कॅशलेस अर्थव्यवस्था आणि चोरी/भ्रष्टाचार
साधारण चार महिन्यांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी ऑफिसमधून घरी परतत होतो आणि कुर्ला स्टेशनवर नव्या मुंबईकडे जाणार्या लोकल ट्रेनची वाट बघत होतो. बर्याचदा संध्याकाळी भूक लागली की मी स्टेशनवरून खायला एखादा बिस्किटाचा पुडा घेतो.त्याप्रमाणे त्या दिवशी मी एक बिस्किटाचा एक पुडा घेतला. तो पुडा होता १० रूपयाचा. मी त्या स्टॉलवाल्याला १०० ची नोट दिली. वरचे पैसे परत देताना त्याने ५० ची एक नोट दिली आणि २० रूपयाच्या दोन नोटा दिल्या. तेवढ्यात माझी गाडी आली त्यामुळे त्या नोटा घेऊन घाईघाईतच मी गाडीत चढलो. नंतर लक्षात आले की त्या ५० रूपयाच्या नोटेला एका बाजूला पूर्ण भागावर लाल रंग लागला होता आणि त्यामुळे कोणीही ती नोट घेणे शक्य नव्हते. दुसर्या दिवशी मी त्या स्टॉलवाल्याला त्या नोटेविषयी विचारले असता त्याने अपेक्षेप्रमाणे ती नोट दिल्याचेच नाकारले. विनाकारण ५० रूपयाचा खड्डा पडला.
हा प्रकार म्हणजे माझी झालेली फसवणूकच होती. त्याची चांगली ४ दिवस चुटपुट लागून राहिली होती. वास्तविकपणे ५० रूपये ही ४ दिवस चुटपूट लागावी इतकी मोठी रक्कम होती का? नक्कीच नाही. तरीही चुटपूट लागायची ती लागलीच. आपल्या चुकीने पैसे गमाविण्यापेक्षा दुसर्या कोणी फसविल्यामुळे पैसे गमावायला लागले त्याचे दु:ख कितीतरी जास्त असते. ते कारण होते का? तर तसेही वाटत नाही. कारण अशाप्रकारे इतर कोणी फसविल्यामुळे यापूर्वीही असे पैसे गमावले होते आणि त्यावेळी इतकी चुटपूट लागली नव्हती. अशाप्रकारची दोन उदाहरणे पटकन लक्षात आली. पहिले उदाहरण होते २००८ मधील. माझ्या आईच्या फोनवरील प्रिपेड कार्ड रिचार्ज करायला मी आय.सी.आय.सी.आय बँकेच्या खात्यातून १०० रूपये ऑनलाईन बँकिंगद्वारे भरले होते. माझ्या खात्यातून पैसे तर गेले पण रिचार्ज शेवटपर्यंत झालेच नाही. बँकेत विचारले तर ते म्हणत होते की फोन कंपनीला विचारा आणि फोन कंपनी म्हणत होती बँकेला विचारा. मधल्यामध्ये माझे मात्र नुकसान झाले. २००८ मधील माझी एकूण परिस्थिती आणि उत्पन्न लक्षात घेता त्यावेळच्या १०० रूपयांचे मला २०१७ मधील ५० रूपयांपेक्षा कितीतरी जास्त महत्व होते. तरीही त्या फसवणुकीची मला ४ दिवस चुटपूट लागल्याचे लक्षात नाही. दुसरे उदाहरण म्हणजे २०१५ मधील. फोनवर मी यु.टी.एस म्हणून एक अॅप डाऊनलोड केले होते. त्या अॅपद्वारे फोनवर मुंबईतील लोकल ट्रेनची तिकिटे काढता येतात. फोनवरील जी.पी.एस वरून आपण नक्की कुठे आहोत हे ट्रॅक करून आपण जर स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असू तर तिकिट फोनवर काढता येईल असे त्या अॅपविषयी ऐकले होते. त्या अॅपवरील वॉलेटमध्ये मी २०० रूपये टाकले. माझे घरही स्टेशनच्या १ किलोमीटर त्रिज्येच्या अंतरात असल्यामुळे माझी कल्पना होती की मला घरूनही तिकिट काढता येईल. अगदी घरून नाही तरी स्टेशनला जात असताना तरी तिकिट नक्कीच काढता येईल अशी माझी अपेक्षा होती. पण कुठचे काय. कुठेही असले तरी 'स्टेशनच्या जवळ जा आणि मग तिकिट काढा' हेच पालुपद त्या अॅपने चालू ठेवले. शेवटी वैतागून मी ते अॅप अन-इन्स्टॉल करून टाकले. अर्थातच त्या अॅपच्या वॉलेटमधील २०० रूपयेही गेले. या गोष्टीची मला किती वेळ चुटपूट लागली होती? तर फार वेळ नाही.
या तीन उदाहरणात झालेली फसवणुक हा एक समान घटक असला तरी एक महत्वाचा फरक आहे. पहिल्या उदाहरणात मी रोख पैसे दिले होते आणि मला फटका बसला होता तो रोख स्वरूपात बसला होता. तर उरलेल्या दोन उदाहरणात बसलेला फटका कॅशलेस होता. हा फरक वगळता तीनही उदाहरणात फार फरक नव्हता. उलट बसलेल्या फटक्याची रक्कम पहिल्या उदाहरणात बरीच कमी होती तरीही त्याची चुटपूट मला कितीतरी जास्त प्रमाणात लागली होती.
हे का होत असावे? कुर्ला स्टेशनवर फटका बसण्यापूर्वी मी एम.आय.टी चे प्राध्यापक डॅन एरिअली यांचे Predictably Irrational हे एक नितांतसुंदर पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकात त्यांनी केलेल्या प्रयोगाचा उल्लेख केला आहे. त्यांनी एम.आय.टी च्या विद्यार्थ्यांच्या डॉर्ममधील फ्रिजमध्ये एक डॉलर किंमतीच्या दहा कोकच्या बाटल्या ठेवल्या. आठवड्याभराने त्यांनी त्या बाटल्या तिथे आहेत का हे तपासले असताना एकही बाटली तिथे राहिली नव्हती. याचाच अर्थ कोणीतरी त्या बाटल्या लंपास केल्या होत्या. दुसर्या प्रयोगात त्याच फ्रिजमध्ये त्यांनी एक डॉलरच्या दहा नोटा ठेवल्या. आठवड्याभराने परत तपासले असताना त्यांना आढळले की सगळ्या नोटा जिथल्या तिथे होत्या. एकही नोट लंपास झाली नव्हती. म्हणजेच एक डॉलर किंमतीच्या कोकच्या बाटल्या हातोहात लंपास झाल्या पण नोटा मात्र जशाच्या तशा राहिल्या. एक डॉलरच्या कोकच्या बाटलीची चोरी करण्यात संबंधित व्यक्तींना आपण फार काही वावगे करत आहोत असे वाटलेही नसावे पण एक डॉलरच्या नोटेची चोरी करताना मात्र ती नोट घेऊन आपण काहीतरी चुकीचे करू असे त्यांना नक्कीच वाटले असणार. अन्यथा त्या नोटा तशाच तिथे राहिल्या याची कारणमिमांसा देता येणार नाही. याचा अर्थ काय?प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात की रोख रक्कम आणि तितक्याच किंमतीची वस्तू या दोन गोष्टींविषयी आपली मानसिकता वेगळी असते. जेव्हा रोख रकमेचा संबंध असतो तेव्हा आपल्या विवेकाची अधिक टोचणी आपल्याला लागते. पण एखादी गोष्ट जितक्या प्रमाणात रोख स्वरूपापासून दूर जाते तेवढ्या प्रमाणात आपल्या विवेकाचे आपल्यावरील नियंत्रण कमी होत जाते.
कुर्ला स्टेशनवरील त्या घटनेनंतर मला जाणवले की नुसत्या चोरीच्या बाबतीत नाही तर नुकसानीच्या बाबतीतही नेमके असेच घडत असावे. म्हणजे रोख नुकसान झाल्याची चुटपूट आपल्याला कॅशलेस नुकसान झाल्यापेक्षा जास्त लागते का? बहुतेक तसेच असावे. अर्थात माझ्या या लेखाचा विषय नुकसान हा नाही तर भ्रष्टाचार (म्हणजे चोरीच) हा आहे. ही घटना त्या दृष्टीने विचार करायला लावणारा केवळ एक ट्रिगर होता.
मी त्या पुस्तकातील संबंधित भाग परत एकदा वाचून काढला. कुर्ला स्टेशनवरील घटना घडण्यापूर्वी केवळ एक चांगला (आणि मनोरंजक) अभ्यास यापेक्षा जास्त महत्व मी त्या भागाला देत नव्हतो. त्यातील अनेक गोष्टी नंतर अधिक प्रमाणात पटायला लागल्या. प्राध्यापक डॅन एरिअली म्हणतात त्याप्रमाणे आपण ऑफिसच्या स्टेशनेरीमधून पेन घेतले आणि आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले असे किती वेळा होते? ऑफिसचे पेन घेऊन ते आपल्या स्वतःच्या कामांसाठी वापरले तरी ती कंपनीमधून केलेली चोरीच असते. तरीही आपण तसे करताना काही चुकीचे करत आहोत हा विचारही आपल्या मनाला बर्याचदा शिवत नाही. समजा आपण घेतलेले पेन १० रूपयांचे आहे असे धरून चालू. आपल्यापैकी किती जण कंपनीमधील पेटी कॅशमधून १० रूपयाची नोट उचलून ती आपल्या खिशात घालतील? मला वाटत नाही की आपल्यापैकी कोणीही तसे करेल. म्हणजेच काय तर रक्कम सारखीच असली तरी तेवढ्याच रकमेच्या नोटेची चोरी करायचा आपण विचारही करू शकणार नाही. याचे कारण आपली विवेकबुद्धी रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेली गोष्ट यांच्यात फरक करते.
मी नक्की कोणत्या रोखाने बोलत आहे हे एव्हाना मिपाकरांच्या लक्षात आलेच असेल. एखादी गोष्ट जेवढी रोख रकमेपेक्षा दूर जाते तितक्या प्रमाणात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण कमी होते. बरं आतापर्यंत मी जी उदाहरणे दिली आहेत त्यातील रक्कम किरकोळ होती (५० रूपये, १० रूपये इत्यादी). मोठ्या रकमेचा संबंध असेल तर आपली (आपली म्हणण्यापेक्षा माणसाची) विवेकबुध्दीची टोचणी जास्त लागून ती चोरी टाळण्याकडे कल असेल का? असेलही कदाचित. प्राध्यापक डॅन एरिअलींनी आणखी एक प्रयोग केला होता आणि त्यात निष्कर्ष निघाला की संधी मिळाल्यास आणि पकडले जाणार नाही याची बर्यापैकी खात्री असेल तर बहुतांश लोकांचा फसविण्याकडे कल असतो. पण असे फसविणे अमर्याद नसते. म्हणजे बहुसंख्य लोकांचा फसविण्याकडे कल जरी असला तरी ते मऊ लागले म्हणून कोपरापासून खणत नाहीत आणि थोडेसेच फसवितात. याचे कारण काय---तर एका मर्यादेपेक्षा जास्त फसवणुक करताना माणसाच्याच विवेकबुध्दीची टोचणी लागते असे म्हणायला हरकत नसावी. म्हणजे हा निष्कर्ष म्हणजे मी म्हणत आहे त्याचा विरोधाभास झाला का? वरकरणी तसे वाटू शकेल. पण यातही काही गोष्टींचा विचार करायला हवा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'एका मर्यादेपेक्षा कमी' ही बरीच फसवी संकल्पना आहे. समजा ५ रूपयांची चोरी ही ती मर्यादा असेल आणि ती एकदा गाठल्यावर ५ रूपयांची मर्यादा वाढून १० मग २० मग ५० मग १०० रूपये व्हायची शक्यता आहेच. आपल्यासारख्यांना (किमान माझ्यासारख्यांना) चोरी करायचीच असेल तर फार तर एखादे पेन चोरणे किंवा गेलाबाजार खोट्या रिसीट्स देणे, इकॉनॉमी क्लासने जाऊन बिझनेस क्लासचे तिकिट घेणे यापेक्षा फार मोठी उडी सध्या तरी मारता येणार नाही. पण मोठ्या अधिकाराच्या व्यक्तींकडे चोरी करायच्या बर्याच जास्त संधी उपलब्ध असतात. आणि जर का 'एका मर्यादेपेक्षा जास्त' चोरी करायची नसेल तरी ती मर्यादा अमर्याद वाढू शकेल इतके अधिकार आणि संधी त्यांच्याकडे असतात. याचे सर्वात योग्य उदाहरण म्हणजे एनरॉनचा घोटाळा.कॉर्पोरेट अमेरिकेमधील २००१ मधील तोपर्यंतचा हा सर्वात मोठा घोटाळा होता. हा घोटाळा काही शे बिलिअन डॉलर्सचा होता. अर्थातच इतका घोटाळा काही एका रात्री झालेला नाही. अकाऊंटिंगमधील घोटाळे त्यापूर्वी कित्येक वर्षे सुरू झाले होते. आपली चोरी पकडली जात नाही म्हटल्यावर हळूहळू धीर चेपून आधीचे घोटाळे पचवून केनेथ ले आणि इतरांनी अधिकाधिक मोठे घोटाळे केले असतील हे म्हणायला नक्कीच जागा आहे. भारतातही रामलिंग राजूने सत्यममध्ये प्रत्यक्षात कंपनीत कामाला नसलेले १२ हजार कर्मचारी दाखवून त्यांचे खोटे सॅलरी अकाऊंट तयार करून त्या खात्यांमध्ये येणारे पैसे स्वतःच्या खिशात घातले होते असे म्हणतात. आता रामलिंग राजूने अशी चोरी एका रात्रीत सुरू केली का? तसे वाटत नाही. सुरवात कदाचित १०० खोट्या सॅलरी अकाऊंटमधून झाली असेल. मग हळूहळू धीर चेपून आणखी खोटे अकाऊंट त्याने तयार केले असतील हे म्हणणे अधिक सयुक्तिक वाटते. तेव्हा 'एका मर्यादेपेक्षा' जास्त मोठी चोरी करताना विवेकबुध्दीची टोचणी लागते हे म्हणणे 'त्या मर्यादेपर्यंतच' लागू ठरेल. महत्वाची गोष्ट म्हणजे ती मर्यादा अधिकाधिक वाढत जायची शक्यता आहेच.
आपल्यापैकी कोणी मोठा रामलिंग राजू होईल याची शक्यता फारच थोडी. पण माझा मुद्दा हा आहे की असे छोटे रामलिंग राजू आपल्या अवतीभोवती (कदाचित आपल्यातच) लपलेले असतात. मी अमेरिकेत असताना (२००३ मध्ये) मी ज्या विद्यापीठात होतो त्या विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना डॉट. कॉम क्रॅशमधून नुकत्याच सावरणार्या अमेरिकन अर्थव्यवस्थेत भारतातील पूर्वीचा आय.टी अनुभव नसेल तर नोकरी मिळणे कठिणच होते. खोटे सी.व्ही बनविणार्या एजंटांचे प्रस्थ त्यावेळी तितक्या प्रमाणात आमच्या विद्यापीठात आलेले नव्हते. अशावेळी अनेक भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत नोकरी न मिळाल्यामुळे भारतात परत जावे लागले होते. जाताना अशा अनेकांनी क्रेडिट कार्डावरील बिले न भरताच भारतात प्रयाण केले होते (काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही रक्कम एकापेक्षा जास्त कार्डांवर मिळून १० हजार ते १५ हजार डॉलर्सपर्यंत होती) हे भारतीय विद्यार्थ्यांच्या कम्युनिटीमध्ये अगदी उघडे गुपित होते. अशा काही विद्यार्थ्यांना मी स्वतः ओळखतो. त्यांनी १० ते १५ हजार डॉलर्स काय तर इतरांचे १० रूपयेसुध्दा रोखीमध्ये चोरले नसते. तरीही असे काही हजार डॉलर्स चोरण्यात आपण काही चुकीचे करत आहोत ही जाणीव त्यांच्याकडे असली तरी ती जाणीव ती कृती करण्यापासून रोखण्याइतकी प्रबळ नव्हती. वॉलमार्टमध्ये एखादी वस्तू वापरायची आणि मग ती परत करायची असे करणारे लोक आपणही आजूबाजूला बघितले असतीलच. ती पण एका अर्थी चोरी झाली नाही का? पण तरीही असे लोक २०-५० डॉलरची रोखीत चोरी कधीच करणार नाहीत हे आपल्यालाही जाणवेलच. एनरॉन घोटाळ्यात समजा अमेरिकेतील प्रत्येक माणसामागे सरासरी १०० डॉलर्सचे नुकसान झाले असे समजू. केनेथ ले आणि इतरांनी रस्त्यात दिसलेल्या कोणाही माणसाचे पाकिट मारून त्यातील १०० डॉलर्स चोरले असते हे जरा असंभवनीयच वाटते.
आता वळू कॅशलेस जगताकडे. मागच्या वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी जाहिर केली आणि त्यामागे कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देऊन भ्रष्टाचार कमी करणे हे एक कारण आहे असे म्हटले गेले होते. पण माझा दावा असा आहे की वर दिलेल्या उदाहरणांवरून आपल्याला दिसते की रोख रक्कम आणि रोख रकमेपेक्षा दूर असलेल्या गोष्टी (वस्तू किंवा ऑनलाईन नेटबँकिंगद्वारे केलेले व्यवहार) यांच्यात आपल्याच विवेकबुध्दीचे आपल्यावरील असलेल्या नियंत्रणाचे प्रमाण वेगळे असते. अशावेळी समजा सगळे व्यवहार कॅशलेस झाले (भारतात सध्या तरी तसे होणे कठिणच आहे पण समजा अजून ५० वर्षांनी ते शक्य झाले) तर भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढू शकेल का? आपण अगदी लहानपणापासून रोख रकमेला पैसा म्हणूनच ओळखतो आणि वर दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल की ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारांमध्ये आपल्या विवेकबुध्दीचे आपल्यावरील नियंत्रण रोख रकम हाताळताना असते तितक्या प्रमाणात नसते. तरीही आपल्यावर ऑनलाईन/कॅशलेस व्यवहारात विवेकबुध्दीचे जितके कितके नियंत्रण असते त्यात 'हा पण पैसाच आहे' ही भावना असेल का? आणि जर मुळात रोख रक्कम हाताळलीच नाही तर 'हा पण पैसाच आहे' ही भावना आणखी कमी होऊ शकेल का? सुरवातीला जर लहान कॅशलेस चोरी केलेली पकडली गेली नाही म्हणून धीर चेपत मोठ्या चोर्या व्हायला लागल्या आणि मुख्य म्हणजे रोख रक्कमेचा संबंध नसेल तर अजून जास्त मोठे घोटाळे केले जायची शक्यता आहे का?
कोणी म्हणेल की अकाऊंटिंग मधील घोटाळे पहिल्यापासूनच 'कॅशलेस' होते. मग कॅशलेस अर्थव्यवस्था आणल्यामुळे त्यात होणार्या भ्रष्टाचारात काय मोठा फरक पडेल? त्यावर माझे म्हणणे असे की जर पूर्ण कॅशलेस व्यवहार झाल्यास पूर्वीपेक्षा अधिक लोकांना असे घोटाळे करायची संधी मिळेल कारण पूर्वी असे मार्ग मोठ्या पदांवरील लोकांनाच खुले होते पण सगळे कॅशलेस झाल्यास नेटवर्क आणि आय.टी यामुळे जास्त लोकांना तो मार्ग खुला होईल. त्यातच रोखीत व्यवहार नसतील तर अनेक लोकांच्या विवेकबुद्धीचे नियंत्रण ढिले पडेल. हे करता येणे कसे शक्य होईल? मी काही चोर नाही त्यामुळे असे करता येणे कसे शक्य होईल याविषयी माझ्या कल्पनाशक्तीची उडी मर्यादितच असेल. तरीही आपण जिथेजिथे पैसे भरतो (स्टोअरमधून सामान विकत घेताना किंवा अन्य कुठेही) तिथेतिथे संबंधीत व्यवसाय करणार्या कंपनीला आपल्याला गंडा घालायची संधी अधिक प्रमाणात मिळेल ही भिती आहे.आपण महिन्याभरात कित्येक व्यवहार करत असतो. समजा हे सगळेच व्यवहार कॅशलेस असतील तर त्याचे कुठेतरी (बँक खात्यात किंवा क्रेडिट/डेबिट कार्डात) स्टेटमेन्ट येईल. असे कित्येक व्यवहार असतील तर काही व्यवहारात आपल्याला गंडा घातला गेला तरी तो आपल्याला लक्षातही येणार नाही. आणि त्यातून सगळे कॅशलेस असेल तर गंडा घालणार्यावर त्याच्या विवेकबुध्दीचे नियंत्रण काही प्रमाणावर ढिले पडलेले असेल ही शक्यता आहे आणि कॅशलेस गंडा पडल्यास आपल्यालाही त्याविषयी तितक्या प्रमाणावर दु:ख न वाटल्यास आपणही ते प्रकरण तडीस न्यायचा प्रयत्न करूच असेही नाही. असा गंडा घालण्यासाठी फार काही करायला लागेल का? कदाचित आय.टी सिस्टिममध्ये बॅक-एन्डला थोडे फेरफार केले तरी तसा गंडा घालता येऊ शकेल.
आतापर्यंत असे घोटाळे करणार्यांनी घोटाळे करायचे नवेनवे मार्ग शोधून काढले आहेतच. १९९५ मध्ये नीक लिसन या एकट्या ट्रेडरने २३० वर्षे जुनी बेरिंग्ज बँक बुडवली. ज्या ट्रेडमध्ये तोटा होईल असे ट्रेड तो ८८८८८८८८ या खोट्या खाते क्रमांकात तो पोस्ट करत असे आणि ज्या ट्रेडमध्ये फायदा होईल असे ट्रेड तो कंपनीच्या अकाऊंटमध्ये पोस्ट करून कंपनीला मोठा फायदा करून दिल्याचे श्रेय घेऊन स्वतः गलेलठ्ठ बोनस घेत असे. जोसेफ जेट या ट्रेडरने किडर पीबॉडी कंपनीतील सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या बगचा गैरफायदा उठवून कंपनीने न केलेला फायदा दाखवून त्यानेही त्याचे श्रेय स्वतःकडे घेऊन असाच गलेलठ्ठ बोनस घेतला होता. नीक लिसन आणि जोसेफ जेट यांचे ग्रह फिरले म्हणून त्यांचे कृत्य उघडकीस आले. पण कदाचित त्यांच्या नंतरच्या ट्रेडमध्ये फायदा झाला असता तर ते आपले चोरीचे कृत्य लपवूही शकले असते आणि ते कोणाला समजलेही नसते. आजही असे किती नीक लिसन आणि जोसेफ जेट आहेत कुणास ठाऊक. माझी भिती ही आहे की सगळ्या गोष्टी कॅशलेस झाल्यास पूर्वी मूठभर ठिकाणी अशा फसवणुक करायच्या संधी उपलब्ध होत्या त्या इतर अनेकांना उपलब्ध होतील. त्यातून रोखीत व्यवहार कधी केलेच नसतील आणि त्यामुळे विवेकबुध्दीचे नियंत्रण ढिले पडले तर त्यामुळे अधिक प्रमाणावर आणि वेगवेगळ्या पध्दतीने भ्रष्टाचार होऊ शकेल ही भिती वाटते. घोटाळे करणारे प्रत्येकवेळी नवीन नवीन मार्ग शोधून काढतीलच. तो मार्ग आजही उपलब्ध असला तरी सध्या रोखीत व्यवहार केल्यामुळे काही प्रमाणात तरी विवेकाची टोचणी असते. तीच जर का कमी झाली तर मात्र मोठ्या समस्या निर्माण होतील ही भिती वाटते.
कदाचित हे सगळे स्वप्नरंजन असेलही.कदाचित यापैकी काहीही प्रत्यक्षात उतरणारही नाही. तसे झाल्यास फारच उत्तम. पण असे व्हायची शक्यता आहे का? याविषयी आपले मत काय?
म्हणजे आज बार्टर सिस्टीम मध्ये समाज असता तरी घोटाळे कमीच झाले असते नाही का ?/code> असाच काहीसा व्यवहार मी करायला गेलो होतो :)