ओंजळीने ती जसा,झाकून घेते चेहरा...
ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा...
का कसा ठावूक नाही,लाल होतो मोगरा!
मोकळ्या केसांतुनी बहरून येतो केवडा
अन् बटांचा जीवघेणा पीळ दिसतो कोबरा!
आरसा घायाळ होतो ती जशी डोकावते
केवढी नाजूक आहे,हीच का ती अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
खेचतो भोळ्या जिवाला पाकळ्यांचा भोवरा!
काय सांगू केवढी असते सुगंधी भेट ती?
ती फुलांची पाहुणी अन् मी फुलांचा सोयरा!
—सत्यजित
मूळ रचना व विडंबन,या दोन्हीचे वातावरण,त्या त्या धाग्यांवर कायम राहिल!संदीप आणि चतुरंगजींनी डायरेक्ट धाग्यावर केलेली विडंबनं रंगाचा बेरंग करुन गेली. सदर प्रतिभा सेपरेट उमटल्या असत्या तर बरं झालं असतं कारण या निमित्तानं ज्यांना कवितेचा मूड वगैरे काही कळत नाही ते सुद्धा विडंबनांची तळी उचलतात. अर्थात, मिपावर ही अनर्थकारी परंपरा पूर्वापार आहे आणि प्रशासनाच्या जोपर्यंत ही किमान गोष्ट लक्षात येत नाही तोपर्यंत चांगल्या रचनांचा विचका होऊन कवी नाऊमेद होत राहाणार. इथे चांगल्या कविता याव्या अशी इच्छा असेल तर प्रशासनाला किमान चांगल्या रचना आणि सुमार रचना यात तारतम्य करता यायला हवं. एक वेळ सुमार रचनांवर तिथल्या तिथे केलेली विडंबनं हास्यरस निर्माण करु शकतात पण चांगल्या रचनांचा रसभंग झाल्याशिवाय राहात नाही. शिवाय कवी हतोत्साह होऊन नवी किंवा अती तरल रचना इथे टाकेल की नाही हा मुद्दा आहेच. अर्थात, प्रशासन जर उदार धोरण ठेवून सगळे सदस्य एकसमान ( :) ) तद्वत सब कवी बाराटक्के ही पॉलिसी राबवणार असेल तर बोलायलाच नको.