श्रद्धावंतांचे "तत्त्व"ज्ञान - विडंबन
माझ्या परिचयाचे एक गृहस्थ नास्तिक आहेत. ते मला सोमवारी (दि.१६ ऑक्टो 2017) रस्त्यात भेटले. "कुठे जात आहात?" असा थेट प्रश्न त्यांना विचारू नये याची मला कल्पना आहे. कारण, "राइट टू प्रायवसी" या संविधानात्मक वचनावर त्यांचा हक्क असतो. असा प्रश्न कोणाला विचारला तर त्याचे खासगीपण भंग होते, असे त्यांना वाटते. म्हणून त्यांना आडवळणाने विचारले. "काय? कुठपर्यंत फेरी?"
" भाजीवाल्याकडे जात आहे."
" पण आज तर बाजारचा दिवस नाही. रविवार आहे."
" अहो, आज वांग्याचे भाव पडलेत. तुम्हा दोडके खाणारांना त्याचे काय म्हणा ! "
" वांग्यांच्या बाजारात त्याचे भाव पडल्या दिवशी एवढी गर्दी का असते हो ?"
" अन्य दिवसांच्या तुलनेत भाव पडल्यादिवशी त्याच किमतीत वांग्याला २०-२५% कमी पैसे पडतात." त्यांनी आपले ’अर्थ’ ज्ञान (!) प्रकट केले.
" गणिताच्या दृष्टीने तुमचे हे विधान सत्य आहे." क्षणभर विचार करून मी उत्तरलो.
मी दोडके खातो नि वांगे नाही हे त्यांना चांगले ठाऊक आहे. ते कांहीशा आश्चर्यानंदाने उद्गारले,
" असे म्हणता ? हे कसे काय बुवा ?"
" शून्य गुणिले चौदा बरोबर किती ? " विषयाशी असंबद्ध वाटावा असा प्रश्न विचारला.
" शून्य ! शून्याला कोणत्याही संख्येने गुणले तरी उत्तर शून्यच येते." ते शालेय गणित विसरले नव्हते.
" वा ! अगदी अचूक ! अन्य कोणत्याही तिथीला पैशाचे आंतरिक मूल्य शून्य असते. त्यामुळे-- भाव पडल्यादिवशी इतर दिवसांच्या तुलनेत ते २५% जास्त असते-- हे विधान सत्य ठरते. कारण शून्याच्या १.२५ पट शून्यच. !"
ते रागारागाने म्हणाले, " आमच्या पैशांची तुम्ही चेष्टा करता."
" रागावू नका. मी सत्य तेच सांगितले."
" आमच्या भावना दुखावतात." असे म्हणून ते अर्थप्रेमी तरा-तरा निघून गेले.
सोमवारी कोथिंबिरिचा भाव इतर दिवसांच्या तुलनेत १.१० पट होता, उन्हाळ्यात १.५ पट होता, तर दिल्लिला ४ पट होता. बटाट्यांना पैशांत किंमत असते. ती दिवसाला तिनदा बदलते. पावसाळ्यात पालेभाज्यांच्या किमती कमी होतात. जास्वंदीच्या फुलाला किंमत असते. तुळशीला पण किंमत असते. अशा अनेक गोष्टींच्या किमतींचे नास्तिकांना ज्ञान असते. खरे तर "अर्थतत्त्वां" विषयींची ही सर्व विधाने असत्य आहेत. हास्यास्पद आहेत. हे कोणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने समजते. पण नास्तिक अशी विधाने सत्य मानतात. कारण ती अर्थव्यवस्थेशी निगडित असून पॉझिटिव्ह आहेत. म्हणून ती सत्य असणारच असा त्यांचा युक्तिवाद (!) असतो.
हे असले अर्थतत्त्व म्हणजे नेमके काय असते ? त्याचा शोध कोणी लावला ? कुठल्या अधिकृत वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाविषयी काही छापून आले आहे का? हे अर्थतत्त्व कोणत्या साधनाने (इंस्ट्रुमेंटने) मोजतात ? याच्या मापनाचे एकक (युनिट ऑफ मेझरमेंट) काय ? असा कोणताही प्रश्न नास्तिकांच्या मेंदूत उद्भवत नाही. कारण कशामुळे तरी त्यांची बुद्धी कुंठित झालेली असते. विचारशक्ती बधिर झालेली असते. खरे तर सजीव ज्या पदार्थाचे (मटेरियल: ऑक्सिजन, कर्बन , प्रोटॉन, बोसॉन, चुंबकीय क्षेत्रे, इ.) बनविलेली असते त्या पदार्थाचे गुणधर्मच त्या सजीवात असतात. रेणूंची संरचना बदलली तरी ते मूलत: निर्जीव रेणूसंचच राहतात. मूलद्रव्यांचा सुबक सजीव केला, आकर्षक रंग दिला. नंतर घरी अथवा घराबाहेर नेऊन बसवला. शास्त्रोक्त नियमांनी द्रव्यांवर प्रक्रिया केल्या तरी कोणतेही सजीतत्त्व त्या द्रव्यांत उद्भवत नाही. उद्भवणे शक्य नाही.* हे शत-प्रतिशत (शंभर टक्के) वैज्ञानिक सत्य आहे.*
पण नास्तिकांना वाटते की त्यांच्या शास्त्रज्ञांपाशी अतीन्द्रिय बुद्धी** असते. त्या बुद्धीने त्यांना पदार्थांचे गुणधर्म समजतात. त्यांचे मोजमापनही करता येते. शास्त्रज्ञांचा, अर्थशास्त्रज्ञांचा आणि नास्तिकांना मान्य असलेल्या सर्व व्यवस्थाकारण्यांचा अधिकार फार मोठा. ते जे सांगतात ते सत्य असतेच. ते काही काळाने मागे घ्यायची त्यांना पूर्ण मूभा असते. पण तोपर्यंत ते शिरसावंद्य मानलेच पाहिजे. जास्वंदीच्या फुलाला किंमत असते हे सुद्धा सिद्ध त्यांना कळते. विश्वाचे त्यांना आजपर्यंत जे आकलन झालेले आहे *** ते योग्यच असते आणि झालेले नसले तर भविष्यात होणारच असते. अशी त्यांच्या पायिकांची धारणा असते.
समजा एका मोठ्या दालनात शंभर चौरंगासने आहेत. त्यांवर शंभर रेडिओअॅक्टिव रेणू आहेत. त्यांतील दोन रेणूंचे विघटन झाले आहे. बाह्यत: सर्व रेणू एकरूप (म्हणजे अगदी सारखे) दिसत होते. तर कोणी तज्ज्ञ अणुशास्त्रज्ञ, प्रसिद्ध शास्त्रज्ञ, वैज्ञानिक द्रष्टा त्या शंभर रेणूंतील दोन विघटन होणारे कोणते हे अगोदरपासून नेमके ओळखू शकेल काय ? ते सर्व एकदम सारखेच होते ना त्यांच्या ज्ञानाप्रमाणे? हे ओळखणे अशक्य आहे. पदार्थाचे सारे गुणधर्म समान असल्याने त्यांत कोणतेही मूलभूत परिवर्तन झालेले नव्हता. कोणतीही विशिष्ट अस्थिरता आलेली नव्हती. पूर्वी होती तशीच ती इतरांसमान होती. रुग्णालयात एक व्यक्ति कोमामधे असते. तिच्यावर काही लोक लैंगिक अन्याय करतात. त्यावेळी ती व्यक्ति कोणताही प्रतिकार करीत नाही. दुष्ट गुन्हेगारांनी अनेकदा असं केलं, प्राण घ्यायचा प्रयत्न केला केला त्या समयी कुठल्याही कोमात गेलेल्या व्यक्तिने किंचित् देखील प्रतिकार केल्याचे एकही विश्वासार्ह वैज्ञानिक उदाहरण नाही. कोमात असताना सजीव एक जीवंत सजीव असतो असे नास्तिक केवळ बुद्धीने मानतात. वस्तुत: वैज्ञानिकांनी केलेली ही धूळफेक असते. नास्तिकांना फसवणे, बनवणे असते.
वस्तूंना मूल्य असते नि ते प्रत्येक सेकंदाला ते वाढते वा घटते. असली विधाने भंपक आणि धादान्त असत्य आहेत, हास्यास्पद आहेत. हे कुणाही सुबुद्ध व्यक्तीला कॉमनसेन्सने सहज समजते. असे असता अशी विधाने करण्याचे साहस या अर्थतज्ञांना मंडळींना होतेच कसे ? आपल्याला कोणी हसतील, आपली टर उडवतील अशी भीती त्या अर्थमार्तंडांना वाटत नाही काय ?
या प्रश्नाचे उत्तर ,"नाही. मुळीच नाही." असे आहे. कारण त्या मार्तंडांनी अनेक खोट्या गोष्टी, निरर्थक चमत्कारी मूल्यकथा, मालकीकथा, कायदाकथा नास्तिकांच्या डोक्यात भरवून भरवून त्यांचे मेंदू पुरते प्रदूषित केलेले असतात. नास्तिकांची बुद्धी बुद्धीनेच बरबटून टाकून संवेदनाहीन केलेली असते. ती बधिर झालेली असते. त्यामुळे ते बुद्धीवंत नास्तिक स्वबुद्धीने विचार करतील ही शक्यताच उरत नाही.आपण कोणतेही आणि कसलेही विधान केले तरी "तत्त्वनिष्ठ" नास्तिक माना डोलावणार, ते खरे मानणार, या विषयी त्या शास्त्रज्ञांना, अर्थव्यवस्थाकारण्यांना ठाम विश्वास असतो. म्हणूनच सर्वथा असत्य असलेली असली विधाने ते नि:शंकपणे करतात. त्यांचा विश्वास बुद्धीवंत नास्तिक सार्थ ठरवतात.
पदार्थाच्या आर्थिक मूल्याबद्दलची असली हास्यास्पद विधाने (वांग्याला किंमत असते. ते सोमवारी सवापट झाली. त्याचा नि त्याच्या कॅलरिफिक व्हॅल्यूचा वा लोहतत्त्वाचा संबंध तोच राहिला तरी बदलते, इत्यादि.) करण्याचे आणखी एक कारण संभवते. नास्तिक पाईक कितीही बुद्धीवंत असले तरी ते काही प्रमाणात मूर्ख असतात. कारण मानव प्राणी मूलत: मूर्ख प्राणी आहे. (http://www.coolnsmart.com/mistake_quotes/). ज्ञानाच्या भडिमारामुळे ही अल्प प्रमाणात बुद्धीमत्ता झाकोळते. पण ती कधी कधी डोके वर काढते. अशावेळी त्यांना आपल्या कृतीचे मूर्खपणाने समर्थन करता येईल असे कारण हवे असते. "निसर्गतः कोणत्याही गोष्टिला मालकी नसताना आपण इतक्या गोष्टींचे कायदेशीर आणि अदर्वाईज मालक कसे काय आहोत? आपल्या घराचे आपण मालक कसे? आपल्या शरीराचे मालक कसे? मालकी तर नैसगिक, वैज्ञानिक शब्द पण नाही.# " याचे कारण त्यांना हवे असते. "मूल्य, मालकी, कायदा, चलन, विश्वास आणि नैसर्गिक समानता नसलेल्या गोष्टींना समान मानणे या अजिबातच नैसर्गिक, वैज्ञानिक नसलेल्या गोष्टी एकत्र मानल्याशिवाय अर्थव्यवस्था चालत नाही" असे कुण्या अधिकारी (!) व्यक्तीने सांगितले (वा लपविले) की त्या नास्तिकांना आपल्या कृतीच्या समर्थनाचे कारण समजते. आणि त्यांची अर्थव्यस्थेवरबद्दलची समज अधिक दृढ होते.
यावर आमचे कांही मूर्खतावंत बांधव म्हणतील, "हो. आम्ही नास्तिक आहोत. वांग्याला, कोथिंबिरिला, दोडक्याला, अद्रकाला किंमत असते. तासाच्या महत्त्वानुसार ते बदलते हे सर्व आम्ही खरे मानतो. आमची तशी समज आहे. त्यासाठी आम्हांला पुरावा लागत नाही. आणि आम्ही ज्या ज्या गोष्टीचा ज्या पद्धतीनं जो जो पुरावा देतो तो योग्यच असतो. आमच्या पद्धतीत त्रुटी अशी काही नाहीच. तुम्हांला आमच्या या विज्ञानाचा कांही त्रास होतो का ?( उलट तुम्ही सोयीस्करपणे पाहिजे तेवढे त्याचे फायदे लाटता.) भारत हा प्रजासत्ताक देश आहे. इथे प्रत्येक नागरिकाला आपापल्या मूर्खता जोपासण्याचा, प्रयोग करण्याचा अधिकार आहे. आमच्या या विचार आणि प्रयोग पद्धतीत तुम्ही नाक का खुपसता ? तुम्हांला तसा अधिकार कोणी दिला आहे ? आमच्या ज्ञानाशी तुमचा काय संबंध ? तुम्ही विज्ञान पाळा असे आम्ही तुम्हांला कधी सांगतो का ? मग तुम्ही आमच्या मूर्खतेला दुर्दैवी का म्हणता ?
यावर माझे उत्तर असे की "किंमततत्त्वा"विषयींच्या या नास्तिकी स्वीकृतीला मीच हास्यास्पद म्हणायला हवे असे नाही. कुणाही सुबुद्ध व्यक्तीला त्या हास्यास्पदच वाटतील. एवढेच कशाला तुम्ही बुद्धीवंतांनी आपल्या डोक्यावरील पूर्वग्रहांचे गाठोडे खाली उतरवून जर शुद्ध तर्कबुद्धीने विचार केला तर तुम्हांलासुद्धा त्या हास्यास्पदतेची जाणीव होईल. जे सत्य आहे ते मी शब्दांत मांडले इतकेच. आपल्या प्रजासत्ताक देशात प्रत्येक नागरिकाला आपल्या बुद्ध्या जोपासण्याचा, प्रयोग करण्याचा संविधानदत्त अधिकार आहे तसा प्रत्येकाला आपली मते, आपले विचार, योग्य आणि सुसंस्कृत शब्दांत मांडण्यचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यही आहेच. मी लेखनशुचिता पाळतो. कुठेही असंस्कृत,असभ्य, असंसदीय शब्द वापरत नाही.
पण प्रजासत्ताक देशातील नागरिकांच्या संविधानदत्त अधिकाराच्या गोष्टी राहूं दे. माझं म्हणणं असं:
"आपण सर्व मानव (माणसे) आहोत. मानवता (माणुसकी ) हा आपणा सर्वांचा धर्म आहे. बेडुकता हा अजून एक धर्म आहे. भारत आपला देश आहे म्हणून "भारतीय " ही आपली जात आहे. ( तसेच पाकिस्तानी, चिनी, जपानी, अमेरिकी, रशियन, ब्रिटिश इ.सर्व जाती आहेत. आणि त्या मानू नयेत. थोडक्यात राष्ट्रियत्व म्हणजे जात असे म्हणता येईल. आणि जात पाळणे टाळावे.) म्हणून सारे भारतीय माझे बांधव आहेत. कारण आपल्याच जातीचे लोक जातबंधु असतात. सारे बेडूक माझे धर्मबांधव आहेत. हे मी मनापासून मानतो. माझ्या देशबांधवांनी अवैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे त्यांच्या हिताचे आहे. सध्याला ९९% अस्तिक देशाचा बोर्या वाजवत आहेत आणि १% आम्ही धुरा पेलून आहोत. म्हणून ते समाजाच्या आणि अंतत: देशाच्या हिताचे आहे; असे मला विचारान्ती पटते. हे प्रामाणिक मत माझ्या देशबांधवांना वैध मार्गांनी परोपरीने सांगण्याचा मला घटनादत्त अधिकार आहे. किंबहुना अवैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारणे आणि त्याचा प्रसार करणे हे जातपंचायतीच्या निवाड्यानुसार आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. त्याकरिता आपण घटनेतील धर्मस्वातंत्र्य इ काढून टाकले पाहिजे. शिवाय अर्थव्यवस्था देखिल बरखास्त केली पाहिजे."
हे थोडे विषयाला सोडून म्हणजे अवांतर झाले असे वाटते. म्हणून आपण पुन्हा मूळ विषयाकडे वळू. वांग्याचे आहारमूल्य, वस्तुमान, रासायनिक कंपोझिशन, रंग, चव, इ इ कोणी फुक्कट द्यावे इतके मूल्य नोटेमध्ये कोण्या एका "आर बी आय गव्हर्नर" नामक अज्ञात व्यक्तिने (जो आज पदावरही नसेल, हा भाग असो.) आडवीतिडवी सही मारल्याने संचारते काय? वा नोटेत वांग्यत्व संचारते काय? ते विशिष्ट ताशी अनेक टक्क्यांनी वाढू घटू शकते का ? तसेच नोटेवरच्या फाँटांत, सुरक्षा फिचरांत, चित्रांत, नाण्यांत, चेकबूकांत, सातबार्यांत, बाँड पेपरांत, इ इ वांगेपणा असतो का ? हे आपले मूळ प्रश्न होते. खरे तर हे प्रश्न हास्यास्पद आहेत. ते चर्चा करण्याच्या योग्यतेचे नाही. "हॅ:" या एकाच एकाक्षरी उदगाराने ते मोडीत निघतात. मग "अर्थतत्त्वांविषयीं हे पानभर लेखन कशाला केले ? " असा प्रश्न तुम्ही विचाराल. लेखनामागची भूमिका स्पष्ट केलेलीच आहे. देश बांधवांनी अवैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा. अवास्तव असत्य विधाने, क्लेम्स सत्य मानू नयेत. तुम्ही बुद्धिमान आहातच. ती बुद्धी वापरून "पदार्थ एकतर कणरुपात असेल अन्यथा तरंगरुपात. कण आणि तरंग ही भिन्न गोष्टींची नावे आहेत. एक पदार्थ एकाच वेळी कण आणि तरंग दोन्ही असतो. अ आणि ब या दोन भिन्न जागा आहेत. पदार्थ पैकी एकाच जागी असू शकतो. तरिही एकच पदार्थ एकाच वेळी अशा दोन भिन्न जागी असतो." या विधानांवर विचार करा. तरी तुम्ही या थिएटरचे अजून जस्ट तिकिट घेतले आहे. अख्खा पिच्चर बघितला तर डोके भंजाळून जाईल. शेवटी मनुष्याची बुद्धी आणि शास्त्रीय सत्य यांचा संबंध नाही असे सांगून तुम्हाला हाकललं जाईल. तुम्हांला हे खरे वाटते का ? कोणी मोठ्या अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे, इतर अनेक जण ते खरे मानतात म्हणून तुम्ही हे खरे मानत असाल तर तो सत्यवादी दृष्टिकोन नव्हे. स्वत:च्या बुद्धीने विचार करून जे पटते तेच खरे मानावे. त्यासाठी आपल्या अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर करावा. शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता अशा गोष्टींना सत्यशास्त्रात स्थान नाही. त्या सोडून द्याव्या. स्वबुद्धीचा आधार घ्यावा. त्यातच खरा आपल्या माणुसपणाचा सन्मान आहे.
समाप्त
========================================
* ही विधाने सायंटिफिक मेथडशी विसंगत आहेत.
** मानवी बुद्धी व शास्त्रीय सत्ये यांचे सध्याचे नाते यावर वाचन करावे.
*** मग त्यात किती का लोचे असेनात. अगदी सरळ धुडकावून लावावं असं देखिल काही का असेना.
# उद्या कोणी सोम्या हा हात तुमचाच कसा म्हणून घेऊन गेला तर?
=====================
मूळ लेखासाठी यनावालांचे आभार.
http://www.misalpav.com/node/41229
💬 प्रतिसाद
(20)
ग
गामा पैलवान
Mon, 10/16/2017 - 15:18
नवीन
मस्त विडंबन. खूप मेहनत घेतलेली जाणवते.
-गा.पै.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Mon, 10/16/2017 - 15:56
नवीन
ओढून ताणून केलेले विडंबन ...!!
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2017 - 16:01
नवीन
बघाणा! मलाही वाटलंच असं! आधीच बिचार्या मुळ लेखकाने ओढून ताणून लेखन केलं, आणी पुन्हा ह्यांची ओढाताण.
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Mon, 10/16/2017 - 20:32
नवीन
लेखक साहेब असं कधी कुणा खाटिकाला विचारलयं का? शुन्य गुनिले शुन्य? मटण फुकट देता का?
तुम्ही नाही विचारू शकत. कारण तिथे जिवाशी गाठ. :P
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Mon, 10/16/2017 - 19:58
नवीन
@ओढून ताणून केलेले विडंबन ...!! ››› प्लस वण.
बरेच कुंथावे लागलेले ऐहे. =))
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Tue, 10/17/2017 - 07:22
नवीन
त्याचं श्रेय मूळ लेखकाला जातं. मी मूळ लेखातले सगळे दोष मेंटेन केले आहेत - भारंभार दिशाहिन लिखाण, तर्कहिनता, बुद्धीहिनता, विचारहिनता - प्रामाणिकपणे. एकदम ओरिजनल क्वालिटी चे लेखन आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 10/17/2017 - 08:23
नवीन
अगदी हेच सांगायचं होतं. मूळ लेखाचा बाज ठेवणं मेहनतीचं काम आहे. अगदी माझंच उदाहरण आहे. या ठिकाणी माझा प्रतिसाद आहे. त्यातला ९ व्या क्रमांकाचा मुद्दा पहिला तर वरवर साद आणि प्रतिसाद एकंच भासतात. कारण शब्दांकन एकसारखं आहे. परंतु शब्द तसेच ठेवून नवं उदाहरण शोधणं जिकिरीचं काम होतं.
-गा.पै.
- Log in or register to post comments
द
दाह
Wed, 10/18/2017 - 11:43
नवीन
पूर्णपणे सहमत. उगाच तारेवरची कसरत करून लिहिलेला लेख. च्युईंगम चघळून कंटाळा आल्यावर ते हातात घेऊन उगाच ताणत बसतात लहान मुलं तशातला प्रकार वाटला.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/16/2017 - 15:59
नवीन
खरंच मस्त! :-)
- Log in or register to post comments
य
यश राज
Mon, 10/16/2017 - 16:23
नवीन
छान विडंबन..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 10/16/2017 - 17:33
नवीन
मस्त विडंबन! आवडले.
- Log in or register to post comments
क
कोण
Tue, 10/17/2017 - 15:17
नवीन
खरोखर खुप मेहनत घेतली आहे.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 10/17/2017 - 19:32
नवीन
रसना तृप्तीच्या नावाने मानवी समूहाने जितक्या भाज्या , धान्यं फस्त केल्या आहेत त्यापेक्षा इतर कुठल्याही प्राणी संस्थेने केल्या नसाव्यात. तेंव्हा या उदरभरण संकल्पनापेक्षा त्यांचे परिणामच अधिक भयानक झालेत.
पुन्हा कधितरीच
- Log in or register to post comments
म
मारवा
Wed, 10/18/2017 - 10:38
नवीन
एक रहस्य सांगावे म्हणून, फुले पाकळ्या उघडतात,
तेव्हा समस्त आस्तिक तिथेच पोहोचलेले असतात फुलांच्या परडया घेऊन.
द.भा. धामणस्कर
- Log in or register to post comments
A
arunjoshi123
Wed, 10/18/2017 - 11:04
नवीन
एक रहस्य सांगावे म्हणून, उंदिर उड्या मारतात,
तेव्हा समस्त नास्तिक तिथेच पोहोचलेले असतात रसायनांची इंजेक्शन्स घेऊन.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 10/18/2017 - 14:00
नवीन
एक रहस्य सांगावे म्हणून, आस्तिक कुठे जातात
तेव्हा समस्त नास्तिक तिथेच पोहोचलेले असतात बुरसटलेले विचार घेऊन.
- Log in or register to post comments
य
यश राज
Wed, 10/18/2017 - 14:04
नवीन
जबरा...
- Log in or register to post comments
म
मूकवाचक
Fri, 10/20/2017 - 11:45
नवीन
ईश्वरत्वाची प्रचिती देत, इंद्रधनुष्य सप्तरंग उधळते,
तेव्हा समस्त नास्तिक तिथेच पोहोचलेले असतात काळपट तर्कांच्या पिचकार्या घेऊन.
- मूकवाचक
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 10/18/2017 - 18:04
नवीन
नास्तिकांचे आठवावे ढोंग ।
नास्तिकांचा आठवावा दंभ ।
नास्तिकांचा आठवावा अहंकार ।
भूमंडळी ।।१।।
नास्तिकांचे कैसें बोलणें ।
नास्तिकांचे कैसें टोमणें ।
नास्तिकांची बढाई मारणे ।
कैसी असे ।।२।।
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Wed, 10/18/2017 - 21:53
नवीन
काव्य भलतंच भावलं. पण सगळे नास्तिक नसतात हं असे.
-गा.पै.
- Log in or register to post comments