांपर्यंत असंख्य सुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला म्हणावी तशी साद काही या समाजाने दिली नाही. हा समाज एखाद्या मोठ्या, प्रचंड, सुस्त अजगरासारखा आहे, तो हलतच नाही किंवा फारच थोडा हालचाल करतो. या सर्व महान लोकांना या हिंदू समाजाने पचवून टाकले आहे आणि वर अजून ढेकर ही दिला नाही. अहो जो समाज अंधश्रद्धे वर प्रहार करणाऱ्या गाडगे बाबांचा देव करून त्याला नवस बोलतो , म. फुल्यांच्या प्रतिमेच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालतो आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या राष्ट्र्पुरुषाला जाती च्या कुम्पणा मध्ये अडकवतो त्याला सहिष्णू तरी कसे म्हणावे. सर्व समाज सुधारकांचे व धर्म सुधारकांचे गेल्या १५० वर्षातील एकूण कार्य आणि त्यात आलेलं यश पाहू लागलो तर धक्का बसण्याइतकी निराशा निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. शहरातून वावरणारा १५-२०% समाज तोही मर्यादित प्रमाणात या सुधारणांनी प्रभावित झालेला आहे. बाकी सगळा तसा अंधारच आहे. उलट प्रौढ मतदानाने सुप्त जातीयवाद उसळून पुन्हा वर आलेला आहे. सर्व सुधारक महापुरुष, राष्ट्रपुरुष आज जाती-पातीच्या, भाषेच्या, प्रादेशिकतेच्या तुरुंगात खितपत पडलेले आहेत, ह्यांच्या बद्दल आम्ही जरा जास्तच संवेदनशील झालो आहोत. उदाहरणार्थ शिवाजी महाराजच घ्या . आजकाल शिवाजी महाराज हे आपले प्रेरणा स्थान कमी आणि मर्म स्थान जास्त झाले आहेत. कुणी "शिवाजी महाराज कि जय" म्हणून आमच्या ढून्गणावर लाथ घातली तर ते आम्हाला चालते पण कुणी काही नवे मुल्य मापन करायचे म्हटले कि आमच्या भावना भडकल्याच! . जी गोष्ट शिवाजीची तीच संभाजीची आणि तीच बाबासाहेबांची . हे सर्व फार भयावह आहे. हा कमालीचा स्थितीशील असणारा पण( आणि म्हणूनच ) टिकून राहण्याचा लोकविलक्षण चिवटपणा दाखवणारा हिंदू समाज मनाने आधुनिक व गतिमान कसा करावा हा भारतीय सेक्यूलारीजम समोरील मोठा प्रश्न आहे. तसं म्हटलं तर युरोपातील सेक्युलरीजमच्या पोटात फक्त सामान्य जनतेच्या इहलौकिक जीवनावरील धर्माची पकड समाप्त करणे एवढाच कार्यक्रम येत होता पण भारतात हि गोष्ट सामाजिक सुधारणा, समता, आणि अंत्योदयापासून सुटी आणि एकटी साध्य करता येणे शक्य नव्हते. म्हणून भारतात सेक्युलरिजम ला स्वतः शेजारी व्यक्तिस्वातंत्र्य एक मूल्य म्हणून उभे करून जोपासावे लगते. नाहीतर जगातल्या धर्म न मानणाऱ्या हुकुमशाह्या/ राजकीय तत्वज्ञाने काही कमी क्रूर नहित. हा संबंध लक्षात घेतला म्हणजे लोकशाही, समाजवाद, राष्ट्रवाद, आणि सेक्युलरिजम या सहचारी संकल्पना म्हणून उभ्या कराव्या लागतात. स्वतः प. नेहरूंनी सांगितल्या प्रमाणे किमान ५००० वर्षांचे सातत्य असलेले आपले भारत राष्ट्र हे म्हणूनच नव्या मूल्यांच्या आधारे पुन्हा नव्याने स्थापित करावे लागते. भारतीय संविधानाने सुद्धा हीच भूमिका घेतेलेली आहे. भारतीय संविधानाने घेतेलेली समान नागरिकत्वाची भूमिका हि त्यामुळे लोकशाहीची आणि सेक्युलारीजमचीच भूमिका आहे. आता समान नागरिकत्व म्हणजे काय तर या देशाच्या सर्व नागरिकांना धर्म, जात, भाषा, प्रांत, लिंग यांचा विचार न करता समान अधिकार/ स्वातंत्र्य असणे . यात धर्म स्वातंत्र्य हि आले. धर्म स्वतंत्र्या मध्ये नागरिकांना आपण कोणत्या धर्माचे अनुयायी आहोत , कि कोणताच धर्म मानीत नाही, धर्मांतर करणे, भिन्न धर्मियाशी लग्न करूनही स्वतःचा धर्म टिकवणे , आपल्या धर्मातल्या कुठल्या गोष्टी मानणे किंवा कुठल्या गोष्टी त्याज्य आहेत हे ठरवणे असे अधिकार दिलेले आहेत. जगातला कुठला हि धर्म असे अधिकार आपल्या अनुयायांना देत नाही, म्हणून आपले संविधान धर्म स्वातंत्र्य जरी नागरिकांना देत असले तरी धर्मांना कुठलेही स्वातंत्र्य देत नाही. इहालौकिक बाबतीत धर्माचे कोणतेच प्रभाव क्षेत्र न मानणारे आपले संविधान म्हणून मुळात सेक्युलारीजमचा उल्लेख करीत नव्हते. संविधानाने आपले भारतीय गणराज्य सेक्युलर म्हणून घोषित करावे असा प्रयत्न K.T. Shah यांनी करून पहिला पण त्याला प. नेहरूंनी विरोध केला. कारण सेक्युलारीजाम जरी फक्त पारलौकिक जीवनातील धर्माचे प्रभूत्वा मनात असले तरी तेव्हाधेही स्वातंत्र्य धर्माला द्यायला आपले संविधानकर्ते तयार नव्हते. भारतीय संविधानाने गरज पडल्यास आरोग्य, सामाजिक व वैयक्तिक नीतिमत्ता, अन सुरक्षितता यांना विरोधी जाणारे धर्माचे आणि व्यक्तीचे आचरण अवैध ठरवून पर्यायी योग्य व वैध आचरण कोणते हे ठरवण्याचा अधिकार स्वतः कडे ठेवला आहे. धर्माशी निगडीत अगर अ-निगडीत अशा सर्व सार्वजनिक बाबिंमध्ये आपली संसद सार्वभौम आहे. हेच ते कलम ४४ आहे कि ज्याच्या विरोधात सर्व मुस्लिम धर्मगुरू बोलत असतात. घटना समितीत हे कलम जेव्हा मांडले गेले होते तेव्हा मुस्लिम नागरी कायदा यातून वगळावा अशी एक उपसूचना मांडण्यात आली होती पण ती फेटाळून लावण्यात आली. ( ती उपसूचना कोणी मांडली होती हे वेगळे सांगणे नकोच)त्यामुळे हिंदू किंवा नुस्लीम किंवा इतर कुणी अन्य धर्मीय यांच्या धार्मिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा हक्कच फक्त संसदेला नाही तर तसे लवकरात लवकर करणे हे संसदेचे कर्तव्य आहे. समान नागरी कायदा म्हटले कि मुसलमान आणि भारतीय राजकारणातला मुसलमानांचा प्रश्न हे दोन्ही ठळकपणे आपल्या समोर येतात. वरती हिंदू बद्दल काही लिहिल्यामुळे भारतातील लोकसंख्येने नंबर २ चा धर्म जो मुस्लीम धर्म त्याबद्दल थोडे लिहिणे क्रमप्राप्त आहे. आता आता पर्यंत म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवाती पर्यंत इस्लाम हा विजेत्यांचा आणि म्हणूनच राज्यकर्त्यांचा हि धर्म राहिलेला आहे. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिमांचे ऐहिक हितसंबंध सुरक्षित आणि वर्धीष्णूच होते मुस्लीम असल्यामुळे, सरकारदरबारी चांगल्या नोकऱ्या मिळत, प्रतिष्ठा मिळे, आक्रमणाचा, राज्यकरण्याचा अधिकार प्राप्त होई शिवाय केवळ मुस्लिम असल्याने परलोकातील उत्तम गती हि सुनिश्चित होती.त्यामुळे सर्व साधारण पणे मुस्लीम समाज कर्मठ असेल तर त्यात आश्चर्य असे काही नाही . या सर्वसामान्य मुस्लिमांसाठी इस्लाम हा इहलोकातील इभ्रत व मान मरातब यांचा लाभ आणि परलोकातील सद्गती चा मुख्य आधार होता. जेव्हा असे असेल तेव्हा धर्म चिकित्सा, धर्म सुधारणा कशी संभवणार, त्या करता हे हितसंबंध धोक्यात आले पाहिजेत. तसे जवळ पास ७०० ते ७५० वर्ष भारतात झाले नाही . मोठा पराभव, सर्वस्व गमावण्याची वेळ, मुळापासून उखडून फेकले जाण्याची वेळ त्यांच्या वर कधी आली नाही. तिकडे अराबास्तानांत हि फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. प्रेषिताच्या मृत्युनंतर(इ.स.६३२) साधारण १० वर्षातच आक्रमणकारी मुस्लिम फौजांनी अक्खा अरबस्तान जिंकला आणि ७ वे शतक संपायच्या आत जवळ पास पूर्ण मध्य पूर्व हिंदुकुश पर्वत ते रोमन - बयाझन्टैन साम्राज्य, स्पेनच्या किनार पट्टी पासून ते उत्तर आफ्रिका, बलाढ्य पर्शिअन साम्राज्य यांना हादरे देत एक प्रचंड मोठी सत्ता दृढमूल केली जी कि तत्कालीन ज्ञात जगाच्या १/३ भूभागावर वसलेली होती.उम्माय्याद खिलाफत संपेपर्यंत म्हणजे इस्लाम च्या स्थापने पासून २०० वर्षाच्या आत या जिंकलेल्या भूभागातून मुऴचा धर्म आणि संस्कृती पूर्ण नष्ट करून तो भूभाग पूर्णतया इस्लाममय करण्यात त्यांना यश आले. केवळ २०० वर्षात मिळवलेले हे यश देदिप्यमान तर होतेच पण त्यामुळे मुस्लिमांचा प्रेषिताच्या शिकवणुकीवर दृढ विश्वास बसला. या काळातले इस्लाम आणि तो पाळणारे मुस्लिम हे सगळ्यात शुद्ध आणि म्हणून अल्लाला जास्त प्यारे आहेत असे प्रतिपादन त्यानंतर आजतागायत केले जाते.खरे पाहू जाता हा इतिहास इस्लाम मधील अंतर्घात संघर्ष , रक्तपात, कत्तली आणि सत्तास्पर्धा यांनी भरलेला आहे. अहो प्रेषितांनन्तरचे पहिले चार प्रेषित जे शिया सुन्नी व इतर सर्वांना सारखेच वंदनीय आहेत ते सुद्धा सत्तास्पर्धा आणि कत्तलीचे बळी ठरले आहेत.जसा विजय इस्लामच्या फौजांना मिळाला होता अगदी तसा किंवा त्यापेक्षा मोठ जय अलेक्झांडर किंवा चेंगीज खान ( हा मुस्लिम नव्हता त्याव्ह्या नातवाने नंतर इस्लाम स्वीकारला- खान हे मंगोलियन नाव आहे) यांनी मिळवला होता तेव्हा इस्लामला मिळालेल्या विजयात भव्यत असली तरी दिव्यता खचितच नव्हती. इतका प्रचंड मोठा विजय आणि त्यानंतर आलेले दीर्घ कालीन स्थैर्य हे इस्लाम मधील धर्म चिकित्सा आणि सामाजिक व धार्मिक सुधारणेला पोषक खचितच नव्हते. खरा पाहू जाता जसा विजय झंझावाती इस्लामी फौजांना इतरत्र मिळाला तसा भारतात मिळाला नाही. खरे पाहू जाता इस्लाम चा भारतावर पहिला हल्ला इ. स. ६३७ म्हणजे प्रेषिताच्या मृत्युनंतर फक्त ५ वर्षात सिंध प्रांतावर झालेला आहे पण त्यांना सिंध वर विजय मिळायला पुढे ७५ वर्ष(इ.स,७१२) संघर्ष करावा लागला. इ.स. ९७७ मध्ये सुबकत गिन याने काबुल कंदाहार म्हणजे तत्कालीन वायाव्व्य भारत जिंकला. तिथून पुढे दिल्ली गाठायला इस्लामला १९४ वर्षे संघर्ष करावा लागला आणि तिथून पुढे दक्षिण गाठायला अजून ११८ वर्षे लढावे लागले. म्हणजे संपूर्ण भारत पादाक्रांत करायला त्यांना एकूण ६७३ वर्षे लागली. झंझावाती इस्लामला हि काही भूषणावह गोष्ट नव्हतीच तसेच जसा दाखवला जातो तसा हा हिंदूंच्या लाजिरवाण्या पराभवाचा व गुलामीचा हि इतिहास नसून त्यांच्या संथ पण चिवट प्रतिकाराच्या आणि हळू हळू आक्रमण पचवून रिचवून टाकण्याच्या परमापारेला साजेल असा संघर्शेतिहास आहे फक्त या प्रक्रियेमध्ये ब्रिटीश आल्यामुळे थोडा घोळ झाला पण हि प्रक्रिया अजूनही चालूच आहे फक्त ती अत्यंत संथ असल्याने पटकन लक्षात येत नाही एव्हढेच. असो हा फक्त इस्लामच्या भारत पादाक्रांत करण्याचा इतिहास झाला. मुस्लिमांना त्यांचा विजय भारतात पूर्णत्वाला कधीच नेता आला नाही . अगदी ब्रिटीशांकडून निर्णायक पराभव होई पर्यंत राजपूत, शीख, मराठे, असम चे अहोम राजे, (दक्षिणेत होऊन गेलेल्या विजयनगर साम्राज्याचा उल्लेख इथे आवर्जून केला पाहिजे)असे मुस्लिमांशी संघर्ष करतच होते . नव्हे इस्लामला- मोगलांना राजपुतान्सारख्या पराधर्मियांशी मिळते जुळते घेऊनच दीर्घकाळ सत्ता उपभागता आली. अकबरासारख्या शहाण्या, मुत्सद्दी ( संत नव्हे ) राजामुळे मुस्लिम सत्ता इथे एव्हढा काळ नांदली. हा खरं तर इस्लामचा एक प्रकारे पराभवच होता. दिव्य, सर्वात शुद्ध परिपूर्ण विचारधारेला विजयासाठी मागास, अपरिपूर्ण मागास संस्कृतीच्या मदतीने विजय प्राप्त करावा लागतो हे एक प्रकारचे अपयश नाही काय! ह्याची जाणीव सय्यद नुरुद्दीन मुबारक, शाह वलीउल्ला, सय्यद अहमद( बरेलीवले) अशा अनेक तत्कालीन मुस्लिम विचारवंतांना झालेली होती. त्यांनी तसे प्रतिपादन हि केलेलं आहे. पुढे त्यांना ह्या काफर संस्कृतीकडूनच लाजिरवाणे पराभव स्वीकारावे लागले आहेत. १८५७ च्या युद्धात ब्रिटीशाकडून निर्णायक पराभव झाल्यावर इस्लाम मध्ये विचार मंथन सुरु झाले खरे पण निष्कर्ष त्यांना अधिक मुलतत्ववादी बनवणारे अधिक कर्मठ आणि सनातनी बनवणारे होते. मोगल काळात सत्तास्थापने साठी काफारांशी केलेल्या तडजोडीमुळे इस्लामचे अनुयायी अशुद्ध झाले त्यामुळे ते पराभूत झाले म्हणून परत वैभव व विजय मिळवायचा असेल तर मुळ, प्रेषित कालीन इस्लामकडे परत जायला हव हा असा काहीसा तो निष्कर्ष होता. हा असाच विचार आज बऱ्याच मुस्लिम विचारवंतांकडून व्यक्त होताना दिसून येतो. जे खरेच प्रगतीक विचार मांडतात त्यांना मुस्लिम समाज मान्यताच देत नाही उदा. मौलाना अबुल कलम आझाद, हमीद दलवाई, वगैरे . हे असे अनेक वर्षे धर्म चिकित्सेची परंपरा इस्लाम मध्ये नसल्या मुळे घडले आहे हे आपण नीट समजून घेतेले पाहिजे. या पार्श्व भूमीवर आपण भारतीय मुस्लिमांचे भारतातल्या संविधानातले स्थान विचारात घेतले पाहिजे. आपले संविधान कुठल्याच धर्माला सार्वजनिक / सामाजिक पातळीवर ओळखत नाही, त्याचे अस्तित्व व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग म्हणून फक्त व्यक्तिगत पातळीवर मान्य करते. हा मुद्दा जसा हिंदूंना लागू आहे तसाच भारतीय मुस्लिमांना सुद्धा लागू आहे. संसदेतले निवडून आलेले हिंदू मुस्लिम ख्रिश्चन लोकप्रतिनिधी हे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करतात, त्या त्या धर्माचे नाही. तसे जर ते वागत करत असतील तर ते घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे हिंदू किंवा मुस्लिमांना / त्यांच्या तथाकथित धर्मगुरूंची परवानगी घेऊन सुधारणा करणरे कायदे करण्यास संसद बांधील नाही नव्हे तसे करणे हाच संसदेचा अपमान आहे. संसद सार्वभौम आहे म्हणजे नाहीतर मग काय? यावर एक युक्तिवाद म्हणून मुस्लिमांमधील सुधारणा ह्या हृदय परिवर्तनाने झाल्या पाहिजेत, स्वतः मुस्लिमांनी त्या केल्या पाहिजेत , इतर धर्मियांना तसे करण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी आधी स्वतःच्या धर्म पंथ सुधारणा पुऱ्या कराव्यात सरळ सरळ ,कायदे केले तर हिंसाचार होईल, कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल प्रकारची फालतू विधाने केली जातात. हा पायंडा सुद्धा पंडित नेहरूंनीच पाडला. इतर पक्षांनी आणि नेत्यांनी सत्तेसाठी आणि लोकानुनयासाठी साठी त्याला अजून हिडीस स्वरूप दिले,इतके कि आपण न्याय पालिकेला हि त्या करता डावलले, तिच्या सार्वभौमत्वावर गदा आणली. हृदय परिवर्तनाने जर सुधारणा व्हायची वाट पाहू लागलो तर हा सुधारणेचा कार्यक्रम काही शतकांचा कार्यक्रम होईल. कमीत कमी इस्लाम बाबत तरी त्यांच्याच धर्मपंडितांकडून सुधारणा व्हायची शक्यता शुन्य आहे, त्याला इतिहासच साक्ष आहे.(याच प्रकारे हिंदू मधलीसुद्धा धर्म सुधारणा हृदय परिवर्तनाने होऊ शकत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते) या अशा प्रकारे भारतातल्या संख्येने जवळपास २०-२५ कोटी असलेल्या मुस्लिम समाजाला मागास ठेवणे हे अमानुष तर आहेच पण ते भारताच्या स्थैर्याला घातकही आहे. आज कट्टर मुस्लिम आणि त्यांच्या आडमुठेपणामुळे मुस्लिमांचे नुकसान तर होतेच आहे पण बहुसंख्यांक असलेला हिंदू समाज ज्यात गेल्या २०० वर्षापासून थोडे थोडे सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत ते सुद्धा वाहणे बंद होऊन हा समाज पुन्हा मागास , कट्टर , सनातनी , विषमतेला मान्यता देणारा होईल कि काय असे भीती दायक चित्र उभे राहू लागले आहे. असा भारत फार काळ एक तर राहू शकणार नाहीच, पण राहिला तरी तो भारतीय जनतेला सुराज्य हि देऊ शकणार नाही. अधिक काय सांगणार , सेक्युलरिजम शिवाय भारतला पर्याय नाही पण सत्तालोलुप / अदूरदर्शी राज्यकर्त्यांना एव्हढे कळले तरी पुरे. जनतेला तर इतक्या साधू संतांनी , सुधारकांनी इतके वर्ष कानीकपाळी ओरडून सांगितले तरी कळले नाही, वळले तर अजिबातच नाही …. …आदित्य

प्रतिक्रिया द्या
24283 वाचन

💬 प्रतिसाद (121)
ज
जानु Sun, 01/08/2017 - 11:35 नवीन
उत्तम विवेचन "हृदय परिवर्तनाने जर सुधारणा व्हायची वाट पाहू लागलो तर हा सुधारणेचा कार्यक्रम काही शतकांचा कार्यक्रम होईल. कमीत कमी इस्लाम बाबत तरी त्यांच्याच धर्मपंडितांकडून सुधारणा व्हायची शक्यता शुन्य आहे, त्याला इतिहासच साक्ष आहे.(याच प्रकारे हिंदू मधलीसुद्धा धर्म सुधारणा हृदय परिवर्तनाने होऊ शकत नाही असे मला प्रामाणिकपणे वाटते) या अशा प्रकारे भारतातल्या संख्येने जवळपास २०-२५ कोटी असलेल्या मुस्लिम समाजाला मागास ठेवणे हे अमानुष तर आहेच पण ते भारताच्या स्थैर्याला घातकही आहे. आज कट्टर मुस्लिम आणि त्यांच्या आडमुठेपणामुळे मुस्लिमांचे नुकसान तर होतेच आहे पण बहुसंख्यांक असलेला हिंदू समाज ज्यात गेल्या २०० वर्षापासून थोडे थोडे सुधारणांचे वारे वाहू लागले आहेत ते सुद्धा वाहणे बंद होऊन हा समाज पुन्हा मागास , कट्टर , सनातनी , विषमतेला मान्यता देणारा होईल कि काय असे भीती दायक चित्र उभे राहू लागले आहे. असा भारत फार काळ एक तर राहू शकणार नाहीच, पण राहिला तरी तो भारतीय जनतेला सुराज्य हि देऊ शकणार नाही." याचे प्रत्यक्षिक आता सार्वत्रिक दिसते आहेच..
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 01/08/2017 - 16:33 नवीन
कुरुंदकर हे विसाव्या शतकातील सर्वात द्रष्ट्या विचारवंतांपैकी एक होते. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 01/09/2017 - 05:24 नवीन
हा पारलौकिक अधिकाराचा मुद्दा दिसतो तितका साधा किंवा निरुपद्रवी नाहि. बोरातल्या आळीत तक्षक लपवा तसा धर्माचा सारा विखार ह्यात दडलेला असतो.
दणदणीत सहमती. कुरूंदकर मास्तर हे भारतातील मोजक्या आपल्या विचारप्रणालीच्या चौकटीच्या बाहेर पडून चिकीत्सक बुद्धीने विचार मांडणारे विचारवंत होते. ते इंग्रजीत भाषांतरीत झाले नाहीत हे भारताचे दुर्दैव. आपल्या विचारसरणीचा चश्मा लावून कुठल्याही घटनेचा त्या विचारसरणीच्या सोयीचा अन्वयार्थ लावण्याचा सध्याचा काळ बघता त्यांच्यासारख्या भारताच्या हिताचा साकल्याने, मुल्यांवर निष्ठा ठेवून विचार करणारा द्रष्टा किती गरजेचा आहे हे कळतं. जागर आणि शिवरात्र ही मराठीतील सर्वात श्रेष्ठ नॉन फिक्शन पुस्तकांपैकी आहेत, ओरिजीनल थिंकर खरोखर. आपला लेख त्यांच्या विचारांचा गोशवारा खूप सुंदर प्रकारे देतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
पुंबा Mon, 01/09/2017 - 06:39 नवीन
पुढे जाण्या अगोदर इथे मला एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे . सामान्यत्वे हिंदू धर्म हा परमत सहिष्णू , विचार स्वातंत्र्याचा आदर करणारा आणि उदारमतवादी म्हणून ओळखला जातो. पण हि विशेषणे तकलादू आणि अर्धसत्य विशद करणारी आहेत. हि गोष्ट खरी कि हिंदू धर्मियांनी कधी बाह्य समाजांवर आक्रमण करून स्वतःचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्याचा इतिहास नाही पण तस जर पाहू गेले तर बाह्य आक्रमण कारी जरी त्यांच्या विजेत्या धर्माच्या पताका घेऊन इथे आले असले तरी त्यांचा मूळ हेतू/ किंवा आक्रमणाचे मुख्य कारण हे संसाधनांची / अन्नाची/ जगण्या योग्य सुविधांची कमतरता हेच होते.नवविजित प्रांतातील आपली सत्ता दृढ मुल करण्यासाठी एतद्देशीयांची संस्कृती व त्यांचा धर्म समूळ नष्ट करून आपल्या बरोबर आणलेला - विजेत्यांचा धर्म व संस्कृती त्यांच्यावर लादणे हे आक्रमकांचे एक धोरण असे. भारतीय उपखंडात तशी परीस्थिती फारशी नसल्याने फक्त हिंदू च नाही तर इथले सर्व धर्म(जैन, बौद्ध, शीख) हे परिस्थितीवश अनाक्रमक व तुलनेने कमी क्रूर आहेत. हा एक मुद्दा सोडला तर एतद्देशिय हिंदू हे सुद्धा काही कमी कर्मठ नहित. स्वधर्मीय स्त्रिया, अस्पृश्य आणि मागासांशी त्यांची वर्तणूक काही माणुसकीची खचितच नव्हती आणि नाहि. तसं पाहू जाता हिंदू इतकी चिवट माणसं इतरत्र सापडण मुश्किल. चार्वाकापासून ते बसवेश्वरापर्यंत आणि राजा राम मोहन राया पासून ते अगदी महात्मा फुले, कर्व्यांपर्यंत असंख्य सुधारक होऊन गेले. त्यांच्या कार्याला म्हणावी तशी साद काही या समाजाने दिली नाही. हा समाज एखाद्या मोठ्या, प्रचंड, सुस्त अजगरासारखा आहे, तो हलतच नाही किंवा फारच थोडा हालचाल करतो. या सर्व महान लोकांना या हिंदू समाजाने पचवून टाकले आहे आणि वर अजून ढेकर ही दिला नाही. अहो जो समाज अंधश्रद्धे वर प्रहार करणाऱ्या गाडगे बाबांचा देव करून त्याला नवस बोलतो , म. फुल्यांच्या प्रतिमेच्या उद्घाटनाला सत्यनारायण घालतो आणि शिवाजी महाराजांच्या सारख्या राष्ट्र्पुरुषाला जाती च्या कुम्पणा मध्ये अडकवतो त्याला सहिष्णू तरी कसे म्हणावे.
याची पुनुरूक्ती झाली आहे.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Tue, 01/10/2017 - 01:42 नवीन
भाग १ आणि २ एकत्र छापले आहेत, आधी भाग २ छापतान सांधा जुळवण्यासाठी हा परिच्छेद परत दिला होता तो आत्ता काढायचा राहून गेला....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ओ
ओम शतानन्द Mon, 01/09/2017 - 08:41 नवीन
त्यांचा मूळ हेतू/ किंवा आक्रमणाचे मुख्य कारण हे संसाधनांची / अन्नाची/ जगण्या योग्य सुविधांची कमतरता हेच होते. हे खरे आहे , महमद बिन कासिमला हाच उप जिविकेचा प्रश्न भेड्सावत असल्यमुळे त्या बिचार्यास इथे यावे लागले . पोर्तुगाल मध्ये सम्साधने / अन्नाची / जगण्या योग्य सुविधान्ची कमतरता होती , त्यामुळे वस्को द गामा ला युरोप मधुन आफ्रिकेला वळसा घालुन भारतात यावे लागले.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/09/2017 - 09:30 नवीन
कोरडेराव, ह्यात तुम्हाला आ कलन झालेलं तुम्ही काय मांडलय? सांगा.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sat, 01/14/2017 - 03:48 नवीन
नाही झाल काहीच आकलन, आम्ही माठ...तुम्ही समजावून सांगा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ग
गामा पैलवान Mon, 01/09/2017 - 13:50 नवीन
ADITYA KORDE, कुरुंदकरांचं हे विधान पटलं नाही :
३)तिसरे म्हणजे विज्ञान धर्माला मान्य नसणारी पण नाकारता न येण्याजोगी सत्ये प्रस्थापित करते आणि या सत्यांभोवती तत्कालीन समाजाचे हितसंबंध निर्माण होऊ लागतात त्यामुळे धर्म जो समाजाच्या व माणसाच्या आयुष्यातील सर्व लहान सहन बाबीचे नियंत्रण करू पाहतो त्याच्या आणि ह्या नव-प्रस्थापित हितसंबंधांमध्ये संघर्ष अटळ ठरतो
हिंदू धर्म एकतर विज्ञानाच्या विरोधात नाही. दुसरं म्हणजे माणसाच्या दैनंदिन आयुष्याच्या लहानसहान बाबींचं नियंत्रण करत बसणे हे हिंदू धर्माचं उद्दिष्ट नाही. कुरुंदकरांना इस्लाम अभिप्रेत असेल तर गोष्ट वेगळी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Tue, 01/10/2017 - 10:08 नवीन
खालील लेख नरहर कुरुंदकरांच्या ‘जागर’ ह्या पुस्तकातील लेखामधल्या विचारावरून लिहीलेला आहे लेखामधल्या विचारावरुन लेख लिहिला आहे म्हणजे काय ? म्हणजे पुस्तकात बघून टाईप केला असे म्हणायचे आहे का ? हे विचार तुम्ही स्वतः प्रसवलेले नाहीत असे स्पष्ट लिहायला हवे होते. जागर वाचून फार वर्षे झाली पण एखाद दुसरे वाक्य सोडले तर संपूर्ण लेख कॉपी पेस्ट केला आहे हे नक्कीच.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/10/2017 - 11:07 नवीन
@एखाद दुसरे वाक्य सोडले तर संपूर्ण लेख कॉपी पेस्ट केला आहे हे नक्कीच. ››› जोरदार सहमत! म्हणूनच मी वर विचारलेलं.. की ह्यात तुमचं काय मांडलय ते सांगा? सगळ त्यातलं आणून ह्यात ऒतलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/10/2017 - 11:10 नवीन
@एखाद दुसरे वाक्य सोडले तर संपूर्ण लेख कॉपी पेस्ट केला आहे हे नक्कीच. ››› जोरदार सहमत! म्हणूनच मी वर विचारलेलं.. की ह्यात तुमचं काय मांडलय ते सांगा? सगळ त्यातलं आणून ह्यात ऒतलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
आ
आदित्य कोरडे Sat, 01/14/2017 - 04:04 नवीन
होय तसेच म्हणायचे होते आणि आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
R
Ram ram Tue, 01/10/2017 - 15:20 नवीन
आ.बंध तुम्ही काहीतरी भर घालायची ना, नुसती खवचट प्रतिक्रिया देण्यापेक्षा. कोरडे साहेब धन्यवाद छान विश्लेषण, विचार मंथनासाठी.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/10/2017 - 16:11 नवीन
चालू द्या निरर्थक आत्मकुंथन! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
A
arunjoshi123 गुरुवार, 01/12/2017 - 13:45 नवीन
तिसरे म्हणजे विज्ञान धर्माला मान्य नसणारी पण नाकारता न येण्याजोगी सत्ये प्रस्थापित करते आणि या सत्यांभोवती तत्कालीन समाजाचे हितसंबंध निर्माण होऊ लागतात
असं काही नसतं. जराविज्ज्ञानाने प्रस्थिपिलेल्या एका त्रिकालाबाधित सत्याचे उदाहरण देता येईल काय?
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sat, 01/14/2017 - 03:52 नवीन
गुरुत्वाकर्षण, आधुनिक वैद्यकशास्त्र , (खरेतर हा प्रश्न इतका मूर्खपणाचा आहे कि मी ह्याला प्रतिक्रिया द्यायचे पण टाळायला हवे होते.....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 01/15/2017 - 17:11 नवीन
सत्य हे वाक्य असते का शब्द असतो? का भाषे बाहेरचे काही असते? तुमचे उदाहरण कळले नाही म्हणून . ============= तुम्ही माझया प्रश्नाचे उत्तर प्रामाणिकपणे दिले आहे. ते पुरेसे आहे. तुमची बुद्धी जोखायची मला अजिबात इच्छा वा घाई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदित्य कोरडे
A
arunjoshi123 Sun, 01/15/2017 - 17:35 नवीन
सध्यापुरते मी गृहीत धरतो कि तुम्हाला F = GMm/r^2 असे म्हणायचे आहे . तर प्रश्न असा आहे विश्व प्रसारात का आहे? अगदी ९८% कृषण द्रव्य आहे असे मानले तरी त्यांच्यासकट विश्व आकुंचन पावायला पाहिजे! Also what is expensed to cause work? अजून बरच आहे, पण हिंदूना शिव्या देण्याशिवाय विज्ञानाचे काही फायदे असले तर मला माहीत करून घ्यायचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदित्य कोरडे
स
संदीप डांगे Sun, 01/15/2017 - 18:10 नवीन
तुम्ही सध्या विज्ञानाचा वापर 'विज्ञानालाच शिव्या घालायला' करत आहात हा एक फायदा समजावा काय? उगाच आपली एक शंका! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 01/15/2017 - 18:40 नवीन
तथ्य आहे तुमच्या म्हणण्यात , हे मान्य . परंतु धर्माच्या लेगसीचा वापर धर्माला शिव्या घालायला ज्या स्केलवर केला जातो त्याला तोड नाही. आणि यात शंका अजिबात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 01/15/2017 - 18:54 नवीन
तथ्य म्हणजे सत्य. चला तुम्हाला विज्ञानाने सिद्ध केलेल्या एका तरी त्रिकालाबाधित सत्याचा याचिदेहि याचिडोळा प्रत्यक्ष अनुभव आला असं समजूया... बाकी राहिला, धर्माला शिव्या वगैरे... ते तुमचं स्वत:चं वैयक्तिक मत आहे वैज्ञानिक सत्य नव्हे. त्यामुळे ते सर्व सब्जेक्टिव आहे. आपले मत हेच अंतिम सत्य आहे असे समजणे हाच अवैज्ञानिकपणा. आपल्या धर्माला कोणीतरी खतरा उत्पन्न करतंय असे वाटणे तो धर्मांधपणा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 01/17/2017 - 07:10 नवीन
भलताच गैरसमज नको. मी विज्ञानांचा वापर त्यालाच शिव्या द्यायला करतो हे मला मान्य आहे. पण म्हणून लगेच विज्ञानाने एक त्रिकालाबाधित सत्य सिद्ध केले आहे हे मला मान्य आहे असे होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदित्य कोरडे Mon, 01/16/2017 - 02:04 नवीन
विश्व प्रसारत आहे हे तुम्हाला विज्ञाने सांगितले कि धर्माने? स्थितीशील विश्वावर अगदी न्यूटन ते आईनस्ताईनचाही विश्वास होता,म्हणून त्याने त्याच्या थेरी ऑफ रिलेटीविटी मध्ये कोस्मोलोजीकल कोन्स्तंट घातला कारण त्याची थेरी विश्व स्थितीशील असू शकत नाही हेच दाखवत होती पण नंतर जेव्हाकळले कि ते प्रसारण पावत आहे तेव्हा कोस्मोलोजीकल कोन्स्तंटघालून मी चूक केली असे त्याने म्हटले .......ह्यातले कुठले धर्माला माहित होये, मुख्य म्हणजे आजचे उपग्रह प्रक्षेपण ह्या हेरी मधल्या अनेक गृहीताकांचा वापर करते. देवी ह्या रोगाचे कारण देवीचा प्रकोप मानणाऱ्या अज्ञ लोकांना देवी ने नाही तर आधुनिक वैद्यक शास्त्राने मदत केली ... मेडिकल आणि फार्मास्युतीकाल उद्योग एवढा फैलावाला आहे, अनेक लोकांची उपजीविका त्यावर चालते , अनेकांची एरवी आजारलेली असली असती अशी आयुष्य वेदनारहित आणि निरोगी झाली.... लोकांचे हितसंबंध त्याभोवती तयार झालेत ते असे. आता तुमचा वरचा प्रश्न ....बिग बंग पासून विश्व प्रसारण पावताच आहे संशोधाक्मध्ये ते प्रसारण पावत आहे ह्या बाबत वाद आणि ते का प्रसारण पावत्य ह्या बद्दल शंका नाही त्यांची शंका आहे कि प्रसारण थांबून आकुंचन सुरु कधी होईल, होईल कि नाही ह्या करत खरोकःर विश्वाचा आकार आणि त्यातील एकूण द्रव्याची मोजदाद करण्यीतकी तंत्रज्ञानाची झेप नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 01/17/2017 - 07:16 नवीन
विश्व प्रसारत आहे हे तुम्हाला विज्ञाने सांगितले कि धर्माने? >>>>>>> विज्ञानाने. (विज्ञानाच्या एकूण मूर्खपणावर बोलायला फार वेळ लागेल म्हणून आपण इतकेच विधान पाहू.) पण असला मूर्खपणा सांगावाच कशाला ? विश्व या संकल्पनेत डार्क मॅटर देखील येते . २% नॉर्मल मॅटर प्रसारण पावत आहे . एकूण विश्व ??? आणि का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदित्य कोरडे
A
arunjoshi123 Tue, 01/17/2017 - 07:23 नवीन
संशोधाक्मध्ये ते प्रसारण पावत आहे ह्या बाबत वाद आणि ते का प्रसारण पावत्य ह्या बद्दल शंका नाही . >>>> शंका नाही ही तुमची व्यक्तिगत अंधश्रद्धा आहे. http://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/news/universe-galaxies-how-big-many-size-observable-map-history-nottingham-a7360736.html ही बातमी वाचा. विश्व मानले जायचे त्यापेक्षा एका झटक्यात १० पट मोठे निघाले आहे . ज्या लोकांना ते १ मीटर cube आहे कि १० हे कळत नाही , त्यांना ते प्रसारत आहे कि आकुंचीत आहे याबद्दल माहिती आहे याबद्दल शंका ठेवलेलीच बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदित्य कोरडे
A
arunjoshi123 गुरुवार, 01/12/2017 - 13:59 नवीन
सेक्युलरिजम शिवाय भारतला पर्याय नाही पण सत्तालोलुप / अदूरदर्शी राज्यकर्त्यांना एव्हढे कळले तरी पुरे.
धार्मिकतेशिवाय मानवतेला पर्याय नाही. मानवी कल्याणाचे जितके काही निकष आहेत त ते समोर ठेऊन जर आज पाहिले तर आधुनिकता, विज्ञान, कायदा, लोकशाही, अर्थशास्त्र, यांनी मानवतेचे जे नुकसान केले आहे ते हे सगळे धर्माच्या अखत्यारित असते तर झाले नसते . परंतु आधुनिकतावाद्यांच्या डोळ्यावरची पट्टी इतकी घट्ट आहे कि आपले काही चुक असू शकते असे वाटणारा पहिला पुरोगामी जन्मायला अजून १००- १५० वर्षे लागतील.
  • Log in or register to post comments
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/13/2017 - 02:44 नवीन
विज्ञान, कायदा, लोकशाही, अर्थशास्त्र, यांनी मानवतेचे जे नुकसान केले आहे ते हे सगळे धर्माच्या अखत्यारित असते तर झाले नसते . ए भावसाहेब, समदा ज्यर का रिलीजनच्या हाती सोपवला असता तर आजही आपले पोरेलोक टेक्स्टबुक मंदी 'अर्थ फ्लॅट हाय अने सन अलॉंग विथ बिजा ऑल प्लॅनेट तिचा चक्कर काटते' असाच मगिंग करीत बसला असता नी. काय पण बोलते राव तू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Fri, 01/13/2017 - 09:23 नवीन
भावा मी तुले काय मैती देते नि परसान इचारते . पटता का बग १. http://www.astronomyfactbook.com/timelines/heliocentrism.htm हे वाच. आपल्या बारताचं सोड. तेची काय वॅल्यू? पण तो गॅलिलिओ होता ना, त्यानं हेलिओसेंट्रिक मॉडेल प्रूव केला नवता. ते उगंच माझं खरं मना मनायचं. २. २००० वर्षापोर्वीचे धर्म सूर्याला मधात मानायचे. मंग त्यो टोलेमी मनला तसं नसतंय. धरनीमायच मदात हाय. टोलेमी कै पादरी नवता राजा, त्येनं शास्त्रज्ञच हुता. त्येच्या नंतर जीजस जनमला मनून तवाचे शास्त्रज्ञ जे मनायचे ते त्यनं बायबल मददी लिवलं. ३. म्या आपल्या तुच्छ भारतात जनमलो असतो तर हा प्रश्नच नवता मगिंगचा . ४. म्या युरपमदी बी जनमलो असतो तर १७५७ नंतर मला पोप बाबानं उलटं मगिंग कराया सांङिटलंच असतं कि ========================== ह्या कोन कुंकडं फिरलालय च्या खेळात राजा म्या तुला एक कोडं घालतो. मजी मले तु सांगतो तसा जे खरं त्येचंच मगिंग करायचा हाय मनून. आपन दोगं बी उद्यापासून काय बी आर्दवट मगिंग करायचा नाय. https://en.wikipedia.org/wiki/Solid_angle हे वाच. आनि मले सांग राजा आपलं दिल्लीचं संसद नक्की कोन्या वेक्टर कडं स्पेस मदी चाल्लं आहे (ते मण्तात ना xi+yj+zk). i j k च्या टकुर्‍यावर आडवी रेग र्‍हाती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
A
arunjoshi123 गुरुवार, 01/12/2017 - 13:59 नवीन
सेक्युलरिजम शिवाय भारतला पर्याय नाही पण सत्तालोलुप / अदूरदर्शी राज्यकर्त्यांना एव्हढे कळले तरी पुरे.
धार्मिकतेशिवाय मानवतेला पर्याय नाही. मानवी कल्याणाचे जितके काही निकष आहेत त ते समोर ठेऊन जर आज पाहिले तर आधुनिकता, विज्ञान, कायदा, लोकशाही, अर्थशास्त्र, यांनी मानवतेचे जे नुकसान केले आहे ते हे सगळे धर्माच्या अखत्यारित असते तर झाले नसते . परंतु आधुनिकतावाद्यांच्या डोळ्यावरची पट्टी इतकी घट्ट आहे कि आपले काही चुक असू शकते असे वाटणारा पहिला पुरोगामी जन्मायला अजून १००- १५० वर्षे लागतील.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sat, 01/14/2017 - 03:46 नवीन
पूर्ण पणे असहमत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
सतिश गावडे Sat, 01/14/2017 - 08:16 नवीन
आधुनिकता, विज्ञान, कायदा, लोकशाही, अर्थशास्त्र, यांनी मानवतेचे जे नुकसान केले आहे ते हे सगळे धर्माच्या अखत्यारित असते तर झाले नसते .
धर्माच्या नावावर जे काही चालू आहे त्याकडे तुम्ही सोयिस्कर डोळेझाक करत आहात. वरच्या यादीतील गोष्टींइतकेच नुकसान धर्मामुळे झाले आहे; होत आहे. अगदी आपण ज्याला उद्दात्त धर्म समजतो त्या धर्माच्या लोकांनीही जवळपास हजार वर्ष एका समाजगटाला पशूवत वागणूक दिली होती हे माहिती नाही का तुम्हाला. तुम्ही दिलेली यादी काय किंवा धर्म काय, ही लेबलं आहेत. जे काही करतो ते माणूस. आपल्या स्वार्थाला माणूस लेबल लावून त्याला आयडीयालिझम म्हणून मिरवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Sun, 01/15/2017 - 18:00 नवीन
आपलं नक्की मत कळले नाही . मानवी व्यवस्था ही अन्याय्य असतेच असा काहीसा प्रतिसादाचा सूर दिसतो. मनुष्य हा एक साधा प्राणी आहे नि सोर्स साठी स्पर्धा असते , मुळात स्वार्थ असतो इ इ निरीश्वरवादि विचार असले तर विषयच संपला. आपली अंतःप्रेरणा हीच दुर्वर्तन असेल तर उगाच एका व्यवस्थेचे कौतुक कर , दुसरीला नाव ठेव यात अर्थ नाही. म्हणून आपण (तुम्ही ) कोणतीतरी बाजू घेणे आवश्यक आहे. ============ प्रत्येक व्यवस्थेत दोष असतात , तसे धर्मात देखील आहेत. पूर्णविराम. ============ पण व्यवस्था म्हणून धर्म यातल्या अन्य बाबींपेक्षा श्रेष्ट आहे . =========== आज धर्म व्यवस्था चालवत नाही. लेकिन, आजची व्यवस्था एका मोठ्या समाजाच्या एका भागाला यंत्रवत वागवते (पशू तरी बरा वागवला जातो यंत्रापेक्षा) . आपण इतिहासाची इतकी जास्त नि सिनिकल चिकित्सा करत आहोत कि आज नक्की काय चालले आहे त्याचे आपल्याला भान नाही . ============= आणि भारतीय इतिहासाचा विचार केला तर इथले शूद्र जगाच्या मानाने फार लकी आहेत. इथे त्यांना मागच्या जन्मीचे पापी , पण शेवटी मनुष्य मानले जाई . आपल्यासारखे नसणारे , तथाकथित खालचे, इतर खंडांमधले लोक, युरोपीय लोकांनी तर 'मनुष्यच नाहीत' या वैज्ञानिक प्रभावाखाली कापून संपवले . (धार्मिक कारणासाठे पण तो आकडा नगण्य आहे.) . उलट सगळे व्यवसाय शूद्रांसाठी भारतात राखीव होते नि ब्राह्मण निरर्थक मंत्रपठण करत. हेच लोक शूद्रांना स्पर्श करत नसत पण सोवळे घालून स्वतःच्या मुलाला देखील स्पर्श करत नसत . हे लोक मूर्ख होते का अन्यायी? न शिवता चापट तरी मारता येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 01/16/2017 - 08:07 नवीन
ऐतिहासिक सत्य स्पष्टपणे न नाकारता त्याची तत्कालीन इतर भूभागातील परिस्थितीशी तुलना करुन "त्यांच्या तुलनेत बरेच होते" असे म्हणत आहात हे ही नसे थोडके. :) एक आगाऊ सल्ला, धर्माचा अभिनिवेश बाजूला ठेवून रमण महर्षी आणि स्वामी विवेकानंद यांचा "ज्ञानयोग" वाचा. त्याचवेळी डार्विनचा "दि ओरीजीन ऑफ स्पेसिज" आणि तत्सम साहित्य वाचा. मजा येते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Mon, 01/16/2017 - 20:04 नवीन
सत्य मान्य करणे तब्येतीला चान्गले असते. ============== माझे चिकार वाचन झाले आहे. समोरच्या व्यक्तीच्या विचारांस अकारण अभिनिवेश म्हणू नये इतके तर नक्केच झाले आहे. ========== बाय द वे , डार्विन सध्याला कचऱ्याच्या डब्ब्यात देखील अडगळ वाटेल इतका आऊटडेटेड झाला आहे. पुरोगाम्यांमधे पोथीनिष्ठता घुसल्यामुळे त्याला वारंवार उल्लेखात राहतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
फ
फेदरवेट साहेब Fri, 01/13/2017 - 02:49 नवीन
Image removed. धिस इज मियरली वन फ्रॅग्मेंट ऑफ अल्टीमेट तृथ
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/13/2017 - 08:24 नवीन
ए फेवे साहेब, च्यायला ते पोप जे बकवास करते नी त्याला तू रिलीजन म्हंते? जगामंदी साला एकंच रिलीजन हाये. ते म्हंजी फकस्त हिंदू रिलीजन. बाकी समदा झोल हाय. आता हेच बघ ना, साला मिडल ईस्टच्या चालीस डिग्री टेंपरेचरमदी बर्फाची गाडी घेऊन कोनी घसरत येते काय? मग सांताकलाज दाखवून पब्लिकला छूत्या बनवते किनई? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
A
arunjoshi123 Fri, 01/13/2017 - 09:59 नवीन
प्रश्नांकित न होणारी उत्तरे आणि उत्तरे नसणारे प्रश्न हे तरी थोडं मानवी आहे. विज्ञान : सत्य हे मानवी मेंदूसाठी नाही. तुमचे शास्त्रज्ञ काय मगिंग करातात ते फार भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
प
पैसा Fri, 01/13/2017 - 09:42 नवीन
मी जागर वाचल्यावर लिहायचा विचार केला आणि सोडून दिला. एका लेखात लिहून संपणारे पुस्तक नव्हे ते.
  • Log in or register to post comments
आ
आदित्य कोरडे Sat, 01/14/2017 - 03:46 नवीन
खरे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
ग
गामा पैलवान Sat, 01/14/2017 - 11:01 नवीन
सतिश गावडे, अगदी आपण ज्याला उद्दात्त धर्म समजतो त्या धर्माच्या लोकांनीही जवळपास हजार वर्ष एका समाजगटाला पशूवत वागणूक दिली होती हे माहिती नाही का तुम्हाला. दलित मेलेल्या गुरांचे मांस खायचे म्हणून त्यांची वस्ती गावकुसाबाहेर असायची. हे खाणं दुष्काळातली आपत्कालीन परिस्थिती म्हणून वाट्याला आलं होतं. तसंही पाहता पेशवाईच्या वेळेस कित्येक महार आपल्या कर्तृत्वाने हे पहिल्या प्रतीचे वतनदार बनले होते. (संदर्भ : http://peshwekalinitihas.blogspot.co.uk/2012/07/blog-post_30.html). उगीच हिंदू धर्मास नावे ठेवू नयेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 01/14/2017 - 13:04 नवीन
हायला! दुष्काळ फक्त दलितांवर आल्ता हे रोचक आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे Sat, 01/14/2017 - 15:54 नवीन
मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला? आज एका समाज गटाला आरक्षण का आहे? माणसाने एव्हढंही निबर असू नये की सर्व जगाला माहिती असलेली गोष्ट निर्ढावलेपणाने नाकारावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 01/14/2017 - 19:29 नवीन
सतिश गावडे, १.
मग बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्वीकारला?
बाबासाहेबांनी बौद्ध पंथ का स्वीकारला ते मला माहीत नाही. पारंपरिक हिंदू धर्मात राहूनही दलितांना सामाजिक प्रगती साधता आली असती. अशी प्रगती केरळी दलितांनी साधली आहे. नारायण गुरू हे दलितोद्धार चळवळीचे आद्य प्रवर्तक आहेत. २.
आज एका समाज गटाला आरक्षण का आहे?
राजकारण्यांच्या सोयीसाठी. दहा वर्षांनी आरक्षण संपवावं असंच बाबासाहेबांचं मत होतं. ३.
माणसाने एव्हढंही निबर असू नये की सर्व जगाला माहिती असलेली गोष्ट निर्ढावलेपणाने नाकारावी.
कसली माहिती नाकारली? अन्याय झाला असेल तर त्यास पारंपरिक वैदिक म्हणजे हिंदू धर्म जबाबदार नाही. शिवाय दलितांतले दलित आहेत त्यांचं काय? त्यांच्यावर अन्याय झालाच नाही का? या अन्यायासाठी दलितांतल्या पुढीलांना जबाबदार धरावं का? की जगात कुठेही कोणावरही कसलाही अन्याय झाला की हिंदू धर्मालाच जबाबदार धरायचं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 01/15/2017 - 06:10 नवीन
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्विकारला हे जर तुम्हाला माहिती नसेल तर चर्चा इथेच थांबवणे योग्य. जाता जाता तुम्ही बौद्ध धर्माचा "बौद्ध पंथ" असा उल्लेख केला आहे निदर्शनास आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sun, 01/15/2017 - 09:18 नवीन
सतिश गावडे, चर्चा थांबवण्याच्या तुमच्या निर्णयाचा आदर आहे. आंबेडकरांनी बौद्ध पंथ का स्वीकारला, हा तुमचा प्रश्न रास्त आहे. मात माझ्यासमोरील प्रश्न तूर्तास वेगळा आहे. आंबेडकरांना नारायण गुरूंसारखा मार्ग का पत्करावासा वाटला नाही, असा तो प्रश्न आहे. राहता राहिला 'बौद्ध पंथ' हा उल्लेख. बुद्धाने मध्यममार्ग सांगितला आहे. तर मार्ग म्हणजे पंथ. म्हणून 'बौद्ध पंथ' ही संज्ञा उचित अर्थ स्पष्ट करणारी आहे. नाथपंथ हीही अशीच एक संज्ञा आहे. माऊलींनी सिद्धपंथ व पंथराज असे शब्द वापरले आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Mon, 01/16/2017 - 07:44 नवीन
पंथ धर्माच्या अंतर्गत येतो जसे तुम्ही उल्लेख केलेला नाथपंथ हे ही तुम्हाला माहिती असेलच. पंथाला धर्माशिवाय स्वतंत्र अस्तित्व नसते. निदान भारतीय इतिहासातील तसे उदाहरण माझ्या वाचनात नाही. तुम्हाला माहिती असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
A
arunjoshi123 Mon, 01/16/2017 - 20:07 नवीन
आपल्या धर्माला पंथ म्हणणे यामुळे चर्चाच थांबत असेल तर तो कट्टरवाद म्हणावा का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
स
सतिश गावडे गुरुवार, 01/19/2017 - 05:15 नवीन
जोशी, प्रतिसाद खरडण्यापूर्वी इतरांनी लिहीलेले वाचण्याचे श्रम घेत जा. माझं वाक्य आहे,
बाबासाहेबांनी बौद्ध धर्म का स्विकारला हे जर तुम्हाला माहिती नसेल तर चर्चा इथेच थांबवणे योग्य.
यात धर्माला पंथ म्हटल्यामुळे चर्चा थांबवत आहे असा पुसटसा तरी उल्लेख आहे का? तुम्ही मला उद्देशून "आपल्या धर्माला" उद्देशून वगैरे म्हटले आहे ते वाचून गंमत वाटली. तुम्हाला माझा धर्म कोणता हे माहिती आहे का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 गुरुवार, 01/19/2017 - 09:10 नवीन
बरोबर आहे. वाचपो (टायपो तसा वाचपो) झाला आहे. पन्थावर तुम्ही बोलणे थांबवले नाही. चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. =================================== "आपल्या" शब्द बरोबर आहे. षष्ठी विभक्ती तितकी लूज वापरली तरी चालते . तुमचा धर्म बौद्ध आहे. कारण हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म घेतला हे बरे आहे असे तुम्ही म्हणत आहात . तुम्ही प्रत्यक्ष सगळे विधीवत केले असण्याची गरज नाही. ============ नीट वाचायचा विषयच निघाला आहे तर पुढे सांगतो. तसे हिंदू , बौद्ध ( आणि बाकी सगळे) धर्म माझे आहेत. तुमचा सेक्यूलरीझम आहे. पण माझा प्रश्न असा होता मधेच एका वाक्याकरिता तुम्ही माझा (अरुणचा) बौद्ध धर्म माझा (सतिशचा) कसा काय म्हणू शकता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा