उद्यापासून भारतात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाविरूद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना गहुंजे (पुणे) येथे गुरूवार २३ फेब्रु ते सोमवार २७ फेब्रु या कालावधीत खेळला जाईल.
मी गहुंजे येथील पहिला कसोटी सामना बघण्यास जाणार आहे. जमल्यास तिथूनच किंवा नंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर सामन्याविषयी लिहीन व काही फोटोही टाकेन. कोणी मिपाकर सामना बघण्यास येणार असतील तर त्यांची भेट घ्यायला आवडेल.
मी यापूर्वी नेहरू स्टेडिअम येथे इंग्लंडविरूद्ध खेळला गेलेला एक एकदिवसीय सामना तिकीट न काढता घुसून बघितला होता. त्याच मैदानावर काही रणजी व दुलीप ट्रॉफीचे सामनेही तिकीट न काढता पाहिले होते. कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची ही पहिलीच वेळ आणि स्वतःच्या पैशाने तिकीट काढून सामना बघण्याची सुद्धा ही पहिलीच वेळ. या कसोटीत अनेक आवडत्या खेळाडूंना प्रत्यक्ष डोळ्यासमोर खेळताना बघणार आहे.
पुण्यात/पुणे परीसरात प्रथमच कसोटी सामना खेळला जात आहे. यापूर्वी पुण्यातील नेहरू स्टेडिअमवर काही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले गेले होते. त्यातील शेवटचा सामना २००५ मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर पुण्यात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. उद्यापासूनच प्रथमच गहुंजे येथील मैदान एक नवीन कसोटी केंद्र म्हणून उदयास येत आहे.
मालिकेचे वेळापत्रक असे आहे (सर्व सामने सकाळी ९:३० ते दुपारी ४:३० या वेळात खेळले जातील).
पहिला कसोटी सामना - गहुंजे (पुणे) येथे २३ ते २७ फेब्रु
दुसरा कसोटी सामना - बंगळूर येथे ४ ते ८ मार्च
तिसरा कसोटी सामना - रांची येथे १६-२० मार्च
चौथा कसोटी सामना - धर्मशाळा येथे २५-२९ मार्च
भारताने पहिल्या दोन कसोटींसाठी जाहीर केलेल्या संघात नेहमीच्या यशस्वी खेळाडूंप्रमाणे कुलदीप यादव व जयंत यादव हे नवोदीत खेळाडू आहेत. अभिनव मुकुंदचे बर्याच कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. त्रिशतकी वीर करूण नायर सुद्धा संघात आहे. मात्र सातत्याने अपयशी ठरलेल्या के एल राहुलला पुन्हा एकदा संघात घेतले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघात कर्णधार स्टिव्हन स्मिथसह डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, शॉन मार्श, अॅश्टन अॅगर, जॅकसन् बर्ड, जॉश हॅजलवूड, पीटर हॅन्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नेथन लॉयन, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन ओ'कॅफी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन इ. खेळाडू आहेत.
भारतीय खेळपट्ट्यांचे स्वरूप लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियाने संघात फिरकी गोलंदाजांचा भरणा केला आहे. अर्थात अश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर ऑसीज किती टिकाव धरू शकतात ते कळेलच. त्यांच्या जोडीला अमित मिश्रा सुद्धा आहे. भारताने भारतात खेळली गेलेली मागील मालिका ४-० अशी निर्विवाद जिंकली होती. परंतु २०१५ मध्ये भारताचा ऑस्ट्रेलियात ०-२ असा पराभव झाला होता. एकंदरीत दोन्ही देश आपापल्या भूमीत जिंकतात असेच मागील २-३ दशकात दिसून आले आहे (अपवाद भारतातील २००४ मधील मालिकेचा). भारताने लागोपाठ ६ मालिका जिंकून कसोटी क्रमवारीत प्रथम स्थान मिळविले आहे. भारताने मागील सलग १९ कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे याही मालिकेत भारतातेच पारडे जड आहे.
सकाळी लवकर उठून गहुंजेला निघालो. काही कारणाने अपेक्षित वेळेवर निघता आले नाही. त्यामुळे अंदाजे अर्धा तास उशीरा पोहोचलो. पण नंतर दिवसभर सामना पाहिला.
सुरवातीपासूनच वॉर्नर व रेनशॉ अत्यंत संथ खेळत होते. खेळपट्टी पाटा वाटत होती. तरीही दोघे संथ खेळत होते. बराच वेळ प्रतिषटक धावगती २.५० च्या आसपास होती. उपाहारापूर्वी काही वेळ असताना नाबाद ८२ या धावसंख्येवर उमेश यादवच्या गोलंदाजीवर वॉर्नर त्रिफळाबाद झाला. त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्ट्यांवर गेला. यादव चेंडू टाकत असताना मी दुर्बिणीतून खेळ पाहत होतो. दुर्बिणीतूनच वॉर्नरचा त्रिफळा उडालेला अगदी स्पष्ट दिसला. हा माझ्या दृष्टीने अविस्मरणीय क्षण आहे!
वॉर्नर बाद झाल्यावर पुढील फलंदाज यायच्या आतच रेनशॉ देखील स्नायू दुखावल्यामुळे तात्पुरता निवृत्त झाला. त्यामुळे शॉन मार्श व कर्णधार स्टिव्हन स्मिथ हे दोन फलंदाज एकदमच खेळायला आहे. उपाहाराला १ बाद ८४ अशी धावसंख्या होती. उपाहारानंतर पुन्हा एकदा संथ खेळ सुरू झाला. काही वेळातच शॉन मार्श स्वीप मारण्याच्या प्रयत्नात बॅकवर्ड शॉर्टलेगला कोहलीच्या हातात झेल देऊन बाद झाला. ही विकेट देखील मी दुर्बिणीतून पाहत असतानाच पडली.
नंतर काही वेळाने पीटर हॅन्ड्सकॉम्ब व स्टिव्हन स्मिथ बाद झाले. उपाहाराला ऑसीज ४ बाद १४९ होते. उपाहारानंतर भराभर विकेट्स पडायला सुरूवात झाली. आधी शॉन मार्श, नंतर मॅथ्यू वेड व नंतर रेनशॉ बाद झाले. तत्पूर्वी रेनशॉने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. काही वेळाने उमेश यादवच्या एका चेंडूवर उडालेला ओ'कॅफीचा झेल साहाने उजव्या बाजूला हवेत झेपावत एका हातात घेतला व एक अत्यंत उत्कृष्ट झेल याचि देही याचि डोळा बघितल्याचे भाग्य लाभले. यादवच्या पुढच्याच चेंडूवर लॉयन पायचित झाला व उमेश यादवला हॅटट्रिकची संधी मिळाली. यावेळी ऑसीज ९ बाद २०५ अशा अवघड परिस्थितीत होते. परंतु त्याचा पुढील चेंडू हॅझलवूडने नीट खेळून हॅटट्रिक वाचविली.
त्यावेळी पावणेचार वाजले होते व खेळ संपायला अजून ४५ मिनिटे होती. काही वेळातच १० गडी बाद होऊन आपल्याला आजच भारताची फलंदाजी बघायला मिळणार असे वाटत असतानाचा मिचेल स्टार्क ने जोरदार हल्ला चढविला. भारताच्या फिरकी गोलंदाजांची धुलाई करताना त्याने ३ षटकार व ५ चौकारांच्या सहाय्याने जवळपास १०० च्या धावगतीने नाबाद अर्धशतक करून दिवस संपविला. खेळ थांबला तेव्हा ऑसीज ९ बाद २५६ या धावसंख्येवर होते.
आता उद्या लवकरच भारताची फलंदाजी सुरु होईल अशी आशा आहे.
उद्या येइन म्हणतो गहुंजेला.. पुण्यातला पहिला एकदिवसीय सामना पाहिला होता प्रत्यक्ष .. तो पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच होता.. माझ्या दुर्दैवाने तो सामना भारताने गमावला होता..
इंग्लंडविरुद्धचा पुण्यातला सामना त्याच दिवशी मुंबई मॅरॅथॉन असल्याने प्रत्यक्ष पहाता आला नव्हता.. नेमका तो अविस्मरणीय झाला..
आता कसोटी सामनाही बघायचाय आयुष्यात प्रथमच.. यावेळी तरी कामगिरी सरस होवो ही इच्छा.. आत्ता तरी फार वाईट अवस्था आहे भारताची.. १०० च्या आत ५ गेले...
Great atmosphere here although very thin crowd (approx. 7 k). Watched all wickets live. Wicket boomranged. Excellent catching by Aussies. India got out in just 40.2 overs. Warner is already gone. India will most probably lose this match.
केटी लागून क्रिटीकल ला विषय गेलेल्या ईंजिनीअरिंग च्या स्टुडंट च्या निष्ठेनं, डिटरमिनेशन नं आणी बुडाला आग लागल्या च्या भावनेनं खेळलो तरच ईभ्रत वाचेल आता. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे सारसबागेतल्या गणपतीसमोर सामुदायिक रीत्या 'ओ पालनहारे' चा गजर करणे.
दुसरा दिवसही आनंदात गेला. आजच्या दिवसात एकूण १५ विकेट्स पडल्या. ऑस्ट्रेलियाने ९ बाद २०५ वरून स्टार्कच्या फक्त ६३ चेंडूतील ६१ धावांमुळे २६० ची मजल मारली. ऑस्ट्रेलियाला थोडक्यात गुंडाळण्याचा भारताचा आनंद फार काळ टिकला नाही. फलंदाजी सुरू झाल्यापासून के एल राहुल जोरदार फलंदाजी करीत होता. तो थोडासा नशीबवानही ठरला कारण त्याचे २-३ फटके स्लीपच्या डोक्यावरून किंवा दोन स्लीपमधून हवेतून पार झाले. दुसरीकडे १० धावा करून मुरली विजय हॅझलवूडच्या एका बाहेर जाणार्या चेंडूला बॅट लावून यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. पुजारा थोडा वेळ टिकला. पण दुसर्या हप्त्यात गोलंदाजीला आलेल्या स्टार्कच्या एका बाहेर जाणार्या चेंडूवर पुजारा देखील बॅट लावून यष्टीरक्षकाकडे सोपा झेल देऊन बाद झाला.
सर्व प्रेक्षक फलंदाजीसाठी कोहलीची आतुरतेने वाट पहात होते. तो मैदानात येऊ लागल्यावर प्रेक्षक भयंकर चेकाळले व आरडाओरडा करून त्यांनी स्टेडिअम दणाणून सोडले. त्यात अर्थात मी सुद्धा होता. कोहलीने स्टार्कचा पहिला चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळून काढला. पुढच्या काहीशा खाली राहिलेल्या बाहेर जाणार्या चेंडूवर चेंडूच्या पुरेसे जवळ न जाता त्याने बॅट लावली व पहिल्या स्लीपमध्ये पीटर हॅन्ड्सकॉम्बने एक अत्यंत उत्कृष्ट लो कॅच घेतल्यावर सर्वांना दु:खाचा धक्का बसला. १ बाद ४४ वरून केवळ ३ चेंडूत भारत ३ बाद ४४ अशा अडचणीत आला.
नंतर रहाणेने राहुलला बर्यापैकी साथ दिली. राहुलने आपले अर्धशतक झटपट पूर्ण केले. नंतर त्याने लागोपाठ २ चौकार मारून रहाणेबरोबर ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. भारत ३ बाद ९४.
पुढच्या ओ'कीफ या डावखुर्या फिरकी गोलंदाजाचा एक चेंडू खेळताना त्याने तो लाँगऑनला उचलून मारण्याचा प्रयत्न करताना त्याचा खांदा दुखावला व चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागून डीप फाईन लेग व डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान उंच झेल उडाला. फटका मारल्याक्षणीच तो वेदनेने जमिनीवर कोसळला. दरम्यानच्या काळात कसलेला क्षेत्ररक्षक डेव्हिड वॉर्नर लांबून धावत आला आणि त्याने अचूक झेल पकडला. ४ बाद ९४.
अश्विन ६ व्या क्रमांकावर खेळायला आला व त्याने पहिल्याच चेंडूवर १ धाव घेतली. ओ'कीफच्या पुढच्याच काहीश्या उसळलेल्या चेंडूवर रहाणेला आपली बॅट काढता आली नाही आणि पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने एका बाजूला झेपावत एका हातात उत्कृष्ट झेल घेतला. झेल नीट घेतला की नाही याची पंचांनी तृतीय पंचांकडे विचारणा केली. रिप्लेमध्ये झेल अत्यंत अचूक जमिनीच्या वरच पकडल्याचे स्पष्ट दिसले आणि रहाणे १३ धावा करून परतला. ५ बाद ९५.
आता साहा खेळायला आला. या षटकाचे अजून २ चेंडू शिल्लक होते. षटकात पहिल्या ४ चेंडूत २ बळी गेलेले होते. ६ व्या चेंडूवर साहाची बॅट चेंडूला लागली आणि झेल यष्टीरक्षकाच्या हाताला लागून पहिल्या स्लीपमध्ये स्टिव्हन स्मिथच्या हातात विसावला. एकाच षटकात ३ बळी घेऊन ओ'कीफने भारताचे कंबरडे मोडले. ६ बाद ९५.
काय होत आहे यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नव्हता. अवघ्या ४-५ मिनिटात हाराकिरी झाली होती. लॉयनच्या पुढच्या षटकाच अश्विनने एक चेंडू बॅकफूटवर खेळला. चेंडू बॅटच्या दांड्याला लागून त्याच्या बुटावर पडला व तिथून उडून फॉरवर्ड शॉर्टलेगच्या दिशेने उडाला. पुन्हा एकदा पीटर हॅन्ड्सकॉम्बने अगदी खाली लो कॅच उत्कृष्ट झेलला. भारत ७ बाद ९५.
आता जयंत यादव आला. तो बर्यापैकी फलंदाजी करू शकतो. त्याने व जडेजाने पुढील २ षटके सावध फलंदाजी करून धावसंख्या ९८ पर्यंत नेली. ओ'कीफच्या पुढच्या षटकात पाय ताणून फ्रंटफूटवर खेळताना जयंत यादवचा मागील पाय किंचित क्रीजच्या पुढे गेला. पाय मागे येण्याच्या आतच यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने बेल्स उडविल्या. रिप्लेत दिसले की यादवचा मागील पाय रेषेपासून जेमतेम १ सेंटीमीटर अलिकडेच राहिला व तो यष्टीचित झाला. ८ बाद ९८.
उमेश यादव फलंदाजीला आल्यावर ओ'कीफच्या पुढच्या षटकात जडेजाने त्याचा एक चेंडू बेजबाबदारपणे मिडविकेट बाऊंड्रीच्या दिशेने उचलला. तिथे उभा असलेल्या लंबूटांग स्टार्कने कोणतीही चूक न करता आरामात झेल पकडला. हा ओ'कीफचा ५ वा बळी. ९ बाद १०१.
शेवटचा फलंदाज इशांत शर्मा. पुन्हा एकदा ओ'कीफच्याच गोलंदाजीवर उमेशने स्लीपमध्ये स्मिथच्या हातात सोपा झेल दिला. भारत सर्वबाद १०५. ओ'कीफने ६ बळी घेऊन आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. त्याचे पृथक्करण होते १३.१-२-३५-६. त्याने फक्त २४ चेंडूत ६ बळी मिळवून भारताची दाणादाण उडवून दिली. फिरकी खेळणारा सर्वोत्कृष्ट संघ अशी भारताची ओळख आहे. परंतु भारताने फिरकी गोलंदाजासमोरच नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाने एकूण १५५ धावांचे जबरदस्त आधिक्य मिळविले.
ऑस्ट्रेलियाचा डाव देखील सुरवातीस कोसळला. अश्विन व जडेजाने गोलंदाजीची सुरूवात करून काही वेळातच ३ बाद ६१ अशी पडझड केली. तीनही बळी अश्विनने घेतले. परंतु नंतर कर्णधार स्मिथ व रेनशॉने डाव सावरला. ११३ धावसंख्येवर जयंत यादवच्या गोलंदाजीवर लाँगऑफला षटकार मारताना रेनशॉचा इशांत शर्माने उत्कृष्ट झेल घेतला. ४ बाद ११३. परंतु त्यानंतर मिचेल मार्श व स्मिथने अजून विकेट न गमावता धावसंख्या १४३ पर्यंत नेली. आता ऑस्ट्रेलियाकडे २९८ धावांचे आधिक्य आहे व अजून ६ गडी बाद व्हायचे आहेत.
एकंदरीत भारताची अवघड परिस्थिती आहे. ३५० धावांहून मोठे लक्ष्य असेल तर भारताला ते अवघड जाणार आहे. उद्या जर ऑस्ट्रेलियाने ४०० धावांच्या लक्ष्याचा टप्पा पार केला तर भारत सामना हरल्यातच जमा आहे. सामना बहुतेक ४ थ्या दिवशीच संपेल अशी चिन्हे आहेत. तसा खेळपट्टीत फारसा दम नाही. परंतु भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली.
निघाले असतील. सर्वबाद १०७. ३३३ धावांनी पराभव.
आज टिकाव धरला असता तर उद्या जाणार होतो पोराला घेऊन मॅच बघायला. आता त्याची कशी समजूत घालायची ह्याचा विचार करतोय.
चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताचा ६ वा गडी बाद झाला होता व फक्त ९९ धावा फलकावर होत्या. त्यामुळे तेव्हाच घरी निघालो. चहापानाची २० मिनिटे थांबून नंतर दिवस संपेपर्यंत थांबण्याचा पेशन्स शिल्लक नव्हता. चहापान संपल्यावर जेमतेम २०-२२ मिनिटातच उर्वरीत ४ खेळाडू बाद होऊन भारताचा स्वतःच्या भूमीवर तब्बल ३३३ धावांनी अत्यंत लाजिरवाणा पराभव झाल्याचे नेटवर समजले आणि चहापानानंतर लगेच परत निघण्याचा अचूक निर्णय घेतल्याबद्दल स्वत:चीच पाठ थोपटली.
इतक्या लाजिरवाण्या पराभवाचे आपण साक्षीदार असल्याचे वाईट वाटले. कांगारूंना कमी लेखणे व स्वतःबद्दल असलेला फाजील आत्मविश्वास यामुळे भारताचा जेमतेम पावणेतीन दिवसातच दारूण पराभव झाला. भारताचा पहिला डाव जेमतेम ४०.१ षटकात ३ तासात १०५ धावात संपला तर दुसरा डाव तर जेमतेम २ तासात ३३.५ षटकात १०७ धावात संपला. भारताने दोन्ही डाव मिळून जेमतेम ५ तास फलंदाजी केली व फक्त ७४ षटके खेळून २१२ धावा केल्या.
मी दुर्बिणीतून पाहत असतानाच बहुतेक सर्व विकेट्स पडल्या. त्यामुळे बहुतेक सर्व विकेट्स अगदी जवळून प्रत्यक्ष बघता आल्या. विशेषतः दोन्ही डावात कोहलीला बाद होताना बघितले. दुसर्या डावात ओ'कीफचा काहीसा बाहेर पडलेला एक चेंडू स्टंपाबाहेरून निघून जाईल या समजूतीने कोहलीने दोन्ही हाताने बॅट उचलून धरून चेंडू सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने त्याचा अंदाज चुकला व चेंडू काहीसा आत येऊन त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त झाल्याचे पाहणे नशीबी आले. खरं तर तिथेच सामना संपला होता. पण आशा चिवट असते. म्हणून अजून थोडा वेळ थांबावे असा विचार केला. परंतु निराशाच पदरात पडली.
नवोदीत डावखुरा गोलंदाज स्टिव्हन ओ'कीफ याने दोन्ही डावात ६ बळी घेऊन सामन्यात तब्बल १२ बळी मिळवून सामनावीराचा पुरस्कार मिळविला. त्याला नेथन लॉयनने पहिल्या डावात १ व दुसर्या डावात ४ बळी घेऊन उत्तम साथ दिली. स्टार्कने पहिल्या डावात केवळ ३ चेंडूत पुजारा व कोहलीला बाद करताना फलंदाजीत पहिल्या डावात ६३ चेंडूत ६१ व दुसर्या डावात ३१ चेंडूत ३० असे वेगवान डाव खेळले. त्याने दोन्ही डावात ३-३- षटकार मारले. रेनशॉने पहिल्या डावात ६८ तर दुसर्या डावात ३१ धावा केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथने पहिल्या डावात २७ धावाच केल्या, पण दुसर्या डावात शतक झळकावले. भारताची गोलंदाजी तशी चांगली झाली. उमेश यादव, अश्विन व जडेजाने दोन्ही डावात चांगली गोलंदाजी करून भरपूर बळी मिळविले. परंतु फलंदाजीत राहुलच्या पहिल्या डावातील ६१ धावांचा अपवाद वगळला तर इतरांनी नुसत्या पाट्या टाकल्या.
२००४ नंतर तब्बल १३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात कसोटी सामना जिंकला. २००४ ची भारतात खेळली गेलेली ४ सामन्यांची मालिका भारत १-२ असा हरला होता. यावेळी त्याचीच पुनरावृत्ती होते की काय ही भयशंका मनात डोकावत आहे.
आता भारताला पुढील ३ कसोटींपैकी एकही न हरता किमान २ सामने जिंकावे लागतील. पुढील कसोटी सामना ४ मार्चला बंगळुरात आहे.
५ दिवसांच्या तिकिटापैकी सव्वा दोन दिवसांचे तिकीट वाया गेले. तिकिटाचे पैसे आता कोण भरून देणार?
आजपासून ऑस्ट्रेलियाविरूद्ध दुसरा कसोटी सामना बंगळूर येथे सुरू झाला. भारताने संघात २ बदल केले आहेत. सलामीवीर मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंद व जयंत यादवच्या जागी त्रिशतकवीर करूण नायरला संघात घेतले. ऑस्ट्रेलियाने पुण्यातील विजयी संघ कायम ठेवला आहे.
मुरली विजयच्या जागी अभिनव मुकुंदला आणल्याने भारतीय संघाच्या कामगिरीत शून्य फरक पडला. संघाची धावसंख्या जेमतेम ११ असताना मुकुंद शून्यावर बाद झाला. मागील १-२ वर्षांपासून सलामीची जोडी ही भारताची प्रमुख समस्या आहे. गेल्या २ वर्षात खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यात सलामीच्या जोडीचा किमान एक फलंदाज स्वस्तात बाद झालेला आहे. किंबहुना भारतीय सलामीच्या जोडीने यापूर्वी किमान अर्धशतकी भागीदारी मागील २ वर्षात किती वेळा केली हा संशोधननाचा विषय आहे. मुरली विजय, राहुल, पार्थिव पटेल, गौतम गंभीर, अभिनव मुकुंद असे सलामीसाठी अनेक प्रयोग करून झाले. परंतु भारताला भक्कम सुरूवात देणारी सलामीची जोडी अजून मिळालेली नाही.
काही वेळाने पुजारा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने फक्त १७ धावा केल्या. त्यापाठोपाठ कोहली पुन्हा एकदा अपयशी ठरला. फिरकी गोलंदाज नेथन लॉयनचा एक चेंडू खूप वळून लेगस्टंपबाहेर जाईल हे गृहित धरून त्याने चेंडू न खेळता बॅट वर करून सोडून दिला. त्याच्या दुर्दैवाने चेंडू थोडासाच वळून त्याच्या पायांवर चेंडू आदळला त्यावेळी त्याचा पाय अगदी मधल्या यष्टीसमोर होता. त्यामुळे पंचांना त्याला पायचित बाद द्यायला जराही कष्ट पडले नाहीत. मागील सामन्यातील दुसर्या डावात ओ'कीफचा चेंडू वळणार नाही अशा समजूतीने त्याने सोडून दिला होता, परंतु तो चेंडू थोडा वळून आत आला व कोहलीच्या ऑफस्टंपवर जाऊन आदळला होता. म्हणजे लागोपाठ दुसर्य डावात कोहलीचा फिरकीचा अंदाज चुकला. कोहलीने ३ डावात ०, १३ व १२ अशा धावा केल्या आहेत.
नंतर रहाणे आला आणि थोड्याच वेळात तोही १७ वर यष्टीचित झाला. रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पुढील डावातही रहाणे अपयशी ठरला तर बहुतेक तो संघाबाहेर जाईल कारण रहाणे मागील १०-१२ डावात एक अर्धशतक वगळता पूर्ण अपयशी ठरला आहे. भारत ४ बाद ११८. त्यातले ३ बळी लॉयनचे.
त्यानंतर स्थानिक खेळाडू करूण नायर आला. इंग्लंडविरूद्ध त्रिशतक करूनसुद्धा रहाणेला आत आणण्यासाठी त्याला नंतरच्या सामन्यात वगळण्यात आले होते. दुसरीकडे दुसरा स्थानिक खेळाडू के एल राहुल चांगली फलंदाजी करून धावा वाढवित होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. करूण नायर बर्यापैकी खेळत असताना तो ओ'कीफच्या गोलंदाजीवर २६ धावांवर यष्टीचित झाला. एकंदरीत फिरकी गोलंदाजी खेळण्यामध्ये दादा समजले जाणारे भारतीय फलंदाज भारतातच फिरकीसमोर फसत आहेत. ५ बाद १५६.
नंतर अश्विन आला आणि गेला. त्यापाठोपाठ वॄद्धिमान साहा आला आणि गेला. त्यानंतर आलेला जडेजा देखील हजेरी लावून परतला. आता भारताची अवस्था ८ बाद १८८ अशी दारूण आहे. यावेळी फिरकी गोलंदाज नेथन लॉयन याने ६ बळी घेतले आहेत.
भारताची परिस्थिती अत्यंत अवघड आहे. एकटा राहुल नाबाद ८९ धावांवर झुंज देत आहे. उर्वरीत सर्व फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरले आहेत.
संपला डाव. भारत सर्वबाद १८९. नेथन लॉयनची २२.२-४-५०-८ अशी अफलातून कामगिरी. १८९ मधील ९० धावा एकट्या राहुलच्या. उर्वरीत १० जणांनी मिळून ८३ धावा केल्या व १६ धावा अतिरिक्त. पुण्यातील कहाणीचा पुढील अंक बंगळूरमध्ये सुरू.
दिवसअखेर भारत सर्वबाद १८९ तर ऑसीज नाबाद ४०. पहिल्याच दिवशी भारताची वाट लागली आहे. हा सामना जर भारत हरला तर मालिका हरल्यातच जमा आहे.
भारताची संघनिवड चुकत आहे. वृद्धिमान साहाऐवजी पार्थिव पटेल हवा होता. त्याच्यामुळे एक डावखुरा फलंदाज मिळतोच पण एक सलामीचा फलंदाजही मिळतो. इशांत शर्मा गोलंदाजी व फलंदाजी या दोन्हीतही निष्प्रभ आहे. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. भुवनेश्वर कुमार बर्यापैकी फलंदाजीही करतो. अजिंक्य रहाणेऐवजी कुलदीप यादव हा डावरा लेगस्पिन गोलंदाज संघात आल्यास एक वेगळ्या पद्धतीचा गोलंदाज संघात येऊन ५ व्या गोलंदाजाचा फायदा होईल. निदान पुढील २ कसोटीसाठी तरी योग्य ते बदल व्हावेत.
भारत जिंकण्याची शक्यता मला फारच कमी वाटत आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी टिच्चून फलंदाजी करून मालिकेच्या आधीच्या तीनही डावात किमान २६० धावा केल्या आहेत.
ही खेळपट्टी चमत्कारिक वाटते. भारताच्या पहिल्या डावात ९ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ८ फलंदाज फिरकी गोलंदाजांनी बाद केले. भारताच्या दुसर्या डावात फिरकी गोलंदाजांना फक्त दोनच बळी मिळाले पण वेगवान गोलंदाजांनी ८ गडी बाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात भारताचे फिरकी गोलंदा़ज यशस्वी ठरतात का मध्यमगती गोलंदाज हे सांगता येणे अवघड आहे. तसेही १८८ हे फार मोठे लक्ष्य नाही.
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे. गेल्या २-३ वर्षांपासून भारताला भरवशाची सलामीची जोडी मिळालेली नाही. मुरली विजय, राहुल, धवन, गंभीर, पार्थिव पटेल, अभिनव मुकुंद असे अनेक प्रयोग सलामीसाठी केले गेले. सलामीच्या जोडीपैकी किमान एक फलंदाज चटकन बाद होतो. मागील २-३ वर्षात भारताच्या सलामीच्या जोडीने अर्धशतकी भागीदारी केल्याची अगदी दुर्मिळ उदाहरणे सापडतील.
कोहलीचे या मालिकेतील अपयश चिंताजनक आहे. मागील ४ डावात त्याने ४,१३, १२ व १५ अशा ४० धावा केल्या आहेत. जडेजा व अश्विन सर्व सामन्यात अपयशी ठरले आहेत. रहाणेने फक्त १ अर्धशतक केले. मुरली विजय व मुकुंद सर्व डावात अपयशी आहेत. पुजाराच्या आजच्या ९२ धावा सोडल्या तर तोही साहाच्या आजच्या नाबाद २० धावा सोडल्या तर तोसुद्धा अपयशी आहे. एकट्या राहुलने ४ पैकी ३ डावात अर्धशतक केले आहे.
गोलंदाजांची व संघाची निवडही चुकत आहे. इशांत शर्माचा फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात फारसा उपयोग नाही. त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमार हवा होता. तसेच संघात कुलदीप यादव हा अजून एक चायनामन फिरकी गोलंदाज हवा होता. सलामीसाठी व यष्टीरक्षक म्हणून सुद्धा पार्थिव पटेलला पुन्हा संघात आणल्यास उपयोग होईल.
भारताला डीआरएसचा नीट वापर करता येत नाही असे दिसत आहे. आतापर्यंत भारताने फलंदाजी व गोलंदाजी करताना डीआरएसच्या बहुतेक सर्व संधी वाया घालविल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या दुसर्या डावात पहिल्या ४ षटकात नाबाद २२ धावा आहेत. त्यात ८ बाय धावांचा समावेश आहे. जिंकण्यासाठी आता फक्त १६६ धावा हव्या आहेत. बहुतेक आजच सामना संपेल.
एकंदरीत भारतीय भूमीवर भारताच्या सामर्थ्याचा फुगा फुटत आहे.
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे.
<<
<<
सहमत श्रीगुरुजी,
आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.
भारताची फलंदाजी दयनीय अवस्थेत आहे.<< << सहमत श्रीगुरुजी, आजच्या दिवशी फक्त ३६ धावांच्या बदल्यात भारताचे सहा फलंदाज बाद झाले, अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ही.