दुसरा बाजीराव: २११६
गेल्या आठवड्यात झालेल्या गडकरी पुतळा प्रकरणी बरीच चर्चा, धूमधाम झाली. गडकर्यांनी संभाजीमहाराजांचे जाणिवपूर्वक चारित्र्यहनन केल्याचा पुतळेउखाडसमितीचा आरोप आहे. पुतळाबचावसमितीचा खुलासा असा की तात्कालिक उपलब्ध किंवा ऐकिव माहितीमधे ज्या पद्धतीची प्रतिमा शंभू राजांची होती त्याचा कल्पनाविलास करुन गडकर्यांनी नाटक लिहिले. आता शंभर वर्षांनी बरीच संशोधने होऊन महाराजांचे चारित्र्य जसे पूर्वी सांगितले जात होते तसे नव्हते हे समोर आले आहे. तो काही कपटी लोकांनी त्यांच्यावर राग धरुन मुद्दाम केलेला बनाव होता असे समजले जाते.
इथवर मी काथ्याकूटाची पार्श्वभूमी म्हणून सदर गडकरी-संभाजी प्रकरण घेतले आहे. पुढे वाचतांना कृपया कोणताही गैरसमज करुन घेऊ नये.
आता मला असा प्रश्न पडलाय की आता सांप्रत काळात ज्या ज्या ऐतिहासिक व्यक्तिंबद्दल नकारात्मक लेखन झालेले आहे, होत आहे, किंवा होणार आहे, अशा ऐतिहासिक व्यक्तिंबद्दल पुढे शंभर वर्षांनी काही पुरावे आले की बुवा हे लोक निष्कलंक होते आणि भलत्याच गैरसमजामुळे ह्यांची आजवर मानहानी होत आली, तर या परिस्थितीचे आकलन कसे करावे?
उदाहरणार्थः दुसरे बाजीराव पेशवे, ह्यांनी पेशवाई बुडवली असे सामान्यपणे समजले जाते, इतिहासअभ्यासक व तज्ञांची काही वेगळी सुधारित मते त्यांच्या अभ्यासानुसार असू शकतात. तर समजा शंभर वर्षांनी काही पुरावे-कागदे मिळाली ज्यांने असे सिद्ध झाले की दुसरे बाजीराव हेही पहिल्या बाजीरावासारखे आक्रमक, दमदार होते, त्यांनी अमुक ह्या कारणामुळे राज्य सोडले किंवा जे काही ते. तर आतापर्यंत कोणत्याही साहित्यात त्यांचे काही पात्र रंगवलेले असल्यास काय करावे? म्हणजे आताच २०१७ मधे काय करावे? २११६ पर्यंत समजा हे कलंक मिटवणारे कागद मिळतील असे समजून.
अगदी औरंगजेब, अफझलखान इत्यादींबद्दलही पूर्ण संशोधन झाले असून आता परिस्थिती १८० अंशात फिरवणारे कोणतेही पुरावे पुढे येणार नाहीत असे समजावे काय?
------------------------------------------------------------
अजून काही प्रश्नः
इतिहासात 'व्हिलन पात्रे' बरीच आहेत. ऐतिहासिक व्यक्ति न म्हणता मी व्हिलन पात्रे म्हणत आहे. कारण सामान्य जनता इतिहासाकडे चित्रपटाची, कादंबरीची कथा व ऐतिहासिक व्यक्तिंना हिरो-विरुद्ध-व्हिलन अशा अॅन्गलने पाहते तेही आजचे संदर्भ लावून. अशाच समजूतींमुळे जाती-जातींत चारशे वर्षांआधी घडून गेलेल्या अशा घटनांच्या बद्दल असलेल्या भावनिक आवेगामुळे अनेक वाद घडतात. हे घडतच राहतील. यावर उपाय काय करावा?
जेव्हा मी बी.ए. ला इतिहास विषय घेतला त्याच्या दुसर्या वर्षाला मराठा साम्राज्य अभ्यासाला होते, त्यावेळेला म्हणजे सन २००० साली वयाच्या वीसाव्या वर्षी मला संभाजींविरुद्ध झालेल्या बदनामीच्या कटाची माहिती मिळाली. तोवर संभाजी महाराज गडकर्यांच्या लेखनात दिसल्याप्रमाणेच माहित होते. खरोखर हे प्रकरण २००० सालाच्या आसपास निकालात निघाले का? जर हे खूप आधी निघाले तर जनसामान्यांना ह्या संशोधनांची स्पष्ट आणि जाहीर माहिती का मिळत नव्हती? शालेय अभ्यासक्रमात वीस वर्षांआधी मी जे शिकलो ते बदलल्याचे मला मोठे झाल्यावर कळले. हे शालेय अभ्यासक्रम आता अद्ययावत, खरा व अभिनिवेशशून्य इतिहास शिकवतात काय की अजूनही वीस वर्षांआधीचा मसाला चालू आहे.?
माझ्यामते इतिहासाकडे बघण्याची, इतिहास शिकण्याची, त्याबद्दल चर्चा करण्याची एकूण पद्धतच आमूलाग्र बदलणे आवश्यक आहे. ही एक मोठी जबाबदारी आपल्या पिढीवर आलेली आहे. ही पद्धत कशी विकसित करता येईल ह्याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.
नजर बदलो, नजारे बदल जायेंगे.+१११