चार कोटी रुपये .......
गाभा:
चार कोटी रुपये .......
"शेअर मर्केटमधून पैशांचा पाऊस ! भोंदू ब्रोकरने व्यावसायिकाना चार कोटी रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी कोल्हापूर म.टा.(०१-११-२०१७) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
कोल्हापुरात अनेक डॉक्टर आहेत. ते डॉ. असणार म्हणजे त्यांच्याकडे किमान बुद्धी आणि पैसा असणारच. त्यांच्याकडे गुन्तवणुकदारांचे, बँकवाल्यांचे येणे- जाणे असते. क्षक्षक्ष नावाचा शेअर ब्रोकर त्या डोक्टरांकडे आला. "तुम्हांला धंद्यात चांगली प्राप्ती आहे, मी शेअर मार्केट नावाचा अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने प्रत्येकाडे काही लाख रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "नफा होत आहे, पण अजून पैसे गुंतवल्याशिवाय अधिक धन येणार नाही. इन्वेस्टमेंट करावी. " अशी बतावणी करूवीआणखी पैसे घेतले.
त्यानंतर ब्रोकर कुंभ घेऊन आला. त्यातून काही हजाराचा पाडून दाखविल्या. अधिक पैसे पडेनात. "तुम्हाला अधिक रिस्क घ्यायला हवी.. आता फ्युचर मध्ये जाउन मोठा विधी करायला हवा. आणखीन रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास आहेत ते पण संपतील" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून आणखीन पैसे दिले. त्यानंतर ब्रोकरने आणखीन क्षक्ष लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "थोडा लॉस झाला आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर अकाउंटचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.
कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा ब्रोकर कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी ब्रोकरविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पुढे काय झाले माहीत नाही बातमी नवीन आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
सदर डॉक्टर हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला काहीलाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे हे बुद्धिमान आहेत. ते अनुभवी देखील आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे काही लक्ष रुपये एक शेअरब्रोकर लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या ब्रोकरने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. डोक्टरांनी जवळजवळ त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार करूनदेखील काही उपयोग झालेला नाही हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.
असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे शेअरबाजारावरआणि त्याच्याशी संबंधित विषयांवर डोक्टरांची असलेलीश्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. शेअर खाली पडला की घ्यावा.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.माझा शेजारी घेतो म्हणजे तो चांगलाच असणार.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.आज मार्केट पडले तरी उद्या वर जाइल.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.आज जर घेतला नाही तर परत कधीच घेता येणार नाही.)
प्रस्तुत प्रकरणात डॉक्टरांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, पैसा निष्ठापूर्वक गुंतवलेला आहे. आता बाजार माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते बाजाराची प्रतीक्षा करीत होते. डोक्टर्स अनेक इन्व्हेस्टमेंटवाल्यांना भेटत होते. शेवटी हा ब्रोकर न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हाला शेअरबाजाराचा अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. डॉक्टरांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला बाजारानेच पाठविले आहे. त्याने पैसे मागितले. यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. यांना वाटले बाजार आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. बाजाराच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? बाजार आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. बाजाराने पाठविलेला हा ब्रोकर मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी काही लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे शेअर ब्रोकर श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे मोठे लोक सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी ब्रोकर विरुद्ध वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली.. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. डॉक्टरांनी शेअरब्रोकरकडे श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण ब्रोकरकडे गेले. त्यामुळे तो ब्रोकर सांगेल ते सत्य मानून डॉक्टर त्याच्या आज्ञा पाळत गेले. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचा ब्रोकर अशी बुवाबाजी करणारा नव्हेच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************
असो -
प्रेरणा अर्थात आहेच.. परवा मटा चाळताना सहज ही बातमी वाचली होती. मग मिपावरचा एक लेख वाचला आणि हे किती कोरिलेट होते ते क्लिक झाले, म्हटले लिहुया. पण त्या धाग्यावर इतकी राळ उठली, की तिथे चर्चा होणे अशक्य होते. म्हणून धागा काढला.
मुद्दा असा आहे, की इथे जे काही झाले ते तर सरळ सरळ कायदेशीर होते. डो़टरांनी कितीही ठरवले तरी ते त्या ब्रोकरचे शष्प वाकडे करू शकणार नाहीत.
या श्रद्धांचे आपण काय करणार?
वरील ठिकाणी झालेला फ्रॉड हा तर कायदेशीर आहे, लोक दिवसाउजेडी कागदोपत्री फसले आहेत. मग यासाठी कोनात्या देवाला जबाबदार धरणार?
टीप - मी श्रद्धाळू आहे, पण त्याप्रकारे काही ठिकाणी बादरायण संबंध जोडून सुबुद्ध लोकांच्या श्रद्धांची टिंगल उडवली जाते, हे बघून वाईट वाटावे, राग यावा की कीव यावी काही कळत नाही. स्वतःला बुद्धीवादी म्हणवणार्या लोकांकडून तरी अश्या ठिसूळ लेखनाची अपेक्षा नाही. अधिक काय लिहिणे, वाचक सूज्ञ आहेतच.
काही तपशीलाचा चुका राहून गेल्या असल्यास क्षमस्व. रेफरन्ससाठी ही बातमी https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/kolhapur-fraud-doctors-in-trouble/articleshow/61375830.cms
तुमच्या मतानुसार अंधश्रद्धा फक्त अध्यात्मातच असते का?मटा सारख्या वर्तमानपत्रात छापली गेलेली घटना सत्यच असणार यावर अंधविश्वास ठेवणे हीसुद्धा तथाकथित बुद्धिवाद्यांची अंधश्रद्धाच आहे.