Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

व्देष, तिरस्कार, घृणा, सामाजिक वर्चस्ववाद की आणखी काही?

ज
जानु
Tue, 01/10/2017 - 08:32
🗣 18 प्रतिसाद
सध्या बहुजन समाज मोर्चा पासुन महाराष्ट्रात एक वेगळीच घुसळण सुरु आहे. जातीच्या संवेदना तशा गेल्या १० वर्षात हळुहळु टोकदार होत होत्या. ओबीसी आंदोलनाने त्यास चांगलीच हवा दिली. भाजपा केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासुन या प्रकाराला धार चढली. भुजबळ अटकेत गेल्यावर कोणाचा नंबर येतो याकडे जनतेचे आणि दोन्ही काँग्रेसींचे लक्ष होते. कोपर्डी हे तत्कालीन कारण ठरले. या मोर्चापासुन सामाजिक प्रगटीकरणाच्या साधनांवर समाजातील दोन्ही बाजुंकडुन आपाआपली मते जोरदारपणे मांडली जात आहेत. या मुद्द्यांचा विचार केला असता, त्यात खालील बाबी जाणवतात, १ - मागील घटनांचा उल्लेख करुन त्यावर भाष्य होतांना दिसते. २ - या मोर्चात दृश्यपणे आरक्षण आणि जातीविषयक कायदा बदल या मुख्य मागण्या समोर आल्या. ३ - दलित आणि ईतर समाजानेही आपले शक्ती प्रर्दशन करुन आपण लढण्यास तयार आहोत हे दाखवले. ४ - त्या नंतरच्या स्थानिक निवडणुकीत या सगळ्यांचा भाजपाला फटका बसेल असे वाटत होते तो अंदाज चुकला. ५ - यानंतर ब्राम्हणांना दोन्ही बाजुंकडुन भुतकाळातील घटनांवरुन लक्ष करण्यात आले. रोज या मुद्द्यावर आम्ही चेपु, काय अप्पा वर अत्यंत टोकाचे विचार ऐकतो, वाचतो. हे वाचतांना काही बाबी फार खटकल्या, १ - फार कमी लोक यावर संयमित प्रतिक्रिया देतात. २ - आजची स्थिती काय? आजचे आपले सामाजिक, आर्थिक, राजकीय संबंध पणाला लावण्याची तयारी धरावी इतकी गरज आहे का? याचा विचार केला जात नाही. ३ - आपल्या दैवताबाबत अवास्तव कल्पना आणि भ्रामक समजुती, संदर्भहीन अणि बिनबुडाच्या कथा बिनदिक्कतपणे सांगितल्या जातात. ४ - यात २० वर्ष प्राथमिक शिक्षक आणि डॉक्टर म्हणुन सेवा केलेले लोकही मनापासुन भाग घेतांना दिसतात हे फार निराशाजनक. ५ - भाषा वापरण्याचे संकेत, सामाजिक प्रतिष्ठा यांचा विचार न करता असभ्य आणि समोरच्याचा अत्याधिक अपमान कसा होईल याचा प्रकर्षाने विचार करुन पोस्ट टाकल्या जातात? याची खरच गरज आहे का? ६ - बहुजन समाजाला मुस्लीम आपले मित्र ही मांडणी भविष्यात काही कामात येईल का? हे प्रथम मान्य करतो की वरील विचारांमध्ये मुख्यतः मराठा समाजाने अधिक जबाबदारीने वागावे ही अपेक्षा आहे. मी ना ब्राम्हण, ना मराठा, ना अल्पसंख्यांक, ना माझ्या जातीत कोणी महापुरुष आला. (याचा मला आज आनंद वाटतो.) सामाजिक उतरंडीत आम्ही अधे मधे, राजकीय बाबीत शुन्य, आणि आर्थिक आहे त्यात सुखी. आमच्या सारख्यांची मोठी गोची होते, ब्राम्हण, मराठा आणि दलित या सगळ्यांत मित्र असल्याने या मित्राच्या विचारांमधील बदल, जुने मित्र जेव्हा मराठा, दलित, मुस्लीम म्हणुन भेटतात तेव्हा फार वाईट वाटते. या सगळ्या घडामोडींचा आपल्या समाजावर आणि विकासावर फार परिणाम होतील असे मला वाटते. ही एकमेकांविषयीची मते म्हणजे नेमके काय आहे याचा विचार आपण करावा. परिणाम काय होतील याचाही विचार करा. चुका असतील तर दुरुस्त करायच्या की त्याच्या आधारावर अधिक मोठ्या चुका तर आपण करत नाही ना? याचा उहापोह आपण करावा. कृपया मागील घटनांचा / ईतिहासाचा उल्लेख न करता यावर मते मांडावीत ही अपेक्षा.

प्रतिक्रिया द्या
4644 वाचन

💬 प्रतिसाद (18)
श
श्रीगुरुजी Tue, 01/10/2017 - 11:06 नवीन
आजूबाजूला काय होतंय यावर जास्त विचार न करता फक्त स्वप्रगतीवरच भर द्या. आपला इतिहास किती गौरवशाली होता, आपल्या जातीत/धर्मात कोण महान व्यक्ती होऊन गेल्या, कोणत्या जातीच्या लोकांनी भूतकाळात आपल्या पूर्वजांवर अन्याय केला, आपल्या पूर्वजांनी भूतकाळात किती महान कार्य केले इ. अभिनिवेश चघळायला ठीक आहे. परंतु निव्वळ चघळण्यातून प्रगती होणार नाही. भूतकाळ/इतिहास पूर्ण विसरू नका, पण त्यात पूर्ण रमून जाऊ नका. तो फक्त एवढ्यासाठी विसरू नका की त्या काळातील चुकांची पुनरावृत्ती वर्तमानात व भविष्यात होऊ नये. वर्तमान व भविष्य हेच भूतकाळापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे याची जाणीव असू द्या.
  • Log in or register to post comments
R
Ram ram Tue, 01/10/2017 - 14:38 नवीन
किती साळसुद प्रतिक्रिया दिलीय गुर्जींनी वा.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 01/10/2017 - 14:52 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
श
श्रीगुरुजी Wed, 01/11/2017 - 10:44 नवीन
हहपुवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
ख
खेडूत Wed, 01/11/2017 - 10:46 नवीन
साळसुद नाही, निरागस म्हणा हवं तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
म
मनिमौ Tue, 01/10/2017 - 15:20 नवीन
प्रतिक्रियेत काय साळसूद पणा सापडला हे जरा ईस्कटून सांगा
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 01/10/2017 - 18:40 नवीन
वेगळी जात ही जगण्याची वेगळी पद्धती एवढेच मला वाटायचे. पण जात ही आता हिन्स्त्र रानटी टोळी झाली आहे. हे सगळ लवकर थाम्बायला हवे....
  • Log in or register to post comments
द
देवेन भोसले Wed, 01/11/2017 - 04:49 नवीन
खरच सगल्या जाति पुसुन टा़कल्य पाहिजे फक्त मानव हि एकच ओळख पाहिजे वीट आलाय आता जातिजातित अडकुन, कुनाचि प्रगाति तर होनर नहि पन अधोगति नक्कि होते जातित अड्कल्यने
  • Log in or register to post comments
N
nanaba Wed, 01/11/2017 - 04:51 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
औ
औरंगजेब गुरुवार, 01/12/2017 - 04:58 नवीन
असेच जातिआधारीच राजकारण करत राहिलो तर आपला देश कधीच प्रगत होणार नाही.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Mon, 01/23/2017 - 18:54 नवीन
आमच्या सारख्यांची मोठी गोची होते, ब्राम्हण, मराठा आणि दलित या सगळ्यांत मित्र असल्याने या मित्राच्या विचारांमधील बदल, जुने मित्र जेव्हा मराठा, दलित, मुस्लीम म्हणुन भेटतात तेव्हा फार वाईट वाटते. या सगळ्या घडामोडींचा आपल्या समाजावर आणि विकासावर फार परिणाम होतील असे मला वाटते. ही एकमेकांविषयीची मते म्हणजे नेमके काय आहे याचा विचार आपण करावा. परिणाम काय होतील याचाही विचार करा. चुका असतील तर दुरुस्त करायच्या की त्याच्या आधारावर अधिक मोठ्या चुका तर आपण करत नाही ना? याचा उहापोह आपण करावा.
जात मानणे, जात या गोष्टीचे अस्तित्व मानणे हे इतके वाईट का मानले जात असावे? आपल्या सोडून अन्य जातीला आपल्या जातीपेक्षा हिन मानणे हे अयोग्य हे आपण मान्य करू. पण मी मला माझ्या जातीचे का मानायचे नाही? भारतीय घटनेत जे धर्मस्वातंत्र्य दिले आहे ते मूर्ख लोकांनी दिले आहे का? आणि त्यांना देशात असा कोण भेटेल जो फक्त हिंदू आहे आणि पुढे काहीच नाही? एका तुम्ही हिंदू आहेत म्हटले कि पुढे तुम्ही कोण्या ना कोण्या जातीचे आहेत हे ओघाने आलेच. हे घटनाकारांना माहित नव्हते कि काय? म्हणजे शासकिय यंत्रणेची वा भारतीय राजकीय व्यवस्थेची तुम्ही जात मानलीच नाही पाहिजे अशी कोणती गरज वा अट नाही. मग समोरच्या माणसाने आपली जात मानली नाही पाहिजे ही अपेक्षा कोणत्या प्रेरणेतून आली आहे? फक्त सरकारी खुर्चीवर बसल्यावर तुम्ही जातीआधारित भेद सरकारचा ट्रस्टी म्हणून करायचा नाहिये. बाकी तुम्हाला पूर्ण मुभा आहे. भारतीय सरकार हे सेक्यूलर आहे, भारतीय जनता नाही, आणि असायची गरजपण नाही. =========== जात ही उतरंड म्हणून नाही पाळली पाहिजे असा समाजसुधारकांचा आग्रह होता. पण जातीचे जे अन्य पैलू आहेत ज्यांच्यात काही वाईट नाही ते कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आता महाराणा प्रताप राजपूत होता म्हणून शब्द मोडत नसे हे एक ऐतिहासिक सत्य मानू. मी राजपूत असलो तर राजपूत म्हणून किंवा नसलो आमचे राजपूत कसे आहेत ते सांगत मी या वचन पालण्याच्या गोष्टीचे कौतुक का करू नये? ============== हे मोर्चे का निघत आहेत? जातींचे मूकयुद्ध (तसे असल्यास) का चालू आहे? कारण स्वतःला सुज्ञ समजणार्‍या बर्‍याच लोकांना जात या शब्दाचीच भयंकर लाज वाटू लागली आहे. आपल्या जातीची लाज तर विचारायलाच नको. खरे तर हाच प्रकार निर्लज्ज आहे. यातून जातींचे नेतृत्व हे लायकी नसलेल्या लोकांकडे गेले आहे. त्यांनी मग जातीच्या मतपेढ्या, नेपोटिझमचे गढ, नातेवाईकांची जाळी, सरकारी एकजाती खाती, एकजाती उद्योग, एकजाती गुंडगिरी, एकजाती माध्यमा, इइइप्रकार करून टाकला आहे. ============== तुम्हाला तुमच्या जुन्या मित्राला मुस्लिमाला म्हणून भेटायला लागले, अवश्य भेटा. उसका भी एक अपना मजा है. त्याची बिर्यानी खा. नॉनवेज चालत नसेल तर शिरकुर्मा खा. 'काय रे तुमच्या बायका काय मागासल्यासारख्या बुरखा घालतात' असे (म्हणायचे असल्यास) म्हणा. पर यारा उसकी मुसलमानियत ही उससे मत छिन लेना. या मोर्च्यातल्या गर्दीत तो तुमच्या विरुद्ध ओरडत आहे असे इमॅजिन करू नका. आवडले तर स्वतः देखिल स्वतःच्या जातीप्रमाणे वागा. जात, परंपरा हे टॅबू शब्द झालेले आहेत. पण इतकेही हे सगळे अस्मितांच्या दृष्तीने, संस्कृतीच्या दृष्टीने टाकाऊ नाही. लक्षात घ्या आज देखिल नास्तिक लोक ब्राह्मणांना पूजापाठ करत राहिले म्हणून नगण्य शिव्या देतात पण अस्पृश्यता पाळली, मंदिरात प्रवेश दिला नाही म्हणून जास्त शिव्या देतात. यातला हार्मलेस पूजापाठी ब्राह्मणीपणा (तत्सम जातवाद) चालू ठेवायचा आपल्याला संविधानात्मक अधिकार आहे आणि ते इष्ट आहे म्हणूनच असावा.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/24/2017 - 06:03 नवीन
१) भारतीय राज्यघटना जशी व्यक्तिगत आणि सामूहीक सांस्कृतीक अभिव्यक्तीची मोकळीक देते तशी स्वातंत्र्य, समता आणि बंधूतेची हमी देते ह्याचे विस्मरण व्हावयास नको. अरुण जोशी काही गोष्टी विसरत आहेत अथवा विसरु इच्छितात भारतातील जात हि संस्था मुख्यत्वे जन्माधारीत राहीली आहे ज्यात नको असलेल्या ओळखीचा त्याग आणि नव्या ओळखीचा स्विकार सहज साध्य आहेच असे नाही. " अन्य जातीला आपल्या जातीपेक्षा हिन मानणे हे अयोग्य " आहे हे अरुण जोशी मान्य करतात पण असे एकमेकांना हिन मानणे या जातसंस्थेचा आधार राहिला आहे हे विसरु इच्छितात -आणि सांस्कृतीक वैविध्याचा आधार शोधावा तर ह्या जातसंस्थेत सांस्कृतिक वैविध्य खरोखर कितपत आहे ? अरुण जोशींना हिन मानले गेलेल्यांच्या संवेदनांची जाणीव कितपत आहे. गरिबीचा आघातापेक्षा आत्माभिमानावरील आघात मोठा समजला जातो अश्या आत्माभिमानावरील हल्ला मोठ्या समुहांवर झाल्यामुळे भिन्न धार्मीक संस्कृतींचा स्विकार आत्माभिमान डिवचल्या गेल्यांकडून होतो असे नव्हे तर परकीय सत्तेबद्दल सुद्धा आपुलकी निर्माण होऊ शकते आणि परकीय सत्तांना आयते स्थानिक साहाय्यक भेटू शकतात. अख्खा देश परकीयांना अमलाखाली ठेवण्यासाठी तोडा आणि फोडा नितीस अनुकूल होऊन जातो. २) जात संस्था व्यक्तिचे व्यवसाय स्वातंत्र्य नाकारते तेव्हा एखादी होतकरु व्यक्ति दुसर्‍याप्रकारच्या व्यवसायात जाउ इच्छित असेल आणि त्यात कर्तबगारी करु इच्छित असेल तर त्याचे स्वातंत्र्य नाकारले जातेच त्या शिवाय समाज आणि अर्थव्यवस्था एका होतकरु व्यक्तिला आणि त्याच्या बळावरच्या विकासांच्या संधींना मुकत असते. ३) जातसंस्थेची विवाह संस्थेतील बंधने व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
A
arunjoshi123 Tue, 01/24/2017 - 10:59 नवीन
भारतातील जात हि संस्था मुख्यत्वे जन्माधारीत राहीली आहे ज्यात नको असलेल्या ओळखीचा त्याग आणि नव्या ओळखीचा स्विकार सहज साध्य आहेच असे नाही.
सहज साध्य नाही हे मान्य आहे. मी तत्त्वतः योग्य आहे असे म्हणत आहे.
सांस्कृतीक वैविध्याचा आधार शोधावा तर ह्या जातसंस्थेत सांस्कृतिक वैविध्य खरोखर कितपत आहे
मला वैविध्याची हौस नाही. जाती संवर्धनाचा निकष वैविध्य इ इ ? काय संबंध? आपल्याला देशाचे म्यूझियम थोडीच करायचे आहे?
अरुण जोशींना हिन मानले गेलेल्यांच्या संवेदनांची जाणीव कितपत आहे.
संवेदना हा कोणत्याही सज्जन मनुष्याचा स्थायीभाव आहे. बाय डिफॉल्ट संवेदना आहे असे गृहित धरूनच चालावे. असो. मूळात हिन मानले गेले होतेच का? सोवळ्यातला ब्राह्मण आपल्या सख्ख्या (पुरुष) मुलाला शिवत नाही. याला हिन मानणे म्हणतात का मूर्खपणा करणे म्हणतात? सवर्ण स्थानिकच म्हणावे तर आपल्यातल्याच ५०% लोकांना रँडमली निवडून त्यांना उद्यापासून कनिष्ठ कसे मानता येईल? आणि परकीय जेते होते म्हणावे तर त्यात फार काही गैर वाटत नाही. ब्रितिश आणि युरोपीय लोक कितीतरी शतके स्वतःला श्रेष्ठ समजून बाकी वंशांच्या हारलेल्या लोकांना गुलाम बनवतच होते. हारलेल्या लोकांशी पोरसप्रमाणे बरोबरीचा व्यवहार करणे ही त्या काळातल्या लोकांकडून थोडी उच्च्चच अपेक्षा नै का झाली. मंजे आज लोक जिनिवा कंवेंशन नीट पाळत नाहीत, तेव्हा तेव्हा असं कसं शक्य आहे. त्बरे हिन आणि गतजन्मीचे पापी यात फरक आहे. यामागे आर्थिक प्रेरणा होती म्हणावे तर अपरिग्रह हा त्यांच्यावर नियम होता. समाज ब्राह्मणांचे ऐकतो म्हणून मुस्लिम नि ब्रिटिश लोकांनी पुस्तकी सवर्णांना हातात धरल्यावर त्यांना बरे (जास्तच बरे) दिवस आले. राजकीय सत्ता देखिल त्यांना धार्मिक कायद्याप्रमाणे अलाउड नव्हती. (नंतर बरेच अपवाद झाले पण ते सार्‍या वर्णांत झालेत.) ======= ही देखिल संभावना असू शकते कि मला पूर्वजांबद्दलचा आरोप असह्य होतो नि म्हणून मी आरोपच अमान्य करतो. दॅट इज योर कॉल. पण व्यक्तिगत भावनांचा घोळ होऊ नये याचा मी यथाशक्ती प्रयत्न करतो.
गरिबीचा आघातापेक्षा आत्माभिमानावरील आघात मोठा समजला जातो
१००% सहमत.
जात संस्था व्यक्तिचे व्यवसाय स्वातंत्र्य नाकारते
१. जात संस्था व्यक्तिचे व्यवसाय स्वातंत्र्य नाकारते हा पुरोगामी लोकांनी चालवलेला एक अपप्रचार आहे. वेद शूद्रांनी ऐकायचे पण नाहीत इ इ नियम आहेत. पण भारतात पुरोहित जातीच चिक्कार आहेत! जसजसा विकास होत आहे तसे तसे विविध शोध लागत आले आहेत. अलरडी लागलेल्या शोधात सुधारणा होत आहे. मग त्याची काळजी घ्यायला अजून जाती बनल्याच आहेत. बीसी २००० ते एडी १७०० या काळात किती शोध लागलेत? https://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_inventions_and_discoveries हे शोध लागलेच कसे व्यवसाय स्वातंत्र्य नसेल तर? अगोदर एकत्र कुटुंब पद्धती होती आणि व्यवसायाला सगळा सेटाप घरीच असे. मराठा शेतकर्‍याने लोहाराचे आणि सुताराचे काम करून बैलगाडी घरीच बनवली तर त्याला कधीही बॅन नव्हता. गवळ्यांची कामे प्रत्येक घरातल्या बायका करत. पानिपतच्या लढाईत जे लोक मेले त्यातले किती टक्के मराठा होते? वैश्य लोक असताना बाकी किती जातींना व्यवसाञ करायला बंदी होती. अगोदर प्रामुख्याने लोक शेती करत , आणि बर्‍याच जातीचे शेतकरी असतात. २. आधुनिक व्यवस्था देखिल व्यवसाय स्वातंत्र्य नाकारते. वय, शिक्षण, आर्थिक स्थिती, अलरेडी असलेली स्पर्धा, इ इ आधारांवर. शिवाय व्यवसाय म्हणजे विनोद नाही. मी डॉक्टर असेन तर मला आता इंजिनिअर असणे जवळजवळ नाकारलेले आहे. व्यवस्था ही एका अतिजिद्दी माणसासाठी नसावी. ती अनंत सामान्य कुवतीच्या माणसांसाठी असावी. अगदी जुनी व्यवस्था व्यवसाय स्वातंत्र्य नाकारते हे १००% मान्य केले तरी नवी व्यवस्था रोजगार हमी नाकारते हे ही खरे आहे.
जातसंस्थेची विवाह संस्थेतील बंधने व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड येतात.
मान्य आहे. परंतु हेच आजही आधुनिक व्यवस्थेत होत नाही का? क्लाससंस्थेची बंधने असतातच की. But there is a lot beyond profession and marriage in castes as well as in classes.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 01/24/2017 - 11:46 नवीन
क्लाससंस्थेच्या मर्यादा मान्य आणि त्या मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रश्नपण नाही. अर्थात दुसर्‍या संस्थेत मर्यादा आहेत म्हणून ह्या संस्थेच्या मर्यादा स्विकार्य होतात ही तार्कीक उणीव (लॉजीकल फॉलसी) झाली. एका चुक गोष्टीने दुसर्‍या चुक गोष्टीचे समर्थन होत नसते. बाकी पण लिहिण्यासारखे आहे पण मी उर्वरीत जिम्मा उर्वरीत मिपाकरांवर सोडतो किंवा भविष्यातील चर्चेत योग आलातर ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
म
माहितगार Tue, 01/24/2017 - 06:05 नवीन
४) जातसंस्था सामाजिक आणि राजकीय वर्चस्ववाद जोपासत इतर व्यक्ति आणि समुहांच्या संधी कमी करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
संदीप डांगे Tue, 01/24/2017 - 06:57 नवीन
@अरुण भौ, तुम्ही विचार छान करता. चांगलं आहे की... =))
पण जातीचे जे अन्य पैलू आहेत ज्यांच्यात काही वाईट नाही ते कंटिन्यू करायला काही हरकत नाही. आता महाराणा प्रताप राजपूत होता म्हणून शब्द मोडत नसे हे एक ऐतिहासिक सत्य मानू. मी राजपूत असलो तर राजपूत म्हणून किंवा नसलो आमचे राजपूत कसे आहेत ते सांगत मी या वचन पालण्याच्या गोष्टीचे कौतुक का करू नये?
पारधी म्हणून एक जमात आहे, तिचा सरकार दरबारी बहुधा चोर जमात असा उल्लेख आहे असे ऐकले आहे. पारधी असेल तर तो जन्मजात चोरच असतो अशी मान्यता रुढ आहे. जातीचे हेही वैशिष्ट्य राजपूतांच्या वचनपालनाबद्दल कौतुक करतांना माहित असू द्यावं की नको? अशा अनेक जातींना अनेक वैगुण्य चिकटवलेली आहेत. वैशिष्ट्यांसह जात मानायची तर त्यात चांगली-वाईट अशी विभागणी करुन चांगली तेवढी घ्या, वाईट सोडा असे होत नसते. राजपूतांचे उदाहरण घ्या. वचन पाळण्याचा राजपूतांचा विशेष गुण आहे याचा अर्थ इतर जातीचे लोक वचन पाळण्यात ढिसाळ आहेत असा होतो. मग जो राजपूत नाही तो वचन पाळण्यात कच्चा आहे, निम्न आहे असे समजावे लागेल... जातीचे चांगले गुण घ्यायचे म्हटले तरी ते इतरांचे दोष-कमतरता दर्शवण्याचे सूचक विधान होऊ शकते. हे म्हणजे मिसळपाववरचे अर्धे सदस्य गाढव नाहीत असे म्हणण्यासारखे होइल.. बघा ध्यानात येतंय का? दुसरं असं की, लहानपणी पुराणांत वाचले होते की सती अनुसया ही जगातली सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे, सर्वात जास्त एकनिष्ठ पत्नी आहे, वगैरे वगैरे, जे ऐकून तीन देवांच्या पत्नी मत्सर उद्भवून अनुसयेची परिक्षा घ्यायला आपल्या पतीदेवांना भाग पाडतात. तेव्हाही अगदी लहान असतांना मला हा प्रश्न पडलेला का बुवा, अनुसया ही जगातली सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणजे इतर बायका स्लखनशील, चालू टाईप आहेत काय? त्यांचे त्यांच्या नवर्‍यांवर असलेले प्रेम-निष्ठा अनुसयेच्या प्रेम-निष्ठेपेक्षा कमअस्सल आहे हे कुणी ठरवले? हा तर समस्त स्त्री-समाजावर एकप्रकारे आरोप आहे. पण स्त्रियांसकट सगळे लोक माना डोलावून सगळं ऐकून घेतात, असो... कहानी सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही एखाद्या जातीला इतरांपेक्षा वेगळ्या दर्जाची, गुणांची मानता तेव्हा आपोआप श्रेष्ठ कनिष्ठ उतरंड तयार होऊन एकमेकांचा दुस्वास करण्याचा प्रघात सुरु होतो. जात जन्मापासून येते, कर्तृत्व कमवावे लागते. विशिष्ट जातीत जन्माला आलो म्हणजे कर्तॄत्व आपोआप येत नसते. आपल्या पूर्वजांनी कधीकाळी कमावलेल्या कर्तृत्वावर आजचे नेभळट हक्क सांगायला लागले तर ते फक्त हास्यास्पद होतात, ज्याबद्दल रामदास स्वामींनी सांगून ठेवले आहे की "पूर्वजांची सांगे किर्ती तो येक मूर्ख"
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Tue, 01/24/2017 - 09:27 नवीन
पारधी म्हणून एक जमात आहे, तिचा सरकार दरबारी बहुधा चोर जमात असा उल्लेख आहे असे ऐकले आहे.
आहे नव्हे होता. मला काही काही गोष्टींचा आकस आहे त्यात ब्रितिश एक आहेत. मूळात चोर जमात असा प्रकार नाहीच. ब्रिटिशांनी एकदा कायदा केला कि मग काय उरलं? त्यांनी मूर्खासारखं प्रत्येक गोष्ट करायला भारतात विशिष्ट जातीचे लोकच लागतात तर चोरी करायला कोणी जात असेलच (लॉजिक भारी आहे!!) म्हणत हा कायदा केला केला. "भारतीय चोरट्या जमाती कायदा" इ इ केला. त्याला आज १५०-२०० वर्षे झाली. तसे हे लोक फक्त शिकारी आहेत तेही बिनाबंदुकीचे. म्हणून पारधी हा जन्मजात चोर असतो हे अज्ञान आहे, रुढ मान्यता नाही. (काही) शिकारी चोर का झाले? शिकार्‍यांचे जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यावर कायदेशीर बंदी आली. आर्थिक बदल फार फास्ट झाले.
वैशिष्ट्यांसह जात मानायची तर त्यात चांगली-वाईट अशी विभागणी करुन चांगली तेवढी घ्या, वाईट सोडा असे होत नसते.
का नसते. गांधी चांगले तेवढे घ्या. ते तिरसट आणि हट्टी असले तर तेवढे सोडून बाकी घ्या. लोकशाहीत किती वाईट गोष्टी आहेत, सोडतो का आपण लोकशाही?
अशा अनेक जातींना अनेक वैगुण्य चिकटवलेली आहेत.
मी एक ब्राह्मण आहे आणि माझ्या पूर्वजांचा किंवा जातीचा अभिमान करणे समस्त आधुनिक लोकांनी अवघड करून ठेवले आहे. सर्वसाधारणपणे प्राचीन (मंजे प्राचीनपासून परवापर्यंत टाइप) ब्राह्मणांनी (मंजे माझ्या पूर्वजांनी) लोकांना मूर्ख बनवून, त्यांच्यात भेद निर्माण करून, त्यांची बुद्धी भ्रष्ट करून, त्यांच्यावर नको नको ती बंधने टाइप), त्यांना पशूवत मानून त्यांचा अतीव छळ केला, जीवन बर्बाद केले, सारे मूलभूत अधिकार झिडकारले, इ इ लोक सरास म्हणताना दिसतात. अक्षरशः त्या पारधी माणसाची अवस्था आणि माझी अवस्था यांत काही फरक नाही. एक वेळ त्या पारधी माणसास परिस्थिती, दारिद्र्य, शिक्षण, कायदे, (आणि अर्थातच आमच्या ब्राह्मणी व्यवस्थेचा दुष्परीणाम) हे सगळे पाहून गुन्हेगारीच्या न्यूनगंडाबद्दल सहानूभूती देता येईल. माझ्याबद्दल असे अजिबात नाही. पूर्वजांच्या कृतींतून होणार्‍या विषादातून सुटका करून घेण्यासाठी जात मानायची नाही हे काही बरोबर नाही. जे ब्राह्मण आपल्या सद्वर्तनाचे श्रेय आपल्या जातीला देतात त्यांना ते ब्राह्मणच नव्हेत असे म्हणणे देखिल खोटे होईल. महान राजा असण्याचे एक कारण "त्यांच्यामते" मराठा असणे हे एक असेल तर शिवा़जीला मराठा न मानणे हे अर्थहिन आहे. आजचे काही मराठे हे महानपण स्वतःत शोधू लागले तर मला त्याचा आनंदच असायला हवा.
वचन पाळण्याचा राजपूतांचा विशेष गुण आहे याचा अर्थ इतर जातीचे लोक वचन पाळण्यात ढिसाळ आहेत असा होतो.
इंजिनिअर्सं गणित पक्कं असतं मंजे बाकीच्यांचं कच्चं असतं असं होतं का? डॉक्टरांचे असेल, वकिल्लांचे असेल, पण अकाउंटंट, वैज्ञाणिक, बिझनेसमेन, इ इ चं पण असतं. बाय द वे, पारधी देखिल शब्दाचे फार पक्के असतात. तसं त्यांचं रूढ रेप्यूटेशन आहे.
कहानी सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा तुम्ही एखाद्या जातीला इतरांपेक्षा वेगळ्या दर्जाची, गुणांची मानता तेव्हा आपोआप श्रेष्ठ कनिष्ठ उतरंड तयार होऊन एकमेकांचा दुस्वास करण्याचा प्रघात सुरु होतो.
तुम्ही ब्रँड ब्रँड मधे फरक करत असालच कि. कुठे आपल्याकडे नायके आणि आदिदास या दोन जाती दुस्वास करतात? जो करतात त्याला 'आवश्यक स्पर्धा' म्हणतात.
जात जन्मापासून येते, कर्तृत्व कमवावे लागते.
अहो पण जात आणि कर्तृत्व हे दोन विरोधार्थी (किंवा तत्सम) शब्द नाहीत.
ज्याबद्दल रामदास स्वामींनी सांगून ठेवले आहे की "पूर्वजांची सांगे किर्ती तो येक मूर्ख"
रामदासांनी समाजाला चार चांगल्या गोष्टी सांगण्याची त्यांची प्रेरणा काय सांगीतली आहे? पुरूष ब्राह्मण मनुष्य व्हायला भाग्य लागते इ इ ?? ==================== आपण बंधनकारक व्यवहिन, विवाहसंबंध इ इ जातीची लक्षणे हिन मानू. तरीही बरंच उरतं.
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Tue, 01/24/2017 - 11:39 नवीन
वचन पाळण्याचा राजपूतांचा विशेष गुण आहे याचा अर्थ इतर जातीचे लोक वचन पाळण्यात ढिसाळ आहेत असा होतो. हे कसं काय ? अनुसया ही जगातली सर्वश्रेष्ठ पतिव्रता आहे म्हणजे इतर बायका स्लखनशील, चालू टाईप आहेत काय? अजिबात नाही. जर कोणी असा विचार करत असेल तर ते चूक आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा